क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ४ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ४

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग तिसरा

निखील नी अपर्णाला हाक मारली." अपर्णा...काय झालं? "

" काही नाही. मला माहित नव्हतं तुम्ही इथे आहात." अपर्णा जरा बावरून बोलली.

" अगं एवढी बावरते काय? आपलं लग्नं झालंय.नवरा बायको आहोत आपण. लक्षात आहे नं?"

असं हसत विचारत निखीलने चटकन अपर्णाचा  हात पकडला.जसा निखीलनी अपर्णाचा  हात पकडला तसं एक गरम शिरशिरी तिला आपल्या शरीरातून वाहते आहे असं जाणवलं. तिचा हात काय अख्खं शरीर थरथरू लागलं. तिची लाजेमुळे निखील कडे मान वर करून बघण्याची हिम्मत होत नव्हती.

शेवटी निखीलनेच हळुवारपणे तिची हनुवटी वर केली.

" अपर्णा किती लाजतेस.बघ जरा माझ्याकडे." अपर्णा वर न बघताच चाचरत बोलली,

" खाली बरंच काम आहे.आई रागवल्या तर!"

" घाबरू नकोस.मीच तुला आणण्याचं काम दीपाला सांगीतलं होतं. ती करेल तुझ्या वाटणीचं काम"

बोलता बोलता निखील अपर्णाच्या खूप जवळ आला तशी अपर्णा खूप घाबरली आणि झटक्यात निखीलच्या हातून हात सोडवून भरभर  जाऊ लागली.

निखील ने पटकन पुन्हा तिचा हात पकडला.

"अपर्णा काय हे.आपल्या नव-याला इतकं घाबरायचं? इथे बस. आपण थोडं एकमेकांशी बोलूया. "

त्याने अपर्णाला हळूच गच्चीवर असलेल्या एका खुर्चीवर बसवलं.बाजूच्या खुर्चीत निखील बसला.

निखीलच्या या बोलण्याने अपर्णाला आणखी घाम फुटला. तिच्या डोक्यात विचारांचा वारू चौफेर ऊधळू लागला.तिच्या अंगाला सुटलेली थरथर अजूनही कमी झालेली नव्हती.

निखील मिश्कीलपणे तिची ही गोंधळलेली अवस्था बघत होता.

" अपर्णा आपण देवाब्राह्मणाच्या साक्षीने नवरा बायको झालो.पण जोपर्यंत आपल्या दोघांची मनं जुळत नाही तोपर्यंत आपण आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात करू नाही."

" मग तोपर्यंत काय करायचं?"

अपर्णा नी अजाणतेपणी विचारलं आणि निखीलला हसायला यायला लागलं.त्याला हसताना बघून तिला स्वतःचा जीव नको नकोसा झाला. निखील का हसतोय हे तिला कळेना. ती वेड्यासारखी त्याच्याकडे बघत बसली.

निखीलनी तिला अधिक न चिडवता आपलं हसणं थांबवलं.

" अपर्णा आपण आधी एकमेकांना समजून घेऊ.एकमेकांचे विचार जाणून घेऊ.आवडी निवडी जाणून घेऊ.मी नवरा आहे म्हणजे मला शिंग फुटलेली नाहीत.आपलं वैवाहिक जीवन आणि आपला संसार हे दोघांच्या विचारांनी चालणार आहे. त्यासाठी आपण पहिले काही दिवस एकमेकांना समजून घेण्यासाठी देऊ."

वैवाहिक जीवन आणि त्यातील गोडी ही तेव्हाच टिकून राहील जेव्हा आपण एकमेकांमध्ये दुधात साखर  मिसळेली असते तसं  मिसळून गेलेलं असू.

एका विशिष्ट काळानंतर आपलं शरीर म्हातारं होईल.आपलं सौंदर्य जाईल पण मनमात्र उत्साही आणि तरूण असेल तर उरलेलं आयुष्य सुखात समाधानात जातं.. हे तारूण्य मला आपल्या संसारात आणि वैवाहिक जीवनात  हवं आहे.त्यासाठी तू मला सतत घाबरून राहिलीस तर कसं होईल?"

अपर्णा बराच वेळ काहीच बोलली नाही.

"अपर्णा" निखील नी तिचा हात हळुवारपणे कुरवाळत हाक मारली.

" खरं सांगू तुम्हाला  मला या गोष्टींची अपेक्षा नव्हती म्हणून मी भांबावले आहे." आत्ता अपर्णाला जरा धीर झाला बोलण्याचा.

" कसली अपेक्षा?" निखील ने विचारलं.

" कोणी नवरा तुमच्यासारखं बोलत नाही नं."

" अरे बापरे! म्हणजे तुला किती नवरे होते?" आपल्या बोलण्याचा अर्थ  कळताच अपर्णा गडबडली आणि म्हणाली,

" अहो तसं नाही. माझं फक्त तुमच्याशीच लग्नं झालंय." यावर निखील खो खो हसायला लागला.

" का हसताय तुम्ही?"

" तुझ्या मैत्रीणीनी तिच्या नव-याचे अनुभव सांगीतलेले दिसताहेत. अग पण प्रत्येक माणूस वेगळा असतो.प्रत्येक घरातील संस्कार वेगळे असतात.आमच्या घरात सगळे एकमेकांना समजून घेणारे आहेत. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. घरच्यांच्याही आधी आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं. माझ्याबद्दल वाटणारी भीती हळूहळू कमी कर. त्याशिवाय तू मोकळेपणाने बोलणार नाहीस.तू बोलली नाहीस तर मला कशी कळेल तुझ्या विचारांची दिशा. ऐकतेयस नं?"

" हो." अपर्णा म्हणाली.आता तिनी निखीलच्या हातातून आपला हात सोडवण्याची धडपड केली नाही.

" मलापण वाटत होतं नवरा बायको म्हणून आपलं आयुष्य सुरू करण्यापूर्वी आपल्या दोघांमध्ये मैत्री व्हायला हवी." एका दमात बोलून अपर्णा नी लांब श्वास घेतला.तिची उडालेली भंबेरी बघून निखीलला खूपच मजा वाटली.

" अपर्णा संसार सुरू करतानाच काही गोष्टी स्पष्टपणे दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे.मी आयुष्यात तुला कधी गृहित धरणार नाही.  तू आधी एक स्वतंत्र व्यक्ती आहेस नंतर माझी बायको आहेस. तुझं मन आणि विचार जाणून घेणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. आपल्या संसाराशी  संबंधीत कुठलाही निर्णय दोघांच्या एकमतानीच घ्यायचा.अगदी आपल्याला मूल कधी होऊ द्यायचं हा निर्णय सुद्धा दोघांच्या संम्मतीनच घ्यायचा."

अपर्णा निखील चे विचार ऐकून खूप आनंदीत झाली. निखीलबद्दल तिला आदर वाटू लागला.त्याच्यावरचं प्रेम आणखी वाढलं.ती आश्चर्याने निखील कडे एकटक बघत होती.

" काय ग! काय झालं? माझ्याबद्दल तुला अजून भीती वाटतेय का?"

" नाही.तुमच्याबद्दल खूप आदर आणि प्रेम वाटतंय"

" चला मी निश्चिंत झालो.याचा अर्थ असा की मला हवी तशी बायको आता  सापडेल." निखील खूप प्रेमानी अपर्णा कडे बघत होता.अपर्णाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं.ती आपल्याच तंद्रीत होती.

अचानक अपर्णा म्हणाली"मला नं माझा नवरा नेहमी आपला…" बोलता बोलता अचानक अपर्णा थांबली.ती बोलताना थांबली तेंव्हा निखीलचं लक्ष ती बघत असलेल्या दिशेकडे गेलं.

अपर्णाचा हात तसाच पकडून निखील बोलला," अरे तू…?"-------------------------------------------------------------क्रमश:कोण होतं तिथे? वाचू पुढील भागात.' प्यासी नदी' लेखिका... मीनाक्षी वैद्य.माझं लिखाण आवडत असेल तर इतरांना शेयर करा ही विनंती.धन्यवाद.