कामीनी ट्रॅव्हल - भाग ५ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ५


कामीनी ट्रॅव्हल्स भाग ५वा


मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धनच्या स्थळाला होकार दिला आहे.आता पुढे काय घडेल बघू.

साखरपुड्याआधी पटवर्धनांच्या घरी पाटणकरांना रितीनुसार घर बघायला बोलवलं. प्राची आणि तीचे आई-बाबा सगळे पटवर्धनांच्या घरी पोचले. घराचं गेटच शानदार होतं. खूप वजनी आणि छान कलाकुसर केलेली होती दारावर. वाॅचमननी दार उघडलं.‌त्यानी दार उघडताच कुत्री भुंकायला लागली.त्यांना बघून तिघही घाबरले. वाॅचमन म्हणाला "घाबरू नका बांधलंय त्यांना."


तो त्यांना आत घेऊन गेला.ती एक छोटीशी वेटींग रूम होती.त्यांना तिथे बसायला सांगून वाॅचमन आत गेला.वेटींग रूमचं छान इंटीरियर केलेलं होतं. पाचच मिनीटात वाॅचमन बाहेर आला.वेटिंगरूमच्या डाव्या बाजूला असलेलं स्लाईडींग डोअर त्यांनी उघडलं आणि आत बसा सांगीतलं. ते दार ऊघडेपर्यंत ते दार आहे हेच तिघांच्या लक्षात आलं नव्हतं.


तिघही आत गेले. आणि हाॅलचं इंटीरियर बघून चकीत झाले. गेटपासूनच पटवर्धनांची श्रीमंती दिसत होती. वेटींग रुम आणि हाॅल दोन्हीकडचे इंटीरीयर मधे भडकपणा नव्हता पण एक श्रीमंतीचा लुक होता.हे प्राचीच्या लक्षात आलं. तिघही चुपचाप सोफ्यावर बसले.तेवढ्यात बाईंनी पाण्याचा ट्रे आणून टेबलवर ठेवला. तिनी घातलेली साडी, तिची राहणी बघून वासंतीच्या मनात आलं बापरे केवढी महाग साडी नेसली आहे. कामवाली बाई एवढी अपटूडेट राहते. बरं झालं प्राचीला पसंत केलं पटवर्धनांनी. प्राचीला एकदम हायफाय राहता येईल.


अशोकच्याही मनात वासंती सारखेच विचार चालू होते. प्राची श्रीमंत घरी जाणार म्हणजे तिच्या नशीबी तडजोड,काटकसर हे येणार नाही. आपलं आयुष्य काही कवड्या जपून ठेऊन खर्चाचा विचार करत राह्यलो. प्राचीच्या बाबतीत असं होणार नाही.मनात आलं की ती वस्तू हजर होईल.आनंदानी अशोक गालातल्या गालात हसला.


प्राचीच्या डोक्यात वेगळे विचार चालू होते. घर सुंदर आहे पण मुलगा असा का? तिला खरं काय ते कळत नव्हतं.तिघही आपल्या विचारात होते तेवढ्यात पांढरा चुडीदार आणि सोनेरी रंगाचा झब्बा घालून भय्यासाहेब आले. त्यांच्या चालण्यात प्राचीला उद्धटपणा जाणवला. मी म्हणजे कोण हा भाव त्यांच्या चेह-यावर आहे असं तिला जाणवलं. मुलीकडची बाजू म्हणून अशोक वासंती अगदी अजीजीने पटवर्धनांशी बोलत होते.


जुजूबी गप्पा चालू होत्या.प्राचीला त्यात फार इंटरेस्ट नव्हता. थोड्यावेळानी वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थांनी भरलेल्या प्लेट्स बाईंनी टीपाॅयवर आणून ठेवल्या.नंतर हळूच प्राची कडे बघून गालातच हसली. प्राचीही हसायचं म्हणून हसली. त्या ककामवालीच्या हसण्यात काय दडलंय वगैरे विचार प्राचीच्या मनात आले नाहीत. पटवर्धनांच्या आणि आपल्यात आर्थिकदृष्ट्या जमीन अस्मानाचा फरक आहे हे तिच्या लक्षात आलं. आईबाबांनी हे स्थळ पसंत करण्याचं साहस कसं केलं. याचं प्राचीला आश्चर्य वाटत होतं.


एवढं फराळाच़ कोण खाणार असा प्रश्न तिघांनाही पडला. "जावई बापू नाही दिसत?" अशोकनी विचारलं.


"हां तो जरा बाहेर गेलाय.येईल." आपली होणारी बायको आज घरी येणार आहे आणि हा प्राणी बाहेर गेला. प्राचीला जरा खटकलच. "विमल" भय्यासाहेबांनी हाक मारली."जी." विमल आत आली."अग हिची पूजा आटोपली असेल तर बोलावलंय बाहेर म्हणून सांग." त्या कामवालीशी बोलताना मय्यासाहेबांचा सूर एकदम मालकासारखा लागला होता. "व्हय जी" म्हणून विमल आत गेली.


थोड्यावेळानी कामीनीबाई बाहेर आल्या आणि त्यांनी नमस्कार केला."बसा"करड्या आवाजात भय्यासाहेब म्हणाले. त्या घाबरतच बसल्या. मोलकरणीसारखच बायकोशी पण हा माणूस असं बोलतो. प्राचीला खूप आश्चर्य वाटलं. वासंती आणि प्राची कडे बघून कामीनी बाई कसंनुसं हसल्या. प्राचीला या मायलेकाचं कोडं काही उलगडत नव्हतं. ती त्यांचं निरीक्षण करीत होती. फक्त भय्यासाहेबच बोलत होते. अशोकचं मधून मधून "हंहं" चालू होतं वासंती फक्त ऐकत होती.कामीनीबाईंची नजर कुठे गुंतली होती तेच कळत नव्हतं.


जरावेळानी "नीघतो" असं अशोक म्हणाला. यावर


" ठीक आहे. रवीवारी भेटू हाॅलवर. काय प्राची ठीक नं" प्राचीला भय्यसाहेबांनी विचारलं आणि तिच्याकडे त्यांनी असं काही बघीतलं की प्राचीला थीजल्यासारखं वाटलं. मानेनीच तिनी ठीक आहे सांगीतलं.


पटवर्धनांकडून बाहेर पडल्यावर वासंती आणि अशोक त्यांच्या श्रीमंतीची आणि त्यांच्या घराचं कौतुक करण्याचं थांबतच नव्हते. प्राचीला त्यांचं इतकं उत्साहीत होणं आवडतं नव्हतं. ती काही न बोलता कानात बोटं घालून बसली होती. वासंतीचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिच्या कानातले बोट काढत वासंती तिला म्हणाली " ऐ अशी काय कानात बोटं घालून बसली आहे."


"आई किती त्यांच्या श्रीमंतीचं आणि घराचं कौतुक करायचं. कंटाळा आला ऐकून म्हणून कानात बोटं घालून बसली आहे." तिच्या या बोलण्याचा अशोक आणि वासंतीला राग आला.


आज सकाळपासून पाटणकरांकडे गडबड सुरू होती.बघता बघता मधले सहा-सात दिवस कापरा सारखे उडाले आणि आज रवीवार साखरपुड्याचा दिवस उजाडला. साखरपुडा संध्याकाळी होता. परवाच प्राची राधाबरोबर पार्लर मध्ये जाऊन आली होती. राधा तिची जिवलग मैत्रीण असल्याने तिला बोलवावच लागणार होतं. आता वासंतीला भीती नव्हती कारण साखरपुड्यापर्यंत लग्नाची गोष्ट पुढे सरकली होती. आधी प्राचीचा नकार बघतांना राधा तिच्याजवळ नको असं वासंतीला वाटत होतं.


दुपारी सगळे हाॅलमध्ये पोचले. हाॅल तिथल्या माणसांनी छान सजवला होता. पार्लरवाली साडेचार पर्यंत येणार होती. राधा छान नटून आली होती. प्राचीची हेअरस्टाईल कोणती करायची हे सगळं आधी ठरलं होतं.हे तिचं हाॅलवर पोचले त्याचवेळी राधा पण पोचली. प्राचीच्या चेह-यावर खूप आनंद दिसत नव्हता.राधानी तिला सांगीतलं " प्राची तू आनंदात नसलीस तरी तू आनंदात आहेस असं दाखवावं लागेल कारण आज तुझा साखरपुडा आहे.सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर असतील."


"मग मी आनंदी नसतानाही हसत राहू?" "अर्थातच. तुझा दु:खी चेहरा बघून लोकांना शंका येईल. वाटेल तुझ्यावर जबरदस्ती करतात आहेत तुझे आई बाबा." "मग तेच तर खरं आहे.पण मीही तडजोड करायचं ठरवलं आहे म्हणून हा साखरपुडा होणार आहे." "बाई नको वाद घालू. शहाण्यासारखी रहा, चेहरा हसरा ठेव."


"राधा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो नं तेव्हा ते मोलकरणीशी ज्या पद्धतींनी बोलले त्यांचं पद्धतींनी आपल्या बायकोशी पण बोलले.याचं आश्चर्य वाटतं मला. बायको आणि मोलकरणीला एकाच तराजुत तोलतात बहुदा." "अगं काही लोकांची सवय असते अशी.म्हणून दोघं घाबरत असतील त्यांना." राधाच्या या बोलण्यानी प्राचीन काही समाधान झालं नाही.


पार्लर वाली आली तशी राधा प्राचीला हळूच म्हणाली."आता तो विषय नको.पार्लरवाली थर्ड पर्सन आहे.ऊगीच तिच्यासमोर चर्चा नको.काहीतरी चांगलं आवडतं गाणं म्हण मनात म्हणजे तुझा चेहरा चांगला दिसेल." प्राचचीनी मान हलवून हो म्हटलं.


पार्लर वालीनी आपली बॅग उघडली आणि सुरवातीला प्राचीची हेअरस्टाईल कशी करायची ठरली होती तशी करायला सुरुवात केली. राधा बाजूला बसून बघत होती.


हाॅलमध्ये हळुहळू लोक येऊ लागले.अशोक आणि वासंती ची एकच गडबड उडाली होती.तेवढ्यात पटवर्धनांकडची मंडळी आली. त्यांचं स्वागत अशोक आणि वासंतीनी केलं. दोन्ही पक्षी आजच्या कार्यक्रमाला गावातलीच मंडळी होती. एक तासांच्या कार्यक्रमाला बाहेरगावाहून कोणाला बोलावलं नव्हतं. अशोक आणि वासंतीच्या नात्यातील जे नातेवाईक आले होते त्यांना एवढ्या महागड्या हाॅलमध्ये यांनी कसा साखरपुडा ठेवला याचं आश्चर्य वाटलं.कारण अशोकची तेवढी ऐपत नव्हती.


कार्यक्रमाला सुरुवात झाली. राधा सारखी हर्षवर्धनकडे, त्याच्या आईकडे आणि वडिलांकडे बघत होती. राधाला प्राचीचं म्हणणं पटू लागलं होतं. ज्या मुलाचा साखरपुडा असतो तो किती उत्साहीत असतो. हा नुसताच शुन्यात नजर लावून बसल्या सारखा बसलाय. त्याची आईपण किती शांत आहे.वरमाय म्हणून काही तोरा नव्हता. कुणाशी बोलत नव्हत्या. कोणी नातेवाईक बोललेच तर तेवढ्यापुरता बोलत होत्या. सगळीकडे मुलांच्या वडलांचाच तोरा होता. सगळ्यात आश्चर्य तिला याचं वाटलं की मुलांचे कोणीच मित्र नव्हते. नाहीतर अश्या प्रसंगी मित्रांची काय धूम असते.


कार्यक्रम संपल्यावर फोटो वगैरे झाले नंतर जेवण होतं. तिथेही मुलाचे वडील सगळ्यांमध्ये फिरून चौकशी करत होते. राधा प्राची जवळ आतल्या खोलीत येऊन बसली. म्हणाली "प्राची मला तुझं म्हणणं थोडं थोडं पटतंय. हर्षवर्धनचा एक मित्र दिसत नाही साखरपुड्याला. बसलाय कसा बघ शुन्यात नजर लावून.असं बसतं का कोणी स्वतःच्या साखरपुड्याला?" " पटलं नं तुला पण आता जाऊ दे मी निर्णय घेतलाय हर्षवर्धनशी लग्नं करण्याचा.."


"प्राची आता एवढं पुढे आलोत आपण आता नको ते विचार आणू नको मनात." "राधा मनात आणलं तर मी काय आत्तासुद्धा लग्नं मोडू शकते."


"काय?" राधा जवळ जवळ ओरडलीच." राधा ओरडू नकोस. मी असं काही करणार नाही. मला माहिती आहे. आई बाबांनी किती कष्ट काढले. मला सगळं मिळावं म्हणून स्वतःची हौसमौज केली नाही. त्यांना माझं आयुष्य अश्या धकाधकीत आणि काटकसरीत जावं असं वाटतं नाही. म्हणून ते माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत."


"अगं पण म्हणून अश्या मुलांशी तुझं लग्नं लावायचो?"


"त्यांचं मन मला मोडायचं नाही. बघू काय नशीबात आहे. नातेवाईक आत्ता बोलतील नंतर पैशाचा रुबाब सगळ्यांना झुकवेल. सासू मला गरीब स्वभावाची वाटते. मी तिला समजून घेईन आणि नक्की काय प्राॅब्लेम आहे ते बघीन. तू नको काळजी करु राधा. मी पंधरा दिवसांपूर्वी तुझ्यासमोर कटकट करणारी प्राची नाही राहीली. त्या दिवशी त्यांच्या घरी गेल्यावर सासूशी ते ज्या पद्धतींनी बोलले फार वाईट वाटलं. चांगलं सरळ करते त्या म्हाता-याला." बोलतांना प्राचीनी मुठी आवळल्या होत्या. हे तिचं रूप राधाला नवीनच होतं.


दोन दिवसांनी राधाचा फोन आला "काय ग प्राची आला होता का फोन हर्षवर्धनचा?" " नाही. मला नाही वाटत तो फोन करेल." " मग तू कर ?" "बघते कल्पना वाईट नाही.पण त्याचा नंबर नाही माझ्याकडे." " त्यांच्या वडलांना लाव सांग त्यांच्याशी बोलायचय" " बघते फोन लावून." "तो काय बोलला सांगशील मला नाहीतर.."


"नाहीतर काय करशील? मी असं करु का मी शशांकलाच फोन करते." " ऐ गप्प बस.ठेवते फोन." शशांक राधाचा प्रियकर आहे.प्राचीला खूप हसू आलं.


प्राचीनी त्यांच्या घरच्या फोनवर फोन लावला. फोन कामवाल्या बाईनीच उचलला. " हॅलो कोण बोलतोय?" " मी प्राची बोलतेय हर्षवर्धनची होणारी बायको. मला हर्षवर्धनशी बोलायचय.देता का त्याला फोन." " हो देते." एवढं बोलून ती निघून गेली.थोड्यावेळानी फोनवर आवाज आला " हॅलो बोल प्राची मी भय्यासाहेब बोलतोय. कशी आहेस? साखरपुडा छान झाला. तू खूप सुंदर दिसत होतीस." प्राचीला त्यांचं बोलणं आवडलं नाही तिला कळत नव्हतं जिथे तिथे हा म्हातारा का धमकतो. "हर्षवर्धन कुठे आहे? मला त्यांच्याशी बोलायचय."


"अगं आधी माझ्याशी बोल मग देतो त्याला." " मला सहज बोलायचय हर्षवर्धनशी जर त्याला वेळ नसेल तर ठेवते फोन." "तुझी मर्जी हर्षवर्धन आत्ता तुझ्याशी बोलून शकेल असं वाटतं नाही." "ठेवते मग" एवढं बोलून प्राचीनी गादीवर फोन आदळला.


मनातच भय्यासाहेब चरफडले. पण लगेच स्वतःशी पुटपुटले प्राची लग्न होऊन तू घरी ये मग बघतो किती दिवस तू माझ्यापासून लांब राहशील.आणि स्वतःशीच हसले.


आता प्राचीला या म्हता-याची गाडी रूळावर आणण्याची घाईचं झाली होती. ज्याचं लग्न ठरलंय त्याला फोन द्यायचा तर आपणच बोलतो. या मायलेकांची काय कहाणी असेल? याची उत्सुकता प्राचीला लागली होती. आपलं आयुष्य खूप रहस्यमय होत चाललं आहे याची तिला कल्पना आली आणि भीतीऐवजी तिच्या अंगावर रोमांच उठले. आपल्या मीळमीळीत आयुष्यात आता खरी मजा येईल असं तिला वाटलं.


सुरवातीला तिला हे स्थळ पसंत नव्हतं. तसं अजूनही नाही पण आईबाबांचं बोलणं ऐकल्यावर तिनी तडजोड करायचं ठरवलं.नंतर त्यांच्या घरी गेल्यावर भय्यासाहेबांनी जी विचीत्र वागणूक आपल्या बायकोला दिली होती ते तिला अजीबात आवडलं नव्हतं.तसच सासूचा घाबरलेला चेहरा बघून तिला दया आली.तिच्या लक्षात आलं या मायलेकांची या राक्षसाच्या हातून सुटका करायला हवी.अजून तिला पूर्णपणे माहित नव्हतं की हर्षवर्धन असा का वागतो.पण माणूसकी म्हणून तिला त्या दोघांची दया येत होती.


वासंतीला प्राचीच्या खोलीबाहेर आलेलं बघून अशोक नी विचारलं" काय ग ताप नाही नं प्राचीला?" " नाही."


" मग अशी अवेळी का झोपली?" " अहो लग्नं ठरलं की मुली आनंदीत होतात पण माहेर आता परकं होईल म्हणून थोड्या हळव्या होतात." " गावातच सासर आहे. एवढं हळवं कशाला व्हायचं?" " तुम्हाला नाही कळणार. तुम्ही कुठे तुमचं घर सोडून आलात? आम्ही बायका आमचं घर, आमची माणसं, आमच्या सवयी सगळं माहेरी ठेवून येतो. तुम्हाला एकदिवस नेहमीच्या जागी झोपू नका म्हटलं तर जमतं का?" " अगं झोप नीट नाही लागत.दुसरं काही कारण नाही."


"होनं.मग पंचवीस सव्वीस वर्ष ज्या जागी झोपायची आम्हाला सवय असते ती एक,दोन दिवस नाही नेहमीसाठी बदलावी लागते. सांगा बरं कशी एकदम दुस-या ठिकाणी झोप येईल.?" "बरोबर बोलतेस. "नातेवाईकांचे पत्ते लिहीलेली वही आहे नं?" "हो जसे जसे पत्यांचे मेसेज येत आहेत मी उतरवून ठेवते आहे. एकदा पोस्टात जाऊन बरीचशी तिकीटे घेऊन या. एक चांगला पेन घेऊन या." " हो ऊद्या जातो पोस्टात."


" माने काकू म्हणत होत्या एकदम एका दिवशी खूप पत्रीका पाठवू नका गहाळ होतात. दहा वीस अश्या पाठवा"


प्राचीच्या डोक्यात काय शिजत होतं हे कोणालाच कळलं नव्हतं अगदी राधालासुद्धा. हा मुलगा नको म्हणणारी प्राची अचानक कशी तयार झाली हे त्यामागचं कारण कळूनही राधेला पुरेसं उमजत नव्हतं. प्राचीनी पुढे काय करायचं आपल्या मनात आहे हे तिनी राधाला सांगीतलं नव्हतं. प्राचीच्या मनातलं ती पुढे कशी वागते त्यातूनच दिसणार होतं.


--------------------------------------------------------------


क्रमशः


लेखिका...मीनाक्षी वैद्य.