एक पडका वाडा - भाग 8 - (अंतिम ) Kalyani Deshpande द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक पडका वाडा - भाग 8 - (अंतिम )

त्या दागिन्यांचा उजेड सर्वत्र पसरला. सगळी अंधारलेली खोली प्रकाशाने लख्ख उजळली.

"कालकेतू बाबा हे एवढे दागिने इथे कसे आले आणि ह्याचं आता काय करायचं?",माझ्या व रक्षाच्या बाबांनी त्यांना विचारलं

काळकेतू बाबांनी ती संदुक पूर्ववत बंद केली आणि म्हणाले,"पोलिसांना ह्याची खबर द्यावी लागेल आणि सरकारी मालमत्तेत ह्याची भर पडेल."

त्या खोलीतून बाहेर पडण्याचा आणखी कुठे मार्ग आहे का हे काळकेतू बाबा बघू लागले. त्या खोलीला एकही खिडकी नव्हती फक्त उंचावर छोटे छोटे झरोके होते. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. त्यामुळे आम्हा सगळ्यांना त्याच भुयारी मार्गाने जाणं क्रमप्राप्त होतं. खुंटीवर लटकलेल्या पिशवीत नाग एकसारखा वळवळत होता. काळकेतू बाबांनी तो नाग असलेली पिशवी घेतली आणि आम्हाला त्यांनी खुणेनेच त्यांच्या मागे चलायला सांगितलं. परंतु तो भुयारी मार्ग बंद होता आणि तो काही केल्या उघडता येत नव्हता. त्यामूळे आम्ही सगळेच चिंतेत पडलो.

"मला वाटते हा भुयारी मार्ग फक्त एकतर्फा आहे ह्यात परतीचा मार्ग नाही",काळकेतू बाबांचा धीरगंभीर आवाज घुमला.

"बापरे! मग आपण आता बाहेर कसं जायचं",मी एकदम म्हंटल.
"तेच आपल्याला सगळीकडे बघावं लागेल कुठे न कुठे इथून बाहेर पडण्याची गुप्तकळ असेलच",काळकेतू बाबांनी पुन्हा ती नाग असलेली पिशवी त्या खुंटीला लटकवली.

माझी सारखी नजर त्या वळवळणाऱ्या नागाच्या पिशवीकडे जात होती आणि अचानक एक विचार माझ्या डोक्यात आला.

"मला वाटते कदाचित ती खुंटीच तर गुप्तकळ नसेल?",मी असं म्हणताच सगळ्यांनी चमकून माझ्याकडे बघितलं.

माझं काही चुकलं की काय असं मला वाटलं तेवढ्यात काळकेतू बाबा म्हणाले,"पोरी तू म्हणते ते बरोबर असू शकते"
त्यांनी ती पिशवी बाजूला काढली आणि ती खुंटी ओढून बघितली आणि काय आश्चर्य त्या संदुक च्या उजवीकडे एक गुप्तमार्ग खुला झाला. आम्हा सगळ्यांचे डोळे आनंदाने चमकले.
आम्ही सगळेजण हळूहळू त्या भुयारी मार्गाने जाऊ लागलो. बरंच अंतर गेल्यावर आम्ही वाड्याच्या अंगणात बाहेर पडलो आणि ते भुयारी दार पूर्ववत बंद झालं. काळकेतु बाबांनी त्या नागाला त्याच्या निलमणी सकट दूर सोडून दिले.
"तो निलमणी का नाही काढून घेतला बाबा?",रक्षाचे बाबांनी विचारलं

"त्या निलमण्यातच त्या नागाचा जीव होता म्हणून तो निलमणी काढला नाही तो जर काढला असता तर नाग हकनाक मेला असता.",काळकेतू बाबा म्हणाले.

रक्षाला बघून रक्षाच्या आईच्या जीवात जीव आला. रक्षा तिच्या आईला जाऊन बिलगली. काळकेतू बाबांचे दोन शिष्य बाहेर उभे होते. त्यांनी त्या दोघांना काहीतरी आदेश दिला. ते वटवाघळे त्याच खोलीत तसेच निपचित पडून होते आणि दुसऱ्या खोलीत ते दहा सांगाडे तसेच खोलीच्या मध्यभागी वर्तुळाकार बसलेले होते.

काळकेतू बाबांच्या शिष्यांनी भराभर आदेशानुसार अग्निकुंडाची व्यवस्था अंगणाच्या मध्यभागी केली. अग्निकुंड पेटवण्यात आला.
काळकेतू बाबा आणि त्यांचे दोन शिष्य त्याभोवती बसले. काळकेतू बाबा आणि त्यांचे शिष्य काही मंत्र म्हणत होते आणि काय आश्चर्य एकेक करून असे सगळे वटवाघळे अग्निकुंडाजवळ आले आणि त्यांनी त्यात प्रवेश केला. सगळे वटवाघळे जाळून राख झाले. पाच पांढऱ्या आकृत्या आकाशाकडे जाताना दिसल्या.

त्यानंतर त्यांनी आणखी मंत्रोच्चार केले आणि बाजूच्या खोलीतील दहाही सांगाडे अग्नीकुंडाजवळ आले त्यांनीही एकेक करून अग्निप्रवेश केला आणि त्यातून दहा पांढऱ्या आकृत्या आकाशाच्या दिशेने वर वर जाऊन दिसेनाशा झाल्या. आम्ही सगळेजण अनिमिष नेत्राने ते सगळं बघत होतो.

"आता हा वाडा पिशाच्चमुक्त झाला आहे. सगळ्यांनी आता आत आलं तरी चालेल",काळकेतू बाबा म्हणाले.

सगळेजण अंगणात येऊन बसले.

"बाबा हा काय प्रकार आहे हे वटवाघळे हे सांगाडे कोण होते? त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. ",मी विचारलं

"मला जी माहिती माझ्या पूर्वजांकडून मिळाली ती मी तुम्हाला सांगणार आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी ह्या वाड्यात कवडीमल नामक सावकार राहत होता. तो खूप कंजूष आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याच्या कंजूशपणाला कंटाळून त्याचे बायको मुलं त्याला सोडून गेले होते. तो आणि त्याचे नोकर ह्या वाड्यात राहायचे. तो गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपायचा.
एकदा काही शेतकऱ्यांनी त्याच्याकडे जाऊन त्यांच्या जमिनी मागितल्या. त्यांनी त्याचे सगळे कर्ज फेडले होते तरीही तो त्यांच्या जमिनी द्यायला तयार नव्हता.
शेतकरी सुद्धा मागे हटायला तयार नव्हते कारण त्या जमिनीवरच त्यांचा संसार सुरू होता त्यामुळे जोपर्यंत जमिनीचे कागदपत्रे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वाड्यातून बाहेर जाणार नाही असे ते दहा शेतकरी म्हणाले.
शेतकरी ऐकत नाही म्हंटल्यावर सावकाराच्या क्रूर डोक्यातून एक युक्ती निघाली त्याने सगळ्या शेतकऱ्यांना त्या डाव्या खोलीत बसायला सांगितलं आणि स्वतःच्या नोकरांना सांगून ती खोली नकळत बंद केली आणि त्यात विषारी धूर सोडून दिला ज्यामुळे ते दहाही शेतकरी तत्क्षणी मेले. ते सांगाडे म्हणजे त्यांचे अतृप्त आत्मे होते. सावकाराचे चार क्रूर नोकर आणि पाचवा स्वतः सावकार हे मेल्यानंतर पिशाच्च झाले आणि वाटवाघळांच्या रुपात ते ह्या वाड्यात राहू लागले.

आज त्यांच्या मुक्तीची वेळ आली होती. आज ते सगळे त्यांच्या पिशाच्चयोनीतुनमुक्त झाले. ",एवढं सांगून काळकेतू बाबा थांबले.

"पण काळकेतू बाबा जर तुम्हाला हे माहिती होतं तर मग तुम्ही आधीच हा वाडा पिशाच्चमुक्त का केला नाही?",सगळ्यांनी त्यांना विचारले.

"प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ दयावी लागते. मला नियम आहे की कोणी मला ह्या कामासाठी बोलावलं तरच मी हे करू शकतो स्वतःहुन मला करण्याची आज्ञा नाही",त्यांनी वर आकाशाकडे अंगुलीनिर्देश करत म्हंटल.

त्यानंतर त्या वाड्यातला खजिना काळकेतू बाबांच्या मदतीने सरकारने जप्त केला. तिथल्या तळघरातल्या सापांना सर्पमित्रांकडे सुपूर्द करण्यात आलं आणि तो महाकाय वाडा पाडून तिथे एक सुंदर बगीचा निर्माण करण्यात आला. तिथे खेळण्यासाठी मोठं पटांगण उपलब्ध केलं. सगळ्या मुलांना तिथे मुक्त खेळण्यासाठी छान जागा झाली. वयस्कर लोकं तिथे सकाळ संध्याकाळ फिरू लागले. तिथे एक मंदिर बांधण्यात आलं. वाड्यातला खजिना वापरून सरकारने गावातल्या गरीब शेतकऱ्यांसाठी अनेक योजना निर्माण केल्या.

अशा तर्हेने पडक्या वाड्याचे रहस्य संपुष्टात आले.
◆◆◆◆◆◆◆◆समाप्त◆◆◆◆◆◆◆◆◆◆