Nava Prayog - 2 books and stories free download online pdf in Marathi

नवा प्रयोग... - 2

नवा प्रयोग...

पांडुरंग सदाशिव साने

२. घनाचा आजार !

किती तरी वर्षांनी सखाराम घरी आला होता. ते लहानसे तालुक्याचे गाव. परंतु रेल्वे होती म्हणून महत्त्व होते. आईला, वडील भावाला आनंद झाला. परंतु सखाराम घरात ताई दिसली नाही. ताई त्याची मागे आलेली बहिण. लहानपणीच तिचे लग्न लावण्यात आले होते. आणि एकदोन वर्षांतच पती वारला. सासरी हाल होत म्हणून ती घरीच येऊन राहिली होती. सखारामला ताईची आठवण येऊन रडू येई. त्याला ताईच्या शतस्मृती येत. गावातच सासर. एकदा दादा ताईला घेऊन सासरी गेला. विधवा बहिणीला घेऊन सासरी गेला. परंतु दादा परत निघताच तीही त्याच्या पाठोपाठ धावली. त्याने तिच्या थोबाडीत मारली.

“कोठे येतेस ओरडत? घराला का काळिमा फासायचा आहे? सासरीच रहा.” दादा दु:ख-संतापाने म्हणाला.

“मी जीव देईन दादा. या नरकात मला नको ठेवू-” ती दीनवाणी गाय म्हणाली.

“घेऊन जा तुमची बहीण. पांढ-या पायाची अवदसा! नव-याला खाल्लन्: आणखी कोणाला खायची. जीवबीव देऊन आमच्या मानेला गळफास लावायची. न्या तुमची बहीण.” सासू तणतणत म्हणाली.

शेजारीपाजारीही “घेऊन जा बहीण” म्हणाले. आणि दादा बहिणीला घेऊन घरी आला. पुन्हा ती सासरी गेली नाही. ती घरात दु:खी-कष्टी असे. मालतीने ताईची हकीकत सांगितली. क्षयी होऊन ती मेली. परंतु स्वत:च्या थुंकीची वाटी स्वत: नेऊन कफ पुरी. स्वत: वाटी धुवी. ती कुणाला स्वत:चे काम करु द्यायची नाही. सखाराम आईजवळ ताईचा पुनर्विवाह करावा म्हणायचा. परंतु आईला तो विचारही सहन होत नसे. सखाराम ताईच्या दु:खाने दु:खी असे. पुढे तो घरातूनच गेला! कित्येक वर्षांत त्याला घरचे काही कळले नव्हते आणि घरी आला तो ताई नाही! त्याला ताईचा आत्मा आपल्याभोवती आहे, असा भास होई. त्या घरात का तिचा आत्मा त्याच्यासाठी घुटमळत होता?

परंतु सखाराम शांत झाला. तो घर सोडून गेला तेव्हा मालती आठदहा वर्षांची होती. परंतु आता ती अठरा-वीस वर्षांची होती. तिला सारे कळू लागले होते. त्या तुमची बहिणीचे वडलांनी लहानपणीच लग्न केले. आणि पुढे तर सारे दु:खच झाले. या बहिणीला शिकवायचे असे दादांनी ठरवले होते. सखारामही घरी असताना पूर्वी म्हणायचा की मालतीला खूप शिकवू आपण. वडलांनी विरोध केला असता. परंतु ते अकस्मात देवाघरी गेले. आईने त्या दिवसापासून हाय घेतली होती. परंतु दु:खावर काळासारखे औषध नाही. आईचे मन हळूहळू शांत झाले. पुढे सखाराम घर सोडून गेल्यावर पुन्हा तिला धक्का बसला होता. तो घरी यावा म्हणून ता जप करी. आणि देव जणू प्रसन्न झाला. मुलगा बारा वर्षांनी घरी आला.

सखाराम आल्याने घरात अलीकडे प्रसन्नता होती. दादा एका दुकानात नोकरीला जात असे. ते लहानसा वाडा त्यांचाच पिढीजात होता. घरापाठीमागे विहीर होती. तेथे एक पेरूचे झाड होते. ताईला आपण एकदा पेरू वरून टाकले नाहीत म्हणून ती कशी रागावली, ती लहानपणची आठवण सखारामला आली.

“भाऊ, हे चंदनाचे झाड. हे ताईच्या हातचे, ती त्याला पाणी घालायची. मी मेल्यावर हे झाड माझी आठवण देईल, असे म्हणायची. मरायच्या दिवशीही म्हणाली, माड्याला पाणी घातलेस का?” मालती गहिवरून सांगत होती.

सखाराम त्या चंदनाच्या झाडाकडे बघत बसे. जणू ताईचा आत्मा त्या झाडाच्या रूपाने तेथे उभा होता.

वैनीची दोन मुले ही सखारामची करमणूक होती. जयंता सहा-सात वर्षांची होता आणि पारवी तीन वर्षांची. दोनच मुले. ती घरी आलेल्या काकांच्या भोवती भोवती असत.

“तुम्ही आमचे काका? इतके दिवस कुठे होतेत?” जयंता विचारायचा.

“जमतीत होते. होय ना काका?” पारवी डोळे मिचकावीत म्हणायची.

सखाराम त्यांना गोष्टी सांगायचा, गाणी शिकवायचा.

“काका, आजी मघा रडत होती.”

“रडत नसेल, डोळे चोळीत असेल.” सखाराम म्हणाला.

“खरेच रडत होती. आजी कधी कधी रडते. तिला कोणी रागवत नाही, मारत नाही, मग का हो काका, आजी रडते?” जयंताने विचारले.

“मी विचारीन हो. जयंता, तुला मास्तर मारतात का रे?”

“एकदाच छडी बसली काका. आमचे मास्तर ठेंगणे आहेत, परंतु मारतात जोराने. मी रडलो.”

“का रे, त्यांनी तुला मारले?”

“मी मित्रांजवळ बोलत होतो म्हणून.”

“कोण तुझा मित्र?”

“तो बाळशा. काल नव्हता का आला? तो झाडावर झपझप चढतो. बोरीच्या झाडावरसुद्धा चढतो. त्याला काटे नाही बोचत. आणि मग ते झाड गदागदा हालवतो. आम्ही मुले बोरे वेचतो. बाळशालासुद्धा मास्तर मारतात. एकदा त्याच्या खिशात बोरे सापडली म्हणूनच मारले हो त्यांनी. सारी बोरे त्यांनी बाहेर फेकली. काका, बोरे का वाईट?”

“अरे, रामाला शबरीने बोरे दिली होती.”

“उष्टी ना? दातांनी खाल्लेली. चिमणीच्या दातांनी खाल्ली असतील. होय ना काका?”

इतक्यात पारवी आली गात गात-
“इवलं इवलंसं पाखरू
लाल लाल ग त्याची चोच
गुंजावाणी ग त्याचे डोळे
सातापाचांनी बाळ खेळे
की पाखरू माझे।।”

“आली पारवी.” जयंता म्हणाला.

ती काकांच्या मांडीवर जाऊन बसली. ती टाळ्या वाजवीत होती, गाणे गात होती.

“काका ते दह्याचे गाणे म्हणा.” ती म्हणाली.

“तुला दही आवडते?” सखारामने विचारले.

“हो आणि त्यात साखर!”

“पारवी हावरी आहे काका.”

“तूच हावरा, तूच कावळा!”

“पारवी असे म्हणू नये. मी गाणे म्हणू ना?”

“म्हणा काका, म्हणा.”

सखाराम गाणे म्हणू लागला-
दह्या-दुधाने भरल्या वाट्या
वर साखल रायपुरी
असा माझा खेळे ग हरी।

“अशी माझी खेळे ग पारवी- असे म्हणा काका.” ती म्हणाली.

“तुझे नाव नको, माझे हवे.” जयंता म्हणाला.

“तू मोठा आहे, मी लहान. माझे नाव हवे. होय ना काका?” पारवीने गळ्याला मिठी मारून म्हटले.

“होय हो. जयंता, तू जा शाळेत.” सखाराम म्हणाला.

जयंता शाळेत गेला. खेळत बोलत पारवी काकांजवळ झोपली. वैनीही काम-धाम आटोपून जरा पडली होती. मालती शिवणाच्या वर्गाला गेली होती.

सखाराम उठून आईजवळ जाऊन बसला. अलीकडे आईला बरे वाटत नसे जणू. ती माऊली सखारामची वाट पाहात होती. परंतु आणखी एक चिंता तिला होती. मालतीच्या लग्नाची!

“आई, तू आज रडत होतीस?” त्याने विचारले.

“कधी कधी डोळे येतात भरून. ते गेले नि मी मागे राहिले! तुझी ताईही गेली. झुरून झुरून ती मेली. ती तुझी आठवण काढी. माझा भाऊ कुठेही असो, सुखी असो, असे ती म्हणायची. जाऊ देत त्या गोष्टी. परंतु आता या मालतीचे कसे होणार? उगीच तिला दादाने इतके शिकवले. आपल्या समाजात शिकलेले मुलगे कमी. मालीला कोण घालील मागणी? नाकापेक्षा मोती जड, असे जो तो म्हणणार. मी सांगत होते की दोन बुके शिकली म्हणजे पुरे. परंतु तुझा मोठा भाऊ ऐकेना. तूही तसेच म्हणायचास. तू गेला निघून, त्याला वेळ नाही. माली किती दिवस अशी राहणार?” आई मुलाजवळ बोलत होती.

“आई वेळ आली म्हणजे सारे होईल. आणि लग्न न करता अशीच राहिली म्हणून काय बिघडले? कोठे काम करील, सेवा करील. आपल्या देशात काम करणारी माणसे आज हवी आहेत. खेड्यापाड्यांतील स्त्रियांत काम करण्यासाठी माणसे हवी आहेत.” सखाराम सांगत होता.

लग्न करून करू दे काम. तुमच्या महात्मा गांधींनी का लग्न नाही केले? लग्नशिवाय का कोणी राहतो? रीतीने सारे झाले पाहिजे. तू जा पुण्यामुंबईकडे नि आण शोधून एखादा हुशार मुलगा.” आई कळकळीने सांगत होती.

एके दिवशी सखाराम खरेच पुण्यामुंबईकडे गेला. त्याला जुने ओळखीचे मित्र भेटले. कोणाची लग्ने झालेली, कोणाला मूलबाळ. असे ते बहुतेक होते. बहिणीसाठी नवरा कोठे बघायचा? तो निरनिराळ्या वसतीगृहात जाऊन चौकशी करी. त्याला विद्यार्थी हसत. सखाराम साधा-भोळा. शांतपणे सारे सहन करी.

एके दिवशी त्याला एका तरुणाचा पत्ता मिळाला. तो विलायतला जाणार, बॅरिस्टर होणार, असे त्याला कळले. त्याचा पत्ता काढीत तो त्या जागी गेला. तो तरुण तेथे होता. सिगारेट फुंकीत होता.

“नमस्कार.” सखाराम म्हणाला.

“गुड मॉर्निंग!” तो तरुण म्हणाला.

“आपल्याला काही विचारण्यासाठी मी आलो आहे. विचारू का?”

“हो, हो विचारा की.”

“आपणाला लग्न करायचे आहे असे मी ऐकले. माझी बहीण लग्नाची आहे.”

“शिकलेली आहे का?”

“मॅट्रिक झालेली आहे.”

“वा, फार छान! आपल्या जातीत अजून शिकलेल्या मुली फार नाहीत. अहो उद्या मी बॅरिस्टर होणार, किंवा आय्.सी.एस्. ऑफिसर होणार. मोठी माणसे मग माझ्या घरी येणार, मला दुस-यांकडे जावे लागणार; खाने, समारंभ- नाना प्रकार. पत्नीला बरोबर न्यावे लागेल. ती आडाणी, मुखदुर्बळ असेल तर काय उपयोग? खरे की नाही? तुमची बहीण बरेच शिकली एकूण. ठीक, ठीक. परंतु एक अट आहे. मला विलायतेला जायचे आहे. त्याचा खर्च जो देईल त्याच्या मुलीशी मी लग्न करणार. उद्या मुलीचेच कल्याण आहे त्यात. आपल्या मुलीला फॉरिन-रिटर्नड फक्कडसा नवरा मिळाला तर आईबापांना किती आनंद होईल! खरे की नाही?”

“तुम्ही एकदा बहिणीला बघून तर घ्या.”

“अहो बघायची जरुरी नाही. शिकलेली असली आणि पैसे मिळत असले म्हणजे पास.”

“परंतु माझी बहीण तुम्हांलाही पाहील. ती शिकलेली, तुम्ही शिकलेले. एकमेकांनी एकमेकांस पाहून घ्यावे. एकमेकांजवळ बोलावे, आणि काय ते ठरवावे. पैशाचे पुढे पाहू.”

“ठीक तर. मी येईन. तुमचा पत्ता देऊन ठेवा. कधी येतो ते कळवीन. अच्छा. मला जायचे आहे. अपॉइन्टमेन्ट आहे. शहरात सारे टाइमशीर आसते. आणि मी फार रेग्युलर वागतो!”

सखाराम नमस्कार करून गेला. चे घरी आला. त्याने वडील भावाला, आईला सारी हकिगत सांगितली.

“हे बघ सखाराम, विलायतेला जाण्याआधी लग्न उरकून टाका. नाही तर तो तिकडून एखादी मड्डम आणायचा. आधी नका पैसे देऊ.” आई म्हणाली.

“आई, मला खरोखरच हे लग्न नको. दादाची थोडी-फार असलेली शिल्लक सारी जायची. कर्ज काढायचे. खरेच नको. मला कुठेतरी नोकरी करू दे. त्यात का काही वाईट आहे? वेळ येईल तेव्हा होईल लग्न.” मालती म्हणाली.

“आई मी दादाला मदत करीन. आता मी घरीच राहीन. वकिलीचा अभ्यास करीन. गहान ठेवले घर ते मी सोडवीन. मालतीचे लग्न होवो.” सखाराम म्हणाला.

मालतीला बघायला येणार अशी कुणकुण आजूबाजूला पसरली. जो तो कौतुकाने विचारी.

लहान गावात लहानशी वार्ताही पटकन पसरते.

“काका, आतेला कोण बघायला येणार? आतेचे लग्न होणार?” जयंताने विचारले.

“जमले तर होईल.” सखाराम म्हणाला.

“काका, तुमचे लग्न कधी होणार? मी तुमचा हात बघू?”

“हातात काय बघायचे?”

“मला आहे माहीत. बघू तुमचा हात?”

“बघ.”

“तुमचे बायकोवर प्रेम नाही. तुम्हांला दहा मुले होतील. आणि काय बरे...”

“तुला कोणी शिकवले हात बघायला, जयंता?”

“आमच्या शाळेत मुले बघतात एकमेकांचे हात. असेच असते ना हातात? काका, आतेचे कधी होणार लग्न? मग बँड, लाडू, होय ना? वरातीत नळे, चंद्रज्योती!”

“आतेचे लग्न असे नाही व्हायचे.”

“मग कसे?”

“मुक्यामुक्याने. नुसत्या अक्षता टाकायच्या.”

“नाही काही.”

तिकडे आईने हाक मारली म्हणून जयंता गेला. सखारामही काही कामासाठी बाहेर जायला निघाला. परंतु दारात टपालवाला आला. त्याने एक पत्र दिले. ते त्या तरुणाचे पत्र होते. तो आज येणार होता. स्टेशनवर जायला हवे होते. त्याने घरात बातमी दिली. दादा बाजारात चांगली भाजी आणायला गेले. सखाराम स्टेशनवर गेला.

“माले, सुंदरसे पातळ नेस. कानात कुडी घाल. हातात सोन्याच्या बांगड्या घाल.” आई म्हणाली.

“आई, मी का प्रदर्शनाची वस्तू?”

“माझे ऐक. आईचे ऐक.”

वैनीनेही मालतीला गोड गळ घातली. अखेरीस मालतीने शृंगारसाज केला. ती खरोखरच आज रमणीय दिसत होती. परंतु तिच्या लावण्यात करुणा होती,-खिन्न गंभीरता होती.

“आज कोण येणार आई?” जयंताने विचारले.

“आतेला बघायला येणार. नीट वाग. गडबड करून नकोस. पारवीला रडवू नकोस.”

छोटी पारवीही ‘आतेचे लग्न, आतेचे लग्न-’ म्हणत होती.

“माझ्या भावलीचे लग्नही मी लावीन. आई मला लाडू देईल. भावलीला दागिने देईल. गंमत जंमत.” असे म्हणत ती नाचत होती.

सखाराम त्या तरुणाला घेऊन आला. दादाने स्वागत केले, नमस्कार-चमत्कार झाले. हस्तमुखप्रक्षालनादी विधी झाले. मालतीने चहा आणला.

“अय्या!” जयंताने टाळी वाजवली.

“जयंता, आत जा बघू.” दादा रागाने म्हणाला.

“ही माझी बहीण.” सखाराम म्हणाला.

“वाटलेच. चहा तर उत्कृष्ट झाला आहे. अगदी साहेबी थाटाचा. बसा उभ्या का?” तो तरुण म्हणाला.

“मी जाते, काम आहे घरात.” म्हणून मालती आत गेली.

“फार विनयी बोवा तुमची बहीण.” तो म्हणाला.

“विनय हेच तर स्त्रियांचे भूषण.” दादा बोलला.

“ती जुनी संस्कृती. नवसंस्कृतीत विनय म्हणजे दूषण ठरते. अहो, पुढे पुढे केले पाहिजे. गप्पा मारल्या पाहिजेत. हसले पाहिजे. धीटपणा हवा.” तो तरुण प्रवचन देऊ लागला.

स्नाने वगैरे झाली. सखाराम, दादा, आत पाटपाणी करीत होते. जयंता-पारवी बाहेर डोकावत होती.

“ये बाळ.” तरुणाने हाक मारली. जयंता धीटपणे बाहेर गेला.

“तुझे नाव काय?”

“जयंता.”

“छान आहे नाव.”

“तुम्ही आतेशी लग्न करणार?”

“तुला काय कळते बाळ?”

“मला सारे कळते. तुमचा हात पाहू?”

“तुला कोणी शिकवले?”

“मला येते. बघू दे हात.”

त्या तरुणाने हात पुढे केला. आणि गंभीर आव आणून तो पोरटा म्हणाला, “तुमचे लग्न होणार नाही. तुम्हांला दहा मुले होतील. आणखी काय बरे...”

“अरे, लग्न नाही मग मुले कशी होणार?”

“तुमच्या हातावर तसे आहे. मुले हात बघून असेच सांगतात!”

पारवीही बाहेर आली.

“आत्तेचे नोवरो काळे की गोरे?” ती म्हणत होती.

“मी आहे काळा!” तो तरुण म्हणाला.

“इश्श मेला काळा!” ती चिमुरडी म्हणाली.

“पारवी, जयंता,- तुम्हांला आत बसा, म्हटले ना? व्हा आत.” दादाने घसारा घातला.

“हुशार आहेत तुमची मुले.” पाहुणे म्हणाले.

जेवण सुरू झाले. फारसे बोलणे-चालणे होत नव्हते. परंतु तो विलायतेला जाऊ इच्छिणारा तरुण मालतीकडे बघे नि हसे. आणि मालती काही तरी वाढत होती. तो पुरे म्हणेना. ती आणखी वाढत होती.

“अहो पुरे. इतक्यातच आग्रह नका करू; पुढे करा. मी म्हटले, तुम्ही आपण होऊन वाढायच्या थांबाल!” तो छचोर तरुण म्हणाला.

मालती कोपायमान झाली. परंतु क्षणात मुखमंडळ शांत झाले.

जेवण झाले. मंडळी बाहेर बसली. पाहुण्यांना विडा देण्यात आला. विडा चघळीत व पेटवलेली सिगारेट फुंकीत तो तरुण आरामखुर्चीत पडून राहिला.

“तुम्ही जरा पडा. रात्रीचे जागरण असेल. पलीकडच्या खोलीत व्यवस्था आहे.” दादा म्हणाला.

“तुमची बहीण एकदम पसंत. सुंदर असून विनयी. परंतु इतके विनयी असून उद्या भागणार नाही. हसावे लागेल. शेकहँड करावे लागेल, कधी पेलासुद्धा थोडा तोंडाला लावावा लागेल. अपटुडेट राहावे लागेल. सवयीने जमेल त्यांना. बड्या सर्कलमध्ये एकदा वागायची सवय झाली की होईल सारे. अच्छा. मी जरा पडतो.” तो तरुण म्हणाला.

त्या खोलीतील अंथरुणावर ते पडले.

जयंत शाळेत गेला.

पारवीही झोपली.

दादा व सखाराम बोलत होते. त्यांना तो तरुण तिरस्करणीय वाटत होता.

वामकुक्षी झाल्यावर पुन्हा चहा आला. मालतीही तेथे बसली. मोकळ्याने बोलणे सुरू झाले. त्याने इंग्रजीतून प्रश्न विचारले. तिने टाइम्स वाचून दाखवला. खूष होऊन तो तरुण म्हणाला, “मी आहे का तुम्हांला पसंत? मला विचारा प्रश्न.”

“तुम्ही खादी वापराल का?” तिने प्रश्न केला.

“खादी वापरून साहेब कसे होता येईल? बडी नोकरी कशी मिळेल? मी नाही खादीच्या फंदात पडणार. ती नको तुम्हांला काळजी.”

“तुम्ही उद्या बडे अधिकारी झालात. समजा, देशात स्वातंत्र्याची चळवळ चालू असणारच. तुम्ही आपल्याच लोकांवर लाठी चालविणार का? गोळ्या झाडणार का?” तिने प्रश्न केला.

“राजनिष्ठा हा तर धर्म आहे. मी लाठीमाराचा, गोळीबाराचा हुकूम देईन तेव्हाच बढती मिळेल. मग मोटार घेऊ. तुम्ही तिच्यातून हिंडाल, राजाची जणू राणी व्हाल!”

“तुम्ही दारू पिता वाटते?”

“क्वचित घेतो. परंतु उद्या बडा अंमलदार झाल्यावर घ्यावीच लागेल. म्हणून सवय करीत आहे. आणि विलायतेतील थंड हवेत उद्या दारू न घेईन तर मरेन. थोडी दारू म्हणजे टॉनिक असे म्हणतात. पण या गोष्टी जाऊ देत. मी तुम्हांला पसंत आहे का? मी हडकुळा दिसलो तरी विलायतेत गेल्यावर लठ्ठ होईन. मी काळा असलो तरी तिकडे गेल्यावर गोरा होईन. सांगा.”

“दादांजवळ सांगेन.” असे म्हणू मालती उठून गेली.

“किती विनय हा?” तो तरुण उद्गारला.

“आपणाला विलायतेला जाण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?” दादाने विचारले.

“पाच हजार. आणखी जी रक्कम लागंल ती मी कर्ज काढीन. साराच भार तुमच्यावर नाही मी घालणार. मी विचार करून वागतो.”

“तुम्हांला दोन दिवसांनी कळवतो.”

“मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे.”

“विचारा.”

“तुमचे हे बंधू अविवाहितच आहेत. त्यांचेही लग्न आमच्या लग्नाबरोर व्हावे असे वाटते. माझी बहीण आहे. फारशी शिकलेली नाही, आणि एका डोळ्याने जरा अधू आहे. तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी, तसी मला माझ्या बहिणीची. मी तुमच्या बहिणीशी लग्न करतो; यांनी माझ्या बहिणीशी करावे. साधा सरळ व्यवहार!”

“मागून कळवू.” दादा म्हणाला.

पाहुणे जायला निघाले. मालती बाहेर आली नाही. सखाराम त्यांना पोचवायला गेला. गाडी गेल्यावर तो परत आला. दादा, सखाराम. मालता. सर्वांना त्याचा तिटकारा आला होता.

“सखाराम, काय ठरले?” आईने विचारले.

“बहुतेक ठरल्यासारखेच आहे.” तो म्हणाला.

“चांगले झाले. आता मी प्रत्यक्ष लग्नापर्यंत नाही जगले तरी हरकत नाही. एक चिंता मिटली. मला दोन दिवस मुळीच बरे वाटत नाही. जग सोडून जावे लागेल असे वाटते!”

“तू मालतीची काळजी नको करू. सारे सुरेख होईल. मी तुला वचन देऊन ठेवतो की तिचा संसार नीट मांडून दिल्याशिवाय मी कुठे जाणार नाही.” सखाराम म्हणाला.

आणि आईने खरोखरच अंथरूण धरले. मालती तिच्याजवळ बसून असे. मुलीचा हात हातात घेऊन माता डोळे मिटून पडून असे.

“मालती सुखी हो. थोरामोठ्याची तू बायको होशील. मोटारीतून हिंडशील, तुझे दैव मोठे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. गरिबांना हिडिस-फिडिस नको कधी करू. नको अभिमान. नको ताठा. गोड बोल. नीट रीतीने वाग. देवधर्म करीत जा. बरे का?” माता निरवानिरव करीत होती.

जयेत, पारवी यांना तिने जवळ घेतले. सुनेला आशीर्वाद दिला.

त्या रात्री सारी आईच्या अंथरूणाभोवती होती. सर्वांकडे प्रेमाने शेवटचे पाहून म्हातारीने राम म्हटला! मालती रडू लागली. सर्वांचेच डोळे गळत होते.

काही दिवस गेले. वैनी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. घरात तिघे भावंडे होती. मालती सारे करी.

“सखाराम, तू वकिलीचा तरी अभ्यास कर. काही तरी उद्योग करीत जा. नाही तर पुन्हा जीवनाचा कंटाळा येऊन तू निघून जायचास. मिळवता हो. संसाराला तुझीही थोडी मदत होऊ दे.” एके दिवशी दादा म्हणाला.

“मी तोच विचार करीत आहे. हायकोर्ट प्लीडरच्या परीक्षेस बसावे म्हणतो. मी पैसा मिळवीत नाही. दादा तुमच्यावर सर्वांचाच भार.”

“मी भार उचलीतच आहे. मिळत आहे तोवर सर्वांना मी पोशीनच, परंतु तू तुझ्या जीवनाच्या दृष्टीनेही विचार करायला हवा ना?”

“होय, दादा.”

सखाराम वकिलीचा अभ्यास करू लागला. आणि मालती घरात शिवणकाम करू लागली. हातशिवणाचे यंत्र तिला दादाने नुकतेच घेऊन दिले होते. तीही घरखर्चाला मदत करू लागली.

एके दिवशी घनाचे पत्र आले. सखाराम किती तरी वेळ ते पत्र वाचीत होता. पत्र खाली ठेवून तो गंभीरपणे बसला.

“भाऊ, कुणाचे पत्र?” मालतीने विचारले.

“त्या माझ्या मित्राचे.”

“घनाचे; होय ना?”

“हो. त्यानेही ती संस्था सोडली. तो तेथेच गावात राहतो. त्याने कामगारांची संघटना आरंभली आहे. तो त्यांचे रात्री वर्ग घेतो. त्यांना बरोबर घेऊन स्वच्छता करायला जातो. संडासही त्याने स्वच्छ केले.- मी घरी येऊन बसलो. घना सेवेत रमला!”

“त्याच्या पत्रात काय आहे?”

“तो आजारी पडला आहे. त्याने मला बोलावले आहे. मी जाऊ का?”

“त्यांना आपल्याकडेच का नाही घेऊन येत? येथे त्यांना बरे वाटेल. घरचे जेवण मिळेल. तेथे तू जाऊन तरी काय, घरच्यासारखे सारे थोडेच करता येणार आहे? नाही का?”

“मी त्यांना कळवतो की, तुला येण्याइतपत बरे वाटत असेल तर हवापालट करायला येथे ये. नसेल येववततर कळव; म्हणजे मी तुला घ्यायला येतो.”

“लिही, असेच लिही.”

सखारामने त्याप्रमाणे पत्र लिहिले. एके दिवशी घनाचे‘मला बरे वाटते, मी येतो.’ असे पत्र आले. सखाराम व मालती दोघे स्टेशनवर गेली होती; आणि उंच, सडपातळ घना भोटला. दोघा मित्रांनी एकमेकांचे हात हातात घेतले.

“किती वाळलास तू!” सखाराम म्हणाला.

“आता टॉनिक देऊन मला परत पाठव.”

“ही माझी बहीण, मालती हिचे नाव. मी तुमच्याजवळ हिच्याविषयी बोलत असे. बाबांची हा फार लाडकी होती. आईचीही. आई गेल्यापासून ती दु:खी-कष्टी असते. आजच तिची कळी जरा खुलली आहे.”

“ती तशीच राहो. पुन्हा म्लान न होवो.” घना म्हणाला.

तिघे घरी आली. घनाला थकवा वाटत होता.

स्नान केलेस तर बरे वाटेल.” सखाराम म्हणाला.

“भाऊ, पाणी तापलेले आहे.” मालती म्हणाली.

घनाने स्नान केले. नंतर जेवण करून तो झोपला. किती तरी दिवसांनी आज त्याला शांत झोप लागली होती. तिसरे प्रहरी तो उठला. त्याच्या तोंडावर प्रसन्नता होती. थकवा जणू पार निघून गेला होता.

“घना, चहा घेतोस ना?” सखारामने विचारले.

“घेतो.” तो म्हणाला.

मालतीने चहा आणला. सर्वांनी घेतला. नंतर तो वाचीत बसला.

“काय वाचता?” मालतीने विचारले.

“कामगार चळवळीचा इतिहास आहे.”

“तुम्हांला हे काम आवडते?”

“पडलो आहे खरा या कामात. परंतु माझ्या मनात अनेक कल्पना येत असतात. काही तरी विशेष करून दाखवावे, असे मनात येते.”

“विशेष म्हणजे काय?”

“समजा, उद्या संप झाला तर आम्ही काय करणार? एखादे वेळेस माघार घ्यावी लागते. शेकडो कामगार बेकार होतात. अशा वेळेस उपाय काय? कोठे तरी पडिक जमिनी असतात. तेथे शेकडो कामगारांसह जावे; तेथे सामुदायिक जीवनाचा प्रयोग करावा; एक नवीन सहकारी मानवी संस्कृती फुलवावी असे मनात येते. मी सुंदरपुरात काम करतो आहे. परंतु मनात अशी स्वप्ने येत असतात.”

“तेथे का संप होईल?”

“आज ना उद्या वेळ येईलच. फारच कमी मजुरी तेथे आहे. राहायची व्यवस्था नाही. सुंदरपूरच्या त्या संस्कृतिसंवर्धन संस्थेस कामगारांच्या पगारातून आजवर जवळ जवळ लाखो रुपये गेले असतील. हे पैसे कामगारांना परत का मिळू नयेत? त्यांतून त्यांच्यासाठी चाळी बांधता येतील. मी हे सर्व प्रश्न घेऊन मालकांसमोर जाणार आहे. परंतु आधी कामगारांची नीट संघटना व्हायला हवी. संघटनेवर सारी इमारत उभारायची. ती संघटना बांधण्याचे काम मी सध्या करीत असतो.”

“मला येईल का तेथे काम करायला?”

“हो, किती तरी येईल. तुम्ही बायकांत जात जा. त्यांचे वर्ग चालवा. त्यांच्या मुलांची काळजी घ्या. त्यांचे कपडे शिवा. कामाला काय तोटा? परंतु तुम्ही कशा येणार! सखाराम आला असता तर त्याच्याबरोबर तुम्हीही आला असतात.”

“भाऊ, आपण जायचे का सुंदरपूरला?”

“सध्या नको. आता कोठे अभ्यासाला सुरुवात केली आहे. आजवर प्रयोग करण्यात, भटकण्यात सारे आयुष्य गेले. एक काम तरी हातून पुरे होऊ दे. आई म्हणाली की दादाला मदत कर. आजवर सारा भार दादाने उचलला. माझ्या हातून ना झाली देशसेवा, ना कुटुंबसेवा.”

“हिंदुस्थानभर भटकून तू अनुभवाचे धन गोळा केले आहेस.” घना म्हणाला.

“परंतु ते संसारात थोडेच उपयोगी पडणार आहे? ‘प्रपंची पाहिजे सुवर्ण!” सखारामाने खिन्नपणे उत्तर दिले.

“भाऊ, हे आजारी ना आहेत? नको उगीच चर्चा.” मालती म्हणाली.

“तूच त्याच्याजवळ सारखे होलत आहेस!” सखारामाने टोमणा मारला.

“चुकले माझे.” ती हसून म्हणाली.

“मला आता जरा बरे वाटते.” घनाने सांगितले.

“आपण फिरायला जायचे का?” मालतीने प्रश्न केला.

“त्याला विचार.” सखाराम म्हणाला.

“तुमच्याने येववेल?” तिने विचारले.

“येईन. तुम्हा प्रेमळ बहीणभावांच्या संगतीत मला आनेदच वाटेल.” घना म्हणाला.

सायंकाळी तिघे फिरायला गेली. गावाबाहेर एक लहानसे सरोवर होते. सरोवराच्या काठी तिघे बसली. दूर कमळे होती. सायंकाळ झाल्यामुळे ती आता मिटत होती. सूर्याचे किरण सरोवरावर नाचत होते.

“आपण भाकरीचा खेळ खेळू.” मालती म्हणाली.

“आपण का लहान आता हे खेळ खेळायला?” सखाराम म्हणाला.

“खेळ केव्हाही खेळावे. खेळासारखे निष्पाप जगात काय आहे? मी येतो खेळायला.” असे म्हणून घनाने दगड गोळा केले. एक लहान दगड घेऊन त्याने तो पाण्यावर तिरकस फेकला. उड्या मारीत तो दगड गेला.

“तुमच्या दगडाला जणू पंख फुटले होते. तुमच्या हातात अजब शक्ती दिसते. आता मी फेकते हा दगड.” असे म्हणून मालतीने दगड फेकला. परंतु तो एकदम पाण्यात गेला. तो उड्या मारीत गेला नाही. सखारामच्याने आता राहावले नाही. तोही खेळात सामील झाला. तिघे खेळात रमली. घनाचे दगड नुसते पाण्याला स्पर्श करून उड्या मारीत जात. मालतीला कौतुक वाटे.

“रामनामाने शिळा तरत. तुम्ही का मनात रामनाम म्हणता?” तिने विचारले.

“लोकांची सेवा हे माझे रामनाम. जपजाप्य माझ्याजवळ नाही.” तो म्हणाला.

“तुम्ही देवबीव नाही मानीत” तुम्ही का नास्तिक आहात?” तिने हसत विचारले.

“नास्तिक म्हणजे काय? हे जग मांगल्याकडे चालले आहे असे मी मानतो. ही आशा ज्याच्याजवळ आहे- तो आस्तिक नव्हे का? देव आकाशात कोठेतरी आहे असे मानून या जगात प्रत्यक्ष वागताना जो वाटेल तसा वागतो, त्याच्यापेक्षा जगाच्या मांगल्यावर श्रद्धा राखून ते मांगल्य मानवी जीवनात यावे म्हणून जो धडपडतो तोच खरा आस्तिक, असे नाही तुम्ही म्हणणार? सखाराम तुला काय वाटते?”

“ईश्वराला न मानणारे नास्तिक पुष्कळ वेळ महान संतांप्रमाणे वागताना दिसतात, तर माळा ओढणारे दांभिक बगळे असतात.” तो म्हणाला.

मालती सायंकालीन आकाशाकडे बघत होती. तेथे जसे शतरंग फुलले होते. ती एकाएकी मुकी झाली. तेथील एका शिलाखंडावर ती बसली. सखाराम व घनाही तेथे बसले. सृष्टीला बघता बघता जणू समाधी लागली.

“चल भाऊ. उशीर झाला. मला स्वयंपाक करायचा आहे. वैनी असती तर तिच्या हातचा स्वयंपाक हे जेवते.” मालती म्हणाली.

“घना, आमची वैनी म्हणजे देवमाणूस. कधी आदळआपट नाही. द्वेष-मत्सर नाही. मालती घरात काम करू लागली की वैनी तिला म्हणते, ‘वन्स, तुम्ही कशाला करता काम? उद्या सासरी गेल्यावर आहेच काम.’ खरेच, दादा नि वैनीचा जोडा म्हणजे राम-सीतेचा जोडा.” सखाराम म्हणाला.

“तुम्ही कधी जाणार सासरी?” घनाने विचारले.

“लग्न झाल्याशिवाय कशी जाऊ?” तिने हसत उत्तर दिले.

“माझ्या लक्षातच नाही आले. मला वाटले की तुमचे लग्न झाले. मागे कोणी बॅरिस्टर आला होता ना?” घनाने प्रश्न केला.

“तो बॅरिस्टर नव्हता,- बालिशतर होता; बावळट होता त्याचा मला तिटकारा वाटला.” सखारामने सांगितले.

रस्त्यात घनाला जोराने ठेच लागली. आंगठ्यातून रक्त आले.

“बरेच लागले.” मालती म्हणाली.

“माझे लक्षच नव्हते.” घना म्हणाला.

“जपून जावे लागते जगात.” सखाराम म्हणाला.

तिघे घरी आली. दादाही घरी आला होता. मालती स्वयंपाक करायला गेली. गच्चीत आरामखुर्ची टाकून तिच्यात घना पडला. त्याच क्षणात डोळा लागला. दोघे भाऊ बोलत होते, मालतीच्या लग्नासंबंधी बोलणे होते.

“हे तुझे मित्र नाही का करणार लग्न?” दादाने विचारले.

“दादा, एकदम तुझ्या मनात कसे आले?”

“त्यांना पाहून मला पवित्र, पावन वाटले. असा नवरा मालतीला मिळाला तर तिच्या गुणांचे चीज होईल, असे एकदम मनात आले.”

“मी कसे त्याला विचारू? सुंदरपूरला तो सेवा करतो. कामगार संघटना करीत आहे. रस्ते झाडतो, शिकवतो. त्याला का मी संसारात गुरफटवू? आणि संसाराला नको काय? त्याच्याजवळ काय आहे? सुंदरपूरचे काही मित्र वर्गणी करून त्याचा खर्च भागवतात.” सखारामने सांगितले.

“माझ्या आपले मनात आले.” दादा म्हणाला.

“काय आले, दादा, मनात?” मालतीने विचारले.

“दुसरे काय असायचे मनात? तुझ्या लग्नाचे हो. आईच्या आत्म्याला एरवी समाधान मिळणार नाही.” दादा दु:खाने म्हणाला.

“दादा, मी तुम्हांला आज सांगून टाकते की माझ्या लग्नाचा विचार तुम्ही मनातून काढून टाका. ती चिंता अत:पर नको.”

“का? तू का कोणाला पसंत केले आहेस? आशी लाजू नको.”

“दादा, मी कोठे जाते का तरी? मी कोणाला पसंत करू? दरिद्री-नारायणाच्या सेवेत रमावे असे मला वाटते. आज ना उद्या तुझी मालती सेवेसाठी बाहेर पडेल.”

“मालती, तुझा मला बोजा नाही. तू काळजी नको करून. तुझ्यासाठी आम्ही खटपट करीत नाही असे का तुला वाटते? अशी वैतागाची भाषा नको बोलूस.” दादा म्हणाला.

“परंतु आधी जेवायला चला.” ती म्हणाली.

“घना, अरे घना-” सखारामने हाक मारली, डोळे चोळीत तो उठला.

“सुंदर स्वप्न पाहात होतो, कशाला उठवलेस?” तो म्हणाला.

“आधी पोटात जाऊ दे; मग भरपूर स्वप्ने बघत झोप.” सखाराम प्रेमाने बोलला.

जेवण-खाण झाले, आणि खरखरच घना लवकर झोपी गेला. तो आज थकून गेला होता.

आठ दिवस हा हा म्हणत गेले. आज घना परत जाणार होता. आज जेवायला शिकरण केली होती. तीच मेजवानी.

“पोटभर जेवा.” मालती म्हणाली.

“आज शिकरणशी केलीत?” त्याने विचारले.

“लग्नाचे हे केळवण!” दादा म्हणाला.

“ठरले वाटते कुठे लग्न?” त्याने सरळ विचारले.

“दादाला माहीत.” सखाराम म्हणाला.

घनाची बांधाबांध झाली. मालतीने पटकन एक डबा आणला.

“हा घ्या बरोबर.” ती म्हणाली

“कशाला ओझे?”

“वाटेत कमी करा. आणि तिकडे तुम्ही एकटे. कोण आहे गोडधोड द्यायला? तुम्ही जगाची काळजी घेता, तुमची कोण घेणार? आम्ही सामान्य माणसे. तुमच्यासारख्यांची थोडी सेवा हातून घडली तरी ती केवढी कृतार्थता! खरेच.” ती काप-या आवाजात म्हणाली.

“मालती, तुम्ही सर्व सुखी असा.” तो म्हणाला.

सर्वांचा निरोप घेऊन तो गेला. आगगाडीत बसल्यावर त्याच्या विचारांची गाडी भरघाव सुटली होती.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED