Ahmsmi yodh - 1 books and stories free download online pdf in Marathi

अहमस्मि योध: भाग -१

अहमस्मि योध: ही एक काल्पनिक कथा आहे. यातले सगळे पात्र व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत..

 

समीर देवधर..एक " हॅपी गो लकी " मुलगा, आनंदाने त्याचे जीवन व्यतीत करत असतो.. आई- बाबा..त्याचा एक खोडकर कुत्रा..टॉमी आणि त्याचे मित्र हेच त्याचे विश्व असते..पण नियतीने त्याच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं..माणसाच्या आयुष्यात उतार चढाव येत असतात पण ते इतके अनपेक्षित आणि भयानक असतील  असं समीरने स्वप्नात देखील विचार केलं नसेल..

एक गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेला धूर्त वैज्ञानिक आणि त्याची टोळी.. भूतकाळातून उक्रून काढलेले काही रहस्य.. त्याचं जगणं कठीण करून ठेवतात..हा खेळ चालू ठेवणारे एकामागून एक असे आणखी खेळाडू निर्माण होतात..कोण आपलं , कोण परकं..याचा सुगावा लागणं ही मुश्किल..नेमका संशय घ्याचा तरी कोणावर..रक्ताचं नातं असलेल्या आई-बाबांवर , जीवाभावाचा मित्र असणाऱ्या दिग्यावर की नवीनच प्रेमात पडलेल्या स्नेहावर.. त्याच बरोबर त्याला अलौकिक शक्तींचा सामना ही करावा लागतो. 

रुद्रस्वामी त्याची मदत करतात पण त्यांचं काम काय.. त्याला फक्त जाणीव करून द्यायचं  ..काय करायचं ? कसं करायचं ? हे समीरला ठरवावं लागणार !!!

ही कथा आहे समीरच्या धैर्याची... शौऱ्याची...भविष्यावेधी दृष्टीकोनाचा..

सुरुवातीपासून शेवट पर्यंत ट्विस्ट , थ्रील ने भरलेली आणि उत्सुकता वाढवणारी ही चित्तथरारक कथा..

 

                        अहमस्मि योध:

प्रारंभ:

 

" ऐऽऽऽ..टॉम्या अरे थांब.. टॉमी..थांब रे..कुठे पळतोय.." 

एक जर्मन शेफर्ड कुत्रा जंगलात जीवाच्या आकांताने पळत होता त्याच्याच मागे साधारण २२-२३ वयवर्ष असलेले दोन तरुण. समीर देवधर आणि दिगंबर कदम.

 

तेव्हा सकाळचे सात वाजले असावेत.रविवार ची सुट्टी म्हणून दोघं शहाराजवलच्या जंगलात फेरफटका मारायला गेलेले. सुखद गारवा हवेत जाणवत होता. दाट धुक्याच्या दुलईतून झाडांचे शेंडे डोकं वर काढत होते. तिथेच गवतावर दोघे बराच वेळ शांत बसून होते. अचानक समीर चा टॉमी जोरात भूंकायला लागला आणि वेगाने जंगलाच्या दक्षिण दिशेला धावू लागला..दोघं ही त्याला थांबण्यास सांगत होते पण काही उपयोग झाला नाही. म्हणून दोघं त्याच्या मागे गेले.

 

" टॉमी थांब.."  - समीरने जोरात हाक मारली..पण टॉमी काही ऐकेना.आता मात्र ते जंगलात खूप दूर वर येऊन पोहोचले होते. सगळीकडे चिडीचुप शांतता होती अगदी पक्ष्यांचे आवाजही नव्हते. दोघं एका झाडाखाली श्वास घेत थांबले. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावरच्या घामाला स्पर्शुन गेली.

 

टॉमी आता कुठेही दिसत नव्हता आणि इकडे सम्या आणि दिग्या पुरते दमले होते .अचानक टॉमी चा आवाज त्यांचा कानावर पडला.दोघांनी सगळं बळ एकवटलं आणि आवाजाच्या दिशेने पावलं टाकली.

 

धापा टाकत ते काही अंतरावर पोहोचले तेव्हा पुढे फेसाळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याने भरलेले जलाशय होते . डोंगरातून फोफवणाऱ्या धबधब्याची सोबत त्या तलावास मिळालेली. त्याच तलावाच्या काठावर टॉमी एकटक लावून बघत होता. काहीतरी अदृश्य जे फक्त त्याला दिसत असावे असे काहीतरी.

 

सम्या आणि दिग्या दोघांच्या तोंडावर एक स्मितहास्य दरवळलं आणि ते टॉमीच्या जवळ जाऊ लागले..

" ओsss टॉमी शेट , अहो जीव घ्याल का आता , किती पळवलं आम्हाला !! "  - दिग्या टॉमीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. पण टॉमीची काही हालचाल ना प्रतिकार तो त्याच जागी टक लावून बघत होता. समीर टॉमीच्या गळ्यातलं बेल्ट नीट करत म्हणाला - "कमऑन टॉमी , लेट्स गो होम.. " आणि त्यांनी बेल्ट लगत असलेली लिश हातात घेतली. पण टॉमी त्या जागेवरून हलण्यास तयार नव्हता. 

 

" चल टॉमीऽऽऽ.." - समीर मोठ्याने बोलला.

अचानक टॉमी इकडे तिकडे पाहू लागला जणू त्याचे भान परत आले आणि समीर बरोबर चालू लागला. टॉमी या पूर्वी असा कधीच वागला नव्हता. समीरला त्याच्या वागण्यातले बदल लक्षात आले. 

 

" टिक...टिक...टिक..टिक..." समीरच्या फिट-बिट मधून आवाज येऊ लागला.. " ओह नो !! दिग्या अरे दहा वाजले चल लवकर घरी जाऊ ." मोठी पावलं उचलत समीर दिग्याला म्हणाला.समीरला ती भयाण शांतता आता असह्य झाली होती. 

 

तोच त्यांच्या मागे झाडाच्या फांदीवरून कसलीशी सळसळ ऐकू आली. मागे वळून पाहिले तर झाडावर कोणीतरी होत. त्या पानांच्या आडोश्याला ते लपून त्यांना पाहत होत. काटेरी झाडांच्या हिरव्यागार पानांनी वेढलेल्या जाळीमधून कोणीतरी पाहत होत..

 

झटकन त्या आकृतीने झाडावरूनच पलीकडे धप्पकन जमिनीवर उडी टाकली. ते कोण होते ते नाही समजलं पण चपळाईने धावत जंगलात नाहीस झालं होतं.

 

" अरे भाई.. जाऊदे एखादा प्राणी असेल " - दिग्या..

 

"हो..हो..चल निघू आपण " - समीर..

 

समीरला मात्र वेगळीच शंका येऊ लागली होती.कोणीतरी आपला पाठलाग करत आहे आणि आपल्यावर पाळत ठेऊन आहे असं त्याला सतत वाटत होतं . पण काही न बोलता तो चालू लागला. 

 

चालता चालता समीर अचानक थांबला त्याला दिसले की आजूबाजूची माती नवीन खणली गेली होती आणि इतर पृष्ठभागाच्या भूभागापेक्षा ती थोडी उंच होती जणू त्या ठिकाणी काहीतरी पुरले गेले होते. त्याने पायाने  माती सरकवली त्याला काहीतरी प्लास्टिक सारखे दिसले. ते मातीमधून बाहेर खेचण्यासाठी तो खाली वाकला तेवढ्यात पुढे गेलेल्या दिग्या ने त्याला आवाज दिला..

 

" ऐss.. सम्या , आता का थांबलास..चल पट पट.. "

 

" हो... आलो आलो.."  - समीर..

 

दूर तळ्याजवळ कोणीतरी तिथे दबा धरून बसले होते..काय घडतंय ते सर्व काही पाहत होत..समीर आणि दिगंबरला जी आकृती झाडावर दिसली होती ती बहुदा हीच असावी.

 

" या दक्षिणेकडील जंगलावर कोणीच येत नाही मग तिथे प्लास्टिक कसं आलं " समीरने चालता चालता दिग्या ला विचारले. टॉमी गुपचूप त्यांच्यामागे चालत होता..

 

अरे भाई...तू मोठा शेरलॉक होम्स झालास रे..एखाद्या प्राण्यानी आणले असेल." दिग्या उपहासात्मकपणे म्हणाला.

 

समीर दिग्याच्या उत्तरावर समाधानी नव्हता परंतु तरीही त्याने त्याच्याशी सहमत असल्याचे दाखवत डोके हलविले.

 

*************************************

 

ते अतिशय गडद ठिकाण होते, अगदी लहान खिडकीतून खोलीत फारच कमी प्रकाश पडत होता, साधारण 40 वर्षांच्या वयातील एक माणूस पाठमोरा उभा होता ,  त्याच्या तोंडात सिगारेट असावी असं निघणाऱ्या धुरातून अंदाज येत होता. तो काहीतरी  कागदं वाचत होता आणि दुसरी कडे  नोंद करत होता. सगळीकडे कागदपत्र पसरली होती. प्रयोग करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे, काही केमिकल बाटल्या, पाईप्स, टेस्ट ट्यूब इत्यादी एका कोपऱ्यात विखुरल्या होत्या.

 

" मालक , त्या म्हाताऱ्याच नातू आज तलावा पावतर पोचलं व्हतं , तुम्ही म्हणशीला तर काटा काढतो त्याचा.."   - एक इसम त्या चाळिशीतल्या व्यक्तीला म्हणाला.

 

" नाही, माझ्या आदेशाशिवाय नाही !! "  कठोर शब्दात  त्या माणसाचे बोलणे थांबवत मागे वळून तो तोंडातून सिगारेटचा धूर सोडत म्हणाला.

 

आणि तो होता डॉ. विक्रांत महाजन , एक विध्वंसक शास्त्रज्ञ जो बेकायदेशीर प्रयोग केल्याबद्दल आणि  दहशतवाद्यांचा संपर्कात असल्यामुळे दोषी आढळला होता.परंतु सुदैवाने तो पोलिसांपासून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि एका गुप्त ठिकाणी राहत होता. आणि समोर टोळीतील त्याच्याच एक विश्वासू माणूस...धोंडीबा.

 

" त्या पोरा कडून खूप काम करून घ्याची आहेत..तो माझ्या जुन्या स्वप्नांना नवीन मार्ग देईल..नवीन मार्ग.... एवढ्यात नाही जीव घ्याचा त्याचा.." एवढं बोलून तो खदा खदा हसू लागला..आणि पुन्हा सिगारेटचा झुरका घेऊ लागला..

 

 

*************************************

 

चालता चालता समीर आणि दिगंबर एका मोठ्या आलिशान बंगल्यासमोर येऊन पोचले होते. ते होतं समीरचं घर. " शरण व्हिला "..घर उच्च क्षमता असलेल्या सर्व नवीनतम वैशिष्ट्यांसह सुसज्ज होते. कमळ आणि सूर्य यांच्या धर्तीवर आर्किटेक्चरल डिझाइनची रचना केली गेली होती .घराच्या सीमेस समांतर झाडे होती  पुढच्या बाजूला लॉन आणि स्विमिंग पुल होतं..

 

सम्या आणि दिग्या इतके दमले होते की ते घराच्या दाराशी असलेल्या पायऱ्यांवरच जाऊन विसावले. दोघंही घामाघूम झाले होते. तेवढ्या मागून समीर ची आई  माधुरी..ट्रे मध्ये लिंबू सरबत घेऊन येते.. 

 

" आलात तुम्ही.. इतका उशीर का झाला आज ?? "  माधुरी ट्रे दोघांच्या पुढे करत म्हणते..

 

सम्या आणि दिग्या दोघं ही सरबत पिऊ लागतात. दिग्या गपागप सरबत संपवून म्हणतो " ह्या टॉम्या मुळे...काकू.. अचानक जंगलात बेभान पळत सुटला. "

 

"अच्छा..चला आता फ्रेश होऊन घ्या पटापट.."  - माधुरी

 

दोघं ही फ्रेश होऊन समीरच्या खोलीत जाऊन जरा वेळ बसतात..दिगंबर बीन बॅग वर बसून रुबिक्स क्यूब सोडवत असतो..पण  समीर मात्र त्याच्याच प्रश्नांच्याच्यात गुरफटलेला असतो.. " टॉमी तिकडे जाऊन का थांबला असेल आणि ते प्लास्टिक..ते कुठून आलं असेल जंगलात..?? " तो स्वत:शीच बोलत होता.

 

" सम्या , अरे भाई...नको तू डोक्याला शॉट लाऊन घेऊ..कसला एवढा विचार करतोय.. " या वेळेस दिग्या चिडून बोलतो.

 

" चल बाय , मी जातो घरी , आई वाट बघत असेल..उद्या भेटू कॉलेज ला.." हे बोलून दिग्या तो अर्धा सोडवलेला रुबिक्स क्यूब बाजूच्या टेबल वर ठेऊन निघून जातो..समीर तसाच बसून राहतो..स्तब्ध..

 

रात्रीचं जेवण करताना ही समीर हरवल्या सारखा असतो..

 

" काय झालं समीर असा शांत का आहेस आज ? " - प्रकाश , समीर चे बाबा त्याला विचारतात..

 

जंगलात घडलेला सगळा प्रकार समीर त्याचा आई-बाबांना सांगतो..टेबल जवळ उभे असलेले दत्तु काकाही त्याच बोलणं लक्ष देऊन ऐकत होते. 

 

" ओह , यू थिंक टू मच.. सॅम.. "   - प्रकाश..

 

" तुम्ही नगा काळगी करुसा , म्ह्या हाय..मी न्हेईन टॉमी ला फिर्वया.. चालतंय न्हवं.. " दत्तु काका समीरला म्हणाले. 

 

" ओक्के.."  समीर होकारार्थी मान हलवत म्हणाला.

 

दत्तु काका हे त्यांच्या घरी काम करायचे अगदी समीरचे आजोबा होते तेव्हा पासून..ते मूळचे कोल्हापूर चे होते..पण ते मुंबईत आले तेव्हा पासून ते इथेच राहायचे. देवधर कुटुंबाचं ते एक अविभाज्य भाग झाले होते. प्रकाश आणि माधुरीच्या मनातही त्यांच्या बद्दल खूप प्रेम आणि आदर होते. 

 

सगळ्यांच जेवण एव्हाना आटपलं होतं..दत्तु काका सगळी आवरा आवर करत होते..

 

" माधुरी , मला उद्या अर्जंट जयपूरला जावं लागणार आहे..तिथे एक बिझनेस कॉन्फरन्स आहे. प्लीज मला सामान पॅक करायला मदत कर ना.. -  प्रकाश.

 

" अच्छा...चल आलेच मी.. "  - माधुरी.

 

प्रकाशचं असा अचानक एखाद्या बिझनेस ट्रीपला जाणं हे काही माधुरी साठी नवीन न्हवत. व्यवसायानिमित्त तो अनेकदा असं जात असे.

 

"समीर तूही लवकर झोपून घे , उद्या कॉलेज ला जायचयं ना.." - माधुरी तिच्या खोलीकडे जाता जाता समीरला बोलते. 

 

" हो आई " - समीर.

 

चोहीकडे दाट अंधार होता. रातकिड्यांचा कीर्रऽऽऽ आवाज येत होता. खोलीत एक झीरो चा दिवा पेटलेला होता. समीरला झोप येत न्हवती तरीही तो झोपण्याचा एक खोटा प्रयत्न करत होता. सारखा कूस बदलून झोपण्याचा त्याचा प्रयत्न ही निष्फळ ठरत होता. रात्रीचे १:०० वाजून गेले असावेत. अचानक समीरला बाजूच्या खोली चा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि तो ताडकन उठला. बाजूची खोली त्याच्या आजोबांची होती. समीर बेड वरून खाली उतरला आणि त्याच्या खोलीच्या दरवाजाच्या दिशेने दबक्या पावलांनी चालू लागला. अगदी थोडा दरवाजा उघडून तो कानोसा घेऊ लागला पण बाहेर त्याला कोणतीच हालचाल जाणवली नाही..एकदा दरवाजा उघडण्याचा आवाज झालेला तेवढंच..

 

हिम्मत करून तो बाहेर आला आणि बाजूच्या खोलीच्या दरवाजाच्या समोर उभा राहिला. दरवाज्याचा अगदी थोडा भाग उघडा होता. समीरने थरथरत्या हाताने दार आतल्या बाजूला ढकलले..समोर पाहतोय तर काय.... टॉमी.. आजोबांच्या फोटो कडे बघत बसला होता.. समीरला बघताच टॉमी शेपूट हलवत त्याचा जवळ आला..  समीरने भुवया उंच करून तोंडातून "फूऽऽऽ..." असा उद्गार काढला आणि सुटकेचा निःश्वास टाकला. 

 

मग तो आणि टॉमी खोलीत गेले .समीर बेड वर जाऊन बसला आणि तो ही आजोबांच्या फोटो कडे पाहत राहिला.टॉमीने ही बेडवर उडी घेतली आणि समीरच्या शेजारी येऊन बसला..समोर एक सत्तरीतल्या व्यक्तीचे फोटो..त्यावर चंदनाच्या फुलांचा हार घातलेला होता. फोटोच्या खाली काचेच्या रॅकवर एक दिवा मंद आंचेवर जळत होता.." डॉ. विश्वासराव लक्ष्मण देवधर.. " ( जन्म १२ मे १९४६ - मृत्यू २१ मार्च २०१८)   असा मजकूर त्या फोटोच्या खालच्या बाजूला लिहलं होतं.  

 

समीरला आता त्याच्या आजोबांच्या आठवणींनी घेरलं होतं. लहानपणी त्याचे आजोबा कसे त्याला  खांद्यावर घेऊन फिरायला जायचे..सायकल चालवायला शिकवायचे..अश्या अनेक आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या.त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते.पण अश्रू आवरत तो फोटो कडे नजर रोखून म्हणाला.."का सोडून गेलात आम्हाला आजोबा.. , बघा..ह्या टॉमीला पण तुमच्या शिवाय करमत नाही.." 

 

विश्वासराव हे तत्कालीन काळात सायन्स क्षेत्रातले प्रख्यात प्रोफेसर होते. कार अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले होते.तो अपघात इतका भीषण होता की  त्यांचे पार्थिव शरीर ही सापडले नाही. दत्तु काकांना हा आघात सहन झाला नाही म्हणून ते कोणालाही न सांगता निघून गेले . थोड्यादिवसांनी ते परत आले , गावाला गेलेलो असं त्यांनी सांगितलं. पण ते नेहमी गप्प असायचे , खूप कमी बोलायचे. ते आधीचे दत्तु काका राहिले न्हवते...

 

समीर तिथेच बेड वर पडून राहिला..फिरणाऱ्या पंख्याकडे बघत बघत तो तिथेच झोपी गेला..

 

खोलीत फक्त घड्याळाच्या काट्यांचा आवाज येत होता.चंद्राचा मंद प्रकाश खिडकीतून खोलीत येत होता..काही क्षण गेले..आणि एक अंधुकशी आकृती अजूनही समीर कडे पाहत होती..तेच रोखलेले डोळे...तीच खिळलेली नजर !!

 

 

.....................................................................................................................................

 

क्रमशः

 

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED