Nirbhaya - 15 books and stories free download online pdf in Marathi

निर्भया - Part 15

       निर्भया- १५.

     आईच्या  विरोधाकडे   लक्ष  न  देता  सुशांतने  मूल दत्तक घेण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण  केले. त्याला  जो दोन  वर्षांचा   मुलगा-- सिद्धेश  आवडला होता त्याच्याविषयी बोलताना संचालक म्हणाले, "त्याचे आई- वडील गेल्या  वर्षी झालेल्या भूकंपात  दगावले. याची  एक  पाच  वर्षांची बहीण- शिल्पा, इथेच आहे आहे. जेव्हा  भावंडं  आमच्याकडे   असतात,  तेव्हा दोघांनाही  एकाच  घरात दत्तक द्यावे असा अामचा आग्रह  असतो    कारण   त्यामुळे      त्यांच्यातले  भावबंध   कायम   राहतात;  पण    जर   तुम्हाला  एकच मूल पाहिजे असेल तर तुम्ही इतर मुलांमधून निवडू शकता."
     पण दीपाला गोबऱ्या गालांची  आणि मोठ्या डोळ्यांची  गोंडस शिल्पा    खूप   आवडली   होती. "आपण   दोघांनाही    दत्तक  घेऊ   या  का?" ती अर्जवी नजरेनं सुशांतकडे पहात म्हणाली .
 "पण  तुला  दोघांचं   सगळं  करायला जमेल का?" सुशांतने विचारलं.
"हो नक्कीच जमेल!  शिल्पा तशी मोठी आहे. दोघं एकत्र चांगली रमतील."  दीपा म्हणाली. आणि  शिल्पा आणि  सिद्धेश   दोघांनाही   दत्तक घ्यायचं  नक्की झालं.   
  सुरुवातीला     वसुधाताई     मुलांशी   जरा  फटकूनच वागत होत्या, पण त्यांच्या बाललीलांमध्ये त्या कधी  रंगून गेल्या हे त्यांनाही  कळलं  नाही.ही  दत्तक  घेतलेली  घेतलेली    मुलं    आहेत,  हे    सुद्धा     त्या  कालांतराने  विसरून  गेल्या.  मुलांमुळे  आता  घराचं  नंदनवन  झालं  होतं. त्यांना दूर रहावंसं वाटत  नव्हतं. दोघं  शेतीची   कामे  नोकरांवर  सोपवून   वारंवार मुंबईला येऊ लागली. आणि नातवंडं म्हणजे त्यांचा जीव की  प्राण झाली.
                    ********
     शिल्पा आणि  सिद्धेशला  वाढवताना   दीपाचं   आयुष्य  बदलून  गेलं.   तिने  आता  नोकरी  सोडून   दिली   होती;  तरीही   दोघे   शाळेत   जाऊ लागल्यावर तिला दिवस कमी पडू  लागला. सुशांतची आई- वडील आता  कायम  त्यांच्याबरोबरच  राहू  लागले.  त्यांना  नातवंडांचा  इतका   लळा लागला होता, की त्यांना सोडून राहायला त्यांचं  मन  तयार  होत   नव्हतं.  शिवाय   दीपाची  किती धावपळ होतेय,  हेसुद्धा   त्यांना कळत  होतं. ती     दोघं आल्यापासून दीपाला  त्यांचा   खूप   आधार  वाटत   होता. मुलांना      ती  आता अधिक  वेळ  देऊ  शकत   होती.  मुलंही   आजी - आजोबांची   माया मिळाल्यामुळे खुश होती. काळ वेगाने पुढे सरकत होता. दोन्ही मुलं  हुशार  होती. त्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने सुशांत  आणि  दीपा  पाहू  लागली दोघंही  अभ्यासात  हुशार  होती; आणि खेळ आणि कलांमध्येही  प्रवीण होती. त्यामुळे मित्र मैत्रिणीचा घोळका नेहमीच त्यांच्याभोवती असे.            बारा वर्षे दहा भराभर निघून गेली. सुशांतला वरच्या  हुद्द्यावर प्रमोशन  मिळालं  होतं.  शिल्पा  कॉलेजला जाऊ  लागली  होती. ती  सुशांतकडून  नेहमी   पोलिसांच्या  शौर्यकथा    लक्षपूर्वक   ऐकत   असे. तिला  समज  आल्यापासून  त्यांनी हाताळलेली  प्रत्येक  केस तिच्या कानावरून  गेली होती.पोलिसांनी शर्थीने पकडलेले अनेक  गुन्हेगार  शेवटी   कायद्यातील पळवाटा शोधून कोर्टात स्वतःला निर्दोष सिद्ध करतात; यासाठी सुशांतला अनेक  वेळा चडफडताना तिने   पाहिलं  होतं. म्हणूनच तिने ठरवलं होतं      की,   ग्रॅज्युएट  झाल्यावर कायद्याचा  अभ्यास करून  वकील   व्हायचं! 
जेव्हा  तिने  आपला   मानस  सुशांतला  सांगितला तेव्हा खुश होऊन तो म्हणाला, 
 " बेटा! तू खूप हुशार आहेस.तुझं वक्तृत्व- कौशल्यही   चांगलं  आहे.  तू   नक्कीच  चांगली वकील  होशील.  एका   प्रकारे   तू  माझा   वसा  पुढे  चालवणार  आहेस. माझा  आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. खुप      मोठी हो!" 
    त्यावेळी दीपा त्यांचं  संभाषण  ऐकत होती.  ती लगेच काही  बोलली      नाही,  पण   थोड्या  वेळाने  शिल्पा कॉलेजला  गेल्यावर  ती  सुशांतला  म्हणाली,  
   " नको ते विचार तिच्या मनात भरवू नका! वकीली  पेशा म्हणजे सतत गुन्हेगारी  विश्वाशी  संबंध! कोमल  मनाच्या  शिल्पाला ते  जमणार  नाही.    दुसरं  एखादं चांगलं करिअर तिला निवडायला सांगा."
       " ते  सगळं  ठरवायला   अजून  वेळ   आहे. तू आतापासून  इतक्या  गांभीर्याने घेऊ  नको. अजून तीन- चार  वर्षे जायची आहेत. तेव्हाचं तेव्हा    बघू. कदाचित् तोपर्यंत ती  स्वतःच  तिचा  विचार  बदलेल." सुशांत विषय थांबवण्यासाठी म्हणाले. पण दीपाच्या मनातील भीतीचं दडपण अजूनही    कमी झाली नव्हतं हे या प्रसंगाने त्यांच्या लक्षात आले. काही गोष्टी मनावर इतक्या खोल कोरल्या जातात की, कितीही प्रयत्न केले तरी पुसल्या जात  नाहीत,  हेच खरं!  पण कटु आठवणींची उजळणी   होणार  नाही;  याची काळजी  ते  नेहमीच  घेत असत. आताही   त्यांना  चांगलंच  माहीत होतं,      की  शिल्पा विचार बदलणार  नाही, पण दीपाला तात्पुरता दिलासा देऊन.  त्यांनी   तो विषय थांबवला होता. 
                                   **********     
  तो   ३१  डिसेंबरचा दिवस होता. या   दिवशी   नेहमीच दीपाचं  मनःस्वस्थ्य नेहमीच बिघडलेलं  असे, पण घरच्या कामात स्वतःला गुंतवून  घेऊन अस्वस्थ करणा-या   विचारांना  दूर  ठेवण्याचा  प्रयत्न करत  असे.  या वर्षी मात्र तिला गेले तीन दिवस इमर्जन्सी ड्युटीसाठी हाॅस्पिटलला जावं लागलं होतं. ती एवढी थकली होती, की कॅलेंडरकडे तिचं लक्ष गेलं नव्हतं.   त्या  दिवशी   दुपारी   कॉलेजमधुन   शिल्पा   लवकर  घरी आली.
 " आज कॉलेजमधून एवढ्या लवकर कशी आलीस? तुझी  तब्येत  बरी  आहे    नं ?"  दीपानं काळजीच्या स्वरात विचारले.
    " आई! आज ३१ डिसेंबर आहे ! मुलांनी विनंती केली म्हणून प्रिंसिपाॅलनी आम्हाला आज लवकर सोडलं. माझ्या शाळेतल्या मैत्रिणींचा ग्रूप मला  भेटायला  कॉलेजमध्ये  आला   होता.  त्या सगळ्यांनी    रात्री  जुहूला जायचं   ठरवलं   आहे. मलाही बोलवलंय  त्यांनी!  मी त्यांच्याबरोबर  गेले  तर  चालेल  का? आम्ही   रात्री  फार   वेळ  नाही थांबणार! लवकर  घरी  परतणार   आहोत. आणि माझ्या मैत्रिणी इथे जवळपास तर  राहतात! मला    त्या  घरी  सोडणार   आहेत."  आईची  परवानगी मिळणारच या खात्रीने शिल्पा बोलत होती.
    " नको शिल्पा ! आपल्या कॉलनीत आज रात्री  नववर्षाचा कार्यक्रम आहे.  तू   इथेच  थांब.  कुठे  बाहेर  जायची गरज नाही. तरूण मुलींनी   रात्री - अपरात्री घराबाहेर  रहाणं बरं नाही. "   दीपा  घाईघाईने तिचं बोलणं अर्ध्यावर थांबवत म्हणाली.
         तिचा  आवेश  बघून  बाजूला टी.व्ही. बघणाऱ्या  आजीने   चमकून   दीपाकडे   पाहिलं. मुलांवर  कधीच   कोणतेही  निर्बंध  न  घालणारी   दीपा   आज   एवढ्या  ठामपणे  शिल्पाला  नाही म्हणतेय याचं त्यांना आश्चर्य वाटलं.
    " अग आई! कॉलनीतले लोक तर रोजच भेटतात! शाळेतल्या ग्रुपबरोबर एंजॉय  करण्याची संधी क्वचितच मिळते.आई! प्लीज परवानगी दे नं!  शिल्पा तिला समजावत म्हणाली.
      " नाही!   नाही!बाळ! तू रात्री   घराबाहेर   राहावंस आणि तेही जुहुूसारख्या ठिकाणी; हे मला पटत  नाही! समाजकंटक   याच  गोष्टींचा फायदा घेतात. जायचंच असेल तर तुम्ही मैत्रिणी कधीतरी   दिवसा  तिथे   जा. पण  रात्री   तिकडे   जाण्याचा  विचारही   मनात   आणू   नकोस."  हे  बोलताना  दीपा  थरथरत  होती. तिच्या डोळ्यात  पाणी होतं. आई अचानक् एवढी  का  रागावली;  हे शिल्पाला कळत नव्हतं. दीपाचा रागरंग  पाहून  तिने  तिथून  काढता पाय घेतला.
                  ********

       संध्याकाळी  सुशांत आले तेव्हा  दीपा  बाहेर   गेली होती. शिल्पा फुरंगटून बसली होती. सुशांतने आईला विचारलं,
     " हिला काय झालं आई? ती आज गप्प कशी?" शिल्पा सहसा कधी  हट्ट करत नसे, त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटत होतं. आईने   दुपारचा  सर्व  प्रकार त्याला सांगितला. 
        " मी समजावतो तुझ्या आईला! तू काळजी करू    नकोस.  नववर्ष   तू   नक्की     जुहूलाच मैत्रिणींबरोबर    साजरं    करशील.  जा   आता !  उद्याचा  अभ्यास  करून ठेव. उद्या  तुला उशीरा उठायचं. आज  रात्री  जागरण  होईल."  पप्पांनी शिल्पाला  आश्वासन देऊन टाकलं.
     थोड्या वेळाने दीपा  आली. "बस! मी   कॉफी बनवली आहे. तुझ्यासाठी घेऊन येतो." 
    कॉफी  पिताना  त्यांनी दीपाला  विचारलं,    " आज शिल्पा रागावून बसली आहे. मी  विचारलं पण  काही सांगत  नाही.  तुला काही माहित आहे का?"
    " आज नववर्ष साजरं  करायला   तिच्या   मैत्रिणी   जुहूला   चालल्या   आहेत.  शिल्पालाही  बोलावतायत.  त्यांच्याबरोबर जायचं  म्हणून  हट्ट करयेय..मी  नको म्हटलं म्हणून रागवलीय. दुसरं  काही नाही."  दीपा  अपराधी    स्वरात  म्हणाली.  तिलाही   शिल्पाचं  मन  दुखवून  आनंद   झाला नव्हता. लाडक्या लेकीला कधी नाही ते दुखवलं; म्हणून तिचं मन तिला खात होतं.  मैत्रिणींबरोबर      वेळ घालवायला मिळणार,  म्हणून शिल्पा किती    खुश झाली होती! माझ्या अनपेक्षित   नकारामुळे    ती  नाराज   होणं  अगदी  साहजिक  आहे.  पण  तिचं नुकसान होईल, अशा  गोष्टींपासून तिला दूर ठेवणं आई म्हणून माझं कर्तव्य आहे. नाही का?" दीपा तिच्या निर्णयावर ठाम होती.  
    " तू? आणि  शिल्पाला नाही  म्हणालीस? मला खरंच  वाटत  नाही.  नेहमी  तू  तिचे  सगळे  लाड पुरवतेस. आज का परवानगी नाकारलीस  तिला? अगं! हेच वय आहे  मौजमजा करण्याचं! चांदण्या रात्री   चंदेरी   प्रकाशात   चमकणाऱ्या   समुद्राच्या  लाटा  पाहणं  म्हणजे  एक  दिव्य अनुभूती  असते.  मैत्रिणींसोबत  ते   दृष्य   पाहण्याची   रंगत   काही न्यारी असेल. तुला घाबरायचं काहीच कारण नाही. तिच्या मैत्रिणी जवळपास राहतात. तिला घरापर्यंत नक्कीच सोबत करतील! जाऊ दे तिला!"  सुशांतचं   हे   बोलणं दीपाला पटत  नव्हतं.
       " अशाच एका रात्री मुळे मी आयुष्यातून उठले  होते.  अजून विसरले  नाही  मी!  शिल्पाला    अशा प्रसंगाला तोंड द्यायला लागू  नये  हीच  माझी इच्छा! दोन  दिवस  रागावेल  आणि   मग   सर्व   विसरून जाईल. तुम्ही या सगळ्यात  न  पडलेलं बरं. " दीपा  तिच्या विचारांवर ठाम होती.
     " एकदा एखादी गोष्ट घडली  की नेहमीच घडते  असं  थोडंच   आहे?  तुझ्या  समाधानासाठी मी दोन साध्या वेशातले पोलिस शिल्पाच्या नकळत तिच्या आजूबाजूला ठेवतो शिवाय मीही आज रात्री    त्याच एरियात माझी व्हॅन फिरवतो. मग तर  झालं? तुला  काळजी  करण्याचं  काहीही   कारण   नाही. उद्याच्या दिवस तिला  जाऊ दे. नंतर  मात्र  आपण तिला समजावून सांगू की मुलींनी रात्री-बेरात्री बाहेर फिरणं चांगलं नसतं. हवं तर मी  बोलेन तिच्याशी. सुशांत तिला समजावत म्हणाले.
यावर  दीपाकडे   शिल्पाला  विरोध करण्याचं काहीही कारण राहिलं नाही. मनाविरूद्ध कां होईना; तिला शिल्पाला परवानगी द्यावी लागली. पण मनाची तगमग थांबत नव्हती.
             **********
   त्या रात्री शिल्पा मैत्रिणींबरोबर जुहूला गेली सुशांतही  घरातून   बाहेर   पडले.   तिच्या नकळत  मुलींच्या संरक्षणाची   व्यवस्था  त्याने  केली   होती. अशा  जागांवर  त्या   रात्री   सगळीकडेच   कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  दीपाला  आठवलं;  त्या  रात्रीही असाच बंदोबस्त  होता. पण  राकेशने निर्मनुष्य जागी जाण्याची चूक केली  होती; आणि त्यामुळेच पुढील प्रसंग ओढवला होता.
                     Contd.-  Part.16.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED