Mall Premyuddh - 9 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 9

मल्ल - प्रेमयुद्ध


संग्रामला खूप उशिरा जाग आली. बेड वर तो उठून बसला. डोकं फार जड वाटत होतं. त्याने दोन्ही हाताने डोकं दाबून धरलं. त्याने आजूबाजूला पाहिले. तेजश्री कुठेच दिसत नव्हती. त्याने जोरात हाक मारली.
"तेजश्री..." तेजश्री स्वयंपाकघराततुन धावत वरती आली.
" डोकं जड झालंय... अमास्नी लिंबू पाणी पाहिजे. तेजश्री खाली आली.
राजवीर हातामध्ये तेवढ्यात ग्लास घेऊन आला.
" अरे ती कुठं गेली ते तुला पाठवलं." संग्राम चिडून म्हणाला.
" वहिनी ना... आधी तू हे घे..." संग्रामने लिंबूपाणी घेण्यासाठी हातपुढे केला. वीरने पाण्याचा ग्लासमधल पाणी त्याच्या तोंडावर भिरकावले. संग्रामला राग आला. वीरची असे वागणे त्याला अपेक्षित नव्हते. संग्राम खाडकन बेडवरून उठला.
"वीर हे काय वागणं?" संग्राम चिडला.
" काय म्हंजी? उतरली का?" वीरला राग अनावर होत होता.
" वीर मोठ्या भावाशी बोलतोयस... सांभाळून बोल" संग्रामने टॉवेल घेऊन तोंड पुसले.
" मोठ्या भावाने तस मानानं राहावं. घरात बायको असताना भायर जायची काय गरज हाय? आबा आईंनी हे संस्कार केले न्हाईत आपल्यावर." वीर रागाने बोलत होता.
" तुमि अमास्नी शिकवू नका." तेवढ्यात खालून आबांचा आवाज आला. दोघे खाली आले. खाली आल्यानंतर दोघांनी बॅग पहिल्या.

" तुम्हाला जर रोज त्या बाईच्या वाड्यावर जायचं असलं तर तिथंच रहा. घ्या बॅग भरल्यात. शेवटी निर्णय तुमचा हाय. आमची ऐवज थोडीथोडी इज्जत जाण्यापेक्षा एकदाच काय ती जाऊद्या. उचला त्या बॅगा अन चालते व्हा." तेजश्री आणि आई दरवाजात उभ्या राहिल्या होत्या.
" ह्यांनी ह्यांनी चोंबडे पणा केला ना.?" संग्राम तेजश्रीकडे बघून बोलला.
"आवाज खाली... संग्राम ... आमच्या घरात राहायचं असलं तर
तुम्हाला त्या बाईच्या वाड्यावर जाणं बंद करायला पाहिजे." आबा कडाडून बोलले. आज पहिल्यांदा आबा मुलाची चूक कबुल करून सुनेच्या बाजूने बोलत होते. तेजश्रीच्या डोळ्यांमधून पाणी आले. आबांनी त्यांच्याकडे पाहिलं.
" तुम्ही कशापायी रडताय रडायची बारी आता ह्यांची. चूक तुंकगी न्हाय... " आबांनी सुलोचनाबाईकडे पाहिले.
" उद्या तेजश्रीला तालुक्याच्या गावाला एक चांगल्या डॉक्टरकड न्यायचं. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी... उद्या तपासण्या करणार हायत. फकस्त मूक व्हत न्हाई म्हणून जर हे बाहेर शेण खात असत्याल तर... आबा परत चिडले." संग्राम काही न बोलता वर जायला निघाला.
" थांबा... एका शब्दाने जरी तेजश्रीला बोललात अन आम्हांसनी समजलं तर ..." संग्राम वर गेला. तेजश्री आणि सुलोचनाबाई सुद्धा आत गेल्या.
" वीर तुम्ही आमचं डोळ उघडलं... न्हायतर हे पोर हाताबाहेर गेलं असत.. तुमची ही कल्पना नक्की काम करल." आबा

तेजश्री काम करता करता डोळे पुसत होती.
" कशापायी रडताय? सुलोचना
"आई कस काय आबा एवढं बोलले ह्यांना?" तेजश्री
" हे आबा न्हाय वीरच काम हाय..." सुलोचनाबाई
" वीर भाऊजी...? पण आई मला भीती वाटती याना समजणार की हे मी त्यांना सांगितलं... आई मला वरच्या खोलीतच न्हाय जायचं. संग्राम तुम्ही नसल्यावर फार वाईट वागतात माझ्याबरोबर." तेजश्री
" काय बी व्हणार न्हाय... काळजी करू नका . फकस्त तुम्हाला थोडा जरी संशय आला तर लगीच सांगा." सुलोचनाबाई
तेजश्रीला बर वाटले पण भीती उद्याची होती. डॉक्टरांनी जर तिच्यामध्ये दोष आहे असं सांगितलं तर...?

" आठवडा झाला आपण त्यांच्याकडून जाऊन आलोय. आता त्यांना निर्णय सांगायला पाहीजेल नव्ह?" आशा दादांना म्हणाली.
"व्हय बघू आज बोलतो मी क्रांती बरोबर.." दादा म्हणाले तेवढ्यात क्रांती बाहेर आली.
" दादा मला मनापासून वीर बरोबर लग्न करायची इच्छा नाय पण तुम्हाला योग्य वाटत असल तर मी तयार हाय." आशाला मनापासून आनंद झाला.
"बघा मी म्हणाले व्हते ना की पोर आपल्या शब्दाबाहेर न्हाय... एक काम करा आबासाहेबांना फोन केउन कळवा.
" आशा घाई करू नका... क्रांती मनापासून तयार न्हाय. मनापासून तयार नसलेल्या नात्यात प्रेम कस तयार व्हनारे?" दादांनी क्रांतीच्या डोक्यावर हात ठेवला.
" आव आपण काय एकमेकांना बघितलं व्हत का नीट तरी झाला ना संसार, पोर- बाळ ... आत्ताच्या पोरासनी लय सूट दिली की डोक्यावर बसत्यात. अन काय झालं तरी ती खंबीर हाय तीच निर्णय घ्यायला आपल्याला आपल्या पोरीच्या बाबतीत काय करायचं हे कळत.तिच्यापेक्षा जास्त" आशा थोडी चिडली व्हती. तेवढ्यात बाहेरून सरपंचांनी हाक मारली.
"दादा हाय का घरात...?" प्रकाश
" व्हय हाय की पका ये ..." दादांनी त्यांना घरात बोलावले.
" दादा काय निर्णय झाला. एवढ्या मोठ्या लोकांना एवढ्या दिवसात काहीही निरोप पाठवणं बर न्हाय दिसत. अगदी त्यांनी कितीही वेळ आपल्याला दिला तरी. व्हय असलं तर व्हय म्हणून सांगू आणि न्हाय असलं तर तस सांगू." क्रांती सरपंचांना चहा घेऊन आली.
" क्रांती तुझ्यापेक्षा मोठा अन अनुभवानं सांगतो. आयुष्यात असे योग कमी येतात पोरी. तुझं भविष्य पुढं घडवशील पण योग्य वयात महत्त्वाचे निर्णय घेण चांगले असतं. तुला पटत नसलं तरी ठीक हाय पण एक सांगतो आयुष्यातली ही सोन्यासारखी संधी सोडू नकोस." प्रकाश क्रांतीला समजावत होते. क्रांतीला एक बाजूला करियर आणि दुसऱ्या बाजूला आई वडिलांच्या निर्णयाला दुजोरा द्यायचा होता. तिला वेळ हवा होता पण तसा विचार होत नव्हता.
" काका तुम्हाला, दादा - आईला जे योग्य वाटत असल ते करू.
मी तुमच्या शब्दाबाहेर न्हाय." दादांना क्रांतीची मानसिक अवस्था समजत होती पण आई खूप खुश झाली. प्रकाशने लगेच आबांना फोन लावला.
" नमस्कार आबासाहेब मी प्रकाश..." प्रकाश
" नमस्कार प्रकाश ... बोला..." आबांचा भारदस्त आवाज प्रकाशाच्या कानावर पडला. बाजूला वीर बसला होता.
" आनंदाची बातमी... दादांकडून होकार आलाय.
" वा वा प्रकाश लै आनंदाची बातमी दिली. बर पुढची बोलणी करायला पाहिजे. दादानाही बोला अन अमास्नी कळवा." आबांनी असे म्हणत फोन ठेवला.
" वीर मुलीकडच्यानी होकार कळवलाय..." वीर मनापासून हसला. सुलोचनाबाई आणि तेजश्री बाहेर आल्या.
" सुलोचना आवो बघता काय तोंड गोड करा सगळ्यांच... वीरच्या मनासारखं होणार हाय..." तेजश्री पटकन आत गेली आणि साखर घेऊन आली. सगळ्यांच्या हातावर साखर ठेवली. सगळ्यांनी तोंड गोड केले.
"सुलोचना चला सगळी तयारी करायला पाहिजे. त्यांच्याकडून आज रात्रीपर्यंत बैठकीचा निरोप येईल. आम्ही तर त्यांना सांगितलंय की पोरगी अन नारळ द्या... बस काय बी नको दुसरं." आबा आनंदाने बोलत होत.
" आबा एक बोलु." तेजश्री म्हणाल्या.
" व्हय बोला की..." आबा
" मला वाटत आधी साखरपुडा करून घ्यावा अन नंतर लग्न... या दोघांना साखरपुडा अन लग्न या दोन्हीमधी जर वेळ दयायला पाहिजेत. एकमेकांना समजून घेणं गरजेचं वाटतं." वीरला तेजश्री म्हणतोय ते पटलं.
" व्हय आबा ... क्रांती लग्नाला व्हय म्हणाली असली तरी तिला आम्ही आवडत नव्हतो. लग्नाआधी जरा वेळ पाहिजे." वीरने वहिनीच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
" व्हय वीर तुम्हाला पाहिजे तस व्हईल." आबा
तेवढ्यात भूषणने बाहेरून वीरला हाक मारली. वीर बाहेर पडणार तोच आबांनी भूषणला आत बोलवायला सांगितले. वीरने त्याला आत यायला आग्रह केला. भूषण मात्र तयार होत नव्हता.
"आज सूर्य कोणत्या दिशेत उगवला लेका??? मला आत बोलावत्यात. ठीक हाय ना बाबा सगळं?" वीर हसला.
" तू असा हसलास ना की मला भीती वाटते. तुझ्या हसण्यामध्ये गोम असते बघ." भूषण
" महितीयेना मग चल आत ... एक आबा काय सांगत्यात" वीरने त्याला दंडाला धरून आत नेले.
" या भूषण शेठ..." आबांनी त्याच स्वागत अश्या प्रकारे केलं त्याने भूषणच्या चेहऱ्यावर आणखी भीती दाटली.
" घाबरताय काय? या बस बर आमच्या इथे." भूषणला आता दरदरून घाम सुटला व्हता.
" सुलोचना अहो वीरच्या खास मित्रच तोंड गोड करा. साखर आना बर..." सुलोचनाबाई साखर घेऊन आल्या आणि भूषणला दिली.
" पण का???" भूषणने घाबरतच विचारले. वीर हळूच हसत होता त्याची अवस्था बघून वीरला हसू आवारात नव्हते.
" भूषणशेठ आव मुलीकडच्यांनी होकार दिला वीरला...आता लग्न ठरवायचं... तयारी करा तुमास्नी लय काम करायचं हाय..."
आबा उत्साहात होते.
" अरे वा... ! मस्त... अभिनंदन मित्रा..." भूषण उठला. आबांनी भूषणला हाताला धरून खाली बसवले.
" कुठे उठता? लग्न ठरवायला तुम्ही यायचं. वीर सांगल तुमास्नी कधी जायचं..." आबा
"व्हय व्हय नक्की येणार...." भूषण पहिल्यांदा वीरच्या घरच्यांचे वागणं बघून हैराण झाला होता. काय जादू होती एवढ्या वर्षात आबांनी पहिल्यांदा त्यांच्या जवळ बसून ठेवले होते.




प्रॅक्टिस करून क्रांती बाहेर एका दगडी कट्ट्यावर विचार करत बसली होती. रत्ना आवरून बाहेर आली. तिने क्रांतीला विचार करताना पाहिले आणि तिच्या शेजारी जाऊन बसली. क्रांतीचे लक्ष नव्हते तिच्याकडे.
" क्रांती... वीरचा विचार करतीस ना?" रत्ना पाणी पीत म्हणाली.
" त्याचा न्हाय माझा विचार करती." क्रांती
" तुझा विचार केला असतास तर ठाम सांगितलं असतं दादांना की तुला हे लग्न करायचं नाय..." रत्ना
" माझा त्यांनी विचार केला असलं म्हणूनच त्यांना हे स्थळ आवडलं ना... आई वडील जे करतात ते योग्यच असतं असच शिकवलं ना आपल्याला लहनपणापासून... मी तेच करती त्यांना योग्य वाटेल ते.." क्रांतीचे डोळे पाण्याने भरले.
" क्रांती अजून वेळ गेली न्हाय तू दादांना सांग मनात नसलं तर न्हायतर मी संतुशी बोलते." रत्ना
" नको आता न्हाय मी माझा निर्णय घेतलाय... यात काहीही बदल न्हाय व्हणार... जे घडवलं ते नशीब... आणि ते नशीब मी घडवणार... " क्रांती
" काय बोलती तु क्रांती मला काय बी कळत न्हाय... म्हणजे तू लग्न करणार वीर बरोबर... तू नको काळजी करू तुझ्या करियर वर तुझं किती प्रेम हाय मला माहितीये... मी एकदा संतुशी बोलते... वीर बरोबर लग्न करून जर तुझ करियर संपणार असलं तर मी हे न्हाय होऊन देणार..." रत्नाला काहीही सुचत नव्हतं ती क्रांतीचा निर्णय ऐकून फक्त बोलत होती.
" न्हाय आता मी हे लग्न करणारच... आता हे कोणी थांबवू शकत न्हाय..." क्रांती उठली आणि झपझप पावलं टाकत घराकडं निघाली. रत्ना अजून तिथंच बसली होती.





क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.






( अचानक घरच्यांनी तेजश्रीला पाठिंबा दिला संग्रामला काय वाटेल? संग्राम मध्ये दोष असेल की तेजश्रीमध्ये? क्रांतीने मनापासुन निर्णय घेतला नाही पण लग्नाला तयार का होते? )




इतर रसदार पर्याय