Jal tu Jvalant tu - 4 books and stories free download online pdf in Marathi

जल तू ज्वलंत तू! - 4

4

------------------

फिन्जानची आई मूळची भारतात राहणारी होती. तिचा जन्म जैसलमेर जवळच्या एका लहान गावात झाला होता. रस्बीने वयाच्या चार वर्षांपर्यंत चंद्र पाहिला नव्हता. तिला हेही माहीत नव्हते की, तारे म्हणजे काय? पानं, फुलं, झाडं, पक्षी चार वर्षांपर्यंत दिसले नव्हते.

वाळू आणि वाळू! चारी बाजूला उंच दगडी भिंत आणि आकाशातून येणारे ऊन एवढेच तिला माहीत होते. तिची आई अशा उन्हात इतर स्त्रियांबरोबर दळण दळत असे. कापड विणत असे. कधी बांबूच्या परड्या बनवत असे. कधी खडी फोडत असे. हे करत असताना तिला कांदा, चटणी, वरण आणि चार भाकरी मिळत. त्या भाकरी आई खात असे व काही तुकडे रस्बीला देत असे. तेव्हा तिचे नाव रसबाला होते.

या वाळवंटात रसबालासाठी एक लहानसा नखलीस्तान, अमृतासारखा दूधाच्या थेंबाचा झरा होता. तो तिच्या आईच्या छातीतून वाहत होता. बाकी सगळे जग रूक्ष आणि बदरंग होते.

रसबालाच्या जन्माची कहाणीसुद्धा अजब होती. ती गर्भात असताना एके दिवशी गावाबाहेर उंटावर पाणी विकणारा आला. सकाळपासून त्याची वाट पाहणार्‍या रसबालाच्या आईचा पारा चढला. तिच्यापुढे उभ्या असलेल्या महिलेने दोन हांडे पाणी खरेदी केले. उंटवाल्याची पखाल रिकामी झाली. पाण्याची किंमत चुकवण्यासाठी आणलेली अंडी तिच्या हातात होती. नाहीतर तिने त्या दोघांचे चेहरे ओरबाडले असते. पाणी घेणारी महिला पाण्याचा काळा बाजार करायला निघाली होती. दोन्ही हातात पाण्याने भरलेले हंडे घेऊन ती ठुमकत चालली होती. तिचे कोपर रसबालाच्या आईला लागले. हातातील तीन अंडी वाळूत पडून फुटली. वाळू इतकी तापलेली होती की त्याचे आमलेट झाले!

रसबालाच्या आईने मागेपुढे पाहिले नाही. आधी त्या महिलेचे केस धरून ओढले. मग झटक्यात तिचे दोन्ही हंडे फोडले. उंट घाबरून पळाला. पळापळ झाली. आता एका बाजूला फुटलेली अंडी, दुसर्‍या बाजूला पसरलेले पाणी, दोन्ही बाजूला तहान. दोघीत खूप भांडण झाले. रसबालाच्या आईने हातातल्या कड्यांनी त्या महिलेला मारले. थोड्याच वेळात गरम वाळूत रक्त दिसले. तमाशा बघणारे निघून गेले. रसबालाच्या आईच्या हातात बेड्या पडल्या. जे हात पाणी आणायला गेले होते, ते बेड्या घालून परतले. रसबालाच्या आईच्या हातून त्या स्त्रीचा खून झाला होता.

तिचे वडील मजूर होते. जामिन मिळवण्याचा प्रयत्न करेपर्यंत रसबालाची आई जेलमध्ये पोहोचली होती. अशाप्रकारे रसबालाचा जन्म जेलमध्येच झाला. तिच्या आजीने तिला पाहिले नव्हते, पण नाव ठेवले रसबाला. ती त्या मुलीला सांभाळण्यास सक्षम नव्हती. वृद्ध, अशक्त, जर्जर. रसबालाचे बालपण कोरड्या उन्हात खेळत आणि संध्याकाळी अंधार्‍या बराकीत बंद होण्यात गेले.

कैद्यांच्या मुलांना सांभाळणार्‍या एका संस्थेने जेलमध्ये प्रवेश केला तेव्हा रसबाला चार वर्षांची होती. एका समाजसेविकेने जेलमधल्या बायकांना समजावले की आपल्याबरोबर आपल्या मुलांचे भविष्य नष्ट करू नका. त्या दुर्दैवी स्त्रियांना यावर हरकत असण्याचे कारण नव्हते. त्यांच्या मुलांना कोणी अंधार्‍या भुयारातून उजेडाच्या जगात घेऊन जाणार असेल, तर त्यांना आनंदच होता.

रसबाला कैद्यांच्या मुलांच्या शाळेत गेली. तिथेच मोठी होऊ लागली. रसबालाच्या आईची शिक्षा पूर्ण होईपर्यंत कैदी स्त्रियांच्या या मुलींचे जीवन रस्त्यावरील कुत्र्या-मांजरासारखे होते! वेळेवर भाकरी मिळत होती इतकेच! बाकी त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने काहीही केले जात नव्हते. दाट जंगलातील मोठमोठ्या झाडांसारख्या बराकी होत्या. तिथे काम करणारे, सेवा करणारे, हुकूमत गाजवणारे सगळ्यांसाठी चार वर्षाची मुलगी आणि चोवीस वर्षाची तरुणी यांच्यात फरक नव्हता. जणू निसर्गाने स्त्री शरीर एकाच नजरेसाठी बनवले असावे. तिथे कोणी कोणाला काही सांगणारे नव्हते. कोणी ऐकणारे नव्हते. मुली वरण प्यायल्यावर कोपर्‍यापर्यंत आलेेले वरणाचे पाणी जसे पुसून टाकत तसेच मांड्यांमध्ये टपकणारे रक्त पुसून टाकत. त्यांच्या बरोबर खेळणारी मुलं असो की जेलचे कर्मचारी, ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा त्या मुलींचे कपडे काढत आणि आपलेही! असा नरकवास किती दिवस चालला असता कोण जाणे. रसबालाच्या नशीबाने एक मुस्लिम परिवार एका असहाय मुलीला दत्तक घेण्यासाठी तिथे आला. रसबाला त्या लाईनमध्ये होती. हे काम इतके सोपे नव्हते. त्यात अनेक अडचणी होत्या. अनाथालयाच्या अधिकार्‍याने जेव्हा पाहिले की, एक श्रीमंत स्त्री पुन्हा पुन्हा रसबालाला घेऊन जाण्याचा आग्रह करत आहे, तेव्हा मुलीच्या भविष्याचा विचार करून त्याने त्या मुस्लिम कुटुंबाला मदत केली. तिच्या माहितीत थोडे फेरबदल केले. अशाप्रकारे रसबाला रसबानो झाली. तिला कैदी स्त्रिची मुलगी न दाखवता अनाथ दाखवण्यात आले. नशीब लिहिण्यात विधातासुद्धा चूक करतो. माणसांचे काय? मुस्लिम दांपत्याने शाळेने केलेल्या सहकार्याबद्दल मोठे बक्षीस दिले. मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी टाकी बनवली. त्यासाठी हजारो रुपये खर्च झाले. आता रसबानो एका श्रीमंत कुटुंबात आली होती. तिच्या या वडिलांचा घोडे आणि उंटाचा व्यापार होता. चांगल्या वंशाचे अरबी घोडे लहान असताना खरेदी केले जात. त्यांना प्रशिक्षण देऊन मोठ्या किमतीला विकले जात. पश्चिमेकडून मोठी मागणी होती. त्याप्रमाणे चांगले जनावर तयार केले तर त्यांना खूप फायदा होत असे. उंट, घोडे पूर्व विभागात स्वस्त मिळत होते. त्यांच्यापासून चांगल्या वंशाची हायब्रीड जनावरे तयार केली जात. चांगले खाणे-पिणे, ट्रेनिंग त्यांना उमदे जनावर बनवत होती. पूर्व क्षेत्रात त्यांना चारा-पाण्यावाचून सोडून दिले जात असे. अशी जनावरं काही औपचारिकता पूर्ण करून फुकट मिळत असत.

रसबानोचे कुटुंब वर्ष-दोन वर्षातून एकदा खाडी देशात जात असे. बारा वर्षांची होईपर्यंत रसबानोने आपल्या आईवडिलांबरोबर हज यात्रासुद्धा केली होती. मक्का-मदिना आणि जेद्दाहमध्ये तिला फार आनंद मिळत असे. ती आपल्या वडिलांच्या व्यवसायाकडे लक्ष देत असे. तिला आईसारखी घरकाम आणि इतर मुलींच्या कामाची आवड नव्हती.

त्यांचा परिवार इतका मोठा होता की, रसबानोच्या आईलाही माहीत नव्हते की कोणत्या शहरात किती नातेवाईक राहतात. जिथे जाईल तिथे रसबानोला आपले लोक भेटत. आता ती अशा वयात होती की, त्या वयात सगळेजण मुलीला आपली मानतात. घरच्या लोकांना वाटते की मुलीने मर्यादेत राहावे. बाहेरच्या लोकांना वाटते, ती कुठेही उपलब्ध व्हावी. तिला वाटत होते जग का पाहू नये? रसबानोने मग मागे वळून पाहिले नाही. तिने आपल्या गत आयुष्याबद्दल ना कधी कोणाला विचारले ना कोणी तिला सांगितले. एवढे नक्की की जेव्हा ती भारतात आपल्या घरी येऊन परत जात असे तेव्हा घरातील, गावातील प्रत्येक वस्तू तिला आपल्याकडे ओढत असे. हा आपलेपणा का होता, कसा होता, रसबानोला कधी कळले नाही. एकदा या आपलेपणाचा स्वभाव, बुद्धी, टोचणी सुगंधाच्या रूपाने तिच्या मनाच्या झरोक्यातून डोकावली, जेव्हा सोमालियाहून आलेल्या एका तरुणाबरोबर तिच्या मनाच्या तारा जुळल्या. एकच गोष्ट होती की, विदेशी तरुणांच्या गर्दीत तिने त्याला पसंत केले होते. लांबून आलेले हे सैनिक स्त्रियांना पाहून वेगवेगळ्या हालचाली, खट्याळपणा, चेष्टा करत. त्यांच्यावर कोणाचा लगाम नव्हता. हा तरुण असा होता, जो रसबानोला पाहून खाली मान घालत होता. हे पाहून रसबानो सावध झाली. ती आपला चेहरा वर करत असे आणि तो तरुण लाजून खाली पाहत असे. रसबानोची रस्बी बनण्याची हीच कथा होती.

रसबानो आपली आई आणि इतर नातेवाईकांसह सुट्टीत फार्महाऊसवर राहायला आली होती. काही सैनिक फार्महाऊसपासून काही अंतरावर राहत होते. रसबानोला कळाले की, अमेरिकी सैन्याचे एक जहाज काही अंतरावर थांबले आहे. फार्म हाऊसवर काम करणार्‍या मुलांचे त्या जहाजावरील कामगारांशी, सैनिकांशी बोलणे होत असे. सैनिकांना लोकल बाजार आणि पाहण्यासारख्या ठिकाणांमध्ये रस होता. फार्महाऊसच्या कर्मचार्‍यांना अमेरिकेबद्दल जाणण्याची उत्सुकता होती. सैनिकांबरोबर आलेले लहान-मोठे सामानपण त्यांना आकर्षित करत असे.

मंद वार्‍याबरोबर वाहणार्‍या पराग कणांसारखे रसबानोचे नशीब अमेरिकी सैन्यात भरती झालेल्या एका सोमालियाई सैनिकाबरोबर बांधले गेले. काही महिन्यांनी रसबानोला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. सोमालियाची ओळख फक्त पतीचा देश एवढीच राहिली. अशाप्रकारे एका देशात जन्माला आलेली रसबाला खाडी मार्गे रसबानो बनली, मग आपल्या सैनिक पतीसह कायमची इथे आली.

इथे तिचे नाव रस्बी झाले. मुलगा म्हणून फिन्जान मिळाला.

तो म्हातारा, जो स्वत:ला रस्बीचा भाऊ म्हणवून फिन्जानकडून मामाचा सन्मान मिळवत होता, तो फिन्जानच्या वडिलांना फार्महाऊसवर एकदा भेटला होता. रस्बीच्या वडिलांनी दोन लग्नं केली होती. हा म्हातारा घोडे खरेदी करण्यात निष्णात होता. या कामात आपल्या वडिलांना मदत करत होता. व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे येणे-जाणे होतच होते.

म्हातार्‍याने फिन्जानला आग्रह केला की, त्याने त्याच्याबरोबर एकदा जेद्दाहला यावे. तिथे त्याला त्याचे नातेवाईक भेटतील. पण फिन्जानला या सगळ्या भाकडकथा वाटत होत्या. कारण त्याबद्दल त्याची आई कधी त्याच्याजवळ बोलली नव्हती. त्याला एवढेच माहीत होते की, त्याच्या आईचे आपल्या देशावर- अमेरिकेवर प्रेम आहे. अमेरिकी सैन्यात काम करताना तिने तिचा पती घालवला होता, तरीही आपल्या मुलाला ती सैन्यात पाठवू इच्छित होती. आता आपला आग्रह बरोबर घेऊन या जगातूनच निघून गेली. फिन्जानची नजर त्याच्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नावर होती. विधाता जगात अर्धवट गोष्टी कशा सोडतो? त्याने जगाचा ब्लू प्रिंट आधीच बनवला असता तर फिन्जानचे स्वप्न एक न् एक दिवस पूर्ण झाले असते.

स्वप्न डोळ्यात रेघ सोडून जातात. जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत डोळ्यात झोपेचे साम्राज्य पसरू देत नाहीत. फिन्जानने आपल्या नशिबाला मुक्काम दिला होता. आत्मसमर्पण केले नव्हते. काही दिवसांनी म्हातारा- फिन्जानचा मामा आणि रस्बीचा सावत्र भाऊ परत गेला.

एकेदिवशी फिन्जानने घरात एक विचित्र गोष्ट पाहिली. घरात तो एकटाच असूनही अशा काही गोष्टी घडत होत्या ज्याची त्याला माहिती नसायची. एके दिवशी त्याने फ्रिजमध्ये अशा वस्तू पाहिल्या ज्या त्याने कधी खरेदी केल्या नव्हत्या. त्याने खूप विचार केला की असे कसे होऊ  शकते?

असं तर नाही ना की त्याची स्मृती कमी होत गेलीये. त्याने बाजारातून काही गोष्टी आणल्या असतील आणि तो विसरला असेल. म्हातारपणी असे होऊ शकते. त्यात काही नवल नाही. पण फिन्जान अजून तरुण होता. त्याच्याकडून अशी चूक कशी होऊ शकेल? फिन्जानला एकदा वाटले, आपल्या मित्राला आर्नेस्टला सांगावे. पण मग विचार करून तो थांबला. तरुणपणी आपल्या मित्रांनासुद्धा आपली चेष्टा करण्याची संधी कोणी देत नाही.

अशा गोष्टी ऐकून कोणीही त्याची चेष्टा केली असती.

पण हळूहळू त्याला वाटू लागले, हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे. असे पुन्हा पुन्हा होऊ लागले. फिन्जान सकाळी उठला की बघत असे, त्याच्या अंथरुणाजवळ पाण्याची बाटली ठेवलेली आहे. त्याला चांगले आठवते की त्याने तिथे पाणी ठेवले नव्हते.

कधी कधी फिन्जानला भीती वाटत असे. हे सगळं काय आहे? या गोष्टींनी त्याला कधी काही त्रास झाला नव्हता. तरीही कोणी अशा घरात कसा राहील जिथे आपण न केलेल्या गोष्टी होत असतात. विशेषत: तेव्हा, जेव्हा घरात तुम्ही एकटेच राहत असता. फिन्जान आता घरी थोडा वेळ असायचा. आपला जास्तीत जास्त वेळ तो मित्रांच्या बरोबर घालवायचा. तो गंभीरपणे विचार करत होता की, आता त्याने काही काम केले पाहिजे. त्याला आठवले, त्याची आई त्याला सैन्यात पाठवू इच्छित होती. पण सैन्यात जाण्याचे त्याच्या मनात नव्हते.

मग त्याने बफलोमध्ये लहानसा व्यवसाय करायचे ठरवले. मुख्य रस्त्यापासून थोड्या अंतरावर एका गल्लीत पर्यटकांना आवडणार्‍या लहान-मोठ्या वस्तूंचे दुकान लावायला त्याला त्रास झाला नाही. फिन्जानच्या स्टॉलवर बरेच गिर्‍हाईक येत असत. त्यामुळे त्याला विचार करायला फारसा वेळ मिळत नव्हता. पण जेव्हा त्याला वेळ मिळत होता, तेव्हा तो पाहत होता की, त्याच्या दुकानातून तो सुप्रसिद्ध धबधबा नायगारा फॉल स्पष्ट दिसतो. कधी कधी त्याच्या मनात विचार येतो की, बर्फासारख्या शुभ्र पाण्याचे हे वादळ श्वासासारखे त्याच्या जीवनाशी जुळलेले आहे. या विचाराने तो हसत होता. नकळत फिन्जानच्या मनात उत्साह संचारला. त्याने नायगारा फॉल्स पार करण्याचे सहासी स्वप्न पाहणे सुरू केले.

फिन्जानने जिथे दुकान थाटले होते, त्याच्यापासून काही अंतरावर इतर मुलांनी वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. दिवसभर एकाच प्रकारचे काम करणारी ती मुलं रिकामा वेळ असला की एकमेकांना भेटत. गप्पा मारत. बघता बघता त्यांच्यात मैत्री होऊन जात होती. जवळच जुनी पुस्तकं विकणार्‍या एका मुलाशी फिन्जानची ओळख झाली. आता रिकाम्या वेळेत फिन्जान त्याच्याजवळ जाऊन बसत असे. धंद्यासंबंधी बोलणे झाले की, निघताना त्याच्याकडून पुस्तक घेऊन येत असे. फिन्जानला लहानपणी वाचनाची गोडी नव्हती. आतासुद्धा तो हलकीफुलकी मनोरंजक पुस्तकं वाचत असे. तो मासिक चाळत असे. संध्याकाळी परत देत असे. तिथेच एकेदिवशी फिन्जानला ते पुस्तक मिळाले. ते एकदा वाचायला सुरुवात केल्यावर तो त्यात गढून गेला. एकदोन गिर्‍हाईक परत गेले. फिन्जानचे लक्ष नव्हते. त्या पुस्तकात फिन्जानला त्याच्याबरोबर घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब दिसले. पुस्तक अशा लोकांबाबत होते, जे एकदा मृत झाल्यावरही वास्तविक मृत झाले नव्हते. कोणत्या ना कोणत्या रूपात या जगात होते.

पुस्तकात अशा लोकांना ‘आत्मा’ नाव दिले होते! हा आत्मा मृत्यूनंतर कुठे ना कुठे कोणत्यातरी रूपाने आपल्या ओळखीच्या लोकांना दिसतो. या आत्म्याशी संबंधित एखादी वस्तू समोर येत असे. मग कधी अदृष्य तर कधी दृष्य रूपाने ते आपल्या असण्याचा आभास देतात. आश्चर्य म्हणजे काही लोक या आत्म्याशी बोलत असत. त्यांची माहिती घेत असत. या लोकांचा आत्म्याशी दैवी संबंध असायचा.

फिन्जानने काही दिवसांपूर्वी जर हे सगळं वाचलं असतं तर इतर मुलांप्रमाणे त्यालाही वाटले असते की, हे मनोरंजनासाठी लिहिलेले किस्से आहेत. पण आता त्याला तसे वाटले नाही. त्याला स्वत: आपल्या घरात कोणाचीतरी अदृष्य उपस्थिती जाणवली होती. आता त्याची खात्री पटली होती की, त्याच्या घरात अशा आत्म्याचा वावर आहे.

त्या रात्री फिन्जान घरी गेला तेव्हा त्याने पाहिले की, घरात वेगळाच वास पसरला आहे. खोलीच्या भिंतीवर असलेला एक फोटोसुद्धा बदलल्यासारखा वाटला. तो फोटो तिथे बर्‍याच दिवसांपासून होता. आज त्याला वाटले, तो फोटो मोठा झाला आहे. असं कसं होईल! आपल्याला भ्रम होत असावा. किंवा दिवसा वाचलेल्या पुस्तकाचा मनोवैज्ञानिक परिणाम असावा.

नाही, हा मनोवैज्ञानिक परिणाम नाही! फिन्जानला चांगले आठवत होते की, त्याच्या अंथरुणावर पसरलेली चादर लाल नव्हती. लाल रंग असा नसतो की कोणी तो विसरेल.

फिन्जानने आठवण्याचा प्रयत्न केला की त्याने कधी आपल्या खोलीत लाल चादर अंथरली होती, पण त्याला आठवत नव्हते. तो अस्वस्थ झाला. त्या जादूच्या चादरीवर झोपण्याची त्याची इच्छा नव्हती. तो जमिनीवर बसला.

थोडा वेळ बसल्यावर त्याचे लक्ष भिंतीवरच्या एका छिद्राकडे गेले. त्याने पाहिले, त्या छिद्रातून सोनेरी रंगाच्या मुंग्या निघून भिंतीवरून एका रांगेत खाली येत आहेत. तो लक्षपूर्वक त्यांच्याकडे पाहू लागला. मुंग्या सरळ रांगेत एकमेकींपासून सारख्या अंतरावर चालल्या होत्या. असे वाटत होते, जणू त्यांना असे चालण्याचे प्रशिक्षण दिले असावे. फिन्जान विचार करू लागला, सैन्यात अभ्यास परेडच्या वेळी एकमेकांबरोबर चालण्यासाठी सैनिकांना कसे निर्देश देऊन प्रशिक्षित केले जाते आणि हा एवढासा जीव कोणत्याही निर्देशाशिवाय आपोआप रांगेत जात आहे.

फिन्जानने गंमत म्हणून त्यांची शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फक्त तीन-चार मुंग्या इकडेतिकडे झाल्या. थोड्या अंतरावर त्या पुन्हा रांगेत चालू लागल्या. फिन्जान पाहत होता की, त्या कुठे जात आहेत. त्यांच्या रांगेमागोमाग गेल्यावर त्या कुठे जात आहेत ते त्याला कळले. त्या लाल चादरीकडे जात होत्या. आता फिन्जानला उत्सुकता होती की, त्या लाल चादरीवर असे काय आहे की या मुंग्यांनी आक्रमण केले.

फिन्जानने पाहिले. चादरीच्या एका काठाला एक लहानसा मासा चिकटलेला आहे. चिंचेच्या आकाराचा सोनेरी-केशरी रंगाचा. मृत झाल्यावर आक्रसलेला. चादरीच्या सुरकुत्यांमध्ये अडकलेला. जिवंत असताना पाण्यात धूर सोडणारा, आता त्याचा निर्जिव देह धुराऐवजी दुर्गंधी पसरवत होता. खोलीतील दुर्गंधीची त्याला आता जाणीव झाली, जेव्हा त्याने मेलेला मासा पाहिला. या माशाच्या वासाने भिंतीवरून मुंग्या येत होत्या. माशाच्या देहाची विल्हेवाट लावण्यासाठी!

फिन्जानच्या डोक्यात अचानक काहीतरी चमकले. चादरीचा रंग बदलायला हा मासा तर कारणीभूत नसेल ना? या माशाच्या जीवंतपणी जसा त्याच्या शरीरातून धूर निघत होता तशी आता त्याच्या मृतदेहातून काही चमत्कारिक प्रक्रिया घडली असेल का? हा चमत्कार गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांशी संबंधित आहे का? की ही साधारण वैज्ञानिक प्रक्रिया आहे जी जीवजंतूंच्या शारीरिक बनावटीशी जुळलेली असते. त्या रात्री फिन्जान झोपला तेव्हा पहिल्यांदा त्याला स्वप्न पडलं. तो दमलेला होता. उशीर झाला होता. त्यामुळे गाढ झोप लागली. असं म्हणतात, गाढ झोपेत पाहिलेले स्वप्न जास्त स्पष्ट दिसते. त्याने पाहिले की, त्या माशाला फेकण्यासाठी त्याने तो हातात घेतला. त्याला वाटत होते, माशाचा फार वाईट वास येत आहे. म्हणून त्याने माशाला घरच्या कचर्‍याच्या डब्यात टाकले नाही. तो दार उघडून बाहेर पडला. गल्ली ओलांडून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या कचरापेटीकडे जाऊ लागला. त्या कचरापेटीला झाकण होते. लोक आपले पाळलेल्या कुत्र्या-मांजरांचे मलमूत्र त्यात टाकत असत. त्यात रासायनिक पदार्थ टाकून दुर्गंधी पसरणार नाही अशी व्यवस्था होती.

फिन्जानने झाकण काढून त्या मेलेल्या माशाला त्यात टाकण्याचा प्रयत्न केला. पण झटक्यात मासा उसळून पुन्हा फिन्जानच्या हातात आला. त्याला करंट लागल्यासारखा झटका लागला. त्याने हाताकडे पाहिले. तो ओरडला. त्याचा हात रक्ताने माखला होता. त्याने आपल्या हाताकडे निरखून पाहिले. हाताला जखम झाली नव्हती. मग रक्त कोठून आले? फिन्जानने घाबरून माशाला पुन्हा लांब फेकले. यावेळी मासा डब्यात पडला नाही. डब्याच्या दुसर्‍या बाजूला पडला. पण तेथून उसळी मारून पुन्हा फिन्जानच्या हातात आला. क्षणात त्याचा हात रक्ताने रंगला. रक्त इतके होते की, हात बरबटला. आता त्याला भीती वाटली नाही. त्याला चादरीचा रंग बदलल्याचे रहस्यही लक्षात आले.

आता त्याने सगळी शक्ती एकवटून माशाला लांब दाट गवतात फेकले. फिन्जानच्या हातात इतकी शक्ती होती की तो मासा जवळजवळ सत्तर फूट लांब जाऊन पडला. फिन्जानला घाम फुटला. मासा पुन्हा तेवढ्या अंतरावरून उसळी मारून फिन्जानच्या हातात आला.

आता फिन्जान भीतीने थरथरू लागला. रात्रीचे दोन वाजले होते. फिन्जानने माशाला खिशात टाकायचे ठरवले. आता कोणतीही भयानक प्रतिक्रिया झाली नाही. पण मासा हळूच पुन्हा फिन्जानच्या हातात आला. फिन्जानला थकवा आला. तो घराकडे परतला. घरी येऊन त्याने दार उघडण्यासाठी दाराला धक्का दिला. तेवढ्यात तो जागा झाला. तो उठून बसला. त्याने इकडेतिकडे पाहिले. सगळे व्यवस्थित पूर्वीसारखेच होते. त्याचे लक्ष त्याच्या हाताकडे गेले. ते स्वच्छ होते. हाताला रक्त लागलेले नव्हते. मासाही नव्हता.

रात्री चादर लाल झालेली असल्याने तो जमिनीवरच झोपला होता. त्याने अंथरुणाकडे पाहिले. चादर मूळ हलक्या रंगातच होती. चादरीवर मेलेल्या माश्याची निशाणी नव्हती. सकाळ व्हायला अजून अवकाश होता. फिन्जान जमिनीवरून उठून आपल्या अंथरुणावर आरामात झोपला.

ज्ञश्र

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED