Ayushyach sar - 9 books and stories free download online pdf in Marathi

आयुष्याचं सारं ( भाग -9)


हिंदू कोड बिल आणि भारतीय स्त्री ....

   भारतीय स्त्री अनेक वर्ष आणि आजही बघतो रूढी परंपरेच्या बंधनाने जोखण्डाने बांधलेली आहे . आपली भारतीय संस्कृती म्हणजे पुरुषप्रधान . त्या पुरुषप्रधान संस्कृतीने तर स्त्रीला तिच्या हक्कापासून वंचित ठेवले . परंपरागत चाली नुसार आजही जन्माला येणाऱ्या नवजात नागरिकाला आपल्या नावासमोर वडिलांचे नाव लावण्याचा अधिकार पुरुषांतक संस्कृतीनेच दिला . स्त्री फक्त एक बाईमाणूस म्हणून जगते . खरं तर माझ्या दृष्टीने स्त्री ही अनंतकाळाची पत्नी आणि आई होण्याआधी ती एक जिता जागता माणूस आहे हा विचार समाजात रुजवणे श्रेष्ठ ठरेल . स्त्रीच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आम्ही कितीही झगडलों तरी निरर्थक ठरेल जेव्हा पर्यंत स्त्री स्वतः जागृत होऊन ह्या बंधनाचा उंबरठा ओलांडणार नाही . आज आपण बघतो विज्ञान शिकवणारी स्त्री वट पौर्णिमा आली की वटवृक्षाला धागेदोरे गुंढाळाला जाते का ?? तर , नवऱ्याला शंभर वर्ष आयुष्य मिळो म्हणून . अरे ज्या सावित्रीच्या अथक प्रयत्नाने तुम्हाला ह्या पदावर नेऊन पोहचवलं तिने जर आपला वेळ वटाला धागेदोरे गुंढाळण्यात घालवला असता तर तुम्ही कुठे असत्या ? चूल आणि मुलं सांभाळत चार भिंतीच्या आत . ह्याचा जरा प्रत्येक स्त्रीने विचार करावा . बहुतेक हिंदू स्त्रियांना आज हे नाही माहिती हिंदू कोड बिल काय आहे . प्रत्येक भारतीय स्त्रीने स्वतःच्या हक्काबदल जाणून घेणं गरजेचं आहे .
२७ सप्टेंबर इतिहासातील  या दिवशी १९५१ साली स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारली आणि राजीनामा दिला होता का तर हिंदू स्त्रियांना त्यांचे हक्क मिळतं नव्हते म्हणून . याच दिवशी १९५१ साली भारताचे प्रधानमंत्री नेहरू यांनी डॉ. बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक आणि धाडसाने मांडलेले "हिंदू कोड बिल" बरखास्त केले. हे सर्व मान्य आहे कि हिंदू संस्कृतीत स्त्रियांचा दर्जा हा दुय्यम प्रतीचा आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकार नाकारणारा होता. हिंदू धर्माच्या, स्त्रियांबद्दलच्या अनिष्ट रूढी आणि बंधने झुगारून देऊन स्त्री-पुरुष समानतेच्या आणि योग्य सन्मान मिळण्याच्या सोनेरी संधी ला भारत कायमचा मुकला होता. 

    डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विरोधानंतर बाबासाहेब एकटेच लढतं राहिले .आज सुद्धा प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवादी लेखक / लेखिका सोयीस्कररीत्या बाबासाहेबांच्या या एकहाती लढया बद्दल लिहित नाहीत. बाबासाहेबांना एक "राष्ट्र निर्माते" म्हणून न मानता फक्त दलित नेता असे भारतीय समाजावर कायमचे बिंबवण्याचे हे षड्यंत्र आहे. भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणा-या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची म्हणावी तशी दखल आपल्या भगिनीवर्गानेही घेतलेली नाही.
पुरातन साहित्यात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला आहे तसेच सती ची चाल , बाल विवाह आणि विधवा विवाह सारख्या प्रथा अतिशय चलाखीने नेमून स्त्रियांना संपत्ती मधून हद्दपार केले होते या बाबतचे काही पुरावे खाली देत आहे (संदर्भासह)-
  १) अथर्व वेद - ६/११/३-
हे परमेश्वरा तू हा गर्भ बनवला आहेस, त्यातून मुलाचा जन्म होऊदे, स्त्री काय कुठेही जन्माला येईल.
२) अथर्व वेद - २/३/२३
हे वरा तू पुरुष जन्माला घाल.
३) शतपथ पुरण-
मुलाला जन्म देऊ न शकणारी स्त्री दुर्दैवी असते
४) रीग वेद- ८/३३/१७-
इंद्र म्हणाला : स्त्रियांना उपजतच कमी बुद्धिमता असते , ती ज्ञान ग्रहण करू शकत नाही
५) रीग वेद - १०/९५/१५-
स्त्रियांसोबत मैत्री करू नका त्यांचे हृदय तरस (लाकड्बाग्घा ) पेक्षा क्रूर / कपटी असते
६) यजुर वेद -- ६/५/८/२-
(तैतरीय संहिता )
स्त्रियांमध्ये कार्य शक्ती नसते म्हणून त्यांना संपत्ती मध्ये हिस्सा देऊ नये..
७) शतपथ पुरण - (यजुर्वेदाचे प्रवचन )-
८) मनुस्मृती - त्रिष्णा ९/९३-
कुठल्याही धार्मिक परंपरेतील समस्या असतील तर २४-३० वयोगटातील पुरुषाने ८-१२ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे
९) मनुस्मृती- अति कार्माय ९/७७-
बेकार (काम धंदा नसलेला /lethargic), नशाबाज, आणि रोगी नवऱ्याची आज्ञा जी स्त्री मानणार नाही तिला ३ महिन्यासाठी जंगलात सोडून द्यावे आणि तिचे दागिने काढून घ्यावे
१०) मनुस्मृती- अशीला काम्व्रतो -- ५/१५७-
नवरा विकृत, बाहेख्याली, अनैतिक असला तरी पत्नी ने त्याची पूजा आणि सेवा करावी.
भारतीय परंपरेने स्त्रीला कायमच जोखडात ठेवले आहे. तिने बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या अधिपत्याखाली राहावे अशी व्यवस्था मनुस्मृतीने करून ठेवली.
डॉ आंबेडकरयांनी  हिंदू कोड बिलाविषयी म्हटले होते की...
समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे होय. हिंदू कोड बिलाला मी हे महत्त्व देते. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. 
डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाविषयी जाणून घेऊया-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण ओळखतो ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी म्हणूनच. पण त्यांचे कर्तृत्व इतपतच मर्यादित नाही. डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणा-या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची म्हणावी तशी दखल आपल्या भगिनीवर्गाने घेतलेली नाही. 
स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती ती म्हणजे स्त्रियांना या जाचक रूढी आणि परंपरा मधून मुक्त करावे आणि ते आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले, हे बिल २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे-
१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.
२. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
३. पोटगी
४. विवाह 
५ . घटस्फोट 
६. दत्तकविधान
७. अज्ञानत्व व पालकत्व.
हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच ! भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला, हे अतिशय दुर्दैवी होते. या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला.
या बिल द्वारे बाबासाहेबांनी एक-विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता, स्त्रियांना संपती मध्ये समान वाटा आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधीची तरतूद केली होती परंतु कडवे हिंदू नेते आणि विचारवंत यांना स्त्रियांना समान अधिकार देण्याची तयारी नव्हती. "हिंदू धर्मावरील आक्रमण" अशा प्रतिक्रिया देऊन अशा नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. स्वतःला उदार मतवादी आणि पुरोगामी म्हणउन घेणाऱ्या राजेंद्र प्रसाद, वल्लभ पटेल आणि मदन मोहन मालवीय यांनी त्यांचे खरे रूप दाखऊन RSS शी हात मिळवून बाबासाहेबांना पराकोटीचा विरोध केला होता, ज्या स्त्री साठी बाबासाहेब इतकी मेहनत घेत होते ते बिल पारित होऊ नये म्हणून सरोजिनी नायडू उपोषण करणार होत्या. एक अस्पृश्य व्यक्ती हिंदू धर्मावर भाष्य करतोय म्हणून बरयाच तथाकथित हिंदू समाजाने बाबासाहेबंविषयी घृणास्पद प्रतिक्रिया दिल्या होत्या इतकेच काय बाबासाहेबांविरुद्ध देशद्रोही, हिंदू धर्माचा शत्रू अशा घोषणा देत मोर्चे काढले होते. सामाजिक एकता आणि बांधिलकी धाब्यावर बसउन कॉंग्रेस च्या मदतीने एक अस्पृश्य व्यक्तीमुळे " हिंदू खतरे " असे नाक्रासू हे हिंदू धर्माचे ठेकेदार काढत होते.
पिचक्या कण्याचे प्रधानमंत्री सामाजिक दबावाचे राजकारण करण्यात यशस्वी झाले आणि हे बिल संसदेतून बरखास्त करण्यात आले बाबासाहेबांनी त्या वेळच्या असलेल्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना / प्रसार माध्यमान या बिलाच्या पाठी उभे राहण्यास आवाहन केले परंतु बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे कुणी उभे राहू शकले नाही. समाजातील समानतेचे सकारात्मक बदल करण्याची बाबासाहेबांची इच्छा मातीमोल ठरली होती. प्रधानमंत्री नेहरुची कृत्याची बाबासाहेबांना चीड आली आणि दुख हि झाले आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.... केवढे ते निस्वार्थी कार्य, केवढी ती महानता होती.
सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करताहात, असा सवाल डॉ. आंबेडकरांनी प्रतिगामी विरोधकांना २० सप्टेंबर १९२१ रोजी केला. हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच योद्ध्यासारखे लढले. पण दुर्दैवाने सत्र संपताना या बिलाची केवळ ४ कलमेच मंजूर झाली होती. यास्तव अत्यंत दु:खीकष्टी होऊन डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. भारतीय स्त्रियांच्या हक्कांसाठी केवढा मोठा त्याग बाबासाहेबांनी केला! डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र डॉ. राजेंद्रप्रसाद, शंकराचार्य, ब्रह्मानंद सरस्वती, स्वामी करपात्री, डॉ. पट्टाभी सीतारामय्या या नेत्यांनी बाबासाहेबांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाहीत. बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्मितीचे ऐतिहासिक कार्य केले आहे. ज्या तत्त्वांचा, मूल्यांचा त्यांनी संविधानात जोरदार पुरस्कार केला त्याच तत्त्वांना मूठमाती देणे त्यांच्यासारख्या विचारी नि विवेकनिष्ठ महापुरुषाला कसे शक्य होईल? म्हणूनच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले.
हिंदू कोड बील लोकसभेत मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारून राजीनामा पंतप्रधान नेहरुंच्या तोंडावर फेकल्याचे भारतातील एकमेव उदाहरण आहे. त्याचवेळी हे विधेयक पास झाले असते तर आज भारत आज जगात महासत्ता म्हणून राहिला असता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीय महिलांवर जे उपकाराचे कर्ज केले आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न फिटणारे आहे. याची जाणीव खरचं किती महिलांना आहे ?? हेच मोठ गुढ आहे.
पण बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नाहीत. ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे-
१) हिंदू विवाह कायदा.
२) हिंदू वारसाहक्क कायदा
३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा
४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा.
हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होय. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली.
बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद असलेले आचार्य अत्रे म्हणतात…
आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीय महिलांवर जे उपकाराचे कर्ज केले आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न फिटणारे आहे. यांची जाणीव खरचं किती महिलांना आहे?? हेच मोठ गुढ आहे असो. डॉ बाबासाहेब आंबेडकर भारताचे सगळ्यांत महान पुरुष आहे आणि राहतील ..
  म्हणूनच भारतीय समाजाची ही व्यक्तीविषयीची दुर्दशा त्यांच्या मनात पेरलेले विष नाहीसे होऊन एखाद्या व्यक्तीने एवढ्या श्रमातून त्यांच्यासाठी केलेले कष्ट दिसायला पाहिजे . अमेरिकेत कोलंबिया विदयापिठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भला मोठा पुतळा उभारला आहे आणि त्या खाली " the knowledge of symbol "  म्हणजे ज्ञानाचे चिन्ह म्हणून लिहिले आहे . हे आम्हा सर्व भारतीयांसाठी गर्वाचे असले तरी . भारतीयांना त्यांचा ज्ञानाबद्दल अप्रूप वाटतं नाही . निदान त्यांनी स्त्रियांसाठी त्यांचा हक्कासाठी अहोरात्र जागून जे हिंदू कोड बिल लिहिले त्याची तरी माहिती करून घेऊन आपले हक्क जाणून घ्या .. हिंदू कोड बिलनेच तुम्हाला वडिलांच्या जमिनीवर ( स्त्रीचे लग्न झाल्यावर ) मुला एवढाच सामान मुलीला हक्क मिळवून दिला .  तो कायद्यानुसार वडिलांना देणे भागच आहे . गरोदर असताना तुम्हाला मिळणाऱ्या सुट्या ह्या कुणामुळे मिळतात ह्याचा विचार जरूर करा . आणि हिंदू कोड बिल एकदातरी पडताळून पहा .. शेवटी स्त्रीला तिच्या हक्काविषयी बोलण्याचा अधिकार पुरुषप्रधान संस्कृतीने हिरावून घेतला असेल तरी तो  हक्क संविधानाने दिला आहे . 

    शिक्षणाच्या वाटेवर खचता खाणाऱ्या त्या सावित्रीबाई फुले , जोतिबाफुले , राज्यश्री शाहूमहाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्याच्या विचाराचा आदर्श नक्की डोळ्या समोर ठेवा . कुण्या व्यक्तीची जात धर्म बघण्याआधी त्याचे कार्य बघा . राष्ट्राचा आणि देशाचा नक्कीच विकास होईल . 

- कोमल प्रकाश मानकर 


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED