धर्मयोगी - भाग 1 -2 Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

धर्मयोगी - भाग 1 -2

धर्मयोगी नावाच्या पुस्तकाविषयी

धर्मयोगी नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अतिशय आनंद होत आहे. तशी धर्मावरील मी एक पुस्तक धर्मांतरण नावाची यापुर्वी वाचकांना दिलेली आहे. त्याच अनुषंगानं ही देखील पुस्तक मी वाचकांसाठी खास पर्वणी म्हणून लिहिलेली आहे. ही पुस्तक प्रेमावर आधारीत आहे. असं प्रेम की ज्याची आपण कल्पना करु शकत नाही.
प्रेमाविषयी सांगायचं झाल्यास प्रेमाच्या कथा आपण बऱ्याच वाचलेल्या आहेत. बऱ्याच चित्रपटांमधून पाहिलेल्या आहेत. काहींच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. परंतु असंही एक प्रेमाचं कथानक असू शकते की ज्यानं आपलं मत छिन्नभिन्न होईल. मनात विचारांचं वादळ सुटेल. लोकं तर्क वितर्क करु शकतील. परंतु ते गुपीत प्रेम आहे. आता ते प्रेम कशाचं आहे? मित्र मैत्रीणीचं की आणखी कशाचं आहे? यासाठी ही पुस्तक वाचावी लागेल. शिवाय ही पुस्तक वाचल्यावर आपल्या मनातील बऱ्याच शंकांचे समाधान होईल.
या पुस्तकाबद्दल आणखी सांगायचं झाल्यास ही पुस्तक भारत पाकिस्तान फाळणीवर आधारीत असून यातील पुर्णच भाग हा काल्पनिक आहे. त्याचा सत्याशी संबंध जोडू नये. कारण सत्य हे काल्पनीक आहे. महत्वपुर्ण बाब ही की दोन्ही देश चांगले असून केवळ पुस्तक लिहिण्यासाठीच काही बाबींची तुलना केलेली आहे. जी तुलनाही काल्पनिकच आहे. हे विशेष करुन सांगतो.
या पुस्तकाच्या शिर्षकाविषयी सांगतांना मी एवढंच सांगेन की या पुस्तकाच्या शिर्षकाविषयी बराच संभ्रम माझ्या मनात होता. माझे मित्र सुनील वाडेंशी मी कथानकाच्या माध्यमातून चर्चा केली. यातील काही काही भाग त्याच चर्चेतून साकार झालेले आहेत. त्यांनी या कथानकाला धर्मयोगी शिर्षक त्यांनी सुचविलं होतं. परंतु माझ्या मनात गुपीत प्रेम असं शिर्षक द्यायचं होतं. तसं पाहिल्यास माझी चर्मयोगी नावाची यापुर्वी एक पुस्तक निघालेली आहे. त्यामुळंच मला धर्मयोगी हे नाव पटलं नाही. तसंच गुपीत प्रेमही आवडलं नाही. कारण त्यातून एकच अर्थ निघत होता. तो म्हणजे प्रेमाचा. मला अनेक अर्थ निघणारं शिर्षक हवं होतं. त्यामुळंच एक वेगळंच नाव ओढ ठेवलं. ज्या शिर्षकातून अनेक अर्थ निघतात. परंतु ओढ नावाची एका लेखकाची पुस्तक प्रसिद्ध असल्यानं मला या पुस्तकाचं नाव बदलवून नाईलाजानं धर्मयोगी ठेवावं लागलं.
या पुस्तकाविषयी सांगायचं झाल्यास या पुस्तकात ओढ शिर्षकाअंतर्गत तीन अर्थ आहेत. ते हळूहळू आपल्याला पुस्तक वाचल्यावर समजेलच. ते धर्मयोगी नावानं समजणार नाहीत. शेवटी एकच सांगतो की शिर्षक कोणतेही का असेना, त्यातील कथानक व कथानकाचा अर्थ समजला म्हणजे झालं. आपण ती पुस्तक वाचावी व ते अर्थ कोणते? हे जाणून घ्यावेत ही विनंती. ही माझी एकोणसत्तरावी कादंबरी असून छ्यान्नवी प्रकाशित पुस्तक आहे. ही पुस्तक आपल्या आशिर्वादाची वाट पाहात आहे. आपण तो द्यावा व आवडल्यास एक फोन अवश्य करावा ही विनंती.

आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

धर्मयोगी कादंबरी भाग एक
अंकुश शिंगाडे

ती निरतिशय प्रेम करीत होती त्याचेवर. तशी ती बालपणाची त्याची मैत्रीण. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी. त्यातच त्यांच्यात पुढील काळात प्रेम निर्माण झालं व त्याचं रुपांतर हाताची नस कापण्यात झालं.
ती त्याचेवर प्रेम करीत होती निरतिशय. परंतु तो तिच्यावर प्रेम करीत नव्हता. अशातच त्याचं दुसऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरु झालं होतं. ती महिला होती धर्म. ती गोष्ट झाकून होती बरेच दिवसपर्यंत. परंतु कालांतरानं ती गोष्ट तिला माहिती झाली. मग काय ती त्याला बरीच बोलली. त्यावेळेस त्यानं तिला असे काही शब्द म्हटले की त्या शब्दाचा तिच्यावर आघात होवून तिनं आपल्या हाताची नस कापून स्वतःला दुखापत केली होती.
शर्मिला नाव होतं तिचं. ती आता या जगात होती. ती देवाघरी निघून गेली नव्हती एवढ्याशा चुकीनं. चूक तिची होती की तिची ती चूक आज तिला कळत नव्हती. ती आता म्हातारी झाली होती व मरणाची वाट पाहात होती. परंतु तिला मृत्यू येत नव्हता. तो मृत्यू यावा यासाठी तडपत होती तरी. तो मात्र मरण पावला होता, अपघातात. त्याचं नाव आबेद होतं.
धर्म...... तो धर्मावरही प्रेम करीत होता निरतिशय. त्याचं तिच्यावर तर प्रेम होतंच. परंतु त्याच्या दृष्टीनं त्याला धर्मही प्रिय होता. त्या धर्मापुढं त्याच्यासाठी प्रेम वैगेरे वायफळ गोष्ट होती. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आलं की ज्या धर्मावर तो प्रेम करतो, तोच धर्म त्याला आपला मानत नाही. तेव्हा त्याला पश्चाताप झाला व त्याला प्रेम आठवलं. परंतु तेव्हा वेळ निघून गेली होती. ज्याची परियंती अपघातात झाली होती. परंतु अपघात कसा झाला? त्याला पश्चाताप का झाला? वैगेरे प्रश्न आजही अनाकलनीयच होते.
आबेदचं बालपण अतिशय थाटामाटात गेलं होतं. त्यातच त्याला अगदी छान वाटत होतं. त्याच्या बालपणात रमणीयत्व होतं.
आबेदच्या बालपण हे कोकणात गेलं होतं. तेथील निसर्गरम्य वातावरण व त्या वातावरणात येत असलेली मजा रमणीय होती. ती मजा पाहिली की कोणालाही कोकणातच जावून राहावंसं वाटत असे. कोकणात संततधार पडणारा पाऊस. जो पाऊस थेंब थेंब स्वरुपात येत असे. जो पाऊस शेतात, बागेत व मैदानात पडत असे. तेथे पडून त्या ठिकाणाहून हिरवगार गवत उगवायचं. जे गवत मखमल अंथरल्यासारखंच दिसायचं. जे गवत पाहून एखाद्यानं गालिचं अंथरुणच पसरवल्यासारखं वाटायचं.
कोकणात पडणारा पाऊस नदी नाल्यातही आणि कोकणात विस्तीर्ण पसरलेल्या समुद्रातही पडायचा. तो पाऊस पावसाळ्यात पडायचा व पडल्यानंतर लोकांना थंडावा प्रदान करायचा. ज्यामुळं बेडकासारखे प्राणी, मोर या सर्व प्राण्यांना आनंद व्हायचा. तो आनंद पाहिला की पावसालाही अतिशय आनंद होत असे व तो आपल्या थेंबाचा वेग वाढवीत असे. त्यानंतर तसा पाऊस पडायला लागला की मोर आपला पिसारा फुलवून थयथय नाचत असे आणि बेडकं आपल्या मंजूळ आवाजानं गाणी गात असत. त्यातच पावसात एकदा तरी भिजावे. असं आबेदला वाटत असे.
पावसाळा......... पावसाळा कुणाला आवडतो तर कुणाला अजिबात आवडत नाही. कारण पावसाळ्यात संततधार पाऊस पडत असतो. त्यातच लहान मुलं बाहेर निघून पावसात भिजलीच तर आई वडील सारखे ओरडत असतात. म्हणत असतात की बाहेर निघू नकोस. पावसात भिजशील. अन् तेच घडतंही. बाहेर पावसात निघालो आणि भिजलोच तर सर्दी पडसं होतं आणि विनाकारणच खर्च मायबापांवर पडतो. जे काबाडकष्ट करुन पैसे मिळवीत असतात.
पावसाळ्याबद्दल सांगायचं झाल्यास कालही आबेद पावसात भिजत होता. त्याचा जन्म ग्रामीण भागातील. त्याचं गाव ग्रामीण असल्यानं त्या काळात गावात रस्तेही नव्हतेच. शिवाय गावात एक शाळा होती. ती घरापासून थोडी लांबच होती. तसं पाहिल्यास जास्त रहदारीही नव्हतीच. मधली सुट्टी शाळेला व्हायची. तेव्हा तो घरी जेवायला यायचा. त्यातच दुपारी पाऊस आला तर मग त्याची मजाच मजा. त्याला पावसाची चिंता वाटायची नाही. उलट मजाच वाटायची. मग तो शाळेत गेलाच आणि मधली सुट्टी झालीच तर तो त्याच्या बाईला न घाबरता चक्कं पावसात घराकडे त्या तेवढ्या पावसात धुम्म पळत सुटायचा. अन् घरी गेल्यावर आई ओरडायची. केसं पुसून द्यायची. म्हणायची की असं येत जावू नकोस. सर्दी होईल. आजारी पडशील. परंतु ते बोलणं मनावर घेत नव्हता तो. कारण त्यावेळेस आजार त्याच्या पाचवीलाही शिवत नव्हताच. याचा अर्थ त्याला आजार होत नसेल काय? आजार होतच होता. सर्दी सदोदीत राहायची आणि ती सर्वांनाच असायची. त्यामुळंच त्याचा बाऊ वाटायचा नाही. तशी आई नेहमीच म्हणायची. शेंबूड काढून टाकत जा. रुमालानं पुसत जा. परंतु ऐकतो कोण? सारखं सर्वांचं शाळेत फुरक फुरक करणं सुरु असायचं. परंतु तसं असलं तरी डॉक्टरचं तोंड पाहात नव्हता तो, वर्ष न् वर्ष.
शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवणाला घरी आलाच तर आई जेवन झाल्यावर कपडे बदलवून पाऊस येत असेल तर छत्री द्यायची व तो ती छत्री घेवून शाळेत निघायचा. परंतु ती छत्री आईला दाखविण्यापुरतीच असायची. एकदा काय घरातून बाहेर पडलाच की बस. तो ती छत्री बंद करीत असे आणि बंद्या पावसात पावसाची मजा घेत धावत पळत शाळेत जात असे. तशी त्याची बाई देखील छानच होती. ती तो भिजलेला शाळेत गेलाच तर त्याला सुट्टी द्यायची. मग संपूर्ण दिवस आनंदात जायचा. त्यामुळंच पावसात भिजण्याचा आनंद काही औरच असायचा आबेदच्या जीवनात.
आबेद पावसात भिजत असे. अलबत पाण्यात उतरत असे आई ओझल होताच. त्यावेळेस आई म्हणायची, "बापू, पाण्यात जळू असते. ती रक्त पिते. ती एकदा का अंगाला चिकटली की पुर्ण रक्त पिल्याशिवाय सोडत नाही. मग माणूस मरतो." तेव्हा थोडीफार भीती वाटायची. परंतु पुढल्याच क्षणी मित्र म्हणायचे, "अरे, जळू काही करीत नाही. ती अंगाला चिकटलीच तर तिच्या तोंडावर मीठ टाकायचं. ती पळते." असं मित्रानं सांगताच मित्रांबरोबर तोही त्याच्या खिशात मीठ ठेवत पावसात फिरत असे. त्यातच पावसाची त्याला अजिबात भीती वाटत नव्हती.
तो पाऊस...... तो पाऊस आलाच तर रस्त्यारस्त्यावर पाणी गोळा व्हायचं. त्यात पाय बुडायचे. परंतु त्या पाण्यातून घोड्यासारखं धावतांना जी मजा येत असे. ती आता येत नव्हती. लहानपणी भीती वाटायची सापाची. परंतु तिही भीती कालांतरानं लहानपणीच नष्ट झाली होती. पावसाळ्यात गावात लपायला येणारी माकडं बंद पावसात हाकलून लावायला मजा यायची. ती आता येत नव्हती. व्यतिरीक्त अलिकडचे आजार हे लहान मुलांच्या पाचवीलाच पुजलेले दिसत होते. शिवाय साधी सर्दी जरी झाली तरी आपल्या मुलाचा आजार वाढू नये. म्हणून त्याला ताबडतोब रुग्णालयात नेणारे पालक आज दिसत होते. त्याचं कारण म्हणजे आज साधी सर्दीही जीवघेण्या स्वरुपाची ठरत होती. तसं काल नव्हतं.
आबेदला पावसाळा आवडायचा. कारण त्याला त्या काळात पावसातच खेळायला मजा यायची. आजही पावसाळा आवडत होता. कारण आजचा पावसाळा त्याला अन्नधान्य पुरवत होता. अंगात घालायला कापड देत होता. राहायला एक लहानसं घरही देत होता. परंतु पाऊस जर आलाच नाही तर झाडं दिसणार नाही. सगळीकडे हिरवळ दिसणार नाही. अन्नधान्य पिकणार नाही. कापूस पिकणार नाही. मग पोटाला अन्न, घालायला कापड आणि राहायला घरही कदाचीत नशिबात नसेल, अशी आपली स्थिती होवून जाईल. असं आज आबेदला वाटत होतं. तेव्हा सर्वांनाच तो सांगत असे की पावसाला कोणीही हिणवू नये. त्याचं स्वागतच करावे. तो जर आला तर त्याला अलगद ओठावर टिपावं. त्याच्या पडणाऱ्या सरीत स्वतःला न्हाऊन टाकावं. तसेच ते पावसाचे थेंब न् थेंब अलगद गिळावे. ज्यातून आपलीच रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकेल. म्हणतात ना की पाऊस जर अंगावर गेलाच तर शरीरातील उष्णता पुर्णतः निघून जाते व आपण वर्षभर आजारी पडत नाही. अगदी तसंच आपण पावसाची तमा न बाळगता वागावं. एकदा तरी पावसात पुर्ण भिजावं आणि पावसाचा आनंद घ्यावा म्हणजे झालं.
आबेदला जसा पाऊस आवडत असे. तसा शर्मिलालाही पाऊस आवडत असे. त्या पावसात भिजण्याचा तिलाही आनंद वाटत असे व तिही त्या पावसात त्याचबरोबर भिजत भिजत आपले दिवस काढू लागली होती. लहानाची मोठी होवू लागली होती. त्यातच त्यांच्यात केव्हा प्रेम निर्माण झालं तेही त्यांना कळलं नाही.
कोकणात तसा जास्तच पाऊस पडायचा. तो सतत पडत असे आणि तो पडलाच तर नारळाच्या झाडावरून अलगद त्याचे तृषार ओसंडून खाली पडत. ते पाहून सुपारीची झाडं हसायची.
समुद्र तर पावसाळ्यात खवळलेलाच असायचा. तो ऐकायचाच नाही कुणाचंही. कारण त्याला त्याच्या नदीरुपी बहिणी भेटायला यायच्या. त्या भेटायला येतांना आपल्यासोबत काही वस्तूही आणायच्या. त्यानं तो आपलं अंग फुगवून टाकायचा. तो चार महिने आपलं अंग फुगवूनच ठेवायचा. ते त्याचं अंग फुगवणं पाहिलं की त्याच्याशी कुणालाही या पावसाळ्यातील चार महिने बोलावसं वाटत नसे. तसं पाहिल्यास कोणीही पावसाळ्यात त्याच्याशी बोलत नसे व त्याला भेटायलाही जात नसे. मग नारळी पौर्णिमा आली की समुद्राच्या बहिणी आपल्या माहेरला परतत असत. त्यानंतर सगळेजण समुद्राला नारळ अर्पण करीत व भेटायला जात. कारण त्यावेळेस तो दुःखी असायचा, त्याच्या बहिणी माहेराला परतल्या असल्यानं. जणू त्याचं एकाकीपणाचं दुःख दूर करण्यासाठीच.
*****************************************

आबेद व शर्मिला कोकणात राहात होते. बालपण त्यांचं कोकणात जात होतं. त्या दऱ्याखोऱ्यात फिरतांना व चोरवाटा न्याहाळतांना त्यांना मजा वाटायची. त्यातच आबेद हा मुस्लीम जरी असला तरी शर्मिलाला त्याचं गैर वाटत नव्हतं. तो स्वातंत्र्यापुर्वीचा काळ होता. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. मुस्लिमांनाही स्वातंत्र्य हवं होतं. त्याचबरोबर हिंदूंनाही स्वातंत्र्य हवं होतं.
तो कोकणचा प्रदेश अतिशय रमणीय असा प्रदेश होता. आबेद व शर्मिलाच्या गावाला लागून अरबी समुद्र होता. या अरबी समुद्रात मासेमारी फार चालत असे. कधीकधी आबेदला त्याचे वडील मासेमारी करण्यासाठी समुद्रात खोलवर नेत असे. शिवाय आबेदही आवडीनं जात असे मासे पकडायला.
आबेदचे वडील व शर्मिलाचे वडील एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. ते एक पान वाटून खायचे. त्यातच गावात इतरही बरेच मुस्लीम होते. ज्यांचे हिंदूंशी घनिष्ठ संबंध होते. तेही सर्वजण गावात अगदी एकोप्यानं राहात असत. ना हिंदू मुस्लीमांचा राग करायचा ना मुस्लीम हिंदूंचा. त्यातच जे गाव होतं. त्या गावातील एकोपा इतरांना लाजविणाराच होता. अशातच सामाजीक बदलाचे वारे सुरु झाले.
सामाजीक बदलानुसार इंग्रजांनी डाव साधला. त्यांनी एक सभा भरवली. ज्यात केवळ इंग्रजच होते. त्यांनी गुप्त मसलत केली. मसलत होती, हिंदू मुस्लीमात फुट टाकणे. त्यानंतर विचारविमर्श झाला व फुटीची योजना बनवली गेली. त्यानंतर दुसरी सभा इंग्रजांनी भरवली. ज्यात काही मुस्लीम नेत्यांना बोलावण्यात आले व सांगीतलं गेलं की हे हिंदू तुमचे शत्रूच. ते आजचे शत्रू नाहीत, तर बऱ्याच वर्षांपासूनचे शत्रू आहेत. असं सांगत असतांना याच काही मुस्लीम नेत्यांना त्यांच्याच बिरादरीतील मुस्लीम राज्यकर्त्यांना हिंदू शासकांनी कसं मारलं. कशी हत्या केली याचा इतिहास दोन हात वाढवून सांगण्यात आला. ज्यात राजा दाहिरच्या मुलींनी कसा बदला घेतला? अफजलखानाला कसे मारले? शायिस्तेखानाची चार बोटं कशी कापली? या इतिहासाचा समावेश होता.
इंग्रजांनी जशी मुस्लीम नेत्यांची सभा घेतली व सांगीतलं की त्यांच्या पुर्वजांची हिंदूंनी हत्या केली. तशीच दुसरी सभा हिंदूंचीही घेतली. ज्यात बयाण केलं की मुस्लीम राज्यकर्त्यांनी तुमच्यावर अतिशय क्रूर असा अत्याचार केलेला असून त्यांनी तुमच्या धर्मातील राजा दाहिरची हत्या केलेली आहे. कित्येक हिंदू लोकांना ठार केलं आहे. पृथ्वीराज चव्हाणची हत्या केली आहे. नालंदा तक्षशिलेसारखी तुमची वाचनालयं जाळलेली आहेत. संभाजी आणि कवी कलशांना अतिशय क्रुरपणे मारलं आहे. तुमची देवळं पाडली आहेत. कित्येक विधवा स्रियांना भ्रष्ट केलं आहे. काहींना सती जावं लागलं आहे मुस्लीम राज्यकर्त्यांच्या धाकाने.
इंग्रजांनी जसं मुस्लिमांना सांगीतलं की हे हिंदू तुमचे आजचे नाही तर फार पुर्वीच्या कित्येक पिढ्यांपासूनचे शत्रू आहेत. तसंच त्यांनी हिंदूंना मुस्लीम हे तुमचे आजचे नाही तर फार पुर्वीपासूनचे शत्रू आहेत. हे इंग्रजांनी अतिशय अक्कल हुशारीनं सांगीतलं. त्यातच वर्तमान परिस्थिती न पाहता हिंदू भडकले. तसे मुस्लीमही भडकले आणि अशातच एक तात्कालिक कारण घडवलं. ते कारण म्हणजे कायदे. त्यांनी जे जे कायदे बनवले. त्या त्या कायद्यात मुस्लिमांच्या हिताचा विचार केला. हिंदूंना डावलून टाकलं. मग जनमत खवळलं. त्याचा भडका हिंदू मुसलमान एकता तोडण्यात झाला. परंतु तो इंग्रजांचा डाव सहजासहजी ना हिंदूच्या लक्षात आला. ना मुस्लिमांच्या. इंग्रज चाल चालत राहिले आणि त्यात फसत गेले हिंदू मुस्लिमांचे नेते.
हिंदू मुस्लीमांची असलेली एकता. हिंदू मुस्लिमांची एकता पाहिली व त्यांनी विचार केला. विचार केला की ही एकता तोडायला हवी. ही एकता जर तोडली नाही तर आपल्याला तमाम हिंदूस्थानावर राज्य करता येणार नाही. त्यानंतर त्यांनी पाहिलं की हिंदूंची संख्या अफाट आहे. मुस्लिमांची कमी. मग आपण त्यांना भडकवावं. जेणेकरुन ते जर भडकले तर ते एकमेकांशी नक्कीच भांडतील. तसेही या देशातील काही लोकं मूर्खच आहेत की जे चांगला विचार करीत नाही. आपण मुस्लीम नेत्यांच्या मनात असा विश्वास निर्माण करावा की ते आपलं ऐकतील. ज्यातून हिंदू मुस्लिमात फुट पाडली जाईल.
विचाराचा अवकाश. इंग्रजांनी जे हिंदू मुस्लीम एकता तोडण्यासाठी पाऊल उचललं. ते यशस्वी पाऊल ठरलं. ज्यातून हिंदू मुस्लीम एकता तुटली. तद्नंतरच्या काळात तोच द्वेष धुमसत गेला. तशी मुस्लिमांची पाठराखण इंग्रज करीतच होते. मग इंग्रजांनी मुस्लिमांना शह देत काही नेत्यांना हाताशी धरुन सांगीतलं की तुम्ही स्वतंत्र पाकिस्तान मागा तर काहींना सांगीतलं की तुम्ही पाकिस्तान मागणीचा विरोध करा. तिथंही मुस्लीम मुस्लीमात फुट पाडली गेली. मग ठरलं. भारत स्वातंत्र्य मागतंय ना. सहजासहजीच देवू. परंतु ते भांडत राहावेत सदैव. आम्ही गेल्यावर त्यांचेही मुदडे पडावेत. मुस्लिमांनी मुस्लीमांचेच मुदडे पाडावेत. तसेच मुदडे हिंदूंचेही मुदडे पाडावेत आणि हिंदूंनी हिंदूंचे मुदडे पाडावेत. असे करीत असतांना त्यांनी मुस्लिमांचेही मुदडे पाडावेत. ही आग. ही आग लावली इंग्रजांनी. ज्यात ते यशस्वी झालेत आणि इथं हिंदू मुस्लीम भांडत बसले.
आबेद लहान असतांना सामाजीक क्रांती झाली असल्याचं चित्र होतं. आबेदचा बाप फकरुद्दीन हा तसा कमी शिकलेला होता. गावात मुस्लीम समाज तसा जेमतेमच होता. गावातील व्यवसाय मासेमारी होता. काही लोकं सुपारी, फणस, हापूस आंबा व नारळाचीही शेती करीत. ते आपल्या शेतात मजूरीला फकरुद्दीन व त्याची पत्नी झैबुन्नीसाला बोलवीत आणि फकरुद्दीनही जेव्हा समुद्रात मासे पकडायला जात असे. तेव्हा तोही काही हिंदूंना सोबत घेवून जात असे. अशातच त्या गावात एक अनामीक मुस्लीम व्यक्ती आला. त्यानं संपुर्ण मुस्लीम बिरादरीला सांगीतलं की हे सर्व हिंदू आपले शत्रू आहेत.
इंग्रजांनी पाडलेली फुट. स्वातंत्र्य द्यायचंच. परंतु हिंदू मुस्लीम भांडायला हवेत. त्यांनी एकमेकांचे मुदडेही पाडायला हवेत. परंतु त्यात आमचं नाव समोर येवू नये. आम्ही पदड्यामागचं राजकारण करु. असा राजकारणी डावं. त्यांनी पेरलेलं दुहीचं बीज. मग काय, मुस्लिमांनी आपला एक दूत लागलीच गावागावात, शहराशहरात आपल्याच बिरादरीत पोहोचवला. ज्यानं सांगीतलं,
"आजपासून हिंदूंशी संपर्क ठेवूच नये. ते आपले शत्रू आहेत. गतकाळातील फार पुर्वीपासूनचे असलेले शत्रू. त्यांनीच आपल्या मोहम्मद बिन कासीमला ठार केलं. त्यांनीच अफजलखानाचीही हत्या केली आणि त्यांनीच शायिस्तेखानाचीही चार बोटं कापली."
त्या दुतानं सांगीतलेल्या गोष्टी. परंतु असं त्यांनी का केलं? हे त्या दुतानं सांगीतलं नाही. शिवाय जो कोणी आजपासून हिंदूंशी संपर्क ठेवेल. बोलेलं. त्याला वाळीत टाकलं जाईल. त्याचेशी संपर्क तोडला जाईल. असंही तो दूत म्हणाला.
गावागावात व शहराशहरात जसा मुस्लीम नेत्यांनी आपला आपला एक दूत पाठवला होता. तसा हिंदूंनीही आपला एक दूत गावागावात व शहराशहरात पाठवला व त्यानंही तेच व्यक्त करावं हे सांगीतलं. मग हिंदूंचा दूत आला. त्यानंही तोच इतिहास आळवला.
"मुस्लीम आपले जुने शत्रू आहेत. त्यांनी राजा दाहिरची हत्या केली. पृथ्वीराज चव्हाणची हत्या केली. संभाजी महाराजांची हत्या केली. ताराबाईंना भयंकर त्रास दिला. एवढंच नाही तर कित्येक स्रियांच्या अब्रू लुटल्या आणि कित्येक स्रियांना जोहार करायला भाग पाडलं."
इंग्रज बोलून गेले. तशी आग लागली होती. त्यातच मुस्लीम खवळले होते व हिंदूही खवळले होते. ज्यातून हिंदू मुस्लीम एकता तुटली. मग मुस्लीम स्वतंत्र्य पाकिस्तानची मागणी करु लागले होते आणि हिंदूही मुस्लिमांचा द्वेष करु लागले होते. त्यांना वाटत होतं की हे मुस्लीम पाकिस्तानात जावे. त्यातच कोणी मुस्लिमांना पाकिस्तानात का हाकलता, ते आपलेच भाऊ आहेत. असे म्हणत असत. परंतु कोणी तसं म्हटल्यास भयंकर राग यायचा त्यांना. त्यातच ते बोल ऐकणारे हिंदू त्यांची हत्याच करुन टाकायचे.
पावसाळा नुकताच सुरु झाला होता. युद्ध सुरु झालं होतं. महात्मा गांधी तसेच तत्सम नेत्यांनी आम्ही युद्धाला मदत करतो. परंतु युद्ध समाप्तीनंतर आम्हाला स्वातंत्र्य द्या असे म्हटले होते. त्यानंतर इंग्रजांनी मान्यही केलं होतं. परंतु इंग्रजांना सहजासहजी स्वातंत्र्य द्यायचंच नव्हतं.
मुस्लिमांनी गावागावात पाठविलेला दूत आबेदच्याही गावात कोकणात आला होता. त्यानं म्हटलं की आबेदच्या वडीलानं हिंदूंशी संबंध ठेवू नये. ते आपले फार पुर्वीपासूनचे शत्रू आहेत आणि संबंध ठेवलेच तर आम्ही तुम्हाला आमच्या बिरादरीतून काढून टाकू.
ती मुस्लीम वस्तीत झालेली सभा. त्या सभेत पारीत झालेला ठराव. त्यातच सर्व मुस्लीम समुदायांनी ठरवलं. आपण हिंदुंशी संबंध ठेवू नये. आपण हिंदुंशी व्यवहार करु नये. त्यांच्या घरी जावू नये. त्यांना आपल्या घरी येवू देवू नये. त्यांना आपल्या घरातील कोणत्याही समारंभाला बोलावू नये. आपणही जावू नये. कारण आपण जर त्यांच्याशी संबंध ठेवला आणि आपल्या बिरादरीतील लोकांना माहीत झालं तर ते आपल्याला वाळीत टाकतील.
सभा झाली होती व त्या सभेनुसार ठरलं होतं की आपण हिंदूंच्या घरी जावू नये. सभासमारंभातही जावू नये. व्यवहार करु नये व संबंध ठेवू नये. मग काय सारेच मुस्लीम फारकतीनं वागू लागले होते. त्यातच तशाच प्रकारची सभा हिंदू वस्तीतही झाली होती. त्यानुसार हिंदूंनीही ठरवलं होतं की आपणही मुस्लिमांना मदत करु नये. कारण बिरादरी नाराज होईल.
दोन्ही धर्माचे दूत आपआपल्या धर्मातील लोकांना काही गोष्टी सांगून गेले होते. त्याचे नियम ठरवले होते. ते नियम काही लोकांना मान्य होते तर काही लोकांना मान्य नव्हते. त्याचा फार त्रास होत होता.
शर्मिला लहान होती. तसा आबेदही. त्यांना कळत नव्हत्या त्या गोष्टी. धर्म म्हणजे काय व धर्माचे नियम काय? हेही माहीत नव्हतं त्या लहानग्या जीवांना.
ती लहानगी मुलं. ज्यात हिंदू मुस्लीम यांचाही समावेश होता. ते खेळत असत एकत्र त्या आमराईत. जी गावापासून थोड्या दूर अंतरावर होती. चक्करबिल्ला खेळायला त्यांना फार आवडत असे. त्यातच दोन्ही समुदायातील मुलंही लपंडाव, लघोरी, धावण, डाफ यासारखे खेळ खेळायचे. त्यावर त्यांची आई वा वडील सातत्यानं आवर्जून सांगायचे की तुम्ही त्या दुसऱ्या धर्माच्या मुलांसोबत खेळू नका. जर तसे खेळाल तर आपल्या धर्मातील माणसं आपल्याला आपल्या बिरादरीतून काढून टाकतील. परंतु ते आईचं म्हणणं. त्या गोष्टी समजत नव्हत्या त्या सर्वांना. ते ऐकत नसत आपल्या आईवडीलांचं व एकत्रच खेळत असत.
**********************************************************

तो त्रास होताच त्यांना. त्यातच फकरुद्दीनलाही तो त्रास होता. फकरुद्दीन तसा सामान्य माणूस. त्याला वाटत होतं की असं आपल्या मुस्लीम समुदायाने वागू नये. हिंदू काही आपले शत्रू नाहीत. शत्रू आहेत हे नेते. ज्यांना हिंदू आवडत नाहीत. हिंदू जर वाईट असते तर आपल्याला याठिकाणी राहायलाच जागा मिळाली नसती. आज आपल्याला या देशात ज्या सोयी मिळतात ते यांच्याचमुळे. मग आपण हे का विसरावे? अन् त्रास तो होणारच. त्याला पर्याय नाही. शिवाय आपण विदेशीच आहोत. कुठून तरी आलेले आणि या हिंदुस्थानात आपण सामावले गेलो आहोत. आज कित्येक पिढ्या आपण या हिंदुस्थानात काढल्या आहेत. आता जीव लागला आहे. तसं पाहिल्यास धर्म आपल्या जागी. आपण आपल्या जागी. कारण माणूसकी महत्वाची. परंतु काय करावं. त्रास तर होणारच. तेव्हा शेवटी त्रासालाच आपलं शस्र बनवावं.
त्रास.......त्रासाबाबत सांगायचं झाल्यास काही लोकांना भयंकर त्रास होत असतो तर काही लोकांना काहीच त्रास होत नाही. ज्यांना त्रास होत नाही. ते अतिशय भाग्यवान लोकं असतात. अन् ज्यांना अतिशय वेदनादायी त्रास होत असतो. ते कमी भाग्याचे असतात. तसं पाहिल्यास त्रासाचा पुनर्जन्माशी काहीही संबंध नाहीच. कारण काही लोकं पुनर्जन्माला मानत नाहीत. ते पुनर्जन्माला थोतांड असं संबोधतात.
पुनर्जन्म असतो काय? याचं उत्तर होय आणि नाही असं संभ्रमाचं आहे. मागील जन्मात आपल्या काही इच्छा अपुर्ण राहिलेल्या असतात. त्या इच्छा पुर्ण झालेल्या नसतात. त्या पुर्ण करण्यासाठी पुनर्जन्म असतो. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. पुनर्जन्म हा कुणाच्याही रुपात होवू शकतो. साहजीकच एखादे प्राणी वा पक्षी किंवा एखादं झाड. मग हे प्राणी एखाद्या वेळेस आपल्याला अकस्मात चावा घेतात. त्यानंतर आपलं विधान असतं की मी अमूक रस्त्यानं गेलो नसतो तर तो प्राणी चावला नसता किंवा एखाद्याचा अपघात होतो, एखाद्या गाडीनं. त्यावेळेसही लोकं म्हणतात की अमूक व्यक्तीनं माझं ऐकलं असतं तर तो मरण पावला नसता. परंतु हे सर्व आपले तर्कवितर्क असतात. त्या व्यक्तीचा मृत्यु हा तसाच ठरलेला असतो. ज्याला कोणी कितीही थांबवलं तरी तो थांबू शकत नाही. हेही काहीसे पुनर्जन्मावर आधारीत असते. जसं मरणाऱ्या व्यक्तीनं मागील जन्मात असंच त्याला तुडवून मारलं असेल. याबाबत एक महाभारतातील उदाहरण आहे. भीष्म पितामहा बाणशय्येवर असतांना विधात्याला विचारतात की मलाच ह्या बाणाची शय्या का? त्यावर विधाता उत्तर देतो,
"आठव की तू तरुण असतांना व राजपद असतांना व तू एका रस्त्यानं लवाजमा घेवून चाललेला असतांना एका सैनिकानं तुला म्हटलं. साप आडवा आला आहे. विशालकाय आहे. काय करावे. त्यावर तू म्हणाला की त्याला बाजूला करा. तसं तुझं ऐकून तुझा आदेश पाळत त्या सैनिकानं त्या सापाला जीवंत असतांनाच दूर फेकलं. ज्यामुळं तो साप एका काटेरी बाभळीवर पडला. ज्यातून त्याला काटेरी बाभळीचे काटे रुतले व अत्यंत करुणेनं व दुखदायी अंतकरणानं तो मरण पावला. तो सापच अर्जुनाच्या रुपानं आलेला आहे, ज्यानं तुला हे बाणरुपी काटे दिलेले आहेत." त्यानंतर भीष्म काय समजायचं ते समजला व चूप बसला.
महत्वपुर्ण बाब ही की आपण जसे कर्म करतो. कुणाला सतवतो. परंतु त्याच आपल्या कर्मानुसार तद्नंतरच्या काळात आपल्याला त्रास होत असतो. म्हणतात की मला किती त्रास आहे. कारण त्रास हा सहन होत नसतो. तो जीवघेण्या स्वरुपाचा असतो. आपण जसे मागील जन्मी कर्म केले. कुणाकुणाला कसाकसा त्रास दिला. तसेतसे ते कर्म याजन्मी आपल्याला छळत असतात. कोणी माणूस बनून छळतो तर कुणी प्राणी वा पक्षी तर कुणी झाड बनून. तसंच आपण जर या जन्मात कोणाला मदत केली तर पुढील जन्मात तेच घटक आपल्याला मदतही करीत असतात. शिवाय आपल्या इच्छा आकांक्षा या जन्मात पुर्ण न झाल्यास त्या पुढील जन्मातही पुर्ण होवू शकतात. मात्र तुमच्या इच्छा आकांक्षेत काहीतरी दम हवा. जसं रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं आहे. कारण त्यांनी सीता नावाची एकच पत्नी केली. जी शेवटपर्यंत पुर्णकालीक त्यांच्याजवळ राहिली नाही. त्यात रामाला भयंकर त्रास झाला. परंतु पुढील जन्मात तो जेव्हा क्रिष्ण बनून आला. तेव्हा त्याला अनेक पत्नींचं सुख प्राप्त झालं. याचाच अर्थ असा की ज्या जन्मात त्याला पत्नीविरह सहन करावा लागला. पुढील जन्मात ते पत्नीविरहाचं दुःख सारं संपलं. तसंच याजन्मात राम सुखातच नव्हताच आणि पुढील जन्मात क्रिष्ण बनूनही तो सुखात नव्हताच. कारण त्रासानं कुणालाच सोडलेलं नाही.
त्रासाबद्दल सांगायचं झाल्यास ज्याला जास्त त्रास होतो. त्याला अमरत्व प्राप्त होतं असं म्हटल्यासही आतिशयोक्ती होणार नाही. रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला. पत्नीविरहाचा त्रास झाला. क्रिष्णाला जन्मापासूनच त्रास झाला. स्वतःची आई सोडून राहावं लागलं. त्यातच जेव्हा तो तरुण झाला. तेव्हा त्याला प्रेम देणारी आई नाईलाजानं सोडावी लागली. शिवाय ते सर्व मित्रमंडळ सोडावं लागलं. परंतु त्या त्रासातूनच ते घडले. आज त्यांचं नाव जगात आहे. एवढंच नाही तर आधुनिक काळातील उदाहरण आपल्यासमोर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र औषधाअभावी मरण पावले. पत्नी रमाबाईही तशीच. त्यात त्यांना किती त्रास झाला असेल, आपण कल्पनाही करु शकत नाही. तरीही ते सगळं सहन करुन ते शिकले. समाजासाठी झटत राहिले. चवदार तळ्याचा जेव्हा खटला सुरु होता. तेव्हा जवळ जे तुटपुंजे पैसे असायचे. ते पत्नी रमाबाईच्या प्रकृतीला न लावता खटल्याला लावले. ज्यातून खटला जिंकल्या गेला. परंतु रमाबाई मरण पावल्यात. आज समाज आरक्षणाचं सुख भोगतो आहे. तरीही काही समाजकंटक बाबासाहेबांना नावबोटं ठेवतात. तसंच दुसरं उदाहरण थॉमस एडीसनचं. त्यांनी विजेच्या बल्बचा शोध लावला. परंतु तसा शोध लावत असतांना व प्रयोग करीत असतांना त्यांनी आपल्या घरच्याच शेतातील धानाच्या गंजीला आग लावली. ज्यातून कितीतरी मिळकत गेली. त्यावेळेस त्यांच्या वडीलांनी त्यांना घरातून हाकलून दिले. त्यानंतर ते रेल्वेगाडीत वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करुन प्रयोगाचाही छंद जोपासू लागले. त्यावेळेस पांढरा फॉस्फरस सांडल्यानं रेल्वेगाडीच्या डब्याला आग लागली. ज्यांचा त्रास थॉमस एडीसनला भरपूर झाला. परंतु त्यातूनच त्यांना विजेच्या बल्बचा शोध लावता आला.
अशी बरीच माणसं आहेत की ज्यांना ते जीवंत असतांना भरपूर त्रास झाला. ज्यात छत्रपती शिवाजी, आग्र्याची नजरकैद व पन्हाळ्याची कैद, प्रतापगडावरील जीवघेणा हल्ला. महाराणी जीजाबाई, शहाजीपासून कितीतरी दिवस फारकत. महाराणी ताराबाई, पतीचं आजारपण, त्यातच पतीच्या मृत्यूनंतर आलेली स्वराज्य टिकविण्याची जबाबदारी. ज्यातून झालेला तीव्र त्रास. महाराज संभाजी, जीवंत असतांनाच जिव्हा व हात कापले गेलेत. डोळेही काढले गेलेत. अनंत हालहाल केले व नंतर एकेक अवयव कापत मान कापली. महाराज पृथ्वीराज चव्हाण, डोळे काढले. महाराणी पद्यावती, महाराणी संयोगीता, जोहार करावा लागला. गॅलिलिओ पृथ्वी गोल आहे असं म्हणताच हत्या, महात्मा गांधी, अछूत म्हणत दक्षीण आफ्रिकेत असतांना रेल्वेगाडीच्या डब्यातून उतरवून देवून अपमान केला.
आज अशी कितीतरी मंडळी आहेत की ज्यांचे नाव जगात आहे. कारण त्यांनी त्यांच्या जीवंत असतांना अतिशय वेदना भोगल्या. ज्यातून त्यांना संघर्ष करावा लागला व असे करीत असतांना त्यांचं नाव जगात वाढलं. आपणाला राजा विक्रमादित्याचं नाव माहीत आहे. नल दमयंती माहीत आहे. राजा भोज माहीत आहे. ते कशामुळे? तर त्याचंही उत्तर त्यांनी भोगलेला त्रासच.
त्रासाबाबत सांगायचं झाल्यास जो जास्त त्रास सहन करतो. जो जेवढा त्रास सहन करतो आणि जो जसा त्रास सहन करतो. त्याला अमरत्वच प्राप्त होत असतं. शिवाय त्रासाची गती, रचना व स्वरुप कसे आहे? यावरुन इतिहास घडतो. कोणी म्हणतात की रामायण महाभारत घडलंच नाही. ते थोतांड आहे. परंतु ते थोतांड नाही. तिही आपल्यासारखीच माणसं असतील. परंतु त्यांचा पुरावा नष्ट करण्यात आला. नालंदा तक्षशिला तसेच भोजशाला आणि इतर तत्सम तमाम हिंदूस्थानातील विद्यापीठं जाळून. नालंदा विद्यापीठामध्ये एवढे ग्रंथ होते की जे जळायला सहा महिने लागले. ज्यात तमाम हिंदूस्थानातील फार पुर्वीपासूनच्या राजे रजवाड्यांचा इतिहास अस्तित्वात होता. जो मिटविण्याचा प्रयत्न केल्या गेला. परंतु ते साहित्य आजही आपल्याला माहीत झालं. कारण ते काही लोकांना मुखोद्गत होतं तर त्याच्या काही प्रती या लोकांच्या घरी अस्तित्वात होत्या. ज्या शोधून जाळता आल्या नाहीत.
महत्वाचं सांगायचं म्हणजे त्रासापासून कोणीच सुटलेले नाहीत. सर्वांना थोड्याफार प्रमाणात त्रास असतोच. तेव्हा त्रासाला कोणीही घाबरुन जावू नये. त्याचा सहर्ष स्विकार करावा. स्वागतंही करावं. कारण आपल्याला होत असलेला त्रासच आपली दिशा ठरवतो नव्हे तर आपल्याला मार्ग दाखवीत असतो. म्हणूनच त्रासाचा कोणाताही बाऊ न करता, तसंच त्याबद्दल कोणताही किंतू परंतु मनात न बाळगता त्रासालाच आपलं शस्र बनवावं. जेणेकरुन त्यातून आपली दिशा ठरेल व व्यवस्थीत, सुखरुप मार्ग काढता येईल. ज्यातून इतरांना प्रेरणा मिळेल आणि तो एक इतिहास बनेल. इतरांना प्रेरणा देण्यासाठी नव्हे तर दिशा देण्यासाठी आणि मार्ग धरण्यासाठी.
फकरुद्दीनला त्रास होत होता त्या वेगळेपणाचा. आता ना हिंदू त्यांच्या घरी समारंभाला येत असत. ना मुस्लीम त्यांच्या घरी जात असत. सबंध व्यवहारच बंद झाले होते. आता समुद्रात मासे पकडायला फकरुद्दीन एकटाच जात असे. तसेच हिंदूही वेगळ्याच नावेनं समुद्रात जावून मासे पकडत असत.
फकरुद्दीन एकतेचा विचारच करीत होता. अशातच त्याला आठवला शिवरायांचा काळ. शिवरायांच्या काळातही राजसत्तेवर औरंगजेब नावाचा आमच्याच बिरादरीतील माणूस. तरीही शिवरायांच्या सैन्यात दौलतखान आरमाराचा प्रमुख. एक मुसलमानच. शिवाय शिवरायांना सिद्दी इब्राहिम, सिद्दी जौहर, मसूद खान, अंबर वहाब, शमा खान, नूर खान बेग आरमार प्रमुख, इब्राहिम पठाण, दाऊद खान, मसूद खान, हुसेन खान, जाफर खान, मदारी मेहतर, काजी हैदर, मोहंमद खान हकीम आदी मुस्लीम सरदारांनी शिवरायांना मदतच केली स्वराज्य बनविताना. जे स्वराज्य हिंदू मुस्लीमांचं आपलं हक्काचं स्वतःचं स्वराज्य होतं. मात्र इंग्रज डावखुरे. त्यांनीच पाडली असेल अशी फुट. त्यांनीच सांगीतलं असेल आपल्या नेत्यांना. असं वागा, तसं वागू नका. परंतु आपल्या तरी लोकांनी तसं का वागावं.
शिवाजी महाराजांनी चांगलं कर्तृत्व केलं. त्यांच्या चांगूलपणावरच तर मुस्लिमांनी मदत केली त्यांना. जीवावर उदार होवून लढले ते त्या आपल्याच बिरादरीतील औरंगजेबाच्या विरोधात. तसे सरदारच बनवले होते शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना. शिवाय महाराजांच्या या सगळ्या सरदारांचा धसका इंग्रजांनीही घेतला होता. उगाचंच जॉन फायर नावाच्या एका ब्रिटिश लष्करी अधिका-याने ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना १६७२ मध्ये पत्र पाठवून या सरदारांच्या शौर्याचा उल्लेख केला नाही. मुस्लीम सरदारांनी मोठमोठे पराक्रम गाजविल्यानंच तर मराठेशाही जीवंत राहिली होती आणि आज अशी फुटीची गोष्ट. आमच्या पुर्वजांना तर त्यावेळेस असं कधीच वाटलं नाही की आम्ही हिंदू असलेल्या शिवरायांना मदत करु नये. मग आजच का बिघडलं?
शिवाजी महाराजांच्या काळात सक्रिय असलेल्या दौलतखानामुळे पुढे त्याच ब्रिटीश अधिकारी जॉन फायरनं म्हटलं की 'कोकण भागात शिवाजी महाराजांचे आरमार खूपच जागरूक आहे. त्यामुळे येथे आपली डाळ शिजणार नाही,’ ते उगाचच म्हटलं नसेल. या पत्रावरुनच या सरदारांच्या कर्तबगारीची महती पटते. अफजल खान वधाच्या वेळीही तीन मुस्लीम सरदार होते की ज्यांच्यामुळं शिवरायांच्या जीवावर आच आली नाही. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केल्याचा प्रसंग इतिहासात आहे. महाराजांच्या अंगरक्षकांतही नेहमी तीन मुसलमान सरदार असायचे. सरदार नूर खान, इब्राहिम आणि सुलतान अशी त्यांची नावे. छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानाला भेटायला गेले. त्या वेळी हे तिन्ही मुस्लीम सरदार तेथे हजर होते.
फकरुद्दीन आठवत होता एकएक गोष्ट. आजपर्यंत मुस्लिमांनी हिंदूला व हिंदूंनी मुस्लिमांना केलेली मदत. आपल्याच बिरादरीतील माणसांनी फक्त माणुसकी पाहून त्यांना मदत केली आणि त्यांनीही आपल्याला सन्मानानं वागवलं. आपल्या बिरादरीतील माणसं म्हणतात की राजा दाहिरच्या मुलींनी मोहम्मद बिन कासीमची हत्या केली. त्यानं आपल्या धर्मातील काजीची हत्या केली. जो एक धर्मगुरु होता. परंतु ती हत्या करण्यापुर्वी त्यानं त्या मुलीच्या बापाची म्हणजेच राजा दाहिरची हत्या केली होती. हे विसरलेत आपले नेते. आपले नेते म्हणतात की पृथ्वीराज चव्हाणनं मोहम्मद घोरीची हत्या केली. परंतु त्या पृथ्वीराज चव्हाणचे डोळे बिनाकारण फोडलेल्या मोहम्मद घोरीचा कोणीच दोष दाखवत नाही. आपला समुदाय म्हणतो की शायिस्तेखानाची चार बोटं कापली. परंतु त्यानं जो हिंदूंना त्रास दिला होता. ते कोणीच सांगत नाही. शिवाय आपला समुदाय म्हणतो की अफजलखानाची हत्या केली. परंतु अफजलखानानं हिंदूंसोबत काय केलं. ते कोणीच सांगत नाही. अफजलखान जेव्हा वाई मार्गानं महाराष्ट्रात आला होता. तेव्हा त्यानं कित्येक हिंदूंच्या देवळांना शह पोहोचवला होता. त्यानं तुळजापूरच्या देवी भवानीचे तुकडेही केले होते. शिवाय कित्येक हिंदूंच्या स्रियांवर अत्याचार केला होता त्यानं आणि करतच होता. शिवाय प्रतापगडावर जेव्हा शिवराय अफजलखानाला भेटायला गेले. तेव्हा त्या भेटीदरम्यान आलिंगन देतांना अफजलखानाला काय गरज होती त्यांची मान दाबायची. तद्वतच त्यांच्यावर बिचव्यानं वार करायची. बरं झालं शिवरायांनी चिलखत घातलं होतं म्हणून ते वाचले. नाहीतर....... नाहीतर ना शिवाजी वाचले असते, ना कोणाला स्वराज्य स्थापन करताच आलं असतं. आपण जसे वागलो. तसे आपल्याला फळ मिळते. औरंगजेब बादशाहा जसा वागला. तसं त्याला फळ मिळालं.
शिवाजी महाराजांनी तर मुस्लिमांचं पोट तरी जगवलं. परंतु औरंगजेबानं काय केलं. त्यानं तर चक्कं आपल्या बापाला नजरकैदेत टाकलं अन् आपल्याच भावाची हत्या केली आलमवीर बनण्यासाठी. मग तो कसा थोर होवू शकतो?
तो इतिहास...... तो इतिहास आठवत होता फकरुद्दीनला. इतिहासाचा परीपाठ एकेक खुलत होता त्याच्या नजरेसमोर. तसं त्याला आठवलं. आपण का बरं ऐकावं आपल्या बिरादरीतील माणसाचं की जे आपल्याच बिरादरीतील माणसांना भडकवू पाहात आहेत.
गुरुंचं शिकवणं प्रभावी असावं. त्याचं कारण आहे शिक्षकांचं शिकवणं. जो कोणी गुरु असेल त्या नेत्यांना शिकविणारा. तो बरोबर नसेल, त्यानं आपल्याच बिरादरीतील माणसांना कसं भडकवता येईल याचं विषच पाजलं असेल. त्याला. म्हणूनच तो दूत त्याच राजकारण्याचं ऐकून इथंपर्यंत आला.
फकरुद्दीननं काय विचार करायचा तो केला. तसं त्याला त्याचा मुलगा आबेद म्हणाला,
"अब्बू काल इमरान म्हणत होता की त्या हिंदूंच्या मुलांसोबत बोलायचं नाही. कारण काय?"
इमरान...... इमरान बिरादरीतील एक लहान मुलगा. त्यानं आईचं बोलणं ऐकलं होतं गुपचूप. त्याचे आईवडील आतमध्ये गोष्टी करीत होते की आपल्या मुलांना हिंदूंच्या मुलांसोबत खेळू द्यायचे नाही. तीच गोष्ट ऐकून तो आबेदला सांगायला आला होता. तसं त्यानं आबेदला सांगीतलं व हेही सांगीतलं होतं की आपण आजपासून हिंदूंच्या मुलांसोबत खेळू नये. ते आपले शत्रू आहेत पुर्वीपासूनचे.
आबेद तीच गोष्ट आज आपल्या वडिलांनाही सांगू लागला होता. आता त्या आबेदच्या प्रश्नावर काय उत्तर द्यायचं हे काही फकरुद्दीनला कळेनासं झालं होतं. ते आपले मौन बाळगून होते.
लोकं म्हणतात की लहान मुलांना अक्कल नसते. काही शिक्षकही तसंच समजतात. परंतु जेवढी अक्कल लहान मुलाना असते. तेवढी अक्कल मोठ्यांना नसतेच कदाचीत. हे अलिकडील काळावरुन दिसून येते. अलिकडील काळातील मुलं हे मोबाईल वा स्मार्टफोन अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळतात. जो मोठी माणसं हाताळू शकत नाहीत. फरक एवढाच आहे की काय वाईट व काय चांगले हे त्या लहानग्या वयात कळत नाही. कारण त्यांना स्वतःचा अनुभव यायचा असतो. जो अनुभव एखादं संकट आल्यावर सहज येतो.
संकट....... संकटं येत असतात. जातही असतात. ज्याप्रमाणे सुर्य चंद्राला उदय व अस्त असतं, त्याप्रमाणेच संकटांनाही उदय व अस्त असतंच. याबाबत एक उदाहरण.
तो वर्ग पाचवा. तसं पाहिल्यास पाचव्या वर्गातील मुलांना तेवढी अक्कल नसतेच. असं आपण समजू शकतो. परंतु त्या वर्गातील मुलं अचानक एकदा आपल्या शिक्षकाला म्हणाले,
"सर, तुमची जन्मतारीख सांगा."
शिक्षकांनी प्रथम आढेवेढे घेतले व नंतर अगदी सहजरित्या आपल्या विद्यार्थ्यांना आपली जन्मतारीख सांगीतली. त्यानंतर शुक्रवार उजळला. तसं दर शुक्रवारी विद्यार्थी सरस्वतीपुजन करायचे. तसा तो दिवस उजळला. आजही सरस्वतीपुजन होतंच. तसं त्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकाची वर्गात यायची वाट पाहात होते. त्यानंतर थोड्या वेळानं शिक्षक वर्गात आले.
शिक्षक ज्यावेळेस वर्गात आले, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकांच्या ध्यानीमनी नसतांना आणलेला केक आपल्या शिक्षकांच्या पुढ्यात ठेवला. तसं शिक्षकानं विचारलं,
"हे काय?"
"सर, हा केक. आपला आम्ही वाढदिवस साजरा करतोय."
ते विद्यार्थ्यांचं बोलणं. तो केक समोरच होता. तो शिक्षक त्या केकला न्याहाळत होता. अशातच तो विचार करीत होता आपल्याला असलेल्या शाळेतील त्रासाचा. त्यानं आजपर्यंत त्या शाळेत अतिशय वेदनादायी त्रास भोगला होता. कधी वार्षिक वेतनवाढ बंद तर कधी पत्र देवून त्याचेवर ताशेरे ओढणे, कधी नोकरी सुरु असतांनाही वेतन बंद. मग घरी हालअपेष्टा. कधी उपाशी राहणे आणि आताही त्रासच होता त्या शिक्षकाला. आता त्याचं वेतन बंद होतं व तो आपल्याला वेतन मिळावं म्हणून न्यायालयात शाळेविरुद्ध भांडत होता.
तो केक त्या शिक्षकाच्या पुढ्यात होता व तो केक त्याला पाहात हसत होता. कारण त्यानं बऱ्याच वर्षांपासून आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. गतकाळातील बऱ्याच दिवसापुर्वी त्यानं वाढदिवस साजरा केला होता. परंतु जेव्हापासून शाळेचं दुखणं खुपणं मागं लागलं. तेव्हापासून त्याला आपला वाढदिवस साजरा करणं आवडत नव्हतं आणि इतरांनीही त्यांचा साजरा केलेला वाढदिवस आवडत नव्हता. परंतु शाळेतील मुलंच ती. त्या मुलांची ती भावना. तो केक त्या शिक्षकासाठी महत्वाचा नव्हता. त्याची किंमत त्या शिक्षकासाठी महत्वाची नव्हती. तर त्या केकमधून जे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा विद्यार्थ्यात निर्माण झाला होता. ते प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा महत्वाचा होता. ज्याला कोणत्याही मापानं मोजता येत नव्हतं
अलिकडील काळ असाच आहे. सर्वांवर काही ना काही प्रमाणात संकट असतंच आणि हे संकट पाचवीला पुजलेल्यासारखं वागत असतं माणसाच्या आयुष्याशी. त्यातही काही सुखाचे क्षण येतात. तो विद्यार्थ्यांनी अकस्मात आणलेला केक असंच काही त्या शिक्षकाच्या जीवनाला वळण देवून गेला. तो विचार करु लागला. विचार करु लागला की आपल्या या भांडणात या विद्यार्थ्यांचा कोणता दोष? दोष प्रशासन आणि शाळेचा. मग आपल्याला वेतन मिळो अगर न मिळो, आपण शिकवायचंच. चांगलंच शिकवायचं. त्यानंतर त्या शिक्षकानं आणखी चांगल्या प्रकारे शिकवणं सुरु केलं होतं.
एकदा तेच शिक्षक एका मैदानात उभे असतांना एक मुलगी त्याचेजवळ आली. तिच्या कडेवर एक लहान मुल होतं. येताबरोबर ती त्या शिक्षकाच्या पायावर नतमस्तक झाली. त्यानंतर ती तिच्याच जवळ उभ्या असलेल्या आपल्या पतीला सांगू लागली. यांच्यामुळंच माझं जीवन घडलं.
शिक्षकानं ते ऐकलं. तसा त्या शिक्षकाला विचार आला. विचार आला की मी प्राथमिकचा शिक्षक. शेंबड्या मुलांना शिकविणारा. मी काय ह्या मुलीचं जीवन घडवलं असेल. तसं त्यानं विचारलं, विचारलं की मी तुला ओळखलं नाही. तुझं नाव काय?
त्या मुलीनं तो प्रश्न ऐकला. तशी ती म्हणाली,
"सर, आपण मला ओळखलं नाही. मी त्याच वर्गातील मुलगी. ज्या वर्गात आम्ही केक आणला होता."
"सध्या काय करतेय?"
"मी सिनीअर कॉलेजची प्राध्यापिका आहे."
ते मुलीचं बोलणं. त्यानंतर त्यांच्यात बराच संवाद झाला. तसं बोलणं संपलं. तसा नोकरीकाळातील सर्व सारीपाट त्या शिक्षकाला आठवायला लागला. आठवायला लागलं की आपण शिकविलेली मुलगी हीच. हिच्या घरी अनेक बहिणी. त्यातच वडील तिला शिकवायला तयार नव्हते. ते कोणाकोणाला शिकविणार! शिवाय घरी बुरसटलेले विचार. मुलासाठी एवढ्या मुली जन्माला घातलेल्या. त्यातच ती शिक्षकांकडे यायची. वारंवार म्हणायची,
"सर, माझे वडील मला शिकवायला तयार नाहीत. तुम्ही त्यांना म्हणा ना."
त्यानंतर ते शिक्षक त्या विद्यार्थीनीच्या घरी जायचे. त्यांना समजावून सांगायचे की ही तुमची मुलगी उद्या तुमचा उद्धार करेल. कुटूंब पोसेल. त्यावर त्या पालकांनाही बळ यायचं. कधी तो शिक्षकही त्या मुलीला पैसे द्यायचा आणि ज्यावेळेस तो शिक्षक त्या विद्यार्थीनीला पैसे द्यायचा. तेव्हा त्याला अभिमान वाटायचा. कारण त्यावेळेस त्याचं वेतन बंद असल्यानं त्याची न्यायालयीन लढाई सुरु होती.
तोच शिक्षक एकदा शाळेत असतांना शाळेचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर शाळा सोडून गेलेल्या त्याच विद्यार्थीनींनी एकदा त्यांच्या वाढदिवशी एक दैनंदिनी व पेन त्या शिक्षकाला बक्षीस देण्यासाठी आणला होता.
महत्वपुर्ण बाब की आपलं जर चांगलं शिकवणं असेल तर विद्यार्थी असा केकचा प्रकार करीत असतात. ते विद्यार्थी आपल्या जीवाला जीव लावत असतात. त्यातच बहुतेक सर्वच विद्यार्थी हे हिरीरीनं शिकत असतात. हे प्रत्यक्ष निरीक्षणातून दिसून येतं. परंतु अलिकडील काळात असे चांगले शिक्षक शाळा प्रशासनाला आवडत नाहीत. शाळा प्रशासनाला आवडतात ते शिक्षक. जे नातेवाईक असतात वा देण देत असतात. मग त्यांच्यात शिकविण्याचं मुल्य असो वा नसो. ते शालेय प्रशासन त्या होतकरु शिक्षकांची किंमतच करीत नाही.
आज परिस्थिती अशीच आहे. जी मंडळी चांगले काम करतात. त्यांना समाज स्विकारत नाही. कारण कलियुग आहे. आज जे लोकं काहीही करीत नाहीत. उलट भ्रष्टाचार करुन बक्कळ पैसा कमवतात. त्यांना लोकं ते श्रीमंत असल्यानं मान सन्मान देत असतात. परंतु कालपरत्वे ते कालबाह्य होतात. उलट कालांतरानं मानसन्मान त्यांनाच मिळतो, जे इमानदार असतात आणि तेच कालांतरानं टिकूनही राहतात. शिक्षकांबद्दल सांगायचं झाल्यास पैसा हा क्षणीक असतो. परंतु जे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकवतात. ते शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या जीवनात चिरकाल टिकून राहतात. अगदी त्यांच्या मरणापर्यंत. तेव्हा शिक्षकांचं शिकवणं प्रभावी असावं. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगलंच शिकवावं. जेणेकरुन त्यांचं भविष्य घडू शकेल. कारण वेळप्रसंगी आपले बालपणातील मित्र आपल्याला कदाचीत आठवत नाहीत. त्यांचं विस्मरण होतं. परंतु चांगले शिक्षक आपल्याला सतत आणि नेहमी आठवत असतात. ही वस्तुस्थिती आहे आणि भविष्यात जर त्या शिक्षकांच्या निवृत्त झाल्यानंतर एखादा विद्यार्थी त्याचेजवळ येवून त्याला नतमस्तक होत असेल वा एखादं लहानसं बक्षीस देत असेल, वा एखादा केक त्यांच्या वाढदिवशी त्यांना न सांगता कापत असतील तर तेच त्या शिक्षकांना मिळालेलं बक्षीस असतं. ते बक्षीस भारतरत्न वा जगरत्न पुरस्कारापेक्षाही अतिशय महत्वाचं असतं. म्हणूनच शिक्षकानं आपल्या मनात कोणतेही आढेवेढे वा विद्यार्थ्यांबद्दल कोणताही आकस न ठेवता अगदी निश्चींत मनानं, कोणताही किंतू परंतु मनात न बाळगता आपल्या विद्यार्थ्यांना शिकवावं. प्रभावी शिकवावं. जेणेकरुन त्यातून ते विद्यार्थी पुढील काळात सन्मान करु शकतील, नतमस्तक होतील वा आवर्जून येवून त्यांची भेट घेवू शकतील.

************************************************

ती पाकिस्तानची मागणी झाली होती. कवी इकबालनं पाकिस्तानची मागणी केली होती एका कार्यक्रमाच्या दरम्यान. त्याला पाकिस्तान हवाच होता. वाटत होतं की आपल्या लोकांना हक्काचा असा पाकिस्तान मिळायला हवा. ज्या देशात राहतांना आपल्या हक्काची पायमल्ली होणार नाही. आपल्या मुस्लिमांसाठी स्वतंत्र्य असा पाकिस्तान.
मोहम्मद इकबालनं पाकिस्तान मागितला. तशी कार्यक्रमातून पाकिस्तान मागणीची घोषणाही दिली आणि मोहम्मद जिनाला सांगीतलं की त्यांनी तसा प्रस्ताव तयार करावा. जेणेकरुन पाकिस्तानची आपण केलेली मागणी लावून धरता येईल.
ती पाकिस्तान मागणीची गोष्ट. ती मागणीची गोष्ट सगळीकडं पसरली. जनमत तयार होत होतं. तसं हिंदूंनाही वाटायला लागलं होतं की मुस्लिमांनी पाकिस्तान मागणी केलेली असून आता या देशात एकाही मुसलमानांनी राहता कामा नये. परंतु त्या मागणीला तमाम हिंदूस्थानातील मुठभरच मुस्लिमांचं सहकार्य होतं. ते खुश होते. मात्र बऱ्याच जणांना आजही वाटत होतं की मुस्लिमांनी पाकिस्तानची मागणीच करु नये आणि अखंड हिंदुस्थानाला तोडू नये.
काळ हळूहळू सरकत होता. पाकिस्तानची इकबालनं केलेली मागणी जोर धरू लागली होती. आता त्या मागणीला सहकार्य करणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. त्यातच फकरुद्दीनच्या गावातील बरेच लोकं तयार झाले होते पाकिस्तान मिळवायला. ज्यात नाईलाजास्तव का होईना, आपल्याला वाळीत टाकू नये म्हणून फकरुद्दीनही तयार झाला होता.
आबेद मोठा झाला होता. तशीच शर्मिलाही मोठी झाली होती. त्यातच बालपणापासून सोबत खेळत खेळत आज ते तरुण झाले होते व त्यांच्यात प्रेम निर्माण झालं होतं. त्यातच त्यांचे मायबाप आवर्जुन आणि वारंवार सांगत होते की आपण आपला धर्म पाळायला हवा. आबेदचे आईवडील त्याला कोणत्याही हिंदू मुलींसोबत वा मुलासोबत बोलू नये असं सांगत असे. तीच भाषा शर्मिलाचेही आईवडील करीत. मात्र तरीही मुलं एकमेकांशी बोलत असत आणि व्यवहारही ठेवत असत. अशातच शर्मिला व आबेद तरुण झाले.
आबेद आणि शर्मिला तरुण होताच त्यांचे संदर्भ बदलले. ते एकमेकांवर निरतिशय प्रेम करु लागले होते. आता ते एकमेकांपासून विलग होवू शकत नव्हते. ते त्यांचं प्रेम वाढत चाललं होतं. त्यातच पाकिस्तान मागणीही वाढत चालली होती.

भाग दोन.

पाकिस्तान निर्मीती. त्यातच चर्चा व नंतर पाकिस्तान बनला. त्यानंतर ठरलं की ज्याला ज्याला पाकिस्तानात जायचं असेल, त्यांनी त्यांनी पाकिस्तानात जावं. मग ते हिंदू असो की मुस्लीम. अशी दवंडी सर्व गावागावात जाहीर झाली. तशाच पाकिस्तानच्या सीमाही दवंडीतून सांगण्यात आल्या होत्या. परंतु त्या सीमारेषा स्पष्टपणे समजल्या नव्हत्या स्थानिक लोकांना.
पाकिस्तान निर्माण झाला व मुस्लिमांनी आपल्या आपल्या बिरादरीत सांगीतलं, 'आपल्या हक्काचा पाकिस्तान आपण मागीतला आहे. तिथं आपल्याला खऱ्या स्वरुपाच्या स्वातंत्र्यानं राहायला मिळेल. आपला हक्कं तिथं कोणी डावलणार नाही. अतिशय सन्मानानं आपल्याला राहता येईल. शिवाय सर्वच प्रकारच्या सुखसुविधा मिळतील. तेव्हा आपण स्टेशनवर जावं व पाकिस्तानात रवाना व्हावं.
ज्याप्रमाणे गावागावात दवंडी झाली. त्याप्रमाणेच सर्वच लोकं पाकिस्तानात जायला निघाले. लोंढेच्या लोंढे दिसू लागले होते लोकांचे. काहींना भारताच्या सीमा कोणत्या आणि पाकिस्तानच्या सीमा कोणत्या हे कळायलाही मार्ग नव्हता. त्यातच ज्यांना भारतात राहायचे होते, तेही त्यांना सीमा माहीत नसल्यानं पाकिस्तानात जावू लागले होते.
गावागावातील लोकं आणि त्यातल्यात्यात शहरातील लोकंही पाकिस्तानात जावू लागले होते. अशातच एका अज्ञात व्यक्तीच्या मनात राग धुमसत होता. ज्याचं नाव इमरान होतं.
इमरान....... इमरानला पाकिस्तान व भारत असे हिंदुस्थानचे दोन तुकडे झालेले आवडत नव्हते. लहानपणापासूनच पाकिस्तानची मागणी जोर पकडत असतांना व घरी त्याचे आईवडील चर्चा करीत असतांना त्याला त्या चर्चा ऐकायला येत. त्यावेळेस त्याचं पायाची आग मस्तकात गेलेली असायची.
इमरानला हिंदुस्थान आवडत होता. त्याला ना भारत आवडत होता ना पाकिस्तान. त्याला वाटत होतं की अखंड हिंदुस्थानचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग बनवणे म्हणजे हिंदुस्थान नावाच्या आईला कापून दोन भागात विभाजन करणे होय. तो आधीपासूनच सांगत होता लोकांना की त्यांनी पाकिस्तान नावाचं वेगळं राष्ट्र मागू नये. ते इंग्रजांचं षडयंत्र आहे. परंतु लोकं त्याचं ऐकतील तेव्हा ना. त्यावेळेस तो लहान होता. परंतु आता तो मोठा झाला होता, ज्यावेळेस पाकिस्तान बनला होता.
तो विचारच करीत होता की पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे हिंदुस्थानचे करु नयेत. परंतु तुकडे बनले होते व लोकं त्या बनलेल्या तुकड्यानुसार पाकिस्तानात रवाना झाले होते. काही भारतात येत होते. अशातच त्याला आलेला राग. तो राग मनात न मावल्यानं त्यानं एका रात्री एका अज्ञात व्यक्तीचा खुन केला व प्रसार झाला.
ती रात्र गेली होती व आता दुसरा दिवस उजळला होता. त्यातच कोणाची तरी नजर त्या प्रेतावर पडली. ते प्रेत कुणाचं होतं याचीही शहानिशा झाली नाही. मग जनक्षोभ उसळला. हिंदूंना वाटायला लागलं की ते प्रेत हिंदूचं आहे व हे कृत्य मुस्लिमांनी केलंय. तसंच मुस्लिमांना वाटायला लागलं की ते प्रेत मुस्लिमांचं असून ते कृत्य हिंदूंनी केलेय. त्याच कारणावरुन पुढे वाद वाढला. आता त्यांना सोडायचे नाही असं समजून कत्तली सुरु झाल्या. हिंदू मुस्लीमांची कत्तल करु लागले तर मुस्लीम हिंदूंची. अशातच हिंसाचार वाढत चालला होता.
आज संपुर्ण हिंदुस्थानात नाही तर ज्या हिंदुस्थानाचे दोन तुकडे झाले होते, त्या पाकिस्तान व भारतात हिंसाचार सुरु होता. लोकं सैरावैरा पळत होते. कोणी रेल्वेगाडीवरही हल्ले करीत होते तर कोणी गावागातील लोकं कापून टाकत होते. अशातच भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना वाटायला लागलं होतं, पाकिस्तान मुस्लीमांचा. त्या देशात संबधीत संपुर्ण मुस्लिमांनी जायला हवं. नाहीतर या देशात राहिल्यास येथील तमाम हिंदू लोक आपल्याला कापून टाकतील. आपल्याला जीवंत सोडणार नाही. तसंच पाकिस्तान सीमेत राहणाऱ्या हिंदू लोकांना वाटत होतं की त्यांनी भारतात यायला हवं. नाहीतर पाकिस्तानातील संबधीत मुस्लीम लोकं त्यांना जीवंतच ठेवणार नाही. तीच गोष्ट वाटू लागली होती फकरुद्दीनलाही. ज्यावेळेस आबेद वयानं तरुण झाला होता.
फकरुद्दीन हा मुसलमान होता व त्यालाही तो मुस्लीम असल्यानं वाटू लागलं होतं की पाकिस्तानात जावं. नाहीतर येथील हिंदू लोकं आपल्याला जीवंत ठेवणार नाही. तसं त्यानं घरातील सर्व सदस्यांना सांगीतलं. त्याचबरोबर आबेदलाही. शिवाय आबेदही नाईलाजानं पाकिस्तानात जायला तयार झाला होता. कारण तो तरुण जरी असला तरी मायबापाच्या आज्ञेत होता. परंतु त्याला त्याचं प्रेम आठवत होतं. परंतु फकरुद्दीनचा आदेश तो धिक्कारु शकत नव्हता. शेवटी तो त्याच्या जीवामरण्याचा विषय होता. वाटत होतं की जीवंत राहू तर एकदा भेटायला येवू या भारत भुमीला. सर्व परिस्थिती ठीकठाक झाल्यावर. तसा त्यानं मनात विषय दाबताच फकरुद्दीन आला. तेव्हा रात्र झाली होती आणि फकरुद्दीन सर्वांना सांगत होता,
"आपल्याला पाकिस्तानात जायचं आहे. परवा रातच्याला तीन वाजता पाकिस्तानात जायची गाडी आहे. तेव्हा सर्वजण तयार राहा. मी रेल्वेस्टेशनवर जायसाठी गाडीची व्यवस्था करतोच."
ते गाव तसं शांतच होतं. आजुबाजूच्या गावात दंगे सुरु होते. लोकं एकमेकांच्या घरात शिरत होते. एकमेकांच्या घरात शिरुन तलवारीनं एकमेकांचे बळी घेत होते. महिलांवर अत्याचार करीत होते. लहान बायकांनाही कोंबड्या बकऱ्यासारखं करकरा कापत होते. ते पाहून कोणालाही किळस वाटू लागली होती. काही लोकं धाकानं लपून राहात होते. ज्यात फकरुद्दीन आणि फकरुद्दीनचा परीवारही होताच.
ती रात्र गेली. तसा दिवस उजळला. आबेदच्या वडीलानं पाकिस्तानात जायचा निर्धार केला होता. तसा त्यानंही. आज त्याला बेचैन वाटत होतं. कारण त्याचं शर्मिलावर निरतिशय प्रेम होतं. त्याला आता आठवायला लागल्या होत्या त्याच्या प्रेमाच्या आठवणी. ते समुद्रकिनाऱ्यावरील फिरणं. त्या वाळूत खेळणं. त्यातच आठवत होतं एकमेकांच्या गप्पागोष्टीत रंगणं. आजही त्याला वाटत होतं. आपण शर्मिलाची भेट घ्यावी. कारण उद्यापासूनच शर्मिला आपल्या डोळ्याला दिसणार नाही.
लागलीच विचारांचा अवकाश. त्याची पावलं शर्मिलाच्या घराकडं वळली. तसं गाव शांत असल्यानं त्या गावात तेवढी भीती नव्हतीच.
आबेदचं आपल्या मुलीवर प्रेम आहे. हे शर्मिलाच्या आईवडीलांना माहीत नव्हतं. आबेद शर्मिलाच्या घरी नेहमीच जात असे. त्याचं घरच शर्मिलाच्या घराला लागून होतं. त्यामुळं नेहमीप्रमाणेच आबेद शर्मिलाच्या घरी गेला होता. तसा त्यानं तिला आवाज दिला व म्हटलं,
"मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे."
"बोल ना. तुला कोणी अडवलंय?"
"इथं नाही सांगू शकत मी. तिकडे चल, समुद्रकिनाऱ्यावर. बरंच काही बोलायचं आहे तुझ्या बरोबर."
त्याचं ते बोलणं. ते बोलणं ऐकताच शर्मिला तयार झाली. तशी ती त्याच्याबरोबर सागरकिनाऱ्यावर गेली. त्या वाळूत ते अगदी फतकल मांडून बसले. तशी ती आबेदला म्हणाली,
"बोल, काय बोलायचंय ते?"
शर्मिलानं केलेला प्रश्न. आबेदच्या मनावर कोरला गेला. तसा त्यानं तो प्रश्न ऐकला. परंतु बोलायची हिंमत होत नव्हती. तसं त्यानं तिचे हात हातात घेतले. थोडा वेळ मौनात गेला. तशी ती म्हणाली,
"बोल ना रे. काय बोलायचं ते लवकर बोल. सध्या वातावरण तंग आहे. बाहेर पडायची परवानगी नाही. तरीही तुझ्या आग्रहाखातर आले. मला लवकर घरी जायचे आहे."
"अगं मी कसा सांगू तुला? समस्या मोठी बिकट आहे."
"तू सांग तर आधी. त्यावरही मार्ग काढू."
"नाही सांगू शकत. प्रश्न मोठा गंभीर आहे."
"ठीक आहे. मग मी जातेय आता. उद्या सांगशील."
"नाही. उद्या मी नसणारच इथं."
"म्हणजे?"
"उद्या आम्ही सर्वजण पाकिस्तानात जाणार."
"तू देखील."
"मी देखील."
"मला सोडून."
"होय, तुलाही सोडून."
"मग हे प्रेम कशाला केलंय. मला तर आता तुझ्याशिवाय राहावणार नाही. अन् तुला सांगतोय की त्यांना जावू दे. तू नोको जावूस मला सोडून."
"नाही. मला जावंच लागेल. तसं पाहिल्यास पाकिस्तान आमच्यासाठी सोयीस्कर आहे."
"अरे, परंतु भारतही चांगला आहे ना. तू तुझ्या आईवडिलांना समजव. म्हण की आपण भारतातच राहू. इथंच खरी सुख शांती आहे म्हणावं."
"नाही. आता आमचा निर्णय झाला. आम्ही जाणार म्हणजे जाणारच. मग काहीही होवो. निदान आमच्या धर्मासाठी तरी."
"अरे, मला सोडून तू जाशीलच."
"होय, जावंच लागेल."
"हे एवढं विशाल प्रेम सोडून."
"होय."
"मला मरतांना पाहूनही."
"होय, आता आम्हाला कोणीच अडवू शकत नाही."
"मग मी तरी जीवंत राहून काय करु? मीही कायमचीच जाते."
शर्मिलाचं ते बोलणं. तिनं पिशवीतून एक धारदार सुरी काढली आणि म्हणाली,
"हे बघ आबेद. तू जर जाणार असेल तर मी ही नसच कापून टाकेन हाताची."
तिच्या हातात धारधार सुरी होती. परंतु ती त्याला गंमत वाटत होती. त्याला वाटत होतं की ती त्याला धाकच देत आहे. ती कदाचीत गंमत करीत आहे. तसा तो म्हणाला,
"आता हात कापून टाक की मान. मी जाणार म्हणजे जाणारच."
आबेदच्या बोलण्याचा आता तिला तीव्र राग आला होता. त्यातच तिनं त्यावर थोडा विचार केला नाही आणि तत्क्षणी तिनं आपल्या हाताची नसच कापून टाकली. ते पाहून आबेद घाबरला.
शर्मिलानं आपल्या हाताची नस कापली होती. ते पाहून घाबरलेला आबेद. मात्र तो पळून गेला नाही. त्यानं आपल्या अंगातील उपरण्यानं तिची जखम बांधली. ज्यातून तिचं भळाभळा वाहणारं रक्त थांबलं होतं. त्यानंतर आबेद म्हणाला,
"एवढं प्रेम करतेय तू माझ्यावर. मी तुझी परीक्षा पाहात होतो. तू माझ्या परीक्षेत पास झाली तर........ आता माझा परीवार पाकिस्तानात गेला तरी चालेल, परंतु मी पाकिस्तानात अजिबात जाणार नाही. माझंही तुझ्यावर प्रेम आहेच तर."
ते आबेदचे शब्द. त्यावर शर्मिला म्हणाली,
"पुन्हा असली गंमत माझ्यासोबत करु नकोस. वेड्या, तू माझी परीक्षा पाहात होतास काय? अन् ही असली परीक्षा. आता माझा जीव गेला असता तर........"
"कसा जाईल? माझं खरं प्रेम आहे ना तुझ्यावर." आबेद म्हणाला.
सायंकाळ झाली होती. तसा अंधार पडू लागला होता. पाखरं आपल्या घरट्याकडं परतू लागली होती. तसा आबेदही तिला म्हणाला,
"चल, सायंकाळ झाली आहे. अंधार पडू लागला आहे. आपणही घराकडे परतू."
त्याचं ते बोलणं. त्या बोलण्यावर होकार देत शर्मिलानं होकारार्थी मान हलवली व ते आपआपल्या घराकडे परतू लागले होते.
**********************************************************

शर्मिला घरी आली होती. तशी तिच्या हाताला पट्टी बांधून होती. त्यातच तिची घरी विचारणा झाली. त्यावर तिनं उत्तर दिलं. जखम लहानशीच आहे. बाजूच्या गावात काही कामानिमित्त गेली होती. तेव्हा त्या आपल्याच बिरादरीतील हिंदूंनी अडवलं व म्हटलं की अशी बाहेर आता फिरत जावू नकोस. अशी फिरशील तर आपला जीव धोक्यात टाकशील. त्यांनी मला आठवण राहावी म्हणून माझ्या हाताला झळ पोहोचवली.
शर्मिलाचे वडील समजदार होते. ते काय समजायचं ते समजले. त्यानंतर ते चूप बसले होते. मात्र आबेदच्या घरी आबेद जाताच त्याच्या वडीलानं सांगीतलं की आपल्याला आजच पाकिस्तानात रवाना व्हायचं असून आज रातच्यालाच गाडी आहे.
आबेद वडीलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता. त्यातच त्याला वाटत होतं की आपला धर्म चांगला. आपण आपला धर्म सोडून इथं राहायला नको. शिवाय आपल्या धर्माला संरक्षण देणारा देश आपल्यासाठीच निर्माण होतोय. तेव्हा आपण आपल्या देशात जायला हवं. असाच विचाऔर करीत तो रातच्यालाच पाकिस्तानात निघून गेला होता.
आबेद पाकिस्तानात गेला होता. शर्मिला मात्र भारतात होती. तिही त्या कोकणात. तिला तो भेटायला आला नव्हताच दुसऱ्या दिवशी.
दुसरा दिवस उजळला होता. आबेद भेटायला न आल्यानं ती समजून गेली होती की आबेद पाकिस्तानात गेलाय आणि आपण विनाकारणच त्याचेसाठी आपला हात कापलाय. तो धोकेबाज निघालाय आणि आपण आपल्याच हाताला वेदना देवून आपल्या हाताला दुःखी केलंय. आता आपण त्याला विसरायला हवं. कारण त्यानं धोका दिलाय. त्याला धर्म प्रिय होता. प्रेम नाही.
तिला आठवत होते ते दिवस. तो समुद्र आणि त्या समुद्रातील वाळू. कित्येक वेळेस तिनं त्या समुद्रात आपले व आबेदचे नाव कोरले होते आणि त्यानंही तिला ते नाव कोरतांना सहकार्य केलं होतं. शिवाय त्यानं तिचं नाव आपल्या छातीवर व तिनं त्याचं नाव आपल्या हातावर कोरलं होतं. मात्र वाळूवर कोरलेलं नाव. तसं नाव कोरताच समुद्राची एक लाट यायची व ती लाट ते संपुर्ण नाव मिटवून जायची. आज अशाच धर्मरुपी समुद्राची लाट येवून गेली आणि त्या लाटेनं आबेदला माझ्यापासून हिरावून नेलं.
शर्मिलाला आवडत होता आपला भारत. ज्या देशात ती लहानाची मोठी झाली होती. ज्या देशात तिचा जन्म झाला होता. ज्या देशात तिचं प्रेम झालं होतं. तसा आजपर्यंत आबेदही आवडत होता. तसं पाहिल्यास जरी मुस्लिमांनी त्या गावात हिंदूंशी संबंध ठेवले नसतील तरी आबेद शर्मिलाच्या घरी येत असे व तिच्या वडीलांनाही तो गैर वाटला नाही.
शर्मिलाला आबेदची आठवण येत होती. परंतु ती त्याला पाकिस्तानात जाताच हळूहळू विसरायला लागली होती. जखम आता पुर्णतः बरी झाली होती. परंतु आबेदनं मनावर केलेली जी जखम होती, ती जखम अजून कोरडी व्हायची बाकी होती.
भारत स्वातंत्र्य झाला होता. स्वातंत्र्याचा उत्सव पार पडला होता. त्याचा सर्वत्र आनंद झाला होता. त्याचबरोबर आनंद शर्मिलालाही झाला होता.
दिनांक पंधरा ऑगस्ट. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा गतकाळातील अतिशय मानाचा दिवस. त्या दिवशी तमाम भारतीयांना त्यांच्या मनमुराद स्वप्नांना आकार मिळाला व जाहीर झालं की आता यानंतर ब्रिटीशांची सत्ता राहणार नाही. ते येथून आपली सत्ता सोडून जातील. आता या भारतातील सत्ता येथीलच लोकं चालवतील आणि जेही लोकं चालवतील, त्यांनी कोणाला त्रास देवू नये.
भारताला स्वातंत्र्य जाहीर होताच दिनांक पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजताच ब्रिटीशांचा युनीयन जॅक खाली उतरला व त्याजागी भारताचा तीन रंगी तिरंगा वर चढला.
ती रात्र....... ती रात्र अतिशय मोलाची होती. सर्व भारतीयांनाच आनंद झाला होता. त्यातच तो आनंद येथील भुमी आणि वातावरणालाही झाला होता. जो आनंद प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाऊस, वारा जातीनं हजर होता. तरीही लोकं डगमगले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्योत्सव आपल्या गल्लीगल्लीत साजरा केला. असा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत असतांना काही लोकांनाच निमंत्रण नव्हतं. त्यांना जाणूनबुजून विसरलं होतं येथील प्रशासन. ज्यांनी याच देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली होती.
स्वातंत्र्याचा उत्सव साजरा झाला आणि त्यानंतर प्रश्न उठला निर्वासीतांचा. कारण दोन देश निर्माण झाले होते. जे दोन देश धर्माच्या आधारावर निर्माण झाले होते. अर्थात हिंदुस्थानचे दोन तुकडेच केले होते. एक देश होता पाकिस्तान तर दुसरा देश होता भारत.
हिंदूस्थान हा भारत पाकिस्तान या दोघांचाही भाग. भारत पाकिस्तान बनण्यापुर्वी येथील जनता ही हिंदूस्थानात निरनिराळ्या कानाकोपऱ्यात राहायची. ज्यात हिंदूही होते तसेच मुस्लिमही. या ठिकाणी पाकिस्तान देश बनविण्यात काही मुस्लिम नेत्यांची मागणी होती. परंतु त्यात तमाम हिंदूस्थानात राहणाऱ्या लोकांचे मत विचारात घेतले गेले नव्हते. ज्यात मुस्लिमांचाही समावेश होता. तसेच काही भागात राहणारे हिंदूही होते. असे हिंदू की जे भारत पाकिस्तान बनल्यावर पाकिस्तानातील कानाकोपऱ्यात राहात होते. तसेच असे मुस्लिम की जे भारत बनल्यावर भारतातील एका कोपर्‍यात राहात होते. ज्यांना भारत पाकिस्तानच्या सीमारेषाही माहित नव्हत्या. शिवाय त्यापैकी काही मुस्लिम लोकांना भारतात राहायचे होते तर काही मुस्लिम लोकांना पाकिस्तानात जायचे होते. तसंच काही हिंदू लोकांना भारतात यायचे होते तर काही हिंदू लोकांना पाकिस्तानातच राहायचे होते. त्यातच आव्हान सुरु होतं की ज्यांना ज्यांना भारतातून पाकिस्तानात जायचे असेल त्यांनी जावं व ज्यांना राहायचे असेल त्यांनी राहावं.
नेत्यांची मागणी. आम्हाला पाकिस्तान हवाच. ते खुळ त्यांच्या मनात कोणी भरलं? का भरल्या गेलं? ते खुळ फायद्याचं होतं की नुकसानदायक. यावर कोणीच विचार केला नाही. फक्त खुळ समोर आणले व त्यातून भारत पाकिस्तानची निर्मिती झाली.
ते खुळ. त्यालाही एक इतिहास आहे. म्हणतात की भारतात आलेले इंग्रज. त्यांनी या देशावर राज्य करण्यासाठी फोडा व झोडा या पद्धतीचा अवलंब केला. ते कधी हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी आकस शिरवीत. जेणेकरुन वातावरण चिघळायला हवं. तसंच मत मुस्लिमांच्याही मनात टाकत असत. सन १८५७ चा उठाव याच विचारातून झाला. परंतु या उठावाच्या वेळेस हिंदू मुस्लीम भांडले नाहीत. ते एकत्र येवून लढलेत. फरक एवढाच की ते तुकड्यातुकड्यानं लढलेत. म्हणूनच पराभव झाला. त्यावेळेस इंग्रजांनी ओळखलं की जर हिंदू मुस्लीम एकत्र राहिले तर आपली या देशात डाळ शिजणार नाही. म्हणूनच त्यांनी लार्ड कर्झनच्या नेतृत्वात पुढे सन १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली व धर्मांधतेला पहिला फाटा फोडला. त्यातच इंग्रजांनी हिंदूंची कमजोरी ओळखत मुस्लिमांना जास्तीचे अधिकार देणे सुरु केले. ज्यातून हिंदूंमध्ये मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण होईल. तसंच काही मुस्लीम नेत्यांना हाताशी घेवून त्यांच्यात हिंदूंविषयी दुहीचे बीज पेरले. बीज हेच की त्यांच्यावर हिंदू अत्याचार करतात. यातूनच मुस्लीम कवी इकबालनं मुस्लीम लीग संमेलनात सन १९३० मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. त्यानंतर याच मागणीला सन १९३५ मध्ये दुजोरा मिळाला.
मुस्लीम लीग मुस्लिमांची. त्यातच पाकिस्तानची मागणीही मुस्लिमांची. मुस्लिमांसाठी तो खास स्वतंत्र्य देश. त्यावर काही मुस्लीम लोकं खुश होते तर काही नाखूश होते. परंतु स्वतंत्र्य पाकिस्तान कवी इकबाल यांना का हवा होता? त्यात षडयंत्र कोणाचं? ही गंभीर बाब त्या काळात कोणीही विचारात घेतली नाही. शिवाय आजही ती बाब आपल्याला कळलेली नाही.
ती इकबालनं जी स्वतंत्र्य पाकिस्तानची मागणी केली होती. त्यात इंग्रजांचाच हात असेल. परंतु एक विचार केल्यास तो इंग्रजांचा त्यावेळेसचा हेतू नसेल. परंतु नंतर इंग्रजांनी त्यांच्या स्वतंत्र्य पाकिस्तानची मागणी ताबडतोब मान्य केली. ज्यात दोन हेतू होते. पहिला म्हणजे आपल्याला मुस्लिमांनी चांगलं म्हणावं. तसाच दुसरा हेतू म्हणजे तमाम भारतीयांना मुस्लिमांपासून छुटकारा मिळावा. कारण त्यांनी बऱ्याच वर्षांपासून पाहिलं होतं. हिंदू मुस्लीम आपापसात लढत होते व एकमेकांच्या धार्मिक भावना तर दुखवत होतेच. शिवाय एकमेकांचे मुंडके छाटायलाही मागेपुढे पाहायचे नाहीत.
मुस्लिमांची जोर धरणारी पाकिस्तान मागणी. त्याला सहमती देत इंग्रजांनी केलेले अखंड हिंदूस्थानचे तुकडे. त्यातच महात्मा गांधींना वाटत असलेलं देशप्रेम. त्यांना अखंड हिंदूस्थानचे तुकडे झालेले चालत नव्हते. कारण काही काही मुस्लीम नेत्यांनी त्यांच्याशी बोलणी केली असेल की आम्ही भारत सोडून जात नाही. आम्हाला हाकलू नये. त्यानंतर महात्मा गांधी चक्कं उपोषणाला बसले. परंतु त्यांच्या उपोषणानं देशातील काही लोकांच्या भावना थोडं ना बदलणार! शेवटी काही हिंदू लोकांना वाटत होतं की भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी पाकिस्तानातच जावून राहायला हवं. तसंच काहींना वाटत होतं त्यांनी इथंच राहावं. ते आपले मित्र आहेत. तसंच पाकिस्तानातील काही मुस्लीम लोकांना वाटत होतं की येथे राहणाऱ्या तमाम हिंदू लोकांनी भारतात जावं. तर काहींना ते तिथंच राहावं असं वाटत होतं. हाच वाद होता व यावरुनच दंगे सुरु झाले. त्यातच काही लोकांनी आपलीच माणसं कापली. ज्यातून भडका उडाला व धार्मिक दंगली सुरु झाल्या. त्याचा परिणाम हा झाला की तद्नंतरच्या काळात निर्वासीतांचा प्रश्न सुटला नाही. ज्यांना जिथे जायचे होते. ते तिथेच राहिले. त्यांची इच्छा पुर्ती झाली नाही. मात्र तो इतिहास बनला. रक्ताळलेला इतिहास. धार्मिक दंगलीचा इतिहास. जो त्यांचे त्यांचे पुर्वज आपल्या आपल्या पिढ्यांना आज सांगत होते व त्यावरुनच आज भारत जरी स्वतंत्र्य झाला असला तरी आजही हिंदू मुस्लीम वाद होत होते. काही काही लोकं स्वतःच स्वतःच्याच धर्मातील माणसांवर, बिरादरीवर गोळ्या चालवत होते व त्याला धार्मिक रंग देवून दुसऱ्या धर्मातील लोकांची नावं पुढं करत होते. त्यातच धर्मांना बदनामही करत होते.
प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया "लार्ड मांउटबॅटन योजनेअंतर्गत" पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या अधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. भारत पाकिस्तानचा जन्म झाला. भारताला स्वातंत्र्य तर मिळालंच. ज्यातून हिंदूसाठी भारत व मुस्लिमांसाठी पाकिस्तान निर्माण केल्या गेला. परंतु हे जरी खरं असलं तरी तमाम भारतात त्यावेळेपासून हिंदूंसोबत मुस्लीम राहात होते. आजही राहतात. तसेच पाकिस्तानमध्ये त्यावेळपासून हिंदू राहात होते, आजही राहतात. ज्यांना ज्यांना ज्या ज्या ठिकाणी राहायचे होते. ते राहात आहेत आजही. याचाच अर्थ असा की आजही भारतात तसंच पाकिस्तानात विविध धर्माचे लोकं आहेत. जे त्यावेळेस अखंड हिंदुस्थानात होते. मग भारत आणि पाकिस्तान का निर्माण केला? यावर आता उत्तर सापडत नाही. परंतु हाच विषय व विचार मनात ठेवून कधीकधी आजही बॉम्बस्फोट होतात काहीकाही ठिकाणी. कधी आपलीच मंडळी बॉम्बस्फोट करुन दुसऱ्यांना बदनाम करतात तर कधी दुसऱ्या धर्माची मंडळी बॉम्बस्फोट करतात. ज्यात निरपराध लोकांचा बळी जात असतो.
आबेद लहान होता. तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे काय? हे त्याला समजत नव्हतं. ना निर्वासीतही समजत होते. परंतु त्याची झळ जेव्हा त्याला पोहोचली. जेव्हा तो मोठा झाला होता. तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे काय? हे नक्कीच त्याला समजायला वेळ लागली नाही. मात्र या स्वातंत्र्यानं पुढं माणुसकी सोडली होती व हिंसाचार सुरु झाला होता. आपलीच माणसं आपल्याच माणसांचा गळा कापू लागली होती.
शर्मिला ते सगळं पाहात होती. ती त्या सर्व गोष्टीचं निरीक्षण करीत होती. ती भारतातच होती. तिला वाटत होतं की, झाली गोष्ट झाली. काही चुकाही झाल्यात. तसं पाहिल्यास भारताला वा पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळणं अतिशय महत्वाचं होतं. परंतु त्यातून भारत पाकिस्तान वाद उत्पन्न होणं वा हिंदू मुस्लीम तेढ निर्माण होणं तेवढं महत्वाचं नव्हतं. जो वाद आज विनाकारण उत्पन्न होत आहे. तसं पाहिल्यास चुकांपासून शिकणं हा निसर्ग नियम आहे. हीच वस्तुस्थितीही आहे आणि हीच गोष्ट पुर्वीपासून चालतही आलेली आहे. तेव्हा झालेल्या त्या सर्व आपल्या चुका सुधारून आपण सर्व हिंदू मुस्लीम लोकं, तसेच इतरही धर्माचे लोकं एकत्रीत राहूया. पाकिस्तानचं जावू द्या. आपण आपल्या भारताचा विचार करुया. आपला भारत बलशाली बनवूया. तसंच त्याला सुजलाम सुफलाम बनवूया. जेणेकरुन येणाऱ्या पिढीतील प्रत्येक भारतीय माणसाला गर्व वाटेल व त्याची छाती वीतभर फुगेल. जर आपण तसे वागलो तरच देश जागतिक महासत्ता बनेल. आपल्याला आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवता येईल. नाहीतर पुन्हा एकदा या भारताचे तुकडे होवून पुन्हा दोन नवीन देश निर्माण होतील. ज्यात पुन्हा एकदा निर्वासीतांचा प्रश्न उद्भवेल. मग धार्मिक दंगे, कत्तली, हिंसाचार, जाळपोळ होईल. ज्यातून विनाकारण निष्पापांचे मुदडे पडतील. मग जागतिक महासत्ता जाईल खड्ड्यात. एरवी देश सुजलाम सुफलामही बनणार नाही. अन् बलशालीही बनणार नाही. म्हणूनच मिळालेलं स्वातंत्र्य अतिशय मेहनतीनं व बलिदानानं मिळालेलं आहे. ते टिकवूया. तसंच अबाधीत ठेवूया. एकमेकांशी न भांडता, न वाद करता. गुण्यागोविंदाने आणि तेवढ्याच एकजुटीने.
शर्मिलाचा तो विचार. त्या विचारात काहीसं तथ्य होतं. कारण ते विचार भारताला उज्ज्वल बनविण्याच्या हेतुनं सकारात्मक असे विचार होते.
भारत पाकिस्तान वाद होतच होता. हिंसाचारही होतच होता. परंतु निर्वासीतांचा प्रश्न मिटला होता. आता कायमस्वरुपानं मुस्लीम व हिंदू समुदाय आपापल्या देशात राहू लागले होते. मात्र शर्मिलाला आजही आठवत होता आबेद. कधी कधी त्याची आठवण आलीच तर जीव कासावीसही व्हायचा. परंतु त्याच आठवणीवर फुंकर टाकत ती पुढं चालायची. मात्र त्या आठवणीनं आता ती सतत निराश होत असे. ती आठवण काही केल्या पुसली जात नव्हती. अशातच तिचं वय ढळून जावू लागलं होतं.
वय उतरुन जावू लागलं होतं. तशी तिच्या विवाहाची काळजी तिच्या मायबापाला होत होती. त्यामुळंच तिच्यासाठी स्थळ पाहणे सुरु झाले होते. अशातच एक स्थळ आलं व शर्मिलानं आपला विवाह करुन टाकला. ज्यात ती आपल्या स्वतःला हरवून गेली होती. तिला पती एवढा चांगला मिळाला होता की तो तिच्यावर बराच प्रेम करु लागला होता. तिला कोणत्याच स्वरुपाची उणीव भासू देत नव्हता.

************************************************
भारत हा आधीपासूनच अतिशय सुजलाम सुफलाम देश आहे. या देशाचाही अतिभव्य असा इतिहास आहे. तो इतिहास समृद्ध आहे. शिवाय या देशात असे असे वीरपुरुष जन्माला आले की ज्याचा आपल्याला गर्व वाटतोय.
भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालं. प्रचंड प्रमाणात असलेल्या इंग्रजांच्या दहशतीतून भारत स्वातंत्र्य झाला. त्यासाठी कित्येक लोकांना बलिदान द्यावे लागले. ज्यात केवळ हिंदूच नव्हते तर तमाम मुस्लीम व शिखही होते. ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. आज ते नाहीत, परंतु त्यांच्या आठवणी आजही तेवत असतात आपल्या प्रत्येक भारतीय माणसांच्या मनामध्ये.
भारत स्वतंत्र झाला, तेव्हा काही प्रश्न निर्माण झाले होते. ज्यात पहिला प्रश्न होता. तो म्हणजे निर्वासीतांचा. तो प्रश्न सोडविणे भाग होते. कारण असे असे काही राज्य होते की त्या राज्यातील काही लोकांना पाकिस्तान हवाच होता तर काही लोकांना तेवढ्याच प्रमाणात भारतही. शिवाय काही राजे असेही होते की तेथील राजांना पाकिस्तान आवडत होता आणि जनतेला भारत. अशातच सरदार वल्लभभाई पटेलच्या नेतृत्वात बऱ्याच राज्यांचे प्रश्न सोडवले गेले आणि संबधीत सर्व राज्य भारत आणि पाकिस्तानात विलीन करण्यात आले. भारत स्वतंत्र्य झाल्यावर दुसरा प्रश्न निर्माण झाला. तो म्हणजे संविधानाचा. भारत स्वतंत्र्य तर झाला होता. परंतु येथील कारभार चालवायचा कसा? कोणत्या यंत्रणेनुसार कारभार चालवायचा. त्यासाठी काही नियमावली लिखीत स्वरुपात हवी होती. तो मुद्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या नेतृत्वात मसुदा समितीनं सोडवला. तिसरा प्रश्न होता, अन्न पिकवणे व त्यात वाढ करणे. जर अन्नच पिकलं नाही तर आपण आपल्या देशातील तमाम भारतीयांना खायला काय घालणार? हाही एक कळीचा मुद्दा होता. कारण इंग्रज या देशातून जेव्हा स्वातंत्र्य देवून गेले. तेव्हा जातांना त्यांनी या देशात काहीच असं शिल्लक ठेवलं नव्हतं. सर्व बाबतीत भारताला लुटलूट लुटलं होतं. त्यामुळं तोही एक प्रश्नच होता व तो प्रश्न सोडवतांना पंडीत नेहरुंनी तमाम पंचवार्षिक योजना राबववल्या व सिंचनाखाली जास्तीत जास्त क्षेत्र आणलं. व्यतिरीक्त भारताची उच्चकोटीनं प्रगती केली. चौथा प्रश्न होता शिक्षण. गावागावात शिक्षणाच्या सोयी पुरविणे. कारण शिक्षण जर नसेल, तर कोणीही कोणाला मुर्ख बनवू शकतं. हे सरकारचं म्हणणं होतं. त्यातच भारतीय नेत्यांना वाटत होतं की माझ्या देशातील कोणत्याही व्यक्तीला, तो कुठेही गेलेला असतांना कोणीही मुर्ख बनवायला नको. मग काय, तीच बाब हेरुन सरकारनं सरकारी शाळा ह्या गावागावात काढल्या व सर्वांच्या प्राथमिक शिक्षणाच्या सोयी मोफत केल्या गेल्या. पाचवा प्रश्न निर्माण झाला होता रस्त्याचा. सरकारनं पाहिलं की दळणवळण करायला रस्ते नाहीत आणि दळणवळण जर केलं गेलं नाही तर एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी जाईल कसा? याच प्रश्नातून रस्त्याची निर्मीती झाली व दळणवळणाचा प्रसार झाला. त्यातच सरकारनं पाहिलं की आपण रस्ते बनवले. परंतु त्या रस्त्यावर पुल. पावसाळ्यात पाऊस पडायचा. तेव्हा नद्या तुडूंब भरलेल्या असायच्या. त्यावेळेस वाहतूक खोळंबायची. कारण जायला जागाच नसायची. सरकारनं विचार केला की जर नदीवर पुल नसेल आणि दोन दोन दिवस रस्त्यावरील वाहतूक खोळंबळत असेल तर त्या साधनात असणारा माल खराब होवून फेकला जाईल. अशानं अतोनात नुकसान होईल. यातूनच पुलाची कल्पना आली व पुलं बांधल्या गेलीत. पुढं सरकारनं पाहिलं की मोठमोठे पुलं देशात आहेत. परंतु छोट्या पुलाचं काय? छोटे पूल जर नसतील तर गावातील माल शहरात येणार कसा? शिवाय मुलं गावातील ओढ्याला पाणी असल्यानं शाळेत जात नाहीत. शिक्षण बुडतं. त्यावर उपाय म्हणून सरकारनं गावागावात लहान लहान रस्ते निर्माण केले. त्यानंतर विचार केला उद्योगाचा. देशात उद्योग नसतील तर आत्मनिर्भरता येईल कशी? लोकांना रोजगार मिळेल कसा? याच दृष्टीकोनातून विचार करुन सरकारनं उद्योगांची व कारखान्यांची निर्मीती केली. नंतर सरकारनं पाहिलं की आता देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर गेला. परंतु हे सर्व करीत असतांना देशात वीज जर नसेल, तर उद्योगधंदे चालतील कसे? कारण उद्योगधंदे हे विजेवर अवलंबून असतात. मग सरकारनं वीज निर्माण करण्याला प्राधान्य दिलं. त्यानंतर सरकारला वाटलं की जनतेचं आरोग्यही बघावं. जर जनतेचं आरोग्य चांगलं असेल तरच ते कारखान्यात काम करु शकतील. त्यानंतर कारखान्यात काम करणाऱ्या मजबूत व सशक्त कामगाराची गरज पुर्ण करण्यासाठी सरकारनं मोठमोठी रुग्णालये उघडली. त्यानंतर सरकारला वाटलं की जे आपण रुग्णालय उघडलं आहे. त्या रुग्णालयात रोगी जास्त आहेत. ते का येतात? या कारणांचा शोध घेतल्या गेला व कळलं की देशात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. तसेच सर्व आजार हे दुषीत पाणी प्यायल्यानं होत आहेत. त्यामुळंच तसा विचार करीत असतांना सरकारनं गावागावात व शहरा शहरात नळलाईन पुरवली. त्यातच पाण्याचाही प्रश्न सोडवला. त्यानंतर सरकारनं पाहिलं की आपण रस्ते बनवले. परंतु ते रस्ते लहान पडतात. त्यामुळं अपघात होतो. मग रस्ते मोठे केले. तरीही अपघात होतच होते व त्यात लाखो रुपयाचं नुकसान होत होतं. ते पाहून सरकारनं मोठ्या रस्त्यावर रस्ते दुभाजक लावले. असे बरेच प्रश्न होते. या सर्व गोष्टी अल्पावधीतच भारतानं पुर्ण केल्या. परंतु कोणत्याच भारतीयांना त्यांनी उपासात ठेवलं नाही वा कोणत्याच भारतीयांची उपासमार होवू दिली नाही.
आज आम्हाला भारताचं समृद्ध असं रुप दिसत आहे. देश सुजलाम सुफलाम दिसत आहे. सगळीकडं रस्ते चकाचक दिसत आहेत. गावागावात रस्ते पोहोचले आहेत व ते पक्क्या स्वरुपाचे दिसत आहेत. मोठ्या तसेच छोट्या नद्यांवर पुल दिसत आहेत. गावागावात वीज पोहोचलेली दिसत आहे. गावागावात शाळा आणि शिक्षण, शिवाय आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या दिसत आहेत. सिंचनाच्या सोयी दिसत आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयी आज गावागावातही दिसत आहेत. उद्योगही निर्माण झाले आहे. तसेच काही मोठ्या शहरात मोठमोठे सरकारी रुग्णालये देखील.
शिक्षणाच्या सुविधाही गावागावात पोहोचल्या आहेत. नदीवर भव्यदिव्य पुलाचे निर्माण केले गेले आहेत. विज्ञानाच्या बाबतीतही देश आघाडीवर आहे. आज देश चंद्रावर पोहोचलेला आहे. हेच नाही तर देशानं कित्येक अणूबाँब बनवले आहेत आणि कितीतरी प्रमाणात अणूबाँब बनवले आहे. आज देश महासत्ता बनण्यास तयार आहे. त्याचं कारण म्हणजे गतकाळातील नेत्यांनी घेतलेली मेहनत. ती मेहनत एवढ्या प्रमाणात घेतली आहे की विचारता सोय नाही. तसे नेते आज दिसत नाहीत. त्यांची वानवा जाणवते. मात्र असं निश्चीतपणानं म्हणता येईल की आजच्या नेत्यांनीही त्यांच्यासारखंच बनण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्यावर ताशेरे न ओढता. जेणेकरुन देशाचा अतिशय उच्च कोटीचा विकास होवू शकेल. गतकाळात असेही काही राजकारणी होवून गेलेत की ज्यांनी केवळ आणि केवळ आपल्या देशासाठीच काम केले. जोही उत्पन्नाचा पैसा यायचा. त्या पैशानं आपलं घर भरलं नाही, तर त्या पैशातून आपल्या देशाचा विकास केला. म्हणूनच ही भरभराट दिसते आहे. मात्र काही मध्यंतरीच्या काळात काही नेत्यांनी भ्रष्टाचार करीत मंत्री बनल्यावर देशाचाच पैसा खाल्ला नव्हे तर जनतेचा पैसा खाल्ला. आपल्या परीवारांना सशक्त बनविण्यासाठी. त्यांनी भ्रष्टाचार केला व नेत्यांच्या पुर्वी असलेल्या स्वच्छ प्रतिमेवर कलंक लावला. खरं तर नेते बनल्यावर अशा प्रकारचा देशातील पैसा त्या नेत्यांनी खायला नको होता.
आज भारत स्वतंत्र्य आहे व या स्वतंत्र्य भारतातील आजचे काही नेते बरळतात की गतकाळातील बऱ्याच नेत्यांनी भ्रष्टाचार केला, पैसा खाल्ला. ठीक आहे. भ्रष्टाचार केला, पैसा खाल्ला. परंतु तो पैसा कोणी खाल्ला? असा प्रश्न उपस्थीत झाल्यास एक प्रश्न हाही निर्माण होतो की ज्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस देशाजवळ किती प्रमाणात पैसा होता? शिवाय असंही म्हटलं जातं की कालपर्यंत असा पैसा खात असतांना देशाचा विकासच झाला नाही. मग देशाचा विकासच झाला नाही तर आज जे गावं न् गाव रस्त्यानं जोडलेली दिसतात, ती कोणी जोडली? आज गावागावात शाळा दिसतात, त्या कोणी निर्माण केल्या? आज गावागावात सिंचनाचे प्रकल्प दिसतात, ते कोणी निर्माण केले? तसेच काल अवकाशात गेलेला आर्यभट्ट कोणी पाठवला? गावागावात वीज कशी पोहोचली? खरं तर भारत स्वतंत्र्य झाला, तेव्हा आपल्या देशाची हालत खस्ता होती. सारेच प्रश्न आ वासून उभे होते आपल्यासमोर. परंतु तत्कालीन नेत्यांनी एवढी मेहनत केली भारताला उभारणी देण्यासाठी की त्याची कल्पना आपण करु शकत नाही. शिवाय आपल्या भारतानं विकास करु नये म्हणून आपल्याच उरावर बसलेला पाकिस्तान चीनच्या माध्यमातून आपल्याला नेस्तनाबूत करु पाहात होता. परंतु त्यांनाही मात देत देशानं त्यांनाही चूप बसवलंच होतं. म्हणून देशाचे नेते त्याकाळचे कोणतेही का असेना, त्यांच्यावर ताशेरे ओढणे बरे नाही. असे ताशेरे ओढण्यापेक्षा आपण काय करतो याकडे प्रत्येकानं लक्ष द्यावं. आपण त्यांच्या तोडीचं काम आधी करावं. मगच बोलावं. कारण विकास झालेला आहे आणि तोही भरपूरच झालेला आहे. शिवाय विकास झालेला असण्याची बाब सत्य आहे. त्यात किंचीतही असत्यता नाही.
भारत आज एक सुजलाम सुफलाम देश बनला होता. त्यातच भारतात राहणारी शर्मिला आपल्या संसारात रममाण झाली होती. तिचा पती तिला चांगलंच वागवत होता. त्यातच कोणत्याही गोष्टीची तिला कमी पडत नसे.
भारतात आजमितीस चांगल्या सुधारणा झाल्या होत्या. चांगले रस्ते बनले होते. शिक्षणाच्या सोयी झाल्या होत्या. उद्योगधंदे निघाले होते. रोजगाराचा प्रश्न सुटला होता. नदीवर पुल बनले होते. गावागावात वीज पोहोचली होती.
शेतीसाठी सिंचनाच्या सोयी झाल्या होत्या. त्यातच शेती सुधारली होती. पिण्याच्या पाण्याच्या सोयी झाल्या होत्या. शिवाय आता शेती चांगली पीकत होती. त्यातच कोणत्याही नागरीकास कोणत्याही कामासाठी अडकावं लागत नव्हतं. मात्र पाकिस्तानात तशा सोयी नव्हत्या. मुख्य दोन चार रस्ते जर सोडले तर बाकी सर्वच रस्ते बेताल होते. त्यावर साधं डांबरीकरण नव्हतं. महिलांना तर शिक्षणाच्या संधी नव्हत्या. त्यांना बुरख्यात राहावं लागत होतं. त्यातच त्यांना मुलं पैदा करण्याची मशीन समजलं जात होतं. शिक्षण होतं. परंतु त्या शिक्षणातही भेदभाव होताच. मुलं उच्च शिक्षण शिकू शकत होते. मात्र मुलींना उच्च शिक्षणाची बंदी होती. शिवाय काही काही घरात महिलांना नोकरी करण्याचा अधिकार नव्हता. तशी बरीचशी मंडळी शिक्षणापासून वंचीतच होती.
उद्योगाबाबत सांगायचं झाल्यास उद्योगधंदे कमी होते. त्यातच बेरोजगारी जास्त होती. उपासमार सतत होत असे. तसेच बरेचसे कुटूंब उपासमारीतच जगत होते. ना नद्यांवर पुल होते. ना बरोबर दळणवळणाच्या सोयी होत्या. शिवाय जर एखाद्या व्यक्तीस काम पडल्यास त्याची कामं नीट होत नव्हती. त्याला सतत चकरा माराव्या लागत असत.
आबेद आज पाकिस्तानात स्थिरावला होता. त्याला शर्मिलाची आजही आठवण येत होती. तिच्यावर त्याचा जीव जडला होता. परंतु आता थोडी समस्या होती. ती समस्या म्हणजे त्याचं तिला भेटणं. कधीकधी त्याला तिची आठवण आली की त्याचाही जीव कासावीस व्हायचा. कधीकधी तिला केव्हा भेटतो. असंही होवून जायचं.
आबेदला आठवत होतं, ते तिच्यासोबत समुद्रकिनारी वाळूत फिरणं. त्यातच आठवत होता तो प्रसंग. ज्यावेळेस त्यांनी आपलं नाव समुद्राच्या वाळूत कोरलं होतं. जे समुद्राच्या लाटेनं मिटून गेले होतं आणि तोही एक प्रसंग आठवत होता. ज्यावेळेस तिनं आपल्या हाताची नस कापली होती, त्यानं तिच्यासोबत राहावं म्हणून. शिवाय तेही आठवत होतं की तिला दिलेलं भेटण्याचं आश्वासन. तिचा विचार होता, त्याला भेटण्याचा आणि त्यानं तिला दुसऱ्या दिवशी भेटण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु तो दुसऱ्या दिवशी तिला भेटण्यासाठी थांबलाच नाही. तो तर पाकिस्तानात आला होता. कदाचीत ती जीवंत असेल का? त्याला आज तिच्या बाबतीतील तो प्रश्न पडला होता.
आबेदला जशी तिची आठवण येत होती. तशीच त्याची पाकिस्तानात कोणती कामंही लवकर होत नव्हती. त्याला त्या कामात प्रशासनाची दिरंगाई दिसून पडत होती. अशातच भारताची स्थिती त्याला माहीत पडत होती. भारत किती प्रमाणात संपन्न झाला. किती प्रमाणात नाही. या साऱ्या गोष्टी त्याला माहीत पडल्या होत्या. त्यातच त्याला तो राहात असलेल्या पाकिस्तानातील हाल माहीत होते. ते पाहता त्यावेळेस वाटत होतं की जर आपण पाकिस्तानात येण्याऐवजी भारतातच राहिलो असतो तर बरे झाले असते.
भारतात यायची ओढ त्याच्या मनात निर्माण झाली होती. त्यातच शर्मिलाला केव्हा केव्हा भेटतो आणि केव्हा केव्हा नाही, असंही होवून गेलं होतं. भारतातही आपल्यासारखे मुस्लीम आहेत. ज्यांची स्थिती उत्तम आहे याचीही जाणीव त्याला झाली होती. अशातच तो विचार करु लागला होता भारतात येण्याचा. त्यातच तो कागदपत्र बनवू पाहात होता. कारण त्याला भारतात यायचे होते.