अचानक उद्भवलेल्या आणि यापूर्वी कोणतीच लक्षणे नसलेल्या आजारातून तू बरा होशील म्हणून तुला पुण्यात नेले अगदी शेवट पर्यंत चांगला बोलणारा तू अचानक रात्रीतून ब्रेन स्ट्रोक होऊन गेलास आणि माझ्यावर जणू वीज कोसळली ध्यानी मनी नसताना तुझे जाणे स्वीकारणे मला कठीण झाले माझ तर सगळ आयुष्य उलटे पालटे झाले अनपेक्षित रित्या कोणीतरी उंचावरून जोरात ढकलून दिल्या सारखे झाले रे आत्तापर्यंत वडिलांच्या आणि तुझ्या राज्यात एखाद्या राजकन्येसारखी वाढलेली मी पूर्ण हादरून गेले तुझ्या अवती भवती माझे सगळे आयुष्य फिरत होते रे आपण दोघेही गेली बेचाळीस वर्ष एकमेकात इतके गुंतलो होतो की आपल्याला एकमेका शिवाय आयुष्य नव्हते आपणच एकमेकांचे जग होतो Made for each other पासून सुरू झालेला आपला प्रवास... आतापर्यंत mad for each other पर्यंत येऊन पोचला होता 24/7 काळ एकत्र असलेली आपली जोडी कायम सोबत फिरणारी म्हणून आख्या पंचक्रोशीत फेमस होती दोघांची व्यवस्थित मेन्टेन केलेली तब्येत उत्तमोत्तम वेगवेगळ्या फॅशन चे कपडे आणि चप्पल बूट सकट सगळे आप टू डेट..फार वेगळे आणि क्वचित आढळणारे असे कॉम्बिनेशन होते आपले अगदी देवाने स्वर्गात जमवलेली जोडी ,💕ना कधी भांडणे ना रुसवे फुगवे ना मनात कसली अढी दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीला असून सुद्धा कधी संशय नाही....अगदी पूर्ण मोकळे वातावरण होते आपल्या घरातले कधी आपण एकमेकाची पर्स ,पाकिटे चेक केली ना आजच्या काळात कधी मोबाईल तपासले एकमेकावर गाढ विश्वास होता आपला..अगदी सोन्यासारखा संसार झाला होता आपला जगातील सर्व सुखे तू माझ्या पायाशी आणून ठेवली होतीस ...जसे माझ्या वडिलांनी कधी माझा कोणताच खाली शब्द पडू दिला नव्हता तसेच तू सुद्धा माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यासअसे असताना तुझ्या या अचानक जाण्याने माझं तर अख्ख आयुष्य बदलुन गेले आणि बदलते आहेतू गेल्यावर तीन चार महिने मी पुण्यातच राहिले होतेपुढे काय करावे समजत नव्हते..भयंकर अवस्थेत जगत होते कोणी विचारत नव्हते, कोणी बोलत नव्हते आतल्या आत मी घुसमटत होते कसातरी वेळ घालवत होते डोक नुसते सुन्न होत..पुढे काय करायचं ,काय केले म्हणजे काय होईल अशा असंख्य विचारांनी मनात थैमान घातले होते रात्री रात्री अधून मधून झोप उडत होती रोज रात्री रडून रडून उशी भिजून जात होती माझ्या वाईट अवस्थेत घरातली मंडळी मात्र मला धीर न देता मला समजून न घेता आपापल्या व्यापात दंग होती मजा करीत होती त्या काळात मला सांत्वनासाठी जे नातेवाईक किंवा जी मंडळी भेटायला येत होती ते सुद्धा त्याचा अक्षरशः इव्हेंट करीत होते सांत्वन राहिले बाजूला गप्पा गोष्टी आणि हसणे खिदळण.. चाललेले असायचे माझं मन अगदी विदीर्ण होत होत या घरातली एक व्यक्ती नुकतीच स्वर्गवासी झाली आहे असे अगदी पहिल्या दिवसा पासून कधीच वाटत नव्हते कारण घरभर हसणे खिदळणे चालू असायचे तुझी कोणाला जणू काही आठवणच नव्हती मला तर काहीच किंमत नव्हती तिथे तुला मी पूर्वी सुद्धा म्हणले होते तुझ्या माघारी मला काळे कुत्र सुद्धा विचारणार नाही अगदी तसेच झाले होते मृत्यू नंतरचे दहावा बारावा दिवस घालणं वगैरे गोष्टीवर तुझा कधीच विश्वास नव्हता तू कधीच कुणाच्या दहाव्या बाराव्याला जात नव्हतास माणूस गेला की सगळे संपले असे तू म्हणायचा आणि मी जर आधी गेलो माझे दिवस करू नकोस असेही मला निक्षून सांगितले होतेस पण माझे तिथे कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हते शेवटी तुझा दहावा दिवस करायचा घाट घातलाच त्यांनी तो दिवस कसा करायचा कोणाला बोलवायचे काय करायचे या बाबतीत कोणी एका चकार शब्दांत मला बोलले नाही की माझा काही सल्ला घेतला नाही आणि मला काही डिटेल पण सांगितले नाही अगदी नातेवाईकांना वॉट्स अप वर पत्रिका पाठवायची तर त्यात माझे नाव किंवा फोन नंबर सुद्धा घालायची कोणी तसदी घेतली नाही तरी मी त्याकडे दुर्लक्ष केले त्या काळात महत्प्रयासाने मी फक्त शांत राहिले होते माझ्याच नवऱ्याचे दिवस आणि मीच त्रयस्थ झाले होते दहाव्या दिवशी तर दिवस मुख्य कार्य सोडता जेवणाच्या ठिकाणी नुसती बहार उडाली होती आलेली लोक एकमेकात गप्पा ख्याली खुशाली मध्ये दंग होती आपल्या घरची लोकही त्यातच गुंतून होती मी जणू काही सर्वासाठी invisible होते जेवताना सुद्धा एकमेकांना आग्रह करणे कोणता पदार्थ कसा छान झाला आहे त्याच कौतुक करून आणखी वाढणे हेच चालले होते दहाव्याचे जेवण आहे का एखादे फंक्शन तेच समजत नव्हते मी शांत होते.. दुसरे काय करू शकत होते?घरची चाळीस पन्नास माणसे जेवून निरोप घेऊन गेली त्यानंतर आजतागायत त्यातील कोणीही एका शब्दाने मी कशी आहे याची चौकशी केली नाहीय त्या नंतर पुढील नंतर एका घरगुती धार्मिक कार्यक्रमा साठी आपल्या घरी जाणे झाले तेव्हा तर मला जाणवले की आपल्याला कुठेच काहीच किंमत उरलेली नाहीं त्या पंधरा दिवसात आपल्या घरात राहून आपलीच लोक मला हिडीस फीडीस करीत होती मला कार्यक्रमात पूर्ण दुर्लक्षित करीत होती जणू काही माझा नवरा गेला हे मीच मोठे पाप केले आहे अजून तुला दोन महिने जाऊन झाले नाहीत तोपर्यंत तुझ्या प्रॉपर्टी ची विल्हेवाट लावून टाकण्याची भाषा चालू होती घरचा कार्यक्रम संपल्यावर मला असे वाटले की आपण आपल्या मुलाबाळांची नातीची सोबत घेऊन एकत्र राहावे त्या हिशोबाने मी सामान घेऊन परत तिकडे पुण्यात गेले दोन दिवसात लक्षात आले आपण आलेले कोणालाच आवडले नाही माझ्या सामानाला जागाच नव्हती तिथे इतके मोठे घर असून माझं सगळ सामान गच्चीत ठेवले गेले होते उन्हाने ते खराब होत होते पण कोणाला त्याच काहीच नव्हते माझे इतर कपडे ठेवायला काही कप्पे दिले होते त्यात मी कसेबसे कपडे ठेवले होते मी आणलेल्या मला लागणाऱ्या भांडी कुंडी वस्तू वेगळ्या कपाटात ठेवल्या गेल्या मला जर इथे राहायचे असेल तर ऍडजस्ट करून राहावे लागेल अशी समज दिली गेली होती दिवस भर मी बाहेरच्या खोलीत बेड वर बसून असायचे उन्हाळ्याचा झळा येत असायच्या पण कोणी मला आत बस म्हणायचे नाही इतर कोणत्याच कार्यक्रमात मला सामील करीत नव्हते ना माझ्याशी काही गप्पा..ना मला मन रमवायला बाहेर कुठे घेऊन जाणे माझे जेवण सुद्धा मे हातात घेऊन कधी कधि गच्चीत जेवत होते एकत्र जेवायला मला कधीच बोलावत नव्हते मला लागणारे पदार्थ मीच विकत आणत होते तसे पहायला घरात काहीच कमी नव्हते ना काम ना कसली जबाबदारी दोन्ही तिन्ही वेळा आयते जेवण..पण मला आपुलकी, प्रेम, चौकशी हवी होती तिचा मागमूस नव्हता सुदैवाने जवळच माझी एक बालमैत्रीण राहत होती तिच्याकडे अधूनमधून जात होते माझे मीच आपले मन रमवून घेत होते ती माझी मैत्रीण माझी समजूत घालायची माझे सांत्वन करायची मी घरी दिवसा कधी तुझी आठवण आली तर रडू शकत नव्हते तिच्याकडे मात्र मी मनसोक्त रडायची इतक्या वाईट अवस्थेत सुद्धा मी तिथे राहिले कारण मला वाटले मला सगळे समजून घेतील मला आपल्यात सामावून घेतील पण ते राहिले बाजूला ते सर्व कुठे जातात येतात हे सुद्धा मला सांगत नव्हते रोज रात्री रडून रडून उशी ओली होत होती