saahitya samiksha lekhan -Part -6 books and stories free download online pdf in Marathi

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग - ६

रसिक मित्रांनो

माझे साहित्य समीक्षा लेखन -या उपक्रमाच्या या ६ व्या भागात खालील

२ पुस्तकांचा परिचय वाचावा .

१.कविता -संग्रह - "आशय ", कवी - बाबू फिलीप डिसोझा - निगडी -पुणे.

२. कविता -संग्रह - नवरंग (चारोळी -संग्रह )- संपादन -अरविंद कुलकर्णी -पुणे.

--------------------------------------------------------------------------------------------------

१.

पुस्तक- परिचय - लेख -
आशय-संपन्न कवितांचा संग्रह - " आशय ...!
------------------------------------------------------
कवितेच्या वाचकांना कवी- बाबू फिलीप डिसोजा - हे नाव गेली अनेक वर्षापासून परिचित आहे. मराठी कवितेत या कवीचे सातत्याने कविता-लेखन योगदान चालू आहे. "शब्द्झुला (१९१२ ), आवर्त -(२०१३ ) या दोन संग्रहां नंतर प्रस्तुतचा "आशय " हा संग्रह या कवीचा तिसरा कविता संग्रह आहे.

ग्रामीण परिसरातील वास्तव्य तसेच नागरी आणि शहरी -जीवनमानाचा अनुभव ..या दोन्ही जीवन-अनुभवाचे सुरेख प्रतिबिंब कवीच्या रचनेतूनया संग्रहात उमटलेले आहे.
जानेवारी -२०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या आशय " या संग्रहातील बहुतेक कविता - अगदी अलीकडच्या म्हणे २०१४-१५ या कालावधीतील आहेत .या दरम्यान नोकरी निमित्ताने कवीचे वास्तव्य - निसर्गरम्य ग्रामीण परिसरात होते ,याचा प्रभाव या दरम्यानच्या कविता लेखनावर आहे " .असे कवींने आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे.

१२५ पृष्ठांच्या या संग्रहात एकूण -११५ कविता आहेत. "निसर्ग , अध्यात्म ,आणि सामाजिक -चिंतनशील "अशा या कविता आहेत. याच क्रमाने संग्रहातील काही कवितांचा आस्वाद घेऊ या ..
कवीने - आपल्या कवितेतून निसर्ग व त्याच्या विविध छटा चितारल्या आहेत , कवी -मनास या निसर्गाचे अप्रूप असणे साजेसेच आहे. संग्रहातील सुरुवातीच्या कविता ..निसर्ग-कविता " आहेत..यात पावसाच्या - कवितांची "हवीहवीशी बरसात आहेच "..कवितांची शीर्षके लक्षवेधी अशी आहेत.." सृजनसाद (१४) ," वर्षामेघ (१५) , प्रतीक्षा पावसाची (२७) ", किमया (२९)" , " माती -(३०) ", झुंजार कोकण (३२ )" ,गाव स्वप्नाचे -(३४ ) पाऊस आला आला -(३६), दूषण -(४३ ), खेडे (५८) " .वगरे ....!.
पाऊस-पडतांना बघणे "हे सुद्धा "एक पहाणे असते ..मुसळधार पाऊस- धुवाधार पाऊस, रिमझिम बरसणारा पाऊस.असा हा पाऊस आणि पाउससरी..यांच्या अनेक मोहक -कविता -"प्रारंभी वाचावयास मिळतात .
उदा-
पाऊस उतरला आभाळातून
अलगद सरींच्या शिड्या लावून
भेटावा धरेस जीवन घेऊन
मन मोहवी इंद्रधनू त्यातून ..." सर " (पृ-१८)

माती आणि माणसाचे नाते ..एक विलक्षण असा भावबंध -आहे ....
गावाकडल्या मातीची ओढ ..कशी असते ..तिच्या विषयीचा हा जिव्हाळा .."या कवितेत "..
ऊब मातीची
ओढ मातीची
साथ मातीची
सोडवेना
पत मातीची
प्रत मातीची
गत मातीची
उज्वेना ......(माती- पृ-३० ),

निसर्ग सहवासात राहण्याचा योग खरोखरीच भाग्यकारक असतो असे म्हणयला हवे..याचे महत्व आजच्या नागरी-जीवनात जगणाऱ्यांना नव्याने उमजेल .. पहाट-वेळ कशी असते.. त्याची ही सुरेख कविता --
" फांकली प्रभा - एक प्रसन्नपण
आसमंतात चैतन्य संचारण
पशुपक्षी चराचरी अवघे जन
प्रकाशास्तव करिती सदा याचन ..".. (उष:कालच्या कळ्या ..पृ-३१ )

निसर्ग -भूमी कोकण .या भूमीच्या सुंदर अशा निसर्गाचे वर्णन तर आपण खुपदा वाचतो .निसर्ग-वैभव दिले आंदण" इतकेच नाही ..या शिवाय . आणखी एक " कोकण -विशेष " कवी सांगतो आहे ."
संघर्षाने प्रेरित कणकण
अंतरी देशभक्ती विलक्षण
अन्यायाविरुध्द लढे आजन्म
वीर योध्याचे कोकण ..... (झुंझार कोकण ..पृ ..३२ )

माणूस आणि निसर्ग यांच्यातील दुरावा ..कशामुळे आले याचाही शोध हा कवी घेतो .आणि ..या दुराव्याचे .."दूषण" "माणसाला देणे .हे आपल्याला पटणारे असेच आहे..
कवी म्हणतो-
निसर्गाची ती संगत सुटली
घरटे मोडली झाडे पाडली
बंगली झाली इमारत उठली
धुराडी गिरण्यांची घरघर विमानांची
माणसांची बजबज वस्ती माजली ....( दुषण..पृ..४३ )

आपली संस्कृती ,परंपरा , दिन-विशेष , सण-वार , आपली श्रद्धा -स्थाने "..हे सुद्धा कवितेचे विषय झालेले आहेत ..याचे कारण या सगळ्याशी एक भावनिक नाते आहे..जे सभोवतालच्या माणसांशी जोडले गेलेले आहे..
अशा कविता - उदा - पर्वणी (पृ-३२ ), शुभ दिवाळी (५४), गुढीमहात्म्य "(५५), "आराध्या-(६०) , "अवतार -(६१ ),
भक्तीवंदना (६३), ,तसेच ही आणखी एक कविता उदा -
पांडुरंग, हरी , विठ्ठल मुखी
वैष्णवांचा जथा ये भीमेकाठी
अवघे जन व्हावे इथे सुखी
अंतरीचा भाव हा नित्य पाठी...(अंतरीचा भाव ..पृ-६४)
या कवितेत सकल जनांचे कुशल व्हावे अशी कामना कवी करतो आहे.
जेष्ठ साहित्यिक आणि नामवंत शिक्षणतज्ञ - डॉ.न.म.जोशी यांची प्रस्तावना या संग्रहास लाभली आहे .सरांनी - कवी -बाबू फिलीप डिसोजा यांच्या कविता-लेखनाचे अतिशय मर्मग्राही असे रसग्रहण करतांना .कवीच्या कविता लेखनाचे अनेक सुंदरसे पैलू उलगडून दाखवले आहेत. या विवेचनातील महत्वाचे वैशिष्ट्य सांगतांना जोशी सर म्हणतात -
""आशय " या कविता संग्रहाचे पाचवे आणि अत्यंत महत्वाचे बलस्थान म्हणजे "शैली ". शैली हा साहित्याचा आत्मा असतो. कविताशरीराला तो सौंदर्य तर प्राप्त करून देतोच ; पण आशयाची प्रत्ययकारी मांडणीही त्यामुळे होत असते."
जोशी सरांचे विवेचन अधिक अभ्यासण्यासाठी हा कविता संग्रह वाचायलाच हवा ..असे सुचवावेसे वाटते..कारण या शैलीने कवितेला सुंदर शब्दालंकार चढविले आहेत. अनुप्रास आणि यमक या शब्दालंकार यांची रेलचेल या संग्रहात आहे.पण उपमा , उत्प्रेक्षा , रूपक , श्लेष या अलंकारांनी ही कविता विणलेली आहे.

देश ,देशभक्ती , स्वातंत्र्य , स्व -स्वातंत्र्य , आपला तिरंगा ..या विषयावरील कविता एक वेगळेच भान देऊन जातात.
तिरंगा महती या कवितेत कवी म्हणतोय -
गगनी ध्वज फडके डौल काय वर्णावा
अबाधित ठेवू एकता संकल्प अर्पावा
देशभक्ती वारसाला खास हमी मागते
आसमंती मुक्तकंठीं जयघोष गर्जावा .....(तिरंगा महती ..पृ.८१ )

आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे हे खरे ..पण हे नवे स्वातंत्र्य ..जबाबदारी वाढवणारे आहे.त्यामुळेच कवी सांगतोय-
" विस्वास संदेश नवा देऊ
या एकत्र विकासास आता
नव्या उंचीवर देशा नेऊ
ठेवला एकच ध्यास आता ..(नवे स्वातंत्र्य ...पृ-९८ )
महतप्रयासाने देशास "स्वातंत्र्य -पर्वणी "लाभली आहे .याचे भान ठेवणे गरजेचे आहे.. त्यासाठी याचे भान असायला हवे ..असे कवीला वाटते ..की....

हुतात्म्यांचे बलिदान करावे स्मरण
व्हावा एकीने , नेकीने वारसा जतन
स्वातंत्र्याच्या पर्वणीला साजरी सलामी
प्रिय आम्हास आमचे भारत वतन ..!..(स्वातंत्र्य पर्वणी ..पृ..८५ )
अशा प्रेरक रचना कवीच्या लेखन शैलीची प्रभावी उदाहरणे ठरवीत.

सामाजिक जीवनातील स्थित्यंतरे , त्यामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती ..हे वास्तव कवीला वेदना देणारे आहे..त्यातूनच कवीचे संवेदनशील मन व्यक्त होऊ लागते ..आणि मग त्याची कविता रुपे अशी आविष्कृत होऊ लागतात..
या कविता कवीच्या कविता -लेखन प्रवासात अतिशय महत्वाच्या ठरतील अशा चिंतनशील भावनांची अभिव्यक्ती आहे." असे म्हणता येईल.. काही उदाहरणे ...
समाजात झालेल्या - दुषित पर्यावरणावर कविता ..--

वर्षानुवर्षे हेच चालले आहे
शोषितांचे शोषण चालले आहे
जुजबी मलमपट्टी देखाव्याची
व्रणास उकरणे चालू आहे
सर्वत्र कोंडमारा घुसमटवी
निव्वळ प्रदूषण चालले आहे ....( क्रमण...पृ.१२० )


कशात काही अर्थ उरलेला नाहीये कारण .दिसतो तो फक्त अनर्थ ..
विस्कळीत तटबंदी , वाढली घुसखोरी
स्वार्थांध प्रवृत्ती झाले साव लुटून आता
दोष कुणास द्यावा ,कित्त मागचा गिरवी
निव्वळ संस्कृतीसूज , वाढ खुटून आता ...(अनर्थ ..पृ.१०८ )

अशा विपरीत परिस्थीत जगणारा माणूस ..त्याची अवस्था ..नेमकेपणाने मांडणारी ही कविता..

"एक भीती रोज मनात घेउनी जगतो
काळजावर दगड ठ्वूनी तो जगतो
संपेल कधी ही अस्वस्थ दशा जीवनाची
स्वप्ने उराशी , उद्याच्या आशेवर जगतो
थांबेल श्वास कधी अवचित न सांगता
अस्तित्वाला नसो ग्रहण ,म्हणून जगतो ...( ग्रस्त ..पृ..९०)

अशाच आशयाच्या अनेक कविता वाचून वाचक नक्कीच अंतर्मुख होऊन वास्तवाचा विचार करू लागतात ..
काही शीर्षके -- समर्थन (९१ ), "निर्बंध (१२४) , "निर्वाणी "(१२१), सत्ताधीश " (८६) ,संभ्रम " (८३)
उल्लेखनीय अशा कविता आहेत.
आशय " या शिर्षका बद्दल कवी आपल्या मनोगतात सांगतात की-
आशय "म्हणजे विचारसार , आशय म्हणजे भावनांना दिलेले शब्दरूप , आशय म्हणजे मांडलेले तत्वज्ञान ..या संग्रह्तील कविता म्हणजे कवी -बाबू फिलीप डिसोजा ..यांच्या काव्य-प्रतिभेचा मनोरम आणि प्रामाणिक असा अविष्कार आहे.
कविता-लेखनाचा त्यांचा हा दमदार प्रवास त्यांच्या आगामी कविता संग्रहातून ही असाच अभियाक्त होवो याच शुभेच्छा देतो आणि आशय "कविता संग्रहाबद्दल रसिकांच्या वतीने अभिनंदन करतो.

आशय -कविता- संग्रहाचे अतिशय सुरेख असे पुस्तक रूप प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक - वेदान्तश्री प्रकाशन -पुणे यांचे अभिनंदन .तसेच "आशयपूर्ण " मुखपृष्ठाबद्दल चित्रकार -विष्णू थोरे यांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करतो.
-----------------------------------------------------------------------------------

२.

पुस्तक-परिचय लेख -
-नवरंग - (चारोळी संग्रह )-संपादित .
-------------------------------------------------------------------------------
फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून "साहित्य -प्रकाशनच्या " कार्याला अलीकडे खूप चालना मिळते आहे असे दिसून येते . अनेक Whatsapp ग्रुपची यात आनंददायक अशी भर पडल्यामुळे उत्साहाने लेखन करणाऱ्या लेखक आणि कवींना अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी माध्यम आणि व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

अहमदनगर निवासी -श्री अरविंद कुलकर्णी संचलित व्होट्सअप ग्रुप -"साहित्य मंथन "हा ,चांगलाच परिचित असलेला समूह आहे.यातील सभासद समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत आणि परिचित व्यक्तिमत्व आहेत, ही सर्व मंडळी फेसबुक व इंटरनेटवरील माध्य्मातून लक्ष्यवेधी अशी लेखन-कामगिरी करीत आहेत असे दिसून येते आहे.समुहातील गुणवंत कवींचा "नवरंग "या शीर्षकाचा चारोळी संग्रह श्री.अरविंद कुलकर्णी यांनी साहित्य मंथन समूहासाठी प्रकाशित केलाय.

कविता आणि चारोळी हे दोन्ही काव्य -प्रकार जसे कवी -प्रिय आहेत तितकेच ते वाचक -प्रिय आहेत ,म्हणून चारोळी लेखन करण्याकडे कवी-मित्रांचा ओढा असणे सहाजिकच आहे असे समजावे.असे असले तरी .कविता असो व चारोळी "या दोन्हीतही "आशयाची अभिव्यक्ती " कशी झाली आहे हे महत्वाचे आहेच आहे.ज्याला अभियाक्त होणे जमले .त्याचे लेखन-भान अधिक सजग आहे असे म्हणू या . एकच विषय ,एकच घटना ,एकच प्रसंग .."डोळ्यांनी पाहणारा ,आणि मनाच्या नजरेने पाहणारा ..एक बोलण्यातून आणि दुसरा शब्दातून व्यक्त होतो .तेव्न्हा कवींच्या शब्दातले सामर्थ्य "आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही. उत्तम आशयसंपन्न रचनेचे हेच वैशिष्ट्य असते.

"अल्पाक्षरी रमणीयता "हे कवितेचे विशेष असे लक्षणीय वैशिष्ट्य आहे.ते जसे कवितेला लागू आहे..तितकेच ते चारोळीला सुद्धा आहे.त्या दृष्टीने हे सगळे भान सांभाळून असणारी चारोळी ,एखाद्या संग्रहातून वाचकाला भेटते ,त्यावेळी अर्थातच " वाचनीय असा आनंद मिळतो.
साहित्य -मंथन च्या "नवरंग " या चारोळी संग्रहात याची प्रचीती नक्कीच येईल.
नवरंग -चारोळी संग्रहात .-महाराष्ट्रातील विविध भागात असलेले ही कवी-मित्र आहेत.- एका अर्थांने "विविधतेच्या मनोरम काव्य-छटा -म्हणजे नवरंग मधील-चारोळी रचना आहेत.
आकड्यातच सांगायचे झाले तर ..२३ कवींच्या -निवडक दोनशे चारोळ्यांचा समावेश या संग्रहात केलेला आहे.

हे रचनाकार या प्रमाणे --१. सुनील राजाराम पवार -सायन -मुंबई., २- डॉ. शरयू शहा- शिवाजी पार्क -मुंबई ,
३- दिलीप शेषराव धामणे - हिंगोली , ४- अनिल रामचंद्र हिस्सल- बुलढाणा
, ५- रामराव सर्जेराव जाधव -शिरापूर-अहमदनगर , ६- डॉ.शिल्पा जोशी - दादर -मुंबई , ७- सौ. प्रिया वैद्य -ब्रूकलेन-श्रेयसबरी -युएसए.
८- सौ. अंजना कर्णिक - माहीम -मुंबई . ९- सौ.जयश्री पाटील - वसमतनगर -जि.हिंगोली. ,
१०- बालाजी रामचंद्र धोंडगे - पाटील - नांदेड , ११- गजानन विश्वनाथ पाटील -पवार - वरुड-देवी ,जी.हिंगोली ,
१२- सौ.कुंदा अरविंद पित्रे - दादर(प) - मुंबई. १३- नागोराव सा. येवतीकर - येवती -जि.नांदेड .
१४- उत्कर्ष देवणीकर - उमरगा जि.उस्मानाबाद . १५ अरविंद रामचंद्र कुलकर्णी - अहमदनगर ,
१६-सौ.सुलभा प्रकाश कुलकर्णी - बोरीवली (प)- मुंबई . १७- डॉ.सुप्रभा कुलकर्णी - अहमदनगर , १८- जयंत देशपांडे - अहमदनगर ,
१९.गजानन व्ही .वारणकर - तरोडा (खु)-नांदेड . २०- योगेश पुंडलिक देवकर - साखरखेर्डा -जि.बुलढाणा .
२१- सौ.जागृती सुधीर निखारे - कल्याण , २२- उमेश भास्करराव खमितकर - गुंजोटी -जि.उस्मानाबाद.
२३- नंदकुमार सोवनी - बिबवेवाडी -पुणे .
या संग्रहाची सजावट समूह सभासदांनी केलेली आहे-
मुखपृष्ठ - डॉ.शिल्पा जोशी ,
सजावट - उत्कर्ष देवणीकर
यांचे या कामगिरी बद्दल अभिनंदन .
वाचक मित्र हो- दोनशे चारोळ्या आहेत.संग्रहातील नेमक्या कोणत्या चारोळ्या उदाहरणासाठी घ्याव्या ? कोणत्या कवींच्या घ्याव्या ?..हा मोठाच प्रश्न माझ्या पुढे होता..या वर एक सोपा आणि साधा उपाय ,तो करावा , साहित्य मंथन समूह , सहभागी कवी आणि ,प्रकाशक -संपादक -समूह संचालक श्री.अरविंद कुलकर्णी यांचेशी संपर्क साधून "नवरंग "चारोळी संग्रह घ्यावा.
या संग्रहाने यातील कवी-मित्रांना लेखनाची नवी दिशा नक्कीच मिळाली आहे.पुढच्या प्रवासासाठी या सर्वांना तुमच्या वतीने लेखन शुभेच्छा देतो.
-----------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED