शापित गर्भ - जन्म की मृत्यू?
लेखक : एक अश्वस्थामा
अविनाश शांताबाई भिमराव ढळे
---------------------------------------------
काळाच्या पोटात असे काही गूढ दडलेले असते की ते उघड झाले, तर माणसाच्या विवेकबुद्धीचा पाया हादरून जातो. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांमधील सीमारेषा जिथे पुसट होते, तिथे भयाचा जन्म होतो. ही कथा केवळ भुतांची नाही, तर पिढ्यान्पिढ्या वाहत आलेल्या शापाची आहे. ही कथा अशा एका आत्म्याची आहे, जिला मृत्यूनेही शांती मिळू दिली नाही.
ही गोष्ट सुरू होते एका विस्मृतीत गेलेल्या खेड्यातून. नकाशावर जेमतेम नाव असलेले, पण अंधाराच्या कथा ज्याच्या प्रत्येक झाडाझुडपात साठलेल्या आहेत असे हे गाव. दिवसाच्या उजेडात हे गाव सामान्य वाटते, पण सूर्य मावळताच इथली हवा बदलते. वारा कुजबुजतो, सावल्या जिवंत होतात आणि जुन्या बगिच्यातून,पडक्या वाड्यातून, विरान पायवाटातून एखाद्या रडण्याचा केविलवाणा, मनाला अशांत करणारा आवाज आजही ऐकू येतो, असे वयाच्या सत्तरी जगलेले जुने लाकड म्हणजे त्या गावातील म्हातारे सांगतात.
या कथेचा नायक, ना... नायक नाही कदाचित बळीच म्हणणे योग्य ठरेल, हा एक असा जीव ज्याचा आधीचा जन्म शापाने ग्रासलेला होता. मागील जन्मातील पाप, अन्याय आणि अपूर्ण सूड यांचा भार त्याच्या आत्म्याने वाहून आणला आहे. बालपणापासूनच त्याला स्वप्नांत विचित्र दृश्ये दिसतात. रक्ताने माखलेले हात, जळणाऱ्या चिता, मंत्रोच्चार करणारे अघोरी आणि अंधारात हसणारी, स्वतःजवळ बोलणारी एक स्त्री दिसते...!
त्याचे बालपण सामान्य नव्हते. इतर मुलांप्रमाणे खेळण्यात रमण्याऐवजी तो अनेकदा एकटाच बसून अंधाराकडे पाहत असे. कधी कधी मध्या रात्री आरश्यात बघून एकटाच बोलत असे, आपल्याच प्रतिछायेत असणाऱ्या तोतया सोबत रमून जात असे. आई वडिलांना वाटे, मुलगा अबोल आहे, पण सत्य हे होते की त्याला अशा गोष्टी दिसत होत्या ज्या इतरांना दिसत नव्हत्या. रात्री झोपेतून घाबरून उठणे, अंगावर ओरखडे सापडणे आणि “कोणी तरी मला हाक मारतंय” असे तो सांगणे, हे सर्व त्याच्या बाल्याचे भाग होते.
परिवारालाही या शापाची चाहूल होती, पण कोणीच सत्य बोलत नव्हते. कारण सत्य स्वीकारण्याची हिंमत कोणातच नव्हती. पूर्वजांनी केलेल्या एका अमानुष कृत्यामुळे संपूर्ण वंशावर शाप बसला होता. त्या शापाचा केंद्रबिंदू होता गावाबाहेरील शापित वाडा आणि बगीचा. जिथे काळ्या जादूचे प्रयोग, बलिदान आणि आत्म्यांची कैद अशी काहीशी भानगड झाली होती.
रात्र ही या कथेत केवळ वेळ नाही, तर एक जिवंत पात्र आहे. अंधार दाटू लागला की भय वाढते. प्रत्येक भयाण रात्र काहीतरी नवीन उघड करते. कधी एखादे रहस्य, कधी एखादा मृत्यू. चंद्रप्रकाशात हलणारी झाडे, दूरवर ऐकू येणारे मंत्र आणि अचानक बंद होणारे दिवे, या सगळ्यातून भीतीचे दाट वातावरण निर्माण होते.
या भयकथेचा केंद्रबिंदू म्हणजे मांत्रिक शक्ती. अघोरी साधना, तंत्र मंत्र, नरबळी आणि आत्म्यांशी संवाद, हे सगळे केवळ अफवा नाहीत, तर भयावह वास्तव आहेत. एका अघोरीने केलेली साधना अपूर्ण राहिल्यामुळे एक भयानक आत्मा मुक्त झाला आणि त्याने सूडाची शपथ घेतली.
बाल्यावस्था संपून जेव्हा नायक प्रौढत्वाकडे वाटचाल करतो, तेव्हा भूतकाळ अधिक आक्रमक होतो. त्याला वाटते, आता सर्व काही मागे राहिले आहे, पण प्रत्यक्षात शाप त्याच्यासोबतच वाढत असतो.
प्रौढ वयात त्याला भुताची लागण होते. हळूहळू त्याचे वागणे बदलते, डोळ्यांत अंधार साचतो आणि आवाजात परक्याचा थरकाप उतरतो.
याच काळात त्याचे लग्न ठरते. वरून हे लग्न सुखाचे वाटते, पण ते फसवे ठरते. नवरीच्या रूपात घरात एक रहस्य प्रवेश करते. ती बळी आहे की साथीदार, हे कोणालाच कळत नाही. भीती, संशय आणि रक्त यांचा खेळ सुरू होतो.
भूत आणि गुपित रहस्य यांचे जाळे अधिक घट्ट होत जाते. अखेर एक भयानक घटना घडते. नवऱ्या मुलाची निर्घृण हत्या. ही हत्या केवळ मृत्यू नाही, तर एका शापित चक्राची पूर्तता आहे. पण कथा इथे संपत नाही.
पोटी परत पुनर्जन्म होतो. आत्मा पुन्हा जन्म घेतो, पण शाप तसाच राहतो. कारण हा शाप एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण वंशाचा आहे.
पिढ्यान्पिढ्या चालणारा अंधार, जो प्रत्येक नव्या जन्मासोबत अधिक भयानक रूप धारण करतो.
ही भयकथा म्हणजे केवळ भीती निर्माण करणारी गोष्ट नाही. ती मानवी लालसा, पाप, कर्म आणि त्याचे अटळ परिणाम यांची काळी छाया आहे. जिथे मृत्यू शेवट नसतो आणि जन्म सुरुवात नसते, तिथेच सुरू होते ही कथा.
भेटूया लवकरच - कथेच्या पहिल्या भागात..!
Copyright: ©® avinash.b.dhale11@gmail.com