Pritilata - Ek paris sparsh - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रितिलता - एक परिसस्पर्श - 1

पुर्वी लोक एक-एकटे फिरत होते.नंतर ते एकत्र राहू लागले.समाज निर्माण झाला.जे शिकले त्यांनी प्रगती केली.तो समाज उच्च स्तरावर पोहचला.पण अशिक्षित लोक स्वतःची आणि पर्यायाने समाजाची प्रगती करू शकले नाहीत.त्यापैकीच एका समाजातील शाम आणि शंकर.

एका खेडे गावात हजार-पंधराशे लोक राहत असतील.गावात शाळा सातवी पर्यंत होती.गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती.शेती गावातून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असल्याने कांही समाजाने शेतातच घरं बांधली.गावातून बाहेर शेतात राहतात त्या घरांच्या समुहाला 'वस्ती' म्हणतात. शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना वस्तीवरून शाळेत दोन-तीन किलोमीटर अंतर चालून जावं लागायच.
शाम आणि शंकर हे दोन मित्र होते.इयत्ता- तिसरीचा निकाल लागल्यानंतर उन्हाळी सुट्टी लागली.उन्हाळी सुट्टी नंतर चौथीचा वर्ग चालू झाला.पण गावापासून दूर राहीलेल्या अशिक्षित पालकांना काय माहित शाळा चालू झाली की नाही.एक महिना उलटून गेला.पण शाम आणि शंकर शाळेत गेले नव्हते.एक दिवस घरच्यांनी त्यांना शाळेत पाठवले.पण यांना शिक्षणाची आवड नसल्यामुळे ते शाळेत जायला तंगसाची पिशवी घेऊन निघायचे पण अर्ध्या रस्त्यात नदी काठीला एक पेरूची बाग होती.पेरुच्या बागेतून मालकाचा डोळा चुकवून दप्तराच्या पिशवीत बसतील इतके पेरु, पेरूच्या झाडावरून तोडून घ्यायचे.आणि नदीत कमी प्रमाणात पाणी वाहत होतं.त्यामुळे ते नदीत वाळूत दिवसभर खेळत बसायचे.असा त्यांचा नित्यक्रम दोन महिने चालू होता.पण एक दिवस पेरूच्या मालकाने यांना पकडले.मालकाने त्यांना,
"कुणाचे रे तुम्ही?, नांवं काय तुमची?"
असे विचारून, दोन-दोन फटके दिले.माराच्या भितीने दोघांनी सगळं सांगितलं.तरीही त्यांना दिवसभर कासऱ्याने झाडाला बांधून ठेवले.संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांना सोडून
" पुन्हा कधी इथं दिसलाच तर तंगडी मोडून काढिन",
असा दम दिला. ते घाबरले, पेरूच्या मालकाने घरी येऊन सांगितले तर आपलं काय खरं नाय.त्यापेक्षा उद्या पासून शाळेत जात जाऊ.असे ठरवून ते इतर मुलं शाळेतून घरी येणाऱ्या रस्त्यात थांबले.शाळा सुटल्यावर मुलं घरी जात होते त्यांच्या सोबत हे घरी आले पण मनात मात्र भिती होती की, पेरूच्या मालकाने घरी येऊन सांगितले तर नाही ना?.

दुसऱ्या दिवशी, सकाळी उठून अंघोळ करून शाळेत जायला निघाले.दोन किलोमीटरचा रस्ता पार करून शाळेजवळ पोहोचले.शाळेत प्रांगणात प्रार्थना चालू होती. प्रार्थना चालू असताना जायचं नाही, नाहीतर छडीचा मार बसलाच हे नक्की.त्यामुळे ते प्रार्थना संपल्यावर जाऊं असे ठरवून शाळेजवळच्या भिंतीच्या आडोशाला उभे राहिले.प्रार्थना संपल्यावर मुलं आप-आपल्या वर्गात गेल्यावर हे दोघं पळत जाऊन वर्गात शिरनार इतक्यात एका शिक्षकाने यांनी पाहिले आणि बोलावून घेतले.आणि दोन-दोन छडीचा मार दिला.ज्या छडीचा मार बसू नये यासाठी केलेला प्रयत्न फसला.नवीन वर्ग, नवीन शिक्षक, काही नवीन विद्यार्थी,सारं काही नवीन दिसत होते.शिक्षिका वर्गात आल्या.त्यांनी हजेरी घेतली.नेहमीप्रमाणे त्या बोलल्या,
"चुकून कुणाची हजेरी घ्यायची राहिली असेल तर सांगा."
सहा मुले उभा राहिली.त्यातील चौघांची हजेरी लावली.या दोघांची नावं हजेरी पटात होती, पण कधीच हजेरी लावली नव्हती.एक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला,
" बाई,हे आज पहिल्यांदाच शाळेत आले आहेत."
"ये गप्प बस, नायतर शाळेच्या बाहेर घावलास कि माझा इंगा दावीन तुला",
शंकरने हळू आवाजात त्या मुलाला दम दिला.
बाई पुढे बोलल्या,
"शाम आणि शंकर तुम्ही दोघे दोन महिने आला नाहीत त्यामुळे मी तुम्हाला वर्गात घेऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या पालकांना घेऊन या, त्याशिवाय शाळेत यायचं नाही."
बाईंनी दोघांना शाळेतून बाहेर काढले.
शाम आणि शंकर हे दोघं मिळून घरी येऊ लागले.निम्म्या रस्त्यात आल्यावर शाम शंकरला बोलला,"घरी जाऊन आईला काय सांगायचं."
शंकर,"आसं करूया पेरूच्या बागंत न जाता सरळ नदीत जाऊ, तिथं खेळत बसू.संध्याकाळ झाली की रोजच्या सारखं घरी जाऊ."
त्यावर शाम,"पण कधीतरी घरी सांगायचं हायच कि,आसं करुया शाळेत जावून बाईंना सांगूया, घरी कुणी नाही"

शंकरने थोडावेळ थांबून,"चल घरी मी सांगतो काय सांगायचं ते."
असे म्हणून शामला पुढे केले आणि शंकरने पाठीमागून जोरात धक्का दिला.तसा शाम पालथा तोंडावर पडला.जोरात पडल्यामुळे पायाचं गुडघे, हाताचं कोपर फुटले.तोंडाला थोडं लागले होते.शाम रडू लागला, हळूहळू उठला. रडत रडतच उठून चालायला लागला पण गुडघ्यावर लागल्यामुळे त्याला चालता येत नव्हते.
"तू थांब हितंच, मी घिवून यीतू तूझ्या आणि माझ्या आयला", असे म्हणून शंकर पळत सुटला घरी.
शंकर घरी जाऊन त्याच्या आईला सांगितले ,"बाईंनी मला आणि शामला शाळंत जायाला उशीर झाला म्हणून मारलं, अन् सांगितलय आईला घिवून आल्याशिवाय शाळेत घेणार नाही."
"बर, असूदे.उद्या लवकर जा शाळंत."असा समजूतीचा सुर घेऊन शंकरची आई बोलली.पण यावर शंकरचं समाधान झाले नाही.तो शामच्या आईला सांगायला पळत सुटला.शामची आई शेतात काम करीत होती.

,"शामची आई-शामची आई, मला आणि शामला शाळंतंन बाईंनी मारत मारत बाहेर काढलंय.शामला पायरीवरनं ढकलून दिलंय.शामच्या तोंडावर, गुडघ्यावर लागलंय.तो तिथंच हाय आणि सांगितलंय आयला आणल्याशिवाय शाळंत याचं न्हाय."

क्रमशः

इतर रसदार पर्याय