Ti Ek Shaapita - 10 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 10

ती एक शापिता!

(१०)

त्या सकाळी आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीने सुबोधचे स्वागत केले. 'पत्नी आणि प्रियकराने मिळून पत्नीच्या मुलाचा खून केला...' मथळा वाचूनच एकूण घटना त्याच्या लक्षात आली. पुर्ण बातमी वाचण्याची त्याला गरजच भासली नाही. कारण त्या शीर्षकानेच त्याच्या डोक्यात विचार चमकला...'सुहासिनी-निलेशचे संबंध आता अत्यंत मोकळेपणाने सुरू झाले असतील. सुहासिनी सुखसागरात मनसोक्त विहार करीत असेल. ती समाधानी असेल. परंतु तशा काळात... तिच्या आनंदमयी वाटेत अशोक... अशोक आला तर? कालांतराने तो त्यांच्या संबधात अडसर ठरू लागला तर? ते दोघे मिळून तो अडसर म्हणजे अशोकला ... नाही. नाही. हा काय वेडेपणा करून बसलो मी. मला हा निर्णय घेताना अशोकची आठवण का आली नाही? त्यांना सुखाची गुरुकिल्ली देताना ती गोष्ट अशोकच्या जीवावर उठू शकते हे का मला सुचले नाही? हे परमेश्वरा, मला तशी दुर्बुद्धी का सुचली? माझ्या महान विचाराला अशोकच्या खुनाचा कलंक लागला तर...'

डॉक्टरांनी संभोगाचा कालावधी, स्त्रीचे समाधान आणि संतती यांचा आपसात काहीही संबंध नसतो ह्याचा निर्वाळा दिल्यानंतर त्याचे अशोकबद्दलचे मत बदलले होते असे नाही. अशोक माझा की निलेशचा या निर्णयापर्यंत तो पोहोचला नसताना अशोकच्या बाललीलांनी त्याला वेड लावलं. तो नकळत अशोकवर प्रेम करू लागला. त्यामुळेच वर्तमानपत्रातील बातमी वाचून तो कासावीस झाला. त्याला त्या गावी येऊन तीन महिने झाले होते परंतु तो पुन्हा तिकडे गेला नव्हता. सुहासिनी, अशोक आणि इतरांची भेट झाली नव्हती. सुहासिनी, निलेशला पत्रं पाठवून त्याने त्यांच्या संबंधाला

मोकळीक दिली होती. त्यानंतर तीन महिने त्याने अत्यंत समाधानात घालविले होते.

'मी एक चांगले काम केले आहे. ज्या सुखासाठी सुहासिनी तळमळत होती ते सुख मी तिला दिलंय. दानशूर म्हणून अनेकांची ख्याती असेल पण माझ्यासारखा दानशूर कुणी असेल का? मी माझी पत्नीच माझ्या मित्राला दान म्हणून दिलीय. या संस्कृतीत मी एक नवा अध्याय सुरू केलाय. तो समाजाच्या पचनी पडेल अथवा न पडेल परंतु माझ्या अभिनव कल्पनेमुळे माझी पत्नी सुखी, समाधानी झाली म्हणजे मिळवलं. तीन महिन्याच्या काळात मला अनेकदा सुहाकडे जावे वाटले पण त्याचवेळी दुसरा विचार आला, आता तर कुठे ती नवीन वाटेवर मार्गक्रमण करीत असेल, अशावेळी मी तिथे गेलो तर? तिला त्या मार्गाने जाताना माझी साथ तर नकोच सोबत माझी उपस्थितीही नकोच नको. घेऊ देत तिला ते सुख पूर्ण भरभरून घेऊ देत. आणखी एखादा महिना ते सुख तिला लुटता येईल. नंतर तर.. तर.. निसर्गाला तिचे ते सुख पाहवणार नाही. सहा महिन्याचा गर्भ पोटात असताना तिला तसे संबंध ठेवता येणार नाहीत.

घड्याळात दहाचे ठोके वाजले. सुबोध जेवण करून कार्यालयात पोहोचला. ते कार्यालय म्हणजे जुन्या कार्यालयाची सत्यप्रत! झेरॉक्स! चेहरे बदलले, रंगमंच बदलला असला तरीही कथानक आणि दृश्यं तीच होती. तो त्याच खुर्चीत बसला. त्याच्या शेजारी बसणाऱ्या कारकुनांमध्ये एक वेगळीच अर्थात रिकामटेकडे असणारांची चर्चा रंगली होती. तो पोहोचल्याचे पाहताच कुणी तरी त्याला विचारले,

"सुबोध, एक सांगा."

"काय?" सुबोधने विचारले.

"आमच्यामध्ये एक चर्चा सुरु आहे... स्त्री संबंधाची.."

"मी नाही समजलो."

"आमच्यापैकी एकाचे म्हणणे आहे की, तो त्याच्या पत्नीसोबत एकावेळी तासभर संबंध ठेवू शकतो."

तितक्यात दुसरा म्हणाला, "एक जण म्हणतोय की, सलग तासभर संबंध कुणीच ठेवू शकत नाही. तो स्वतः फार तर पंधरा मिनिटे संबंधात रमतो. तुमचे काय मत आहे?"

क्षणभर विचार करून सुबोध म्हणाला, "माझ्या माहितीप्रमाणे संबंधाचा काळ हा त्यावेळी त्या दोघांची शारीरिक, मानसिक स्थिती, एकांत, वातावरण अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. सारे काही अनुकूल असेल तर संबंध पंधरा मिनिटे आणि तासभरही चालू शकतात. परंतु जेव्हा मनःस्थिती बरोबर नसते, हवा तसा एकांत नसेल तेव्हा काहीच समाधान पदरात पडत नाही.."

"व्वा! छान विश्लेषण केलंय तुम्ही." एक जण म्हणाला नि चर्चेलाही पूर्णविराम मिळाला.

सायंकाळी सुबोध खोलीवर परतला. त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्या स्त्रीने त्याचे मधाळ हसून स्वागत केले. तिथे राहायला आल्यानंतर सुरुवातीला त्या स्त्रीचे वागणे आणि शेवटच्या काही दिवसातले तिचे वागणे यात बराच फरक पडला होता. पूर्वी ती स्त्री सुबोधची चाहूल लागताच डोक्यावरचा पदर सावरत लगबगीने आत जायची परंतु काही दिवसांपासून तिचे वागणे बदलल्याचे त्याच्या लक्षात आले होते. सुबोध बाहेरून यायची किंवा बाहेर जातानाची चाहूल लागताच ती स्त्री हातातील काम टाकून लगबगीने बाहेर येत असे. अनेकदा तर तिचे हात खरकटेही असायचे. स्वयंपाक करताना ती बाहेर येत असे. न ढळलेला पदर सावरण्याचा प्रयत्न करीत असे. नजरेत वेगळेच भाव असताना ती हसत असे. सुबोध तिच्याकडे दुर्लक्ष करून खोलीत गेला. हातपाय धुवून कामाला लागलेला असताना एक मंजूळ आवाज ऐकू आला,

"कालवण काय करता?"

सुबोधने मान वर करुन पाहिले. शेजारची स्त्री हातात वाटी घेऊन उभी होती. नजरेत नेहमीप्रमाणेच कामुक भाव होते. पहिल्यांदाच ती स्त्री त्याच्या खोलीत, जास्त जवळ उभी होती. वाटी ठेवण्यासाठी ती खाली वाकलेल्या अवस्थेत तिने पुन्हा सुबोधकडे बघितले पण सुबोधने तात्काळ नजर फिरवली. तितक्यात बाहेर कुणाची तरी चाहूल लागली आणि ती चपळाईने बाहेर गेली. बहुतेक तिचा पती आला असावा. सुबोधने जेवण आटोपले. गादी पसरून त्याने अंग टाकले. क्षणातच तो झोपेच्या अधीन झाला...

रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजत असावे. दारावर थाप पडली. नवविवाहितेच्या हुरहुरीने, लगबगीने तिने दार उघडले. दारात अपेक्षेप्रमाणे निलेश उभा असलेला पाहून सुहासिनी नखशिखान्त शहारली. तिच्या प्रतिक्षेला फळ मिळालं होतं. ती दारातून बाजूला झाली. निलेशने दार लावले आणि अशोकला सरकवत असलेल्या सुहासिनीला त्याने घाईघाईने मिठीत घेतले. तशी सुहासिनी लटक्या रागाने म्हणाली,

"अरे, अरे, थांब! थोडा धीर धर. एवढा उतावीळ का होतोय? माझी स्थिती तर पहा.."

"ओ सॉरी!..." असे म्हणत निलेश बाजूला झाला. अशोकला व्यवस्थित झोपवून सुहासिनी सरळ उभी राहिली न राहिली की पुन्हा निलेश तिच्याजवळ पोहोचत असतानाच अशोक जागा झाला. सुहासिनी परत अशोकजवळ गेली आणि तिने त्याला थापटायला सुरुवात केली. काही क्षणातच अशोक पुन्हा झोपी गेला तसा निलेश पुन्हा सुहासिनीजवळ गेला. परंतु त्याचा विरस झाला होता, भावना थंडावल्या होत्या. त्यामुळे कातावलेला, चिडलेला निलेश म्हणाला,

"काय ही कटकट, बाप देतोय नि पोट्टा हिरावतोय..."

"अरे, असा रागराग करू नकोस. पुन्हा..."

"पुन्हा? मला काय रात्रभर थांबता येणार आहे? तिकडे लक्ष्मी वाट पाहत असणार. अशोकची ही नेहमीचीच बोंब झालीय."

"खरे आहे. बापाने मोठ्या मनाने परवानगी दिलीय. त्यांना जाऊन तीन महिने झाले पण..."

"तर काय? हे कुठून मुळावर आलं तेच कळत नाही. याच्या अशा वागण्यामुळे समाधान तर होतंच नाही... त्यापेक्षा याचा काटा काढला तर?..."

"का..य? निलेश, माझ्या पोटचा गोळा आहे तो..."

"पण आता तो अडसर ठरतोय..."

"अरे, पण..." सुहासिनीच्या विरोधातील तीव्रता कमी झालेली पाहून निलेशने तिथे पडलेली एक उशी उचलली आणि ती उशी अशोकच्या चेहऱ्यावर दाबून धरली...

'ना..ही...' असे ओरडत सुबोध जागा झाला. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. तो पुटपुटला,

'असे स्वप्न का पडावे? सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचली त्याचा हा परिणाम असावा. मानवाच्या मनात जे विचार घर करतात तेच विचार स्वप्नात येतात...'मनी वसे ते स्वप्नी दिसे..' याप्रमाणे! गेली तीन महिने मी त्या दोघांच्या सुखाचा विचार करीत होतो तेव्हा स्वप्नेही तशीच पडत. त्या स्वप्नात त्या दोघांचे शारीरिक संबंध दिसायचे. परंतु त्या स्वप्नामुळे मला वेगळेच समाधान लाभायचे कारण स्वप्नात का होईना सुहासिनी समाधानात, सुखात, आकाशात विहार करताना दिसायची. तशा स्वप्नांचा शेवट माझ्यासाठी सुखकारक, इच्छापूर्तीचा होत असताना आज दुःखांत का व्हावा? आता तर त्या दोघांचे संबंध मुक्तपणे सुरू झाले असतील. त्यांचे संबंध जसे दृढावतील तसा सुहासिनी आणि माझ्यात दुरावा निर्माण होईल आणि वाढतही जाईल. नंतर माझी आठवणही त्यांना येणार नाही...' तो त्या विचारात असताना दुसराच विचार त्याच्या मनात शिरला,

'आत्ताचे स्वप्न खरे ठरले तर? त्यांनी अशोकला संपविले तर? अशोक! मायगॉड! अशोकसोबत मला एका व्यक्तीची आठवण का आली नाही? मी हा असा वेगळा निर्णय घेत असताना मी लक्ष्मीचा विचार का नाही केला? उद्या सुहा-निलेशचे संबंध लक्ष्मीला समजले तर तिची अवस्था काय होईल? तिने आकांडतांडव करून त्यांना विरोध केला तर? निलेशला तिची आठकाठी सहन होईल? अशोकप्रमाणे ते दोघे लक्ष्मीच्या जीवावर उठले तर? ते लक्ष्मीला संपविणार नाहीत कशावरुन?' विचारा-विचारात सुबोधला झोप लागली...

नेहमीपेक्षा थोडा उशिरा उठलेला सुबोध दात घासून आत आला. चहा ठेवण्याचा विचार करीत असताना शेजारचा इसम आत आला. त्याच्या हातात चहाच्या दोन कपबश्या होत्या. त्याला पाहताच सुबोध म्हणाला,

"या. या. चहाचा त्रास कशाला घेतलात?"

"त्यात कशाचा आलाय त्रास? अहो, तुम्हाला येऊन तीन-चार महिने झाले परंतु आपला परिचयच झालाच नाही. तसा योगच आला नाही. आपण आपल्या कामात असतो."

"हो ना. चहा छान झालाय."

"ते मात्र आहे. आमच्या बायकोसारखा चहा आणि स्वयंपाक कोणत्याच बाईला जमत नाही बघा. एक नंबर करते. एक सांगा, तुम्ही इथे आल्यापासून ना तुम्ही कुठे गेलात ना तुम्हाला कुणी भेटायला आले? घरी कुणी नाही का?"

"आहे ना. पत्नी आहे, मुलगा आहे." सुबोध म्हणाला.

"तरीही तुम्ही एकटे राहता? चार-चार महिने भेटायला जात नाहीत. कसं राहवतं हो तुम्हाला?.." असे विचारत तो इसम सुबोधच्या कानाशी येत म्हणाला, "आपल्याला तर रोजच रात्री हवं असते. एखादी रात्र खाली गेली तरी मला करमत नाही. माझी 'ती' भूक प्रचंड आहे. रोज रात्री दोन- तीन वेळा संबंध आल्याशिवाय मला झोपच लागत नाही. महत्त्वाचे म्हणजे स्त्रीची ती भूक भागवली ना तर स्त्री मुठीत राहते."

"दुसऱ्या गावी नोकरी करायची म्हणजे त्रास सहन करावाच लागतो."

"अहो, मग इथे आणा की.."

"नाही ना. तेच तर जमत नाही ना. बायकोला नोकरी आहे."

"व्वा! दोघं नोकरीला म्हटल्यावर काय मजा! पैसाच पैसा!"

"कशाचा पैसा? अहो, असे एकटे एकटे राहावे लागते."

"ते आहे म्हणा. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। बरे चलतो.." असे म्हणत तो निघाला...

काही वेळातच सुबोधने पटापट आवरले आणि तो कार्यालयात पोहोचला. कार्यालयात निलेशने केलेली तार (टेलीग्राम) त्याची वाट पाहत होती. त्यात लिहिले होते,

'सुहासिनी बाळंत झाली असून मुलगी झालीय. लवकर ये."

तो साहेबांच्या दालनात गेला. ती तार साहेबांना दाखवणार तितक्यात साहेब म्हणाले,

"मि. सुबोध, अभिनंदन! तुमच्या पत्नीची... सुहासिनीची बदली इथे आपल्याच कार्यालयात झाली आहे."

साहेबांच्या त्या वाक्याने सुबोधला आश्चर्याचा धक्का बसला. साहेबांकडे रजा देऊन तो निघाला...

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED