Navnath Mahatmay - 18 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग १८

नवनाथ महात्म्य भाग १८

नववा अवतार “चरपटनाथ”
===============

चरपटनाथाच्या उत्पत्तीची अशी कथा आहे...
पुर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व देव, दानव, हरिहर, ब्रह्मदेव आदिकरुन देवगण जमलेले होते.
पार्वतीचे अप्रतिम लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उप्तन्न झाला.
तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन त्याचे वीर्य पतन पावले.
तेव्हा ब्रह्मादेवास संकोच वाटला.
त्याने ते वीर्य टाचेने रगडले.
ते पुष्कळ ठिकाणी पसरले.
त्यापैकी जे एका बाजुस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासुन साठ हजार वालखिल्य ऋषि निर्माण झाले.
दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता.
तो सेवकाने केर झाडुन काढला त्यात झाडुन गेला.
पुढे लग्नविधीनंतर लज्जाहोमाचे भस्म व तो केर सेवकांनी नदीत टाकुन दिला.
त्यात ते रेतही वहात गेले.
पुढे ते एका कुशास ( गवतास ) अडकून तेथेच राहीले.
ते तेथे बरेच दिवस राहीले होते.
त्यात पिप्पलायन नारायणाने संचार केला.
तोच हा चरपटीनाथ.
हा मुलगा नऊ महिन्यांनी बाहेर पडुन स्पष्ट दिसू लागला.

सत्यश्रवा या नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहात असे.
तो सुशील व वेदशास्त्रांत निपुण होता.
तो एकदा भागीरथीतीरी दर्भ आणायला गेला असता कुशाच्या बेटात गेला.
तेथे त्याने त्या मुलास पाहीले.
तो मुलगा सूर्याप्रमाणें तेजस्वी दिसत होता.
त्यावेळीं सत्यश्रव्याच्या मनात त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या.
असे हे तेज:पुंज बाळ कोणाचे असावे बरे ?
उर्वशी तर आपले मुल टाकून गेली नसेल ना ?
किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथेघेऊन आल्या नसतील ? अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या.
तो मुलाकडे पाही, पण त्याला हात लावीना.
आपण ह्यास घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येई, पण मुलगा कोणाचा हे माहित नसल्याने त्या मुलास तो उचलून घेईना.
विचार करीत तो काही वेळ तेयेच उभा राहिला होता व मुलगा हातपाय हालवुन रडत होता.

थोड्याच वेळांत पिप्पलायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी त्या मुलावर पुष्पवृष्टी केली.
मुलाच्या अंगावर देव जी फुले टाकीत होते ती सत्यश्रवा बाजुला काढत होता .
देव एकसारखी फुले टाकीत होते पण सत्यश्रव्यास हे दिसत नसल्यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाच्च्याचा सर्व खेळ असावा असे त्याला वाटले.
मग तो जिवाच्या भीतीने दर्भ घ्यायचे सोडून चपळाईने पळत सुटला.
ते पाहून देव हसू लागले व म्हणाले,” सत्यश्रव्या पळू नको थांब तिथेच असे म्हणू लागले.”
ही आकाशवाणी ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सूटला.

मग सत्यश्रवाची भीति घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा.
म्हणुन देवांनी नारदास पाठविले .
नारद ब्राह्मणाचा वेष घेऊन सत्यश्रव्यापुढे येऊन उभा राहिला.
सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते.
इतक्यात ब्राह्मणरुपी नारदाने त्यास थांबवुन घाबरण्याचें कारण विचारले.
तेव्हा त्यानें आपल्या मनातल्या शंका सांगितल्या .
मग नारदाने त्यास एका झाडाखाली नेले व सावलीत बसुन स्वस्थ झाल्यावर पिप्पलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला.
तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणी मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितले.
नारद म्हणाला देवांच्या इच्छेवर भरवसा ठेवुन मुलास घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर.

हे सर्व घडलेले स्वर्गांत कसे कळले याबद्दल सत्यश्रव्यास संशय उप्तन्न झाला.
नारदाने आपल्या चमत्काराने त्याला देवांचे दर्शन केले, मग सत्यश्रव्याने नारदास म्हटले की, “तू सांगतोस ही गोष्ट खरी, आहे आता मला देव दिसत आहेत.
तु आता माझ्या सोबत चल व तो मुलगा तेथून काढून माझ्याकडे दे.”
मग ते दोघे भागीरथीच्या तटी गेले तेथे नारदाने आनंदानें तो मुलगा सत्यश्रव्याच्या स्वाधीन केला व त्याचे नाव चरपटीनाथ असे ठेवायला सांगितले .
नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरी आला.
सत्यश्रव्याची पत्नी चंद्रा परम पतिव्रता असून मोठी धार्मिक होती.
तो तिला म्हणाला, मी दर्भ आणावयस भागीरथीतीरी गेलो होतो तर देवाने आज आपणास हा मुलगा दिला.
याचे नांव चरपटी असे ठेवावे.
त्याच्या मुळेच देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले.
असें सांगुन सर्व वृत्तांत थोडक्यांत त्याने तिला सांगितला.
ते ऐकून तिला परम हर्ष झाला.
ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्ताने हे बाळ आपल्या हाती आले आहे .
असे बोलून तिने मुलास हृदयी धरले.
मग तिने त्यास न्हाऊ घालून स्तनपान करविले व पाळण्यांत घालून त्याचें चरपटी असे नांव ठेवले .
सातव्या वर्षी त्याची सत्यश्रव्यानें मुंज केली व त्यास वेदशास्त्रांत निपुण केलें.

पुढेएके दिवशी नारदाची स्वारी भ्रमण करीत करीत त्याच गावात आली.
एका ब्राह्मणाच्या वेषात नारद सत्यश्रव्याच्या घरी गेला.
तिथे त्याने चरपटीनाथास पाहिलें, त्या वेळेस त्याचे वय बारा वर्षाचे होते.
ब्रह्मदेवाच्या वीर्यापासुन चरपटीचा जन्म असल्यामुळें तो आपला भाऊ आहे असे त्याला वाटत असे .
नारद तेथुन निघुन बदरिकाश्रमास गेला व तेथें त्याने शंकर, दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ ह्यांची भेट घेतली.
मग चौघेजण एके ठिकाणी बसले असता बोलता बोलता चरपटीचा मूळारंभापासुन वृत्तांत त्यांना नारदाने सांगितला.
तो ऐकून शंकराने दत्तात्रेयास सांगितले ,”चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणावे त्यावर दत्तात्रेयाने म्हटले की पश्चात्तापावाचुन हित करुन घेता येत नाही.
चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल “
त्यावर नारदाने म्हटले की,” ही खरी गोष्ट आहे.
आता चरपटीस पश्चात्ताप होईल अशी व्यवस्था मी करतो.
पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी.”
इतके दत्तात्रेयास सांगुन नारद पुन्हा त्या गावी सत्यश्रव्याकडे आला व त्याने आपण विद्यार्थीं होऊन राहतो, मला विद्या पढवावी अशी त्यास विनंती केली.
सत्यश्रव्याने त्याच्या म्हणण्याला होकार दिला .
नारदास तो कुलंब या नावाने हाक मारी.
मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले.

सत्यश्रवा ग्रामपुरोहित होता.
एके दिवशी एका यजमानाकडे ओटीभरण होते.
म्हणुन त्याने सत्यश्रव्यास बोलाविले होते .
परंतु सत्यश्रवा स्नानसंध्येत गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठवले व सोबत कुलंबाला मदतीस दिले होते.
तो संस्कार चरपटीने यथाविधि पार पाडल्यावर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणली.
त्यावेळी काहीतरी कुरापत काढून व तंटा करून चरपटीचे संसारावरचे मन उडवावे असा नारदाने बेत योजून तो चरपटीस म्हणाला, “तू या वेळेस दक्षिणा घेऊ नकोस.
कारण आपण दोघे विद्यार्थीं आहोत व अजून अज्ञआहोत .
दक्षिणा किती घ्यावयाची हे आपल्याला समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देईल.
म्हणून तु ती घेतल्यावाचून तू घरी चल.
मागाहून तुझे बाबा सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेतील.”
त्यावर चरपटी म्हणाला, “मी रिकाम्या हाती घरी कसा जाऊ ? “
तेव्हां नारद म्हणाला ,”तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाही. “
हे ऐकून चरपटी म्हणाला, “मी यजमानापासुन युक्तीने जास्त दक्षिणा काढून घेतो.
वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखविल्यावर वडील कशासाठी रागे भरतील ?
उलट शाबासकी देतील “असे त्यांचे बोलणे चालू होते इतक्यात यजमानाने थोडीशी दक्षिणा उदकात बुडवून चरपटीच्या हातावर ठेविली.
नारदाने आधीच कळ लावून दिली होती.
त्यात दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नाही म्हणुन चरपटीस राग आला.
तो यजमानास म्हणाला ,”हे कार्य कोणते, ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्यायोग्य दक्षिणा किती द्यावी याचे तुम्हाला बिलकुल ज्ञान नाही. “
ते चरपटीचे बोलणे ऐकून यजमान म्हणाला, “मुला ऐकून घे.तुला पुष्कळ दक्षिणा द्यायला हवी पण यजमानाची परिस्थिती नसेल तर तो काय करील ?”
तेव्हा चरपटी म्हणाला, “परिस्थिती असेल त्यानेच असली कार्यें करावी .”
अशा तर्‍हेने दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बाचाबाची सुरु झाली.
ते पाहून चरपटीने दक्षिणेसाठी यजमानाशी मोठा तंटा करून त्याचे मन दुखविल्याचे वर्तमान नारदाने घरी जाऊन सत्यश्रव्यास सांगितलेआणि त्यास म्हटले ,”चरपटीने निष्कारण तंटा केला.
यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातातुन जाईल.
यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार.
आज चरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले.
आपण पडलो याचक, आर्जव करून व यजमानास खूष करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत.”
नारदाने हे सारे सांगितल्यावर सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लागलीच यजमानाकडे गेला.
तेथे दोघांची बोलाचाली चालली होती, ती त्याने समक्ष ऐकली.
ते पाहून त्याला मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्याने खाडकन त्याच्या तोंडात मारली.
चरपटी अगोदर रागात होताच, तशात बापाने शिक्षा केली.
या कारणाने त्यास अत्यंत राग आला व तो तेथून रागाने निघून गांवाबाहेर भगवतीच्या देवळात जाऊन बसला.
आता नारदाने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला .

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED