मल्ल प्रेमयुद्ध - भाग 15 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 15

मल्ल- प्रेमयुद्ध

वाड्यासमोर गाडी थांबली. आबा, सुलोचनाबाई, तेजश्री, संग्राम सगळे बाहेर येऊन स्वागताला उभे राहिले. सुनबाई येणार म्हणून सुलोचनाबाई आणि तेजश्रीला काय करावे आणि काय नको असे झाले होते. सुलोचनाबाईच्या हातामध्ये ओवळणी तबक होते. क्रांतीने स्काय ब्लु कलरची साधी साडी नेसली होती. आधी ड्रेस घातला होता पण नंतर क्रांतीलाच वाटले की पहिल्यांदा सासरी जातीय ते सुद्धा लग्नाआधी तर वीरचा विचार करून नाही आई आबांचा विचार करून साडी नेसायला पाहिजे. क्रांतीने डोक्यावर पदर घेतला. आबा आणि आईच्या पाया पडली. क्रांतीला तेजश्री आणि सुलोचनाने ओवाळले. भाकरी तुकडा ओवाळून टाकला. रत्नालासुद्धा ओवाळले. रत्नाला वेगळे वाटत होते पण सगळ्यांच्या प्रेमाने आणि आपुलकी बोलण्याने तिला घरच्यासारखं वाटलं. रत्नाचा स्वभाव होताच तसा ती जिथे जाईल त्यांच्याशी जमवून घ्यायचा प्रयत्न करायची. क्रांतीला वाडा पाहून काय बोलावे सुचत नव्हते.
"चिनू मला चिमटा काढ ग...!" क्रांती म्हणाली.
"चिनूने जोरात चिमटा काढला तशी क्रांती जोरात ओरडली." सगळे क्रांतीकडे बघायला लागले.
"ताई काय झालं???" चिनूने मुद्दामच सगळ्यांसमोर विचारले.
"काही नाही... चल." क्रांतीने चिनूला डोळा मारला.
"या सगळ्यांनी आत या." सगळे आत येऊन सोफ्यावर बसले. संतू गाडी लावून आत आला. संतू आणि रत्ना सगळ्यांच्या जोडीने पाया पडले. तेवढ्यात वीर भूषणसोबत आला. त्याला माहीतच नव्हते की हे सगळे आज येणार आहेत. ना आबांनी त्याला सांगितले होते ना संतुन... हे अचानक सगळ्याना बघून त्याला काय करावे समजेना झाले.

"या वीर शेठ... धक्का बसला नव्ह...? " संग्राम हसत म्हणाला.
"मंजी वीरला माहीत नव्हतं हे येणारेत?" सुलोचनाबाई म्हणाल्या.
"व्हय आम्ही सगळ्यांना सांगितलं व्हत की ह्याला काय ते इंग्लिश मधी म्हणत्यात..." आबा आठवत होते.
"सरप्राईज." तेजश्री म्हणाली.
"हा ते द्यायचे..." आबा हसले.
"बघ तुला म्हंटल व्हत ना की दाजींच्या डोक्यात काय सुद्धा नसणार.." चिनू हळू आवाजात म्हणाली.

"इथं आपल्याला आज बोलवायचं नसलं त्यांचा प्लॅन पण उद्या रत्नागिरीला मला घेऊन जायचा प्लॅन त्यांचाच असणार..." क्रांती.
"फक्त तुला नाही आम्हालासुद्धा नेत्यांत...एकटीला नेणार असते तर गोष्ट वेगळी." चिनू.
संतू आणि वीर पुन्हा गप्पा मारत बसले.
"पोरांनो हात- पाय धून घ्या अन पान वाढते. जजेव अन झोपा पहाट लवकर निघावं लागलं." तेजश्रीने चिनू, क्रांती आणि रत्नाला वरच्या बाथरूममध्ये नेले. संतूला वीरने त्याच्या रूममध्ये नेले.
"तेजुताई बाहेरून अगदी वाड्यासारखा वाडा वाटतो पण आत आल्यावर बंगलाच हाय ग..." चिनू पटकन बोलली.
"अग व्हय हे सगळं तुझ्या दाजींचं डोकं... आमच्या लग्नानंतर वीर भाऊजीना वाटले की आतून बदलायला पाहिजे. हा हा म्हणता सगळं शहरातल्या सारख करून घेतलं. बाहेरून वाटतो वाडा पण आतून सगळं भाऊजीनि शहरातल्या लोकांना आणून बदलून टाकलं." तेजश्री आनंदाने सांगत होती.
"खरंच लै भारी वाटतय." रत्ना म्हणाली.
"चला तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत मी खाली जाऊन जेवणाची तयारी करते." तेजश्रीने बाथरूम दाखवले आणि निघाली.

संतू आपल्यावर हसतोय हे वीरला समजत होते.
"साले हसून घ्या नंतर आमची वेळ येईल." वीरने संतुला त्याच्या रूममध्ये नेले.
"दाजी अहो म्हणूनच फोन उचलत नव्हतो. आबांनी तस सांगितलं होतं फोनवर..." संतू हसत म्हणाला.
"व्हय... असुद्या पुढचे दोन दिवस तुम्ही आमच्यासोबत हाय." वीर
"व्हय तूम्ही असणार आमच्यासोबत पण लक्ष आमच्याकड असणार व्हय तुंमच?" संतू.
"संतू मी प्रयत्न तर हाच करणार की तुझी बहीण अगदी मनापासून या लग्नासाठी तयार असावी.उगच मी तिच्या मनाविरुद्ध तिच्याबर लग्न न्हाय करणार..."वीर शांत बसला.
"दाजी मला जशी तुमची तगमग दिसती तशी क्रांतीला दिसलं बघा शब्द हाय माझा. मला म्हायती हाय तुम्ही किती प्रेम करता तिच्यावर.." संतू.
"हम्मम ज तू फ्रेश हो मग आपण जाऊ खाली.


सगळेजण पुरुष जेवायला बसले. आग्रहाने संतुला सुलोचनाबाई जेवायला वाढत होत्या. संग्राम अजूनही तेजश्रीकडे मधून अधून खुणावत बघत होता. तेजश्रीला संग्रामला पहिल्यासारखा बघून समाधान वाटत होते. पुरुषांचे जेवण झाले. आता सगळ्याजणी जेवायला बसल्या. गप्पा मारत सगळ्यांचे जेवण सुरू होई. क्रांती शांत होती. सुलोचनाबाई जरा जास्त लक्ष होणाऱ्या सुनेकडे देत होत्या.! सोफ्यावर बसलेला वीर असुन मधून क्रांतीकडे बघत होता. क्रांतीचा बुजरेपणा कमी व्हायला लागला होता. ती मोकळेपणाने सगळ्यांसोबत बोलत होती. घरात प्रत्येक कामासाठी लोक होते. हे बघून सगळेच आश्चर्यचकित होते. क्रांतीला भरपूर भूक असली तरी तिने थोडेफार खाल्ले. चिनू आणि रत्ना मात्र सगळ्या मेनुवर ताव मारत होत्या. जेवण आटपली.

" पोरींनो तुमची सोय या खालीच्या रुममधी केली. संतू तू वीरसोबत झोप. सकाळ लवकर उठायचय झोप आता. तेजु याना रुम दाखव" सुलोचनाबाई सगळ्यांना सांगून झोपायला गेल्या. तेजश्रीने त्यांना रूममधी नेले.
"आरामात झोपाल तिघी एवढा मोठा बेड हाय...झोपा पाणी प्यायला जग भरून ठेवलाय हित. अन माझ्याआधी उठला तर बाथरूमच्या उजव्या नळ गरम पाण्याचा हाय. टॉवेलसुद्धा हायत. अन क्रांती सकाळी सहाला निघायच् मंजी भाऊजी सहाला गाडी घेऊन तयार असत्यात बर... भाऊजीना उशीर अजिबात आवडत न्हाय." तेजु अस म्हणून निघून गेली.
"बाई पाहुण्यांना एवढी भारी खोली तर तुझी खोली काय भारी असलं ग तायडे..." चिनून अंग बेडवर झोकून दिले.
"व्हय क्रांते नशीब काढलाय बया तू..." रत्ना सुद्धा म्हणाली.
"पण मान किती ताठ तायडे आग अस असलं तर नमतं घ्यायला
पाहिजे तुला..." चिनू
खरतर आता क्रांतीलसुद्धा तिच्या नशिबाचा हेवा वाटायला लागलं होता. क्रांती विचार करत होती. काय होईल तिकडे गेल्यावर कश्या असत्यात वीरच्या आत्या आणि बाकी पाहुणे... नेमकं कशाला बोलावलं असलं आत्ता ते ही लग्न आधी..." रत्ना आणि चिनूला केंव्हाच झोप लागली. क्रांतीला काय झोप लागत नव्हती.

वीरने बॅग भरली.
"संतू चल तुझी बॅग कुठाय आपण गाडीत ठेवून येऊ." वीर त्याची बॅग घेऊन उठला.
"दाजी माझी बॅग हाय पण मला उद्या कपडे घालयच्यात सकाळी लागलं मला आपण उद्याच ठेवू सगळ्या बॅगा गाडीत. अन हो तुमची अन माझी अश्या दोन गाड्या घ्यायच्या ना?" संतू
"आर। न्हाय माझी इंडेवर हाय त्यात बसू आपण आरामात सगळे. आणि तीन ड्रायवर मग कशाला दोघांनी दोन गाड्या घायच्या आलटून पालटून चालवू." वीर
"बर चालल..." संतू
गाडीच नाव ऐकून संतू शांतच झाला. "लेका दाजींकडे एवढी भारी गाडी हाय आपल्याला ना माहिती व्हत न कधी मोठेपणानं सांगितलं. क्रांते तू नशीब काढलायस फक्त भाव खाऊ नकोस आता न्हायतर तुलाच महागात पडलं." संतू झोपून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तयार होऊन बाहेर आले. लिंबू कलरच्या कॉटनच्या ड्रेसमध्ये क्रांती गोड दिसत होती. ऑक्साईडचे छोटे झुबे अन लाल रंगाचे बारीक टिकली लावली होती. वीरची नजर तिच्यावर पडली. अन त्याला काय करावं सुचेना. तो तिच्याजवळ गेला. क्रांतीला काय बोलावे समजत नव्हते.
"बॅग..." वीर
"हम्मम..." क्रांती
"बॅग देताय ना...." क्रांती भानावर आली आणि तिची बॅग वीरच्या हातात दिली. वीरचा हाताला तिचा स्पर्श झाला. वीर बॅग घेताना हळूच म्हणाला.
"लै भारी दिसताय..." क्रांती काहीच बोलली न्हाई तेवढ्यात भूषण आला.
"वीर तुझा फोन लागत न्हाय लेका" भूषण
"काय र काय झालं?" वीर
"आर मला यायला न्हाय जमत... बापूंची तब्बेत बिघडली. मला थांबावं लागलं." भूषण
"जास्त काय न्हाय ना? न्हायतर मी थांबतो." वीर म्हणाला तेवढ्यात संतू आणि संग्राम त्यांच्या चर्चेत सहभागी झाले.
"न्हाय न्हाय आर अस न्हाय... ताप हाय पण आई एकटी घाबरती म्हणून फक्त..." भूषण.
"पण भूषण्या तालुक्याला ने बाबा... पाहिजे तर आबांकडन आपल्या दुसऱ्या गाडीची चावी घे अन आजच्या आज घेऊन जा..." संग्राम
"व्हय व्हय... जातो घेऊन...तुम्ही ज आरामात मजा करा." भूषण जयाल निघाला.
"भूषण्या.." वीरने खिशातून पैशाच्या नोटा काढल्या.
"घे लागलं तर ठेव." वीर
"आर नको... तेवढं मी करीन..." भूषण
"न्हाय म्या इथं न्हाय काय कमी पडायला नको." वीरने त्याच्या खिश्यात पैस ठेवलं.
हा सगळा प्रकार ह्या तिघीसुद्धा बघत होत्या. क्रांतीला वीरचा स्वभाव कळायला लागला होता. वीरची माणसांबरोबर वागण्याची पद्धत आवडायला लागली होती.
तेजश्री आली. अगदी साधी पिवळ्या रंगाचे साडी नेसून सैलसर वेणी घातली होती अन त्यावर गजरा. एकदम गोड दिसत होती.
सगळ्यांनी सुलोचनाबाई आणि आबांना नमस्कार केला.
सगळे गाडीमध्ये बसले. "गणपती बाप्पा मोरया" म्हणून गाडी सुरू केली. वीर गाडी चालवायला बसला. संतू त्याच्या शेजारच्या सीटवर बसला. मध्ये संग्राम, तेजश्री आणि क्रांती बसली. मागच्या सीटवर रत्ना आणि चिनू बसली. प्रवास चॅन चालू झाला. सुरुवातीला सगळेच शांत होते. चिनूला शांतता सहन व्हायना.
"दाजी गाणी लावा की..." चिनू
"लावू व्हय... म्हंटल आवडतंय का न्हाय म्हणून न्हाय लावली." वीरने गाणी सुरू केली. मग काय चिनूच गाडीत धिंगाणा सुरू झाला. सोबत संग्राम, तेजश्री, रत्ना तिला सामील झाले. अंजु क्रांती शांत होती. मधून मधून वीर अरश्यातून तिचे भाव टिपत होता.





क्रमशः

भाग्यशाली अनुप राऊत