Bhutanch lagin - 1 books and stories free download online pdf in Marathi

भुताचं लगीन (भाग १)





आईऽ..ऐ...आईऽ कुठेस गं ? हे बघं मी आलोय कामावरून, लवकर बाहेर ये! पार्कींग मध्ये गाडी लावता लावता दिगंबर आईला हाक मारू लागला.

त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली.
"हा ! आलास तू ऐवढी आरडाओरडा कशाला करतोय, नक्कीच चहा हवा असणारं म्हणूनच ना? तू आधी हातपाय स्वच्छ धुऊन घे मग ये चहा प्यायला."

"अगं.. तुझ्या चहाला मार गोळी, एक गुड न्यूज आहे, ती तर ऐकून घे!"

"अरे व्वा.. गुड न्यूज, खरंच?" भुवया उंचावून आई म्हणाली.

"हो..! माझ्या ६ महिन्यांच्या कामावर खूश होऊन, बाॅस ने मला प्रमोशन दिलंय आणि त्याबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुध्दा दिलाय.

"अरे व्वा..देवच पावला म्हणायचा,थांब आधी देवापुढे साखर ठेवून येते"

"झालं...म्हणजे माझ्या मेहनतीच काहीच मोल नाही का? सगळं देवाने च केलं?" दिगंबर आईवर चिडून म्हणाला.

"तसं नाही सोन्या तुझी मेहनत आहेच की, पण त्यासोबत देवाचा आशीर्वाद सुध्दा आहे,"आई दिगंबरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"बरं..तूझं देव देव आज जरा बाजूला ठेव आणि माझं सगळं नीट ऐक, माझ्या प्रमोशन सोबत माझी कोल्हापूर ला बदली झालेय, त्यामुळे मला उद्या पहाटेच निघायचंय"

"अरे पण तिकडे तुझ्या खाण्यापिण्याचं कोण बघेल तूझी काळजी कोण घेईल" आई वैतागून म्हणाली.

"आता मी काय लहान आहे का ? माझी काळजी मी स्वत: घेईन आणि माझ्या सोबत आमच्या ऑफिसमधला माझा एक मित्र सुध्दा आहे , त्यामुळे काळजी नाही, तू निर्धास्त रहा!"

"बरं बरं जा तू , फक्त काळजी घे म्हणजे झालं!

"हो गं.., असं म्हणत दिगंबर खोलीत जाऊन पॅकींग करायला सुरुवात करतो.

रात्रीचे १० वाजून गेले.
दिगंबर पॅकींग करून झोपायची तयारी करतो,
इतक्यात त्याची आई तिथे येते.

आई : दिगू बेटा माझं जरा नीट ऐक तिकडे गेल्यावर कुठेही भटकत बसू नको, काही जागा चांगल्या नसतात,खेड्या-पाड्यात भुताटकी चे प्रमाण ही व फार असतं म्हणे! त्यामुळे रोज न चुकता हनुमान चालीसा वाचत जा!
दिगंबर : झालं का तुझं देव देव सुरू? या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, माझं या असल्या भुताटकी वर अजिबात विश्वास नाही.
आई : बाळा तू नीट जपून रहा म्हणजे झालं, आणि तशी वेळ पडलीच तर देवाकडे प्रार्थना कर! तो तुझी नक्की मदत करेल, असं म्हणत ती हनुमानाचा फोटो त्याच्या बॅगेत ठेवून देते.

"हो माते..ऽ तू म्हणशील तसं! आता मी झोपतो मला पहाटे ५ ला उठायचं आहे"
असं म्हणतं दिगंबर झोपून गेला.

पहाटेचे ५ वाजून गेले.

मोबाईची रिंग वाजते.
दिगंबर काॅल कट करून पुन्हा झोपून जातो,
पुन्हा एकदा रिंग वाजते.
"अरे यार कोण आहे सकाळी सकाळी" दिगंबर वैतागून फोन उचलतो.
"दिग्या.. मी मनोज बोलतोय, झाली का तुझी तयारी, मी स्टेशन वर येऊन पोहोचलोय बघं!"
मनोज चा आवाज ऐकून दिगंबर खडबडून जागा होतो
"हो हो निघतो मी लगेच!" असं म्हणतं दिगंबर सगळं आवरून स्टेशनवर पोहोचतो
"काय राव.. दिग्या किती उशीर? मी कधीचा येऊन थांबलोय"
मनोज चिडून म्हणाला.
"बरं बरं साॅरी , पुन्हा नाही होणार असं"
"पुन्हा अशी वेळ मी येऊच देणार नाही, काय पाप केलं आणि बाॅस ने तुझ्यासोबत मला पाठवलं" मनोज तोंड वाकडं करत म्हणाला.

तेवढ्यात स्टेशनला कोल्हापूर जाणारी ट्रेन लागते, दोघेही आपापल्या बुकींग केलेल्या जागेवर बसले.

रात्रीचे ८ वाजतात.

ट्रेन कोल्हापूर स्टेशनवर येऊन थांबते.
दोघेही आपापलं सामान घेऊन फलाटावर उतरतात.
"अरे मनोज आता इथून कसं आणि कुठे जायचं?"
"थांब माझ्याकडे Address आहे, मी इथे कोणाला तरी विचारतो"
फलाटावरच्या चहा वाल्याला आवाज देत मनोज म्हणाला,
"दादा हा विश्वनाथ जहांगीरदारांचा वाडा कुठे आहे"
"मला न्हाय ठाऊक, दूसरं कुणालातरी विचारा"
"okay विचारतो" असं म्हणत मनोज इतरांना विचारू लागतो.

दिगंबर आणि मनोज स्टेशनवर अनेकांना विचारतात,पण कोणालाच तो पत्ता ठाऊक नसल्याने दोघेही वैतागून स्टेशनच्या बाहेर येऊन बसतात.
स्टेशनबाहेर उभ्या असणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरला सुद्धा या पत्त्या बद्दल काहीच ठाऊक नव्हतं त्यामुळे दोघेही पूरते वैतागतात.

रात्रीचे १२ वाजून गेले.

दिगंबर : शीट यार मला तर वाटतंय , या बाॅस ने आपल्याला फसवलय, उगाच या बदली साठी आपण तयार झालो.

मनोज :- हो ना, मला तर वाटतंय आपण पुन्हा मुंबई ला निघून जावं.

शेवटी वैतागून आपापलं सामान घेऊन दोघेही पुन्हा स्टेशनवर जायला निघाले, तेवढ्यात मागून त्या दोघांना कुणीतरी आवाज दिला.

"पावणं कुणीकडं जायचं हाय तुमास्नी?" पन्नाशीतला एक माणूस बैलगाडी हाकत म्हणाला.

हा आवाज ऐकताच दोघेही मागे वळून बघतात.

दिगंबर : कोण तुम्ही? आम्हाला विश्वनाथ जहांगीरदारांच्या वाड्यावर जायचंय , तुम्हाला ठाऊक आहे का हा वाडा कुठे आहे ते?

"म्या पांडू , माझ्या शेताच्या बगललाच हाय ह्यो वाडा, या म्या सोडतो तुमास्नी!"

मनोज : खरंच सोडाल ना , नाहीतर इथे हा पत्ता कोणालाच ठाऊक नाही‌.

पांडू : काय पावणं , म्या कशापाई खोटं बोलू? तुमचा इशवास नसल तर नगा येवू, म्या निघतो.

दिगंबर : अरे मन्या , ते एवढं म्हणत आहेत, तर नक्कीच त्यांना माहीत असेल पत्ता, चल बस लवकर बैलगाडीत‌.

मग दोघेही सर्व सामान बैलगाडीत ठेऊन निघाले.

रात्रीच्या २ वाजता.

पांडू : पावणं कुटल्या गावचं तुम्ही, अन् जहागीरदारांच्या वाड्यावर कशापाई जाताय?

मनोज : आम्ही मुंबई हून आलोय, आमची बदली झाल्याने , आम्हाला या वाड्यात राहायला जागा दिलेय.

दिगंबर : अहो पांडू दादा इथे कोणालाच कसं या जहागीरदारांचा वाडा ठाऊक नाही?

पांडू : व्हय तर , कसं ठाव आसल , लय जुना वाडा हाय त्यो किमान ४०-५० वरीस तरी जुना आसन बघा ,पण लय आडमार्गाला हाय, त्यामुळं कोण फिरकत न्हाय तिकडं.

पांडू एकटाच बरळत होता, दिगंबर आणि मनोज दोघेही बैलगाडीत झोपून गेले,
रात्रीच्या अंधारात पांडू बैलगाडी चांगलीच ताणपडत होता, अधूनमधून कुत्र्यांच्या रडण्या-ओरडण्याचा आवाज ऐकू आला की, स्वत:शीच काहीतरी बरळून मोठमोठ्याने हसायचा.

रात्रीचे ३ वाजून गेले,

पांडू : पावणं ह्यो बघा, आला जहागीरदारांचा वाडा.

दिगंबर : "wow कसला भारी आहे रे हा वाडा" दिगंबर मोठ्या आश्चर्याने म्हणाला.

मनोज : तूला भारी दिसतोय हा वाडा? शी..ऽ किती घाण आणि भयानक आहे हा! मी तर नाही राहू शकणार इथे‌.

दिगंबर : don't worry मन्या...राहू आपण!

मनोज : तूला राहायचं असेल तर रहा, मला नाही जमणार,
ओ...ऽ पांडू दादा मला पुन्हा स्टेशनवर सोडा!

पांडू : कशापाई ? आता तुमास्नी इथंच राहावं लागलं, तुमची सुटका न्हाय आता, भेटू लवकरच!
ही....ही...ही अशा विचित्र हसत हसत तो तिथून निघून गेला.

दिगंबर :- येडा आहे वाट्ट हा! काहीतरीच बरळतोय‌.
असं म्हणत दिगंबर मनोज ला घेऊन वाड्यासमोरच्या बागेत उभा राहिला.

मनोज च्या मनाविरुद्ध राहावं लागतं असल्याने तो दिगंबर वर वैतागून म्हणाला,
"दिग्या बोलत होतो ना,इथे थांबायला नको म्हणून, बघं ना काय डेन्जर सीन आहे इथे"

दिगंबर : मन्या गप रे , काय लहान मुलांसारखा रडतोय, आपल्याला या वाड्यापेक्षा जास्त महत्वाचा आपला प्रोजेक्ट आहे, आणि तसंही इथे कामात कोणाचा व्यत्यय येणार नाही, त्यामुळे प्रोजेक्ट ही लवकर पूर्ण होऊन जाईल.

वाड्यात समोरच्या अंगणात बॅगा टाकून दोघेही तिथे असलेल्या खुर्चीवर बसले,
दिवसभराच्या प्रवासामुळे नकळत दोघांचाही बसल्या जागीच डोळा लागला.

सकाळचे ८ वाजून गेले.
दिगंबर : तुमचे खूप खूप आभार पण , खरंच याची काहीच गरज नव्हती.
दिगंबर चा आवाच ऐकून मनोज जागा झाला,
तो एका अनोळखी तरूण मुलीशी बोलत होता.
मनोज: दिग्या ह्या कोण?
दिगंबर : अरे या वाड्याच्या मागच्या बाजूला राहतात, आपण आल्याच दिसलो म्हणून , आपल्यासाठी चहा , नाश्ता घेऊन आल्या.
Bye the way तुमची ओळख नाही सांगितली तुम्ही?

"मी चंद्रीका गोडसे, पूर्वी मी आणि माझे वडील आम्ही दोघे इथे राहायचो, पण २ महिन्यांपूर्वीच ते वारले."

मनोज : अच्छा म्हणजे तुम्ही आता इथे एकट्या राहता?
चंद्रीका : होय..!, चला येते मी तुम्हाला काही मदत हवी असेल तर आवाज द्या.
असं म्हणत मी तिथून निघून गेली.

तेवढ्यात अचानक मनोज च लक्ष वाड्याकडे गेलं.
"अरे दिगू हा वाडा बघं! किती सुंदर दिसतोय, काल रात्री तर किती भयानक आणि खराब दिसतं होता"

दिगंबर : हो! मी सकाळी उठलो तेव्हा चंद्रीका वाड्याची साफसफाई करत होती, तिचे वडील पूर्वी या वाड्याची काळजी घ्यायचे, पण आता त्यांच्यानंतर तिच सगळं बघते.

मनोज :- ooh म्हणजे असं आहे तर! चांगलंच आहे म्हणा, पण या चंद्रीकाला आधी कुठेतरी पाहील्यासारखं वाटतंय?

दिगंबर : काहीतरीच हा तुझं , आता तिला कुठे पाहीलस तू?

मनोज : ते नक्की आठवत नाही,पण नक्कीच मी पाहीलय हिला!

दिगंबर : ok ok आता तुझं झालं असेल तर आपण वाड्यात जाऊन फ्रेश होऊन, आपल्या प्रोजेक्ट ची तयारी करू.

दोघेही फ्रेश होऊन, प्रोजेक्टच्या तयारीत मग्न झाले.

