Geet Ramayana Varil Vivechan - 11 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 11 - आज मी शापमुक्त झाले

श्रीराम व लक्ष्मण ऋषि विश्वामित्रांच्या सांगण्यावरून मिथिलेला जायला निघतात. प्रवास सुरु असताना मधून मधून थोडा विश्राम करत. भूक लागल्यावर फळे खात.
तहान लागल्यावर प्रवासात लागलेल्या जलाशयातील पाणी पीत त्यांचा मिथिला नगरीकडे प्रवास सूरु होता.
प्रवासात जाता जाता त्यांना एक कुटी दिसते व त्यात एक मोठी शिळा दिसते.
श्रीराम विश्वामित्रांना त्याबद्दल विचारतात.
विश्वामित्र श्रीरामांना त्या शिळेचा इतिहास सांगायला लागतात.

"हे श्रीरामा, फार वर्षांपूर्वी इथे गौतम ऋषींचा आश्रम होता ते व त्यांची साध्वी पत्नी अहल्या तिथे राहत असत. गौतम ऋषी जसे तपस्वी होते त्याचप्रमाणे त्यांची पत्नी सुद्धा योगिनी होती. एकदा आकाश मार्गाने जात असता इंद्राला गौतम ऋषींचा आश्रम दिसला.
आश्रमातील अहल्या देवींना बघून त्याला मोह झाला. त्याने गौतम ऋषींना आश्रमाच्या बाहेर जाताना बघितले. देवी अहल्येला फसवून आपलंसं करण्यासाठी इंद्राने गौतम ऋषींचे रूप घेतले आणि तो आश्रमात प्रविष्ट झाला.
देवी अहल्येने आपल्या योग सामर्थ्याने हा इंद्र आहे हे ओळखले आणि अपमानित करून आश्रमाबाहेर पाठवले.

त्याचा वचपा काढण्यासाठी इंद्राने गौतम ऋषींना देवी अहल्या आता पवित्र राहिल्या नसून भ्रष्ट झाल्या आहे असे सांगितले. ते ऐकताच गौतम ऋषींनी क्रोधीत होऊन देवी अहल्येला आहे तिथेच शिळा होऊन पडशील असा श्राप दिला. व इंद्राला तुझ्या शरीराला हजार छिद्र पडतील व तू कुरूप दिसशील असा श्राप दिला.
श्रापामुळे देवी अहल्या आश्रमात शिळा होऊन पडतात. आणि इंद्र संपूर्ण शरीरभर व्रण येऊन विद्रुप होतो. स्वर्गलोकी तो तसाच विद्रूपवस्थेत जातो.

काही वेळाने जेव्हा गौतम ऋषींचा क्रोध शांत झाल्यावर त्यांना त्यांच्या योग्य सामर्थ्याने कळते की देवी अहल्या पूर्णपणे निर्दोष आणि पवित्र आहे तेव्हा ते तिला उ:शाप देतात की काही काळाने श्रीराम ह्या वाटेवरून जातील. त्यांचा पदस्पर्शाने तू शापमुक्त होशील व पुन्हा माझ्यासोबत राहू शकशील.

इंद्र देवाने कपट केल्यामुळे देवी अहल्येला विनाकारण आपल्याकडून श्राप मिळाला हे कळताच ते पश्चाताप दग्ध होऊन हिमालयात तपश्चर्येसाठी निघून जातात.

(अनेक ठिकाणी देवी अहल्येच्या कथेत अनेकजण सद्यपरिस्थितीची कल्पना करून काल्पनिक कथा रचून सांगतात. पण पुराणात किंवा इतिहासात कल्पनाविलास करणे योग्य नव्हे म्हणून जी कथा जशी आहे तशीच वर नमूद केलेली आहे.)

त्यामुळे हे श्रीरामा त्या ऊ:शापाची वेळ आलेली आहे. आता ह्या शिळेला तुझा पद स्पर्श कर व अहल्येला श्राप मुक्त कर.

श्रीराम ऋषी विश्वामित्रांनी सांगितल्यानुसार त्यांचा पाय त्या मोठ्या शिळेला लावतात आणि काय आश्चर्य त्या शिळेतून एक स्त्री बाहेर पडते.
"उठ माते",श्रीराम म्हणतात.

देवी अहल्या श्रीरामांना वंदन करतात.
"हे श्रीरामा आज मी धन्य धन्य झाली आहे. आज एवढा काळ मी ज्याची वाट बघत होते ते आपले पावन चरण स्पर्श मला लागले आणि मी श्राप मुक्त झाले."

गौतम ऋषि सुद्धा तिथे प्रकट होतात व ते सुद्धा श्रीरामांना अभिवादन करतात.
गौतम ऋषि देवी अहल्येला घेऊन पुन्हा हिमालयाकडे प्रस्थान करतात व श्रीराम लक्ष्मण विश्वामित्रांसोबत मिथिलेत प्रवेश करतात.

(रामायणात पुढे काय घडते ते पाहू उद्याच्या
भागात. जय श्रीराम🙏)

*********************
रामा, चरण तुझे लागले
आज मी शापमुक्त जाहले

तुझ्या कृपेची शिल्प-सत्कृति
माझी मज ये पुन्हां आकृति
मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाऊले

पुन्हा लोचना लाभे दृष्टि
दिसशी मज तू, तुझ्यात सृष्टि
गोठगोठले अश्रू तापुन गालावर वाहिले

श्रवणाना ये पुनरपि शक्ति
मना उमगली अमोल उक्ति
"ऊठ अहल्ये" असे कुणीसे करुणावच बोलले

पुलकित झाले शरीर ओणवे
तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे
चरणधुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागले

मौनालागी स्फुरले भाषण
श्रीरामा, तू पतीतपावन
तुझ्या दयेने आज हलाहल अमृतात नाहले

पतितपावना श्रीरघुराजा!
काय बांधु मी तुमची पूजा
पुनर्जात हे जीवन अवघे पायावर वाहिले
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED