नटण्यावर प्रश्न चिन्हं नसावं? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

नटण्यावर प्रश्न चिन्हं नसावं?

नटण्यावर प्रश्नचिन्हं नसावं

अलीकडे महिला जास्त साजश्रृंगार करतांना आढळतात. याचा अर्थ असा नाही की पुर्वी साजश्रृंगार नव्हता. पुर्वीही साजश्रृंगार होता. पुर्वी महिला साजश्रृंगार करतांना अति प्रमाणात साजश्रृंगार करीत नसत. परंतू त्या साजश्रृंगार करीत. तसाच साजश्रृंगार पुरुषही करीत. परंतू काळ बदलला व बदलत्या काळानुसार पुरुषांनी नटणेपणा सोडला. महिलांनी तो सोडलेला नाही.
पुर्वीचा या साजश्रृंगाराबाबतचा इतिहास जर पाहिला तर या इतिहासात अश्मयुगाचं वर्णन हिरीरीनं करावं लागेल. अश्मयुगात ज्यावेळी माणूस झाडावरुन जमिनीवर आला, तेव्हा माणसं अलंकार म्हणून दगडाचा वापर करीत असत. त्यावेळी ते दगडापासून छोटे छोटे मणी बनवत असत. त्यानंतरचा काळ म्हणजे नवाश्मयुग. या काळात माणसानं हाडाचे अलंकार बनवले होते. त्याच काळात विशेषतः महिला वर्ग अंगाला उटणं देखील लावत असत.
व्यक्तीच्या नटण्याची परंपरा ही प्राचीन आहे. या परंपरेत पुर्वी माणसंही नटत होती. या नटण्यात पुर्वी मोरपीस किंवा प्राण्यांची पिसं डोक्यावर लावणे, शंखशिंपल्यांच्या माळा वनवून डोक्याला लावणे, हाडांचे व कातडीचे अलंकार वापरणे इत्यादी गोष्टींचा समावेश असे. कालचे राजेमहाराजे पाहता आजही ते महाराजे वेगवेगळ्या रंगाच्या माळा घातलेल्या दिसतात. हे राजे एखाद्या दासीनं वा गुलामानं चांगली आनंदाची बातमी सांगीतल्यास त्याला बक्षीस म्हणून आपल्या गळ्यातील माळ काढून देत. म्हणून त्यांच्या नटण्याला मान्यता होती. तशा राण्याही नटत होत्या. तसं पाहता आजही आदिवासी समुदायात लोकं वेगवेगळ्या रंगभुषेने नटत असतात.
आज मात्र नटण्याची स्पर्धा लागली आहे. आज पुरुष हा जास्त करुन नटत नाही. जास्त नटते ती महिला. पुरुष एखाद्या उत्सवप्रसंगी चांगले कपडे परीधान करतो. एखाद्या वेळी पावडर लावतो. कधी उटणेही. परंतू महिला? आज महिलाच जास्त प्रमाणात नटतांना दिसते. तिच्या नटण्याला लोकं पती असलेल्या पुरुषांच्या आयुष्याची कामना समजतात. आज अगदी जी गरीबही स्री असेल. तिलाही नटणं आवडते.
या नटण्याच्या बाबत विचार करतांना विशेष गोष्ट अशी की काही लोकं नटण्यासाठी कर्जही काढतात असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. परंतू त्यावर मत देतांना लोकं म्हणतील की असे प्रकार उघडकीसच आले नाही. मग लेखक महोदय असे कसे बोलतात. परंतू हे खरे आहे. कारण आज काही काही स्रिया ह्या अलंकार आधी बनवून घेतांना दिसतात व त्यानंतर त्या अलंकाराचे पैसे हप्तेवारी देत असतात. काही काही स्रिया, ह्या स्रियांवर कर्ज असतं लोकांचं, तरीही त्या नटत असतात.
नटणं हे स्रिच्या सौभाग्याचं लक्षण आहे. नटणं या प्रकारात केवळ सौभाग्यवतीच स्रिया मोडत नाही तर अगदी जन्म झालेल्या बाळापासून तर आज मरणाला खिळलेल्या अगदी म्हाता-या जराजर्जर झालेल्या महिलांचाही समावेश होतो. काही नटींच्या सौंदर्यात फरक पडल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसत आहे. काही महिलांना वयानुरुप येणारे काळे दाग चालत नाहीत. ते घालविण्यासाठी अगदी महागड्या क्रीम लावत असतात. तरीही ते काळे दाग जात नसल्यानं आज अशाच चिंताग्रस्त झालेल्या ब-याच महिला दिसतात. त्यांच्या चिंताग्रस्त असल्यानं आणखी जासूत सौंदर्य बिघडत असतं.
याबाबत विशेष सांगायचं म्हणजे नटणं हा आपला अधिकार आहे. नटा, नटण्याला मनाई नाही. परंतू कोणीही नटण्यासाठी कर्ज काढू नये वा पतीच्यामागं सतत नटण्यासाठी तगादा लावू नये. उदाहरण द्यायचं झाल्यास आज काही काही अशा स्रिया दिसतात की बाजूची बाई जर दोन हजाराची साडी वापरत असेल तर तिही तेवढ्याच पैशाची साडी घेवून मागते. घेवून न दिल्यास निराश होते. यामध्ये विचार असा आहे की जेवढी आपली ऐपत, तसं स्रियांनी वागायला हवं. बाजूच्या स्रिची जर चंद्रावर जायची ऐपत असेल आणि आपली नसेल तर आपण चंद्रावर जायची तयारी करु नये. तसंच अशा नटण्यासाठी पतीनं नकार दिल्यास स्वतः आत्महत्या करु नये किंवा आपल्या पतीला आत्महत्या करायला लावू नये.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आज महिलांनीच का नटावं? त्यांनीच नटण्याचा ठेका घेतला आहे काय? त्याच्या नटण्याचा पुरुषांच्या आयुष्य वाढविण्याशी कोणता संबंध? तरीही स्रियांनी नटावं यासाठी मध्यंतरीच्या काळापासूनच त्यांच्या नटण्यासाठी प्रथा पाडून ठेवल्या. तिला सोळा श्रृंगारांची देवी मानल्या गेलं. पुरुषांचं नटणं हळूहळू बंद केलं गेलं. या नटण्याबद्दलची समानताही हळूहळू नष्ट केली गेली. आता नटण्याची सवय पडली असल्यानं जर एखाद्या उत्सवप्रसंगी महिला नटली नाही वा तिनं कोणत्याही स्वरुपाचा साजश्रृंगार केला नाही तर तिला बरं वाटत नाही. त्याही पुढे जावून तिच्यावर प्रश्नचिन्हं उभे राहतात. नावबोटं ठेवली जातात. म्हणून नाईलाजानं का होईना परंपरा आहे म्हणून स्रिया नटतात. मग कोणताही प्रसंग का असेना, आजही काही काही समाजात महिलांना मरणातही नटविण्याची परंपरा आहे. पुरुषांना नाही.
आज स्पर्धेचा काळ आहे. या स्पर्धेच्या काळात लोकांच्या नटण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे. आज कोणी जर नटला नाही तर त्याला गरीब समजलं जातं. त्याच्यावर ताशेरे ओढले जातात व त्याचा पदोपदी अपमान समजला जातो. म्हणून कोणीही या नटण्यावर विशेषतः भर देवू नये. कोणी नटत नसेल तर त्याला नावबोटं ठेवू नये. तसाच आपल्या पाहण्याचा दृष्टीकोणही बदलावा. जेणेकरुन त्या व्यक्तीला वैषम्य वाटणार नाही. त्याला स्वतःचा अपमान झाला असंही वाटणार नाही. तसेच तो व्यक्ती कधीही आत्महत्या करणार नाही वा कोणाला करायला लावणार नाही. विशेषतः नटण्यावर प्रश्नचिन्हं नसावं म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०