पण कुणी नवशिका, येरा गबाळा असेल तर सरळ नाही म्हणायचे.काही भजनी बुवा तर मृदंग वाजवावा अशा आवेशात पेटीच्या सुरांवर खडा-खडा बोट मारायचेअसल्या वाजप्यांच्या हाती सोन्यासारखं हत्यार सोपवायला भाऊ राजी नसत. आम्हा पोराबाळांची तर पेटीला हात लावायची बिशादच नव्हती.
सातवीला पी.एस्सी – केंद्राची परीक्षा व्हायची. त्यावेळी या परीक्षेला मोठी प्रतिष्ठा. चार-पाच शाळांसाठी एक केंद्र असायचं. पी.एस्सीला ६८%गुण मिळवून मी केंद्रात पहिला आलो. हेडमास्तर पडवळ रिझल्ट घेऊन आल्यावर मुद्दामआमच्या घरी माझ कौतुक करायला येऊन गेले. पेळप केंद्रात पावणे दोनशे मुलांमध्ये मीपहिला आलो. गुणांच्या टक्केवारीत तालुका स्तरावर माझ्यापेक्षा चार गुण अधिक मिळविणारी देवगडची कुणीतरी मुलगी पहिली आणि माझा नंबर दुसरा आला. पडवळ गुरुजी चहा पिऊन उठून गेले अन् भाऊनी मला हाक मारली. बहुतेक माझा पहिला नंबर हुकला म्हणून तासडम् पट्टी होणार या भीतीनच मी मान खाली घालून भाऊंसमोर उभा राहीलो.
माझ्या पाठीवरुन मायेने हात फिरवीत भाऊ म्हणाले, “अशोकss तुझ्या यशामुळे माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं. माझंचनव्हे तर घराण्याच नाव तू उज्वल केलस. मी खूश झालो बघ तुझ्यावर. मी तुला एक बक्षिसदेणारेय्” भाऊ काय बक्षिस देतात हे ऐकायला माझे प्राण कानातगोळा झाले. “तू चोरुन पेटी वाजवतोस हे समजल मला. मी लहानअसताना नारायण सुताराकडे चोरुन पेटी वाजवायला जायचो उठसूट तोच नाद. इथेशास्त्रशुद्ध शिकवणारा कोणी नाही. रागदारी म्हणशील तर मला शब्द सुद्धा कळत नाय पणमाझा हात साफ आहे. मी कीर्तन, नाटक वाजवतो. आचरेकर, बापट, पटवर्धन ही गवई मंडळी मला त्यांच्या साथीला बोलावतात. उत्सवाला पेटीवाल्यासाठी अडत नाही. माझी ऐपत नसताना व्याजाने पैसे काढूनमी पायपेटी घेतली. ते असो... मुलांपैकी कुणीतरी ही कला घ्यावी असं मलाही वाटतं म्हणून तू चोरुन पेटी वाजवतोस हे कळल तरी मी कानाडोळा केला. दुसर म्हणजे हा फंद तू अभ्यास सोडून करीत नाहीस म्हणूनही मी ओरडलो नाही कधी तुला....”
“आज पासून हा अरगण तुझा ! ही पेटी म्हणजे आमच्या घराण्याची दौलत आहे. तूशीक पेटी. तुला शिकवण्याएवढं कसब माझ्याकडे नाही. मुळात माझाच कोण गुरु नाही. मीदुसऱ्याला काय शिकवणार? फक्त बोट कशी फिरवायची त्याची गत दाखवीन तुला. तुझं वाजवणं चुकल तर बरोबर काय हवं तेवढ वाजवून दाखविन बाकी तुला आवडआहे... तुझा मार्ग तू शोधून काढ. पण एक लक्षात ठेव... हा फंद भिकेला लावणारा आहे.पेटी वाजवून पोट भरायच नाही. चरितार्थासाठी काही लौकिक ज्ञान, विद्या, पदवी मिळवायला हवी. मी हे अनुभवातून सांगतोय्... नाटक-किर्तन वाजवायला, गायकीच्या बैठकींना साथद्यायला आठ- दहा दहा कोस तंगड तोड मी करतो. पण प्राप्ती म्हणशील तर शून्य !मंदिरात मानाचं श्रीफळ तरी मिळतं.... नाटकवाले ते सुध्दा देत नाहीत. जनलोकात वाहवा मिळते.... चार जाणकार माणंस मान देतात.... बस्स !
माझा संसार निभावून मी ही हौस केली. पेटीच्या नादापायी धड सातवी नाही पूर्ण झाली माझी ! त्यावेळी मी पी.एस्सी. पास झालो असतो तर सहज कुठे तरी शाळा मास्तरम्हणून लागलो असतो. दरमहा हुकमी पगार घेतला असता.... तू मात्र एक पथ्य पाळ !चरितार्थासाठी भक्कम साधन मिळवायच हे ध्येय ठेऊन खूप शीक... पेटीचा व्यासंग विद्यासांभाळून जोपास ! केवळ पेटीचा नाद धरुन आयुष्याची माती करुन घेऊ नकोस एवढंच पथ्यपाळ....!!” मग भाऊनी पेटी उघडली आणि मला म्हणाले,“बस.... मी तुला प्रारंभिक माहिती देतो." मी भीत भीतच पेटीवर बसलो आणि मला हातखंडा असणार 'बाळकृष्ण चरणी लक्ष लागोरे'हे पद वाजवून दाखवलं.
"छान.... हात हलका आहे तुझा.... सुरांची समज सुद्धा बरी आहे."भाऊंनी दाद दिली. त्यांनी मला पेटीतली सप्तकं, काळ्यापांढऱ्या पट्ट्या सुरांवरुन चपरवल बोटं फिरवायच कसब त्यासाठी कोणत्या बोटांचा कोणत्या सुरांवर वापर करायचा, आंगठा कसा वापरायचा गाणाऱ्याचीपट्टी कशी ओळखायची, डाव्या हाताने वाजवायचा सराव कसा करायचाअशा पेटी वादनातल्या मख्ख्या दाखवल्या. पुढचे पंधरावीस दिवस नित्यनेमाने सराव व्हायचा. खर्जापासून तो तारसप्तका पर्यंत दोन्ही हातानी सुरावली घोटून घेतली.पेटीतल्या साडेतीन सप्तकांमधल्या काळ्या पांढऱ्या पट्टीतल्या प्रत्येक सुराची स्वतंत्र ओळख, बोटाचा दाब देऊन सुराची तीव्रता कशी नियंत्रित करायची हे कसब मला भाऊनी दाखवलं. त्यानंतर मात्र दैनंदिन व्यापात मला शिकवण सराव करुन घेणं भाऊना कधीच जमल नाही.
आमच्या गावात हायस्कूलची सोय नाही. त्यासाठी रोज तीन-साडेतीन मैल तंगडतोड करीतमला शेजार गावी हास्कूलला जाव लागायचं. येती जाती चाल, होमवर्क हे झेपवून पेटीसाठी वेळ देणं, नियमित सरावकरणं मलाही जमायचं नाही. रविवार आणि मोठ्या सुट्ट्या.... मोकळीक मिळेल तेव्हा जमेलतसा सराव मी करायचो. भाऊनी मला अगोदरच बजावलेलं असल्यामुळे अभ्यास चुकवून पेटीचानाद करायचा नाही. हे पथ्थ मी ही सांभाळलं. मी दहावीला असताना मुंबईच्या काकानी कांदिवलीला बिऱ्हाडाची जागा घेतली. त्यावर्षीच्या मे महिन्यात काका गावी आल्यावर मला अकरावी साठी मुंबईला नेण्याचा विषय त्यानी काढला.
काका दामू नगर मध्ये रहायचे. तिथुन एक तासाच्या अंतरावर डोंगरी मध्ये अहमदाबाद हायवे लगतच पंडित शर्माचा पेटीचा क्लास असायचा. शिक्षण सुरु ठेऊन पेटी वाजवणशास्त्र शुद्ध शिकता याव, घराण्याचा लौकिक, भाऊंचावसा मी सांभाळावा अशी काकांची इच्छा... काका तबला वाजवायचे. अर्थात त्यांच वाजवणंसुद्धा भाऊं सारखं स्वतः सराव करून जोपासलेलं..... रागदारीचा पाया नसल्यामुळे इच्छा असूनही त्यांना लौकिक कमावता आला नाही. काकांचा प्रस्ताव भाऊंनी उचलून धरला.काढ ओढ करुन अगदी जीव जीव म्हणून पै-पैसा जोडून साठवलेली ऐंशी रुपयांची पुंजी भाऊंनी काकांच्या हवाली केली. "माझी धाव एवढीच... तू त्यात भर घालून एक उत्तम पेटी अशोकला घेऊन दे. सराव करायला स्वतःच हत्यार हवं..."
आम्ही मुंबईला गेल्यावर दोन दिवसांनी काकांनी दादरच्या हरीभाऊ विश्वनाथ कंपनीतून माझ्यासाठी हातपेटी खरेदी करुन आणली. पंडित शर्माकडे क्लास लावून दिला.पेटी आणि शिक्षण असा दिनक्रम सुरु झाला. अकरावी नंतर माझा कल बघून जे.जे. स्कूल ऑफआर्ट मध्ये काकांनी मला प्रवेश मिळवून दिला. परिस्थितीची जाणीव मला स्वस्थ बसुदेईना. कोर्स आणि पेटी सांभाळून अर्थार्जनासाटी सटर फटर जॉब करायला मी सुरुवातकेली. सकाळी सात ते रात्री अकरा वाजे पर्यंत माझा माझा दिनक्रम. पंडित शर्माकडे मला रागदारींच ज्ञान मिळत गेलं. तीन-साडेतीन वर्ष निर्वेध पार पडली अन् अकस्मातअडचण आली.
पंडितजींचं आणि जागा मालकाच भाड्यावरुन काही बिनसलं आणि अकस्मितपणे क्लास बंदकरुन त्यांनी गाशा गुंडाळला आता मी सुद्धा मुंबईत बऱ्या पैकी रुळलेला. शोध चौकशाकरुन बोरीवलीत आपटेबुवांची शिकवणी मी धरली. त्यांची फी थोडी जास्तच.... माझ्याआवाक्या बाहेरची. मग पहाटे ५ ते ७ असा दोन तासांचा आणखी एक जॉब मिळवला. (क्रमश:)