Geet Ramayana Varil Vivechan - 45 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 45 - शेवटचा कर विचार फिरुनी एकदा

रामांनी समजवल्यावर सुग्रीवाला आपली चूक उमगते. रामांच्या सांगण्यानुसार सुग्रीवाने सगळ्या वानर सेनेला पाचारण केले आणि श्रीरामांनी जी युद्ध योजना आखली होती ती समजावून सांगितली. आता युद्धाला सुरू करणार तत्पूर्वी रामांनी राज धर्माला अनुसरून वालीपुत्र अंगदाकरवी रावणाकडे एक निरोप पाठवला.


"अंगदा! त्वरित रावणाकडे जा आणि एकदा पुन्हा विचार कर असे रावणाला जाऊन सांग.",असे म्हणून श्रीरामांनी अंगदकडे निरोप दिला तो अंगद ने लंका दरबारी जाऊन रावणासमोर सांगितला.


अंगद रावणाला म्हणाला,


"रावणा!लंकानगरीच्या प्रवेश द्वारावर श्रीराम आपल्या वानर सेनेसह समुद्र ओलांडून उभे ठाकले आहेत. अजूनही एकदा विचार कर,राघवास शरण जा आणि हे युद्ध होणे टाळ. ब्रम्ह देवाच्या आशीर्वादाने तू बलशाली झाला पण त्या बळाचा तू दुरूपयोग केला. सगळ्या पृथ्वीवरील माणसांना तू त्रास दिला. देवलोक,नागलोक,अप्सरा ह्यांना सुद्धा त्रास द्यायला कमी नाही केलंस तू. परंतु तुझा उन्मत्तपणा संपवायला शूर राम आता आलाय. तो तुझा निर्वंश करून टाकेल, तुझं राज्य,तुझी सत्ता नेस्तनाबूत करून टाकेल.


बघ ऐक त्या अफाट वानर सेनेने केलेला शंख नाद त्या प्रचंड आवाजाने सगळी लंका हादरली आहे. युद्ध आरंभशील तर तुझ्या राक्षस कुळाचा नाश अटळ आहे. अजूनही तुला तुझी घृणास्पद लालसा सोडवत नाही?


रावणा तुझा काळ जवळ आला आहे. अंतसमयी तरी तुझा मूर्खपणा सोड. राघवांना त्यांची मैथिली परत कर. त्यांना शरण जा व होणारा विनाश टाळ.",अंगद ने असे म्हंटल्यावर रावण त्याचे म्हणणे तुच्छतेने हसून धुडकावून लावतो.


"दूता मला वाटते तुझा राम मला घाबरला म्हणून वारंवार युद्ध टाळण्याच्या वार्ता करतो आहे. खरा योद्धा असशील तर शीघ्र अति शीघ्र युद्ध सुरू कर म्हणा. बघू कोण कोणाचा विनाश करतो ते? अहम ब्रम्हास्मी! हा! हा! हा!",रावण गडगडाटी हसत अंगदाला म्हणतो.


त्यावर अंगद रावणाला म्हणतो,"ठीक आहे रावणा! रामांच्या हातूनच तुझा मृत्यू योजला गेला असेल तर काहीही होऊ शकत नाही. फक्त आता युद्धाच्या वेळी मायावीपणे वागून मागे हटू नको. रामाच्या बाणानेच तुला आता मोक्ष प्राप्त होईल.


युद्धात रणनीती नेच वाग. छलकपट करून जसे रामाच्या सहचरिणीला पळविले तसे मायावी खेळ युद्धभूमीवर खेळू नको. आमच्या कडून येणाऱ्या वज्राला बाणाने उत्तर दे आणि पर्वताला गदेने उत्तर दे. शस्त्राचे उत्तर शस्त्रानेच दे मायावी अस्त्र वापरू नको. ते युद्धनीतीला धरून नाही. ह्या युद्धाने तर तुझा नाश होईलच पण पृथ्वीवर कोणीही तुझे नाव मानाने घेणार नाही. तुझा भाऊ तुझ्यापेक्षा सुज्ञ व विवेकी निघाला त्याने वेळीच रामांना शरण जाऊन त्यांच्याशी मैत्री केली. तुझ्या पश्चात आता तोच लंकाधिपती होणार आहे.",अंगदने असे म्हणताच रावण क्रोधातिरेकाने बेभान होतो व अंगद ला जबरदस्त शिक्षा करण्याची आज्ञा करतो त्यावर चतुर अंगद म्हणतो,


"हे लंकेश आपण मला अवश्य शिक्षा करा पण मला शिक्षा करणारा मला तुल्यबळ तर असला पाहिजे. हे पहा मी माझा डावा पाय इथे जमिनीवर ठेवला आहे तो जो कोणी उचलेल तो मला शिक्षा देऊ शकतो.",असे म्हणून अंगद डावा पाय समोर जमिनीवर ठेवून उभा राहतो.


ते पाहून रावणाला तो अंगदाचा मूर्खपणा वाटतो. त्याला वाटते हा मामुली वानर असा काय मोठा शक्तिशाली असणार आहे. असे वाटून तो त्याच्या सभेतील एकेका व्यक्तीला अंगद चा पाय उचलण्यास पाठवतो पण कोणीही अंगद चा पाय तसूभरही हलवू शकत नाही. सगळ्यांच्या तोंडाला फेस येतो पण अंगद चा पाय कोणीही उचलू शकत नाही. जेव्हा सगळेच अपयशी ठरतात तेव्हा रावण स्वतः त्याचा पाय उचलायला येतो तेव्हा अंगद म्हणतो,


"हे लंकेश आपण माझ्या पायाशी झुकणे योग्य नाही आपण रामांच्या पायाशी झुकणेच योग्य आहे.",असे म्हणून तो रावणाचा निरोप घेऊन लंका राज्यसभेतून पुनः रामांजवळ येतो.


{ह्या प्रसंगातून रामांचा संतुलित स्वभाव आपल्याला कळून येतो. त्यांनी शेवटपर्यंत युद्ध टाळण्याचाच प्रयत्न केला पण विकारांध रावणाने काही ऐकले नाही. ह्यातून आपल्याला असा बोध घेण्यासारखा आहे की कितीही बिकट परिस्थिती असली तरी मन संतुलित ठेवून धर्माने वागणेच श्रेयस्कर ठरते.}


(रामकथेत पुढे काय होईल जाणून घेऊ उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)



कवी ग.दि. माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे पंचेचाळीसावे गीत:-



जा, झणि जा, रावणास सांग अंगदा

शेवटचा करि विचार फिरुन एकदा


नगरद्वारिं राम उभा सिंधु लंघुनी

रणरागीं वानरगण जाय रंगुनी

शरण येइ राघवास सोडुनी मदा


वरलाभें ब्रह्माच्या विसरुनी बला

पाप्या, तूं पीडिलेंस अखिल पृथ्विला

छळिसी तूं देव, नाग, अप्सरा सदा


उतरविण्या गर्व तुझा ठाकला उभा

शौर्याचा सूर्य राम, सैन्य ही प्रभा

जाळिल तव वंश, सर्व राज्य-संपदा


शंखनाद ऐक, देख धरणिकंप ते

तुजसाठीं राक्षसकुल आज संपते

अजुन तरी सोड तृषा तव घृणास्पदा


अंती तरि सोड मूढ वृत्ति आपुली

परतुन दे राघवास देवि मैथिली

शरणागत होइ त्यास, टाळ आपदा


स्थिर राही समरीं रे समय जाणुनी

जातिल तुज रामबाण स्वर्गि घेउनी

वाट उरे हीच एक तुजसि मोक्षदा


नातरि बल मायावी दाव संगरीं

ज्यायोगें हरिली तूं रामसहचरी

वज्राप्रति भिडव बाण, मेरुसी गदा


नामहि तव भूमीवर कठिण राहणे

आपणिली रामकृपा सुज्ञ विभिषणे

लंकेच्या भूषवील तोच नृपपदा

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED