Jayanta - 4 books and stories free download online pdf in Marathi

जयंता - 4

जयंता

पांडुरंग सदाशिव साने.

४. पाला खाणारी माणसे

काही वर्षांपूर्वीचा तो अनुभव. चार-पाच वर्षे त्या गोष्टीला झाली. मी बोर्डीला गेलो होतो. तेथील सुंदर समुद्रशोभा रोज बघत होतो.

“तुम्हा जवळची आदिवासींची गावे बघायला याल ? चला, नाही म्हणू नका.” एक मित्र म्हणाले.

“जाऊ” मी म्हटले.

आणि आम्ही दोघे गेलो. पावसाळा नुकताच संपला होता. आजूबाजूला हिरवीपिवळी शेते. मधूनमधून नाले होते. बांधाबांधाने जात होतो. एका बाजूला गवताळ भाग दिसला.

“हे का कुरण आहे ?” मी विचारले.

“ही खरे म्हणजे शेतीची जमीन आहे. परंतु गवताला भाव आहे म्हणून मालक गवतच करीत आहे. पुन्हा गवताला खर्च नाही. एक राखोळी ठेवला म्हणजे झाले.” मित्र म्हणाला.

“तिकडे अधिक धान्य पिकवा मोहिम आहे आणि इकडे गवत वाढवले जात आहे. हे कसे काय ?”

“अधिका-यांची मूठ भरली म्हणजे सारे चालते.”

“ही जमीन आदिवासींना का देत नाही ?”

“आदिवासींना का शेती करायला येईल ? उद्या स्वराज्यात त्यांना मिलिटरीत पाठवावे.”

“आदिवासी का माणसे नाहीत ? तुमच्या शेतांतून तेच राबतात. तुमच्या वाड्या तेच करतात. त्यांना सारे येईल. मिलीटरीत वेळ आली तर सर्वांनी जायला हवे. देशाच्या रक्षणासाठी उभे राहायला हवे. आदिवासींनीच का जावे ? पारश्यांनी का नये जाऊ ? तुम्ही आम्ही का नये जाऊ ?”

असे बोलत आम्ही चाललो होतो. आणि लहान लहान झोपड्या दिसू लागल्या. एका झोपडीजवळ आम्ही आलो. झोपडीचे दोन भाग होते. एका भागात बक-या बांधलेल्या होत्या. दुस-या भागात माणसे राहत. एकीकडे बक-यांची पोरे, दुसरीकडे आदिवासींची मुले. निजायला शिंदीची चटई. कपडे फारसे दिसलेच नाहीत. मातीची मडकी हीच इस्टेट. एक तरुण तेथे तापाने आजारी होता. मी त्याच्या अंगाला हात लावला. ताप पुष्कळ असावा. ना पांघरुण ना औषध. ना फळ, ना दूध. त्या झोप़डीत निराशा, दारिद्र्य, दैन्य यांचेच राज्य होते.

तेथे एक म्हातारी होती. अस्थिचर्ममय केवळ ती होती. लहानशी चिंधी नेसून होती. तिच्यासमोर एक पाटी होती. पाटीत चिरलेला पाला होता.

“कशाला हा पाला ?” मी विचारले.

“हा शिजवतो नि खातो” ती म्हणाली.

“नुसताच पाला? त्यात डाळ, तांदूळ, कण्या, काही तरी मिसळीत असाल.”

“नाही रे दादा. आम्हाला कुठले डाळ-तांदूळ ? आमची का शेतीवाडी आहे ? थोडी शेती खंडाने करतो. ते भात किती दिवस पुरणार ? मजुरी मिळाली तर करावी आणि हा पाला खावा. शेळ्याबक-या पालाच नाही का खात ? आम्ही तशीच. पाला थोडाफार मिळतो हीच देवाची कृपा. उद्या पालांही घेऊ नका म्हणून जमीनदार म्हणायचा. मग तर हवा खाऊनच राहावे लागेल.”

त्या म्हातारीचे ते शब्द बंदुकीच्या गोळीप्रमाणे हृदयात घुसत गेले. मी खाली मान घातली. क्षणभर तेथे उभा राहून दुस-या झोपडीकडे मी निघालो.

तेथेही तसेच दृश्य. तेथे दोन मायबहिणी कसले तरी कंद विळीवर निशीत होत्या. कसले होते ते कंद ? ती रताळी नव्हती, तो बीट नव्हता. ते बटाटे नव्हते, कांदे नव्हते. ती कणगरे नन्हती, ते करींदे नव्हते. कसले होते ते कंद ?

“कसले हे कंद ?” मी विचारले.

“रानातून आणले.”

“गोड आहेत वाटते ? बघू.”

त्या कंदाचा एक तुकडा मोडून मी तोंडात टाकला. तो क़डूकडू लागला.

“हे कडू कंद तुम्ही खाता ? रताळी, बटाटे का नाही आणीत ?”

“गरिबांची, दादा, थट्टा नये करु. बटाटी, रताळी तुम्हाला; डाळतांदूळ, गहू तुम्हाला. ती तुमची खाणी, आम्हाला कुठली ? आणि आम्हाला ती सोसतील तरी का जंगलच्या लोकांना जंगलचा पाला, जंगलचे कंद.”

“तुम्हाला हे कडू नाही लागत ?”

“हे कंद रात्रभर उकड़ून तसेच मडक्यात ठेवतो. त्यांचा राप सकाळला कमी होतो. कडूपणा कमी होतो. मग ते आम्ही खातो. एकदा सवय झाली म्हणजे सारे चालते.”

मी त्या श्रमजीवी लोकांना प्रणाम करुन निघालो. ही आदिवासी जनता. हे मूळचे मालक. त्यांच्या जमिनी त्यांना केव्हा मिळतील ? केव्हा नीट राहतील, धष्टपुट होतील ? केव्हा त्यांची मुलेबाळे गुबगुबीत होतील ? घरदार, ज्ञानविज्ञान, कला, आनंद, विश्रांती सारे त्यांना कधी बरे मिळेल ? पिढ्या न् पिढ्या ही माणसे अर्धपोटी जगत आहेत. उपाशी लोकांना सद्गुणांची संथा नका देत बसू. आधी जमिनी द्या; मग दारू पिऊ नका सांगा. नुसत्या नैतिक गोष्टी निरुपयोगी आहेत. भगवान् बुद्ध म्हणत, उपाशी माणसाला अन्न देणे म्हणजे त्याला धर्म शिकवणे. उपाशी माणसाची धर्मज्ञानाची भाषा अन्न ही असते. आमच्या हे कधी लक्षात येणार ? ही लक्षावधी जीवने कधी हसणार, फुलणार ?

“आपण परत जाऊ. ही दोन दृश्ये मला जन्मभर पुरतील. स्वराज्यात काय करायचे त्याचे ज्ञान येथे येऊन झाले. चला. आपण परत जाऊ.” मी म्हटले.

आणि विचार करीत आम्ही दोघे माघारी गेलो.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED