some more books and stories free download online pdf in Marathi

अजुन काही

विटाळ द्वेष शत्रुत्व की अजून काही

माणसाचा स्वभाव की सवय माहीत नाही. परंतु ती माणसं जशी वागतात. त्यावरुन त्यांचा स्वभाव कळत असतो. ती समाजात कशी वावरत असावी? कोणाला कशी वागवत असावी? याचं गणित त्यांच्या वागण्यावरून दिसून येतं.
साधारणतः विचार केल्यास माणसांमध्ये राग, द्वेष, मद, मत्सर व लोभ भरलेला असतो. तो कमीअधिक प्रमाणात असतो आणि तो प्रत्येकच माणसात असतो. त्यानुसार तो वागतो व तद्नंतर त्यांच्या या स्वभावगुणानं त्यांच्यात अहंकाराचा जन्म होतो. मग सुडबुद्धीची भावना वाढीस लागते. प्रेमभाव वा प्रेम उरत नाही. आपुलकी केव्हाच हद्दपार झालेली असते. त्यातूनच भेदभाव, शत्रुत्व आकार घेत असतात. मग एकमेकांचे मुडदे पडतात नव्हे तर पाडली जातात.
वरील बाबीच्या अनुषंगाने विचार येतो की लोकं असे का वागत असावे? लोकांना काय मिळतं असं वागून? आनंद........ज्या आनंदानं क्षणभरातच पश्चातापाची वेळ येते. जो आनंद जास्त वेळ टिकत नाही. अन् ज्या आनंदाची जो कल्पना करतो. त्या आनंदानं तोच खड्ड्यात पडतो. दुसरा पडत नाही. मग त्याला प्रारब्ध असं नाव दिलं जातं.
अलिकडे वरील बाबींच्या अनुषंगानेच विटाळ सुरु झाला आहे. भेदभावही तेवढाच सुरु आहे. हा भलताच विटाळ आहे. पुर्वी जातीयतेचा विटाळ होता. आज गरिबीचा विटाळ आहे. समाजासमाजात भेदभावाची दरी निर्माण झाली आहे. गरीब-श्रीमंत भेद उसळतो आहे. काल उच्च जातीला प्राधान्य दिलं जात होतं. आज श्रीमंतीला प्राधान्य दिलं जात आहे. काल हा उच्च जातीचा तो कनिष्ठ जातीचा अशीही एक दरी निर्माण होत होती आणि समाजात याच जातीच्या आधारावर मारपीट दंगेही घडत होते. गावात तर जातीयता जास्त होती. शहरातही ती काही कमी नव्हती. त्यानंतर सन १९५० आरक्षण आलं व सर्व बदललं. आज आरक्षण वा संविधान आहे, म्हणून जात सुरक्षीत झाली आहे. जर संविधान नसतं आणि तेवढाच कायद्याचा धाक जर नसता तर जातीची माणसं चूप बसली असती. ती बोलूही शकली नसती. ही जातीयता आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून संपुष्टात आली. अंश रुपात का असेना, परंतु त्याची जागा तसं पाहता आज गरीब वर्गानं घेतली आणि आता श्रीमंत झालेली हीच माणसं गरीबांना केरकचराच समजतात. त्यांच्याकडे माणूसकीच्या दृष्टीनं पाहात नाहीत. आज श्रीमंत गरीबीतील वाद वाढत आहे. जशी काल जातीयता होती तशी. श्रीमंत माणसं तर स्वतःला एवढी थोर समजतात की विचारता सोय नाही. ती गरीबांना हीन समजतात. त्यांच्या हातचं खात नाही. पिण्याचा व्यवहार होत नाही. कोणी त्यांच्याशी व्यवहार करीत नाहीत. त्यातच त्यांना अगदी तुच्छ समजलं जातं आणि व्यवहार करायचा झाल्यास त्यांना आज गुलाम समजलं जातं. गुलामी पद्धतीनं वागवलं जातं.
आज अशीच दरी निर्माण झाली आहे. लोकं गरीबांना तुच्छ समजत त्यांच्या हातचं पाणीही पीत नाहीत आणि व्यवहार करीत नाहीत. मात्र ते आपल्या घरच्या ढोर मेहनतीच्या कामाला चालतात. जसे पुर्वी बैलाला घाण्याला जुंपून होते तसे. आज शेतात वखरण करायचे असल्यास मजूर म्हणून राबविण्यास ही माणसं चालतात. बदल्यात त्यांना तुटपुंजी रोजी मिळते. आज घरी फरशी पुसणे, भांडी घासणे यासाठी ही माणसं चालतात. बदल्यात काय तर तुटपुंजा पगार. काही काही घरात तर त्यांच्या हातचं बनलेलं जेवनही चालत नाही. एवढा श्रीमंत गरीबीचा भेदभाव. अन् त्यातच एखादा गरीब व्यक्ती आपल्या अंगमेहनतीनं श्रीमंत बनलाच वा त्यानं बनण्याचा प्रयत्न केल्यास जो पुर्ण रुपात श्रीमंत असतो, त्याचा जळफळाट होतो. त्याला वाटतं की अमूक अमूक गरीब माणसानं माझ्या एवढं श्रीमंत बनायचं स्वप्नदेखील पाहू नये. अशाच स्वरुपानं आज लोकं वागत असतात. जणू शत्रू असल्यासारखीच. याला काय म्हणता येईल. विटाळ, द्वेष की शत्रुत्व की अजून काही? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
विशेष बाब ही की आज आपण स्वतंत्र आहो व भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला श्रीमंत बनण्याचा अधिकार आहे. तसाच गरीब बनण्याचाही अधिकार आहेच. माणूस कर्मानं गरीब बनतो आणि कर्मानंच श्रीमंत बनतो. ज्या व्यक्तीत आउट कुटकुट भरलेला असेल, तो व्यक्ती गरीब होतो हे तेवढंच खरं आहे आणि जो आईशी नसेल तो तेवढाच श्रीमंत. त्यातच कधीकधी प्रारब्धानुसारही माणसं गरीब श्रीमंत बनत असतात. जिथं वाल्याचा वाल्मीक जर होवू शकतो. अंगुलीमालचा स्वभाव बदलवू शकतो. तिथं गरीबांचा श्रीमंत व श्रीमंतांचा गरीब का नाही बनू शकणार? काही माणसं तर आपल्या बापाची भरपूर मालमत्ता आहे व काम करण्याची गरज नाही असे समजून काम करीत नाहीत. ते गरीब बनतात. तर काही गरीब असलेली माणसं आपल्या बापाची गरीबी व त्याला झालेल्या वेदना लक्षात घेवून श्रीमंत बनण्यासाठी प्रयत्न करीत असतात. ते श्रीमंत बनतात. त्याला कोणी अडवू शकत नाही व अडवू नये. त्यामुळं आज आपण स्वतंत्र असल्यानं व संविधानानुसार आपल्याला अशी खुली अर्थव्यवस्था लाभल्यानं त्याचा आपल्याला श्रीमंत होण्यासाठी फायदा होत असतांना कोणी जर श्रीमंत झालो तर त्यात गैर काय? मग असा कोणी श्रीमंत झाल्यास आपल्याला त्याचा जळफळाट वा द्वेष का असावा? तसाच कोणी जर प्रारब्धाने गरीब बनला तर त्याचा आपल्याला विटाळ का असावा? कोणी श्रीमंत बनला असेल तर त्याबद्दल आपल्या मनाचाच जळफळाट करुन घेवून आपण त्याला आपला शत्रू का मानावं? वैगेरे प्रश्न अनाकलनीय आहेत. तेव्हा आपण तसा विटाळ, जळफळाट वा शत्रुत्व मनात न ठेवता त्यांच्याबद्दल आपल्या मनात आत्मीयता ठेवावी. आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर नष्ट करावा. तेव्हाच आपण आनंदी राहू. इतरांनाही आनंदी ठेवू आणि त्याचबरोबर आपल्या देशालाही आनंदी ठेवू हे तेवढंच खरं आहे याबद्दल वाद नसावा.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय