मल्ल प्रेमयुद्ध - भाग 8 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 8

मल्ल - प्रेमयुद्ध


गाडी दारात पोहचली. गाडीचा आवाज ऐकून दादा,चिनू नि आई बाहेर आले. समोर वीर क्रांती आणि रत्नाला एकत्र बघून त्यांना पहिल्यांदा काय बोलावे सुचत नव्हते.


क्रांतिच्या लक्षात आले.


" दादा संतू ची गाडी बंद पडली म्हणून मग यांनी आमाला सोडलं." क्रांतीने वीरकडे पाहिले त्यांनीही तसच सांगावं अस तिला वाटले.
" नमस्कार दादा... ह्या प्रायव्हेट गाडी बघत व्हत्या.. आमास्नी वाटलं एकट्या पोरी कश्या जाणार कोणाबरोबर सुद्धा म्हणून आम्ही सोडवण्यासाठी आलो." क्रांतीला थोडा राग आला. तिने रागाने वीरकडे पाहिले.
"व्हय दादा खरंच देवावानी भेटले हे म्हणून लवकर आलो." रत्ना
" व्हय व्हय बर केलंत या आत या दोघे..." दादा

" न्हाय उशीर झालाय आम्ही निघतो." भूषण
"अस कस पावन जेवायची येळ हाय उपाशी न्हाय जायचं या आत या." आई
" खरच नको काकू आमी परत येऊ उशीर झाला तर आबा फोन करतील अन जाईपर्यंत काळजी करत बसत्यात" वीर निघायच्या तयारीत असताच संतोष गाडी घेऊन आला. त्याला वीरला पाहून आनंद झाला.
" दाजी धन्यवाद या दोघींना तुम्ही इथवर आणून सोडलं... दाजी म्हणू न्हवं." संतोषने वीरचा हात हातात घेतला. वीरने क्रांतीकडे बघितले.
" होय म्हणा की.... मला काही हरकत न्हाय." वीर हसला.
" बर चला..आई पान घे वाढायला." संतोषने वीरचा हात आणखी घट्ट धरला.
" संतोष उशीर व्हाईल जेवायला. आबा वाट बघत्यात." वीर
" न्हाय दाजी पहिल्यांदा आला अस न्हाय जायचं." चिनू पटकन पुढं आली.
" आता नाय म्हणू नका." रत्ना म्हणाली सगळे एवढा आग्रह करत होते की शेवटी वीरला नाही म्हणणं अवघड गेले. सगळे आत गेले. क्रांतीला वीर आलेला आवडलं नव्हतं. वीरलाही समजले होते पण बाकी सगळ्यांच्या आग्रहामुळे तो थांबला.
सगळे पुरूष जेवायला बसले. क्रांती भाकरी करायला बसली. आई ने ताट वाढली. तांब्या घेऊन वीर बाहेर आला त्यापाठोपाठ भूषण...
" वीर लेका वहिनीला तू पसंत नाहीस बघणं सोड साधं तिरक्या नजरेनं पण बघितलं नाय तुझाकडं..." वीर हसला आणि आत गेला. जेवायला ताट तयार होती. क्रांती जेवायला वाढल्यापासून एकदाही बाहेर आली नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या.
" त्या निमित्तान आला तरी आमच्याकडं ..." दादा बोलले.
" व्हय की न्हायतर कस निमित्त मिळालं असत इकडं यायचं." संतू हसत म्हणाला.
" संतोष हे सगळं तुमच्यामुळं..." वीर हसला संतोषही हसला. चिनू आग्रहाने भूषण आणि वीरला जेवायला वाढत होती. लाजत चार भाकरी खाल्ल्या तेंव्हा कुठं वीरला पोर भरल्यासारखे वाटले. जेवल्यानंतर त्याला बर वाटेल. जेवण झाली.
" दादा आम्ही बाहेर थांबणार व्हतो जेवायला पण इथं जेवलो आणि पोट भरलं... आई जेवण मस्त झालं होतं." आई हसली
" या रस्त्यान गेला तर अजिबात हे घर डावलून जायचं न्हाय मला जाताना सांगायचं... येऊपर्यंत जेवण तयार असलं. हक्काच घर समजायचं." आई बोलत होती. आतमध्ये क्रांतीचा जळफळाट होत होता.
" हक्काचं म्हणते... रत्ना माझ्या तळपायाची आग मस्तकात जाती. हे विसरले असत्यात सगळं मी न्हाय...मला न्हाय आवडलं दादा आईनी त्याला आग्रह केला." फुकणीने चुलीला जाळ फुंकनीने फुंकत क्रांती बडबड करत होती.
" क्रांते आग लाल झालीस तू रागानं.. एवढा राग बरा न्हाय. आपल्यासाठी आला नव्ह तो, आग्रह केला दादा आईने त्यात बिघडलं कुठं?" रत्ना
" आग्रह केला म्हण काय लगीच जेवायला बसायचं असत व्हय? रत्ना माझ्या मनातला राग न्हाय जात. संताप झालाय माझा." क्रांती भाकरी थापत म्हणाली.
" तुझा राग ठीक हाय पण दादा आईनं लग्न ठरवलं तर तू न्हाय म्हणणार हायस का? " असा प्रश्न विचारल्यावर क्रांती भाकरी टाकायची थांबली.
"मी म्हणेन नाय..." विचार करून क्रांती म्हणाली.
"खरंच...? आई दादांचा शब्द मोडशील? दादा त्यांच्या घरून आल्यापासून तुला काय सांगत्यात. आग एवढे मोठे स्थळ घालवतील?" क्रांती निःशब्द झाली.
वीर आणि भूषण निघाले. वीर मागे वळून वळून स्वयंपाक घरात डोकावत होता. संतोषच्या लक्षात आले.
"रत्ना, क्रांती.." संतोषने हाक मारली दोघी बाहेर आल्या.
" thank you dada..." रत्ना वीर ला म्हणाली. वीर हसला त्याने क्रांतीकडे पाहिले. तीने त्याच्याकडे पाहिलेसुद्धा नाही.संतोष त्यांना गाडीपर्यंत सोडवत गेला.
"संतोष तुझ्यामुळं आज थोडा क्रांतीसोबत वेळ मिळाला पण जाम हट्टी तुमची बहीण..." वीर
" दाजी... अहो मी माझं कर्तव्य केलं तिला समजायला पाहिजे की तुमच्यासारख्या मुलाला ती नाही म्हणून चूक करती. चूका कोणाकडून व्हत न्हाईत... दाजी मी प्रयत्न करत राहणार."

" संतोष मला वाटत ओढून ताणून प्रेम करायला लावण्यात अर्थ न्हाय, वहिनींना मनापासुन वीरविषयी काहीतरी वाटायला पाहिजे." भूषण म्हणाला.
" भूषणदादा आपण प्रयत्न करत राहायचं शेवटी दोघांचं नशीब..." संतोष
" तुम्ही कुठं थांबला होता एवढ्या वेळ?" वीरने विचारले.
" दाजी तुमच्या मागे मागे होतो... पण तुमचं लक्ष असलं तर ना..." संतोष हसला. वीरने गाडी स्टार्ट केली आणि वेगाने दोघे गेले.


रात्रीचे बारा वाजले होते. तेजश्रीला झोप येत नव्हती. वरच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि तेजश्री बाहेर येऊन उभी राहिली. गाव शांत झोपला होता. बारीक लावणीचा आवाज कानावर येत होता. तेजश्रीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. " मी कोणासाठी रडतीये??? हा माझा नवरा जो माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता त्याला आता मी नजरेसमोर नको त्याच्यासाठी??? की स्वतःसाठी???"
" मला माझ्या नवऱ्यावर प्रेम करता येत नाही का? तो माझ्यापासन लांब का जातोय? फक्त मूल होत नाही म्हणून...? की आणखी काय कारण असेल? मला याची उत्तर मिळायला पाहिजेत. आबा का काही बोलत नसतील.?" मंद वाऱ्याच्या गारव्यात तेजश्री विचार करत होती. खालून गाडीचा आवाज आला. वीरने वहिनींना एकटीला पाहिले. गाडी लावली आणि आत आला. आबा बाहेर उभे होते.
"वीर उशीर झाला. अजून वाट बघून फोन लावणार व्हतो." आबा
" आबा क्रांती आणि त्यांची मैत्रीण रत्ना त्यांना सोडायला त्यांच्या गावाला गेलो व्हतो म्हणून उशीर झाला." वीरने जे काही आहे ते खरे सांगितले.
"आर वा!" आबा जाम खुश झाले.
" आबा तस न्हाय... रात्र झाली व्हती लय अन त्यांच्या भावाची गाडी बंद पडली म्हणून मग त्यांची मदत केली. त्या जागेवर आणखी दुसरं कोणी असत तरी तेच केलं असतं." वीर
" वा गड्या... लई झाक... मग जेवणाचं... तुमच्या मातोश्री थांबल्या व्हत्या वाट बघत आम्ही त्यांना जेवून घ्याल सांगितलं तवा जेवल्या." आबा
" व्हा बर झालं जेवल्या दादा अन आईंनी लै आग्रह केला मग आम्ही तिथंच जेवण केलं. गरीब लोक पण लै मन मिळावू..." वीर आणि आबा सोफ्यावर बसले.
" वीर अमास्नी कळती तुमच्या मनाची घालमेल... पर तुमीचं म्हणता ना की केलं तर त्याच पोरीबर लग्न करायचं... थोडा दम धरा आमच्या बाजून आम्ही प्रयत्न करतोय." आबा म्हणाले तेवढ्यात तेजश्री खाली आल्या.
" भाऊजी... हे माझा फोन उचलत न्हाईत जर बघा तुमी लावून..." तेजश्री
" दादा अजून आला न्हाय?" वीर
" भाऊजी ते रोजच येत न्हाईत लवकर पण आज लईच वेळ झाला.काळजी वाटली म्हणून..." वीरने खिशातून फोन काढला आणि लावणार तोच संग्राम दारात उभं.. धड नीट उभसुद्धा राहता येत नव्हते.
" पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...." संग्राम लावणी म्हणत आत येत व्हत.
"वीर यांना वरती न्या हे बोलायच्या मनस्थितीत न्हाईत. सुनबाई तुम्ही झोपा आपण उद्या बोलू..." आबांचा स्वर वाढला व्हता एक मुलगा असा आणि दुसरा... आबांना राग येत व्हता. वीर त्याला वर खोलीत घालवून आला. त्याला त्याच्या वहिनीची अवस्था बघवत नव्हती.
" वहिनी आपण बोलू ... आत्ता आराम करा." वीर खाली आला.
" आबा हे काय? दादाचा रोजच हे धंदे वाढत चालल्यात... गावात चर्चा व्हायला लागल्यात." वीर
"व्हय त्याच्याशी उद्या बोलतो." आबा
" त्याच्याशी बोलण्यापेक्षा त्या बाईला का न्हाय गावतन हाकलत. आबा आपल्यासाठी काहीच अशक्य न्हाय तुम्ही फकस्त सांगा." वीर
" सावकारान त्या बाईला गावात आणून ठेवली, तिला राहायला वाडा दिलाय ते बी तिच्या नावावर म्हंटल्यावर आपण काय करू शकणार न्हाय. आपल्या पोराला अडवन आपल्या हातात हाय." आबा
"आबा आता किती वेळ सांगायचं त्याला.. एक दिवस एकल्यासारख करतो न परत चालु..." वीर
" बऱ्याच गोष्टी बायकांच्या हातात असत्यात वीर..." आबा
" आबा वहिनी प्रयत्न करत न्हाय अस न्हाय त्यांची अवस्था मी बघितली. त्यांना बोलून काय उपयोग न्हाय." वीर
"आपण बोलू उद्या जा दमलाय दिसभर झोपा." आबा निघून गेले त्यापाठोपाठ वीर त्याच्या खोलीत गेला.
बराचवेळ वाहिनीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. त्याने ठरवलं संग्रामला कस थांबवायचं आणि बेडवर पाठ टेकवली. आज क्रांतीला बराचवेळ तो न्याहाळत होता. त्याला क्रांतीची चलबिचल बघून हसू आलं. तिच्या आठवणीत तो झोपून गेला.

आशाने सकाळी सकाळी दादांना नमस्कार केला.
" आशा आव कितीदा सांगितलंय अमास्नी नमस्कार नका करत जाऊ... देवांना करा जो काय करायचंय तो" दादा म्हणाले.
" आधी तुमी माझं देव अन मग बाकीचं..." आशा ने चहाचा कप दादांच्या हातात दिला.
"उत्तर पाठ झालय आशा अमास्नी..." दादा हसले
" मग तरीबी ईचारता व्हय..." आशा
" गेल्या इस वर्षात काय फरक पडला। हाय बोलून आता काय पडणार हाय..." दादांनी चहाचा घोट घेतला.
" बर वाटलं राजवीर राव घरी आलात न्हाई..." आशेने मुद्याला हात घातला.
" व्हय की... एक नंबर पोरगा हाय..." दादा
" व्हय की पोरींना घरापर्यंत सोडायला आलं." आशा
" आशा आपल्याच पोरी न्हाय कोणी बी अडचणीत असत ना तरी राजवीररावांनी मदत केलीच असती. " दादांना वीरचा स्वभाव आणखी आवडू लागला होता.
" व्हय पण ही पोरगी लईच राग राग करायला लागली. आपली लेक अशी न्हाय बघा." आशा
" न्हाय अशी पर तिला बी जरा येळ दयायला पाहिजे की आशाबाई." दादा उठले. तेवढ्यात क्रांती आवरून बाहेर आली दादा आणि आईला नमस्कार केला.
" क्रांते... आग काल वीररावांचं आभार तरी मानायचं...?" आई म्हणाली. क्रांतीने आई कडे बघितले आणि....


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत



( क्रांती दादा आणि आईला काय उत्तर देईल? वीरने संग्राम विषयी काय निर्णय घेतला असेल? वीरला खरच क्रांती आवडत असेल? )