Sita Geet - 1 books and stories free download online pdf in Marathi

सीता गीत (कथामालीका) भाग १

श्रीराम व सीतादेवी वनवासातून आल्यावर जावांनी सीतेला सर्व हकिगत विचारली असतां सीतेने जे कथन केले ते म्हणजे सीता गीत. हे ओवीबद्ध आहे. कवी - मोरोपंत
धन्य अशा जनक राजाला यज्ञासाठी भूमी नांगरताना मिळालेली कन्या सीतादेवी ही श्रीरामाची पत्नी झाली. जनकाची सुशिल कन्या उर्मिला लक्ष्मणाची पत्नी झाली. जनकाचा कनिष्ठ पण गुणाने श्रेष्ठ असा एक बंधु होता त्याची दुहिता (कन्या) मांडवी ही दोन्ही कुळांच्या हितासाठी भरताची पत्नी झाली, दुसरी कन्या श्रुतकीर्ती जीची कीर्ती पतिव्रताही सांगतात ती शत्रुघ्न ची पत्नी झाली. अशा रीतीने या चार भाग्यवान बहिणी एकमेकांच्या जावा झाल्या.
त्यांच्यातील सुसंवाद, एकी ही वाखाणण्याजोगी होती.
तिघी सात्त्विक अशा जावांनी प्रेमाने सीतेला वनवासाची हकीगत विचारली.
सीता म्हणाली सांगते पण मनात काही (व्यथा) न आणता ऐका.
सीता म्हणाली चित्रकुटाहुन पादुका घेऊन (भरताने श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करायचे ठरवले होते) आम्हाला वियोगाचे दुःख देऊन तुम्ही परत गेला, तसे आम्हीही तिथून निघालो. वनातून जाताना लक्ष्मण भावोजी मागे व स्वामी पुढे असे चाललो होतो. मला तर चालतांना तहान, भुक, उष्णता काही जाणवत नव्हते. चालतांना कधी थकल्यासारखे वाटे तेव्हा स्वामी मागे वळून पाहत असत, त्यांची दृष्टी पडली की अमृतवर्षाव झाल्यासारखे वाटे व थकवा जात असे. वाटेत आम्ही ऋषींच्या आश्रमात थांबलो. मला माहेरी गेल्यासारखे वाटले. सती अनसूयानी आशिर्वाद दिले. ऋषींचे आशिर्वाद घेऊन आम्ही गोदावरी किनारी असलेल्या पंचवटी नावाच्या क्षेत्रात राहिलों. तीथे माझी भावोजीनी खुप सेवा केली ती महादेवास ठाऊक आहे. तीथे शुर्पणखा आली. तीची मला भीती वाटली होती पण भावोजींनी तीचे कान, नाक कापले. नंतर तीचा खर नावाचा भाऊ क्रोधाने युद्ध करावयास आला . चवदा हजार पापी राक्षस आले होते पण स्वामींनी त्यांना हरवले.
शुर्पणखाने रावणाला सांगितले. रावणांने एक मायावी मृग पाठवला. सोने, रत्नमय मृग असा हा मृग पाहिला व मला तो आवडला . मी स्वामींना हरिणाला आणण्यास पाठवले पण मला त्याचे परिणाम माहित नव्हते. स्वामींनी माझ्या रक्षणासाठी लक्ष्मणास सांगून ते धनुष्य बाण घेऊन निघाले. जगातील अद्वितीय शूर असे स्वामी अरण्यात दुर गेले. त्याना तो कपटी राक्षस वाटल्यांने त्यांनी त्याला बाण मारला व तो जिव्हारी लागताच तो स्वामींसारखा आवाज काढत ओरडला हे सीते, हे लक्ष्मणा, हे लक्ष्मणा धांव ( लवकर ये ). मला ती हांक स्वामींची वाटलेंने माझ्या ह्रदयाचा थरकाप झाला. मी म्हणाले, भावोजी स्वामींचे प्राणाचे रक्षण करा. लगेच धनुष्य बाण घेऊन वेगाने जा.
भावोजी म्हणाले, ही राक्षसाची माया आहे. रामरायाला कोणी कांही करू शकत नाही. ते वाक्य खरे असले तरी मला खोटे वाटले. मला मनातून खुप दुःख झाले. मी रागाने बोलू नये ते बोलले. शब्दरूपी बाणाने भावोजींचे मन दुखावले. ' दुष्टा ' तू मोठ्या भावाचा घात करू इच्छितोस. तुम्ही मला हात लावलात तर मी प्राण सोडीन. पायातील वहाण कोणी डोक्यावर ठेवत नाही. तुम्ही माझ्या डोळ्यासमोर थांबू नका. माझे असे बोलणे ऐकताच भावोजींच्या डोळ्यात पाणी आले. सज्जन माणसाला त्रास दिला की तत्काळ फळ मिळते. सज्जनांचा छळ करू नये. माझ्या  बाहेर जाण्याच्या वाटेत धनुष्याने रेघ ओढली व या रेघेबाहेर येऊ नका म्हणून सांगून ते दयेचे मेघ भावोजी स्वामींकडे गेले. 
रावण संन्यासी होवून आला. त्याचे कपट मला कळले नाही. भीक्षा द्यायला रेघेच्या बाहेर गेले. सासर माहेर चे नांव घालवले. जर तेव्हा धनुष्याची रेघ ओलांडली नसती तर रावणाचे काही चालले नसते. रेघेच्या बाहेर पाय ठेवला आणि रावण, तो साधू महाकाय झाला. जसा लांडगा हरिणाला पकडतो तसे त्या दांडग्याने मला पकडले.
त्या पाप्याच्या स्पर्शाने माझा देह कोमेजला. त्याने मला रथातून आकाशात नेले. हे रामा ! हे लक्ष्मणा अशा हाका मारीत होते. त्या दशरथ राजांचे मित्र असलेल्या जटायू मामांनी ऐकल्या. मामाजी मला सोडविण्यासाठी धावले. ते जातीचे गिधाड पक्षी असून शूर होते. त्यांनी रावणाच्या रथाचा चूर केला. चोंच व नखे ही त्यांची आयुधे वापरून युद्ध करून रावणाला हैराण केले,पण रावणाने अन्यायाने त्यांचे पंख कापले. मला मोठा घात झाल्यासारखे वाटले. मामाजी जमीनीवर बेशुद्ध होऊन पडले.

इतर रसदार पर्याय