.........

रात्रीचे ९ वाजून गेले.
दोघेही प्रोजेक्टच्या कामात पूर्ण पणे गूंतून गेले होते,
तेवढ्यात चंद्रीका दारापाशी जेवण घेऊन आली.

चंद्रीका : मी आत येऊ का?

दिगंबर : हो ये ना!

चंद्रीका : दोघांसाठी जेवण घेऊन आले, जेवून घ्या!

मनोज : तु कशाला उगाच त्रास घेतलास, आम्ही काहीतरी बनवलं असतं!

चंद्रीका : हो पण , तुम्ही बनवणार कशावर? तुमच्या कडे गॅस , स्टो काही आहे का?

दिगंबर : हो रे , हे तर लक्षातच नाही आलं आपल्या!

चंद्रीका : म्हणूनच येताना घरातून जुना स्टो आणि थोडं रॅकेल घेऊन आलेय, उद्यापासून तुमचं तुम्ही बनवून खाऊ शकता.

मनोज : Hmmm..हे एक चांगलंच केलंस तू!

दिगंबर : चंद्रीका... thank you so much!

चंद्रीका : Thank you वैगरे काही बोलू नका, कधीतरी तुमच्या हातचं सुध्दा खाऊ घाला म्हणजे झालं!
असतं म्हणत ती तिथून निघून गेली.

दोघांची जेवणं उरकली,दिवसभराच्या कामामुळे दिगंबर लवकर झोपून गेला,
मुंबईत उशीरा झोपायच्या सवयीमुळे मनोजला लवकर झोप येत नव्हती, त्यामुळे तो खोलीतल्या खिडकीच्या कट्टयावर बसून पुस्तक वाचत होता.

.......

रात्रीचे १ वाजून गेले.
मनोज पुस्तक वाचण्याच्या तंद्रीत होता, तेवढ्यात अचानक त्याला खिडकीखाली कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊन लागला, तसा तो तंद्रीतोडत खाली पाहू लागला.
वाड्याच्या एका बाजूला असलेल्या पडक्या विहिरी च्या कट्टया वर कुणीतरी बाई विचित्र हावभाव करून मोठमोठ्याने खिदळत होती, तिचा त्या आवाजात वेगळीच घर्र...घर्र...ऐकू येत होती, तेवढ्यात वेड्यासारखी उड्या मारत-मारत ती कट्टयावरून खाली विहीरीत उडी घेऊन अचानक अदृश्य झाली आणि पुन्हा कट्टयावर खिदळताना दिसू लागली.
हे चित्र पाहून त्याच्या तोंडचं पाणीच पळालं,त्याला काय करावं हे कळलेच ना!
तसा तो धीट होता,पण हा विचित्र प्रकार पाहून तो , पुरता घाबरून गेला. हा नक्कीच भुताटकी चा प्रकार आहे हे त्याने मनाशी पक्क केलं,
पण तरीही ही बाई नक्की कोण आहे, हे पाहायला हवं असं म्हणत तो खिडकीआडून एकटक तिला पाहू लागला, आणि पाहता पाहता त्याने तिला ओळखलं.

"आई शप्पथ..ऽ ही तर चंद्रीका आहे! म्हणजे चंद्रीका एक अतृप्त शक्ती आहे, अरे देवा..ऽ कुठे येऊन फसलो, तरी सांगत होतो दिग्या ला पण साल्याने ऐकला नाही!
त्यात तो पांडू..ऽ
पांडू च नाव घेताघेता मनोज एकाकी गप्प झाला, इतक्यात त्याला काहीतरी आठवलं, काल तो दिगंबर ला म्हणाला होता की, या चंद्रीके ला कुठेतरी पाहील्यासारखं वाटतंय,
आणि तिच चंद्रीका हुबेहूब पांडू सारखी दिसतेय!
म्हणजे पांडू च रूप घेऊन ती आम्हाला स्वतः स्टेशन वर न्यायला आली, याचा अर्थ आम्ही इथे येणार हे तिला आधी पासूनच माहीत होतं.
नाही नाही आता दिग्याला सांगून उद्याच्या उद्या
इथून पळ काढायला हवा, नाहीतर जीवावर बेतू शकते."
असे अनेक विचार करत करत मनोजचा बसल्या जागीच डोळा लागला.



.
.
.
क्रमशः ✍️
(पुढील भाग लवकरच...)

.

✍️@शिवानी पाटील.


इतर रसदार पर्याय