Geet Ramayana Varil Vivechan - 2 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 2 - अयोध्या मनुनिर्मित नगरी

लवकुशांनी राम दरबारात रामायण सांगण्यास सुरुवात केली आहे.

ते सांगतात:

शरयू नदीच्या काठावर अयोध्या नावाची मनू ने निर्माण केलेली विशाल नगरी स्थित आहे.

(मनू हा भारतीयांचा आद्य पुरुष आहे व शतरुपा ही मनूची पत्नी असून आद्य स्त्री आहे. त्यांच्यापासूनच भारत वंशाचे लोकं निर्माण झाले.)

तर ह्या अयोध्या नावाच्या अजस्त्र नगरी मध्ये एकाहून एक सुंदर अश्या इमारती, वास्तू उभ्या आहेत. दोन्ही बाजूला सुंदर वास्तू आणि त्यांच्या मध्ये समांतर असे रस्ते आहेत ज्या रस्त्यांवरून अनेक रथ हत्ती घोडे, तिथून येणारे जाणारे प्रवासी नटून थटून त्यावरून मार्गक्रमण करत असतात.

ह्या अयोध्या नगरीच्या घराघरावर रत्नांची तोरणे आहेत. घर मंगलचिन्हांनी सुशोभित केलेले आहेत. ठिकठिकाणी नयनरम्य सुंदर असे उपवने बगीचे आहेत. ज्यात नृत्य, गायन, वीणा वादन असे कार्यक्रम सुरू असतात. म्हणजेच अयोध्येतील जनता ही कलोपासक,सौन्दर्य दृष्टी असलेली आहे. अयोध्या नगरी ही समृद्ध आहे त्यात कसलीही कमतरता नाही.

अयोध्या नगरीतील सर्व स्त्रिया तसेच पुरुष हे चारित्र्यसंपन्न आणि धार्मिक आहेत. कोणीही नास्तिक किंवा दुष्ट नाही. ह्या नगरीतील प्रत्येक पुत्र हा कुळाचे नाव उज्वल करणारा आहे. ह्या नगरीत अतृप्तीला थारा च नाही. न नगरीत न घरात न मनात कुठेच अतृप्ती कमतरतेचा लवलेश नाही.

ह्या नगरीत दशरथ नावाचा इशवाकु कुळाचा कर्तव्यपरायण, प्रजेचे हित जाणणारा राजा आहे.
जो आपल्या कुटुंबियांसोबत वागताना चंद्रा सारखा शीतल सौम्य वागतो. प्रजेसोबत वागताना इंद्रा सारखा उदारतेने वागतो आणि वेळप्रसंगी युध्द संग्रामात तो शत्रूसमोर सूर्याप्रमाणे प्रखर वागतो. असा आदर्श राजा अयोध्येला लाभलेला आहे.

ह्या दशरथ राजाला तीन पत्नी आहेत ज्या तिघी आदर्श स्त्रिया आहेत,उच्च कुळातील असून सर्वगुणसंपन्न आहेत. ज्या पतिसेवेस सदैव तत्पर असतात. ह्या तिन्ही राण्यांसोबत संसार करताना दशरथास त्रैलोक्याचे सुख प्राप्त होते. एकंदरीत राजा राण्या प्रजा सगळे जण तृप्त आहेत सुखी आहेत.

पण एवढं जरी सगळं परिपूर्ण त्यांचं आयुष्य असलं तरी सगळ्यांना एकच शल्य आहे ते म्हणजे दशरथ राजाला पुत्र नाही. एवढं मोठं वैभव एवढं मोठं राज्य पुढे सांभाळायला पुत्र हवा. त्याशिवाय ह्या वैभवाला काहीही अर्थ नाही.

(आपल्याला माहीत आहे की शांता नामक दशरथ व कौसल्या ह्यांना एक कन्या होती पण पुरुषप्रधान संस्कृती असल्याने राज्यावर बसण्यासाठी पुत्राची च आवश्यकता होती. पुढे दशरथ राजा आणि कौशल्येनी आपली कन्या कोशल्येच्या भगिनीला संतती नसल्याने दत्तक दिली.)

दशरथ राजा,कौसल्या देवी सुमित्रा देवी कैकयी सगळेजण व्रतवैकल्ये करून करून थकले पण अद्यापही त्यांच्या संसारवेलीवर पुत्ररूपी फुल उमलले नव्हते.

प्रजाजन सुद्धा खंत करीत असत की एवढा आपला आदर्श राजा त्याच्यानंतर आपला कोण सांभाळ करणार? त्याच्यासारखा त्याच्या तोडीसतोड जाणता राजा मिळणं आपल्याला आवश्यक आहे असा प्रजा विचार करीत असे.

(पुढे रामायणात काय घडेल हे बघू उद्याच्या भागात.
जय श्रीराम🙏)

सरयु तिरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वस्तू सुंदर
मधूनी वाहती मार्ग समांतर
रथ,वाजी,गज,पथीक चालती, नटून त्यांच्यावरी

घराघरावर रत्नतोरणे
अवतीभवती रम्य उपवने
त्यात रंगती नृत्यगायने
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरी परी

स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक
पुत्र उपजती निजकुल दीपक
नृशंस न कोणी,कोणी न नास्तिक
अतृप्तीचा कुठे न वावर,नगरी, घरी,अंतरी

इश्वाकू-कुल-कीर्ती-भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचे करितो रक्षण
गृही चंद्रसा,नगरी इंद्रसा,सूर्य जसा संगरी

दशरथास त्या तिघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रुपशालिनी,अतुलप्रभासुंदरी

तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमी
तिन्ही लोकींचे सुख ये धामी
एक उणे पण गृहस्थाश्रमी
पुत्रोदय पण अजुनी नव्हता,प्रीतीच्या अंबरी

शल्य एक ते कौशल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती,छळीते अभ्यंतरी

राजसौख्य ते सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे
काय काज या सौख्य-धनाचे?
कल्पतरू ला फुल नसे का?वसंत सरला तरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED