Navnath mahatmay - 2 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग २

नवनाथ महात्म्य भाग २

पहीला अवतार “मच्छिंद्रनाथ”
==============
आदिनाथ आणि दत्तात्रेय नंतर नाथ पंथातील सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे आचार्य मत्स्येंद्र नाथ, जे मीननाथ आणि मच्छिंद्रनाथ म्हणून लोकप्रिय झाले. कौल ज्ञान निर्णयानुसार मत्स्येंद्रनाथ कौलमार्गचे पहिले प्रवर्तक होते. कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. मत्स्येंद्रचे गुरू दत्तात्रेय होते. कवी नारायणाचे प्रथम अवतार हे श्री मत्स्येंद्रनाथ होते . कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि "श्री मत्स्येंद्र" हे नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होते . कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्ति चळवळीमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात. जगात सर्वात प्रथम श्री शंकराकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते स्वामी मछिंद्रनाथ होते . विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मछिंद्रनाथ होय. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही. हा तर देवाधिदेव महादेव यांनी आदिमाया पार्वती, भिल्लीणीच्या रुपात असतांना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय, असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मछिंद्रनाथ होय. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषीश्रेष्ठ, स्वामी मछिंद्रनाथ होते . महादेव शंकरानंतर ज्या कोणास संजीवनी विद्येचे केवळ ज्ञान होते एवढेच नव्हे, तर त्या अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते आणि स्वतःवर तसेच मीननाथांवर संजीवनी विद्येचा वापर करून स्वतःचे परमश्रेष्ठत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ विभूती म्हणजे स्वामी मछिंद्रनाथ होते . गोरक्षासारखा अवधूत स्थिती प्राप्त झालेल्या श्रेष्ठतम शिष्याच्या तपोमयतेचा अहंकार, अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आव्हान देऊन, त्रिखंडात क्षणात संचार करणाऱ्या गोरक्षनाथांनाही पुनःश्च शरण आणणारे जगातले पाहिले शिवशिष्य स्वामी मछिन्द्रानाथ होय. (मछिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला, त्यात त्यांनी पृथ्वी, तेज, आप, वायू व आकाश अशी रुपे धारण केली व तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळुन काढले पण त्यांना स्वामी मछिंद्रनाथ सापडले नाहीत). श्री मच्छीन्द्रनाथ व गिरनार पर्वत श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांची जन्मकथा अशी सांगितली जाते .. एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर एकत्र असताना , 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस शिवशंकर मंत्रोपदेश करू लागले,पण ज्या एका मच्छीने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. हा मंत्र ऐकल्यामुळे त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे त्यांना समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला,परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यासाठी तु पुढे बदरिकाश्रमास ये,तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पुर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून दिले आणि आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीतरी बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलीच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखे दैदीप्यमान बालक पाहुन त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तु आपल्या घरी घेऊन जा. त्याचे नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तु मनात कोणताच संशय आणू नको. ते ऐकुन कोळ्याने ते बालक घरी नेऊन आनंदाने आपल्या पत्नीला दिले व हा मुलगा आपणाला ईश्वराने दिला आहे म्हणुन सांगितले. तिने त्याला जवळ घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तेव्हा तिला पान्हा फुटला. मुलगा दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात तिने निजविले. त्या उभयताना मुल व्हावे अशी त्यांची खुप इच्छा होती ,तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने दोघांना अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथांचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास सोबत घेऊन त्याचा पिता कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. बापाचे ते कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे,असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण इथे उपस्थित असताना बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पहाणे चांगले नाही. ज्याप्रमाणे आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण काहीही करून ह्याचा हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. मग तो एक एक मासा घेऊन परत उदकात टाकू लागला. ते पाहुन त्याच्या पित्यास इतका राग आला की, तो लागलीच पाण्याबाहेर आला आणि त्यास मारू लागला आणि म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणतो आहे आणि तु ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस? तर मग खाशील काय? आपल्याला भीक मागावी लागेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला. त्या बोलण्याने मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरला आहे असे पाहुन त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला फीरत फीरत तो बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या इतकी कठीण होती की, त्याच्या हाडांचा केवळ सांगाडा शिल्लक राहीला. इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व आदिनाथाची स्तुति करताच आदिनाथाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन आदिनाथ अरण्यात गेले . त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तात्रेयास अरण्य पाहाण्याची इच्छा होऊन त्यास आदिनाथाचा रुकारही मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहुन आनंदित झाले . रम्य वनश्रीने नटलेल्या, गर्द गीरच्या जंगलाने वेढलेल्या, सिंह-व्याघ्र यांचे निवासस्थान असलेल्या परमपवित्र गिरनार पर्वतराजी पाहुन ते प्रसन्न झाले . त्यावेळी नुकताच वर्षा ऋतू सरलेला. सगळीकडे हिरवळ पसरलेली अशा उन्मादक वातावरणात मच्छिंद्र ध्यान लावून बसलेले दिसले . दत्त महाराजांची स्वारी आली गुरू शिखरावर. मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडले आणि दत्तात्रेयांना नमस्कार केला. दत्तात्रेय म्हणाले "मच्छिंद्रा वातावरण बघ कीती मोहक झालंय! मला वनविहार करण्याची प्रबळ इच्छा होते आहे. ह्या माझ्या प्रिय गिरनारचे सौंदर्य बहरून आले आहे ते मला पहायचे आहे. चल ऊठ आपण फेर फटका मारून येऊ." मच्छिंद्रनाथ म्हणाले "प्रभो मी आपला प्रिय पुत्र आहे. आपली ईच्छा पूर्ण करणे माझे परमभाग्यच आहे ." दोघेही गुरू शिखरावरून खाली उतरू लागले. वाटेत एक श्वान त्यांच्या सोबत येऊ लागले .

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED