Aatmvishwas books and stories free download online pdf in Marathi

आत्मविश्वास


आत्मविश्वास ढासाळायला लागतच काय ? काळीज पिळवटून टाकणारी एक घटना.. काळजाच्या आरपार घुसणार एखाद वाक्य.. जवळच्याने केलेला विश्वासघात.. सर्वांसमोर झेलावा लागणारा अपमान. एक क्षण पुरेसा असतो , एखाद्याच खच्चीकरण व्हायला पण तोच आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी , पुन्हा त्याच आत्मिक पातळीवर , वैचारिक पातळीवर पोहचण्यासाठी मात्र खूप काळ लागतो. (पण प्रत्येकाला त्यातून बाहेर पडताच येईल अस नाही.) एक संघर्ष करावा लागतो काल आणि आज मध्ये.. सतत द्वंद्व धुमत राहत बुद्धी आणि मन यामध्ये. सकारात्मकता आणि नकारात्मकता यांचे पारडे वर खाली होत राहते. मी चांगला कि वाईट ? मी चूक कि बरोबर ? मी मूर्ख कि हुशार ? अशा किती तरी उत्तर नसलेल्या प्रश्नांभोवती घोळत राहत मन. आणि आपल्याच नकळत फसत जातो आपण एका दलदलीत. अडकत जातो एका ‘अनिश्चित अविचारित’ डबक्यात. तिथून बाहेर पडण अवघड होत. भीती वाढत जाते. अशा वेळी इतरांच्या सोडाच पण स्वतःच्या नजरेला नजर देन हि जमेनास होत. आता स्वतःच मन स्वतःवर संशय घ्यायला सुरुवात करत. आणि जिथे स्वतः स्वतःच्या क्षमतांवर संशय घेतला जातो.. तिथे काहीच साध्य होत नाही. आपली अवस्था एका चावी हरवलेल्या कुलुपासारखी होवून जाते. आपल्यातली ताकत, क्षमता आपल्यालाच दिसेनासी होते. आणि हळू हळू आपल्याला त्याची सवय होत जाते. आपल्या बुद्धीला , मनाला गंज चढायला लागतो. आणि एक दिवस आपण अडगळीच सामान होवून जातो. अशी असंख्य माणस रोज हरताना दिसतात. विद्यार्थी फेल झाले म्हणून आत्महत्या करतात , कुणी प्रेम नाही मिळालं म्हणून , कुणी बिसनेस लॉस झाला म्हणून... अनेक कारण आहेत. कुणालाही मरण प्रिय नसत.पण त्या व्यक्तीची मानसिकता सर्व आजूबाजूच्या गोष्टीमुळे इतकी तळाला गेलेली असते कि मरण्याशिवाय पर्याय नाही असच वाटत राहत. शेवटी प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. सगळ्यांनाच नाही जमत बिनधास्त मोकळ जगायला. काही भित्रे हि असतात. काही नुसताच विचार करून करून मरणारे हि असतात. जितकी माणस तितक्या प्रकृती. पण या सगळ्याला आपण तर नकळत पणे जबाबदार नाहीत ना ? हे तपासायला हव.. आपल्या बाजूला किती तरी जन असे असतात जे काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतात.. आणि सुरुवातही करतात. पण आपण जातोच ना फुकटचे सल्ले द्यायला. ‘ अरे हे होत असत का ? वेडा आहेस का ? हे काय फालतू काम करतोस ? तुला काहीच येत नाही. तु नेहमी फेल होतोस.. आताही होशील. दे सोडून. अरे हे आपल्या गरीब , मिडल क्लास लोकांच काम नाही. फार मोठी स्वप्न पाहू नयेत, खरी होत नसतात.. वगैरे वगैरे...’ आपण एखाद्याला प्रेरणा देवु शकत नसू तर कमीत कमी त्याचा त्याच्या पायांवर चालण्याचा विश्वास तरी हिरावून घेवू नये. एखाद्याला उठवण्यासाठी हात देवू शकत नसू तर त्याला पाडण्यासाठी खड्डे तरी खोदु नयेत. समाज म्हणून आपण एवढ तरी नक्कीच बदलू शकतो.


...जेव्हा कुणी तुमच्या क्षमतेवर बोट ठेवेल तेव्हा दुर्लक्ष करा. लोकांना तुमच्या बद्दल काय वाटत यापेक्षा , तुम्हाला तुमच्या बद्दल काय वाटत हे खूप महत्वाच आहे. जेव्हा सगळे तुम्हाला वेड्यात काढत असतील.. तेव्हा आपल्या मतावर ठाम राहा. कदाचित इतरांच्या दृष्टीने , किंवा समाजाच्या दृष्टीने तुम्ही अपयशी ठरला असाल. पण वैयक्तिक पातळीवर तुम्ही खूप प्रगती केलेली असू शकते. एखाद्याला ५०,००० चा जॉब लागला आणि तुम्हाला २०,००० चा म्हणजे तुम्ही अपयशी आहात अस होत नाही. एखाद्याने वयाच्या २५ व्या वर्षीच बिसनेस उभारला आणि तुम्ही ४० शी ओलांडली तरी नाही करू शकलात याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात असा नाही. तुमच्या x च लग्न झाल आणि तो खुश आहे , पण तुम्ही तिशीचे होवूनही एकटे आहात म्हणजे तुम्ही अपयशी आहात अस नाही. कुणीतरी स्वतःच्या पैशाने आई वडिलांसाठी घर , गाडी घेतली , परदेशी ट्रीप केल्या आणि तुम्ही अजून सेटल च झाला नाहीत म्हणजे तुम्ही अपयशी आहात अस नाही. एकच नियम सर्वाना लागू होत नाही. ‘प्रत्येकाचे आयुष्य , परिस्थिती , शारीरिक आणि मानसिक क्षमता , आजूबाजूचे वातावरण , विचारसरणी, सगळ भिन्न आहे.. मग रिझल्ट सारखा कसा असेल ?’ स्वतःची तुलना फक्त स्वतःशीच करा. स्वतःवर विश्वास ठेवा. भलेही सगळी दुनिया नाव ठेवेल पण तुमचा आत्मविश्वास डगमगू देवू नका. कारण ‘यश हे एक युद्ध आहे स्वतःच परीस्थितीशी, समाजाशी , आपल्याच विरोधात असलेल्या आपल्या लोकांशी. आणि हे युद्ध जिंकायचं असेल तर तुम्हाला स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर , स्वप्नांवर , विश्वास ठेवावा लागेल..आणि प्रयत्न करत राहावे लागेल तरच तुम्ही जिंकू शकता. आणि त्यासाठी गरजेच आणि सर्वात महत्वाच शस्त्र आहे आत्मविश्वास!’

- साधना वालचंद कस्पटे. ©





ReplyForward

इतर रसदार पर्याय