Pralay - 12 books and stories free download online pdf in Marathi

प्रलय - १२

प्रलय-१२

    ज्यावेळी भिंत बांधली नव्हती आणि भिंतीपलीकडील सम्राट जागृत झाला होता .  त्यावेळी त्याने तीन प्रकारच्या सैना बनवल्या होत्या . एक म्हणजे त्रिशूळाची सेना दुसरी म्हणजे तलवारीची सेना व तिसरी म्हणजे धनुष्यबाणाची सेना...... त्यावेळी भिंतीपलीकडे जे काही लोक होते ते , त्या सर्वांना त्यांने सैनिक बनवून पृथ्वीतलावरील प्रत्येक राज्य जिंकायला पाठवलं होतं . प्रत्येक सैन्यात जरी सामान्य लोक  असले तरी त्यांच्याकडे असणारी हत्यारे म्हणजेच ,  तलवार सैन्यात असलेल्या तलवारी , धनुष्यबाण सैन्यात असलेले धनुष्यबाण व त्रिशूळ सैन्यात असलेले त्रिशूळ हे चमत्कारिक होते.....

      त्रिशूळ सैन्याकडे असलेला त्रिशूळ जर एखाद्या व्यक्तीला , प्राण्याला किंवा सजीवला मारला असता त्या व्यक्तीचे अथवा सजीवाचे जागेला मातीत रूपांतरण व्हायचे . त्रिशुळाच्या  बळावर त्रिशूळ सैना संपूर्ण विश्व पादाक्रांत करत भिंतीपलीकडील सम्राटाच्या छत्रछायेखाली आणत होती . मात्र त्यावेळी असलेल्या जलधि राज्याच्या महाराजांनी त्या संपूर्ण सेनेला एकट्याने हरवलं होतं असं म्हणतात . त्रिशुळ सैन्याच्या शेवटच्या युद्धाबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध होत्या . त्रिशुळाच्या सैन्याची मुख्य शक्ती त्रिशूळ होता व त्रिशूळ हे कोणत्याही सजीव गोष्टीचं रूपांतर मातीत करत असायचा .  त्यामुळे त्याविरुद्ध लढण्यासाठी जलधिच्या त्यावेळच्या महाराजांनी पाण्याची मदत घेतली . असं म्हणतात त्यावेळचे कैरव महाराज पाण्याला स्वतःच्या बळावर ती नियंत्रित करु शकायचे .  त्यांनी  समुद्रातले पाणी आणून संपूर्ण त्रिशूळ सैना त्याखाली बुडवून मारली . मात्र ती सेना शापित असल्यामुळे मुक्त न होता त्याच  भागावरती भटकत राहू लागली . ती सैना तो भूभाग सोडून दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्यानंतर ती काळी भिंत बांधली गेली .  पण काळी भिंत  त्रिशूळांच्या सैन्याला कधीच अडवू शकली नाही . 

    .अशा वेगवेगळ्या दंतकथा जरी सांगितल्या जात असल्या तरी खरं काय आणि खोटं काय हे कुणालाच माहीत नव्हतं .  समोरून त्रिशूळाच्या सैन्याची आरोळी ऐकू येत होती हे मात्र खरं .  इतक्या वर्षात भिंतीपलीकडे एकही  सैनिक दिसला नव्हता तरीही आता त्यांची आरोळी कशी काय ऐकू येत होती हाच मोठा प्रश्न होता .  त्रिशूळांची सैना पुन्हा जागृत करू शकेल असं या पृथ्वीतलावर कोणीही जिवंत नव्हतं .  याचा अर्थ एकच होता ,भिंतीपलीकडचा सम्राट पुन्हा जागृत झाला होता........

    त्रिशूळांच्या सेनेबरोबर लढण्याचा कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे अनुभव नव्हता .  गोष्टीतल्या प्रमाणे लढायचं म्हटलं तरीही गोष्टीतही वेगवेगळे प्रकार सांगितले होते . त्यामुळे त्यांच्याकडे आता कोणताच उपाय नव्हता....

    एवढे सगळे होऊनही जलधि राज्याचा एकही सैनिक घाबरला नव्हता .  प्रत्येक सैनिक लढाईच्या तयारीत उभा होता . कोणत्याही क्षणी भिंत पार करून त्रिशूळांची सेना अलीकडे येऊ शकत होती . प्रत्येक जण आपापल्या जागा घेऊन लढण्यासाठी उभे राहिले .  ती वीस हजाराची सेना त्रिशूळाच्या सैन्या विरुद्ध लढण्यासाठी आता तयार होती...........

      ते सैनिक बराच वेळ त्या ठिकाणी थांबले .  पलीकडे  त्रिशूळांचे सैन्य होते .  फक्त आरोळ्यांचा आवाज ऐकू येत होता .   कोशिकाने भिंतीवरती चढून पाहिले .   पलीकडे जिवंत लोकांची मोठीच्या मोठी फोज दिसत होती . प्रत्येकाच्या हातात त्रिशूळ होता आणि सर्व विचित्र आवाजात आरोळ्या देत होते .  भिंतीपासून काही पावलांच्या अंतरावर सर्वजण थांबले होते व  मोठमोठ्या विचित्र आवाजात ओरडत होते  . जणू काही ते कुणाच्या तरी आदेशाची वाट बघत होते .  उत्तरेकडून दक्षिणेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे जितक्या दूर नजर जावी तितक्या दूर ती त्रिशूळांची सैना दिसत होती .......

" बाबा , तुम्हाला माहित आहे ना.... त्या विक्रमाने काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे ती......
" अरे शौनक तुला किती वेळा सांगू असल्या राजकारणाच्या फंदात पडत जाऊ नकोस ......आपण भलं आणि आपलं काम भलं .....तसेही लोक आपल्याला घाबरतात .  चेटूक करतो म्हणून तर आपल्या गावा बाहेर काढलय....।
" बाबा पण आपण समाजात राहतो आपली जबाबदारी आहे की नाही......
" अरे बाबा अजून तुला जग समजत नाही .  जगातील राजकारण समजत नाही , नाही पडणार ती भिंत .मी शपथेवर  सांगायला तयार आहे
" बाबा मी पाहिलं भिंत पडताना , निळ्या गोलात ....
" तुला कितीवेळा सांगितलं शौनक ,  माझ्या कोणत्याही गोष्टीला न विचारता हात लावत जाऊ नकोस....
"  पण बाबा मी हात नाही लावला.....
" मग.....
" गोलावरील कापड जळाले आणि गोलाचा रंग बदलला आहे . अर्धा लाल आणि काळा झाला आहे . ज्यावेळी ते कापड जळत होतं त्यावेळी मी त्या ठिकाणी होतो.  ते जाळणारं कापड बाजूला सारलं ,  त्यावेळी त्या गोला मध्ये फार भयानक गोष्टी दिसल्या ,  म्हणून मी त्यावरती दृश्य रूपांतर कापड  टाकलं ......
हे बघा त्या दृश्य रूपांतर कापडावरती काय काय दिसतंय......?
    असं म्हणत त्याने ते कापड दाखवलं .  आणि त्या कापडावर जे काही दिसलं त्याने कोणाच्याही अंगावर काटा आला असता.......

   आयुष्यमान व भरत या दोघांचे अश्व अश्वराज पवन यांच्या पेक्षा फार धीम्या गतीने चालत होते . अश्वराज पवन यांची गती फार  होती .  त्यामुळे अश्वराज पवन व मोहिनी नेहमी पुढे असायचे . भरत आणि आयुष्यमान मागुन जायचे . अश्वराज पवन हा त्यांच्या जमातीचा एकच होता . पृथ्वीतलावरती त्याच्या सारखा तो एकच होता . कमरेपर्यंत मनुष्याचे शरीर व तिथून पुढे संपूर्ण घोड्याचं शरीर असा तो अश्वराज पवन होता . त्याला मानवी भाषांचे ज्ञान होतं . तो माणसासारखा बोलू शकत होता .  माणसासारखं विचार करू शकत होता .  तो चांगली करमणूकही होता . त्याला विविध गाणी येत होती .  तो पळत पळत  गाणीही म्हणायचा . त्यामुळे आयुष्यमान भारत व मोहिनी यांचा वेळ जात होता .  ते भराभर एका खड्ड्या मागोमाग दुसऱ्या खड्याकडे जात होते व प्रत्येक ठिकाणी बी टाकत होते . मोहिनीच्या बरोबर ती लहान मुलगीही होती . मोहिनीने  मोहिनी करून त्यांना  अंतःप्रेरणेने धावण्याची प्रेरणा दिली . त्यामुळे त्यांची यात्रा फार गतीने चालली होती .  आता काहीच खड्डे शिल्लक राहिले होते . ते उत्तरेकडे आले होते ,  ज्या ठिकाणी ती भिंत संपत होती . 



      ज्यावेळी आयुष्यमाननज शेवटच्या खड्ड्यात बी टाकला त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटु लागला .  मोहिनीच्या मागे बांधलेल्या झोळीत जी लहान मुलगी होती ती हवेत उडाली .  तिच्या शरीराचे तुकडे झाले .  निम्मा भाग भिंती पलीकडे  पडला तर निम्मख भाग भिंती अलीकडे पडला . आकाशात चित्र-विचित्र रंगाचे ढग जमले . ढगांचा गडगडाट वाढू लागला .  विजा चमकू लागल्या ....थोडा थोडा धरणीकंप जाणवत होता . काही काळानंतर आकाशातील वेगवेगळ्या रंगाचे ढग जाऊन त्या ठिकाणी फक्त दोनच रंगाचे ढग उरले .  भिंतीकडच्या बाजुला काळ्या रंगाचे व भिंती अलीकडे लाल रंगाचे ढग . संपूर्ण आकाश लाल व काळ्या रंगात विभागले होता .  विजांचा कडकडाट थांबला होता .  सोसाट्याचा वारा अजूनही चालू होता . धरणीकंप थांबला होता . 
      आयुष्यमानला एक गोष्ट जाणवली . मोहिनी आणि अश्वराज आता त्या ठिकाणी नव्हते .  अश्वराज जंगलात पळून गेला होता . हवेतून एक मोठा गरुड खाली आला   होता . मोहिनी त्यावर  आरूढ झाली व गरुड पुन्हा हवेत उडाला आयुष्यमान व भरत ते दृश्य पाहतच राहिले......

       तो गरुड उंच उडून दक्षिणेकडे निघाला .

      जन्म तिचा झाला आहे 
      प्रलय काळ आला आहे
      मृत्यू आता तांडव करेल
     गिधाडांसाठी मेजवानी उडेल
     खरेखोटे सारे मरतील
    हवेचे राजे फक्त उरतील.......

   तो भिकारी हे गाणं मोठमोठ्या आवाजात ओरडत घरासमोरून फिरत होता . एकापाठोपाठ एक आवर्तने करत होता  . त्याचा तारस्वर ऐकून कोणीही त्याला भीक देत नव्हतं . शेवटी तो एका तळ्याकाठी गेला  . अगोदरच ज्या काही शिळ्या भाकऱ्या होत्या .  त्या काढल्या व   पाण्यात बुडवून खाऊ लागला .....

      आयुष्यमान व भरत दोघांनी ही त्या अश्वराज पवनच्या मागे घोडे पळवले  .  तो अश्वराज जंगलात जाऊन लपून बसला होता . तो घाबरल्यासारखा वाटत होता . तो सहजासहजी कोणालाही दिसला नसता ,  पण आयुष्यमानची नजर तीक्ष्ण होती .  त्याच्या तीक्ष्ण नजरेने त्याचे लपणे टिपले . आयुष्यमान जर सरळ सरळ जाऊन त्याला बोलला असता तर त्याने त्याचे ऐकले नसते . त्यामुळे आयुष्यामानने पहिल्यांदा दावे काढले   . त्याला गाठ मारत त्याने ते दावे नकळत त्याच्या पायाभोवती फेकले व जोरात ओढून त्याचे दोन्ही पाय एकमेकात गुंतवून बांधून टाकले ......
    त्याने ओरडत सुटायचा प्रयत्न केला ,  पण तो निष्फळ ठरला .  त्याने हातात लाकूड उचलून त्यांच्या अंगावरती फेकायला सुरुवात केली . बराच वेळ त्याचा हा कालवा चालला होता . शेवटी त्याला शांत करत बोलण्याच्या स्थितीत आणत  आयुष्यमान त्याच्याशी बोलू लागला .....

    " मोहिनीला काय झालं ......? अश्वराज पवन ती कुठे गेले ......? तुला काही जाणवलं का.....? 
    " ती मोहिनी नव्हती . ज्यावेळी ते लहान मूल हवेत उडाले , मोहिनी त्यावेळीच गेली .  त्यामुळे तर घाबरून मी जंगलाकडे पळालो .   ती मोहिनी नव्हती . तिचे विचार फारच हिंस्त्र होते .......

    " पण हे सर्व कशामुळे झाला.....?  कसं झालं.....?

" मला काही माहित नाही......!  मला जाऊद्या..... सर्वजण माझ्या मृत्यूवरती टपलेले आहेत . मला जाऊ द्या..... मला सोडा , मला अजून जगायचे आहे ......
त्या अश्वराजाने पुन्हा एकदा सुटायची धडपड केली .  यावेळी तो यशस्वी झाला व चौखूर उधळत तो दिसेनासा झाला ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED