Aala Shravan manbhavna - 5 books and stories free download online pdf in Marathi

आला श्रावण मनभावन भाग ५

आला श्रावण मनभावन भाग ५

श्रावणी शुक्रवार हा श्रावण महिन्यातील शुक्रवारचा दिवस आहे.

या दिवशी जिवतीचा कागद लावून पूजा केली जाते .

जिवतीच्या चित्रात लेकुरवाळी सवाष्ण दाखवलेली आहे .
तसेच पुराणातील नरसिंह व इतर कथांची पण चित्रे आहेत .

आपल्या मुला बाळांच्या सुखासाठी व दीर्घ आयुष्यासाठी हे शुक्रवार केले जाते .

महालक्ष्मीला पुरणावरणाचा नेवेद्य दाखवला जातो .

पुरणाच्या दिव्यांनी तिची आरती केली जाते .

सवाष्ण बाईला महालक्ष्मी समजून जेवायला घातले जाते व नंतर तिची ओटी भरली जाते .

संध्याकाळी जवळच्या बायका हळदी कुंकवाला बोलावून त्याना फुटाणे व दुध साखर प्रसाद म्हणून दिला जातो .

याची कहाणी अशी आहे

आटपाट नगर होतं.

तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे.

तो गरिबीने त्रस्त होता .

त्याची बायको शेजारणीच्या घरीं एकें दिवशी बसायला गेली.

आपल्या गरिबीचं गाणं गाइलं.

शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं.

ती म्हणाली, “बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तूं श्रावणापासून हे व्रत धर.

सारा दिवस उपास करावा, संध्याकाळीं सवाष्णीला बोलवावं.

तिचे पाय धुवावे. तिला हळदकुकूं द्यावं.

तिची ओटी भरावी.

साखर घालून दूध प्यायला द्यावं.

भाजलेल्या फुटाण्याची खिरापत द्यावी.

नंतर आपण जेवावं. याप्रमाणं वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं”

असं सांगितलं.

ती घरीं आली. देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करूं लागली.

त्याच गावांत तिचा भाऊ रहात असे.

तो एके दिवशीं सहस्त्र भोजन घालूं लागला.

सार्‍या गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला कांहीं बोलावलं नाहीं.

ती गरीब आहे तिला बोलावलं तर लोक हसतील असे त्याला वाटले .

पुढं दुसरे दिवशीं भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवत आहेत हे पाहिल्यावर बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे.
आपली मात्र मुलांसोबत उपासमार चालू आहे

भाऊ बोलावणं करायला विसरला असेल. तर आपल्याला भावाच्या घरी जायला कांहीं हरकत नाहीं.

असा मनांत विचार करून ती सोंवळें नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरीं गेली.

पंगतीत एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं.

सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं.

तेव्हां तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं.

वाढतां वाढतां तिच्या पानाशीं आला. ती खालीं मान घालून बसली होतीं.

तो तिला म्हणाला “ताई ताई, तुझ्याकडे चांगले कपडे नाहीत दागिने नाहीत .

तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला हसतात, म्हणून मी तुला कांहीं बोलावलं नव्हत .

आज तूं जेवायला आलीस ती आलीस. आतां उद्या कांहीं येऊं नको.” असं सांगून पुढं गेला.

तिला खुप वाईट वाटले, पण तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं.

मुलांना घेऊन घरीं आली.

दुसरे दिवशी मुलं म्हणूं लागलीं, “आई आई, मामाकडं जेवायला चल.”

बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं?

आपली गरीबी आहे. तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे.

आपले आजच्या दिवसाचे जेवण बाहेर पडेल नाहीतरी उपासमार चालू आहे .

असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली.

भाऊ तूप वाढतां वाढतां तिच्या पानाशीं आला. ती खालीं मान घालून बसली होती.

भावानं तिला हांक मारली, “ताई ताई, भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीं.

तूं जेवायला येऊं नको म्हणून काल सांगितलं, आज पण आपली पोरं घेऊन आलीस.

तुला लाज कशी नाहीं वाटली? आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर तुला हात धरून घालवून देईन.” तिनें तें मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली.

पुन्हां तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं,आणि खरेच हात धरून घालवून दिलं.

ती फार दुःखी झाली.

देवीची प्रार्थना केली.

सारा दिवस उपास घडला होता .

देवीला तिची दया आली.

ती दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवूं लागली.

असं करतां करतां वर्ष झालं. आता बहिणीची गरीबी गेली होती .

पुढं एक दिवशीं ती शुक्रवारचं उद्यापन करूं लागली.

भावाला जेवायला बोलावलं.

भाऊ मनांत ओशाळा झाला.आपण बहिणीला हाकलले हे त्याला डाचू लागले .

बहिणीला म्हणूं लागला,

“ताई ताई, तूं उद्या माझ्या घरीं जेवायला ये. नाहीं कांहीं म्हणूं नको. घरीं कांहीं जेवूं नको. उद्या तूं आलीस नाहीं तर मी कांहीं तुझ्या घरीं येणार नाहीं.”

बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या बोलावण्याचे कारण जाणलं.

दुसर्‍या दिवशीं ती लौकर उठली, वेणीफणी केली. दागदागिने घातले , उंची पैठणी नेसली, शालजोडी घेतली आणि भावाकडे जेवायला गेली.

भाऊ वाट पहातच होता. ताई आली तसा तिचा हात धरला, पाटावर बसवली, पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं.

इतक्यांत जेवायचीं पानं वाढलीं.

ताईचं पान आपल्या शेजारीं मांडलं.

भाऊ तिच्यासोबत जेवायला बसला.

ताईने आपली शालजोडी काढून बसल्यापाटीं ठेवली.

भाऊ पाहूं लागला. मनांत कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल.

नंतर ताई आपले दागिने काढू लागली.

बसलेल्या पाटावर ठेवूं लागली.

भावानं विचार केला, जड झाले, म्हणून काढत असेल.

नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घांस केला, तो उचलून सरीवर ठेवला, भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्यांच्या पेंद्यावर ठेवली.

भावानं विचारलं, “ताई ताई, हें काय करतेस?”

ती म्हणाली, “दादा, मी करतें हेंच बरोबर आहे.

जिला तूं जेवायला बोलावलंस तिला भरवतें आहे.” भावाला काही हे बोलणे समजेना.

त्यानं तिला पुन्हां सांगितलं, “अग ताई, तु आता तरी जेव न .”

तिनं सांगितलं, “हें माझे जेवण नाहीं, हें या लक्ष्मीचं जेवण आहे.

माझं जेवण होतं तें मी सहस्त्रभोजनाच्या दिवशीं जेवलें.”

इतकं ऐकल्यावर भाऊ मनांत ओशाळला.

तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले.

झाल्या अपराधाची क्षमा मागितली.

बहिणीनं त्याला क्षमा केली.

नंतर दोघंजणं जेवलीं. मनांतली अढी काढून टाकली.

दोघांनी देवीचे आभार मानले.

भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला.

देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हां आम्हां करो, ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED