Shree Datt Avtar - 19 books and stories free download online pdf in Marathi

श्री दत्त अवतार भाग १९

श्री दत्त अवतार भाग १९

श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले.
श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे.
श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे.
प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे.
या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत श्री नृसिंह सरस्वती.
श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे.
श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते.

पूर्वावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपाशीर्वादाने शनिप्रदोष व्रत करून शिवोपासना करणारी कुरूगड्डीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात, करंज नगरात वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणाची सुकन्या होऊन जन्माला आली.
याही जन्मी तिचे नाव ‘अंबा’ असेच ठेवण्यात आले.
पूर्वसंस्कारानुरूप ती या जन्मीसुद्धा शिवभक्ती करू लागली
. त्याच ग्रामातील माधव नामक शिवोपासक तरुणाशी तिचा विवाह झाला.
हे ईश्वर-निष्ठदाम्पत्य श्री शिवोपासनेत मग्न असतानाच श्रीदत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला, शनिवारी माध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला- हेच श्री नृसिंह सरस्वती होत.

जन्म होताचि ते बालक । ॐ कार शब्द म्हणतसे अलौकिक
पाहून झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तये वेळी ॥

जन्मताच ते ॐकार चा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत.
त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.
तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले.
हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले.

याच्या स्पर्शाने आईच्या स्तनांतून अमाप दूध स्रवत असे. कौतुकात बाळ वाढू लागले. पण वय वाढत चालले तरी ॐकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे.
हा मुलगा मुका निघणार की काय ? अशी शंका आली.
सात वर्षांपर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला
. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार, म्हणून सर्वांना काळजी होती. बाळाने नाना चमत्कार करून दाखविले. लोखंडाला हात लावताच त्याने बावन्नकशी सोने करून दाखविले.

यथाविधी नरहरीचा व्रतबंध करण्यात आला.
गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला.
या वेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला, ‘अग्निमीळे पुरोहितं’ या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद, सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले.
हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली.
मातेला बाळाने एक भिक्षा मागितली,
‘निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥
वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यांस दु:ख झाले.
पुत्र रक्षक होईल, या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली.
आईचे दु:ख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले
तिला आणखी चार पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली.
त्याबरोबर या श्रीपादरूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले.

मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले,पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते एक वर्ष करंज ग्रामातच राहिले. मातेला आणखी दोन सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले.
प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रैमूर्ती दत्त-स्वरूपात दर्शन देऊन पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले.
स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले.

श्री क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले. या बाल ब्रह्मचारी साधूची ती भक्तियुक्त पण कठोर साधना, तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहानथोर, विद्वान पंडित, आबालवृद्ध आश्चर्यचकित झाले.
सर्वजण त्यांना विनम्रभावाने नमस्कार करू लागले,पण इच्छा असूनही संन्यासी लोकांना नमस्कार करता येईना. म्हणून काशीतील तत्कालीन ख्यातकीर्त, सर्वश्रेष्ठ, वयोवृद्ध संन्यासी श्रीकृष्णसरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली.
पितृतुल्य ऋषितुल्य श्री स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यासदीक्षा स्वीकारली. वृद्ध श्री कृष्णसरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे ‘श्री नृसिंहसरस्वती’ असे नूतन नामकरण केले.
पायी खडावा, कटीला कौपीन अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्त्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वती सर्वांना साक्षात श्री काशीविश्वेश्वरच वाटत.
त्यामुळे संन्याशांसह सर्व काशीकर जन त्रिभुवनवंद्य श्री नृसिंहसरस्वती स्वामींना विधियुक्त वंदन करीत.
अत्यंत विनयाने, प्रेमाने त्यांना शरण येत. त्यांच्या दर्शनाने सर्व धन्य होत,कृतार्थ होत.
लवकरच त्यांनी श्री क्षेत्र काशीचा निरोप घेतला.
ते श्री क्षेत्र प्रयागला त्यांचे तीन वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांना अनेक शिष्य लाभले. यांपैकी सात जणांना त्यांनी विधियुक्त संन्यासदीक्षा दिली. माधवसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती, कृष्णसरस्वती, आणि सिद्धसरस्वती हे सात शिष्योत्तम होत.

मंजारिका नावाच्या गावी माधवारण्य नावाचे एक मुनी नृसिंहाचे उपासक होते.
मानसपूजेत ध्यानाची जी मूर्ती ते पाहात होते, ती श्रीगुरूंचीच म्हणजे नृसिंहसरस्वतींचीच आहे हे ध्यानात येताच त्यांनी श्रीगुरूंना आपले सर्वस्व अर्पण केले.
श्रीगुरूंनी त्यांना आत्मबोध केला. तेथून ते वासर ब्रह्मेश्वर नावाच्या क्षेत्रास आले.
येथे गोदावरीच्या पात्रात स्नान करीत असताना त्यांना एक करुण दृश्य दिसले.
एक ब्राह्मण पोटदुखीच्या विकाराने त्रस्त होऊन आत्महत्या करण्याच्या विचारात होता.
श्रीगुरूंचे त्याच्याकडे लक्ष गेले व त्याला त्यांनी रोगमुक्तीचा उपाय सांगितला.
याच वेळी गंगास्नानास सायंदेव नावाचा एक ग्रामाधिकारी आला.
त्याने श्रीगुरूंना मनोभावे वंदन केले. हा सायंदेव आपस्तंब शाखेचा कौडिण्य गोत्री असून कडगंचीचा रहाणारा, पण उदरभरणार्थ यवनांची सेवा करणारा होता.
त्याचा भाव पाहून श्रीगुरू त्याला म्हणाले, ‘या ब्राह्मणास पोटदुखीचा विकार आहे.
तू याला घरी घेऊन जा व पोटभर मिष्टान्न घाल.
त्याची व्यथा दूर होईल.’ सायंदेवाने श्रीगुरूंनाही आमंत्रण दिले.
श्रीगुरू सायंदेवाच्या घरी आले.
त्याच्या पत्नीने, जाखाईने श्रीगुरूंची मनोभावे षोडषोपचार पूजा केली.
‘तुला अनेक पुत्र होती. तुझ्या घरात गुरुभक्ती वाढेल’ असा तिला आशीर्वाद मिळाला. ब्राह्मणाचा पोटदुखीचा विकारही संपला.

‘कृष्णसरस्वती’ नावाचे एक वृद्ध संन्यासी होते. ते केवळ ब्रह्मज्ञानी असून स्नेहभावाने सर्वांकडे पहात.
या वृद्ध स्वामीची व इतरही संन्याशांची ही विनंती मान्य करून नरहरीने कृष्णसरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली. नरहरीस कृष्णसरस्वती गुरू झाले. या कृष्णसरस्वतींची गुरुपीठिकाही अत्यंत थोर प्रकारची होती. आदिपीठाचे शंकर हे पहिले गुरू. त्यानंतर विष्णू, त्यानंतर ब्रह्मदेव हे मूळपीठ असून पुढे वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधीगिरिय, सिंहगिरिय, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, ज्ञानतीर्थ, मळियानंद, देवतीर्थसरस्वती, सरस्वतीयादवेन्द्र आणि शिष्य कृष्णसरस्वती असून त्यांचेकडून नरहरीने संन्यासदीक्षा स्वीकारली.
श्रीनृसिंहसरस्वती असे नवे नाव नरहरीने धारण केले.

उत्तरेकडील वास्तव्य संपवून ते सप्त शिष्यांसह दक्षिणेकडे वळले.
निरनिराळ्या तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या.
तब्बल तीस वर्षांनी ते मार्गदर्शनार्थ स्वगृही करंजनगरला परतले.
करंजग्रामातील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
संन्यासी बनलेल्या अलौकिक बाळाच्या मंगल दर्शनाने माता-पिता कमालीचे आनंदित झाले.
त्यांनी मातापित्याला प्रेमाने आलिंगन दिले.
काही दिवस करंजपुरीत राहून ते लोकोद्धारासाठी पुनश्च बाहेर पडले.
त्यांच्या भोवती भाविकांचा अक्षरश: गराडा असे.
ते लोकांच्या आधिव्याधी हरण करीत. निपुत्रिकांना सुपुत्र देत.
त्यांनी केलेल्या अभूतपूर्व चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली.
अनेक पतितांचा, पाप्यांचा त्यांनी लीलया उद्धार केला.
अनेकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. वाढत जाणाऱ्या जनसंपर्कापासून थोडे दिवस दूर राहण्यासाठी ते वैजनाथ येथे एक वर्ष गुप्त राहिले. एकांतवासाचे सुख उपभोगू लागले.
सेवेला सिद्धसरस्वती नावाचे शिष्य होते.
श्रीगुरूंच्या गुप्त रहिवासात एक उत्कट जिज्ञासेचा ब्राह्मण त्यांच्या दर्शनासाठी आला; पण वर्षभर त्याला दर्शन झाले नाही. सिद्धसरस्वतींनी त्याला ‘गुरुचरित्र’ सांगितले. आजच्या लोकप्रिय गुरुचरित्राचा निम्मा भाग अशा रीतीने वैजनाथ येथे तयार झाला.

एका वर्षाच्या गुप्त अनुष्ठानानंतर श्री गुरूंचा पुनश्च अखंड संचार सुरू झाला. कृष्णातिरी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीसन्निध असलेल्या श्री क्षेत्र औदुंबरी त्यांनी एक चातुर्मास वास्तव्य केले.
तिथून ते कृष्णा-पंचगंगा संगमावर राहिले. तिथे त्यांचे बारा वर्षे म्हणजे एक तप वास्तव्य होते. ‘मनोहर पादुका’ स्थापून त्यांनी त्या स्थानाचा निरोप घेतला.

तिथून ते भीमा-अमरजा संगमावर श्री क्षेत्र गाणगापूरला आले. तिथे त्यांचे तेवीस वर्षे वास्तव्य होते. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला. श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तांची काशी ठरली. दत्तभक्तांची पंढरी झाली. श्री गुरूंची कीर्ती भारतभर पसरली. चोहो दिशांतून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. उत्तरोत्तर त्यांचा भक्तपरिवार वाढतच गेला.

श्रीगुरु औदुंबरतळीच का निवास करतात? याही प्रश्नाचे उत्तर श्रीगुरुचरित्राच्या एकोणिसाव्या अध्यायात आलेले आहे.
नृसिंह अवताराच्या वेळी हिरण्यकशिपूच्या उदर विदारणामुळे भगवंताच्या हातांची, नखांची आग होत राहिली; ती उंबराच्या फळात हात खुपसल्यावर शमली.
म्हणून शीतल उपचारांचे प्रतीक म्हणून औदुंबराची ख्याती श्रीगुरूंच्या संदर्भात झाली.
अमरेश्वराजवळच्या चौसष्ट योगिनी श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी माध्यान्ह समयी येत.
येथेच गंगानुजावर कृपा करून श्रीगुरूंनी त्याचेही दैन्य हरण केले
औदुंबर हा कल्पवृक्ष आहे, आपल्या मनोहर पादुकाही तेथेच आहेत, तुम्ही तेथेच वास करावा असे सांगून श्रीगुरू भीमातीरी असलेल्या गाणगापूर या गावी येऊन स्थिरावले.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED