दुःखी.. - 11

  • 5.7k
  • 2.1k

वालजी लिलीला भेटायला गेला. तो अंमलदार गाडीत होता. आकाशात आता चंद्र उगवला होता. अंधारात आकाशातील प्रकाश आला. तो अंमलदार विचारू करू लागला, 'या वालजीला का मी पुन्हा पकडू? पुन्हा त्याला जन्मठेप मिळेल. कितीदा पळून गेलेला किती आरोप परंतु हा का चोर? हा दरोडेखोर? हा महात्मा आहे. या महात्म्याला का पुन्हा नरकात लोटू? काय आमचे हे पोलिसांचं जीवन! नेहमी दुसर्‍यांच्या पाठीमागं असायचं. जीवनातील ध्येय काय, तर कैदी पकडला, गुन्हेगार पकडला! आमची हृदयं शुष्क होतात, भावना मरतात. माणुसकी नष्ट होते. आम्ही पशू बनतो. गरिबांसाठी झगडणारे, त्यांच्यावर आम्ही पाळत ठेवतो. त्यांना क्रांतिकारक म्हणून पकडायचं, फाशी चढवायचं! आणि हे दुसरे गुन्हेगार यांचाही छळ आम्ही चालवायचा! परंतु ते क्रांतिकारकही गुन्हेगार नाहीत, हे चोर दरोडेखोरही गुन्हेगार नाहीत. ही समाजरचना गुन्हेगार आहे. एक श्रीमंतीत लोळतो. दुसरा अन्नाला मोताद होतो. का हे असं व्हावं? चोर, कोण चोर? चोरी करणारा चोर की आजूबाजूस उपासमार असूनही कोठारं भरून ठेवतो तो चोर? समाज ज्यांना चोर म्हणून शिक्षा ठोठावतो, ते चोर किती कर्तृत्वशाली, किती उदार, किती मोठया मनाचे! परंतु त्यांच्या अंगातील हे गुण मातीमोल होतात!'