संपूर्ण बाळकराम - 5

  • 5.6k
  • 2.4k

या जगतीतलावर अखिल मानवजातीच्या सुखसमाधानाची जी जी साधने आहेत, त्या सर्वात काव्याला सर्व राष्ट्रांनी, सर्व धर्मांनी आणि सर्व जातींनी एकमताने अग्रस्थान दिलेले आहे. काव्यात राष्ट्राचे बुध्दिवैभव आणि कर्तृत्वशक्ती इतिहास आणि संस्कृती, विकारोत्कर्ष आणि नीतिमत्ता, अशी जोडपी एकाच वेळी विहरत असल्यामुळे राष्ट्राचे सर्वस्व त्याच्या काव्यात प्रतिबिंब होत असते. ज्यांना लिपी नाही, अशी राष्ट्रे थोडीबहुत सापडतील परंतु लौकिक काव्याविरहित राष्ट्र कधीही सापडणार नाही. लेखनकलेच्या अभावी इलियडसारखी महाकाव्ये कैक पिढयांपर्यंत नुसती जिभेच्या शेंडयावर नाचत आली होती. कवितेचा व राष्ट्रोत्कर्षाचा परस्परांशी निकट संबंध आहे. कवितेने वीरांना आणि प्रणयीजनांना उत्साह दिला आहे, आणि वीरांनी व प्रणयीजनांनी कवितेला विषयांचा पुरवठा केला आहे सुंदर स्त्रियांना चढवून ठेविले आहे. कवितेने किती तरी लोकांना शुध्द वेडे केले आहे, तर शुध्द वेडयांनी किती तरी कविता केल्या आहेत! आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर चार शब्द लिहिण्याचा आज मी प्रयत्न करून पाहणार आहे.