पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग २ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग २


प्रिय सोना

तुझ्या बागकामाचे आणखी एक विशेष म्हणजे आपल्या या विस्तृत बागेला पाणी देण्यासाठी तू एक मोठी पाईप ठेवली होती तीचे एक कनेक्शन बाथरूम मधील कॉर्पोरेशन च्या पाण्याच्या नळाला जोडले होते.

जेणेकरून बागेला कॉर्पोरेशन चे पाणी मिळावे आणि साठवणीच्या टाक्या रिकाम्या होऊ नयेत तुझ्या प्रत्येक कामात दूरदृष्टी असे

आवळ्याच्या  बहराच्या काळात पहिले काही वर्षे मी जिथे जिथे मित्र मैत्रिणींना भेटायला जात असे तिथे आवळे घेऊन जात असे आपल्या सर्व नातेवाईकांच्या घरोघरी आपण आवळे पोचवत होतो त्या काळात पुण्यात गेलो तर तिकडे पण आपण सर्वांसाठी आवळे न्यायचो एक दोन वेळा आमचा फेसबुक मेळावा पुणे, मुंबई इथे भरला होता तिथेसुद्धा वीस पंचवीस लोकांसाठी प्रत्येक पाच पाच आवळे नेले होते

आवळ्याचा आकार पाहून सर्वांस खूप अपूर्वाई वाटत असे आवळे आणले म्हणून माझे खुप कौतुक होत असे अर्थात तू ही तेंव्हा माझ्या सोबत असायचा ..मी तुझ्या कष्टावर भाव मारून घ्यायचे पण त्यावेळेस हे सर्व तुझ्या कष्टाचे फळ आहे असे सर्वांना आवर्जून सांगायचे

मग लोक आपल्या दोघांचा हेवा करीत तू मात्र उगाचच संकोचून जात होतास

देशी केळी तर लागली की दहा बारा डझन घड लागत ती केळी खराब होऊ नयेत म्हणून लगेच नेऊन वाटायच फार मोठ काम असायचं आपण दोघेही कामात आपल्या व्यापात असलो तरी हे काम आपण आनंदाने करायचो पण लोक मात्र फळे मिळाली हे ना सांगता.. जर खराब निघाली तर लगेच कानावर घालायचे..तेव्हा वाईट वाटायचे

आपल्याकडे तू पपई पण लावली होती आंब्याच्या स्वादाची आणि रंगाची ती गोड पपई सुद्धा आपण सगळ्यांच्या घरी घेऊन जायचो माझी एक मैत्रीण तर कित्येक वर्ष सारस्वत लोकांच्यात असते ती खतखते नावाची भाजी करायला कच्ची पपई नेत असे कच्ची पपई बाहेर सहजी मिळत नसे त्यामुळे मी पपई दिली की तिला खूप आनंद व्हायचा

एकदा आजारपण मुळे तुझ्या काकू पुण्यात होत्यात्यांना आपल्या बागेचे नेहेमी कौतुक असे कोल्हापुरात असताना देवाला सर्व प्रकारची फुले आपण नेहेमी त्यांना घरी नेऊन देत असू त्या त्या मोसमातील फळे पण त्यांना घेऊन जात असू त्या कोल्हापुरात होत्या तेव्हा आपल्या घरी अधूनमधून येत असत त्यांना आपल्या दोघांचे खूप खास प्रेम होते पण पुण्यात आणि आजारी असल्याने त्या आपल्या घरी येऊ शकत नव्हत्या मात्र फोन वरून त्या सगळ्या झाडांची चौकशी करीत एकदा पुण्यात आपण मुद्दाम त्यांच्यासाठी घरचे आंबे आणि पपई घेऊन गेलो होतो त्यांना एवढा आनंद झाला होता की त्या त्यांच्या वेदना विसरल्या प्रेमाने त्यांनी माझी अलबला घेतली. होती

झाडावर कैऱ्या लागल्या की त्या सुद्धा आपण नातेवाईक, परिचित, शेजारी पाजारी देत असू आपली कैरी अगदी खोबरी होती आपल्याला असे वाटायचे लोकांनी त्याचे पन्हे ,डाळ वगैरे पदार्थ करावे पण घेणारे मात्र स्वतः तर कैरीचे काय केले सांगायचे नाहीत आणि विचारले तर चक्क पिकायला टाकल्या आहेत म्हणायचे नवल वाटायचे कारण पिकलेले आंबे तर आपण देतच होतो.. मग हे काय?

मुलाच्या लग्नापूर्वी आपल्या व्याही लोकांच्या घरी परगावी सुद्धा आपण नारळ, कैऱ्या पाठवल्या होत्या त्याच कौतुक कधी नाही केले गेले.. अर्थात कौतुक व्हावे म्हणून दिल्याचं नव्हत्या पण मानवी स्वभावानुसार कौतुकाची अपेक्षा असते ना एकदा तुझ्या मित्राच्या मुलीचे लग्न होते आमंत्रण द्यायला तो घरी आला दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गृहमुख होते मी सात आठ नारळ, दहाबारा कैऱ्या दिल्या तो घेऊन गेला पण नंतर एका शब्दाने त्याने त्याचे काय काय केले सांगितले नाही तुला ती गोष्ट फारशी रुचली नाही

जी गोष्ट फुला फळांची तीच नारळाची एका वेळेस तीस चाळीस नारळ निघतआपण माणूस बोलावून ते उतरवून घेत होतो दोन चार नारळ शहाळे म्हणून पित असू उरलेले तू निगुतीने लॉफ्ट वर रचून ठेवायचा आपण लागतील तसे फोडायचो गावात तुझी बहीण होती येता जाता तिच्या घरी फुले,फळे, नारळ आपण पोचवायचो पण तिला सुद्धा कधी कौतुक वाटले नाही तो तिला तिचा हक्क वाटायचा अशा गोष्टीत तू वाईट वाटले तरी अलिप्त असायचा

हळूहळू सगळीकडे फळे, फुले नेऊन वाटायची आपली हौस थोडी कमी झाली लोकांना आयते हवे असायचे आणि आपण वेळात वेळ काढून आणल्या गोष्टीचे अप्रूप पण नसे उलट काही वर्षांनी तो त्यांना त्यांचा हक्क वाटू लागला मग फक्त नारळ, आवळा, आणि अंजीर सोडून सगळी झाडे आपण कमी केलीतीनं चार वर्षांनी भाज्यांचा व्याप कमी करूनआपण तिथे लॉन लावायचे ठरवले मग तू चाफा, पारिजातक, आंबा या झाडाना स्वतः कट्टे. करून बांधले गवंडी काम सुद्धा तू बघून शिकला होता  ते कट्टे तू छान रंगवून घेतले होतेस आता उरलेल्या जागेत थोडी फरशी घालून.. कडेला मात्र फुलांची झाडे ठेवली

एके वर्षी तू महाबळेश्वर वरून रंगीत फुलांची झाडे आणून लॅण्डस्केप सुद्धा केले होते येणारी जाणारी बघून कौतुक करीत तुझ्याकडे सगळ्या गोष्टींचं कसब होतं हौस तर खूप होती बागेतील लॉन च्या कडेला आपल्या दोघांना बसायला तू झोपाळा आणला होता रोज दुपारचा चहा आपण तिथे घेत असू

बागेतले लॉन सुद्धा दर दोन वर्षांनी बदलून तू वेगळे लावत होतास बाग सुंदर स्वच्छ ठेवायची तुला आवड होती आंबा, पारिजातक ,नारळ ,चाफा या मोठ्या झाडाना कट्टे बांधून आळी केली होतीस एकदा त्यात पाण्याची पाईप टाकली की ती पोटभर पाणी पित एका सरळ लाईनीत झाडे लावली असल्याने एकदा पाईप सोडली की वाफा भरेपर्यंत काळजी नसायची

तू आपल्या बाहेरच्या बाल्कनीत पेपर वाचत वाचत आनंदाने बागेला दोन दिवसाआड पाणी घालायचा कधी कधी तुला बाहेर जायचे असायचे तेव्हा मी घालीन पाणी असे म्हणलं तर तुला ते रुचायचे नाही मी आल्यावर घालीन असे म्हणून तु ते काम कधीच मला द्यायचा नाही बागेत लावलेले लॉन सुद्धा वेळोवेळी कडेने साफ करून घेऊन ते देखणे दिसेल याची  काळजी घ्यायचा

पहिल्या वेळेस लॉ न लावले तेव्हा आपण एक छोटी शेगडी घेतली होतीत्यात कोळसे घालून तू ती पेटवायचा मग बागेतील फरशीवर मी गरम गरम भाकरी आणि भाजी करायचे थंडीच्या दिवसात कोवळ्या उन्हात लॉन वर गरम भाजी भाकरी खाण्यात खूप मजा यायची