Shahir - 5 books and stories free download online pdf in Marathi

शाहिर... - 5

'शाहीर'!

क्रमशः..
भाग- पाच

"...तुमच्या गुडघ्याला इतकं लागलं, तर त्या वेळी डॉक्टर, दवाखाना असतीलच की! "

" ही मागच्या तीस वर्षां अगोदरची गोष्ट. त्या टायमाला सरकारी दवाखान्याशिवाय कवचितच कुठंतरी एखादा दवाखाना असायचा. आन् दवाखान्यात जायाचं म्हंटल्यावर अंगावर काटा उभा राह्याचा, त्या वेळची माणसं दुखण्यानं जाग्यावर बसून राह्यली तरी दवाखान्याचं नाव काढत नसायची. हळद, झाडपाल्याच्या औषधावरच लय लोकांचा विश्वास. त्यामुळं दवाखान्याचा इचार कुणाच्या डोक्यात सुद्धा येत नसायचा. आन् मग कुठला दवाखाना न् काय..! ,
पण आत्ताच्या लोकांचं कसं झालंय, कष्टाचं प्रमाण कमी.. खाणं नाजूक.. त्यामुळं जीवन नाजूक झालंय, ह्यांना त्यावेळच्या माणसांसारखं किरकोळ दुखणं सुद्धा अंगावर काढणं म्हणजे जीवावर बेतण्यासारखं आहे."

"नाना, तुम्ही इतकी वर्षे शाहीर म्हणून काम करत असताना कुठे मोठा पुरस्कार किंवा बक्षीसं मिळाले आहे, असं कधी झालंय का?"

" तुला अगोदरच सांगितलं तसं, आम्ही पैसं किती मिळत्यालं, पैसं मिळत्यालं..का मिळणारच नाहितं, याचा कवाच डोक्यात विचार आणला नाही. कलेसोबत वाहत रहाणं एवढंच आम्हाला ठावं. आमची कुठंही पोहच नाही, ना आमच्यात कोण लय शिकल्या सवरल्यालं होतं, त्यामुळं कितीही चांगलं काम केलं, तरी त्याची वरच्या लेव्हलला दखल कोण घेणार? तरीही अनेक ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन, फेटा बांधून माझा सत्कार करण्यात आला आहे आणि जे तुझ्या समोर भिंतीवर काही स्मृती चिन्हं, ढाल दिसत आहेत, तेवढंच काय ते आता उरलंय. शाहीर म्हणून आजवर लोकांनी जो मानसन्मान दिला आणि आजही 'शाहीर' या नावानेच लोक मला ओळखतात, या शिवाय अजून काय पाहिजे! यावरच मी समाधानी आहे."

"नाना, तुम्ही इतकी वर्षे झाली दाड किडीवर औषध देत आहात, तेही लोकं इच्छेनुसार देतील तेवढेच पैसे घेऊन.आणि तेवढ्यावरच घर चालवता. मग तरीही लोक तुम्हाला इतर नावांनी न ओळखता 'शाहीर' या नावानेच ओळखतात, असं का असेल?"

दाड किडीच्या औषधाचं म्हणशील, तर ती आमच्या अग्नुअण्णांची म्हणजे आमच्या वडीलांची देणगी आहे, पुण्याई आहे. ते हयात असताना जीवनभर लोकांना दाड किडीवर औषध देत होते, त्यांचाच वारसा मी चालवतोय.आणि माझ्या 'शाहीर' या नावाचं म्हणशील, तर शाहीर म्हणजे नुसता फेटा हाय का..., दोन अडीच रुपय टाकलं, की पटकन मिळंल!. आन् नुसता डोक्यावर फेटा बांधला, म्हणून कुणाला शाहीर होता येतं का..? शाहीर हा, लिहिलेल्या शब्दाला घासून पुसून गुळगुळीत करून त्याचं सोनं करत असतो. ही नुसती कला नाही, ही साधना आहे अन् ती एका दोन दिवसांत येत नसती. त्याला सराव लागतो, तालमी व्हाव्या लागत्यात, मग ते हळूहळू जमतं; अंगात उतरतं न् मग पुर्ण अंगात भिनतं...

तुला सांगायचं म्हणजे, या भाळवणी जवळच्या बलवडीला दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त मोठ्ठा कार्यक्रम असायचा. बाबासाहेबांच्या वर लिहलेली कवणं सादर करायला दरवर्षी वेगवेगळ्या भागातून एकतारी वाले भजन म्हणणारे शाहिर यायचे. त्या टायमाला बलवडीतल्या या कार्यक्रमात जो सरस ठरंल, त्याचा सत्कार आन् 'मानाचं चांदीचं कडं' बक्षीस म्हणून दिलं जायचं. इथल्या कार्यक्रमात आपली शाहिरी कवणं सादर करायची नुसती संधी जरी मिळाली, तरी आसपासच्या परिसरात त्याचं आपोआपच नाव होत होतं. त्यामुळं अशी संधी सहसा कोणी सोडत नव्हतं. अन् त्यात ते 'चांदीचं कडं' ज्याला मिळंल, तो तर चांदीसारखाच चमकायचा. त्यामुळं एकतारीवाल्या शाहिरांच्यात दरवर्षी चढाओढ लागलेली असायची.

मलाही एके वर्षी त्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. एका पाठोपाठ एक असे आठ दहा जणांनी आपापल्या परीनं बाबासाहेबांच्यावर लिहलेली एकापेक्षा एक सरस कवणं सादर केली. 'यात आपला कुठं निभाव लागणार', असं वाटायला लागलं होतं, पण स्टेजवर गेल्यावर जी हाळी ठोकली अन् कवण म्हणायला सुरुवात केली..!

' पब्लिक नुसं टक लावून बघतच राहिलं. माझं कवण झालं अन् आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले, की आता बाकीचे एकतारी वाले गप्प बसतील, कुणीही वळवळ करणार नाही. फक्त हाच एक शाहीर आपली कवणं सादर करेल आणि खरंच त्यापुढं फक्त माझीच कवणं सादर केली गेली. माझ्या आवाजाची धार अन् कवणं ऐकून पब्लिक नुसतं घायाळ झालं. कार्यक्रम झाल्यानंतर हौशी लोकं स्टेजवर मला भेटायला यायला लागली. त्यातले बरेच जण यायचे आणि मला म्हणायचे, 'जय भीम शाहीर. जय भीम शाहीर.' मला भेटायला येणाऱ्या लोकांना मी कधी जय भीम म्हणायचो, तर कधी नमस्कार करायचो. यावर काही लोकं परस्पर चर्चा करायची, मग त्यांना कुठून तरी समजायचं, की हा शाहीर आपल्या जातीचा नाही. हा रामोशी जातीचा आहे. त्यावेळी लय वाईट वाटायचं. वाटायचं, कलाकाराची कला बघावी, महामानवाच्या विचारांबद्दलची आस्था बघावी, की जात....?

त्यातलीपण जी कलेची थोडीफार जाण असणारी काही लोकं असायची, ती आश्चर्यानं तोंडात बोटं घालायची अन् म्हणायची, ' बघा..जातीनं रामोशी असूनसुद्धा बाकीच्यांना जमणार नाहीत अशी सुरेख, एकापेक्षा एक सरस कवणं सादर करतोय.'

आपल्या कलेची कुणी स्तुती केली, की हुरूप वाढायचा. नव्या उमेदीने नवीन कवणं लिहायची, चालीत बसवायची अन् प्रत्येक वर्षी तिथं जाऊन सादर करायची, असं चालू झालं. असं करून बलवडीला दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोलावलं जाऊ लागलं. तिथून पुढं काही वर्षें आंबेडकर जयंतीनिमित्त शाहिरी कार्यक्रम सादर करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये वीस बावीस दिवस माझ्या तारखा बुक असायच्या. असं पुढं कैक वर्षे चालू होतं.

आत्ता नवीन जमाना आला, अन् सगळीकडं कुणाला कसं आवडेल, जमेल तशी जयंती साजरी करू लागले. यात अशी 'मानाच्या चांदीच्या कड्यासाठी' शाहिरां शाहिरांमध्ये सरस कवणं सादर करण्यासाठी होणारी चुरस मागं पडत गेली आणि आता ती प्रथा बंद झाली...

"इतक्या वर्षांपासून चालू असणारं तुमचं कलापथक तुम्ही बंद का केलं ?", मी सहजच विचारलं.

"कलापथक...

क्रमशः.....
©_ सुभाष आनंदा मंडले
(9923124251)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED