Sanjay - 1 books and stories free download online pdf in Marathi

संजय - भाग 1

संजय कादंबरी भाग एक

त्याला आठवत होता त्याचा भुतकाळ. तो आठवत होत्या गतकाळात घडलेली प्रकरणे. तो होता म्हणून एका आंधळ्या माणसालाही जग पाहता आलं होतं. तो सदैव सोबत होता त्या आंधळ्या माणसाच्या. कुणाला तरी दिलेलं वचन होतं ते. ते भंगू नये म्हणून तो कर्तव्य पालन करीत होता तो. परंतू त्याच्या मनात आज एक शल्य होतं. ते म्हणजे तो त्या आंधळ्या व्यक्तीच्या शेवटच्या समयी त्याला वाचवू शकला नव्हता.
महाभारत घडलं की नाही, हे काही माहीत नाही. परंतू त्यात असलेली एक एक पात्र आजही आपल्याला बोध देत असतात. माणूसकी शिकवीत असतात. कोणत्या प्रसंगात कसं वागावं याची शिकवण देत असतात.
आजची परिस्थिती पाहिली जगाची तर असं जाणवतं की आजचं जग हे कौरव व पांडवानंच भरलेलं असून आजच्या काळात जी मुठभर इमानदार माणसं मिळतात. त्याच माणसांवर आजची वास्तविकता आधारलेली आहे. त्यांनाच पांडव म्हणता येईल. ही मुठभर असलेली मंडळी अतिशय इमानदार असून ती मंडळी चो-या लुटमार, डकैती, व्याभीचार करीत नाहीत. तसेच आदर्श व्यवहार ठेवत असतात. मात्र बाकीची सर्व मंडळी अशी आहेत की जी चो-या, लुटमार, डकैती, व्याभीचार करीत असतात. कोणाच्याही मुली पळवून आणत असतात. भावाच्याही पत्नीचे धिंडवडे काढत असतात. कोणी याला कलियुग म्हणतात तर कोणी याला महाभारत काळ. परंतू ते काहीही म्हणोत. वास्तविकता हेच दाखवते की हा महाभारत काळ आहे.
होय, महाभारत काळ. या महाभारतात जी पात्र आहेत. ती सर्वच पात्र आजच्या परिस्थितीत निदर्शनास येतात. असंच एक पात्र आहे संजय.
संजय कोण होता? काय होता? त्याचे कार्य काय? हे कुणालाही कदाचीत माहीत नसेल. परंतू बाकी सर्वांचे पात्र जसे मोठे आहे. त्यांचे जसे विशेष महत्त्व आहे. तसंच महत्व संजयचं आहे. संजय हे पात्र देखील तेवढंच महत्वाचं आहे.
संजय. महाभारतातील एक उपेक्षीत पात्र. तो विदवान होता. शूरही होता. तसं त्यानं महाभारतातील युद्धात भागही घेतला होता. परंतू सार्थकीनं त्याला बंदी बनवलं आणि आता मारुन टाकणार. तोच व्यासमुनी म्हणाले,
"सोडून द्या याला. याचा जन्म मुळातच युद्ध करण्यासाठी झाला नाही. याचा जन्म दुस-या एका महान कार्यासाठी झाला."
संजय आज म्हातारा झाला होता. तो हिमालय पर्वतावर तपश्चर्या करीत होता. त्याच्या सोबतीला त्या भयाण जंगलात कोणीही नव्हतं. तसं कोणीही नसल्यानं तो रानावनात एकटाच फिरत होता गतकाळातील आठवणी काढत काढत.
आज तो कुंती, महाराज ध्रृतराष्ट्र व महाराणी गांधारी सोबतच सन्याशी जीवन जगण्यासाठी वनात आला होता. त्याला आठवत होतं सर्व. ते वन व ती त्या तिघांची सोबत.
महाभारताचं अठरा दिवसाचं युद्ध संपलं होतं. या युद्धात मोठमोठे योद्धे धराशायी झाले होते. ज्या योद्ध्यांनी मोठमोठ्या डिंगा मारल्या होत्या. त्यानंतर युद्ध समाप्त झाल्यावर बराच काळ संजय हस्तीनापुरात राहिला. त्यानं बरेच दिवस महाराज ध्रृतराष्ट्रची सेवा केली. परंतू ज्याचे स्वतःचे पुत्रच जीवंत नाही, त्या राजाचे मन तरी रमेल काय एवढ्या मोठ्या राजप्रासादात. शेवटी तेच झाले.
तो राजप्रासाद भव्यदिव्य होता. तिथं महाराज ध्रृतराष्ट्रला भरपूर प्रमाणात ऐषआराम होता. राजदास्या त्यांच्या सेवेत होत्या. व्यतिरीक्त पाच पांडवही त्यांची सेवा करीत असत. परंतू त्यांना तो पराकोटीचा ऐषआराम जरी असला तरी त्याला तिथं करमत नव्हतंच. कारण त्याला आपल्या शंभर पुत्राची आठवण येई आणि जेव्हा अशी तीव्र आठवण येई. तेव्हा जगावंसं वाटत नसे ध्रृतराष्ट्रला. संजय लहान होता. त्याचे वडील विणकर होते. लहानपणापासूनच संजय विलक्षण प्रतिभावंत होता. संजय बालपणापासूनच हुशार असल्यानं त्याच्या वडीलांंनी त्याला शिकवायचं ठरवलं.
शिकवावं. पण कुठे? संजयचे वडील विचार करु लागले. तसं पाहता त्यावेळी विणकर जातीलाही शुद्र म्हणून मानलं जात असे. त्यामुळंच संजयची आबाळ होत होती. परंतू संजय चाणाक्ष बुद्धिमान असल्यानं त्याच्या वडीलांना गप्प राहाणं पसंत पडलं नाही. शेवटी ते प्रयत्न करीत होते.
संजयच्या वडीलाचं नाव गावाल्गन होतं. तसा त्यांचा व्यवसाय विणकराचा होता. ते राजदरबारात राजशी वस्र विणत असत. या राजशी वस्रात हस्तीनापुरचा समावेश होता.
गावाल्गन हस्तीनापुरातील राजशी वस्राला आकार देत असे. तसं पाहता त्यावेळी शुद्र कितीही हुशार असले तरी त्यांना राजदरबारात शिक्षणाला वाव नव्हता. त्यामुळं आपल्या मुलाला शिकवावे कुठे हा प्रश्न सतत गावाल्गनच्या मनात पडत असे.
हस्तीनापुरात एक शिक्षक होता. त्याचं नाव द्रोणाचार्य होतं. ते राजदरबारात त्या मुलांना शिकवीत होते. जे राजकुमार होते. तसं पाहता सारेच ओळखीचे होते गावाल्गनच्या. त्यातच आपल्या मुलाची विलक्षण चातुर्यता लक्षात घेवून गावाल्गन गुरु द्रोणाचार्यकडे गेला.
द्रोणाचार्य असे शिक्षक होते की ज्यांना त्या काळात सर्व अस्र शस्र विद्या ज्ञात होत्या. परंतू त्यांची बरीच आबाळ झाली होती. शिक्षण पुर्ण होताच गुरु द्रोणाचार्यचा विवाह त्यांचे वडीलांनी लवकरच लावून दिला. परंतू त्यानंतरचा बराचसा काळ गुरु द्रोणाचार्यला वेदनेत काढावा लागला. त्यांना सतत उपासमार झेलावी लागली होती. मदत म्हणून ते त्यांचा जो परममित्र होता ध्रृपद. त्यांचेकडे गेला. परंतू राजा ध्रृपदनं त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा अपमान केला. साधा अपमान नाही तर घोर अपमान झाला त्यावेळी द्रोणाचार्यचा. तसं पाहता ब-याचशी कठिनाई शोषून गुरु द्रोणाचार्यनं नोकरी मिळवली होती हस्तीनापुरात. ते आपली नोकरी गमवू पाहात नव्हते.
तोही काळ असा फारसा प्रगत नव्हता. त्याहीकाळात नोकरी मिळविणे काही सोपे नव्हते. राजदरबारात नोकरी मिळविण्यासाठी उमेदवाराला कठीण परिक्षेला पुढे जावे लागत असे. अशीच कठीण परिक्षा देवून गुरु द्रोणाचार्य हस्तीनापुरात नोकरीवर लागले होते. त्यातच त्यांना पुर्वाश्रमीच्या आयुष्यात उपासमार झेलावी लागल्याने ते राजदरबारात विद्यार्थ्यांव्यतिरीक्त कोणाला शिकवू पाहात नव्हते.
तसं वचनच घेतलं होतं पितामहा भिष्मनं गुरु द्रोणाचार्यकडून. त्या वचनात गुरु द्रोणाचार्यची राजदरबारात प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करतांना वदवून घेतलं होतं की ते राजदरबारा व्यतिरिक्त इतर कोणालाही शिकविणार नाही. तसा एकलव्याचा शिक्षणासाठी घेतलेला अंगठाही परीचीतच होता गावाल्गनला. तरीही ते आपल्या मुलासाठी गुरु द्रोणाचार्यकडे आले व त्यांनी आपली कैफियत मांडली.
ते आपल्या मुलाचे शिक्षणाचे विचार. ते विचार काही गावाल्गनला स्वस्थ बसू देत नसत. अशातच गावाल्गन एके सकाळी गुरुवर्य द्रोणाचार्यच्या दरबारात गेला व म्हटलं,
"गुरुवर्य मला आपणाकडे माझ्या मुलाला शिकवायचे आहे. कृपया आपण माझ्या मुलाला विद्या दान कराल काय?"
गुरुवर्य द्रोणाचार्यनं,ते गावाल्गनचे शब्द ऐकले. नुकतेच त्यांनी एकलव्याचा अंगठा घेतला होता गुरुदक्षिणा म्हणून. त्या प्रकरणाची सर्वत्र निंदा होत होती. त्यातच त्या गोष्टी गुरु द्रोणाचार्यच्या कानावर आल्या होत्या. त्याची खंतही गुरु द्रोणाचार्यांना वाटत होती. तशातच आता गावाल्गन आपल्या मुलाला शिक्षणासाठी घेवून आला होता. म्हणत होता की आपण माझ्या मुलाला विद्या दान कराल काय? काय उत्तर द्यावं सूचत नव्हतं. अशातच गुरु द्रोणाचार्य विचार करु लागले.
ते थोडा वेळ गप्पच होते. तोच गावाल्गन म्हणाला,
"गुरुवर्य आपण सांगीतलं नाही. आपण जेही उत्तर द्याल. त्यात मी सहमत असेल."
गुरु द्रोणाचार्य मौन होते. तोच गावाल्गनचे बोलणे कानावर पडताच गुरुवर्य द्रोणाचार्य म्हणाले,
"गावाल्गन, मी तुम्हास काय उत्तर द्यायचं ते सुचेनासे झालेय मला. तुम्हाला तर माहीत असेलच की आधीच एकलव्य प्रकरणानंतर माझी किती बदनामी झालीय ती. मी शापीत जीवन जगत आहे. मी एकलव्याला शिकविले नाही. तरीही अंगठा घेतला त्याचा. मला तसा त्याचा अंगठा घेण्याचा कोणताच अधिकार नव्हता. मी मात्र यात राजधर्म पाळला. काय करु विवश आहे मी आणि विवश होतो तेव्हाही. वाटल्यास एकलव्यानं मला गुरूदक्षिणा म्हणून अंगठा द्यायला नको होता. नकार द्यायला हवा होता तेव्हा. कारण मी त्याला शिकवलेत नव्हते मुळात. परंतू तो तरी काय करणार. त्याला वाटले असेल की हा गुरुवर्याचाच आदेश आहे. पाळायलाच हवा. तसा त्यानं किंचीतही न घाबरता दिला अंगठा."
गावाल्गन द्रोणाचार्यची व्यथा ऐकत होता. तसा गुरुवर्य द्रोणाचार्यला तो म्हणाला,
"गुरुवर्य, ते सर्व जावू द्या. मला यावर उपाय सांगा की मी असं काय करु की माझ्या मुलाला मी शिकवू शकेल. मी माझ्या मुलाला तुमच्याकडेच शिकवू पाहात आहे. काय करावे लागेल तेवढं सांगा."
"गावाल्गन, मी तुझ्या मुलाला शिकवू शकणार नाही. तसा मी एकलव्यालाही शिकवू शकतो नाही."
द्रोणाचार्य बोलले. तसा त्यांनी एक उसासा टाकला. एक दिर्घ श्वास घेतला. तसे ते परत म्हणाले.
"होय, मी अगदी खरं सांगतोय."
"मग निश्चीतच काही ठोस कारण असेल. बोला गुरुवर्य, कोणतं कारण आहे ते. ते कारण आम्हालाही कळू द्या म्हणजे झालं."
"कारण. ठोस कारण. ऐका तर मग. मी राजधर्म पाहतोय. मी वचन दिलं पितामहांना. वचन........तोच राजधर्म आहे माझा."
"वचन! कसलं वचन? कोणतं वचन?"
"होय वचनच. म्हटलं की मी राजदरबारात राजकुमाराव्यतिरिक्त इतर कोणालाही विद्या शिकविणार नाही."
"पण ही गोष्ट नैतिकतेला धरुन नाही. आपण एक गुरुवर्य आहात. असं वचन देणं आपल्याला आवडलं होतं का? नक्कीच येत काही ना काही आपली ठोस व्यथा राहू शकते."
"नक्कीच.......तशीच व्यथा आहे. ठोस व्यथा आहे माझी. त्यामुळंच मला एकलव्याचा अंगठा घ्यावा लागला गुरुदक्षिणा म्हणून."
"अशी कोणती व्यथा आहे की आपण राजकुमाराव्यतिरिक्त बाहेरच्या मुलाला शिकवू शकत नाही?"
"ऐकायचं आहे तुम्हाला. परंतू मी सांगू शकत नाही ती व्यथा. काही काही गोष्टी ह्या गोपनीय ठेवाव्या लागतात. मी भयंकर दुःखी आहे. माझी व्यथा माझ्याजवळच राहू द्या गावाल्गन."
"गुरुवर्य, वूयथा सांगितल्यानंतर मन हलकं होतं आणि आपल्याला वाटत असेल की हा गावाल्गन अख्ख्या गावाला तुमच्या व्यथा सांगेल. तर ऐका त्याबद्दल. त्याबद्दलापण निश्चींत राहा. मी कोणालाहीतुमच्याबद्दलकाहीहीसांगणार नाही. विश्वासठेवा माझ्यावर."
गावाल्गन म्हणाला तसा तो चूप बसला. मात्र गुरुवर्य द्रोणाचार्यच्या मनात आताही चडफडाट होता. त्यांचं मत आताही शांत झालं नव्हतं. तसा पुन्हा गुरुवर्य द्रोणाचार्यला गावाल्गन म्हणाला,
"सांगाच आता गुरुवर्य. आपण आपली व्यथा सांगाच. "
ते गावाल्गनचे शब्द. तसा गावाल्गन चूप बसला. मात्र त्यावर द्रोणाचार्य बोलके झाले. ते आता पोपटासारखे सांगायला लागले. कारण त्यांना गावाल्गनची गोष्ट पटली होती. सांगितल्यानंतर मन हलकं होतं.
"ऐक तर गावाल्गन." द्रोणाचार्य सांगू लागले.
"माझ्या वडीलांनी मला अस्र, शस्र शिकवलीत. त्याचबरोबर इतरही विद्या. त्या विद्या केवळ मलाच शिकवल्या नाहीत, तर त्या इतरही शिष्यांना शिकवल्यात. माझ्या वडीलांजवळ भेदभाव नव्हता. ते कोणालाही शिकवीत. तसं इतर शिष्यात ध्रृपदलाही शिकवल्यात. जो माझा खास मित्र होता शिकायला असतांना.
त्या विद्या शिकल्यानंतर सर्व शिष्य आपआपल्या राज्यात रवाना झाले. त्यांनी विवाह केला असेल नंतर. तसा मिही विवाह केला व मी संसारात रमलो. तसा ध्रृपदही. तो ध्रृपद आपल्या राज्याचा राजा बनला.
मी विवाह केला खरा व संसारात रमलो खरा. परंतू मी फार गरीब होतो. मला माझ्या मुलाला व माझ्या पत्नीला पोटभर अन्नही देता येत नव्हते. काय करावे सुचत नव्हते. अशातच मी मदत मागायला माझा गुरुमित्र ध्रृपदकडे गेलो. परंतू त्यानं मला काहीच दिलं नाही. उलट माझा अपमान करुन मला भरल्या राजदरबारातून हाकलून लावले. त्यानंतर मी हताश निराश अवस्थेत तेथून निघालो. वाट चालणं अवघड होती. त्यातच ती वाट चालत असतांना मला मला आपला जीवही द्यावासा वाटत असे. काय करणार. मला त्यावर कोणताच उपाय दिसत नव्हता. परंतू मी विचार केला. विचार केला की आपल्यालाही बायकापोरं आहेत. त्यांची जबाबदारी आहे. तोच विचार करुन मी चालत होतो ती वाट. तसं चालता चालता हे हस्तीनापुर आलं.
मी हस्तीनापुरात आलो. मला तहान फार लागली होती. तसा एका विहीरीवर बसलो. तोच तिथं या हस्तीनापुरातील मुलांचा घोळका आला. त्यांचं विहिरीत काहीतरी पडलं होतं. ती ती वस्तू विहिरीतून काढायला लोंबकळत होती. तसं ते पाहून मी विचार केला की जर यातील एखादं मूल विहीरीत पडलं तर. तर प्रसंग ओढवायचाच. काय करावं. शेवटी विचार करुन मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला एका झटक्यात काढून देवू शकतो तुमची वस्तू. त्यावर त्यांना ती वस्तू मी अगदी अल्प प्रयत्नात काढून दिली. तशी ती मुलं रवाना झाली. मिही पाणी पिवून माझी तहान भागवली. ऊन फार पडलं होतंच. तसा मी पाणी पिवून त्याच विहिरीजवळ असलेल्या झाडाच्या सावलीत बसलो. फार थकलोच होतो, त्यामुळं थोडी विश्रांती घेतली.
थोड्याच वेळाचा अवकाश. थोड्याच वेळात मी पाहिलं की ती मुलं आपल्या म्हाता-या आजोबांना घेवून माझ्यापर्यंत येत आहेत. त्यांच्यासोबत काही शिपाही देखील आहेत. तसा मी घाबरलो व विचार केला की आपल्यावर आता घोर संकट आहे. विनाकारण आपण या मुलांची विहिरीत पडलेली वस्तू काढून दिली विहिरीतून. आता आपल्याला हे शिपाही ताब्यात घेणार. परंतू तो माझा विचार होता.
ते त्या मुलांसोबत आलेले भिष्म पितामहा होते. म्हणत होते की मुलांनी कोणीतरी महात्मा आपल्या राज्यात आल्याचं सांगीतलं. त्यामुळंच ते भेटायला आलेत. त्यानंतर त्यांनी मला परीचय विचारला.
मी परीचय दिला. तशी एक आर्जव केली की जर त्यांनी मला राजदरबारात कोणतं काम दिलं तर उपकार होतील. तद्वतच त्यांनी त्या गोष्टीला होकार दिला. शिकविण्याचं काम दिलं मला. तशी एक अट सांगीतली. आपण राजदरबारातील राजकुमाराव्यतिरिक्त इतर कोणालाही शिकवायचं नाही. मलाही गरज होतीच. तसं मी सर्व मान्य करीत म्हटलं,
"मला आपल्या सर्व अटी मान्य आहेत."
ती परिस्थिती.......तो भावनेचा बहर. शेवटी परिस्थितीनुसार परिस्थितीपुढं लाचार होवून मी हो म्हटलं. परंतू आज कळतं की तिही माझी परिस्थिती निघून गेली असती. परंतू मी होय म्हणायला नको होतं. त्याच एका होकारानं मी घोर पाप केलं आहे. एकलव्याचा अंगठा घेवून. आता दुसरं पाप नको आहे माझ्या हातून मला. वाटल्यास आपण मला दोषी ठरवलं तरी चालेल."
ते बोलणं. तसा त्या बोलण्यातून द्रोणाचार्य फारच चिंताग्रस्त वाटत होता. ते पाहून गावाल्गन म्हणाला,
"बरं गुरुवर्य, मी निघतोय आता. परंतू जाता जाता एक विचारतोय की मला माझ्या मुलाला शिकविण्याचा काहीतरी उपाय सांगा. एक गुरुवर्य म्हणून सांगा. कारण माझ्या मुलाच्या शिक्षणाचं कोणतंच नुकसान व्हायला नको."
"एक उपाय आहे तर."
"कोणता गुरुवर्य? तातडीनं सांगा."
"जर तातश्रींनी होकार दिला तर. जावून पाहा. ते जर हो म्हणतील तर मी शिकवीन तुमच्या मुलाला. मग तर झालं."
"ठीक आहे गुरुवर्य. मला निरोप द्या. मी प्रस्थान करतो."
"ठीक आहे."
गावाल्गननं गुरुवर्य द्रोणाचार्यचा पुरता निरोप घेतला. तसा तो तेथून निघाला. परंतू तो आता थेट भिष्माकडे गेला नाही. तो आपल्या घरी परतला काही विचार करण्यासाठी.
गावाल्गन एक राजदरबारातील वस्र बनविणारा एक असाधारण व्यक्ती होता. त्याला राजदरबारात फारच किंमत होती. त्याला राजदरबारात मोठे मानाचे स्थान होते. त्यामुळं त्याच्या विणकर जातीला त्या काळात शुद्र मध्ये गणल्या गेले असले तरी गावाल्गनला राजदरबारात मान दिला जात होता. त्यातच तो त्या राज्याचा असल्यामुळं तो आपल्या मुलाला शिकवणार कुठे? गुरुवर्य द्रोणाचार्यनं तर यावर आपलं मत सांगूनही टाकलं होतं. आता तातश्रीही तसंच म्हणतील असं त्याला वाटत होतं. त्यासाठीच तो विचार करण्यासाठी तो थेट भिष्माकडे गेला नाही.
मुलाचे शिक्षण. चिंताग्रस्तअसलेला बाप. त्या बापाला फारच वेदना होत होत्या. तशा वेदना होत असतांना तो रात्रंदिवस विचार करीत असायचा. अशातच तो विचार करीत असतांना त्याला आठवलं की आपण जेव्हा द्रोणाचार्य कडून आलो, तेव्हा आपल्याला द्रोणाचार्यनं म्हटलं की भिष्माकडं जावून पाहा. कदाचीत त्यातून मार्ग निघेल.
तो विचारच करीत होता. तोच विचार करता करता त्याला आठवलं की आपण आपल्या मुलासाठी तरी पितामहा भिष्माकडं जावं. त्यांना आर्जव करावी व तशी आर्जव करुन आपण आपल्या मुलाला हस्तीनापुरात शिकवावं.
त्याचा तो विचार. तसा विचार करता करता तो भिष्माकडे आला. भिष्म पितामहा तेव्हा कुठंतरी बाहेर जायच्या तयारीत लागले होते. तसा तो येताच पितामहा म्हणाले.
"कसा काय आला आहेस गावाल्गन?"
"मुलाचं शिक्षण."
"अर्थात?"
"माझा मुलगा संजय. त्याला शिकवावं म्हणतो."
"छान. शिकवणं वा शिक्षण देणं चांगली कल्पना आहे."
"परंतू?"
"परंतू? काय परंतू? अरे गावाल्गन असा शिक्षण शिकवितांना किंतू परंतू मनामध्ये नसावा."
"तातश्री, तेच तर म्हणत आहो मी."
"म्हणजे?"
"तात, मला माझ्या मुलाला शिकवायचं आहे. हस्तीनापुरात शिकवायचं आहे माझ्या मुलाला."
"हस्तीनापुरात? म्हणजे?"
"हस्तीनापुरात, युवराजांसोबत शिकवायचं आहे माझ्या मुलाला."
"म्हणजे? शक्य नाही गावाल्गन तसं करणं. कसं शक्य आहे?"
"तातश्री, आपण कदाचीत विचार केला तर शक्य होईल."
"मी विवश आहे गावाल्गन. तसं करणं शक्य नाही. तसं मी वचन दिलं युवराजांना. वचन दिलं की या दरबारातील मुलांसारखे इतर मुलं घडणार नाहीत याचं वचन दिलं मी युवराजांना. हवं तर त्याला माझी भिष्मप्रतिज्ञा समजावं तुम्ही."
"तात, शक्य होणा-या गोष्टीला तुम्ही नाकारता. माझा मुलगा हुशार आहे. म्हणूनच मी आले आपणाकडे. परंतू मी निराश झालो तर. परंतू आपण यावर उपाय सांगावा. आपण तात आहात. दूरदूरचं आपल्याला दिसतं. हवं तर आपल्याला सात समुद्राच्या पलीकडचं दिसतेय. आपण उपाय सांगावा माझ्या मुलाबद्दल. त्याची आबाळ होवू नये यासाठी."
"एक उपाय आहे."
"कोणता उपाय आहे तात?"
"गावाल्गन, तुझ्या मुलाला व्यासाकडे घेवून जा. तेच शिकवू शकतील तुझ्या मुलाला. हवं तर मला माफ कर. मी विवश आहे."
"ठीक आहे. माझी शेवटची आशा मावळली. फार मोठी आशा घेवून आलो होतो मी आपणाकडे. परंतू ते माझे स्वप्न होते. आता कळलं की या जगात बुद्धीमत्तेला थारा नाही. थारा असतो राजदरबारात जन्म घेणा-या जिवाला. यात दोष तुमचा नाही. सर्व दोष आहे आमच्या प्रारब्धाचा. आम्ही राजदरबारात जन्मच घेतला नाही."
"गावाल्गन मी विवश आहे. अरे, मी तर साधा विवाहही करु शकलो नाही माझा. मी काय तुला मदत करणार. हा राजदरबार आहे. याचेही काही नियम आहेत. त्या नियमानुसार चालावंच लागतं राजदरबारातील प्रत्येक माणसाला. तुम्ही तरी बरे की तुम्ही स्वतंत्र आहात. तुमचे हात बांधलेले नाहीत. परंतू आमचे! आमचे हात बांधलेले असतात सदैव."
"ठीक आहे तात, माझीच चूक झाली. मी आपलं मन दुखवायला यायला नको होतं. परंतू मला माहीत नव्हतं की राजदरबारातील लोकांचेही हात बांधलेले असतात. परंतू आता आमच्या सदैव लक्षात राहिल. बराय येतो मी."
गावाल्गन तातश्रीच्या दरबारातून बाहेर पडला. तसा तो आपल्या घरी गेला.

****************************

सर्वजण झोपी गेले होते. मात्र अजूनपर्यंत गावातील कुत्री झोपली नव्हती. ती ओरडत होती विनाकारण. लामणदिवे जळत होते. रात्रीचा तो चंद्रप्रकाशही खुणावत होता.
सर्वजण झोपले होते. परंतू गावाल्गन झोपला नव्हता. तो अजूनही जागाच होता. तो विचार करीत होता आपल्या मुलाच्या शिक्षणाचा. तसं त्याला वाटत होतं की दिवस केव्हा निघतोय. कारण दिवस निघताच त्याला व्यासाला भेटायला जायचे होते. व्यासाकडे आपल्या मुलाला न्यायचे होते. त्याचे भविष्य घडवायचे होते त्याला. त्यासाठीच तो दिवस उजाडण्याची वाट पाहात होता.
ती रात्र तशी निघून गेली होती. गावाल्गनला रात्रभर झोप आली नाही. तो संपूर्ण रात्रभर या कशावरुन त्या कडावर सारखी कुस बदलवीत राहिला. तशी पहाट झाली. कोंबडा आरवला. तो कोंबड्याचा आवाज. संपूर्ण अंधाराला चिरुन तो कोंबड्यांचा आवाज येत होता.
तशी रात्र पुरती सरली याचा भाष त्याला झाला. तसा तो उठला. त्यानं लवकरच प्रातःविधी आटोपवला व पुत्रप्रेमानं तो व्यासाकडे निघाला.
वेद व्यास. त्यांच्या आईचे नाव सत्यवती व वडीलाचे नाव पाराशर होते. म्हणतात की ते कितीतरी जास्त प्रमाणात ज्ञानवंत होते. ज्यावेळी हस्तीनापुरात ज्या काही घटना घडत. त्याची इत्यंभूत माहिती त्यांना असायची. त्यातच त्यातील अनुचीत घटनेवर ते सल्ला सुद्धा देत असत. अशातच जेव्हा जेव्हा संकट आलं, तेव्हा तेव्हा त्याची आई माता सत्यवती व्यास ऋषीच्या आश्रमात जात असे. कधी तिला तसं जाणं शक्य झालं नाही तर ती व्यासालाच आपल्या आश्रमात बोलवत असे व व्यासही आपल्या मनात किंतू परंतू न ठेवता हस्तीनापुरात जात असे. मानलं जातं की वेद व्यासाचा आश्रम हा अलीकडच्या उत्तरप्रदेशातील बिलासपूरला होता. तसाच तो आश्रम यमुनेच्या तीरावर होता. इथेच त्यांनी पाणी मिळविण्यासाठी एका सरोवराची निर्मीती केली. ते ठिकाण व्यास सरोवर म्हणून जगप्रसिद्ध आहे. कोणी म्हणतात की हा आश्रम सरस्वती नदीतटावर होता. जी नदी आज अस्तित्वात नाही अर्थात अदृश्य स्वरुपात आहे.
व्यासांनी महर्षी पदवी दिली गेली. म्हणतात की ही पदवी त्यांच्याजवळ असलेलं दिव्य ज्ञान पाहून दिली गेली. त्यांनी आपल्या ज्ञानाचा दिप प्रज्वलीत करुन महाभारत नावाचा अतुलनीय ग्रंथ लिहिला. कोणी या महाभारत ग्रंथाची निर्मीती काल्पनिक मानतात. परंतू त्या ग्रंथातील व वास्तवीक जगातील बारकावे लक्षात घेता तो ग्रंथ काल्पनीक स्वरुपाचा वाटत नाही. हं, व्यासांना कोणी ब्रम्हा वा कोणी विष्णू म्हणून संबोधतात. ते मात्र कोणीही मानू नये.
संजय महापात्र लिहित असतांना व्यासाबद्दल लिहिणं गरजेचं समजतो. व्यास हे महाभारत महाकाव्य लिहिणारे लेखक म्हणून त्यांची ओळख. परंतू पुरातन कथेनुसार सांगतो.
प्राचीन काळात एक सुधंवा नावाचा राजा होवून गेला. तो एकदा शिकार करण्यासाठी वनात गेला. त्यानंतर त्याची पत्नी रजस्व अवस्थेत पोहोचली.
त्या राजाची पत्नी रजस्व अवस्थेत पोहोचली असता तिनं ती बातमी तिनं पाळलेल्या पक्षांच्या द्वारे आपल्या पतीला पाठवला. ते ऐकताच राजानं एक गुप्त वस्तू त्या पक्षाला दिली व म्हटलं की ही वस्तू घेवून जा. ही वस्तू कोणाला न सांगता महाराणीला देशील. त्यानंतर त्या पक्षानं ते ऐकलं व ती वस्तू घेवून तो पक्षी आकाशात उडाला. परंतू आकाशातून उडत जात असतांना त्याची भेट दुस-या एका शिकारी पक्षाशी झाली. त्यानंतर दुस-या शिकारी पक्षानं ती वस्तू मागीतली. परंतू त्या शिकारी पक्षानं ती वस्तू देण्यास नकार देताच त्या दोघांचं तुंबळ युद्ध झालं व अशाच युद्धादरम्यान ती वस्तू त्या शिकारी पक्षाच्या चोचीतून खाली पडली. म्हणतात की ती वस्तू थेट यमुना नदीत पडली.
ती यमुना नदी. त्या नदीत ब्रम्हाच्या शापवाणीने शापीत झालेली एक स्वर्गातील अप्सरा मासोळीच्या रुपात होती. तिनं ती वस्तू नदीत पडताच गिळली. तसं पाहता ती दुर्मीळ व गुप्त वस्तू त्या मासोळीनं गिळताच ती गर्भवती राहिली. त्यातच गर्भ पुर्ण होताच ती मासोळी एका निषाद अर्थात कोळ्याच्या जाळ्यात सापडली. त्यानंतर त्या कोळ्यानं त्या मासोळीला कापलं.
ती मासोळी त्या कोळ्यानं कापताच त्या मासोळीच्या पोटातून दोन गर्भ बाहेर पडले. त्यात एक मुलगी होती व दुसरा मुलगा.
घडलेली घटना.......ती घटना अजब गजबच होती. ती घटना घडताच तो कोळी त्या दोन्ही मुलांना घेवून राजा सुधंवाकडे गेला. त्यानं घडलेली सर्व हकीकत राजाला कथन केली. तसं ते ऐकताच राजानं त्या मुलाला जवळ घेतलं. तसं पाहता त्याला पुत्र नव्हता. त्यामुळंच की काय तो मुलगा राजानं ठेवून घेतला व तो कोळ्याला म्हणाला,
"जा तुम्ही. मी या मुलाचं पालनपोषण करील."
तो कोळी त्यानंतर ती मुलगी घेवून तेथून निघून गेला. त्यानंतर त्या कोळ्यानं त्या मुलीचं नामकरण केलं व तिचं नाव मत्सगंधा ठेवलं गेलं.
ती मुलगी त्या मासोळीच्या पोटातून जन्मली होती. त्यामुळंच की काय, तिच्या अंगातून मासोळीसारखा उग्र वास येत असे. तिलाच सत्यवती सुद्धा म्हटलं जातं.
सत्यवती लहानपणापासूनच नावेत बसायची. नाव वल्हवायची. कधी ती आपल्या वडीलांसारखीच मासे पकडायची तर कधी माणसांचीही वाहतूक करायची. तसं पाहता एकदा तिनं प्रवासी वाहतूक करीत असतांना ऋषी पाराशरलाही आपल्या नावेतून बसवून नेलं होतं.
एकदा पाराशर ऋषी तिच्या नावेतून प्रवास करीत असताना तिच्यावर मोहीत झाले. कारण तिही आपल्या आईसारखीच सुंदर होती. कारण ती एका शापीत अप्सरेची मुलगी होती. ऋषी पाराशर तिला पाहून एवढे मोहीत झाले की त्यांनी सरळसरळ तिला म्हणूनच टाकलं,
"प्रिये, तू मला फार आवडलेली असून मला तुझ्यासोबत तुझी इच्छा असेल तर काही दिवस सहवास करायचा आहे. तेव्हा तू तयार आहेस का?"
त्या सत्यवतीनं त्या ऋषीचे ते म्हणणे ऐकले व ती म्हणाली,
"हे महात्मा, आपण ज्ञानी आहात. अंतर्यामी आहात. मी निषाद कन्या आहे. तुम्ही ब्रम्हज्ञानी आणि आम्ही निषाद ह्यामुळेच तुमचा आणि आमचा सूर जुळत नाही. तेव्हा मी काही आपल्यासोबत काही काळ तर सोडा एक पलही सहवास करु शकत नाही."
ऋषी पाराशरनं तिचे बोलणे ऐकले. तसे ते म्हणाले,
"सत्यवती, तू मुळीच चिंता करु नको. तुझी प्रसुती झाल्यावरही तू कुमारिकाच असशील. असं वचन देतो मी. तसंच मी तुला या मासोळीच्या गंधापासूनही मुक्त करतो. काल तुझ्या शरीरातून जो दुर्गंध येत होता मासोळीसारखा. तो दुर्गंध आजपासून आणि या क्षणापासून दूर होईल."
थोड्याच वेळाचा अवकाश. सत्यवतीनं अनुभवलं की तिच्या शरीरातून येणारा मासोळीसारखा उग्र वास नव्हे तर दुर्गंध समाप्त झालेला आहे. तसा तिला अनुभव येताच तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला व ती प्रसन्नपणे त्या पाराशर ऋषीच्या सहवासास तयार झाली. त्यानंतर त्या ऋषीनं सत्यवतीला भोगलं. त्यासाठी त्यानं आपल्या योगमायेनं सभोवताल काळा कुट्ट अंधार केला होता.
ऋषी पाराशरच्या सहवासात सत्यवती गर्भवती राहिली. त्यावेळेस गर्भ पोटात असतांनाच ती पाराशरकडून वेद विद्या ऐकत असे. ते ऐकतांना त्याचे संस्कार गर्भावर झाले व तद्नंतर सत्यवती बाळंत झाली व तिनं वेदविद्येत निपुण असलेल्या बाळास जन्म दिला.
सत्यवती व पाराशर ऋषीनं त्याचं नाव व्यास ठेवलं. पुढे तोच मुलगा द्वैपायन बेटावर तपश्चर्या करण्यासाठी गेला. या बेटावर सतत ऊन असल्यानं व अविरत उन्हात तपश्चर्या केल्यानं त्याचा रंगही काळा पडला व त्याला लोकं तद्नंतर कृष्ण द्वैपायन म्हणू लागले. त्यानंतर व्यासांनी पुढं जावून वेदाचं विभाजन केलं. म्हणून त्यांना पुढे वेदव्यास म्हटले जावू लागले.
व्यास प्रकांड पंडीत. होते. म्हणतात की त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होती. त्यांनी वेदाचे विभाजन केलं. त्यामागं त्यांचा विचार होता. तो म्हणजे सामान्य माणसांनाही वेदांचा अभ्यास करता यावा. म्हणतात की व्यासांनी वेदाचे चार भागात विभाजन करुन त्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असं नाव दिलं. त्यांनी वेदांचं विभाजन केल्यामुळे त्यांना वेदव्यास म्हटलं जातं.
वेदाचं विभाजन झालं होतं. तसे आता वेद साध्या स्वरुपात आले होते. त्याचा अभ्यास सामान्य लोकांनाही करता येत होता. म्हणतात की व्यासांनी सर्वप्रथम वेदांचा अभ्यास आपल्या शिष्यांकडून करवून घेतला. त्यात पैल, जैमीन, वैशंपायन व सुमंतूमुनी यांचा समावेश आहे.
वेदांचे विभाजन झाले होते. तरीही त्या वेदात पुर्ण व्यवहाराचा अभ्यास नव्हता. त्यामुळंच की काय, पाचव्या वेदाच्या रुपात व्यासांनी पुराण लिहायला प्रारंभ केला. त्यानुसार त्यांनी महाभारताची रचना केली. हे पुराण त्यांनी सर्वप्रथम त्यांचा शिष्य रोमहर्षण याला सांगीतले. व्यासांनी महाभारत, अठरा पुराण, श्रीमद भागवत गीता, ब्रम्हसुत्र इत्यादी ग्रंथ लिहिले.
बरेचसे पुराण असे आहेत की त्यात व्यासाच्या जन्माचा निश्चीत उल्लेख नाही. कोणी म्हणतात की त्यांचा जन्म हा इ स पुर्व तीनहजार वर्षापूर्वी आषाढ पोर्णीमेच्या दिवशी झाला. ते उत्तम कवीही होते. हे प्राचीन महाभारत ग्रंथरचनेतून दिसून येते. कारण प्राचीन महाभारताची प्रतिलीपी ही एका काव्याच्या रुपात असून ते काव्यरुप संस्कृतमध्ये आहे.
महाभारत ग्रंथ असा निर्मीत आहे की या ग्रंथात माणसाच्या व्यवहाराबाबत जे लिहिलेले आहे. त्यापेक्षा वेगळं असं दुस-या कोणत्याही ग्रंथात सापडत नाही. तिथंही तेच सापडते. तसं पाहता या ग्रंथात जे लिहिलेले नाही. ते इतरही ग्रंथात लिहिलेले आढळून येत नाही. अशी महाभारत ग्रंथाची रचना आहे. म्हणतात की व्यासांचा जन्म यमुनेच्या एका तटावर काल्पी इथे झाला.
व्यास लहानाचे मोठे होताच तपश्चर्येला गेले. काही लोकं म्हणतात की व्यासाचा जन्म होताच ते तपश्चर्येला निघून गेले. कारण त्यांना तपश्चर्या करायची आज्ञा त्यांच्या आईनं दिली होती. ते तपश्चर्या करायला जाताच जातेवेळी ते आपल्या आईला म्हणाले,
"माते, जेव्हाही तू माझं स्मरण करशिल. तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे धावत येईल."
ते आपल्या आईला त्यांनी दिलेलं वचन त्यांनी पुर्ण जीवनभर पाळलं. त्यानंतर ज्या ज्या वेळेस त्याची आई संकटात सापडली. तेव्हा तेव्हा तिनं व्यासाची आठवण केली व तेव्हा तेव्हा व्यास धावून आले. मग हस्तीनापूरवरील कितीही मोठे संकट का असेना. ज्याप्रमाणे कृष्ण प्रत्येक संकटसमयी हस्तीनापुरात येवून मदत करायचा. तसा व्यासही आपल्या आईच्या बोलावण्यानुसार हस्तीनापुरात यायचा व आपल्या आईच्या बोलण्यानुसार हस्तीनापुरला मदत करायचा. त्यात ते चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करायचे नाहीत.
जेव्हा व्यासांनी पाहिलं की धर्माचा -हास होत आहे. लोकं भरकटलेले आहेत. तेव्हा त्या लोकांना खरी दिशा देण्यासाठी व्यासांनी ग्रंथनिर्मीती केली. म्हणतात की व्यासांनी काशीला शाप दिलेला होता. त्यामुळेच काशीतील विश्वेश्वरांनी त्यांना काशीत राहण्याचा अधिकार दिला नव्हता. त्यानंतर ते काशीतून निघून जावून गंगा तटावर लोलार्क मंदीराच्या आग्नेय दिशेला स्थित झाले. (संदर्भ काशी खंड ९६/२०१(४)

************************************************

ऋषी पाराशरांनी सत्यवतीला सहवास करु देण्याची विनंती करताच सत्यवतीनं त्याच्यासमोर तीन अटी ठेवल्या. पहिली अट होती की तशा सहवासात गुप्तता पाळण्यात यावी. तो सहवास कोणाला दिसायला नको. दुसरी अट होती, ती म्हणजे तिच्या अंगातील येणा-या उग्र गंधाचं रुपांतर सुगंधात व्हावं व तिसरी अट होती, ती म्हणजे तिचं कौमार्य भंग होवू नये. या तीन अटी पाराशर ऋषीनं पुर्ण करताच सत्यवती पाराशर ऋषीसोबत सहवास करायला तयार झाली. व्यासांचा जन्म होताच ऋषी पाराशर तपश्चर्या करायला निघून गेले. त्यानंतर तिचा पुत्र असलेला व्यासही तपश्चर्या करायला निघून गेला. त्यानंतर ती आपल्या वडीलांसोबत राहू लागली. नौकानयन करु लागली. मासेही पकडू लागली.

**********************************************************

गंगा राजा शांततेला सोडून जाताच त्याला जगणं असह्य झालं होतं. गंगा सोडून गेली होती. त्याचं कारणही तसंच होतं. गंगेशी जेव्हा शांतनूनं विवाहाबद्दल विचारलं होतं, तेव्हा तिनं त्यात अट टाकली होती. ती अट होती की सांसरीक बाबीत अडकल्यावर ज्यावेळेस गंगेला शांतनू टोकेल. तेव्हा ती त्याला सोडून जाईल.
शांतनूसमोर गंगेनं मांडलेली अट शांतनूनं मान्य करताच ती त्याचेशी सहवास करायला तयार झाली. ती प्रत्येक वेळी सहवास करीत असे व प्रत्येक वेळेस गर्भवती राहात असे. तसंच प्रत्येक वेळेस बाळाचा जन्म होताच ती त्या बाळाला आपल्यात सामावून घेण्यासाठी पाण्यात टाकत असे. असे शांतनूचे बरेच पुत्र नदीत टाकले.
शांतनूला गंगा आपले पुत्र गंगेत टाकत असतांना नेहमीच दिसायची. त्याला वाईट वाटत होतं. परंतू त्याला ती अट माहीत होती. ती म्हणजे कोणीही तिला कोणतेही कर्म करीत असतांना टोकल्यास ती त्याला सोडून जाईल. परंतू तो तरी किती सहन करणार होता. त्यालाही वाटत होतं की जर तो तिला टोकणार नाही तर असे अनेक पुत्र ती पाण्यात टाकेल व पुढे पुत्र न झाल्यास आपला वंश चालणार नाही.
ती वंशवृद्धीची कामना. त्यातच गंगेचे वंश संपुष्टात आणण्याचे प्रयत्न. त्यामुळंच की काय, त्याला आपला वंश टिकणार नाही असं वाटलं. त्यातच त्याच इच्छेनं तसं वाटत असल्यानं त्यानं तिला टोकलं. शांतनूनं गंगेला टोकताच ती अट मोडली गेली व तिनं तिचा शेवटचा पुत्र असलेला भिष्म शांतनूच्या हातात देत ती अंतर्धान पावली.
गंगा निघून जाताच शांतनूला एकटं वाटत होतं. तो वाढवत होता आपल्या इवल्याशा मुलाला. त्याचं शिक्षण, वेद विद्या सा-या गोष्टी पाहात होता. तो बाहेरुन आनंद दाखवत होता तर आतून गंगेच्या आठवणीनं फार दुःखी होता. अशातच त्याचा मुलगा गंगेच्या पोटचा भिष्म आज मोठा झाला होता. त्याचबरोबर तो समजदारही तेवढाच वाटत होता.
शांतनूबाबत भिष्माला पुरेपूर माहिती होती. त्याच्या सुखदुःखाचीही त्याला कल्पना होती. गुरुपासून आज्ञा घेवून गंगापुत्र भिष्म जेव्हा आपल्या राजधानीत परतला. तेव्हा त्यानं पाहिलं की आपला पिता फारच दुःखी नाही आणि तो दररोज कोणालातरी भेटायला जातो. तशी शंका येताच त्यानं एक दिवस शांतनूचा पाठलाग केला व लक्षात घेतलं की शांतनू एका कोळ्याच्या मुलीच्या प्रेमात आहे. जिचं नाव सत्यवती आहे.
भिष्माला ती गोष्ट माहीत होताच आपल्या वडीलाची उद्या बदनामी होईल अशी भिती वाटून त्यानं तिची परस्पर भेट घेतली व विचारलं की तिनं आपल्या वडीलाशी विवाह करुन टाकावा.
भिष्माचा तो प्रस्ताव. सत्यवती विचार करीत होती की आपण विवाह केला तरी तो विवाह आपल्या फायद्याचा नाही. कारण उद्या आपल्याला या शांतनूपासून पुत्र जरी झाला तरी तो पुत्र गादीवर बसणार नाही. कारण शांतनूचा मोठा पुत्र भिष्म जीवंत आहे आणि राजगादीचा मान मोठ्याच पुत्राला मिळत असतो.
गादीच्या वारसाचा असलेला प्रश्न. असा प्रश्न विचारात घेत सत्यवतीनं तो विचार भिष्माजवळ बोलून दाखवला. तसा विचार बोलल्यावर शेवटी ती म्हणाली,
'जर भिष्म ती वारसाची जागा सोडून देत असल्यास वा तसं केल्यास ती शांतनूशी विवाह करेल. त्यासाठी भिष्मानं तशी प्रतिज्ञा करायला हवी. तसं वचन द्यायला हवं.'
भिष्मानं सत्यवतीचं गादीबाबतचं वक्तव्य ऐकलं. तसा त्यानं विचार केला. तो विचार होता शांतनूनं केलेला त्याग. भिष्माला वाटत होतं की त्याच्या पित्यानं त्याचेसाठी बराच त्याग केलेला आहे. त्यामुळंच आता आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या पित्यासाठी त्याग करावा.
विचारांचा अवकाश. शांतनूशी सत्यवतीनं तो विवाह करावा असं ठरलं. परंतू त्यातही ती अट होती. त्या अटीनुसार भिष्माला वाटत होतं की तिनं शांतनूशी विवाह करावा म्हणून तो प्रतिज्ञेसाठी तयार झाला होता.
ती उपकाराची परतफेड. तो उपकाराचा विषय लक्षात घेता भिष्म परमार्थ पद्धतीनं तयार झाला होता आपल्या वडीलासाठी. त्यालाही वाटत होतं की आपल्या वडीलांनी सांसरीक जीवन जगावं. परंतू त्याच्या जीवनाचं काय? त्यानं तर ती आयुष्यभर विवाह न करण्याची प्रतिज्ञाच घेतली होती आपल्या वडीलाचं सांसरीक जीवन बसविण्यासाठी. तो पहिला पुरुष होता की ज्यानं आपल्या वडीलाच्या सांसरीक इच्छेसाठी आपल्या ललनेचा त्याग केला.
सत्यवतीचा तो आग्रह. माझाच पुत्र गादीवर बसावा ही तिची इच्छा. त्यामुळंच तिनं भिष्माला प्रतिज्ञाच घ्यायला लावली. तो तिचा स्वार्थ होता. जणू वचनबद्धच केलं त्यांना. शेवटी सखोल विचार करुन भिष्म अंतिम निर्णयाप्रति पोहोचला आणि सत्यवतीला म्हणाला.
"ठीक आहे. मी प्रतिज्ञाबद्ध होतो. मी प्रतिज्ञा घेतो की आजपासून मी आयुष्यात कधीही विवाह करणार नाही आणि विवाह करण्याचा विचारही मनात आणणार नाही."
ती भिष्माची प्रतिज्ञा. ती प्रतिज्ञाच जणू भिष्मानं केलेली. तिलाच भिष्मप्रतिज्ञा म्हणतात. तद्नंतर भिष्मानं प्रतिज्ञा करताच सत्यवती शांतनूसोबत विवाहासाठी तयार झाली. ही गोष्ट जेव्हा शांतनूला माहीत झाली. तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटलं. त्याचं मन हरहळत होतं. परंतू आता उपाय नव्हता. आता तर ती वेळ निघून गेली होती.
सर्व राजे राजवाड्यांनी ही गोष्ट माहीत झाली होती. तेव्हा तेही हरहळत होते. तशी ती गोष्ट व्यासांना माहीत झाली. त्याचबरोबर व्यास सत्यवतीजवळ आले व म्हणाले,
"माता हे तू काय केलंस. आपल्या स्वार्थासाठी आणि सुखासाठी बिचा-या भिष्माचं मन व्यथीत केलंस. माते याचे गंभीर परिणाम तुलाच नाही तर संपूर्ण हस्तीनापुरला भोगावेच लागतील."
व्यास पुन्हा तपश्चर्येला निघून गेला होता. त्यानंतर मोठ्या थाटामाटात सत्यवती व शांतनूचा विवाहसोहळा पार पडला. त्यातच ते दोघंही सांसरीक मोहमायेत गेली. त्यानंतर त्या दोघांना दोन अपत्य झाली पहिला म्हणजे चित्रानंद व दुसरा म्हणजे विचीत्रविर्य. चित्रानंद मोठा होता व शूरही होता. विचीत्रविर्य हा पाहिजे त्या प्रमाणात शूर नव्हता. तसाच तो लहान होता.
अटीनुसार चित्रानंद हस्तीनापूरच्या राजगादीवर बसला. त्याला लवकर गंधर्वांनी युद्धामध्ये ठार केलं. त्यानंतर अटीनुसार विचीत्रविर्य राजगादीवर आला. परंतू तो कमजोर आणि सशक्त नसल्यानं लवकरच आजारपणानं मरण पावला व तो मरण पावताच सत्यवतीच्या वंशवाढीच्या आशा संपुष्टात आल्या. तिला काय करावं सुचेनासं झालं.
शांतनूशी विवाह करताच सत्यवती सर्वेसर्वा बनली होती. शांतनू राजा असल्यानं ती महाराणी बनली होती. शांतनू व शांतनूचे दोन्ही पुत्र आज जीवंत नव्हते.शिवाय राजगादीला वारसही नव्हता. त्यामुळंच ती चिंतेत होती. तिला काय करावं सुचत नव्हतं. अशातच ती वारसाचा विचार करायची. कारण तिनंही भिष्माकडून राजगादीवरील वारसाबाबत शपथ घेतली होती की ती हस्तीनापुरातील राजगादी तिच्या मुलालाच हवी. दुसरा कोणीही त्या राजगादीवर बसायला नको. यासाठीच तिनं भिष्माकडून वचन घेतलं होतं की त्यानं कधीच विवाह करु नये. तिला वाटत होतं की समजा भिष्मानं विवाह केलाच आणि त्याला जर मुलं झालीच तर त्यानं जरी राजगादी नाकारली असली तरी आपल्या पित्यावर झालेला अन्याय त्याचे वारस सहन करु शकणार नाहीत व ते राजे बनतील. त्यापेक्षा भिष्मानं जर विवाहच केला नाही तर त्याला पुत्रच होणार नाहीत व राजगादीचा प्रश्न आपोआपच मिटेल.
तो स्वार्थ.......तोच स्वार्थ होता तिचा. परंतू नियती ते सर्व ऐकत होती. त्या नियतीला कळत होतं की आता काय करायला हवं. त्या नियतीनंच भिष्म पराक्रमी असून त्याला राजगादीवर बसता न आल्यानं व सत्यवतीनं राजगादीसाठी चाल खेळली असल्यानं तिचे दोन्ही मुलं जीवंत ठेवले नाहीत. आता हस्तीनापुरातील वंश बुडणार असं लक्षात येताच सत्यवतीसमोर प्रश्न उभा ठाकला. वंशाला वारस कोण देणार? आपल्या रक्ताचा असा व्यक्ती कोण? विचार करता करता तिच्यासमोर भिष्माचं रुप तराळलं. कदाचीत भिष्मच आपल्या राज्याला वंशाचा वारस देवू शकतो. आपण त्याला विनंती करावी. विनंती करावी की त्यानं आपली प्रतिज्ञा मोडावी व वंश वाढवावा. वंश वाढविण्यासाठी त्यानं विवाह करावा. तसा तो विवाह करुन त्यानं वंशाला वारस द्यावा.
विचारांचा अवकाश. आज त्याच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले होते. प्रश्न मोठा गंभीर होता. वंशाच्या वारसाचा प्रश्न. सत्यवती हारली होती. तिचे वंशाचे वारस संपले होते. काय करावं सुचत नव्हतं. अशातच तिला भिष्म आठवताच ती भिष्माच्या कम-यात गेली. तसा भिष्म आपल्या कक्षात आपल्या बाणांना धार लावत बसला होता. अचानक त्याची नजर तिच्यावर पडली. तसा तो आश्चर्यचकीत झाला. विचार आला की आज आणि आता अचानक आपली आई इथं कशी? पुर्वी ती आपल्याला बोलावून घ्यायची किंवा महत्वाचं काम असल्यास निरोप पाठवायची. परंतू आज.......आज ती स्वयंम हजर आहे. त्याचा विश्वासच बसत नव्हता तिच्यावर. तसा तो आश्चर्यचकीत होताच व त्याला प्रश्न पडताच तो म्हणाला,
"माते, इकडं कशी काय? काय काम आलं एवढं महत्वाचं. मलाच बोलावून घ्यायचं होतं. मीच आलो असतो तिकडं."
सत्यवतीनं ते भिष्माचे बोल ऐकले. तशी ती म्हणाली,
"नाही भिष्मा, काही काही गोष्टीत बाळाला त्रास द्यायचा नसतोच. एक प्रयोजनहोतं, म्हणून आलेय मी."
"बरं माते, कशासाठी आलीय?"
"भिष्मा, मी कसं सांगू. परंतू मला सांगावंच लागेल."
"बोल माते, अगदी निःसंकोच होवून बोल. मलाही कळू दे तुझ्या मनातील प्रयोजन. सांगीतल्यानं प्रश्नावर उत्तर सापडतं. काही शंका आहे का माझ्याविषयी?"
"नाही शंका तर नाही. परंतू एक मनोधैर्य आहे. बोल, रागावणार नसशिल तर सांगते."
"माते, आईसमोर पुत्र लहानच असतो. तो कसा रागावेल माते?"
"तर मग निधड्या छातीनं ऐक."
"बोल माते."
भिष्म उत्तरला. तशी ती सांगू लागली आपल्या गोष्टी व तो कान टवकारून ऐकत होता त्या गोष्टी. ज्या गोष्टी सत्यवती सांगू लागली होती.
"भिष्मा, माझं प्रयोजन आहे की तू विवाह करावास. मी तुझ्यासाठी विवाहाचा प्रस्ताव घेवून आलीय. मला माहीत आहे की तू हो म्हणणार नाहीस. कदाचीत माझं चुकलंही असेल. कदाचीत तुला माझा रागही येईल. परंतू भिष्मा, याघडीला मी बरोबर आहे. आपल्या राज्याला वारस हवा आहे. मी वारस देवू शकत नाही आणि तुझे भाऊही वारस देवू शकत नाहीत. कारण ते आज जीवंत नाहीत. ते जर जीवंत असते तर मी कदाचीत तुझ्याकडेही आलीच नसती."
सत्यवतीचं ते बोलणं भिष्म ऐकत होता. तसा तो म्हणाला,
"माते, तू म्हणतेस ते बरोबर आहे. परंतू आता ते शक्य नाही. मी वचनबद्ध आहे या घडीला. मी जर हे वचन मोडलं ना, तर उद्या समस्त संसार कोणतेच वचन पाळणार नाही. कोणीच व्यक्ती मग वचनावर विश्वास ठेवणार नाही. मग सा-याच समस्या निर्माण होतील."
"परंतू भिष्मा, गादीला वारस? त्या वारसाचं काय? कोण वारस देईल आपल्या हस्तीनापुरला. असा वारस देणारा आपल्या कुळाचा तुझ्याशिवाय तरी मला कोणीच दिसत नाही. मी काय करु भिष्मा. माझ्यासमोर कोणताच मार्ग नाही. कोणतेच विचारही मला सुचत नाहीत. त्यासाठीच भिष्मा, ही माझी शेवटली आज्ञा ऐक."
ती सत्यवती. त्या सत्यवतीचे ते शब्द काळजाला बाण टोचणारे होते. तिला वाटत होतं की ती सत्यवती जणू तलवार घेवून आपल्या मानेवर चालवत आहे. ती बोलत होती व तो गुपचूप ऐकत होता. शेवटी न राहवून तो म्हणाला,
"माते, पुरे आता. मी विवश आहे. हवं तर मला माफ कर. परंतू मी राजगादीला वारस देण्यासाठी आपली प्रतिज्ञा मोडू शकत नाही. माते, आजपर्यंत तरी मी तुला अंतर दिलं नाही. तुझ्या आज्ञा पाळतच आलोय. मला स्विकार नसतांना मी केवळ राजगादीला वारस मिळावा म्हणून विचीत्रविर्यसाठी त्या अंबा, अंबिका व अंबालिकेच्या स्वयंवरात भाग घेतला. तो प्रसंग मी माझ्यावर स्वतः ओढवून घेतला. माहीत आहे माते.
माते, तुझ्याच म्हणण्यानुसार मी शक्तीशाली नसलेल्या विचीत्रविर्यसाठी स्वयंवर भेदून आणलं मी काशी नरेशच्या तीनही मुलींना. तो प्रसंग आजही आठवतो मला. मी किती व्यथीत केलं त्या तिघींना. माते, त्यातील अंबा तर शाल्ववर प्रेम करीत होती. तिची काय दशा झाली म्हणून सांगतो. जेव्हा मी ते स्वयंवर भेदण्यासाठी गेलो आणि त्या तिघींना सर्वांशी लढून जिंकलो. परंतू तो शाल्व काही पराभव स्विकारीत नव्हता. तेव्हा तीच अंबा आडवी आली आणि म्हणाली की जावू द्या. माझ्यासाठी सोडून द्या. त्यातील त्या अंबेनं स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला आणि ती इथं जेव्हा आली, तेव्हा विचीत्रविर्य काय म्हणाला हे तुझ्यासह सर्व दरबारीगण जाणतातच. तो म्हणाला की मी कोणावर प्रेम करीत असलेल्या मुलीशी विवाह करणार नाही. त्यानंतर मी तिला तिचा प्रेमी शाल्वकडा पाठवलं, त्यावेळेस शाल्व म्हणाला की ज्या मुलीमुळं माझा अपमान झाला. ज्या स्रीच्या स्वयंवरात माझा पराजय झाला. त्या मुलीशी मी विवाह कसा करु? आता मला सांग, त्या बिचा-या अंबेचा यात दोष काय? तुझ्या मुलाला माहीत होते ना की मी त्याचेचसाठी स्वयंवरात भाग घेवून त्या तिघींना आणलं आहे स्वयंवरातून. तरीही त्यानं तिचा स्विकार न करणं व मी दुस-यावर प्रेम करणा-या मुलीशी विवाह करीत नाही म्हणणं शोभा देण्यासारखी गोष्ट तरी आहे का? माते, तुला हे संयुक्तीक वाटते का? माहीत आहे माते, शाल्वकडून ती जेव्हा माझेकडे आली. तेव्हा ती मलाच तिच्याशी विवाह करावा असं म्हणू लागली. परंतू मी वचनबद्ध असल्यानं तिच्याशी विवाह केला नाही. यात माझा काहीच दोष नव्हता. दोष तुझाच होता माते. कारण तूच मला वचनबद्ध केलं होतं. आज राज्याला वारस नाही म्हणून तुला चिंता वाटते. परंतू तू काय केलंस राज्याच्या वारसासाठी ते तरी आठव माते. आज राज्याला वारस नाही म्हणून तू माझ्याच वचनाचा बळी देवून मला विवाह करायला लावत आहेस व मला वचन तोड म्हणत आहेस. परंतू हे लक्षात घे. मी कधीच वचन तोडणार नाही. माहीत आहे त्या त्या अंबेच्या रुपानं मला मिळालेली शापवाणी. ती शापवाणी अजूनही आठवते मला. मी जेव्हा तिला मी वचनबद्ध असल्याचं सांगीतलं ना आणि विवाह करु शकत नाही हेही जेव्हा सांगीतलं. तेव्हा ती रडत बसली. तिचे डोळेही सुजले. तरीही माझ्यावर काही परिणाम होत नाही आहे हे जेव्हा अंबेनं पाहिलं, तेव्हा ती रागाच्या भरात येथून निघाली. त्यानंतर माझ्याशी बदला घेण्यासाठी ती अनेक राजांना जावून भेटली. परंतू अनेक राजांच्या कानावर माझ्या पराक्रमाच्या चर्चा आहेत. त्यांनी तिला नकारच दिला. कारण ते माझ्याशी युद्ध करायला घाबरतात. शेवटी ती कार्तिकेय कडे गेली.
भगवान कार्तिकेयनं तिच्यावर प्रसन्न होवून तिला एक कमळाच्या फुलाचा हार दिला. जो हार सदैव ताजाच राहात होता. त्यानंतर तिला म्हटलं,
"अंबा, तू हा हार ज्याही कोणाच्या गळ्यात टाकशील, तो राजा भिष्माचा विनाश करेल वा विनाशाचे कारण बनेल."
अंबा ती हार घेताच अतिशय आनंदीत झाली. कारण तिच्या मनामध्ये माझ्याविषयी बदल्याची भावना होती. ती भावना त्या माळेच्या रुपानं पुर्ण होणार होती. तिला वाटत होतं की मी हा हार ज्याही कोणाच्या गळ्यात टाकेल. तो भिष्माच्या मृत्यूचे कारण बनेल वा त्याला यमसदनी पाठवेल. त्यानंतर ती तो हार घेवून पुन्हा बरीच फिरली. परंतू कोणीच तिची ना आपबीती ऐकत होते. ना तिला मदत करीत होते. कारण त्यांना माझ्याशी युद्ध करायला भीती वाटत होती. शेवटी ती राजा ध्रृपदच्या दरबारात गेली. तसं राजा ध्रृपदनंही तिची गोष्ट ऐकली नाही. त्यामुळंच शेवटी ती निराश होवून तेथून निघाली व तिनं तो हार त्याच ध्रृपद राजाच्या महालातील मुख्य दरवाजावर लटकवला.
सर्व राजे रजवाडे अंबेचे फिरुन झाले होते. शेवटी ती निराश झाली व तेथून निघाली. त्यानंतर ती भगवान परशुरामजवळ गेली. त्यांनाही आपली आपबीती सांगीतली. त्यावर त्यांना दया आली व त्यांनी मला ललकारलं. युद्धासाठी आव्हान दिलं. शेवटी आमच्यात तुंबळ युद्ध झालं. तेही वीर आणि मिही. मिही ब्रम्हचारी आणि तेही. कोणीच मागे हटेना. त्यावर पराभवाचा पत्ताच नाही. ते युद्ध बरेच दिवस चाललं. शेवटी परशुरामाला काही लोकांनी समजावलं व त्यांनीच हार मानून शेवटी ते अंबेला म्हणाले की तू मला माफ कर. तू भिष्मालाच शरण जा. जेवढे प्रयत्न करायचे होते, तेवढे मी केले. परंतू मला ते जमले नाही. पुत्री हवं तर मला माफ कर. परशुराम असे बोलून तेथून निघून गेले. परंतू अंबा काही केल्या आपल्या मनाला समजवू शकली नाही. तिच्या मनात आताही बदल्याची भावना होतीच. काय करावं सुचत नव्हतं. तसाच परशुरामानं भिष्माला शरण जा हा सांगीतलेला उपाय तिला पटला नाही. शेवटी ती हताश होवून पुन्हा नवा मार्ग शोधू लागली. ती हिमालयात गेली. तिथं ती भगवान शिवाची तपश्चर्या करु लागली. घोर तपस्या. त्यातच भगवान शिव तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले व म्हणाले की पुत्री मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहा आणि तुला एक वरदान देत आहे. तू पुढील जन्मात भिष्म मृत्यूला स्वयं कारणीभूत होशिल. त्यानंतर भगवान शिव अंतर्धान पावले.
भगवान शिव अंतर्धान पावताच तिनं हिमालयातच स्वतः चिता तयार केली व तिनं स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केलं. माहीत आहे माते, अंबा या धरणीवरुन निघून गेली. परंतू ते पाप झालं माझ्याहातून. तेही तुझं ऐकून. ना मी तुझ्या मुलाच्या विवाहाला मुलगी मिळवून देण्यासाठी स्वयंवरात गेलो असतो ना मी अंबेला आणलं असतं. ना तिचं मन मोडलं असतं मी. ना तिला वन वन भटकावं लागलं असतं. ना तिच्यात बदल्याची भावना आली असती. ना तिनं मला कोसलं असतं. ना तिनू तपश्चर्या केली असती. ना तिला वरदान मिळाले असते. सगळं तुझ्यामुळं घडलं आणि दोषी मीच ठरत गेलो. माहीत आहे, मी मृत्यूला घाबरत नाही. परंतू मला वाईट याचं वाटतं की माझ्याचमुळं अंबा अशी वणवण भटकत राहिली. माझ्याचमुळं तिला वणवण भटकावं लागलं. ते पाप झालं व त्या पापाचा दोषीही मीच ठरलो.
धृतराष्ट्रचा जन्म. तो जन्मच मुळात अंधत्वातून झाला होता. तसा विदूरचा जन्मही पंगूपणातून झाला.
गादीचा वारस. गादीच्या वारसाचा प्रश्न ऐरणीवर होता. भिष्मानं तिच्यासमोर तिला दोष दिला होता व तो दोष देवून मोकळा झाला होता. तिचं चुकलं होतं. ती आता आपल्या कर्मावर पश्चाताप करीत होती. परंतू आता पश्चाताप करुन काही आता उपयोग नव्हता.
भिष्म तसा बोलून मोकळा झाल्यावर वारसाचा प्रश्न उपस्थीतच होता. तसं पाहता वारसाचा प्रश्न भिष्मानं सोडवला नसल्यानं तो प्रश्न तिच्याच समोर ठाम मारुन होता. तशी ती विचार करीतच होती. तिला काय करावं सुचत नव्हतं. अशातच तिला आठवलं की तिच्याच पोटचा एक पुत्र आहे. तोही रक्ताचाच आहे. फरक एवढाच आहे की तो भिष्माच्या वा हस्तीनापुरच्या रक्ताचा नाही तर तो तिच्या रक्ताचा आहे. त्याचं नाव व्यास. विचार करता करता व तिला व्यासाबद्दल माहीत होताच तिनं व्यासाला निमंत्रण पाठवलं.
व्यासाला निमंत्रण मिळताच व तसं माहीत होताच तो तातडीनं निरोप माहीती झाल्यावर हस्तीनापुरात आला. त्यानं तिला त्याला बोलावण्याचं प्रयोजन विचारलं. त्यावर ती म्हणाली,
"पुत्रा, मी तुला यासाठी बोलावलंय की मला हस्तीनापुरातील गादीला वारस हवा."
"त्यासाठी माझी कोणती गरज?"
"तू नियोग विद्या जाणतोसच. त्या नियोग पद्धतीनं तू हस्तीनापुरला गादीचा वारस देवू शकतोस."
व्यासनं आपली आई सत्यवतीचं कथन ऐकलं. तसा तो म्हणाला,
"माते, ते कसं शक्य आहे. तुला माहीत आहे की त्या तुझा पुत्र विचीत्रविर्यच्या भार्या आहेत. त्या तुझं ऐकून माझ्याकडे येतील असं तुला वाटते! मला नाही वाटत."
ते व्यासाचं बोलणं. त्यावर सत्यवती म्हणाली,
"पुत्रा, मला हस्तीनापुरातील गादीला वारस हवा. मी काहीही करेल आणि त्या माझ्या पुत्राच्या म्हणजेच विचीत्रविर्यच्या भार्यांना तुझ्याकडे येण्यास बाध्य करेल. फक्त तू तसा वारस हस्तीनापुरला देण्यासाठी नकार देवू नकोस म्हणजे झालं."
"माते, तू जर तसा प्रयत्न करीत असशिल आणि तुला व त्यांना किंतू परंतू नसेल तर मी तयार आहे हस्तीनापुरला वारस देण्यासाठी .परंतू एक अट आहे."
"अट! आणखी कोणती अट आहे?"
"माझ्या मतानुसार तू भिष्माला विवाह करण्यास का नाही सांगत. तो हस्तीनापुरातील वंशाचा आहे. तो वारस देण्यास सक्षमही आहे. तू त्याचा विचार का नाही करत?"
"विचारले. मी त्यालाही विचारले. परंतू?"
"परंतू काय माते?"
"तो तयार नाही आपली शपथ मोडण्यास. तो म्हणतोय की मी प्रतिज्ञाबद्ध आहे. मी प्रतिज्ञा मोडण्यास तयार नाही."
"असं का."
"होय. म्हणूनच तुला बोलावलंय मी."
"असं जर आहे तर मी तयार आहे माते. तू फक्त तुझ्या पुत्रवधूंना तयार कर म्हणजे झालं."
व्यास सत्यवतीला म्हणून गेले.
व्यास सत्यवतीला म्हणून गेले खरे. परंतू तिचा प्रश्न मिटला नव्हता. तिचा प्रश्न अजूनही तेवतच होता. ज्योतीप्रमाणे. व्यास तर तिला हस्तीनापुरासाठी वंशाचे दिवे द्यायला तयार झाला होता. परंतू त्यासाठी तिला तिच्या पुत्रवधूंना त्राच्याकडे जाण्यासाठी तयार करायचे होते. ती अतिशय कठीण बाब होती. त्यामुळं तिच्या मनात प्रश्न प्रतिबिंबीत होता की त्या पुत्रवधू व्यासाकडे जाण्यास तयार होतील का?
ती सायंकाळची वेळ होती. बाहेर गार वारा सुटला होता. ती विचार करीत होती वंशाबद्दलचा. व्यास हस्तीनापुरातील महालातच स्थायीक होता. तो निर्णयाची वाट पाहात होता सत्यवतीच्या. त्याला वाटत होते की सत्यवती तयार करील आपल्या पुत्रवधूना व त्या पुत्रवधू वंशाच्या दिव्यासाठी नाही तर हस्तीनापुरातील गादीच्या वारसासाठी माझ्याकडे येतील. त्यासाठीच तो हस्तीनापुरात होता. तशीच ती त्याची आई सत्यवतीची आज्ञाही होती.
बाहेर थंड वारा सुटला होता. तसे सत्यवतीच्या मनात विचाराचे तरंग उठले होते. त्या विचारांनी तिच्या मनात वाद घातला होता. तशी वा-याची एक शीत झुळूक आली. तिच्या मनाला स्पर्शून गेली. तसा तिच्या स्वप्नात शांतनू आला. म्हणाला,
"झालं का वारसाचं काम? मिळाला का गादीला वारस?"
"नाही." तिनं म्हटलं. त्याचबरोबर तो क्षणार्धात अंतर्धान पावला. तशी ती भानावर आली. तसं तिनं ठरवलं की आता आपण आपल्या मनातील विचार आपल्या पुत्रवधूंना सांगावे. जेणेकरुन त्या तयार होतील.
ती बाहेरची गार हवा. ती थंड वा-याची झुळूक. ती झुळूक तिच्या मनाला सारखी खुणावत होती. सांगत होती की ते गादीच्या वारसाचे विचार तिनं आपल्या पुत्रवधूंना सांगावे व त्यांना तयार करावं. तसं तिनं मनात ठरवलेला बेत अंमलात आणायचे ठरवले. आज याच सुटलेल्या थंड वा-याचा तिनं फायदा घ्यायचे ठरवले. तोच उपयोग होणार होता तिला.
सत्यवती परसबागेत बसली होती. तो तिचा वंशाच्या दिव्याचा विचार. तो हस्तीनापूरच्या गादीच्या वारसाचा विचार तिला येताच तिनं आपल्या दोन्ही पुत्रवधूला शिपायाकरवी बोलणे पाठवले. तसा शिपाही मोठी पुत्रवधू अंबिकाच्या महालात गेला. म्हणाला,
"महाराणीसाहेब, आपल्याला मोठ्या महाराणी सरकारनं बोलावलंय."
ते शिपायाचं बोलणं. विचीत्रविर्य ज्या दिवसापासून मरण पावला होता. त्या दिवसापासूनच संपूर्ण हस्तीनापुरात शोककळा पसरली होती. कधीच सत्यवतीनं असं पुत्रवधूला बोलावलं नव्हतं. तसं पाहता ती सतत उदासच राहायची. तसं अंबिकेला सत्यवतीचं बोलावणं येताच ती आश्चर्यचकीत झाली. तशी म्हणाली,
"काय काम आहे?"
"महाराणीसाहेब, माफ करा. परंतू मला असं राणीसरकारनं काहीच सांगीतलं नाही."
"ठीक आहे. येत आहे असं सांग."
"ठीक आहे महाराणीसाहेब."
तो म्हणाला व तो तसा निघून गेला.
शिपाही त्यानंतर लहान महाराणीकडे गेला. त्यानं तिच्या कक्षात तिच्या दासीकरवी निरोप पाठवला. ती दासी आत प्रवेशली. तसं तिनं आपल्या महाराणीला उठवलं व सुचना दिली
"मोठ्या महाराणी सरकारकडून निरोप आलाय. शिपाही आला महाराणी सरकारकडून. बोलवू का आत."
"बोलव, बोलव आत."
दासीनं तसा निरोप देताच दासी तेथून निघून गेली. तसा शिपाही आत आला. म्हणाला,
"महाराणीसाहेब, आपल्याला मोठ्या राणीसरकारनं बोलवलंय."
तो निरोप. तसं तिनंही विचारलं,
"कोणतं काम पडलं राणीसरकारांना?"
"माहीती नाही."
"ठीक आहे, येते असं सांग."
तो शिपाही निरोप देवून निघून गेला. लहान राणी झोपेतून जागी होताच तिनं निरोप ऐकला. ती लहान महाराणी अंबरिका आपल्या राजवाड्यात विश्रामच करीत होती. तसा शिपाही निघून जाताच ती पुन्हा झोपली. कारण तिच्यावर झोप आरुढ झाली होती.
शिपाही जाताच काही वेळानं मोठी महाराणी अंबिका सत्यवतीसमोर हजर झाली. ती म्हणाली,
"कशाला बोलावलंय राणी सरकार?"
"एक महत्वपूर्ण काम आहे."
"कोणतं काम आहे आईसाहेब?"
"तुला मी कसं सांगू. तसं पाहता मी तुलाच बोलावलंय. कारण तूच या राज्यात अशी आहेस की जी समजदार आहे. समजून घेणारी आहेस. म्हणून तुला सांगायची हिंमत केली."
"मग बोला ना आईसाहेब. अगदी निःसंकोच बोला."
"तुला कदाचीत वाईट तर वाटणार नाही. राग तर येणार नाही ना तुला."
"नाही येणार. बोला. अगदी नि:संकोच बोला."
"ठीक आहे, तर मग ऐक."
असे म्हणत सत्यवती तिला सांगू लागली. तसं तिनं आधीच म्हटलं होतं की मधात व्यत्यय आणायचा नाही. अर्थात बोलायचं नाही.
"तुला माहीत आहे अंबिका की तुझे पती अकाली मृत्यूला प्राप्त झाले. यात व्यक्तीचा दोष नाही. दोष आहे नियतीचा. खरं तर नियतीच त्यात दोषी. या नियतीनंच घेतलेय दोन बळी.
तुला आणखी माहीत असेलच की महाराज शांतनूला दोन मुलं. चित्रागंद आणि विचीत्रविर्य. त्यापैकी चित्रागंदला गंधर्वानं मारलं आणि विचीत्रविर्यला आजारानं. त्यातच तुला माहीतच असेल की भिष्मानंही प्रतिज्ञा घेतलीय की तो कधीच विवाह करणार नाही. म्हणूनच प्रश्न निर्माण झालाय."
"कोणता प्रश्न राणीसरकार?"
"प्रश्न वारसाचा निर्माण झालाय. राज्याला वारस नाही. हस्तीनापुरला वारस हवाय. तेव्हा विचार येतोय."
"कसला विचार? जरा आम्हालाही सांगा. आम्हीही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करु."
"तुम्ही काय मदत करणार मला. परंतू मी त्यासाठीच बोलावलंय तुला. काय करावं याचा मार्ग विचारायला. बोल सांगते ना मार्ग."
"मला नाही सांगता येणार मार्ग. वाटल्यास तुम्ही सांगा मार्ग. आम्हाला आदेश द्या. तुम्ही सांगाल ते कष्ट घ्यायला तयार आहोत आम्ही. आपण फक्त आज्ञा करा."
"आज्ञा.......आज्ञेवरुन कळलं. परंतू तो मार्ग खडतर आहे आणि तुम्हाला आवडणाराही नाही."
"म्हणजे? राणीसरकार, तुम्ही सांगून तर पाहा. तुम्ही म्हणाल तर ही मानही कापून देवू तुम्हाला."
"विचार कर. विचार कर. चांगला विचार कर. असा उतावीळपणानं निर्णय घेवू नकोस."
अंबिका क्षणभर थांबली. त्यानंतर ती बोलकी झाली.
"विचार केलाय आईसाहेब. मी नीट विचार केला. आता आपण आज्ञाच करावी थेट. आपल्या आज्ञेचं पालन होईल."
"ठीक आहे तर मग ऐक. आपल्याला वंश चालवायचाय. भिष्म प्रतिज्ञाबद्ध आहे. तो विवाह करु शकत नाही आणि पुत्र जन्माला घालून वंश चालवू शकत नाही. हे तुला माहीत आहे. तसेच तुझा पतीही हयात नाही आता. तेव्हा तू एक लक्षात घे. तुला नियोग पद्धतीनं पुत्र जन्माला घालावे लागतील."
अंबिका थोडावेळ थांबली. तिला थोडंसं वाईटही वाटलं. आईसाहेब भलतीच गोष्ट बोलत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तसा ती विचार करु लागली. जर हिची मुलगी असती तर.......तर ह्या आईसाहेबानं तिच्या पोटातून नियोग पद्धतीनं पुत्र जन्माला घालू दिली असती का? यात तिच्या इच्छेला स्थान दिलं गेलं असतं की नाही.
ती विचारच करीत होती. तसे तिच्या कानावर शब्द पडले.
"काय झालं अंबिका. तू अशी गप्प का?"
आईसाहेबाचा प्रश्न. तशी ती म्हणाली,
"आईसाहेब, मला नियोग म्हणजे काय ते नीट समजलेलं नाही."
"अगं तू वेडी आहे का? निरोगचा अर्थ तुला कळत नाही. जरा खुलवून सांगावं लागेल का?"
"होय आईसाहेब. जरा खुलवून सांगा. मला अर्थ कळलेला नाही."
"तर मग ऐक. अगं नियोग याचा अर्थ दुस-याच्या पोटचं लेकरु जन्मास घालणे."
"म्हणजे? हस्तीनापुरातील गादीला वारस मिळावा म्हणून आम्ही दुस-यासोबत सहवास करायचा."
"होय. अगदी तसंच. अगं आपल्याला गादीला वारस हवा. हस्तीनापुरातील गादीला. तुला असं नाही वाटत की तुझा वंश चालावा? तुझा पुत्र गादीवर बसावा? त्यानं राज्य करावं?"
"छट् आईसाहेब, मला कल्पनाही सहन होत नाही. असं जर करायचं असेल तर मला नको पुत्र आणि मला नको गादीला वारस."
"वेडी आहेस तू. तुला कळत नाही राजगादी काय होते ते. अगं माझ्याकडे बघ. मी गादीवर माझाच पुत्र बसावा म्हणून भिष्माकडून तसं वचन घेतलं. मी विचार केला होता की माझ्या मुलाव्यतिरीक्त इतर कोणाचाही मुलगा हस्तीनापुरातील राजगादीवर बसू नये. मी अगदी तसंच केलं. मी महाराज शांतनूकडून वचन तर घेतलं. व्यतिरिक्त भिष्माकडूनही वचन घेतलं. भिष्मानं तर प्रतिज्ञाच केली की तो कधीच विवाह करणार नाही. आता सांग विवाहच नाही तर पुत्रप्राप्ती कुठून होणार. परंतू आता असं वाटतेय की त्यावेळी जरी माझं बरोबर असलं तरी आज ते बरोबर वाटत नाही. आज वाटतंय की जर भिष्म वचनबद्ध झालाच नसता वा मी त्याला वचनबद्ध केलंच नसतं तर आज त्याचा विवाह करता आला असता वंशासाठी. आज त्याचा विवाह झाला असता व हस्तीनापुरातील गादीला वारसही मिळाला असता."
परंतू त्यात आईसाहेब माझा काय दोष? अगं माझे पती अकाली मरण पावले, त्यातही माझा दोष नाही. मग मला अशी शिक्षा का बरं?"
"तुला शिक्षा नाही अंबिका, तूला फक्त वंशाला वारस द्यायचा आहे."
"म्हणून काय हे असले उटपटांग उपाय. मला सहन होत नाही आईसाहेब."
"म्हणूनच तर तुलाच बोलावलं आधी. तू समजदार आहेस. हे मी आधीच म्हटलंय. तूच समजू शकतेस माझं दुःख. तूच ओळखू शकतेस माझं मन आणि तूच ओळखू शकतेस माझी व्यथा. कल्पना कर की तू जर माझ्या जागेवर असती तर तू काय केलं असतं? विचार कर तू काय केलं असतं?"
अंबिका सत्यवतीचं ऐकत होती. तिला सत्यवती भावनाशिल बनवीत होती. तरीही ती काही ऐकत नव्हती. तसं ती ऐकत नाही हे पाहून शेवटी ती म्हणाली,
"जावू दे तुला याची गरज वाटत नाही तर. शेवटी मीच मुर्ख ठरले. जशी मलाच फार काळजी हस्तीनापुराची. तरीही आता माझा एक पाय डोहातच आहे. मी तसं पाहता किती दिवस जगणार! सर्व काही तुमच्यासाठीच करीत आहे ना. या हस्तीनापुरातील जनतेसाठी करीत आहे ना. तुला काहीच गरज वाटत नाही का याची. जावू दे, तुला गरज नाही वाटत तर. परंतू एक लक्षात घे. जर का तू या हस्तीनापुरला वारस देवू शकली नाही आणि मला तसं सांगीतलं नाही तर उद्या सकाळपर्यंत माझा मेलेला देह बघशिल म्हणून समज. जा आता. मुकाट्यानं जा." सत्यवती म्हणाली. तसं तिनं डोळ्यातून पाणी आणलं.
सत्यवतीचे ते अश्रू. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या जलधाराच होत्या. वाटत होतं की जशा जलधारा वाहू लागल्या आहेत. त्या अश्रुधारा अंबिका पाहात होती. तिला वाईट वाटत होते. त्या सत्यवतीच्या अश्रुधारा तिच्यानं पाहावल्या जात नव्हत्या. तशी ती सत्यवतीजवळ गेली. तिनं आपल्या पदराचा काठ घेतला व तिचे अश्रु पुसत ती म्हणाली,
"आईसाहेब मी जर आपली स्वतःची मुलगी असती तर.....तर असंच करायला लावलं असतं का मला?"
तो प्रश्न. सत्यवती रडत असतांनाचा प्रश्न. तशी रडक्याच स्वरात सत्यवती म्हणाली,
"होय. तू माझी स्वतःची जरी मुलगी असती तरी मी अगदी तसंच करायला लावलं असतं."
"तर आईसाहेब ठीक आहे. मी तयार आहे नियोग पद्धतीला. केव्हा आणि कोणाकडे सहवास करायला जायचं. तेवढं सांगावं म्हणजे झालं. आता मी जाते. मला आज्ञा द्या."
"पुत्री, तूच माझी खरी पुत्रवधू शोभतेय. आजपासून लक्षात ठेव माझा शब्द. तूझाच मुलगा पुढं जावून राजा बनेल व अगदी शेवटपर्यंत या हस्तीनापुरच्या गादीवर असेल."
ते शब्द न् शब्द. सत्यवती बोलत होती. तशी हुंदके देत रडतही होती.
काही वेळाचा अवकाश. ती तयार होताच सत्यवतीला आनंद झाला. तशी तिला तिनं आज्ञा दिली. त्यानंतर अंबिका रवाना झाली.
अंबिका आपल्या महालात गेली होती. तशी सत्यवतीसोबत झालेल्या वार्तालापाची तिला आठवण झाली. क्षणातच तिला विचार आला व ती विचार करु लागली.
तिचा तो विचार. तो विचार रास्त होता. कारण स्री जात. स्री जात ही त्यावेळेसही गुलामच होती. तिला काहीही बोलता येत नव्हतं. पुरुषी संस्कृतीमुळे तिला स्वतः ती कितीही प्रगल्भ का असेना, हार मानावी लागत होती.
स्री जात. स्री जात मुळातच गुलाम नव्हती. परंतू तथाकथीत लोकांनी गुलाम केलं होतं स्रीला. स्रीवर बंधनं घातली होती. तिनं काय करावं व काय करु नये याचीही बंधनं होती तिच्यावर.
महाभारतातील अंबिका. अंबालिकांना झालेली बाळं. ती बाळं नियोग पद्धतीनं झाली होती. नियोग याचा अर्थ टेस्ट ट्युब बेबी. वर्तमानकाळात या पद्धतीला टेस्ट ट्युब बेबी देखील म्हणता येईल.
त्या अंबिका, अंबालिकेच्या टेस्ट ट्युब बेबीचा विचार करता त्या काळात त्यांचा पती जीवंत नसतांना त्यांना तशा पद्धतीनं बाळ जन्माला घालणं आवडलं असेल का? तर याचा अर्थ नाही असाच येईल. परंतू ज्या काळात तथाकथित लोकांनी त्यांचेवर बंधनं घातली. त्यानुसार त्या दोघींनाही चूपच बसावं लागलं आणि जबरदस्ती करुन त्यांना नियोग पद्धतीनं पुत्र प्राप्त करण्यास बाध्य केलं असेल ही गोष्ट नाकारता येत नाही. कारण त्यांचा पती हा जीवंतच नव्हता.
अंबिकाचा तो विचार. ती सत्यवतीला भेटल्यानंतर आपल्या राजमहालात परतली होती. तरी ती काही स्वस्थ नव्हती. तिला पदोपदी तोच विचार येत होता. काय करावं सुचत नव्हतं. जेव्हा रात्र झाली आणि सगळे अंथरुणावर झोपायला गेले. तिही गेली अंथरुणावर झोपायला. ती पहूडली अंथरुणावर. तरीही तिला झोप येत नव्हती. ती सारखी कड फेरत होती व विचार करीत होती.
तिला वाटत होतं की का बरं स्रियांनीच कोणत्याही गोष्टी ऐकाव्या? का बरं तिनंच राज्याला वारस द्यावा अन् का बरं मनात इच्छा नसतांना गादीच्या वारसासाठी नियोग पद्धती वापरावी? सारेच प्रश्न तिच्यासमोर फेर धरुन नाचत होते. शिवाय असा नियोग करीत असतांना कोण असेल तो? तो सुंदर असेल की कुरुप असेल? वैगेरे प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते.

**********************************************************

सकाळ झाली होती. सत्यवती सकाळीच उठली होती. ती आनंदात होती. कारण आधीच्या दिवशी झालेल्या वार्तालापावरुन अंबिकानं हो म्हटल्यानं तिला माहीत झालं होतं की आपल्याला हस्तीनापुरातील राजगादीवर वारस मिळणार. तसं तिला आठवलं. आपण लहान महाराणीलाही निरोप पाठवला होता. ती आली नव्हती. तशी तिला आठवण येताच ती ताबडतोब लहान महाराणीच्या महालात गेली.
तो महाल. त्या महालात सत्यवती पोहोचताच तिनं अंबालिकेच्या दासींकरवी अंबालिकेला निरोप पाठवला. सांगीतलं की राणीसरकार आलं आहे भेटीला.
तो सत्यवतीचा निरोप. तो निरोप ऐकताच अंबारिकेला आश्चर्य वाटलं. तशी ती विचार करु लागली. विचार करु लागली की एवढ्या सकाळी सकाळी राणीसरकार माझ्या महालात आलंच कसं? तसा विचार करताच तिला आठवलं की राणीसरकारनं काल बोलावलं होतं. परंतू आपण गेलो नसल्यानं प्रत्यक्ष राणीसरकार भेटीला आलं.
ती सत्यवती. ती येताच अंबालिका चांगलीच घाबरली. तशी ती भेदरल्या अवस्थेत बाहेर आली. तशी म्हणाली,
"आईसाहेब, कशाला त्रास घेतलाय. मीच आले असते."
"नको नको, अगं मी आले तर काय झालं."
"कसं काय येणं केलं आईसाहेब? काही काम आहे का?"
"होतं आणि राहील. परंतू सध्या निपटलं."
"निपटलं म्हणजे ? कोणं केलं काम?"
"केलं नाही. परंतू करणार आहे."
"कोणतं काम आहे?"
"वेळ आल्यावर सांगेन."
"परंतू आईसाहेब, ते काम करायला कोण तयार झालं आहे?"
"अंबिका. अंबिका करणार आहे ते काम. परंतू ते तिला विचारशिल नको. काहीही सांगायचं नाही तिला. काम हे गुप्त ठेवावं. राज्यात गवगवा नको त्या कामाचा. कामाचं सुतोवाच नको कोणाजवळ."
"आईसाहेब, परंतू असं कोणतं काम आहे की ज्याची गुप्तता पाळण्याची गरज आहे."
"मीच सांगेन. परंतू वेळ आल्यावर सांगेन. कारण फालतूच राज्याची बदनामी नको."
"ठीक आहे. जर ते काम बदनामीकारक असेल तर,मिही कोणाला विचारणार नाही. मौन धारण करेल. अंबिकेलाही नाही."
"ठीक आहे. येते मी."
सत्यवतीनं आपले बोलणे बयाण केले. तशी ती तेथून निघाली. तिला आजच दुसरंही कार्य करायचं होतं. ते म्हणजे तिला आपला पुत्र व्यास. त्याची भेट घ्यायची होती. त्याला सांगायचं होतं नियोगाविषयी. सांगायचं होतं की अंबिका नियोग पद्धतीला तयार झाली.
ती रथावर बसली. तसं तिनं सारथ्याला म्हटलं.
"सारथी रथ घेवून व्यासाच्या कक्षाकडे चाल."
"ठीक आहे राणीसरकार." सारथी म्हणाला. तसा तो रथ हाकू लागला. थोड्याच वेळात व्यासाचा कक्ष आला. तशी ती उतरली. ती कक्षात गेली. तसा व्यास तिला दिसला. तो कक्षात बसला होता.
सत्यवती व्यासाचे कक्षात पोहोचली होती. तिला व्यासानं पाहिलं. तसं व्यासानंही तिला पाहिलं व तसा तो उभा झाला व म्हणाला,
"आईसाहेब, मीच आलो असतो. तू कशाला येणं केलं?"
"नाही पुत्रा. काही काही गोष्टी आपणच स्वतः करायच्या असतात. ठीक आहे. आता मी लक्षात ठेवेल आणि तुलाच बोलवेल."
"बरं, आता कसं काय येणं केलं?"
"तेच काम. ते काम पुर्ण झालं."
"म्हणजे त्या दोन्ही राण्या तयार झाल्या तर."
"नाही. एक तयार झाली. अंबिका तयार झाली. मी तिलाच सांगीतलं व तिला तयारही केलं. दुसरीला तयार केलं नाही. करील. परंतू जर आपलं काम जमणार नाही तर........."
"ठीक आहे आईसाहेब. मी तयार आहे. आज रातच्याला पाठवून दे नियोग उपचारासाठी. मी त्यासाठी तयारी करतो."
"ठीक आहे. येते मी. तू तयार राहा आणि निश्चींत राहा."
"ठीक आहे." तोही म्हणाला. तशी ती निघून गेली.
सत्यवती रथात बसली होती. सारथ्याला रथ हाकलायला लावलं होतं. तो रथ चालत होता. तशी त्या रथात बसलेली सत्यवती विचारात मग्न होती. ती आपल्या महालाकडे जात होती. तसं तिला आठवलं की चांगल्या कामाला विश्रांती कशाला? तसं आठवताच ती सारथ्याला म्हणाली,
"सारथी, आपला रथ अंबिकेच्या महालाकडे घेवून चल."
तो सत्यवतीचा आवाज. तसा तो आवाज ऐकताच सारथ्यानं जी राणीसरकार म्हणत आपला रथ वळवला व तो अंबिकेच्या महालाकडे जावू लागला. तसं क्षणातच तो महाल आला व सारथ्यानं आपला रथ थांबवला.
रथ थांबला होता. तशी सत्यवती रथाच्या बाहेर पडली. ती अंबिकेच्या महालात गेली. त्यानंतर तिनं दासीकरवी अंबिकेला निरोप पाठवला. तशी अंबिका बाहेर आली. ती सत्यवतीच्या पायावर नतमस्तक झाली व म्हणाली,
"आईसाहेब, मीच आले असते. कशाला आलात तुम्ही?"
"अंबिके, तू भविष्यातील हस्तीनापुरातील गादीला वारस देणारी महाराणी आहेस. तुला कशाला त्रास द्यायचा?"
अंबिका चूप बसली. तशी सत्यवती म्हणाली,
"अंबिका, मी तुला सांगायला आलो आहे की तूला आज राणी शयनकक्षात तयार राहायचं आहे. मी अशा व्यक्तीला नियोगसाठी पाठवणार आहे. जो उद्याला हस्तीनापुरातील राजगादीला वारस देवू शकतो. मात्र आता झाल्या गोष्टीला नकार देशिल नको."
"ठीक आहे आईसाहेब. मी आज रातच्याला शयनकक्षात तयार असेल."
"बरं मी येते."
"बरं आईसाहेब." ती म्हणाली. तशी सत्यवती आपल्या महालाकडे निघून गेली होती.

**********************************************************
रात्र झाली होती. रात्रीला शयनकक्ष तयार केला गेला होता व्यासासाठी. व्यासानं सांगितल्यानुसार सत्यवतीनं अंबिकेला शयनकक्ष तयार करण्याची सुचना दिली होती.
तो शयनकक्ष. त्या शयनकक्षात अंबिका बसली होती. तसा सूचनेनुसार व्यास अंबिकेच्या त्या शयनकक्षात प्रवेशला.
व्यास दिसायला सुंदर नव्हता. पाहायला तो अक्राळविक्राळ होता. तसं पाहता त्याच्या अंगातून चिकट स्राव बाहेर निघायचा. ते पाहून त्याच्या अंगाला मासोळीसारखा वास यायचा. शिवाय तो चेहरा पाहताच कोणालाही भीती वाटायची.
अंबिकानं शयनकक्ष तयार केला होता. ती वाट पाहात होती तिथं कोणी येण्याची, जो वंशाला वारस देवू शकेल. तिनं मनात कल्पना केली होती की तो शयनकक्षात येणारा व्यक्ती सुंदर असेल. परंतू झालं उलटं. व्यास शयनकक्षात येताच अंबिकानं त्याला पाहिलं. त्याचा अक्राळविक्राळ चेहरा अनुभवला. तसं त्याला पाहताच तिला भीती वाटली नाही. परंतू त्याचा चेहरा तिला पाहावासा वाटत नसल्यानं तिनं गच्च डोळे मिटून घेतले.
ती रात्र. ती संबंधीत रात्रच अंबिकानं डोळे मिटून घालवली होती. तिचं त्या अक्राळविक्राळ चेह-याकडं पाहण्याचं धाडस होत नव्हतं. त्यामुळंच की काय, घात झाला. आता रात्र सरली होती. तसा व्यास उठला व तो अंबिकाच्या शयनकक्षातून आपल्या कक्षात चालला गेला.
ते कुतूहल........ते कुतूहल काही सत्यवतीला स्वस्थ बसू देत नव्हतं. दुसरा दिवस उजाडताच ती ताबडतोब रात्रीचा समाचार विचारण्यासाठी व्यासाकडे गेली आणि विचारणा करु लागली. तसा व्यास म्हणाला,
"सगळं काही बरोबर झालं. विधीवतच झालं. परंतू घात झाला."
"घात! घात कसला घात?"
"आईसाहेब, सगळं काही बरोबर झालं. परंतू नियोग पद्धती सुरु असतांना अंबिकानं डोळे गच्च लावले. त्यामुळं होणारी संतती ही बलवान तर होईल. परंतू आंधळी होईल यात शंका नाही."
"म्हणजे? राज्याचा वारस हा आंधळा. तो कसं राज्य चालवेल? नाही, नाही. आपल्याला डोळस वारस हवा. मी अंबालिकेला तयार करते. कदाचीत ती तरी डोळे उघडे ठेवून नियोग पद्धतीला प्रतिसाद देईल."
"ठीक आहे माते. तुला जसं वाटते तसं कर."
"येते मी."
"बरं."
सत्यवती तेथून निघाली. ती थेट अंबिकाच्या कक्षात निघाली. तिला पाहताच ती म्हणाली,
"अंबिका, मला सगळं माहीत झालंय. काय केलंस तू. तू डोळे गच्च लावून नियोग केलाय. अगं याचा परिणाम माहीत आहे का तुला? अगं यापासून होणारी संतती ही आंधळी निपजेल. आणि तुला माहीत नाही की आंधळा व्यक्ती राज्य कसं सांभाळू शकेल. आता यावर काही उपाय तरी आहे का?"
".........." अंबिका चूप होती. तशी सत्यवती तिलाच म्हणाली,
"एक काम कर. आता या नियोग पद्धतीसाठी तू तुझ्या बहिणीला म्हणजे अंबालिकेला तयार कर. माझ्यापेक्षा ती तुझंच जास्त ऐकू शकेल."
अंबिकेनं सत्यवतीचे ते बोलणे ऐकले. तशी ती म्हणाली.
"ठीक आहे आईसाहेब. मी सांगते अंबालिकेला."
"ठीक आहे. तू तिला तयार कर व पाठव उद्याच तिला शयनकक्षात. चांगल्या कामाला वेळ नको."
"बरं आईसाहेब."
"ठीक आहे येते मी."
सत्यवती निघून गेली होती. तशी अंबिका काही वेळानं आपल्या बहिणीच्या कक्षात गेली. त्यानंतर तिला नियोग पद्धतीच्या व हस्तीनापुरातील राजगादीसाठी वारस का हवा याच्या गोष्टी सांगू लागली व तिला नियोग पद्धतीसाठी व हस्तीनापुरातील राजगादीवरील वारसासाठी तयार करु लागली.
"अंबालिका, आपल्याला वारस द्यायचा आहे हस्तीनापुरातील राजगादीसाठी. आईसाहेबांचं म्हणणं."
अंबालिकेनं ते अंबिकेचं बोलणं ऐकलं. तशी ती म्हणाली,
"आईसाहेब वेड्या आहेत की काय? आपला पती जीवंत नाही अन् आपला पती जीवंत नसतांना राजगादीसाठी आपल्याला वारस तरी कसा देता येईल बरं?"
"हो तोच प्रश्न मलाही पडला होता. परंतू त्याचा उपाय सापडला."
"कोणता उपाय?"
"नियोग पद्धती."
"म्हणजे? ही काय आहे नियोग पद्धती?"
"नियोग पद्धती याचा अर्थ रक्ताच्या नात्यातील कोणत्याही परपुरुषासोबत एक रात्र सहवास करणं."
"म्हणजे? परपुरुषासोबत."
"नाही. तसं नाही."
"मग कसं? तो आपल्या रक्ताच्या नात्यातील असेल. पती असेल का आपला?"
"तुझं म्हणणंही बरोबरच. तसंच समज. परंतू तुला तसं करायचं आहे."
"तसं म्हणजे? परपुरुषासोबत एका रात्रीचा सहवास करायचा आहे तर. परंतू ताईसाहेब, मी सांगून ठेवते की मला ते जमणार नाही. मुळीच जमणार नाही."
"का? तुला वाटत नाही का की हस्तीनापुरातील राजगादीसाठी वारस मिळावा?"
"वाटते. परंतू हा असला या पद्धतीनं वारस. आपली किती बदनामी होईल. काळ माफ करेल का आपल्याला."
"का माफ करणार नाही. आपण काय वाईट काम करीत आहोत काय? आपण हस्तीनापुरातील राजगादीला वारस देत आहोत."
"परंतू ताईसाहेब, मला हे जमायचं नाही. ते शक्य नाही तू म्हणतेस ते."
"ठीक आहे. तुला शक्य नाही असं तुझं म्हणणं. मला तरी शक्य होतं का? तरीही मी तयार झालीच ना. मी नियोग पद्धती केली. परंतू फसले. कारण मी तो विधी करीत असतांना गच्च डोळे लावले. म्हणून मला आंधळी संतती होणार आणि आंधळी संतती ही हस्तीनापुरातील राज्य कसं चालवेल. म्हणूनच तुला तयार करावं लागत आहे नियोग पद्धतीसाठी."
"नाही ताई, मला हे शक्य नाही. कधीच शक्य होणार नाही. मी आपल्या पती व्यतिरीक्त कोणत्याही परपुरुषासोबत रात्र काढू शकत नाही."
"ठीक आहे. तू जर माझं ऐकत नसशिल तर माझा जगून तरी काय उपयोग. तसाही आपला पती जीवंत नाही. तुलाही मरायचं असेल माझ्यासोबत तर तूही मरु शकतेस?"
"म्हणजे? का बरं मरायचं?"
"अंबालिके, अगं लेकरंच नाही तर आपण जगून तरी कोणासाठी? अगं आपला पती आज जीवंत नाही लेकरं पैदा करायला. मग आपल्याला लेकरं होतील तरी कुठून? अगं आज आपल्याला लेकरं व्हावीत म्हणून आपल्या आईसाहेबही पुढाकार घेत आहेत."
"परंतू त्यात आपली बदनामी?"
"कशी होणार आपली बदनामी? त्याला नियोग पद्धती नाव दिलं ना आईसाहेबांनी. उद्या राज्याचा वारस सोड. परंतू पुत्ररुपानं आपल्याला आपलं आयुष्य तर सुखदायक काढता येईल. ता काढता आलं म्हणजे झालं."
"हो, तुझंही म्हणणं बरोबरच आहे. ठीक आहे तर. मिही तयार आहे नियोग पद्धतीला. तू सांगून दे. आईसाहेबांना."
ती नियोग पद्धती. अंबालिका अंबिकेच्या म्हणण्यानुसार तयार झाली होती नियोग पद्धतीसाठी. तसं तिनं होकार देताच पुरता निरोप तिनं सत्यवतीला दिला व सत्यवतीनं व्यासाला व ठरल्याप्रमाणं दुस-या दिवशीसाठी शयनकक्ष सजवलं गेलं व त्यात अंबालिकेला तिची इच्छा नसतांनाही तिला भावनेत गुंफून झोकून देण्यात आलं.
तो शयनकक्ष तयार होता. आता व्यास त्या शयनकक्षात येणार नव्हता जसा अंबिकेच्या शयनकक्षात आला होता. तर याठिकाणी व्यास आधीच शयनकक्षात राहणार होता व अंबालिका स्वयं जाणार होती त्या शयनकक्षात. सगळं कसं व्यवस्थीत ठरलं होतं. तशी रात्र झाली. त्या रात्रीच्या प्रहरी अंबिकेनं आपली बहिण अंबालिकेला सजवलं व पाठवून दिलं व्यासाच्या शयनकक्षात.
अंबालिका व्यासाच्या शयनकक्षात गेली होती. तसं तिनं त्याले पाहिलं. तिला तोच तो व्यासाचा अक्राळ विक्राळ चेहरा दिसला. तशी ती घाबरली. तिला भीती फार वाटत होती. वाटत होतं की व्यास तिला खावून टाकतो की काय, तशी ती डोळेही लावणार होती. परंतू तिला क्षणात आठवलं. तिच्या बहिणीनं म्हणजे अंबिकेनं सांगीतलं होतं की तिनं त्याला पाहून गच्च डोळे लावले. ज्याचा परिणाम म्हणजे तिला होणारी संतती ही आंधळी होणार. म्हणून तिनं गच्च डोळे लावले नाही. मात्र ती फार घाबरली. ती एवढी घाबरली की ज्याचा परिणाम असा झाला की तिला होणारी संतती ही सतत आजारी राहणार होती.
ती रात्र तशी निघून गेली. तसा दिवस उजळला व अंबालिका स्वयं व्यासाच्या कक्षेतून बाहेर पडली. ती आपल्या कक्षात आली. तशी उद्वेगानं सत्यवती ताबडतोब काय परिणाम झाला म्हणून तो परिणाम पाहण्यासाठी ती व्यासाचे कक्षात गेली आणि त्याला विचारले. तसा व्यास म्हणाला,
"आईसाहेब, काय सांगू. यावेळेस होणारी संतती ही अंगू पंगू निपजणार. कारण या कक्षात जेव्हा अंबालिका आली. तेव्हा तिनं डोळे तर उघडे ठेवले होते. परंतू ती एवढी घाबरली होती की तिनं आपलं अख्खं शरीरच पिवळं केलं होतं. याचा परिणाम हा होणार आहे की होणारी संतती ही अंगू पंगू पैदा होईल. याचाच अर्थ असा की ती संतती सतत आजारी पडेल."
"यावर काही उपाय?"
"यावर उपाय म्हणजे आता फक्त हा एक शेवटचा उपाय आहे. मला तीन वेळाच नियोग करणं शक्य आहे. यावेळेस तरी तशी चूक होवू नये. तसं समजावून सांग अंबिका आणि अंबालिकेला. यावेळेस तरी हट्ट्याकट्ट्या मनानं, डोळे उघडे ठेवून यावं म्हणावं. जेणेकरुन निपजणारी संतती चांगली निपजेल. नाहीतर पुन्हा तेच ते. तसं सांग त्यांना. मात्र हा शेवटचा पर्याय."
"ठीक आहे. मी सांगते तसं त्यांना."
"अन् हेही सांग की जो कोणी अशी अट पाळू शकेल. तिनंच कक्षात यावं माझ्या."
"ठीक आहे. ती म्हणाली. तशी ती चालती झाली.

**********************************************************

सत्यवतीसमोर चिंतेचा प्रश्न होता. तो हस्तीनापुरातील राजगादीवरील वारसाचा प्रश्न काही सोडवता येत नव्हता. त्यातच अंबिकेकडून तशी चूक झाली होती. ती घाबरली नव्हती. परंतू तिनं डोळे बंद केले होते. तशीच अंबालिका घाबरली होती. ती तर पिवळीच पडली होती. व्यासांनी आता म्हटलं होतं की जी कोणती महाराणी त्याच्या अटी पुर्ण करेल. तिलाच शयनकक्षात पाठवशिल. हा शेवटचा पर्याय आहे. तसा ती विचार करु लागली. कोणाला यावेळेस शयनकक्षात पाठवावं. तसं तिला आठवलं. आपण अंबिकेलाच शयनकक्षात पाठवू. ती घाबरली नव्हती. तशी तिला तिची चूक लक्षातही आली आहे. आपण तिला सांगू की डोळे मिटशिल नको यावेळेस. कारण ही शेवटची वेळ आहे नियोग पद्धतीचा वापर करण्याची. ती करेलही तसं. हं, अंबालिकेला पाठवलं असतं. परंतू ती याही वेळेस घाबरणार नाही कशावरुन?"
तो वारसाचा प्रश्न. सत्यवतीला परेशान करीत होता तो वारसाचा प्रश्न. तशी ती ताबडतोब अंबिकेच्या कक्षात गेली. तशी तिला ती म्हणाली,
"घात झाला अंबिके. याही वेळी घात झाला. ती अंबालिका जेव्हा त्या शयनकक्षात गेली ना. तेव्हा ती फार घाबरली होती. ती तर पिवळीच पडली होती नियोग पद्धतीत. आता याचा परिणाम हा होणार की होणारी संतती ही सतत अंगू पंगू निपजणार."
अंबिकेनं ते ऐकलं. तशी अंबिका म्हणाली,
"आता यावर उपाय?"
"एक उपाय आहे आणि हा शेवटचाच उपाय आहे. यावेळेस तुम्ही दोघींपैकी कोणीही जायचं. परंतू आधी झालेल्या चुका यावेळेस व्हायला नको."
"ठीक आहे आईसाहेब." अंबिका म्हणाली. तशी सत्यवती चालती झाली.
अंबिकेनं सत्यवतीच्या म्हणण्यानुसार आपली बहिण अंबालिकेची भेट घेतली. तिनं अंबालिकेशी बोलणी केली. कोण जाणार त्याच्या शयनकक्षात. तशी अंबालिका म्हणाली,
"मला त्याचा अक्राळविक्राळ चेहरा पाहून भयंकर भीती वाटते. याही वेळेस मी नाही घाबरणार कशावरुन? तो चेहरा. तो चेहरा एखाद्या अजबगजब राक्षसासारखाच दिसतो. मी नाही जात या वेळेस. तूच जा ताई."
अंबालिकेनं सरळसरळ निकाल देवून टाकला. तसं बोलून दाखवलं. आता अंबिकेसमोर विचार आला की त्याच्या कक्षात जाईल कोण? तिही जायला नकारच भरत होती. कारण त्याचा चेहराच असा होता की तिही पाहू शकत नव्हती. काय करावं . ती विचार करु लागली. तसं तिला क्षणातच आठवलं की आपण एखाद्या दासीला पाठवू त्याच्या शयनकक्षात. कामही होईल व आपल्या आईसाहेबही रागावणार नाही.
अंबिकेचा तो विचार. तो विचार तिनं आपल्या बहिणीजवळ बोलून दाखवला. आता विचार होता नेमकं कोणत्या दासीला पाठवावं. कोण हट्टीकट्टी आहे याचा. तशी ती आपल्या बहिणीजवळही बोलू लागली होती त्या दासीबद्दल. तिलाही त्या व्यासाच्या शयनकक्षात पाठविण्यासाठी नव्हे तर हस्तीनापुरातील राजगादीच्या वारसासाठी एक हट्टीकट्टी दासी हवी होती नियोग पद्धतीसाठी. त्यावरच उपाय काढण्यासाठी ती विचार करीत होती. खोल आणि सखोल विचार.
ती एक दासी. अंबिकाची दासी होती ती. तिनं त्याआधी अंबालिकेला विचारलं होतं.
"अशी एखादी दासी आहे का की ती त्या नियोग पद्धतीला तयार होईल."
त्यावर अंबिका म्हणाली.
"नाही. अशी माझ्याकडं कोणतीच दासी नाही. तूच बघ एखादी दासी."
अंबिका चूप बसली. तशी पुन्हा ती विचार करु लागली. तसं क्षणात तिला आठवलं की तिची एक दासी आहे. जी दासी त्या नियोग पद्धतीसाठी तयार होवू शकते.
अंबिकाला तसं वाटताच तिनं त्या दासीला तयार केलं. तशी ती तयार होताच ती दासी व्यासाच्या शयनकक्षात जायला तयार झाली.
ती रात्र. त्या रात्रीचा थरार. ती दासी. ती दासी त्या महाराण्यांची होती.त्या दास्यांना त्या महाराण्यांचं ऐकावंच लागत असे. त्यामुळंच की काय, ती दासी नाईलाजास्तव तयार झाली होती त्या व्यासाच्या कम-यात जायला.
ती रात्र. त्या रात्री ती अंबिकाची एक दासी व्यासाच्या शयनकक्षात गेली होती. तिनं व्यासाला पाहिलं. तो त्याचा अक्राळविक्राळ चेहराही पाहिला. परंतू ना त्या कक्षात गेल्यावर ती व्यासाला घाबरली ना तिनं आपले डोळे बंद केले. तशी अतिशय आनंदात ती रात्र संपली. तशी सकाळ झाली.
सकाळ झाली होती. तशी सकाळ होताच ती दासी त्या शयनकक्षातून परत आली. तशी ती परत येताच अंबालिकेनं तिला विचारलं.
"काय झालं? कशी का गेली रात्र? भीती वाटत होती का तुला?"
ते त्या दोघींचे विचीत्र प्रश्न. तशी ती दासी उत्तरली.
"नाही. मला कशाचीच भीती वाटली नाही."
त्या दासीचं ते उत्तर. तशी तिला अंबिका म्हणाली,
"अगं मग तू डोळे तर नक्कीच लावले असशिल."
"नाही महाराणी. तसं काहीच घडलेलं नाही. मी डोळेही लावले नाही अन् घाबरलीही नाही."
त्या महाराण्यांनी ते उत्तर ऐकलं. तसं उत्तर ऐकताच त्यांना बरं वाटलं. आपला उद्देश सार्थक झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर होता.
रात्र संपली होती. तशी सकाळ झाली होती. तशी सकाळ होताच सत्यवती उतावीळपणानं व्यासाच्या कम-यात गेली. तसं तिनं उद्विग्नतेनं ताबडतोब त्याला विचारलं,
"काय झालं?"
"यावेळी फारच उत्तम योग आला. यावेळी घात झाला नाही कोणताच. यावेळी डोळेही मिटले गेले नाही आणि ती घाबरलीही नाही. परंतू........."
"परंतू काय?"
"परंतू यावेळी तुझ्या पुत्रवधूंपैकी कोणीच आलं नव्हतं."
"मग कोण आलं होतं?"
"एक दासी होती. मात्र तिनं नियोग पद्धतीला दिलेल्या चांगल्या प्रतिसादानंतर होणारा पुत्र हा चांगल्या नीतीचा व हुशार होईल. तो वेद विद्येत पारंगत होईल."
व्यास बोलून गेला व म्हणाला,
"माते, माझे कार्य इथं संपलेलं आहे. मी तू जे सांगीतलं, ते कार्य केलेलं आहे. आता मला मुक्त कर. मला पुनश्च तपश्चर्येला निघायचं आहे."
व्यासाचं बोलणं संपवलं होतं. तशी सत्यवती आणखी चिंताग्रस्त झाली होती. तिच्याकडून झालेले तीनही प्रयत्न विफल झाले होते. कारण तिच्या घरात आता आंधळा, पांगळा पुत्र जन्म घेणार होता आणि तिसरा जो बलवान, नीतीनान पुत्र होता. तो दासीचा पुत्र होता.
ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उजळला. व्यासाचं कार्य संपलं होतं. तसा तो दुस-याच दिवशी तपश्चर्येला निघून गेला होता.

**********************************************************

अंबिका, अंबालिका व ती दासी अशा तिघ्याही जणी गरोदर होत्या. गर्भ ठरले होते. ते गर्भ वाढत चालले होते. तसा तो दिवस उजळला. तिघींनीही तीन गोंडस बाळांना जन्म दिला. तसा त्यांचा नामकरण विधी पार पडला.
ते बाळ लहानाचे मोठे होवू लागले होते. तसं पाहता व्यासांनं सांगीतल्यानुसार धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा होता. पंडू अगदी लहानपणापासूनच आजारी राहात असे तर विदूर हा कोणाच्या भानगडीत राहात नसे. तो अगदी हट्टाकट्टा होता.
ते बाळं लहानाचे मोठे होवू लागले होते. त्यांच्या शिक्षणाचा भार भिष्मानं उचलला होता. त्या शिक्षणातून धृतराष्ट्र बलवान बनला होता. पंडू धनुर्विद्येत पारंगत झाला होता तर विदूर नीतीशास्रात. परंतू ज्यावेळेस हस्तीनापुरातील राजगादी सांभाळण्याचा विषय आला. तेव्हा त्या राजगादीवर पंडू डोळस असल्यानं त्यालाच बसविण्यात आलं. मात्र राजगादीसाठी विदूर दासीपुत्र असल्यानं तो जरी विद्वान, बलवान वा शूरवान असला तरी त्याचा विचार केल्या गेला नाही.
पंडू हुशार आणि डोळस असल्यानं त्याला राजा बनविण्यात आले होते. धृतराष्ट्र आंधळा होता. त्यामुळंच कोणीच त्यानं राजा बनावं असा प्रयत्न केला नाही. त्यामुळंच त्याच्या मनात पंडूच्याबद्दल द्वेष उत्पन्न झाला होता.
पंडू राजगादीवर येताच त्यानं साम्राज्य विस्ताराचं धोरण उभारलं. तसं पाहता त्यावेळेस हस्तीनापुरातील भुभागही वाढला होता. अशातच पंडूमध्ये थोडा अहंकार निर्माण झाला होता.
एकदा ऑगष्ट ऋषीच्या सांगण्यावरुन पंडू शिकारीला गेला. त्या शिकारीदरम्यान त्यानं पाहिलं की एक हरीण वनविहार करीत असून तो अतिशय सुंदर दिसत आहे. तेव्हा हीच चांगली शिकारीची वेळ असल्याचा विचार पंडूनं केला. त्यातच त्यानं आपल्या अंबारीतून बाण काढला व तो त्या हरणाच्या दिशेनं मारला. तोच तो हरीण धाड्कन पडला. तसा तो मनुष्यवाणीनं बोलू लागला.
ती मनुष्यवाणी. ती वाणी ऐकताच पंडू त्या हरणाच्या दिशेनं गेला. तसा तो त्या हरणाजवळ पोहोचताच त्याला तिथं बाण लागलेल्या अवस्थेत किंदम ऋषी दिसले. तशी तिथं त्यांची पत्नीही दिसली. ते दोघंही हरीणीच्या रुपात प्रणयक्रिडा करीत होते.
तो हरीणीचा जोडा. त्यातच त्या ऋषीच्या छातीला बाण लागला होता. तो विव्हळत होता. तसा त्या ऋषीजवळ पंडू जाताच त्यानं ते सर्व दृश्य पाहिलं. परंतू त्याला अहंकार आला असल्यानं त्याला झालेला पश्चाताप जाणवला नाही. त्यामुळंच की काय, त्या ऋषीनं तो प्रकार पाहिला. त्याला वाटलं की मला एवढं लागूनही व मी मरणाच्या द्वारात असूनही या व्यक्तीला किंचीतही पश्चाताप नाही. तसं त्या ऋषीला वाटताच त्यांच्या तोंडून शापवाणी निघाली.
"हे राजन आम्ही मरणाच्या दारात असतांनाही तू अहंकारानं फुलून गेला आहेस. तुला किंचीतही पश्चाताप नाही. त्यामुळंच मी तुला शाप देत आहे की ज्याप्रमाणे आम्ही पती पत्नी प्रणयक्रिडा करीत असतांना तू बाण मारुन आम्हाला प्रणयक्रिडेपासून वंचीत केलेस. तसाच तू देखील आजपासून कोणत्याही स्रिला प्रणयक्रिडेसाठी स्पर्श करु शकणार नाहीस. तू जर तसा प्रयत्न केलाच किंवा तसं करण्याचा प्रयत्न केल्यास तुला त्याचवेळी मृत्यू येईल."
तो किदंब ऋषीचा शाप. तो शाप देताच त्या ऋषीनं देह त्यागला. त्यानंतर त्याच्या चितेवर त्याची पत्नी सती गेली होती.
तो शाप....... ती शापवाणी खरी ठरली होती. त्यातच त्यात उ:शापही नव्हता. त्यामुळेच ते ऋषी मरताच तो शाप लागला व त्या शापानं पंडू राजा खजील झाला. आता तो दिवसेंदिवस खंगत चालला होता. त्याला आता राज्यकारभार करणं बरोबर जमत नव्हतं. शेवटी त्यानं निर्णय घेतला की आता काहीही झाले तरी राजपद सोडायचं व आपण स्वतः वनात जावून उपजीविका करायची. तसा निर्णय घेवून पंडूनं राजपद त्यागलं व तो आपल्या दोन्ही राण्यांना घेवून वनात गेला व त्या वनात तो आपल्या पत्नीसमवेत एक कुटी बनवून राहू लागला होता.
पंडू राजपद सोडून वनात जाताच हस्तीनापुरात हाहाकार माजला. राजगादीवर कोणीच उत्तराधिकारी बसला नसल्यानं हडकंप तर माजणारच. तसा हडकंप माजताच व्यासाला सत्यवतीनं बोलावणं पाठवलं. तसा व्यास येताच त्यानं ठरवलं की हस्तीनापुरातील राजगादीवर धृतराष्ट्रला बसवावं व भिष्मानं राज्यकारभार पाहावा. तसा तो निर्णय संबंधीत मंत्रीगणांना पटला व धृतराष्ट्र आता हस्तीनापुरातील राजगादीवरील राजपद सांभाळणारा राजा ठरला.
आज धृतराष्ट्र राजगादीवर वारस म्हणून बसला होता. तोच राज्याचा कारभार पाहात होता नव्हे तर तो जरी राजा असला तरी त्याचा राज्यकारभार भिष्म पाहात होता.
धृतराष्ट्र राजा बनला. हस्तीनापुरातील सर्वेसर्वा होता तो. तसं पाहता त्याला द्वेष करणं शोभत नव्हतंच. परंतू तरीही तो आपल्या सौतेल्या भावाचा म्हणजेच पंडूचा राग करीत असे. व्यतिरीक्त तो विदूरचाही द्वेषच करीत असे.
धृतराष्ट्रनं राजपद सांभाळलं होतं. त्यातच भिष्म तूयाचा राज्यकारभारही उत्तम प्रकारे करीत होता. परंतू धृतराष्ट्रनं राजपद जरी सांभाळलं असलं तरी एक बाब शिल्लक होती. त्या धृतराष्ट्रला मार्गदर्शन करण्याची. कारण भिष्म त्याचा कितीही राज्यकारभार सांभाळत असला तरी प्रत्यक्षात प्रत्येक वेळी भिष्म त्याच्याजवळ राहणार नव्हता. अशावेळी तो आंधळा असल्यानं आंधळ्याची काठी व्हावी म्हणून धृतराष्ट्रला कोण्यातरी माणसाची गरज होती. तशी चिंता सत्यवतीला वाटत होती.
सत्यवती प्रत्यक्षात प्रत्येक वेळेस व्यासाची मदत घेत असे. तसा आता व्यासही तिला जातीनं विनाअटीनं मदत करीत असे. कारण तो हस्तीनापुरातील वारसांचा पिता बनला होता. सत्यवतीला वाटत होतं की धृतराष्ट्रला राज्यकारभार चांगल्या पद्धतीनं करता यावा. त्यासाठी तिनं मार्ग विचारण्यासाठी व्यासाला बोलावणे पाठवले होते. तसा व्यास सत्यवतीचं बोलावणं येताच धावून आला.
व्यास हस्तीनापुरात येताच सत्यवतीनं आपली कैफियत त्याच्यापुढं मांडली. तसं रुदन मांडताच तिनं त्यावर मार्ग विचारला. त्यावर ती बोलकी झाली. म्हणाली,
"आता पुत्रा तूच यावर काय तो मार्ग सुचव."
सत्यवतीचं ते बोलणं. त्यावर व्यासांनी त्यावर उपाय काढण्याचं आश्वासन दिलं. तसा तो पुन्हा परत आपल्या आश्रमात गेला.
ती हस्तीनापुरातील राजगादी. त्या राजगादीवर वारस म्हणून बसलेला धृतराष्ट्र. तोही आंधळा. तसं व्यासासमोर प्रश्नचिन्हं उभं राहिलं. हे असंच का? त्यावर तो विचार करु लागला. कारण त्याला मार्ग काढायचा होता त्यावर. तो विचार करु लागला. त्यातच त्याला मार्गही सापडला. तो मार्ग होता संजय.
संजय व्यासाचा एक शिष्य. तो इमानदार होता. तसा तो कर्तव्यपरायण. तो आता सर्व विद्या पारंगत झाला होता. त्यातच त्याला त्या विद्येनुसार राज्यकारभारात मदत करता येणंही शक्य होतं.
व्यासांनी ठरवलं. हस्तीनापुरात धृतराष्ट्रला मदत करायला आपण आपला प्रिय शिष्य संजयला पाठवावं. तोच खरा धृतराष्ट्रचा मार्गदाता ठरु शकतो.
विचारांचा अवकाश. तसा वेळ न दवडता व्यास संजयला घेवून हस्तीनापुरात आला. त्यानं सर्व मंत्रीमंडळात तसा प्रस्ताव ठेवला व सर्वानुमते ठरलं की संजयची नियुक्ती राजा धृतराष्ट्रचा निजी सेवक म्हणून करावी. तसं त्याला वैयक्तीक मंत्रीपदही बहाल करावं.
मंत्रीमंडळाचा निर्णय होताच संजयची नियुक्ती धृतराष्ट्रचा वैयक्तीक सेवक म्हणून झाली. तसंच त्याला मंत्रीपदही बहाल करण्यात आलं. त्यावेळेपासून संजय धृतराष्ट्रची सेवा करु लागला. तो आंधळ्या धृतराष्ट्रची काठी म्हणून वावरु लागला. त्यानंतर त्यानं आंधळ्या धृतराष्ट्रला कधीच दगा दिला नाही. तसंच संजयनं धृतराष्ट्र मरेपर्यंत कधीच त्याला अंतरही दिलं नाही.
संजय त्याकाळचा बातमीदार होता असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. कारण त्यानंच इत्यंभूत सर्व प्रकारची माहिती धृतराष्ट्रला दिली होती. कोणी म्हणतात की त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती व त्यानं त्या दिव्यदृष्टीच्या आधारावर एकाच ठिकाणी बसून राजा धृतराष्ट्रला युद्धाची माहिती सांगीतली होती. तर कोणी म्हणतात की त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली नव्हती तर तो सकाळी उठून युद्धमैदानावर जात असे व सायंकाळपर्यंत थांबून सर्व रणांगणाचा आढावा घेत असे. तसंच तो इतिवृत्तांत सायंकाळी घरी येवून ब-याच रात्रीपर्यंत धृतराष्ट्रला सविस्तर तसेच विस्तारपूर्वक सांगत असे.
संजय केवळ त्या काळातील बातमीदार नव्हता तर तो एक योद्धाही होता. सुरुवातीलाच त्यानं धृतराष्ट्रला सल्ले देवून त्यांचं मन युद्धापासून पालटविण्थाचा प्रयत्न केला. परंतू धृतराष्ट्र आंधळा होता ना. तेवढी त्याला बुद्धी जरी असली तरी त्या बुद्धीचा वापर करुन त्यानं ते युद्ध रोकण्याचा प्रयत्नच केला नाही. द्युतक्रिडेत पांडव हारताच व ते तेरा वर्षाच्या शिक्षेसाठी वनात जाताच संजय महाराज ध्रृतराष्ट्रला म्हणाला,
"महाराज, आतातरी पांडवाना थांबवा. त्यांना शिक्षेला पाठवू नका. नाहीतर याचे परिणाम गंभीर पाहायला मिळतील." त्यावर महाराज ध्रृतराष्ट्र म्हणाले,
"माझी मुलं कुठं ऐकतात माझं."
धृतराष्ट्रची मुलं. ती मुलं लहानपणापासूनच मोठ्या प्रेमात वाढली होती. अगदी लहानपणापासूनच त्या मुलांमध्ये द्वेष भरला जात होता. म्हटलं जात होतं की पांडव काही तुझ्या काकाची म्हणजे पंडूची मुलं नाहीत. तुझ्या काकांना तर शाप मिळाला होता किंदम ऋषींचा. शाप असा होता की तो ज्याही स्रिला स्पर्श करेल. त्यावेळी तो मरण पावेल. त्यामुळंच त्यानं आपल्या पत्नीलाही अजिबातच हात लावला नाही. एकदा जेव्हा तो त्याची पत्नी माद्री सुंदर दिसत असतांना तिला जेव्हा त्यानं स्पर्श केला, तेव्हा तो मरण पावला. मग असा शाप असतांना व विणा त्यानं स्री असलेल्या आपल्या पत्नींनाही स्पर्श केलाच नाही. तर,त्यांना मुलं झालीच कशी? हेच बिंबवलं होतं लहानपणापासूनच धृतराष्ट्रच्या मुलांच्या मनात आणि तेही बिंबविणारा शकूनी. जो त्यांचा मामा होता.
शकुनी........शकुनीनं आपल्याच भाच्यांच्या मनात का द्वेष निर्माण केला असावा? हा एक गुढच प्रश्न आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
गांधारीला ती लहान असतांना एक शाप मिळाला होता. त्या शापानुसार तिचा विवाह केल्यास तिचा पती मरण पावेल असा तो ऋषीचा शाप. त्याचं कारण होतं की ती लहान व बाळबोध असतांना व आपल्या दास्यांबरोबर वनात फिरायला गेली असतांना जे ऋषी तपश्चर्या करीत होते. त्यांची तपश्चर्या तिनं भंग केली होती. त्यावर ते ऋषी क्रोधीत झाले होते. तरीही ते ऋषी तिला समजावीत होते. परंतू त्यांचं काहीएक ऐकून न घेता त्यावर त्या ऋषींना उलट उत्तरे देवून त्यांची गांधारीनं मस्करी केली व थट्टा उडवली. बदल्यात तिनं त्या ऋषींचं ऐकून न घेतल्यानं त्यांनी तिला शाप दिला. तो शाप. तो शाप सर्व राज्यांना माहीत होता. त्यामुळंच तिचा विवाह जुळत नव्हता.
ती शापवाणी. ती शापवाणी भिष्माला माहीत होती. परंतू त्यांनी कोणालाच सांगीतलं नाही. कारण आंधळ्या धृतराष्ट्रला कोणीही मुलगी द्यायला तयार नसल्यानं व प्रत्यक्ष गांधारी त्याला मिळत असल्यानं भिष्मानं धृतराष्ट्रला सांगीतलं नाही. कारण त्यांना वाटत होतं की जर ही गोष्ट धृतराष्ट्रला माहीत झाली तर तो तिच्याशी विवाह करणार नाही. त्यापेक्षा आपण मौनच बाळगलेलं बरं. तसे ते गांधारीला पाहायला गेले.
गांधारी अतिशय सुंदर होती. ती धृतराष्ट्रच्या समोर बसली होती. बाजूला तिचा भाऊ शकुनी बसला होता. त्यावेळेस तिनं पाहिलं की तिचा होणारा पती आंधळा आहे. तसं तिला वाटलं की आपण एवढे सुंदर तरीही आपल्याला चांगला पती नशिबात नाही. कारण तो शाप.
विचारांच्या चक्रव्यूहात फसली होती ती. तसं पाहता परीवाराच्या इच्छेपुढे ती चूप बसली होती. गांधारीची भावना. त्यातच तिच्यासमोर आंधळा धृतराष्ट्र होता. तसा तिनं नकार दिला नाही.
पाहुणे तिला पाहून गेले होते. त्यानंतर परिवारात चर्चा झाली. चर्चेअंती ठरलं की आपण आपल्या मुलीला धृतराष्ट्रला द्यायची. कारण आपल्या मुलीला शाप मिळाल्याकारणानं आपल्या मुलीला कुठूनही वर उतरत नाही.
तो परिवाराचा विचार. त्या विचारापुढं गांधारीचं काहीच चाललं नाही. तसंच शकुनीचंही काहीच चाललं नाही. त्यानं तर विरोधच केला होता तिच्या विवाहाला. परंतू त्याचं काहीच चाललं नसल्यानं तो चूप बसला.
गांधारीचा विवाह झाला होता. तिला ऋषींचा शाप असल्यानं व तिचा पहिला पती मरणार आहे असं माहीत असल्यानं त्यावर परिमार्दन म्हणून गांधारीचा विवाह कोणी म्हणतात की एका बकरीशी करण्यात आला तर कोणी म्हणतात एका गाढवाशी. त्यानंतर तो प्राणी मरण पावला. तद्नंतर तिचा विवाह धृतराष्ट्रशी लावण्यात आला.
गांधारीचा विवाह झाला होता. ती हस्तीनापुरात रममाण झाली होती. तसे काही दिवस गेले. काही दिवसानंतर संपूर्ण हस्तीनापुरात माहीत झालं की गांधारकडील लोकांनी आपल्याशी बनवाबनवी केलेली आहे. ती बनवाबनवी क्षमेच्या लायक नाही. ती गोष्ट माहीत होताच धृतराष्ट्रला अशा बनवाबनवीमुळ गांधार प्रदेशाचा राग आला होता. तो राग एवढा तीव्र होता की त्या रागामुळं त्यानं गांधार प्रदेशावर आक्रमण केले व त्या राज्याचा राजा सुबलसह सर्व परिवाराला कैद केले.
हस्तीनापुरातील राजा धृतराष्ट्रनं गांधार प्रदेशाला नेस्तनाबूत केले नव्हे तर त्या अख्ख्या परिवाराला कैदेत टाकलं. तसंच त्यांचेवर अनन्वीत अत्याचारही केले.
कैदेत पडले होते गांधारचे लोकं. ती कैद अजूनही गांधारीला माहीत झाली नव्हती. अत्याचाराची कारणमिमांसा अशी होती की ते अत्याचार सहन होत नव्हते. त्यांना जेवन मिळत नव्हतं. म्हणतात की एका एका व्यक्तीला एकच अन्नाचा कण खायला मिळायचा. त्या शकुनी आणि त्याच्या त्या एका अन्नाच्या कणात शकुनीचं आणि त्याच्या परिवाराचं भागत नव्हतं. त्यामुळंच परिवार विचार करीत होता की राज्यातील असा एक व्यक्ती जगायला हवा की जो हस्तीनापुरातील कार्यकर्तृत्वाचा बदला घेवू शकेल.
शकुनी.......शकुनी लहानपणापासूनच हुशार होता. कुटील डावातही पारंगत होता. तो लहानपणापासूनच चौसरचे डाव खेळत असे. तसं पाहता परिवारवाले उपाशी राहात. परंतू शकूनी जगला पाहिजे म्हणून त्याला अन्न देत. तसंच त्याला दररोज आठवण देत असत की त्याला संपूर्ण हस्तीनापुराला नेस्तनाबूत करायचं आहे नव्हे तर बदला घ्यायचा आहे.
शकुनीला तसं पाहता त्याच्या बहिणीचा विवाह झाला, तेव्हापासूनच हस्तीनापुरचा राग यायचा. तशी त्यानं आपल्या पित्याला कल्पनाही दिली होती. परंतू त्याचे पिता ऐकले नसल्यानं आज त्यांच्यावर अशी पाळी आली होती. त्यामुळं शकुनीला वाटणं साहजीक होतं की जर त्याच्या परिवारानं आपल्या बहिणीचा विवाह केला नसता तर आज जे दिवस दिसत होते. ते दिवस दिसला नसते. तसा त्याच्या मनात राग वाढतच चालला होता.
शकुनी जगत होता ते सा-यांच्या वाट्याचं अन्न खावून. ते परीवारवाले जगवत होते त्याला बदल्याच्या भावनेनं प्रेरीत करुन. तशी त्याच्या मनात ती त्या बदल्याची आग तेवत राहावी म्हणून परिवारानं त्याचा एक पाय तोडला होता. त्यांना वाटत होतं की ज्याला जगवलं त्या शकुनीनं बदल्याची भावना विसरु नये. त्यानं बदला घ्यावाच. त्यामुळंच त्याचा पाय तोडला गेला.
सारे परिवारवाले मरण पावले होते. त्याचबरोबर त्याचे वडीलही. परंतू वडीलांनी मरतासमयी त्याचेकडून वचन घेतलं होतं की बदला घेणार. त्या हस्तीनापूरकडून बदला घेणार आणि शकुनीनंही आपल्या पित्याला तशा स्वरुपाचं वचन दिलं होतं.
परिवारवाले सर्वजण मरण पावले होते. आज शकूनी एकटाच वाचला होता. त्याच्या मनात बदल्याची आग धुमसत होतीच. तसं त्यानं त्याचा बाप मरताच त्याच्या हाडापासून सोंगटीचे फासे बनवले होते. त्यानं आपल्या कलेनं संपूर्ण हस्तीनापुरला नेस्तनाबूत करण्याचा निश्चय मनात केला होता.
शकुनीच्या परिवारातील सर्व जण मरण पावले होते. तसा शकुनी एकटाच वाचला होता. तसं त्याला सोडून देण्यात आलं कैदेतून. तसा तो एकदाचा प्रसंग घडला.
गांधारीला मुलं झाली होती. तशी ती मोठी होत होती. त्या वाढत्या वयाबरोबर त्या मुलांवर संस्कार करणेही आवश्यक होते. ते पाहून एकदा गांधारीनं धृतराष्ट्रला म्हटलं,
"आर्य, मिही डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि आपणही. आपण स्वतःला डोळे आणू शकत नाही आणि मिही आज डोळ्याला बांधलेली पट्टी काढू शकत नाही. आता आपल्याला मुलं झाली आहेत. त्यांचेवर संस्कार करायचे आहेत. तेव्हा आर्य आपण असे आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठीच कोणाची तरी नियुक्ती करणे आवश्यक आहे. तेव्हा त्यासाठी आर्य आपण तत्परतेनं अशी नियुक्ती करावी म्हणजे झालं."
धृतराष्ट्रनं गांधारीचं म्हणणं ऐकलं. तसे ते म्हणाले,
"महाराणीसाहेबा, आपण यावर उपाय सुचवावा."
"मला तर,कोणताच उपाय दिसत नाही आहे. एक काम कर. तूच सूचव ना उपाय."
"उपाय........माझ्या भावाला बोलवू काय?"
गांधारीनं भावाचंनाव काढताचतो वैतागला. परंतू चेह-यावरअसे कोणतेचभाव दिसून देतातो म्हणाला,
"नाही. आता ते शक्य नाही."
"का? का शक्य नाही?"
"तुला माहीत नाही का की त्यांच्याशी आपलं शत्रुत्व आहे ते."
"आहे माहीत. परंतू माझा भाऊ तसा नाही. मी ओळखते त्याला. तो तर शत्रुत्व विसरलाही असेल. तुम्हीच घेवून बसलात आर्य शत्रुत्व."
"ठीक आहे. तुला जसं वाटते तसं कर. परंतू त्याचेव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही का? भिष्म आहेत ना. माझे मोठे पिता."
"यावर दुसरा उपाय नाहीच. भिष्म आहेत. परंतू ते राज्याचा राज्यकारभार सांभाळतात. शिवाय ते कार्य करीत असतांना त्यांचेजवळ पुरेसा वेळ नाही. मग ते राज्यकारभार पाहतील की आपल्या बाळांकडे लक्ष देतील. त्यासाठी असा विश्वासू व्यक्ती हवा की नाही?"
"हो पण त्यानं कोणता विश्वास ठेवला. ते प्रकरण गुप्त ठेवलं पतीमरणाचं. माझ्या मृत्यूसाठी डाव रचला होता ना तो. बरं झालं माझ्या मोठ्या पित्यांना ते माहीत होतं तर. त्यांनीच उपाय सुचवला व तुझा विवाह एका प्राण्याशी लावून दिला. म्हणून मी वाचलो. तुला मिळालेल्या शापानुसार जर त्या प्राण्याशी तुझा विवाह केला नसता तर मी वाचलो असतो का? मी केव्हाच यमसदनी पोहोचलो असतो. म्हणूनच टाकलं मी पुर्ण गांधारला तुरुंगात. त्यात माझं काय चुकलं?"
"आर्य, अहो विचार करा की तुम्ही आंधळे होते. तुम्हाला साधी आंधळीच मुलगी विवाहासाठी मिळत नव्हती. त्यात डोळस कुठून मिळणार! विचार करा आणि आभार माना की मी तुम्हाला मिळाले. नाहीतर आयुष्यभर तुम्हाला अविवाहितच राहावं लागलं असतं. अन् हं, माझ्या शापावर काही ना काही उपाय नक्कीच निघाला असता."
ते गांधारीचं बोलणं. तसं बोलणं होताच धृतराष्ट्र भडकला व ओरडत म्हणाला,
"तू तर डोळस होती. मग कशाला बांधली डोळ्याला पट्टी?"
"सुंदर होती ना. अति सुंदर होती. माझे डोळेच एवढे सुंदर होते की तसे जगात डोळे नसावेत. परंतू मला मी तेवढी सुंदर असूनही तुमच्याशी विवाह करावा लागला."
"डोळ्याला पट्टी का बांधली तेवढं सांग?"
"मी जर माझ्या डोळ्याला पट्टी बांधली नसती तर माझं मन सतत तुम्हाला पाहून मलाच कोसत राहिलं असतं हे विसरु नका. म्हणून बांधली पट्टी. परंतू आता विचार आहे. आता आपल्या बाळाचा विचार आहे. वाटतं की आपल्या बाळावर असा जवळचा कोण संस्कार करणार. बोलवू का मी माझ्या भावाला?"
"मी जेष्ठांना विचारतो."
"कोणत्या जेष्ठांना विचारता?"
"मोठे पिता भिष्म, आचार्य द्रोण अन् विदूर."
ते धृतराष्ट्रचं बोलणं. तशी ती म्हणाली,
"जेष्ठ काय खाक तुम्हाला सल्ले देणार तुमच्या लेकराबद्दल? लेकरं तुमचे की त्यांचे. आर्य ते द्वेषच करणार तुमच्या मुलांचा. कोणाचा सल्ला घेणार त्या भिष्मांचा. अहो, ते तुमच्या आईमुळं राजगादीवर बसू शकले नाहीत. म्हणून तुम्ही बसलात. ते राजगादीवर बसू शकले नाहीत. याचं काही तर शल्य असेल ना त्यांच्या मनात. अन् ते विदूरजी. त्यांची इच्छा नसेल का पांडूनं राजपाट सोडल्यावर राजा बनायची. वाटत असेलच ना की धृतराष्ट्र आंधळे आहेत आणि पांडूला शाप आहे. आता मीच राजा बनणार. तसं पाहता ते दासीपुत्र आहेत. त्यांचा सल्ला का घ्यायचा? अन् तो द्रोण. त्यांना फक्त शिकविण्यात पुरतंच ठेवावं. राज्यकारभारात ढवळाढवळ करु देवू नये. आता माझं ऐका. मी आपल्या भावाला हस्तीनापुरात बोलावते म्हणजे बोलावते. आता तुम्ही नाही म्हणू नका."
ती गांधारीची इच्छा. त्या इच्छेपुढे धृतराष्ट्रचं काहीही चाललं नाही. त्यानंतर तिनं गांधारला निरोप पाठवला आणि सांगीतलं की निरोप मिळताच शकुनीनं ताबडतोब निघून यावं.
हस्तीनापुरातून गांधारला निरोप आला होता. तसं पाहता तो निरोप ऐकून गांधार नरेश शकूनी फारच खुश झाला होता. तसा तो निरोप ऐकताच शकुनीच्या मनात बदल्याची भावना उन्मळून आली व त्यानं ठरवलं की आता जावं हस्तीनापुरला आणि पुर्ण हस्तीनापुरला धुळीस मिळवावं व बदला घेवून आपल्या आईवडीलांचं आणि आपल्या प्रजाजनांचं स्वप्न पुर्ण करावं.
तो कुटील डाव. तो डाव ना गांधारीला माहीत होता, ना धृतराष्ट्रला. सगळे कसे बेसावध होते. शकुनी इथं हस्तीनापुरात येवून असाही धुर्त चाली चालेल वा डाव रंगवेल हेही काही माहीत नव्हतं. त्यामुळंच ते माहिती न पडल्यानं त्याला हस्तीनापुरात बोलावलं गेलं होतं.
प्रजाजनांचं ते स्वप्न. ते स्वप्न पुर्ण करण्याचा तो विचार नव्हे तर हस्तीनापुरातून स्वतःवरील झालेल्या अत्याचाराच्या बदला घेण्याचा तो विचार. तशी शकूनी खुश झाला. तसा खुश होताच त्यानं गांधारच्या राजगादीवर आपल्या बाळाला बसवले. ज्याचं नाव उलूपी होतं व तो त्या राजटाटावरुन संन्यास घेवून हस्तीनापुरात आला. सोबत असलेला त्याचा तुटलेला पाय त्याला वारंवार बदल्यासाठी खुणावत होता. बदला घेण्यासाठी तो पाय इशारा करीत होता.

**********************************************************

तो हस्तीनापुरातील राजमहल. त्या राजमहालात शकुनी स्थिरावला होता. ती वेळ हस्तीनापुरसाठी आता योग्य राहिली नव्हती.
गांधारीची मुलं लहान होती. त्याचबरोबर कुंतीचीही मुलं लहान होती. ती सोबत सोबत एकमेकांसोबत खेळत असत. त्यांच्यात कधी कोणत्याही कारणांवरुन किरकोळच भांडणं व्हायची. त्यातच ती मुलं ती भांडणं आपल्या जवळचा असलेल्या शकुनीजवळ आणायची. तेव्हा शकुनी ती भांडणं मिटवीत नसे. तो त्यात अजून अंगार टाकत असे. तो त्या मुलांच्या लहानपणापासूनच गांधारीच्या मुलांची बाजू घेत असे ती भांडणं वा तंटे सोडवितांना आणि कुंतीच्या मुलांना वाईट ठरवत असे. यातूनच हळूहळूच पांडव व कौरवात लहानपणापासूनच द्वेष भडकू लागला. तसं पाहता शकुनी चाणाक्ष बुद्धीमत्तेचा होता. तो ओळखून होता की ही कुंतीची मुलं पाच जरी असली तरी यांना विलक्षण बुद्धीमत्ता आहे व हे बुद्धीमत्तेच्या जोरावर कौरवांचा सहजच पडशा पाडू शकतील.
सर्व मुलं, मग ती कुंतीची का असेना वा गांधारीची. ती सर्वजण वेदविद्येत पारंगत होती. मात्र त्यांना चौसर विद्या येत नव्हती. ती चौसर विद्या फक्त कौरवांना शकुनी लहानपणापासूनच शिकवीत होता. ती गांधारीची मुलं, ज्या अपेक्षेनं गांधारीनं शकुनीला बोलावलं होतं गांधारवरुन. शकुनीकडून संस्कार करुन घेण्याचा उद्देश होता तिचा. ती अपेक्षा फोल ठरली होती. शकुनी गांधारीच्या मुलावर संस्कार करण्याऐवजी कुसंस्कार करीत होता. ती बाब इतर सर्वांच्या लक्षात आली होती. परंतू त्याबद्दल कोणीच बोलण्याचं धाडस करीत नव्हतं. एखाद्यानं तसं धाडस केल्यास त्याची एकांतवासात गांधारी चांगलीच खरडपट्टी काढत असे.
धृतराष्ट्र आंधळा, त्याचबरोबर गांधारीही आंधळी. एखाद्या वेळेस कोणी शकुनीबद्दल कुरकूर केल्यास वा कुरघोडी केल्यास ती त्या शकुनीला बोलवत असे व शकुनीला जाब विचारत असे. परंतू तो तिच्याजवळ आपल्याबद्दलचा संभ्रम एवढ्या सफाईनं सांगत असे की तिला त्याचेवर विश्वास ठेवावाच लागत असे. मात्र तिही डोळ्याला पट्टी बांधून असल्यानं तिच्या लक्षात शकुनीचा विश्वासघात आला नाही. त्यातच तिच्या बाळाच्या अगदी लहानपणापासूनच हस्तीनापुरातील कुळविनाशाची चिन्हं दिसायला लागली होती.

इतर रसदार पर्याय