नवी सुरुवात राजमाचीहून परत आल्यावर तीन-चार दिवस अगदी सुट्टीतल्या धुंदीत गेले. गाडीतून येताना खिडकीबाहेर मागे पडणारे डोंगर बघत होतो, पण मन मात्र अजून त्या शेकोटीजवळच रेंगाळत होतं. डोळे बंद केले की अजूनही तो धबधब्याचा आवाज कानात घुमायचा, ओल्या मातीचा तो वास नाकात रेंगाळायचा, आणि अन्वीचा तो शेकोटीजवळचा हसरा चेहरा डोळ्यासमोर यायचा. घरी पोचल्यावर आईने विचारलं, काय रे, कसा झाला ट्रिप? इतका खुश का दिसतोयस? मी नुसतंच हसून छान झाला म्हणालो. मनातलं सगळं सांगायची अजून वेळ आली नव्हती. सोमवारी परत ऑफिसला जायचं म्हणून मन काही केल्या तयार होत नव्हतं. सुट्टीचा शेवटचा दिवस, रविवारी संध्याकाळी, यशचा फोन आला. काय रे, कसं वाटतंय