True charity books and stories free download online pdf in Marathi

खरं दान

खरं दान

'सर' दुरुन शब्द ऐकायला आला.तसं भीमरावनं आपल्या अंधूक नजरेनं त्या मुलाकडं पाहिलं.तसं त्याला स्पष्ट दिसत नव्हतं.त्यातच जेव्हा तो जवळ आला.तेव्हा तो पायावर नतमस्तक झाला.तशी भीमरावची नजर त्या मुलाकडे गेली.तसा तो चेहरा ओळखीचा वाटला नाही. त्यानं त्या मुलाला विचारलं,
"कोण तुम्ही?"
"मी अभय.आपण मला शिकवलं."
"शिकोलं! मी शिकोलं! बेटा,तुह्या गैरसमज झालेला दिसते.मी बाबा शेतकरी होतो.आतापर्यंत शेतीच केली मी.आन् आता मरताखेपी माह्या पोरीन शयरात आणलं.म्हणून मी आलो शहरात.पण तू म्हणतेस का मी तुले शिकोलं,तं मी तुले शिकवाले मास्तर नोयतो एकाद्या शाळेचा."
"नाही सर.तुम्हीच मला शिकवलं."
"केव्हा शिकोलं?"
"मी फार गरीब होतो,तेव्हा मला शाळेची फी भरायला पैसा नव्हता.तेव्हा तो भरायला तुम्ही मदत नाही का केली.आठवा बरं."
"बेटा,आतं मले काई आठवत नाय."
भीमराव खेड्यात राहणारा खेडूत.तरुणपणापासूनच त्यानं गरीबीत जीवन काढलं होतं.त्याला पोटाला पैसा पुरत नव्हता.पण तरीही कोणी त्याचेकडे आलाच तर तो त्याला मदत करीत होता.शिक्षणाबद्दल त्याच्या मनात अतिशय कळ होती.
अभय असाच गावातला मुलगा.शिक्षण शिकायची हौस होती त्याच्या मनात.पण त्याचे मायबाप शिकलेले नसल्यानं त्याला ते शिकवायला तयार नव्हते.अशावेळी तो गावच्या शिवारावर सकाळी सकाळी रडत बसला होता.
भीमरावला सकाळी फिरण्याची सवय होती.तरुणपणात सकाळीच उठून तो शेतावर जात असे.तर आताही शहरात तो सकाळी फिरायला जात असे.असाच फिरता फिरता सकाळी हा अभय भीमरावला गवसला नव्हे तर त्यानं सर म्हणून आवाज दिला.
अभय शिवारावर रडत दिसला असता भीमरावनं त्याल् रडण्याचं कारण विचारलं.तसं अभयनं सांगीतलं की त्याला शिकायची इच्छा असून त्याचे मायबाप शिकवायला तयार नाहीत.ते परीक्षेची फी देखील देत नाहीत.जेव्हा भीमरावनं ते ऐकलं.तेव्हा त्यानं जे पैसे त्याच्या परीवाराच्या पोटापाण्यासाठी होते.त्याच पैशातून काही पैसे दिले.ज्या पैशातून अभयचं शिक्षण झालं.पुढं कमावता झाल्यावर अभय स्वतः काम करुनच शिकला.
भीमराव म्हातारा होता.त्याला आता तरुणपणाच्या गोष्टी स्पष्ट आठवत नव्हत्या.तरीही त्यानं अभयला ओळखलं होतं.त्याला हायसं वाटत होतं.तसा तो म्हणाला,
"आता काय करतोस?"
"मी वकील आहे.याच जिल्ह्याच्या न्यायालयात मी वकीलकी करतोय."
"अस्सं.माह्यी पोरगी बी वकील हाय.ते बी डीस्ट्रीक कोर्टात काम करते."
"कोणती? नयना काय?"
"नाय रं बाबा."
नयनाचं नाव काढताच भीमरावचे डोळे पानावले.त्यानं लांब श्वास घेतला.ते पाहात अभय म्हणाला,
"काय झालं सर?"
"काय नाय बाबा.नयना या जगात नाय."
"म्हणजे? तीच तर वकीलकी शिकत होती."
"शिकत होती.पण नियतीले ते मंजूर नोयतं.नियतीनं तिले हिरावून नेलं."
"कसं काय?"
"ते बलत्काराची शिकार झाली.त्यातच मरण पावली."
"कोण नीच तो.कोणं केला बलत्कार?"
"हं केला त्यानं.पण बाबा,त्याचं बी बरं झालं नाय.तो बी गेला गू खात."
"म्हणजे?
"एक्सेडंड झाला त्याचा.अन् ते त्याचे साथीदार बी मेलेत एक्सेडंडनं."
"केस चालली असेल ना."
"हो चालली.पण हारलो राजा."
तसे त्यानं डोळे पुसले.तसा अभय म्हणाला,
"या ना घराकडं."
"नाय बाबा,माह्ये हातपाय दुखतेत.आतं वागवत नाय.तुच येशीन.कोमललेबी भेटशीन.ते बी वकील आन् तु बी वकील.वळख होईन म्हंतो."
"बरं.आता जातो मी.पण नक्की भेटायला येणार हं."
"त्यानं भीमरावचा पत्ता घेतला.तसा तो चालता झाला.
अभय गेल्यावर भीमराव विचार करु लागला.किती चांगला मुलगा.जवळ आला.नतमस्तक झाला.अलिकडे तर एवढे शिक्षक मुलाला शिकवितात.ज्ञानदान करतात.पण कोणी सर म्हणून जवळ यायला तयार नाही.नतमस्तक होणं तर दूरच.शिक्षक एवढा पैसा कमवितात.ज्या पैशातून त्याचं घर तर भागतंच.शिवाय उरलेला पैसा ते ऐषआरामात खर्च करतात.पण एखाद्या गरीब मुलाला शुल्क भरण्यासाठी एक छदामही देत नाहीत.शिवाय त्यांना तो वेतनाचाही पैसा कमी पडतो.मग काय असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या फी मधूनही पैसा खातात.मग अशी मुलं शिकून मोठी झाली की ती त्या शिक्षकांबाबत सभ्यता पाळत नाहीत.नतमस्तक होणं तं तर दूरच राहिलं,साधं 'सर' हा शब्द देखील उच्चारत नाहीत.कुवत असतांना निःशुल्क कधीच शिकवीत नाहीत.त्यापेक्षा मी बरा की माझी परिस्थिती नसतांना मी त्याला दोनवेळा शिक्षणासाठी पैसा दिला.कदाचित तो दान जर मी मंदिरात दिला असता तर त्याचं महत्व राहिलं नसतं.पण हा शिक्षणासाठी दान दिलेला पैसा अहमियत ठेवून गेलेला आहे.माझ्या जन्माचं आज सार्थक झालेलं आहे की मी जरी शिक्षण घेतलं नसलं......कोणाला शिकवलं नसलं तरी मलाही कोणी सर म्हणतात.मान देतात.त्या प्राध्यापकाची नोकरी करणा-यापेक्षा मी सातपटीनं बरा.
लोकं लाखो रुपये मंदीरात खर्च करतात.कोणी मशिदीत देतात.कोणी अग्यारी तर कोणी चर्चमध्ये.कारण त्यात त्यांचा धर्म असतो.त्यांना वाटते की हा ईश्वर,अल्ला,देव आपल्याला दुःखापासून वाचवेल.काही लोकं म्हणतात की जो न तडपता लवकर मरण पावतो.त्याला पुढच्या जन्मात असंख्य यातना भोगाव्या लागतात.जो तडपत मरतो.त्याला पुढील जन्म सुखाचा प्राप्त होतो.पण असं होत नाही.पुढील जन्म कोणी पाहिला.तसंच धर्मासाठी दान केल्यानं पुण्य मिळतं हे कोणं पाहिलं.पाप आणि पुण्य इथंच असून खरं पुण्य अशा गरीब मुलांना शिक्षणासाठी दान देण्यात आहे.कारण या शिक्षणातूनच पुढं ते आपल्या पायावर उभे राहू शकतात नव्हे तर आपलं पोटंही भरु शकतात.
भीमराव विचार करीत होता.तसा वेळ बराच झाला होता.त्यानं वेळेचा अंदाज घेतला व आपल्या मुलीची न्यायालयात जायची वेळ झाली याचा वेध घेवून तो संथपणे घरी जायला निघाला.पण वाटेनं जात असतांनाही त्याच्या मनात त्या अभयबद्दल कुतूहल वाटत होतं.ज्यानं सर नावाची त्याला उपाधी दिली होती.

अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED