Objection Over Ruled - 4 books and stories free download online pdf in Marathi

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 4


प्रकरण चार

बाहेर आल्यावर पाणिनी ने सौम्या ला फोन लावला. “ जेवलीस का सौम्या ?”
“ नाही,नाही.तुम्ही मला थांबायला सांगितलं होत ना?”
“ मी जेवायलाच गेलो होतो.” पाणिनीम्हणाला.
“ हे बर आहे तुमचं.मला थांबायला........”
“ आणि जेवणा ऐवजी खून सामोरा आला.”पाणिनीम्हणाला.
“ कोणाचा खून झाला?”
“ पद्मनाभ पुंड ”“ अरे देवा ! ” सौम्याउद्गारली.“ असं कसं काय झालं पण? ”
“ काय माहिती ? झालं खर ” पाणिनीम्हणाला
“ आपलं अशील कोण आहे? ”
“ कोणीच नाही. अशिला शिवाय आपण खुनाचा खटला घेऊ शकत नाही का? ” पाणिनीने विचारले.
“ बहुतेक नाही घेऊ शकत.” सौम्याउत्तरली.
“ कनकला वर्तमान पत्र वाल्यांकडे पाठव, त्यांचे कडून पुंड च्या खुना बद्दल काही माहिती मिळाली तर काढायला सांग. ”
“ सर, हिशोबाच्या दृष्टीने हा खर्च कोणत्या तरी अशिला कडून वसूल करायला लागेल.कोणावर टाकू हा?” सौम्याने विचारले.
पाणिनीला असल्या गोष्टीत रस नसायचा. “ टाक त्या राजे बाई च्या नावाने.”
“ तू आता जा बाहेर जाऊन खावून ये ”पाणिनी तिला म्हणाला आणि आपल्या ऑफिस ला यायला निघाला.
त्याची अपेक्षा होती की सौम्या ऑफिस ला नसेल पण ती जेवायला बाहेर गेली नाही हे बघितल्यावर त्याला आश्चर्यच वाटले.पाणिनीने तिला त्याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली “ मी निघालेच होते जेवायला ,तेव्हढ्यात एक पांढरे कपडे घातलेली तरुणी ऑफिसात आली आणि तुम्हाला तातडीने भेटायचय अस सांगू लागली .तिला सांगितले मी की सोमवारीच भेटाल तुम्ही परंतू तिचा हट्टच होता की भेट घेणारच म्हणून ”
“ आता वेळ नाही आपल्याला दुसरे कोणतेही प्रकरण घेण्यात. तू तिला वाटेला लाव.” पाणिनीम्हणाला.
“ त्या तरुणीचे नाव काया प्रजापति आहे.” सौम्या म्हणाली
“ काहीही असुदे ......... थांब ,थांब सौम्या,प्रजापति म्हणजे, कुक्कुटपाल कंपनीशी संबंधित तर नसेल? ” पाणिनीने विचार केला.
“ म्हणून तर मी थांबवलं तिला.” सौम्याम्हणाली.
“ बोलू आपण तिच्याशी. ती बाहेर आहे? ”
“ बसवूनच आल्ये मी तिला.” सौम्या.
“ एकदम अधीर आहे ? ”
“ प्रचंड. पाठवते तिला मी आत.पण त्या आधी मला सांगा सर, मिसेस पुंड ने , नवऱ्याच्या खुनाची घटना कितपत स्वीकारली? ”
“ मी तिच्या स्वयंपाक घरात होतो तेव्हा,तारकर ने जेव्हा तिला ही बातमी दिली तेव्हा ती किंचाळल्याचे मी ऐकले.पण त्या आधी मी तिच्या दाराची बेल वाजवली आणि तिने दार उघडले, तेव्हाच तिचे डोळे मला रडल्यासारखे दिसले.तिला आधीच त्याच्या खुनाची कल्पना असावी.”पाणिनीम्हणाला.
पाणिनीने नंतर तिला सर्व हकीगत सांगितली.सौम्या प्रजापति ला घेऊन आत आली.
“ मिस्टर पटवर्धन, माझ्या वडिलांचे मत आहे की कुक्कुटपाल कंपनीच्या ट्रक ची भानू च्या गाडीला जी धडक बसली, ते प्रकरण तुम्ही भानू चे वकील म्हणून फारच कौशल्याने हाताळलेत.” काया प्रजापति म्हणाली.
“ मला वाटत तुम्ही एवढेच सांगण्यासाठी एवढ्या लांब आणि तातडीने आल्या नाहीत.” पाणिनीम्हणाला.
“ वडिलांचे म्हणणे आहे की भविष्यात काही अडचण आली तर तुम्ही आमच्या बाजूने वकील म्हणून उभे राहावे., म्हणजे विरुद्ध बाजूने वकिली घेण्या ऐवजी.”
“ तुमचे वडील कुक्कुटपाल कंपनीशी संबंधित आहेत? ” पाणिनीने शंका विचारली.
“ आहेत पण अप्रत्यक्षपणे.” ती म्हणाली.
“ वडलांचं नाव काय आहे तुमच्या? ”
“ रेयांश प्रजापति ”
“ तुम्ही माझ्याकडे आलाय त्या अर्थी ते सध्या काही अडचणीत आहेत?” पाणिनीने विचारले.
“ हो.माझ्या वडिलांचा एक सहाय्यक आहे,पुंड नावाचा, माझ्या वडलांच्या मालकीच्या बोटीवर त्याचा खून झालाय. त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे.त्यांना मदत करा तुम्ही.”
“ जेव्हा खून झाला त्यावेळी तुझे वडील बोटीवर होते?”पाणिनीने विचारले.
“ बोटीवर नव्हते. पण तीच मोठी समस्या आहे.म्हणजे ते बोटीवर नव्हते पण त्यांना लोकांना असे भासवायच आहे की ते बोटीवर होते.”
“ कुठे आहेत ते अत्ता?”
“ मला खात्रीलायक पणे नाही सांगता येणार.”
“ तुम्ही काही उत्तर देण्यापूर्वीच मी सांगतो की तुमच्या वडिलांचे वकील पत्र मी नाही घेऊ शकणार.”
“ कारण काय ?”
“ दुसऱ्या अशिलाच्या बाजूने मी आहे.आरक्ता राजेच्या ऐंशी एकर जमिनीच्या विषयात.”पाणिनीम्हणाला.
“प्रणव पालेकर हाच खरा मालक आहे ,कायद्याने.” ती म्हणाली

“ अहो त्याच्या ताब्यात आहे ती मिळकत.” काया प्रजापति म्हणाली.
“ बळजबरी ने घेतलेली ” पाणिनीम्हणाला.
“ तुम्हाला किती जागा हवी आहे ? ” अचानक तिने विचारले
“ भरपूर हवी आहे.” पाणिनीम्हणाला.
“ जमीन म्हणून त्याला .......”
“ काही किंमत नाही , मला माहीत आहे. पण नियोजित धरण क्षेत्रातील जमीन म्हणून नक्कीच आहे.”पाणिनी ,तिचे बोलणे मधेच तोडत म्हणाला.
“ धरण क्षेत्रातील जागा हा विषय कुणाच्या डोक्यातून आला मिस्टर पटवर्धन?”
“ हा सुचलेला विषय नाही तर वस्तुस्थिती आहे.” पाणिनीम्हणाला.
तिने पाणिनी कडे नजर रोखून पहिले.
“ आरक्ता राजे ना त्या जमिनीचे एक कोटी मिळाले पाहिजेत.” पाणिनीम्हणाला.
“ का ssss य ! ” ती किंचाळली. “ हे अशक्य आहे. केवळ अशक्य.”
“ त्यामुळेच मी तुमच्या वडलांची वकिली घेऊ शकत नाही असे म्हणालो ”
“ मला तुम्हीच हवे आहात वकील म्हणून. आपण दोन्ही विषय वेगवेगळे ठेऊ या ना ! तुम्ही जर त्यांची वकिली स्वीकारली तर चर्चेमध्ये तडजोड करा.” तिने तोडगा काढायचा प्रयत्न केला.
“ वडलाना खूप कठीण जाईल माझ्याशी तडजोड करणे.”
“ मला त्याचा अंदाज आला आहे. अत्ता ” ती म्हणाली.
“ तुम्हाला वडलांच्या वतीने बोलण्याचा अधिकार आहे ?”पाणिनीने विचारले.
“ अत्ता सारख्या तातडीच्या प्रकरणात आहे मला अधिकार.”
“ या बाबतीत कोणताही गैर समज आपल्यात असता कामा नाही.”
“ नाही होणार गैर समज ”
“ मी काय करणे अपेक्षित आहे तुम्हाला?”
“ माझ्या बरोबर तुम्ही येऊन एकत्रितपणे आपण वडलाना शोधावे ” ती म्हणाली.
“ काय करताहेत वडील सध्या? ”
“ एका अति महत्वाच्या प्रकल्पावर काम करत आहेत. ते कुठे आहेत ते कोणालाच समजणे हितावह नाही. त्यातील गुप्तता राखली जाणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मला सांगा की ते कितपत अडचणीत येऊ शकतात?” तिने विचारले.
“खुनात गोवले जाण्याच्या दृष्टीने ? ” पाणिनी ने विचारले
“ हो, त्या दृष्टीने. कसं आहे पटवर्धन, दर शुक्रवारी वडील त्यांच्या बोटीवर मुक्कामाला जातात.नदीच्या पात्रात जिथे भरती येते त्या जागी बोट नांगरली जाते.मग एक रात्र ते तिथे बोटीवर जगा पासून दूर एकांतात राहतात.गेले कित्येक वर्षे ते अस करत आलेत. या शुक्रवारी सुद्धा ते बोट घेऊन गेले होते आणि नेहेमीच्या ठिकाणी त्यांनी ती लावली होती, पण त्यांनी त्या रात्री तिथे बोटीत वस्ती केली नाही. ते एका मोठ्या प्रकल्पावर अत्यंत गुप्त पणे काम करत आहेत त्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा कोणाला कळू न देण्याचा ते प्रयत्न करत आहेत.”
“ ते कुठे आहेत याची कल्पना आहे तुम्हाला? ” पाणिनीने विचारले.
“ साधारण माहिती आहे. आपण त्यांना पोलीस तिथे पोचण्यापूर्वी शोधून काढणे आवश्यक आहे.”
“ का? ”
“ म्हणजे बोटीवर काय घडलंय त्यांना सांगता येईल.” काया म्हणाली.
“ पोलीस सांगतीलच की ”
“ ते त्यांना प्रश्न विचारून जाळ्यात अडकवतील आणि खून झाला तेव्हा ते बोटीवरच होते असे त्यांच्या कडून वदवून घेतील , वडील ते नाकारू शकणार नाहीत कारण आपण खरेच कुठे होतो याची माहिती गुप्त असल्याने ते देऊ शकणार नाहीत.”
“ म्हणून ते असे सांगतील की खून झाला तेव्हा ते बोटीवर होते? ” पाणिनीने विचारले.
“ हो.ते सांगण्यावाचून त्यांना गत्यंतरच नाही म्हणूनच आपण त्यांना पोलीस येण्यापूर्वी भेटलो तर पोलिसांना काय सांगायचे याबद्दल ते ठरवू शकतील.”
“ काहीतरी थापा मारू शकतील , असंच ना? ” पाणिनीने विचारले.
“ थापा नाहीत. सत्यच सांगतील पण संपूर्ण सत्य नाही कदाचित सांगू शकणार.जेवढे शक्य तेवढे सांगतील.” काया म्हणाली.
“ मला आणखी काही माहिती लागेल तुझ्या कडून.वडलांची केस घ्यायची की नाही हे ठरवायला.” पाणिनी म्हणाला. “ वडील काय करताहेत नक्की? ”
“ त्यांच काम राजकारणी लोकांशी संबंधित आहे. धरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या जमिनी बद्दल कुठल्या तरी राजकारण्याला लटकवण्याचा डाव खेळला जातोय.वडील त्या बद्दल मूलभूत माहिती जमा करायचे काम करताहेत.म्हणूनच काम पूर्ण व्हायच्या आधी त्याची माहिती बाहेर फुटणे म्हणजे जिवाशीच खेळ आहे. ”ती म्हणाली
“ मी नेमके काय करावे असे तुला वाटतंय? ”पाणिनी ने विचारले
“ माझ्या वडिलांना पूर्ण संरक्षण देणे, वकील या नात्याने. फक्त त्यांनाच नाही तर पर्यायाने सर्वच कुटुंबाला.”
“ आपण काय करणार आहोत? म्हणजे सुरुवात कधी आणि कुठून करायची? ”पाणिनी ने विचारले
“ तुम्ही बाहेर निघायची तयारी करा , लगेचच. कुठे जायचंय ते मी अत्ता नाही सांगू शकणार.” कायाम्हणाली.
“ आपण परत कधी यायचं? ”पाणिनी ने विचारले
“ वडील भेटले की लगेच.”
ते बाहेर पडले.पाणिनी ने सौम्या ला हाक मारली.कायाला न दिसता,डावा डोळा मिचकावला. “ आम्ही बाहेर जाऊन येतोय . तू तुझी वेळ झाली की खाऊन घे., खरं तर जेवायची वेळ टाळून गेली आहे आपली.”
“तुम्ही परत कधी येणार सर? ” सौम्याने विचारलं.
पाणिनी बोलायच्या आधी,कायाने च ठाम पणाने उत्तर दिले. “ अनिश्चित आहे ते.”
( प्रकरण चार समाप्त.)abh


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED