brunhatya books and stories free download online pdf in Marathi

भ्रृणहत्या

भ्रृणहत्या(कादंबरी)

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०



मुल पाहिजे हो अशी आर्त हाक काही लोकांची ऐकायला येत असते.काही जण तडफडत असतात मुलं व्हावी म्हणून.पण त्यांना मुलं होत नाही.मग मुलं व्हावी म्हणून देवाला नवश कबूल करणे सुरु असते.अशातच एखाद्या वेळी ती घटना झालीच आणि मुल झालंच.तर त्या घटनेस देव पावला असं समजून मग हा नवश पूर्ण करण्यासाठी ज्या देवासाठी तो नवश केला,तो नवश पूर्ण करतांना देवाला कोंबड्या बक-याचा बळी देण्याची प्रथा.ज्या कोंबड्या बक-याचा काहीही दोष नाही.काही लोकं नवश म्हणून कानोबा मांडू,फुलोरा ठेवू.गणपती मांडू.तरीही हे नवशं पूर्ण होत नाहीत.अर्थात मुलंच होत नाहीत.मग शेवटी हा भाग नशीबावर सोडून आपल्या नशीबातच नाही असं समजून लेकरु होण्याचं नावच सोडून देतात.ते मग नाईलाजानं प्रकृतीला स्विकारतात व दत्तक मुलं विकत घेवून बाळाचं स्वप्न पूर्ण करतात.काही तर टेस्ट ट्यूब बेबी ही करुन मुलं जन्माला घालत असतात.
निसर्गाच्या या चक्रात कोणाला जास्त मुलं होतात.तर कोणाला अजिबात होत नाही.काहींना लग्न न करता कुवारपणीही मुलं होतात.
ज्या मुलींना प्रेमप्रकरणातून कुवारपणी गर्भ राहतो.तो गर्भ राहिला हे माहित पडताच भीती आणि धाकानं सर्वात प्रथम त्या भ्रृणाची गर्भातच हत्या केली जाते.ती जर हत्या करता येणे शक्य असेल तर.......पण जेव्हा अशी हत्या करता येणे शक्य होत नाही.तेव्हा मात्र अज्ञात स्थळी अतिशय गुप्तपणे मुलींना ठेवून नवजात शिशूला जन्मास घातले जाते.मग हे जन्मास घातलेले बाळ.......त्या बाळाला शाप समजून तसेच आपली बदनामी होईल असे समजून त्या अर्भकाला जन्म झाल्यानंतर मारुन टाकलं जाते आणि त्याची विल्हेवाट नाल्यात किंवा विहीरीत किंवा कच-याच्या ढिगा-यात लावली जाते.कारण हेच कच-यात फेकलेले हे अर्भक खात असतांना जेव्हा कुत्री दिसतात.त्या कुत्र्याच्या तोंडात अर्भकाचा एक पाय दिसतो.तर हात पाय व पुर्ण शरीर बाहेर असतं.त्या बाकीच्या शरीराच्या अवशेषावरुन ते माणसाचंच अर्भक आहे हे सिद्ध होते.काही जण तर ते अर्भक चक्क जीवंत असतांना विहिरीत टाकून देतात.दोन तीन दिवसानंतर त्या अर्भकाचं शरीर जेव्हा पाण्यावर तरंगतं,तेव्हा ते अर्भकच आहे हे सिद्ध होतं.नाल्यातही टाकलेले अर्भक जेव्हा पाण्याच्या कडेला लागतं,तेव्हा त्याही अर्भकाचे काही अवयव नाल्यातील जीवजंतूंनी खाल्लेले असतात.मग विचार येतो की ज्याला लोकं देव म्हणतात.तो देव अशांना मुलं का देतो?ज्याला मुल नको असतं.अन् ज्याला मुल हवं असतं.त्याला का नवश करावे लागतात.अन् नवश केले तरीही मुलं होत नाहीत.
अलिकडे असे गुप्तपणे मायबापाला माहित न करता प्रेम करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत.त्यातच गर्भ राहिलाच तर त्याचा त्रास मुलींनाच होत असतो.तसेच मुले पळून जातात.तसेच मुलगी नको मुलगाच हवा याच अट्टाहासापायी गर्भलिंगनिदान करुन लपूनछपून भ्रृणाची तपासणी करण्याचे प्रकार सर्रास सुरू असून ते भ्रृण मुलीचे निघाल्यास चक्क त्याला मारुन गर्भपात करुन घेण्याचे प्रकार जास्त वाढलेले आहेत.मग असे गर्भातच भ्रृणाचे मरणे होत असतांना त्या परीवारात मुलंच गर्भात राहायला नको.तर ती मुलं ज्यांना मुलं होत नाहीत.जे मुलांसाठी तडपतात,त्यांनाच द्यायला हवी. काहींना एकापेक्षा जास्त मुलं होतात. तर काहींना एकही नाही. ज्यांना होतात, त्यांना मुलांची कदर नसते.
असंच ते एक गाव. मुलगी मारण्याचं सत्र त्या गावात सुरु होतं.अख्ख्या गावात लहान लहान मुली मारल्या जात असत.मुलींचा जन्म म्हणजेच अभिशाप होता.त्यामुळं मुलीचा वध करण्याची जी परंपरा होती.तिला कोणीही फाटा फुटू देत नसत.नव्हे तर कोणीच विरोध करीत नव्हता.
हुंडा देणे ही कुप्रथा अजूनही गावात सुरु होती.हुंड्यावर सरकारचे कायदे बनलेले होते.तरीही लोकं या कायद्याला जुमानत नसत.लोकं राजरोषपणे हुंडा वधूपक्षाला मागत असत.मग ऐपत नसतांनाही वधूपक्ष आपल्या लेकीच्या जीवासाठी हुंडा देतच असे.मनात इच्छा नसतांनाही वधूपक्षाला ते कृत्य करावंच लागे.कधीकधी विचार यायचा की या गोष्टीला विरोध करायचा.पण करणार कसा? कारण एखाद्यानं असा विरोध केलाच तर त्या गृहस्थाची मुलगी खपत नसे.अर्थात विवाह होत नसे.तसेच कितीही हुंडा दिला तरी वरपक्षाची भूक वाढतच असे.ते विवाहानंतरही पैसा मागतच असत.विवाहानंतर असा पैसा न मिळाल्यास राजरोषपणे अशा मुलींचा बळी घेत असत.मग डोळ्यादेखत जावयाच्या मागण्या पूर्ण न झाल्याने मुलीच्या बापाला आपल्या पोटच्या गोळ्याचा असा बळी पाहायला मिळत असे.म्हणूनच त्यामुळंच की काय, लोकं मुलीचा जन्म नाकारत.
असंच ते गाव.आज ते गाव विवाहानंतर आपल्या गावच्या मुलींना सासरी पाठवत नसे.तर त्याचे पती तिच्या माहेराला जावून राहात असत.वर मुलगा पाहायला आला की त्यांची अशी अटच असे की त्या वरानं वधूच्या माहेरी येवून राहायचं.जो तयार होत असे.तोच या गावची मुलगी मागत असे.अर्थात हे गाव घरजावई आणण्यात पटाईत होतं.
गाव तसं सुसंपन्न होतं.त्या गावात कशाचीही कमी नव्हती.लोकांकडे पशुधन,शेती सारं काही होतं.शिवाय भ्रृणहत्या,हुंडाबळीची समस्या मिटली होती.बलत्कारही गावात होत नव्हता.हे सारं चित्र त्या एका वकील मुलीनं बदलवलं होतं.जिचं नाव कोमल होतं.जी त्याच गावात जन्मली होती.लहानाची मोठी झाली होती.नव्हे तर शिकून वकील बनली होती.खरं तर तिच्या परीवाराला याच गावच्या लोकांनी छळलं होतं.म्हणूनच याच गावाला बदलविण्याच स्वप्न तिनं पाहिलं होतं.ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी ती लढली होती.आज ती जगात नव्हती.पण लोकं प्रामाणिकपणे तिची पुजा करीत होते.तिचे विचार अंगीकारून तिचा गौरव करीत होते.नव्हे तर आज तिच्या मृत्यूनंतर तिचा गावात पुतळा बसवून त्या पुतळ्याखाली तिचा इतिहास कोरला होता.ज्या इतिहासावरुन तिनं देशासाठीच नाही तर जगासाठी काय काय केलं.ते नोंद केलं गेलं होतं.
भरतपूर हे गावाचं नाव.त्या गावात नेहमी हुंड्यासाठी सर्रासपणे नववधू जाळल्या जात.मुलंही व्यसनाधीन होती.ती दिवसभर व्यसनं करायची व रात्रीला ती व्यसनं पुर्ण करण्याला हव्या असलेल्या पैशासाठी रस्त्यावर लुटमार करीत.चो-या करीत.तर दिवसाढवळ्या सर्रासपणे कोण्या तरुण मुलीवर बलत्कार करुन आपल्या वासना पुर्ण करीत.पोलिसही या गावातील अशा क्लृप्त्यावर वचक आणत नव्हते.कारण हे पोलिस त्या नेत्यांचे गुलाम होते.ज्या नेत्यांचा राजकारणाशी संबंध होता.राजकारण करीत असलेले मोठमोठे नेते त्याच्या ओळखीचे होते.
गावात जास्त शिकलेली मंडळी नव्हती.त्यांनी शिकूच नये म्हणून हा गावातील गुंड माणूस त्यांच्यावर दबाब आणत असे.त्यांना त्रास देत असे.नव्हे तर ती मंडळी जर शिकली तर आपल्यावर भारी पडेल याचा विचार करुन हा व्यक्ती त्यांचं व्यक्तीस्वातंत्र्य व मत प्रदर्शित करणारं स्वातंत्र्य हिरावून घेत असे.आपल्या गुंडांकरवी त्या व्यक्तीच्या घरातील तरुण मुलींना छळत असे.बलत्कार करवून घेत असे आणि ते पोलिस स्टेशनला गेलेच तर तिथे आपल्याविरुद्ध कोणत्याच स्वरूपाची नोंद होवू नये यासाठी प्रयत्न करीत असे.
या मुलींना गावातच छळलं पाहिजे असा त्या गुंड्याचा कयास नव्हता.त्या गुंडाचं नाव भानुदास होतं.जो व्यक्ती गावात त्याच्या विरोधात शिरजोर झालाच.अशाच्या लेकरांना परगावातील लोकांनाही छळायला लावत असे.त्यामुळं इथून विवाह होवून गेलेल्या मुलींवर सासरची मंडळीही कधी कधी त्रास देत असत.हुंड्यासाठी जीवही घेत असत.तर काही ठिकाणी या भानुदासची ओळखपाळख नसतांनाही हुंड्यासाठी या गावातील मुलींना ठार केले जात होते.
लोकांना कधीकधी मुलींचा जन्म नकोसा वाटत होता.कारण मुली झाल्याच तर आधी या गावातील तरुण मुलांच्या बलत्कारापासून वाचवावे लागायचे आणि एखादी वाचलीच तर तिचा विवाहानंतर हुंडाबळी म्हणून जीव जात असे.म्हणूनच की काय,गावची लोकं सर्रासपणे गर्भलिंगनिदान चाचणी करुन पोटातील भ्रूण मुलगा आहे की मुलगी हे तपासून पाहात असत.मुलगी असलीच तर सर्रास तिचा जन्म होवू नये म्हणून त्या गर्भाची धुलाई करुन टाकत असत.अशाच या गावात भीमराव आपल्या चार मुलासमवेत राहात होता.
भीमराव असाच गावातील एक गृहस्थ होता.त्याला तीन मुली होत्या व एक मुलगा होता.कांता,कोमल,नयना व रोहित अशी मुलांची नावं होती.त्यापैकी एक उपवर झाली होती.एकीचा विवाह झाला होता.तोही मोठ्या मुश्किलीनं.तिचा विवाहानंतरही छळ सुरुच होता.जावई या ना त्या कारणानं मुलीच्या बापाला पैशाची मागणी करीत होते.पण भीमरावजवळ आता पैसा नव्हता.
एक मुलगी लहान होती.ती शिकत होती.तर ज्या मुलीचा विवाह झाला होता.त्या मुलीच्या विवाहाच्या वेळी भीमरावनं आपली एक एकर शेती विवाह करायला पैसा नसल्यानं व वधूपक्षाची चांगलं लग्न केल्याशिवाय आम्ही विवाहास तयार नाही अशी अट असल्यानं त्याला एक एकर जागा विकावी लागली होती.
भीमरावजवळ मोठ्या मुलीचा विवाह करण्यापुर्वी चार एकर शेती होती.त्या चार एकर शेतीला तो त्याची माऊली मानत होता.त्यामुळं की काय,ती शेती मुलीच्या विवाहासाठी विकणे म्हणजे आपल्या आईला विकणे असं त्याला वाटत होतं.नव्हे तर त्याचा एक एकर तुकडा विकणे म्हणजे स्वतःच्या आईचेच तुकडे करुन विकण्यासारखे भीमरावला वाटत असे.पण वरपक्षाच्या इच्छेसमोर उपाय नव्हता.त्यामुळच की काय,मनात इच्छा नसतांनाही भीमरावला आपली एक एकर शेती नाईलाजानं विकावी लागली होती.
मोठ्या मुलीला वरपक्षांचा त्रास आहे असे ती वारंवार सांगत असे.पती आपल्याला नित्य पैशासाठी मारहाण करतो असं भीमरावला ती नेहमी सांगत असे.पण भीमराव हा मजबूर होता.तो तिला म्हणत असे,
"बाई दिल्या घरी त्रास सहन कर.हेही दिवसं निघून जातील.जर आपण जावयांविरुद्ध पोलिसात तक्रार केलीच तर उद्या आपली बदनामी होईल व तुझ्या दोन्ही बहिणींचे विवाह होणार नाही."
बापाच्या सांगण्यानं कांता चूप होती.ती बापाला शिकायतही करीत नव्हती.तसेच सासरकडील त्रास ती सहन करायची.हेही दिवसं निघून जातील या आशेनं.
वर्षा ऋतू नुकताच लागला होता.त्या मोसमात पिकांची पेरणी होणे महत्वाचे होते.दोनवर्ष भीमरावची शेती पिकली नव्हती.पहिल्या वर्षी सतत पावसामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालं होतं.तर दुस-या वर्षी निव्वळ कोरड्या दुष्काळानं शेत कोरडं पडलं होतं.मात्र अमदाचा काळ चांगला निघेल अशी आस बाळगून भीमराव शेती पेरणार होता.
वर्षा ऋतू जसा लागला.भीमरावसह सर्वांच्या मनात आशेची किरणं निर्माण झालीत.सुरुवातीला पाऊस पडायला लागला.तसा भीमरावसह सर्व शेतक-यांनी पेरणी करण्यासाठी बी विकत घेतलं.तसेच शेतीला लागणारी खतंही विकत घेतली.
पाऊस पडत होता.त्याचबरोबर जमीन ओली होत होती.जमीनीतील वाफ वर निघून गेली होती.तसा जमीनीत थंडावा निर्माण झाला होता.त्याचबरोबर परीसरातही थंडावा निर्माण झाला होता ग्रिष्माचा उष्मा शांत झाला होता.कमीतकमी सात आठ दिवस सतत पावसानं जमीन ही पेरणीयोग्य झाली होती.तसा आठव्या दिवशी पाऊस थांबला.
जसा आठव्या दिवशी पाऊस थांबला.तसा भीमराव आपली जमीन वखरु लागला.त्याच्या वखरण्याचं कारणही तसंच होतं.त्याचं कारण होतं,ते म्हणजे जमीन जरी उन्हाळ्यात वखरली असली तरी त्यावर काही प्रमाणात तणकट उगवलं होतं.ते तणकट नष्ट व्हावं यासाठी भीमरावला ती जमीन वखरणं आवश्यक होती.तशी जमीन वखरुन होताच भीमरावनं शेतात पेरणी केली.तसं दोनचार दिवसात अंकूरही वर येवू लागले होते.
ते हिरवे हिरवे अंकूर.......त्या अंकूराला स्वतःच्या लेकरागत भीमराव कुरवळायचा.त्याला हायसं वाटायचं.त्याचबरोबर त्या रोपांनाही हायसं वाटत असे.थोड्याच दिवसात ती रोप मोठी होवू लागली.त्या रोपाभोवताल फुलचूख्या फेर धरून नाचू लागल्या.त्याचं कारणंही तसंच होतं.त्या रोपांना आता फुले धरली होती.

भीमराव नेहमी शेतावर जात होता.त्याला त्या रोपाच्या सानिध्यात असतांना कंटाळा येत नसे.तासन् तास त्याला त्या रोपाचं निरीक्षण करण्याची सवय लागली होती.त्यातच ती रोपं त्याच्यासोबत बोलतच आहेत असंही त्याला वाटत असायचं.तो त्या पिकांच्या सानिध्यात असतांना देहभान विसरुन जायचा.तसा भीमराव खुश होता.कारण यावर्षी त्याचं पीक इतर वर्षीच्या मानानं चांगलं होतं.
हळूच त्या रोपांतील फुलांनी फळधारणा केली होती.तसं फुलचुख्यांचं प्रमाण कमी झालेलं होतं.त्यातच आता त्या पिकांवर अळ्या पडल्या होत्या.त्या अळ्या उभं पीक खायला लागल्या होत्या.त्यामुळं त्यांना मारणं आवश्यक होतं.
पिकांवर किटकनाशक फवारल्याशिवाय आपल्या हातात पीक येणार नाही असं भीमरावला वाटत होतं.पण तो तरी काय करणार.जर पिकांवर किटकनाशक फवारलं नाही तर तिकडूनही धोका होता.
भीमरावला विचार येत होता.ते जीव जंतू मारणे म्हणजे पापच नव्हे तर ही हिंसाच.त्या निष्पाप अळ्या.त्यांचा काय गुन्हा की त्या पिकांवर आल्या.त्यांनाही पोट आहे.त्या आपलं पोट भरण्यासाठी पिकांवर आल्या.त्यांचा कसा काय जीव घ्यायचा.पण उपाय नाही.आपण जर त्यांचा जीव घेतला नाही तर त्या आपला जीव घेणार.आपलं उभं पिक नष्ट होणार.काय करावं.तो विचार करीत होता.
शेती करणं हे सामाजिक काम आहे.शेतीत पिक पिकविणारे शेतकरी हे सामाजिक काम करीत असतात.त्यांनी जर शेतात काम केलं नाही तर जगातील लोकांचं पोटंच भरणार नाही.
शेतातील जीवजंतूमना मारणे ही हिंसा आहे.नव्हे तर त्या शेतातील अळ्या,त्या अळ्या निष्पाप असतात.जशी माणसाला भूक लागते.तशी त्या अळ्यांनाही भूक लागते.मग या अळ्या पिकांवर पडतात.त्या अळ्या पिकांवर पडून रोपांची विल्हेवाट लावतात.त्या अळ्या पिकांची पानं खातात.दाणे खातात.मग उभं पिक नष्ट होतं.
शेतक-यांना वेगवेगळा औषधोपचार करुन या अळ्यांना मारावंच लागतं.जर त्यांनी या अळ्यांना मारलं नाही.हिंसा होते असं जर समजलं तर या देशातील नव्हे तर जगातील लोकं कशी जगणार?
शेतकरी या अळ्या मारुन पापच करीत असतो.पण हे पाप कोणासाठी करतो.लोकांसाठीच ना.मग कोणी त्याला स्वार्थी समजत असतील तरीही त्याला ते पाप करणे आवडते.कारण त्या पापावरच त्याचं उद्याचं भविष्य अवलंबून असतं.
अशा जीवजंतूंना मारण्याची शिक्षा आपल्याला तसेच शेतक-यांना मिळतेही.शेतक-यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्याची ती म्हणजे शेती बंजर बनणे.त्याच्या शेतात पिक न पिकणे.दरवर्षी कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ पडणे.उभं पिक हातात येत असतांना सावकारी फटका बसणे एवढेच नाही तर पिक होवूनही मालाचा भाव उतरणे.मालाला योग्य भाव न मिळणे.
या अळ्या मारणं पाप जरी असलं तरी शेतकरी ते पाप करीत असतात.कोणासाठी तर समाजासाठी. तरीही त्याला समाज काय देतो? काहीच देत नाही.कारण समाज स्वार्थी आहे.
एक कथा प्रचलीत आहे.एकदा नारदमुनी रस्त्याने जात असतांना त्याला वाल्यानं अडवलं. म्हटलं,
'तुझ्याजवळ जेवढे काही असेल,तेवढे काढ.नाहीतर मी तुझा जीव घेवून टाकणार.'
त्यावर नारदमुनी म्हणाले,
'अवश्य घे.परंतू तू हे सगळं कोणासाठी करतोस?ते सगळं सांग.'
'मी हे सर्व,माझी पत्नी,माझी आई व माझ्या मुलांसाठी करतोय.'
'मग ते सर्व तुझ्या कार्यात सहभागी आहेत का?'
'का असणार नाही.शेवटी मी त्यांच्यासाठीच करतोय ना.'
'ठीक आहे.जावून विचार बरं.'
'ठीक आहे.पण मला ही तुमची चाल वाटते.तुम्ही मला कटविण्यासाठी असे बोलत असावे असे मला वाटते.'
'नाही,मी सत्यवचनी आहे.'
'तुम्ही पळून तर जाणार नाही.'
'नाही,मी पळूनही जाणार नाही. मी इथेच राहणार तू येईपर्यंत.तेव्हा तू लवकर घरी जा व घरी जावून आपल्या पत्नी आणि मुलाला विचार की ते तुझ्या कार्यात सहभागी आहेत का?'
वाल्या तसा दरोडेखोर.तो घरी गेला.त्यानं आपल्या आई,पत्नी व मुलांना विचारलं की ते त्यांच्या कार्यात सहभागी आहेत का? त्यावर त्यांनी चक्क नकार देत म्हटलं की ते त्याच्या कार्यात सहभागी नसून त्यांना पोषणं हे त्याचं कर्तव्यच आहे.
वाल्याला विचार आला.त्याला पश्चाताप झाला.मी दररोज जे कार्य करतो ते पापच.त्याला क्षमा नाही.मग मी जे कार्य करतो,ते कोणासाठी करावं? जर ते पापात सहभागी नाहीत.तो निराश झाला.तसा निराश मनानं तो नारदमुनींकडं गेला.त्याला घडलेला सर्व प्रकार सांगीतला आणि त्यावर उपाय विचारला.त्यावर नारदमुनींनी त्याला तपश्चर्या करण्यास सांगीतलं.
त्यानं प्रपंच,मोह,माया सगळं सोडून अरण्यात तपश्चर्या केली.त्यानुसार तो वाल्याचा वाल्मीक बनला.आता त्याला हिंसा ही आवडत नव्हती.कोणता जर पक्षी घायाळ झालाच तर त्याला वेदना होत असत.तो विव्हळत असे.
शेतक-यांचंही तसंच आहे.त्यालाही या अळ्या मारतांना विचार येतो की ही हिंसा.त्यालाही तपश्चर्या करावीशी वाटते.पण विचार येतो की आपल्यावर अवलंबून असणारे हे जीव........हा समाज.........या समाजात माझी कोणी आई आहे.माझे कोणी मुलं आहे.तर माझी एक पत्नीही आहे.तेव्हा या सर्वांना पोषणे माझे कर्तव्य आहे.त्याच लोकांना पोषण्यासाठी हे शेतकरी हत्या करीत असतात त्या अळ्यांची.त्यांना मनात इच्छा नसतांनाही मारत असतात किटकनाशकानं.कोणासाठी तर समाजासाठी..........
समाज त्यांना काय देतो? अनाठायी दुःख.त्यांच्या मालाला कमी हमीभाव.त्यांनी एखाद्यावेळी आंदोलन केल्यास त्यांचं आंदोलन चिरडून टाकलं जातं.
ज्या समाजाच्या घटकाला आमचा शेतकरी पोषतो.त्या समाजातील घटकांसमोर भाजीपाल्याचे थोडेसे दर जर वाढले,तर ते दर वाढलेले दिसतात.या समाजाच्या घटकांना गाड्या,टिव्ह्या,काँन्व्हेंटची फी,एसी,फ्रीज किंवा ऐषआरामाच्या वस्तूंचे भाव वाढलेले दिसत नाहीत.आमचं सरकारही शेतक-यांची दया घेत नाहीत.ते आमचं सरकारही पदोपदी आमच्या शेतक-यांच्या वाट्याला जात असतं.त्यांना दुर्बल करीत असतं दिवसेंदिवस.त्यांना निसर्गही दुर्बल करीत असतो.
सरकार मात्र ज्यांना कामात तेवढी संकट नसतात.ज्यांना उन्हातान्हात राबावं लागत नाही.ज्यांना सततचा पाऊस अंगावर झेलावं लागत नाही.ज्यांना अळ्या मारण्यासारखं पाप करावं लागत नाही.त्या सरकारी कर्मचा-यांना वेतन देतात.शेतक-यांची आंदोलनं चिरडली जातात.अन् कर्मचा-यांची आंदोलनं! त्या आंदोलनावर योग्य तोडगा काढला जातो.त्यांच्या त्या आंदोलनातून त्यांची पगारवाढ केली जाते.
महत्वाचं म्हणजे त्या सरकारी कर्मचा-यांना काय राबायला जावं लागते काय की पगारवाढ हवी.त्या सरकारी कर्मचा-यांना उन्हातान्हात घाम गाळावा लागतो काय की पगारवाढ हवी.त्यांना तर चक्क सावलीत खुर्चीवर बसून राहता येतं.त्यांना कोणत्याच साप आणि किड्यांची सतत भीती वाटत नाही.मात्र आमच्या शेतक-याला सतत सापासारख्या तर कधी वाघ सिंहांसारख्या हिंस्र प्राण्यांच्या सानिध्यात राहावं लागतं.हे सरकार जरी शेतक-याचं शत्रू वाटत असलं तरी आमचा शेतकरी तसा सरकारचाही शत्रू तसेच मित्र म्हणून भेदभाव न करता त्यांच्याही पोटासाठी राबत असतो दिवसरात्र.
सरकारनं या सर्व गोष्टीचा विचार करावा नव्हे तर मालाला योग्य भाव द्यावा.शेतक-यांनाही म्हातारपणात पेंन्शन द्यावी.शेतीत राबणा-या कास्तकारालाही पगार द्यावा.कारण तो उन्हातान्हात राबतो.तसेच आमच्या शेतक-यांनाही पगार द्यावा.मगच आमच्या मालाचे हमीभाव ठरवावे.सरकार जर पगार देत नसेल तर शेतक-यांच्या मालाचा हमीभाव ठरविण्याचा अधिकार सरकारला नाही.तो अधिकार फक्त शेतक-याला आहे.

भीमराव च्या मुलीला भयंकर त्रास होता.त्यालाही आपल्या मुलीला असा त्रास पाहून घरी आणावसं वाटत असे.पण तो हतबल होता.बाकीच्याही मुली त्याच्या उरावर ओझं बनूनच होत्या.त्यातील एक उपवरही.अशातच परीसरात एक घटना घडली होती.
तो दिवस सोमवार होता. सोमवारला एक अमानवीय घटना घडली होती.अशीच एक मुलगी पेट्रोल टाकून जाळली गेली होती.यात ती गंभीर जखमी झालेली असून तिला शहरामध्ये अॉरेंज सिटी इस्पितळामध्ये भरती केले होते.पीडीत युवती ही कोणत्यातरी महाविद्यालयात बॉटनी या विषयात प्राध्यापिका होती.यात एका व्यक्तीने तिचा पाठलाग करुन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यावर टेंभा फेकून जाळले होते व पळून गेला होता.आरोपी नंतर सापडला देखील.तसा भीमरावला विचार आला.
महत्वाचं म्हणजे काल हमला झाला एका मुलीवर.........आज आरोपी सापडणार.......उद्या खटला चालणार आणि मग आरोप सिद्ध झाल्यास फाशी.पण तरीही लोकं सुधारणार काय? ते सुधरायला तयार नाहीत.मग फाशी द्या की अजून काही.........
मागे काही दिवसापुर्वी पोलिसांनी जाळलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृत डॉक्टरची ओळख करुन घेवून तिच्या खुनातील चारही आरोपींना यमसदनास पाठवले.तसेच काही दिवसापुर्वी दिल्लीत निर्भया अशीच बसमधून फेकली गेली.तसेच इथून त्रेचाळीस वर्षापुर्वी अरुणा शानबाग नावाच्या नर्सवर बलत्कार केला.त्यात तिला गंभीररित्या धक्का पोहोचला आणि ती कोमात गेली.ती पुढे कोमातच मरण पावली.आरोपींनी जन्मठेप भोगली.त्यानं विवाहही केला.पण अरुणाला न्याय मिळाला काय?
काल असंच खैरलांजी घडलं.कोपर्डी घडलं.असे भरपूर प्रकार घडले बलत्काराचे.एकतर्फी प्रेम करण्यापासून होत असलेले बलत्कार नव्हे तर याच एकतर्फी प्रेमातून आज बलत्कार करुन जाळण्याचे प्रकार सध्या वाढत चाललेले आहेत.याला जबाबदार आहे लोकांची मानसिकता आणि इथलं वातावरण.
आम्ही वारंवार ओरडतो अमुक ठिकाणी बलत्कार झाला,जाळलं.पण खरंच आम्ही काय करु शकतो. फक्त ओरडू शकतो.त्यात बदल करु शकत नाही वा आरोपींना धडा शिकवू शकत नाही.कारण आम्ही फक्त बघ्यांची भुमिका घेतो.करत काहीच नाही.म्हणूनच आज आरोपी बिनधास्त गुन्हे करतात. कायद्यानुसारही अशा आरोपींना काहीही होत नाही.जर का आम्ही आमच्यावर अत्याचार करणा-या माणसाला धडा शिकवला आणि वेळीच जर अशा आरोपींना शिक्षा दिल्यास तो आरोपी आरोप करण्यापासून वंचीत होतो.
लोकांनी आपली मानसिकता बदलवली पाहिजे आताही.समाजात असे गुन्हे करणारे गुन्हेगार नेहमी भटकत असतात.त्यांना वेळीच लोकांनी जबाब दिला पाहिजे.प्रत्येकानं आपल्या घराजवळ,परिसरात,आजुबाजूला राहणा-या मुलींना बहिण आणि आई मानलं पाहिजे आणि मैत्रीही करीत असल्यास ती मैत्री निखळ असायला हवी.त्यात स्वार्थभावना वा वासनांधपणा नकोच.प्रेम करावे,करायला मनाई नाही,पण ते प्रेम एकतर्फी नसावं.वरुन प्रेम केल्यास स्वार्थ ठेवून करु नये.शिवाय प्रेम केल्यास आणि त्या युवतीला पसंत नसल्यास प्रेमवीरांनी त्या युवतीला सोडून द्यावं.
सुंदरता ही स्रीला दिलेली देण आहे.या सुंदरतेने येतांना भेदभाव केलेला नाही.एखादी सुंदर मुलगी दिसलीच,तर मानसिकतेची नजर विकृत व्हायला वेळ लागत नाही.त्यामुळं स्रीयांनी जपून वागावं.पण स्रीयांची जहाल मानसिकता.........स्रीयांना काही बोलू शकत नाही.स्रीयांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पुर्वी त्यांना डोळे आणि चेहरा झाकेल एवढा पदर घ्यावा लागायचा.पण आज तसं घडत नाही.पुर्वी लुगडे होते.आज पोशाखही बदलला.यामुळेच आज लोकांच्या भुरट्या नजरा......त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.यातच बलत्काराचे प्रमाण वाढले.
आम्ही आज दोष देतो स्रीयांनाच.म्हणतो की स्रीयांनी पोशाख बदलवला.स्रीयांनी मेकअप बदलवला.त्यामुळं लोकांच्या नजरा बदलल्या.पण याचा अर्थ स्रीयांनी स्वतःमध्ये परीवर्तन आणू नये काय? आम्ही म्हणतो स्रीयांनी प्रेम करु नये.सारीच बंधनं.केवळ स्रीयांसाठी........माणसासाठी काहीच बंधनं नाहीत का? अन् स्रीयांनी कमी कपडे घातले,मेकअप लावला, ती चांगली दिसते,म्हणून पुरुषांनी तिच्यावर प्रेम करावे.नव्हे तर तिनं नाही म्हणताच तिच्यावर पाशवी बलत्कार करावा नव्हे तर तिला जाळावं हे कितपत बरोबर आहे? यात पुरुषांचंच चुकतं.आजचा पुरुष हा स्रीयांना बहिण,आई मानायला तयार नाही.पुत्री तर नाहीच नाही.यातूनच बलत्काराचे नव्हे तर महिलांना जाळण्याचे प्रमाण वाढत आहे.
आजही हे प्रमाण कमी होवू शकते वा बंद होवू शकते.पण त्यासाठी लोकांमध्ये ख-या अर्थानं जनजागृतीची गरज आहे.हा उपक्रम शासनाने हाती घेवून राबवायला हवा.ज्याप्रमाणे स्वच्छता मोहीम हाती घेवून राबवली जाते.तशीच आजही बलत्काराला रोखण्यासाठी बलत्कार रोख मोहीम शासनाने राबविण्याची गरज आहे.देशाचे भवितव्य ज्या शाळेतून घडते.त्याच शाळेत आज संस्कृतीचे आणि संस्काराचे धडे विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजेत.बलत्काराचे प्रमाण बंद करण्यासाठी जनजागृती म्हणून आज घरोघरी जावून जनजागृती करण्याची गरज आहे.तसेच पोलिसांनीही या आरोपींना अभय देवू नये.त्या आरोपींना आरोप सिद्ध झाल्यास त्याला शिक्षा देत असतांना तो आरोपी जनतेलाच सोपवावा.जेणेकरुन लोकांमध्ये जनजागृती तर होईलच.शिवाय जनताच शिक्षा देते म्हणून लोकं गुन्हा करायला समोर येणार नाही व या गुन्ह्याला रोकथाम करता येईल.कायदा हातात घेऊन अशा आरोपींना शिक्षा देणा-या लोकांना कायद्याने गुन्हेगार न बनवता त्यांना निर्भयता प्रदान करावी.जेणेकरुन बलत्काराला कायमचं हद्दपार करता यावं.नव्हे तर पुन्हा अजून अशा मुली जाळल्या जाणार नाही.
ह्या तर विवाह न झालेल्या मुली झाल्या.पण आज विवाह झाल्यानंतरही वर पक्षाच्या पुर्ण अटी पूर्ण केल्यानंतरही वधूंना छळलं जातं नव्हे तर त्याच वधूंना जाळलंही जातं.पुरावे पोलिसांच्या माध्यमातून नष्ट केले जातात. वकीलाच्या माध्यमातून खटलेही जिंकले जातात.अशावेळी मुलीच्या बापानं कोणाला न्याय मागावं?त्या निष्पाप,लाचार मायबापाला न्याय कुणी द्यावा.तेव्हा या पद्धतीत जर अत्याचार होत असेल तर दोष कोणाला द्यावा?



भीमरावला वाटत होतं की ही मानसिकता बदलायला हवी.आम्ही आज आमचं पुरुषत्व नेहमी सिद्ध करीत असतो.नव्हे तर या पुरुषत्वाच्या नेहमी डिंगा मारत असतो.स्वतःला सिद्ध करण्यासाठी आम्ही आमचे अत्याचार नेहमी करीत असतो.
पुर्वीपासून तर आजपर्यंत आणि आजही याच पुरुषत्वाच्या मानसिकतेत स्रीयांना कमजोर समजणारे घटक उपलब्ध आहेत.ह्या घटकांना नेहमी अत्याचार केलेला आवडत असतो.
पुरुषी अत्याचाराची शिकार झालेली स्री कालपासून तर आजपर्यंत त्यांचे अत्याचार झेलीतच आलेली असून आज स्री प्रत्येक क्षेत्रात सृदृढ झाली असली तरी अत्याचाराची चरणसीमा कमी झालेली नाही.तसा त्याला एक प्रसंग आठवला.
एक शहर होतं. नावाजलेलं शहर........त्या शहरात पती पत्नी राहात होते.ते पती पत्नी गुण्यागोविंदाने राहात होते.त्यांना दोन मुलंही होती.त्याच्या पत्नीचं नाव श्रद्धा होतं.त्याची पत्नी तरुणपणापासून इतर स्रीयांवरील पुरुषी अत्याचार दूर करीत होती.पण काळ गेला.बदलत्या काळानुसार ती अपंग झाली.कारण तिला अपघात झाला होता.त्या अपघातात तिचे दोन्ही पाय गेले होते. त्या अपघातानं तिच्या कार्यावर बंधन आलं. तिच्याने कार्य करणं मुश्कील झालं.अशातच ती अधू झाली.
आपल्या पत्नीची अशी अवस्था.खरं तर गुण्यागोविंदाने नांदणारं जोडपं.त्यांचा संसार व्यवस्थीत चालला असला तरीपण त्या जोडप्यामधून एक जरी चाक पंचर झालं असलं,त्या पंचर चाकाला सोबत घेऊन पतीनं पुढील आयुष्य कापायला हवं होतं.पण पती तो.......पुरुषी रक्त होतं त्याच्यात.त्यामुळं ती अपंग होताच ते पुरुषी रक्त जागृत झालं नव्हे तर या रक्तानं दोन पत्नीही केल्या.
राब राब राबून,पोटाला चिमटा घेवून जमवलेली संपत्ती.ती संपत्ती काही एकट्या पतीनंच जमविलेली नव्हती.पण आता पत्नी अपंग होताच त्यानं दोन पत्नी केल्यानं तो ती संपत्ती तिच्यावर लुटवू लागला.
पहिल्या पत्नीला आता विचार येत होता.तिची मुलं लहानशी होती.तो तिच्यावर अत्याचार करीत होता त्याच पत्नींसमोर.तिला मारतही होता.तिला बरोबर जेवायला खावायला देत नव्हता.नव्हे तर तिला दुषणेही लावत होता.
ती त्रस्त होती.ती अपंग असल्यानं पोलिसस्टेशनलाही जावू शकत नव्हती.नव्हे तर आपली कैफियतही कोणासमोर मांडू शकत नव्हती.ती हवं तर आपल्यावरील अत्याचार सहन करीत होती.
महत्वाचं सांगायचं म्हणजे नेमकं काय चुकतं स्रीयांचं अशावेळी.ते त्यांना समजत नाही.स्री कितीही चांगूलपणानं वागली तरी तिला नावबोटं ठेवणारे भरपूर असतात.शिवाय एखादी स्री जर सक्षम असेल तर तिच्या वाट्याला कोणी जात नाही.मग पती का असेना.पण हे पुरुषी रक्त वाट पाहात असतं त्या स्रीच्या अधू होण्याच्या संधीची.ती माता जरी असेल,तरी आमचा आजचा पुरुष हा आपल्याला तिनं नव महिने गर्भात ठेवलाय.आपल्याला जन्म दिलाय,उन्हातून सावलीत नेलाय.वाढवलाय.लहानाचं मोठा केलाय.एवढंच नाही तर शिकवलाय.हे विसरतो आणि आपल्या खुद्द मातेवरच अत्याचार करतो.तिला वृध्दाश्रमात टाकतो.जिथे तो आपल्या स्वतःच्या आईची काळजी घेवू शकत नाही.तिथे तर ती पत्नी.
श्रद्धालाही वाटत होतं की त्याचा बदला घ्यावा.त्याचा अत्याचार सहन करु नये.पण ती काय करणार.ती स्वपायानं चालू शकत नव्हती वा हातही हालवू शकत नव्हती.अगदी पुरुषी मानसिकतेपुढे लाचार होवून ते अत्याचाराचे जीर्ण जगणे जगत होती.एक अबला बनून.........
शेती पीकत नव्हती.जावई त्रास देत होता.एक मुलगी उपवर झाली होती.एक मुलगी शिकत होती.मुलगाही शिकायला लागला होता.पैसा पुरत नव्हता.घर कसं चालवावं याचा भीमरावला विचार येत होता.अशातच यावर्षी भीमरावला शेतात भरपूर पीक आलं.त्याच्या पीकाला भावही आला.तशी ती बातमी वा-याच्या वेगानं मोठ्या जावयाला समजली.त्यानं तसं कांताला म्हटलं,
"तुह्या बापाले या वरीस भरपूर पीकलं हाय.तवा तू जावूनशान काही पैसे मागून आण.आपल्याले घर बांधाचं हाय.आपल्यालेही घर पाह्यजे का नाय."
"अवं,मा बाप गरीब हाय.आपल्या लगनासाठी त्यानं एक एकर शेती विकली.आपलं लगन केलं.आतं मा बापाजोवर पैसे नाय.तवा मी कशी जावू आन् मांगू पैसे.पैसे का झाडाले लागतेत व्हय."
"लमची,मी का वाईट बोलतूया.आपल्यालेबी घर नाय पाह्यजे का?आपली उद्या पोरं मोठी होतीन.त्याईले घरदार नाय पाह्यजे का? आपण आपलं सोचावं.तुले समजत नाय का?"
"अवं मा बाप गरीब हाये.तुमाले पहिलंच सांगतलं न."
"कायचा गरीब हाये.तुले माईत आहे का?ते शेती किती महाग हाये ते.अन् या वर्षी त्याईची शेती किती पिकली माईत हाये का तुले? अन् मी का वाईट म्हणतो.तू नाय रायशीन का घरात.मी तं तुह्या पोराबारासाठीच म्हणतो."
ती आढेवेढे घेत होती.तसा तो काही ऐकायलाच तयार नव्हता.त्यातच तो ऐकत नाही हे पाहून व मुलाबाळाचा विचार करुन कांता एक दिवस बापाच्या घरी आली.तसा भीमराव म्हणाला,
"कशी का आलीस पोरी? एकटीच आलीस? जावयाईले नाय आणलं का?"
"नाय."
"कावून बा? जावयाले कावनाय आणलं?"
"दादा,जावयानं पैसे मांगतले.म्हणतेत का पैसे मागून आण.घर बांधाचं हाय.आपल्या पोराबारासाठी.द्यान का पैसे?"
"पोरी,तुले कसं समजत नाय.तुह्याच लग्नासाठी एक एकर इकली शेती.आतं माह्यापाशी तीन एकर उरली.त्यातच हे तीन पोरं आन् आमी दोघं.पाच जीव पोसाचे हाय.आन् राह्यला तुह्या घराचा प्रश्न.तं माह्य घर पाह्य.तुह्यं तरी घर बेस असन.पण माह्य घर? माह्या घराले ऋण्या लागल्या.जिकडून तिकडून माती पडते.आमी कसे राह्यतो आमच्या घरात आमचं आमालेच माईत.कधी तं वाटतं का आमच्या आंगावर छत पडन अन् आमी मरुन.माईत हाये?आमी जीव मुठीत घेवून कसे जगतो ते आमचं आमालेच माईत.तवा तू जावयाले सांग.मनावं तुमच्या सास-यानं पैसे द्याले नकार देला.पैसेच नाय हाये म्हणलं."
मुलीनं बापाचं काय ते ऐकलं.तशी ती निराश झाली.ती दोन दिवस मुक्कामाला राहिली व नंतर लहानसं तोंड करुन सासरी निघून गेली.
कांता सासरी पोहोचली होती.तिला पाहताच तिचा पती आनंदावला.कदाचित त्याला वाटलं की तिनं पैसा आणला असावा.तशी ती दारातच असतांना तो म्हणाला,
"आणला का पैसा?"
"सांगते.मले आतमंधी तं येवू द्या."
"नाय नाय.पह्यलं सांग."
"नाय देला पैसा."
"अशी गंमत करु नगं.खरं खरं सांग."
तशी ती चूप बसली.तिचा चेहरा पडला.तसा तिचा चेहरा पडलेला पाहून तो काय ते समजला.तशी ती आतमध्ये गेली.
भीमरावचं घर.मातीच्या भींती होत्या चारही बाजूला.पण त्या घरात दरवर्षी रानातली माकडं येत असल्यानं व त्या घरावर उड्या मारत असल्यानं छतावरची कौलं फुटत होती.त्याचबरोबर घरात पावसाचं पाणी गळायचं.वर्षाचे आठ महिने बरे जायचे.पण पावसाळ्याचे चार महिने बरे जात नव्हते.त्यातच गळतूनीवर घरचे भांडे ठेवून ते दिवस काढत होते.त्यातच ते पावसाचं पाणी भींतीवर पडताच त्या भींतीही खचत होत्या आणि दरवर्षी पावसाळ्यात भीमराव ती माती लिपायचं काम करीत असायचा.
भींती खचून पडू नये.म्हणून दर दोन वर्षानं भीमराव त्या भींतींना गिलावा द्यायचा.त्याला शेणाचं सारवण द्यायचा.पण त्या पावसासमोर भींतींना कितीही गिलावा दिला तरी त्या भींतींचं चालत नव्हतं.अशातच त्या भींती पडत होत्या.
जरी त्या भींती खचत असल्या,जरी त्या घरात पावसाचं पाणी गळत असलं,जरी त्यांच्या घरी पीक पीकत नसलं,अन् जरी त्यांच्या घरी विश्वकोटीचं दारिद्रय असलं तरी ती माणसं आपल्या घरी प्रेमानं राहात होती.घरात भांडणतंटा अजिबात नव्हता.वा कोणाचा राग द्वेष अजिबात नव्हता.सगळे संतुष्ट होते.कोणी कोणत्याही गोष्टीसाठी भांडत नसत.
कांता घरात आली खरी.पण तिचं खाली हातानं परतणं तिच्या नव-याच्या पचनी पडलं नाही.सास-यानं आपल्या पत्नीला पैसे न देणे ही गोष्ट त्याला आवडली नाही.न दिलेल्या पैशाची गोष्ट त्याच्या डोक्याला ताप आणत होती.त्यातच आता तो आपल्या पत्नीला भयंकर त्रास देत होता.सासूही बोलत होती.मात्र ते सासूचे आणि पतीचे बोलणे सहन न झाल्यानं कांताही त्यांना उत्तरं देत होती.
कांताची उत्तरं देण्याची वस्तुस्थिती त्यांना खपणारी गोष्ट नव्हती.त्यांना कांता मुजोरी करते असं वाटत होतं.त्यातच एक दिवस.त्या कांताचा काटा काढण्याची योजना आकार घेवू लागली.हिचा आपल्याला काहीच उपयोग नाही असं सासरकडील मंडळींना वाटायला लागलं.यापेक्षा आपण हिला मारुन दुसरी चांगली श्रीमंतांची मुलगी करु असं त्याला व त्याच्या आईला वाटलं.तशी आज त्यांनी योजना बनवली.

कांतासाठी आज काळ चालून आला होता.आज ते प्रेमानं वागत होते.केव्हा काटा काढतो तिचा आणि केव्हा नाही असं त्यांना वाटत होतं.अशातच एक दिवस तो काळ तिच्या समीप आला.
रात्रीचं जेवन आटोपलं.कांताही जेवन करुन गाढ झोपली होती.तशी मध्यरात्र उलटली.तशी त्याची आई आत आली.तिनं आपल्या मुलाला इशा-यानंच उठवलं.तोही लवकरच उठला.तशी त्यानं उशी घेतली.
त्यानं ती उशी तिच्या चेह-यावर ठेवली.त्यानं त्या उशीनं तिचं नाक दाबून धरलं.तशी त्याची आई तिच्या पायावर बसली.तिनं आपल्या वजनानं पाय दाबून ठेवले.तसे प्रचंड ताकद लावून हातही.
कांता जीवाच्या आकांतानं ओरडू लागली.पण त्या अंथरुणात त्या चार भींतीच्या बाहेर तिचा आवाज पोहोचला नाही.तसा तिचा गुदमरल्यानं मृत्यू झाला.कांता संपली.त्याचबरोबर कांताचं प्रकरणंही.
दुसरा दिवस उजळला.तसे ते सर्वजण उठल्याचं नाटक करु लागले.त्याचबरोबर कांता रात्रीच झोपेत मरण पावली असा आभास करुन सासू रडायला लागली.आजुबाजूची मंडळी गोळा होवू लागली.त्याचबरोबर त्यांनी तिच्या बापालाही बोलावणं पाठवलं.
भीमराव आला.प्रेत बाजूला ठेवलं होतं.तसं ते प्रेत पाहताच तो रडायला लागला.त्यातच रडता रडता त्याच्या तोंडातून शब्द फुटले.
'पोरी मी तुले घर बांधायसाठी पैसे देलो असतो तं तू मरणागती गेली नसती.'
बाप येईपर्यंत ती मृत्यूची मुठ झाकली होती.ती झाकली मुठ सव्वालाखाची.पण भीमराव येताच ती मुठ उघडली.बिंग फुटलं.तसं ते प्रकरण वस्तीतील लोकांच्या लक्षात आलं.हा खुनच आहे असं कोणालातरी वाटलं व त्या जमावाच्या गर्दीतून कोणीतरी पोलिसांना फोन केला.

पोलिस येण्यापुर्वी त्या प्रेताची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यासाठी अंत्यविधीची तयारी सुरु झाली होती.प्रेताला अंघोळ घालण्यात आली.त्यानंतर त्या प्रेताला तिरडीवर ठेवण्यात आलं.त्याचबरोबर कुंकवाचा मरवट लावण्यात आला.हार टाकण्यात आले व प्रेत स्मशानाकडेही रवाना झालं.अशातच पोलिस घटनास्थळी हजर झाले.चौकशीअंती कोणीतरी सांगीतलं की प्रेत स्मशानाकडं गेलं आहे.तशी पोलिसांन आपली गाडी वळवली.सायरन लावलं व सायरनच्या भो भो आवाजात ती गाडी स्मशानाच्या दिशेनं भरधाव चालू लागली.

थोड्याच वेळात प्रेतही स्मशानात पोहोचले.लवकरच लाकडं रचली गेली.प्रेताभोवती फेरेही मारली गेली.आता अग्नी देणार एवढ्यात पोलिसांचा ताफा स्मशानात हजर झाला.सर्वजण आश्चर्यचकीत झाले.पोलिस आलेच कसे?कोणी बोलावले?

पोलिसांनी चौकशी केली व म्हटलं,

"हे प्रेत जाळता येणार नाही.तुमच्याविरुद्ध तक्रार आहे."

कांताच्या पतीचं नाव आनंद होतं.तसा आनंद म्हणाला,

"कोणाची तक्रार हाये? काय केलं आमी?"

"आनंदा,आपणच ना."

"व्हय."

"अज्ञात नंबरवरुन फोन आहे."

"अहो,पण आमचा सरवा विधी झाला.या प्रेताले अन् माह्या बायकोच्या आत्म्याले शांती तरी लाभन का?"

"ते माहीत नाही.शवविच्छेदन केल्यावर सगळं समजेल.जर रिपोर्ट तुमच्या बाजूनं आला तर तुम्हाला काहीही होणार नाही.अन् नाही आला तर तुम्हाला प्राब्लेम येईल.तुम्ही घाबरु नका."

"नाही हो.मी घाबरत नाही.पण......"

"पण काय?"

"मोक्षाचा प्रश्न हाये न सायेब."

"ते मोक्ष गिक्ष जावू द्या खड्ड्यात.आम्ही आता बॉडी नेतो.तुम्ही या पोलिसस्टेशनला.तुमचं स्टेंटमेंटस घ्यावं लागेल ना."

".........." आनंदा चूप होता.तसा पोलिसवाला म्हणाला,

"येता नवं.की चालता आमच्याचसोबत?"

"नाही.येतो येतो."

"जास्त चालाखी दाखवाचं कारण नाही आणि हं गायब होवू नका.चुपचाप या पोलिसस्टेशनला.जर पोलिसांना गुंगारा दिलाच तर तुमची खैर नाही असं समजा.पोलिस तुम्हाला शोधून काढेलच.समजलं का?"

"हो जी सायेब.समजलं."
पोलिसांनी शरणावर रचलेलं प्रेत काढलं.ते प्रेत घेवून गेले.तशी बाकीची माणसंही आपआपल्या घरी परतली.तशी आनंदाची पंचक्रोशीत बदनामी झाली होती.

आनंदा आश्चर्यचकीत होता.कारण फोन अज्ञात नंबरवरुन होता.हा अज्ञात व्यक्ती कोण असावा? तो विचार करीत होता.तसा तोही घरी गेला.

पोलिसानी आनंदाला त्याचं बयाण देण्यासाठी बोलावलं होतं.पण तो अख्खा घाबरला असल्यानं बयाण द्यायला गेला नाही.पोलिसांनीही त्याकडं दुर्लक्ष केलं.तसा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला.त्यात लिहिलं होतं की कांताचा गळा दाबून जीव घेतलेला आहे.मग काय? पोलिस घटनास्थळी पोहोचले.तशी त्यांनी त्याला अटक केली.त्याला पोलिसस्टेशनला नेलं.त्याचं बयाण घेण्यात आलं.तसं त्यानं बयाणात त्याच्या आईचं नाव घेतल्यानं तिलाही अटक करण्यात आली.तिचंही बयाण नोंदविण्यात आलं.तसा खटला न्यायालयात उभा राहिला.

काही लोकं मुलामुलींबद्दल भेदभाव करीत असतात.त्यातच कोणी मुलगाच गर्भात आहे की नाही,म्हणून गर्भलिंगनिदानाची चाचणीही करीत असतात.काही सर्रास मुलासाठी मुलींच्या भ्रृणाच्या हत्या करीत असतात.कितीतरी अशी प्रकरणे आहेत की त्या प्रकरणात मुलगा हवा म्हणून मुलीच्या भ्रृणाच्या हत्या झालेल्या आहेत.मुलाला वंशाचा दिवा समजतात.मात्र मुलगी वंशाची पणती असली तरी तिला वंशाची पणती समजत नाही.तर गर्भातून बाहेर येण्यापुर्वीच तिची हत्या केली जाते.त्यामुळं कधीकधी मुलगा हवा मुलगी नकोच,असंही म्हणण्याची पाळी येते.

स्वातंत्र्यानंतर एवढी वर्ष झाली तरी परिवर्तन झालेलं दिसत नाही.जननदराच्या बाबतीत पुर्वी अख्खा देश आघाडीवर होता.एका एका एका महिलेला बाराच्याही वर मुलं व्हायची.त्यातच मुलगी झालीच तर मात्र शोक व्यक्त केला जात असे.त्याचं कारणही तसंच होतं.

मुलीचा विवाह होताच सासरी जाणारी मुलगी तिला जर त्रास झालाच तर तो त्रास मायबापांनाही थोडा व्हायचाच.एरवी तो पोटचा गोळा असायचा मायबापाचा.त्यातच दिल्या घरी जर काही त्रास असेल आणि मुलगी माहेरी परत आलीच तर बाप म्हणायचा,

"बाई ज्या घरी तुला दिलं.त्यालाच आपलं समझ.तिच तुझी काशी आणि तेच तुझं पंढरपुर आहे.तिथेच तुझं विश्व असुन तू मरत जरी असेल तरी आम्हाला आठवू नकोस.यदा कदाचित तू मृत्यू पावलीच,तर पतीच्या खांद्यावर जायचं भाग्य लाभेल.तेव्हा दिल्या घरी सुखी राहा.

तो बाप कसायागत मुलीला एक दिवस पाहूणचार करुन किंवा त्याचवेळी तिला घेवून सासरी नेवून देत असे आणि सांगत असे की बाई आजपासून तू आम्हाला मेलेली असून पुन्हा परत येवू नकोस.बापालाही वाईट वाटायचंच.पण बाप अंतकरणावर मोठा दगड ठेवून आपली छाती नाईलाजानं मोठी करीत असे.यातूनच सतीप्रथेत नवरा आजारानं किंवा दारुनं मरण जरी पावला तरी त्याच्या चितेवर जबरदस्तीनं सती देण्याची प्रथा कालांतरानं निर्माण झाली.यावेळी पोटचा गोळा सती जात असताना खरं तर बापाला मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं.पण या परंपरेला स्वाभिमानाचं स्थान होतं.जरी ती कुप्रथा होती तरीही......

तो काळ गेला.सतीप्रथा बंद झाली कालांतरानं.पण त्या प्रथेचं पिल्लू मागे शिल्लक राहिलच.स्रीयांना हा समाज कालही ठारच करीत होता.आजही ठार करीत आहे.मात्र थोडा फरक पडला आहे.

काल पतीच्या चितेवर जाणुनबुजून स्रीयांना सती जायला लावणारा समाज आज स्वातंत्र्यानंतर आपल्या विचारांच्या मानसिकतेत बदल करुन या समाजाने हुंड्याची परंपरा आणली.वधुपित्याकडून हुंड्याच्या रुपाने द्यावी लागणारी रक्कम जास्त असल्याने व ती देतांना मायबापाला जास्त त्रास होत असल्याने गर्भातच कन्या मारण्याची परंपरा आज रुढ होतांना दिसत आहे.काल चितेवर ही महिला मारली जात होती.तर आज गर्भातच त्या महिला भ्रुणाचे तुकडे पडतांना दिसत आहे.कशासाठी तर महिलांचा जन्म नकोच म्हणून.

महिलांनी कोणते पाप केले?महिलांनी पुरुषांचे काय बिघडवले? तरीही महिलांना आज ठार मारण्याची परंपरा महिलांची पिळवणुक करणारी आहे.

विशेषतः महिलांबद्दल सांगायचं झाल्यास महिलाच पुरुषांचा उद्धार करीत असते.म्हातारपणात मुलगीच बापाची सेवा करीत असते.मुलगा नाही.तरीही आमची मानसिकता अशी की मुलगा पिढ्यांचा उद्धार करतो.खरं तर बाप जेव्हा जास्त आजारी असतो.तेव्हा त्या आजारी बापाची सेवा आज करायला मुले पुढे येत नाही.आज मुलीच बापाची सेवा करायला लागल्या आहेत.तरीही आम्ही मुलगा मुलगा म्हणत मुलीला ठुकरावतो आणि मुलाचा लाड करतो.मुलगा नाव चालवतो,मुलगी नाही असे मानून तसेच हुंड्याच्या भीतीने आजही मुलींचे भ्रुण गर्भातच मारले जातात.ही मानसिकता आम्ही बदलवून हुंडा पद्धती बंद करायला हवी.आज मुलगा हवा,मुलगी नको म्हणण्याची गरज नाही.गरज आहे मुलगीच हवी म्हणण्याची.मुलगी अन् मुलगा काय देतो.उलट मुलगी जर सेवा करीत असेल तर याच मुलीसमोर बापाने नतमस्तक होवून मुलीच्या जन्माची पर्वणी वधुपित्यांनी साजरी करावी.मुलगीच हवी म्हणत आम्ही पुरुषी मानसिकता समाप्त करावी आणि मुलीला सन्मान द्यावा.तरच पोरींचा उद्धार होईल.नाहीतर सतीप्रथा संपली तरी हुंडा,भ्रृणहत्या ह्या प्रथा सुरुच राहतील आणि महिलांचे सतत जीव जात राहतील ही शंका नाकारता येत नाही.

भीमरावला चार मुलं होती.तीन मुली व एक मुलगा.त्यानंही मुलाच्या हव्यासापायी तीन मुली जन्माला घातल्या होत्या.तरीही त्याला नेहमी वाटायचं की मुलगा हवा, मुलगी नको.कारण सगळा समाज असंच मानत असायचा.कोणाला मुल हवं म्हणून ती मंडळी नवशंही करीत असायची.अशातच मुलासाठी मुलीच्या भ्रृणहत्या.मुल झाल्यावर निष्पाप कोंबड्या बक-याचा बळी.त्यातच मुल झाल्यावर मायबाप त्या मुलाला लहानाचं मोठं करीत असत.उन्हातून सावलीत नेत असतात.त्याच्या इच्छा पुरवीत असत.अशातच काही दिवसानं मायबाप म्हातारे होत.

भीमराव समाजातील परीस्थीती जेव्हा डोकावून पाहात त्या परीस्थीतीचं जेव्हा अवलोकन करायचा.तेव्हा त्याला समाजातील ते दृश्य दिसायचं.मग तो त्यावर मार्गदर्शन करायचा.

म्हातारी मंडळी आपल्याला आवडत नाहीत.ती सारखी वटवट करीत असतात.म्हणून आपल्याला त्यांचा भयंकर राग येतो.तो राग एवढा येतो की आपण त्यांना चक्क सोडून जातो दूर.खुप दूर.आपल्याला भानच नसते की आपणही म्हातारे होणार.आपल्यालाही हेच दिवस पाहायला मिळणार.

खरंच म्हातारपण......सर्वांना मिळत नाही.कोणी तरुणपणातच मरतो.ज्यावेळी आवश्यकता असते.तर कोणी म्हातारपणात मरतो.बहुतःश लोकांना सतत वाटत असते की ही म्हातारी मंडळी केव्हा केव्हा मरतात.केव्हा केव्हा नाही.ते प्रेम करीत नाहीत म्हाता-यावर.पण काही मंडळी एवढं प्रेम करतात की आपल्याला ही म्हातारी मंडळी सोडूनच जावू नये असं त्यांना वाटत असते.ती मंडळी आधार वाटत असतात.

म्हातारी मंडळी ही आपल्यासाठी आधार असतात.त्यांची वटवट हे त्यांचं मार्गदर्शन असतं.ते आपल्याला आपल्या अनुभवातून शिकवित असतात.कारण त्यांनी फार वेदना सहन केलेल्या असतात.एवढ्या वेदना सहन केलेल्या असतात की त्यांना वाटत असते,आपल्या पिढींना अशा संकटांचा सामना सहन करावा लागू नये. असं वाटत असल्याने ती मंडळी बोलत असतात.ज्या गोष्टीला आपण वटवट म्हणतो.कदाचित परिवर्तनाच्या नांदीत भरडलेल्या आपल्यासारख्या मंडळींना त्यांचं ते जुनाटपण खपत नाही म्हणून ते बोलत असतात.पण आपण वयानं मोठे झाले असलो तरी आपल्याला माणुसकीची अक्कल न आल्याने त्यांचं म्हातारपण आपल्यासाठी डोकेदुखी वाटते.परिवर्तनवादी काळात तेच ते जुनाटपण आपल्याला खपत नाही.कोणी मैत्रीण जर आपल्या घरी येत असेल तर ती म्हातारी माणसं जड वाटतात.त्यातच त्यांचं त्या मैत्रीणींसमोर बोलणं आपल्याला खटकतं आणि तद्नंतर त्यांची रनानगी आपण वृद्धाश्रमात करीत असतो.

एकतरी मुलगा दे रे देवा असं सारखं आपण देवाला साकडं घालतो.मुलगी आपल्याला असेल तरीही आपण मुलाची गोडी करीत असतो.वाटत असते की मुलगा हा आपला वारस.तो आपले नाव चालवतो.वारसा चालवतो आणि मुलगी...... मुलगी वारसा चालवत नाही.ती दुस-याची आधीन असते.

खरं तर आजच्या काळात मुलगीच वारसा चालवीत आहे.ती मायबापाच्या मनाचा आरसा आहे.तिला बापाचं दु:ख समजतं.तिला आईचं रुदन कळतं.अर्थात मायबापांनी भविष्यात जी काही स्वप्न पाहिलेली असतात.ती सगळी स्वप्न पुर्ण करण्याचं काळीज मुलीत असतं.अलिकडे मुलगीच मायबापाचा आधार असते.

आज एक तरी पुत्र दे म्हणण्याची गरज नाही.अलिकडे नव-याच्या नावासह मायबापाचंही आडनाव लावण्याची परंपरा निर्माण होत आहे.त्यामुळे नाव आणि वारसा मुली चालवत नाही हे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही.मुलगा हुशार असतो हे जरी बरोबर असलं तरी मुलगाच आज आश्रीत झाला आहे.ज्या मुलीला आपण आश्रीत समजतो.ती मुलगी सक्षमपणे मायबापाची सेवा करु लागली आहे.मुलगा मात्र बापाच्या भरवश्यावर खात बसला आहे.ही वास्तविकता पदोपदी जाणवते आहे.

आज मुलाकडे पाहिलं तर पंचवीस वर्ष होवूनही तो शिकतच असतो.मग तो शेतक-यांचा का असेना.बाप करीत असलेलं काम मुलगा करीत नाही.कारण त्या पेशाची त्याला पुष्कळ लाज वाटते.तो रिकामे राहणे पसंत करतो.पण मायबापाच्या व्यवसायाला आधार द्यायला मागेपुढे पाहातो.सरकार तरी कोणाकोणाला नोकरी देईल.तरीही हा मुलगा नोकरीची अपेक्षा बाळगून मिळेल ती कमी पैशाची नोकरी न स्विकारता उच्चपदाची नोकरी शोधतो.त्याला धंदा लावणे म्हणजे तारेवरची कसरत वाटते.म्हणून तो शेवटपर्यंत बापावर विसंबून राहात बेरोजगारीचं जीवन कापतो.पण मुलगी मिळेल ती छोटी मोठी नोकरी हस्तगत करुन मायबापालाच नाही तर पतीलाही साथ देते.मायबापाच्या वृद्धापकाळीही आपल्या भावावर अवलंबून न राहता ती आपल्या मायबापालाही पोषते.प्रसंगी मायबापाच्या मालमत्तेची चिंता करीत नाही.खरं तर तीच मालमत्तेची मालकीण असते.पण आमचा समाज मुलाला वारस समजून मुलाला सर्व हक्क प्रदान करतात.मुलीला पराया धन समजत इस्टेटीतून बेदखल करण्याचा प्रयत्न करुन तिची सरासरी कत्तल करतात.अशाप्रकारे लहानपणी गर्भात कत्तल.बालपणी बोलण्याने कत्तल तर मोठेपणी मालमत्तेतील कत्तल.वृद्धापकाळीही तीच परिस्थिती.

आज मुलगा मुलगी समान असतांना हा भेदभाव टाळण्याची गरज आहे.मुलगा काय देतो आणि मुलगी काय देते.दोघंही घटक मायबापासाठी समान असतात.मायबापाचं मार्गदर्शन त्या दोघांच्या आयुष्यात बदल घडवतो.म्हणून त्यांची वटवट, वटवट समजू नये.मायबापांनीही लहानपणी भ्रृणहत्या करु नये.मुलगा प्रसंगी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवेलही कदाचित.पण मुलगी आमची माय म्हणून आधार देईल.तुमची वटवट ऐकेल.तुम्हाला मार्गदाता समजेल आणि तुमच्यासाठी जीव लावेल.ही वास्तविकता आहे.हे विसरु नये समाजाने.तसेच म्हातारी मंडळी हे आपले आश्रयदाते असतात हेही विसरु नये.
बरेच दिवस झाले होते.भीमराव आपल्या घरी मुलीच्या मरनानंतर परतला होता.तो तिची आठवणंही विसरला होता.कांता मरण पावली होती.तिचा गळा दाबला व त्यातच कांता मरण पावली.असा अहवाल आला होता.तशी कांता अनंतात विलीन झाली होती.पण तिचं अनंतात विलीन होणं हे नियतीला खपलं नाही.त्यातच न्यायालयात खटला उभा राहिला होता.आता मात्र कांताला न्याय मिळेल असं वाटत होतं.
ते उन्हाळ्याचे दिवस होते.भीमराव दुपारच्याला वखर सोडून व बैलाला चारा पाणी घालून दुपारी जेवन करण्यासाठी घरी आला होता.तो त्या दिवशी जेवन करुन घरात पहुडला असतांना त्याला आवाज आला.
"हलो,घरात आहे का कोणी?"
तसा कोण आलं हे पाहण्यासाठी तो बाहेर निघाला असता त्याला दारात पोस्टमेन उभा असलेला दिसला.तसा तो म्हणाला,
"कोण पाहिजे?"
"तुमच्या नावाचा वारंट आहे."
"वारंट! कायच्याबाबत? कायचा हाये वारंट जी? आमी तं काय बी केलेलं नाय."
"मले नाय माहीत बा.तुम्ही खोलून पावा.म्हंजे समजल."
"मी गी नाय घेत बा वारंट.कायचा होये नं कायचा नाय."
"कदाचित तुमच्या फायद्याचाबी निघू शकते."
"बरं."
"पण सही करा लागन एक."
"ठीक हाये."
भीमरावनं सही केली.तसा त्या पोस्टमेननं ते पत्र भीमरावच्या हातात देवून तो रवाना झाला.तसं भीमरावनं ते पत्र उघडलं व मुलीला ते वाचायला दिलं.त्यात फक्त कोर्टात बोलावलं असं लिहिलं होतं.तारीख दिलेली होती.
भीमरावला काही कळायला जागाच नव्हती.तसा तो फार घाबरला होता.तशी त्याची पत्नीही.तारखेदरम्यानचे दिवस त्याच चिंतेनं मोठे खराब गेले.तसा तारखेचा दिवस उजळला.
आज भीमराव सकाळीच उठला.त्यानं लवकरच प्रातःविधी आटोपला.तशी अंघोळही आटोपवली व जेवनखावन करुन तो तारखेसाठी रवाना झाला.त्या ठिकाणी रवाना झाला.ज्या शहरात त्याची तारीख होती.
ज्या न्यायालयातील कक्षात त्याची तारीख होती.त्या कक्षात तो हजर झाला.त्यानं चौकशी केली.चौकशीअंती समजलं की ही तारीख त्याच्या मुलीची आहे.कांताला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी पक्ष हे ती तारीख लढत आहेत.त्याला एक साक्षीदार म्हणून बोलावले आहे.
त्याला एक साक्षीदार म्हणून बोलावले असल्याचे ऐकून त्याला थोडं बरं वाटलं.तसं त्याला काहीवेळ थांबायला लावलं.
भीमराव काही वेळ बाहेरच थांबला.पुकारेवर पुकारे सुरु होते.त्यातच त्याचं नाव आलं.भीमराव आत गेला.तो कठड्यात उभा झाला.तसं न्यायाधीशानं म्हटलं,
"कांता कोण तुमची?"
"मुलगी होये जी."
"आनंदकडे बोट दाखवीत न्यायाधीश म्हणाले,
"ह्यांना ओळखता का?"
"हो जी."
"कोण आहेत हे?"
"माह्यी पोरगी देली होती जी याईले."
"तुम्हाला माहीत आहे का हा खटला कशाचा आहे?"
"हो जी.याईनंच मा पोरीले मारलं."
"हे बघा,आरोप अजून सिद्ध व्हायचं आहे.असा आरोप उगीचच लावू नका.जा आता.बाकी काय काय घडलं,ते पुढच्या तारखेला पाहू."
न्यायाधीश महोदयानं तारीख दिली.त्याचबरोबर खटला चालवायचा की नाही हेही विचारलं.भीमरावनं होकार दिवा.तसा भीमराव तारीख घेवून घरी चालता झाला.
भीमराव घरी आला होता.तसं त्याला पाहताच चिंतेत असलेली त्याची पत्नी संध्यानं विचारलं,
"कायच्याबाबत तारीख होती जी?"
"आपल्या पोरीची.आपली पोरगी मारली न त्याईनं.ते केस बोर्डावर आली म्हणे.म्हून बोलावलं म्हणे."
"हो.तेच कारण हाये." तशी संध्या चूप बसली.
तारखावर तारखा पडत होत्या.भीमराव अगदी वैतागून गेला होता.शिवाय जवळचा पैसाही जात होता.त्याचबरोबर वेळही बरबाद होत होता.त्यातच प्रतिपक्ष वकील प्रश्नांच्या सरबत्तीनं डोक्याची लाही लाही करीत होते.त्यामुळं भीमरावला काय करावं सूचत नव्हतं.प्रतिपक्ष वकील बारीकमध्ये समझौता करुन घ्या असंही सारखं म्हणत होते.तसेच तुमची मुलगी गेली.आता काय करता असंही म्हणत होते.
तारखावर तारखा,वेळेचा अपव्यय व प्रश्नांच्या सरबत्तीनं भीमराव तंग आला होता.त्यातच शेती पाहिजे तशी पीकत नव्हती.शिवाय तारखेवर जायला पैसाही लागत होता.घरी दोन्ही मुली लग्नाच्या झाल्या होत्या.त्या मुलींसमोर तो हतबल ठरला होता.घरी जिथे खायलाच पैसा पुरत नव्हता.तिथं खटल्याचं काय? मात्र प्रतिपक्ष वकील आपल्या पक्षकाराच्या बचावासाठी खटल्याच्या समझौत्याची गोष्ट मांडत होते.त्यातच एक दिवस त्याला विचार आला.
भारतीय न्यायालय ही अशी व्यवस्था की त्या ठिकाणी वंचितांना न्याय मिळेल अशी आशा असते आणि तो न्याय मिळतोच.पण न्याय मिळतो कुणाला? जो गरीब आहे त्याला की श्रीमंत आहे त्याला.
काही काही श्रीमंत महाभागांना भ्रष्टाचाराचा अतिरिक्त पैसा असल्याने जाणुनबुजून लोकांच्या वाट्याला जाण्यात धन्यता वाटत असते.त्यांना कोणालाही त्रास द्यावासा वाटतो.त्यात असुरी का होईना आनंद वाटतो.हा पैसा वाया गेलाच तर त्याचं जरासंही दुःख वाटत नाही त्यांना.कारण तो कमवायला मेहनत करावीच लागली नसते त्यांना.ते गरीबांचे रक्त पिणारे ढेकुण असतात.स्वतःच वाट्याला जातात आणि स्वतःच खटला दाखलही करुन टाकतात.
भारतीय न्याय हा काहीसा असाच आहे.इथे गरीबाच्या गरीबीची तसेच त्यांच्या प्रामाणिकपणाची किंमतच नाही.कारण त्याचेजवळ पैसा नाही.भारतात न्याय मिळविण्यासाठी पैशाची फार गरज आहे.कारण न्याय मिळविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला खटला न्यायालयात दाखल करावाच लागतो.तो दाखल करतांना पदोपदी पैसा लागतो.कागदपत्र बनविण्यापासून तर पुढं तो खटला लढण्यापर्यंत सारखा पैसा लागतो.त्यातच तो खटला लढायला वकीलही पोषावा लागतो.कारण भारतीय कायदेविषयक प्रक्रिया ही सर्वसामान्य नागरिकांना कळेल अशी नाही.ती किचकट व गुंतागुतीची असून इंग्रजी भाषेत आहे.ही इंग्रजी भाषा सर्वसामान्य लोकांच्या व्यवहाराची भाषा नसल्याने ती लोकांना समजत नाही.म्हणून वकील करावाच लागतो.
हा वकील जर चांगल्या स्वभावाचा,निस्वार्थी असेल तर ठीक नाही तर तो त्या खटल्याचं वाटोळं करीत असतो.कारण खटला लढायला वकीलाने जरी म्हटलं की मी फुकटात लढतो तर त्यावर अवलंबून असणारा त्याचा परीवार जगेल कसा?हा प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा असतो.तो तरी काय करणार? मग मात्र त्या वकीलाच्या दुटप्पीपणात खटल्याचं वाटोळं होणार नाही तर काय?
कधी कधी खटला करणारा पण ह्यात नसतो खटला चक्क दहा पंधरा वर्ष चालतो.खरंच मग न्याय मिळाला तरी त्याचा उपयोग कुणाला होतो.खटले संपवण्यापेक्षा ते लांबवण्यावर जर लाभ होत असेल तर बलात्कारा सारख्या अतिशय नाजुक संवेदनशील अशा विषयाला आणि खटल्याला वर्ष वर्ष लागूनै जातात आणि पिडीतेचा रोज न्यायालयातून वृत्तपत्रातून अश्लिल प्रश्न विचारुन बलात्कार केला जातो त्याचं काय? होय म्हणतात ना न्याय देवता अांधळी असते तेच बरोबर वाटतं कधी कधी.लोकांना न्याय पद्धतीचीच एवढी भीती आहे की न्यायालयाच्या बाहेर मांडवली करणे योग्य वाटतं त्यांना आणि ज्या देशात चक्क न्यायालयात पाय ठेवणे म्हणजे अब्रू घालवणे आहे, त्या देशात न्यायाची अपेक्षा करणे किती दुय्यम ठरतं हे न सांगितलेलं बरं.
प्रत्येकजण जन्मतः मोठा नसतो.जो स्वतःला मोठा समजतो त्याच्यासारखा तरी जगात मुर्ख नाही.तो त्याचा अहंकार असतो.यातुनच गुन्हे घडतात.श्रेष्ठ मानण्याची भावना.मला श्रेष्ठ म्हणावं.कोणी अपशब्द म्हटल्यास राग.सहन करायची ताकद नसल्यानं राग येतो.तो राग एवढा भयंकर असतो की त्याचं चक्क रुपांतर भुकंप यावा तसा खटल्यात होतो.
आम्ही जगतो आहोत. प्रत्येकजण जन्मतः मोठा नसतो.जो स्वतःला मोठा समजतो त्याच्यासारखा तरी जगात मुर्ख नाही.तो त्याचा अहंकार असतो.
महत्वाचं म्हणजे न्यायव्यवस्था पारदर्शी असायला हवी.त्यातच या न्यायालयातून गरीबांनाही न्याय मिळायला हवा.गरीब श्रीमंत हा भेदाभेद नको व्हायला न्यायालयातून तरी.....
पण आज न्यायालयानं आपली भुमिका बदलली आहे.ज्याच्याजवळ जास्त पैसा.त्याला न्याय मिळत आहे.त्याच्यासाठी न्यायालय अर्ध्या रात्रीही उघडतं आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही ते मात्र निरपराध असुनही न्यायालयाच्या कचाट्यात सापडून कारागृहात सडत आहेत.जणू असे वाटायला लागले आहे की हे इंग्रजांचे वंशजच असावे.न्याय काय त्या काळात भारतीयांना नव्हताच.त्या इंग्रजांचेच न्यायाधीश असायचे.न्यायदान करतांना काही चुकलंही त्यांचं.तरी भारतीयांनाच दोषी धरुन कित्येक भारतीयांना त्यांनी फासावर चढवले होते.तीच परिस्थिती आज दिसून येते.इथे एक दोन लाख बँकेतून कर्ज घेणार्‍यांकडून कर्जाची रक्कम जबरण वसूल केली जाते आणि त्याचं जीणं नकोसं केलं जातं. पण त्याच देशात राजनेत्यांचा पैसा स्विस बँकेत जमा असतो आणि करोडोचे कर्ज घेणारे लोकं देशातून चक्क फरार होऊन जातात.न्याय व्यवस्था तेव्हा फार दुबळी भासते.तरीही त्यांना मोकाट सोडल्यागत कडक शासन करण्याऐवजी त्यांना देशात आणू.त्यांचा पैसा भारतात आणू.असं पोकळ आश्वासन.कृती मात्र शुन्य......अशी अवस्था देशाची करुन टाकलीय न्यायालयानं.
आज भारतीय न्यायव्यवस्था सक्षम जरी असली तरी या न्यायव्यवस्थेला कोणी घाबरत नाहीत.कारण दंडुकेशाहीचा न्यायालय वापरच करीत नाही.आज कृषी जगतात शेतकरी आत्महत्या करतात.शिक्षकही आत्महत्या करतात.कारण त्यांना या देशात न्यायच नाही.शिक्षकांच्या हिताचं असलेलं पवित्र पोर्टल.त्यालाच संचालकांनी न्यायालयात आव्हान दिल्याने शिक्षणाची ऐसीतैशी होऊ घातली आहे.पवित्र पोर्टल मधून येणारा गुणवत्ताधारक उमेदवार संचालकांना चालणार नाही तर जो उमेदवार संचालकांचा जवळचा असेल,नातेवाईक असेल तो चालेल.त्यासाठी संचालकांचे न्यायालयात जाणे न्यायालयाने समजून घ्यावे की नाही हा न्यायालयाचा प्रश्न.पण आजही याच न्यायालयातून निलंबीत शिक्षक जिंकुनही त्याला कामावर रुजू केले जात नाही.संचालकांच्या चुका असूनही त्या संचालकांना न्यायालय फटकारत नाही.तसेच या न्यायालयातूनच आपले पहा म्हणत शिक्षकांच्या याचिका निकाली तर निघतात.पण संचालकांना साधा दंड होत नसल्याने,वा कार्यवाही होत नसल्याने संचालक मंडळी माजून गेल्यासारखी वागतात.त्यामुळे संचालक मोठा की न्यायालय मोठे ही स्थिती आज निर्माण झाली आहे.
आज देशात शेतक-यांचीही अवस्था अतिशय दयनीय असून कर्जबाजारीपणामुळं तो आत्महत्या करतो हे सर्वांना दिसतंय.पण हे कर्ज का काढावे लागले याची शहानिशा कोणी करीत नाही.हुंडा मागणे देणे हा गुन्हा जरी असला तरी मुलगी खपविण्यासाठी मेटाकुळीस येणारा शेतक-यांचा जीव,आधीच पीकांच्या अतोनात नुकसानानं लाचार झालेला शेतकरी,त्यातच त्याला लुटणारे दलाल,खरं तर त्यांच्या आत्महत्येस दलालच जबाबदार असतात.पण त्यांच्या आत्महत्येस दलालांना जबाबदार न धरता,हुंडा मागणा-यांना जबाबदार न धरता केवळ पिकाचं नुकसान झालं होतं म्हणून आत्महत्या केली असं मानणं किंवा म्हणणं चुकीचं जरी असलं तरी देशीय न्यायव्यवस्था त्यालाच सत्य मानून त्या दलालांना अभय देते.हुंडा घेणा-यांनाही अभय देते.
माझ्या बाबांजवळ हुंडा द्यायला पैसे नाही म्हणून आज आत्महत्या करणा-या मुलींची संख्या कमी नाही.शिवाय हुंडा म्हणून रक्कम कमी पडल्यास चक्क विवाहितेला जन्मभर छळणारे मुर्ख या देशात आहेत.नव्हे तर हे मुर्ख लाचार विवाहितेला जाळूनही टाकतात जीवंत.पण परीस्थीती सबळ नसल्याने व जवळ पैसाजी नसल्याने वधुपीता न्यायालयात दाद मागू शकत नाही माझ्यासारखा.अन् मागायला गेल्यास तब्बल न्यायालयाची वेळखावू खर्चीक अवस्था या लाचार मायबापाचे कंबरडे नाही मोडणार तर नवलच.अर्थात न्याय हा गरीबांसाठी नाही असंच म्हणावं लागेल.
महत्वाचं म्हणजे न्यायव्यवस्था ही सक्षम जरी असली तरी ती थोडीशी का होईना श्रीमंतांकडे झुकलेली वाटते.न्यायव्यवस्थेचे असे परीवलन बरोबर नाही.त्या व्यवस्थेनं श्रीमंतांभोवती पृथ्वी सारखं परीभ्रमणही करु नये.तर सुर्यासारखं अचल राहावं.न्याय करावा निरपेक्ष. तिच्याजवळ गरीब श्रीमंत असा भेदाभेद नसावा.तरंच ती भारतीय वंशाची शोभेल.नाहीतर इंग्रजांच्या न्यायव्यवस्थेत आणि आपल्या न्यायव्यवस्थेत काहीच फरकच उरणार नाही.
भीमराव विचार करीत असतांना त्याचं मन त्याला छळत होतं.एक मन म्हणत होतं की देशीय न्यायव्यवस्थेच्या बाबत मी तंग आलोय.यात माझा पैसा जातो.वेळंही जातो.त्याचबरोबर जाण्यायेण्याचा त्रासही होतो.वकीलानं म्हटलं की तुमची मुलगी मरण पावली.आता त्यांना जगू द्या.काय करायचं त्या मेलेल्या मुलीला न्याय मिळवून देवून.आता परत ती येणार आहे का न्याय मिळाला की नाही मिळाला हे पाहायला.त्यापेक्षा मी हा खटला सोडायला हवा.घरी पोटभर जेवन मिळत नाही.शेती पीकत नाही.सतत दुष्काळ.त्यातच विनाकामाचं हे दुखणं.तारीखवर तारीख.शेवटी लढलोच खटला तर न्याय मिळेल की नाही हे सांगता येणार नाही.मात्र वेळ व पैशाची बरबादी नक्कीच होईल. तर दूसरे मन म्हणत होते की हे नराधम सुधारणार केव्हा?आज तुझी मुलगी मारली.आज अजून दुस-याची मारतील.हुंड्यासाठी अशा लाचार बापाच्या मुलीचा सतत जीव जात राहणार.त्यांच्यावर वचक म्हणून तू खटला लढायलाच हवा.त्यातच तू त्या लोकांसाठी एक मिसाल बनावं.
पहिलं मन जरी त्याला छळत असलं तरी तो दुस-या मनासाठी खटला लढत होता.माझ्याच मुलीला नाही तर माझ्या मुलींसारख्या मुलींना न्याय मिळावा म्हणून.पण तो तग तरी किती दिवस धरणार.प्रतिपक्ष वकील प्रश्नांच्या सरबत्तीनं त्याला छळत नव्हते.तसंच न्याय मिळविण्याच्या मार्गात त्याचं विश्वकोटीचं दारिद्रय छळत होतं.कधी स्वतः उपाशी राहून तर कधी मुलाबाळांना उपाशी ठेवून खटला लढावा लागत होता.पण पदरात काय मिळत होतं.तारीखेवर तारखा.शेवटी तंग येवून त्यानं खटला सोडण्याचं ठरवलं.त्याला वाटलं की नियती देत बसेल त्या लोकांना सबक.आपण मोकळं होवून जावं.माझी मुलगी काही आनंद पाहायला येणार नाही.पोटंही पाहायला हवा.तसा तो आपल्या वकीलाला म्हणाला.जो सरकारी वकील त्याला मिळाला होता.
"सायेब,एक बोलू का?"
"बोला,काय बोलायचं ते."
"मले खटला सोडायचाय."
"का बरं?"
"असाच सोडायचाय.बरेच दिवस झाले ना.मले वाटते की माह्या पोरीले न्याय भेटन का नाय."
"का बरं असं वाटतंय? न्याय भेटेलच."
"पण सायेब केव्हा?"
"हं वेळ लागणारच आहे.लागतोच वेळ."
"सायेब नाय.मी थकलो आता.बरेच दिवस आलोय.आता पुरे.पुरं झाल्यासारखं वाटतंय.नियती देईन त्याईले जे शिक्षा द्याची असन ते.मी मात्र सोडतो खटला."
"नियती कशी देईल आपोआप शिक्षा? त्यासाठी लढायला हवं की नाही."
"हो सायेब.पण सायेब हा खटला लढाले पैसे तरी कोठून आणू?"
"तुम्हाला मी पैसे मागीतले का? अहो कोर्टात वकीलाचीही फी असते.ती तर तुम्हाला लागूच होत नाही."
"सायेब,तुमी जरी मले पैसे मागत नसले तरी याले जाले पैसा लागते न सायेब.सायेब माही शेती बी पीकत नाय.अन् लग्नाच्या दोन पोरी हायेत.त्याईचं पोट कसं भरतो ते माह्यं मलेच माहीत.तवा मले हा खटला बंद कराचा हाये."
"बरं.जशी तुमची इच्छा.मी एक फाम देतो.त्यावर सही करा.तसं मी कोर्टाला सांगतो."
वकील चांगला होता.पण भीमरावजवळ पैसा नव्हता.घरी पोट भागवणं जमत नव्हतं.त्यातच त्याच्या मनात आलेला असा कुविचार.वकीलानं फाम भीमरावच्या समोर ठेवला व म्हटलं,
"करा यावर सही.मी बोलतो तसं कोर्टात आणि कोर्टानं विचारलं तर सांगाल तसं.म्हणाल की मी स्वतःच माझी केस बंद करीत आहे.स्वखुशीनं.कोणाचा दबाव नाही माझ्यावर.स्वखुशीनंच करता नव्हं खटला बंद."
"हो हो."
"मग करा सही."
भीमरावनं त्या कागदावर सही केली.त्यावर काय लिहिलं ते ही त्यानं पाहिलं नाही.तसा तो कागद कोर्टाच्या समोर ठेवत वकील म्हणाला,
"सायेब,माझा पक्षकार खटला बंद करु इच्छित आहे."
"का बरं?"
"ते त्यालाच विचारा."
न्यायाधीशानं भीमरावला कठड्यात बोलावलं.दोन चार प्रश्न विचारले.कोणी दबाव आणला का तेही विचारलं.तसा तो म्हणाला,
"नाही सायेब."
तसे त्याच्या डोळ्यातून अश्रू टपकले.तो रडायला लागला.
"भीमराव रिलँक्स व्हा.रडू नका.बोला काय सांगायचं ते."
"सायेब,पोटच्या माह्या गोळ्याले मी लाडा प्रेमानं वाढवलं.ती आज जगात नाही.मग मी कोणासाठी लढू केस?"
"हे बघा मिस्टर भीमराव.खटले भावनेवर चालत नाही.तुम्ही अजून विचार करा.मी पुढची तारीख देतो."
"नाही सायेब.मले बंद कराची हाये केस."
त्यानं डोळे पुसले.
त्यानं डोळे पुसले.तसा वकील म्हणाला,
"साहेब यांनी खटला बंद करण्यासाठी मनाची तयारी केलेली दिसते."
"पण हा खटला बंद करणं योग्य होईल काय?" न्यायाधीश महोदय म्हणाले.
"हो.का होणार नाही? एखाद्याची इच्छा.खटला लढायचा की नाही त्यासाठी."
"तरीही मी पुढची तारीख देतो.मलाही न्याय देण्यासाठी व विचार करण्यासाठी वेळ लागेल की नाही."
"ठीक आहे साहेब." वकील महाशय म्हणाले.तशी न्यायाधीशानं पुढची तारीख दिली.
तारीख मिळताच तारीखवर तारीख असा विचार करीत भीमराव आपल्या गावी रवाना झाला.


आज पितृ श्राद्ध होतं.तसा तो विचार करीत होता.सर्व लोकं या दिवशी आपआपल्या मातापित्यांना घास टाकणार.कशासाठी? तर मायबापांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी.आपण त्यांची जीवंतपणी सेवा करु शकलो नाही, म्हणून त्यांच्या मरणानंतर त्याचं पूजन करुन जे आपण आपल्या मायबापाची सेवा न करण्याचं आपल्या हातून पाप घडलं.त्या पापावर परीमार्दन करण्यासाठी माणसानं पितृमोक्ष अमावस्येसारखा पर्याय शोधला.जसा मायबापांचा आशीर्वाद फुकटात मिळतो.
अलिकडे कावळेबोवाचीही संख्या कमी झालेली आहे.याचं कारण मानवाची प्रगती.माणसानं कारखान्यात नवनवीन वस्तू बनवल्या.पण त्या कारखान्यातून निघणा-या धुळीचा परीणाम सर्व सजीव सृष्टीवर झाला.तसाच कावळ्यावरही झाला.त्यामुळं साहजिकच कावळ्यांनाही भाव आला.कारण पिंडदानात कावळ्याला जास्त महत्व आहे ना.मायबापाची त्यांच्या जीवंतपणी सेवा नाही झाली तरीदेखील मायबापाच्या मरणानंतर या पिंडाला कावळा शिवल्यास पुण्य मिळतं. सर्व पाप धुतल्या जातं असा मानस आणि अशी प्रथाच पाडली आहे झोंग्यांनी.तसेच असा कावळा शिवला पाहिजे यात त्यांनी अंधश्रद्धाही आणली आहे.बरं झालं की तसाच हुबेहूब कावळ्याचा क्लोन बनवून तो शिवायला लावण्याचा शोध लागला नाही तर.नाहीतर कितीतरी पैसा या झोंग्यांना कमविता आला असता.तरीही आम्ही कावळा शिवायलाच लावतो म्हणत मायबापाच्या मृत्यूनंतर तर्पण करतांना जी पूजा केली जाते.त्या पूजेत काही लोकं मासोळी किंवा अंड्याचा नैवेद्य ठेवतात.मग कावळा पिंडाला शिवणार नाही तर काय? मग कावळा शिवतो आणि चुकीचा संदेश समाजात जातो की मायबापाची सेवा नाही केली तरी त्यांच्या मरणानंतर त्यांचं पूजन केलं.त्यांना घास टाकला की बस झालं.सगळं पाप धुतल्या जात.पण असं होत नाही.हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं.
भगवान श्रीराम जेव्हा वनवासात गेले.तेव्हा पुत्रवियोगानं राजा दशरथ मरण पावले.प्रभू रामचंद्राला पित्याच्या मृत्यूस हजर राहता आलं नाही.हे पाप घडलं.त्यामुळं त्या वडीलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रभू रामचंद्रानं वनवासात असतांना तर्पण केलं.हाच दिवस पितृमोक्ष अमावस्या म्हणून हिंदू धर्मात सुरु आहे.
प्रभू श्रीराम हे हिंदू धर्माचे आराध्य.म्हणून ही प्रथा आजही सुरु आहे.लोकं मायबापाच्या पात्राची पूजा करतात व आठवणीनं ते पात्र गाईला व कावळ्याला चढवितात.पण यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी की आपल्या बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थीव समयी हजर न राहण्यात दोष श्रीरामाचा नव्हताच.मुळात ह्याला या धर्मात विधीलिखीतचा हवाला देतात.पण जे लोकं विधीलिखीत या गोष्टीला मानत नाहीत.त्यांनी रामाचा आज्ञापणा लक्षात घ्यावा.पित्याच्या पार्थीव वेळी हजर नसण्याला प्रभू श्रीराम जबाबदार नाहीत.त्यांनी मायबापाची खुप सेवा केली,नव्हे तर त्यांच्या आज्ञेत वागले.
आज पितृमोक्ष अमावस्येच्या पूजेचं स्वरुप बदललं आहे.आज मायबापाच्या आज्ञेत वागणं दूरच.त्यांचे साधे बोलणेही जीवंतपणी माणसाला खटकते.तशी बहुतःश लोकं मायबापाची सेवा करीतच नाही.तसं त्याला एक उदाहरण आठवलं.
एका घरी तिच्या पतीची आई राहात होती.दोघंही पती पत्नी कामाला जात होते. स्वयंपाकघर वेगळं होतं.त्या स्वयंपाकघरात गॅससह स्वयंपाक बनवायच्या जीनसा होत्या.जेणेकरुन घरी राहणा-या सासूला जे लागेल ते बनवून खाता येईल.पण महत्वाची गोष्ट अशी की सासूनं आमच्या मागे काहीही स्वयंपाकघरात बनवून खावू नये म्हणून ती सुन त्या स्वयंपाकघराच्या दरवाज्याला कुलूप लावून जात होती.तिला गरज असतांना जेवन मिळत नव्हतं.चक्क कधीकधी तर उपाशी राहावं लागत होतं.
काही दिवसानं म्हातारी मरण पावली.त्यानंतर तो परीवार आपल्या म्हातारीचं पितृमोक्षला पूजन करु लागला.पण त्या पूजनाचा काय उपयोग.संकटाला कोणं सोडलं.प्रत्येकाच्या जीवनात येतातच.तसेच त्यांच्याही जीवनात आले. पण त्या म्हातारीचं मरणानंतर कितीही पूजन केले तरीही.जे संकट आलं.त्याला आपली म्हातारी सतावतेय असा विचार करुन त्यांनी दुसरा नवीन धर्म स्वीकारला.या धर्मात आता श्राद्ध बंदी होती.पण नवीन धर्म घेवून संकटानं आताही सोडलेलं नव्हतं.जी म्हातारी तडपत तडपत मरण पावली.त्याचा त्रास तिलाच झाला.या सुन आणि पुत्राला तिच्या जीवंतपणी पाहिजे तेवढा झाला नाही.पण मरणानंतर मात्र तिचा भयंकर त्रास जाणवत होता.जरी आत्मा परमात्मा कोणी मानत नसेल तरीही.मग तो संकटांच्या रुपानं का असेना.......
मायबापाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.पण ते जीवंत असतांना ती ईश्वरसेवा वाटत नाही.त्यांचा त्रास वाटतो.परंतू ते मरणानंतर त्यांच्यातला ईश्वर समजतो.खरं तर तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
आज हे मायबापाचं पितृमोक्षला पूजन करणं, या गोष्टीला व्यापारीपणा आला आहे.तुम्ही एवढी एवढी दक्षिणा द्या.मी तुमच्या हातून जेही पाप घडलं.ते धुवून टाकून देतो.तुम्हाला पितृदोष आहे.मातृदोष आहे असं म्हणत कोणीतरी झोंगी माणसं लोकांना फसवत आहेत.खरंच जे काम जीवंतपणी नाही झालं,ते काम मायबापाच्या मरणानंतर कितीही श्रद्धेनं केलं.तरी त्यावर फुंकर घालता येईल काय? मायबापाची सेवा न झाल्याचं जे पाप घडले.ते कितीही पूजा अर्चना केली.तरी ते पापच.ते पाप कसं धुता येईल? तसेच कितीही धर्म बदलवले तरी ते पाप समाप्त करता येणार नाही.त्यामुळं कोणी झोंगी कितीही पाप धुवून देतो हे जरी सांगत असला तरी त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही.तेव्हा हे जे पाप आहे.ते होवूच नये.आपल्याला पितृ मातृ दोष लागू नये.म्हणून मायबापाची त्यांच्या जीवंतपणीच जमेल तेवढी सेवा जमेल त्या प्रमाणात करायला हवी.मातृपितृदोष लागत नाही.कारण मायबापच देव आहेत आणि मायबापांनीच आताच्या काळातला देव आणि धर्म दाखवला आहे.
अलिकडे जे पितृमोक्ष पूजेला महत्व आलंय ना.ते महत्व अशाच झोंग्यांमुळं आलंय.हे झोंगी निव्वळ सोंग धतूरेपणा करतात.आपलं पाप कमी होतं की नाही होत हे काही आपल्याला दिसत नाही वा आपण पाहायला जात नाही.पण एक मात्र खरं की या झोंगी लोकांच्या निव्वळ बनवबुद्धीच्या गोष्टीनं आज मायबापाची सेवा करणे मुळातच बंद झाले आहे.जो तो मनात विचार करीत असतो की नाहीही मायबापाची त्यांच्या जीवंतपणी सेवा झाली तरी चालेल.एक तर्पण करु.पितृमोक्षला कावळ्याला घास टाकू.पात्राचं पूजन करु. एवढंच नाही तर कावळ्याला बोलवायलाही सांगू.ही सर्व कामे या झोंगी माणसांकडून करवून घेवू.म्हणजे झालं.आपली या मातृपितृदोषातून निर्दोष मुक्तता होईल.त्यासाठी मायबापाची सेवा करण्याची गरज नाही.
खरंच मायबापाची सेवा करण्याची गरज नाही का? खरंच मायबापाची सेवा न करता त्यांच्या मृत्यूनंतर पूजन (तर्पण) केल्यास पाप धुतल्या जाते का? पाप धुतल्या जात नाही व पुण्यही लाभत नाही. मग त्यांच्या जीवंतपणी सेवा न केल्यास त्यांच्या मृत्यूनंतर कितीही पूजन करा.असा विचार कोणीच करीत नाहीत.जेव्हा केव्हा असा विचार कोणी करेल.तेव्हाच ख-या अर्थानं पुण्य लाभेल.तसेच तेव्हाच ख-या अर्थानं पितृमोक्ष अमावस्येच्याही पूजेला अर्थ येईल.यात शंका नाही.

पुढली तारीख उजळली होती.तसा पुकारा झाला.तसा भीमराव सह सरकारी वकील व प्रतिपक्ष वकील न्यायालयात हजर झालेत.तशी सुनावणी सुरु झाली.न्यायाधीश महोदय बोलले,
"हं बोला भीमरावजी,काय विचार केलाय?"
"सायेब,मले केस बंद कराची हाय.मले खटला लढाचाच नाय."
"पण तुम्हाला पैशाचा प्रश्न नाही ना?"
"पण सायेब,याले जाले पैसा लागतेच नं.आन् आमची शेती बी चांगली पीकत नाय.तवा पैसा कुठून आणाचा?"
तसा प्रतिपक्ष वकील म्हणाला,
"ऑपजेक्शन माय लार्ड,ते म्हणत आहेत स्वतः,खटला बंद करतो तर करु द्या ना.त्यांना माहीत आहे की ते खटला चालवू शकत नाहीत.कारण त्यांच्याजवळ पुरावे नाहीत.खटले घटना मागत नाहीत.पुरावे मागतात.तसेच न्यायालयात भावना चालत नाही."
"ठीक आहे मग." न्यायाधीश महोदय म्हणाले.तसे न्यायाधीश महोदय सरकारी वकीलाला म्हणाले,
"वकीलसाहेब,यावर काही सांगाचं आहे का?"
"साहेब,खटला चालवणं हे काही माझ्यावर अवलंबून नाही.ते माझ्या पक्षकारावर अवलंबून आहे.तेच नाही म्हणतात,तर त्याला मी तरी काय करणार.तेव्हा आपणच याचा विचार करुन हा खटला बंद करावा.सगळी कागदपत्र मी यांच्या निवेदनात जोडलेलीच आहेत."
न्यायाधीश महोदयांनी सरकारी वकीलाचं ऐकलं.तसे त्यांनी न्यायालयाला दिलेले कागदपत्रही तपासलीत.त्याचबरोबर ते म्हणाले,
"याचा निर्णय मी पुढल्या तारखेला देणार."
अजून एक तारीख मिळाली होती.त्या तारखेला निर्णयाची सुनावणी होणार होती.प्रतिपक्ष चांगलं खुश होतं.त्याचबरोबर त्यांचा वकीलही.तसा भीमराव मात्र फार दुःखी होता.
पुढली तारीख अशीच आली.न्यायालय खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी भरलं होतं.तसे न्यायाधीश बोलके झाले.
"मी आज एका महत्वपूर्ण विषयावर निकाल ऐकवत आहे." तसे ते थोडे थांबले.आवंढा गिळला.सर्वांकडे एक कटाक्ष टाकला.तसे परत म्हणाले,
"विषय असा की भीमरावची मुलगी.कांता नाव तिचं.आरोपीवर तिचा खुन केल्याचा आरोप आहे.पण आरोपी तो खुन मान्य करीत नाही आणि न्यायालयही पुराव्यानिशी बोलू शकत नाही.त्यामुळं त्यांनी तिचा खुन केला की नाही हे सिद्ध होत नाही.
न्यायालयात भावनेवर निकाल लागत नसल्यानं जरी या भीमरावांचं सर्वांना खरं वाटत असलं तरी न्यायालयाला ते खरं वाटत नाही.त्यामुळं आरोपीची निर्दोष मुक्तता करणे होवून बसते.देशात अशी कितीतरी भीमरावसारखी मंडळी आहेत की जी अजूनही अशा अत्याचाराचे शिकार होत आहेत.कोणाचे बिनधास्त बळी जात आहेत.कोणी नववधू जाळल्या जात आहेत.अत्याचार करणारे अत्याचारी न्यायालयाला न घाबरता बिनधास्त अत्याचार करीत आहेत.शेवटी खालच्या न्यायालयात निर्णय दिलाही.तरी अपील.मग निकालानुसार अपीलावर अपील.अन् शेवटी नाहीच जमलं तर राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज.न्यायालय फाशी तरी कोणाला देणार.सगळी आपलीच माणसं.न्यायालयात येण्यापुर्वी ही माणसं पुरावे मिटवत असतात.काय सापडणार पुरावे मिटल्यावर.पण यानंतर तरी असं होवू नये.हे प्रकरण न्यायालयात असंच आहे.पण न्यायालयाला हे प्रकरण स्वतः लढविण्याचा अधिकार नाही.न्यायालयाचे हात बांधलेले आहेत आणि न्यायालय भावनेवर निकाल लावू शकत नाही.
कित्येक वधूपीते आज आपले काळ्याचे पांढरे केस करीत,न्यायालयात चपला झीजवीत वर्षानुवर्षे येत असतात.तेव्हापर्यत अस्तित्वात असलेले साक्षीदारही मरण पावतात.पुरावे नष्ट होतात.कित्येक भीमरावासारखे वधुपिते पैसा नसल्यानं शेवटी थकून,लाचार होवून न्याय मागणेच सोडतात.हे न्यायालयालाही माहीत आहे.पण ज्याप्रमाणे भीमराव सारखे लोकं लाचार दुर्बल असतात.तसंच न्यायालयही लाचार असतं.तेव्हा याही प्रकरणावर पुरावे नसल्याने शेवटी मी स्वतः सत्र न्यायाधीश या अंतिम निर्णयावर आलो आहे की कांता ही भीमरावाची मुलगी.जरी तिचा खुन झाला तरी तो खुन झालेला न्यायालय मानत नाही.कारण कोणताच पुरावा नाही.तसाच या दोघांमध्ये आपसी समझोता झाला असल्याने ह्या केसची फाईल न्यायालय स्वतः बंद करीत आहे.तसेच पुरावे नसल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करीत आहे.हाच माझा अंतिम निर्णय आहे."
न्यायाधीश महोदयानं कांता खुनाची फाईल बंद केली होती.तसा भीमराव आपल्या दुर्बलतेवर रडत होता.त्यालाही वाटत होतं की न्याय मिळावं.पण तो तरी काय करणार.तो दुर्बल तर होताच असहाय ही होता.

एकदा भीमराव पारावर बसला होता.तसा त्याला विचार आला. देशात सक्षम असं न्यायालय आहे.या न्यायालयाच्या माध्यमातून लोकं न्याय मागत असतात.लोकांवर अन्याय झाल्यास.पण खरंच न्याय मिळतो का न्यायालयाच्या माध्यमातून असा जर विचार केला तर त्याची टक्केवारी जेमतेम दहा ते वीस टक्के एवढीच येईल.मग बाकी प्रकरणाचं काय होतं? तर बाकी प्रकरणात लोकं काही प्रकरणं अर्ध्यावर बंद करतात.तर ब-याचशा प्रकरणात समझोत्याचे करार होतात.जरी नुकसान झालं तरी. काही प्रकरण पुराव्याअभावी समाप्त होतात.अर्थात जी काही प्रकरणं असतात.त्या प्रकरणात न्यायालय सक्षमपणे काम करीत नाही.तर लाचारी स्विकारल्यागत वागत असतं.
बरीचशी खुनाची तसेच मालमत्तेची अशी काही प्रकरणं असतात की ज्या प्रकरणात निकाल लागत असतांना बराच वेळ लागतो.इतका वेळ लागतो की कित्येक साक्षीदार मरण पावतात.पुरावे नष्ट होतात.केसं काळ्याची पांढरी होतात.तसेच शरीर थकतं.त्याचबरोबर मनही.कित्येक चपलांची जोडही झिजतात.कित्येक गोष्टी वयाच्या मानानं लक्षात राहात नाहीत.तर शरीराच्या थकतेपणानुसार बहिरेपणा व आंधळेपणाही काही प्रमाणात आलेला असतो.वाणी काम देत नाही.अशावेळी न्यायालयात निर्णयाची प्रक्रिया सुरु असते.खरंच न्यायालयाचं असं वागणं.कोणत्याही खटल्याला वेळ लागणं न्यायालयाचं लाचारपण दाखवत नाही काय? अशा प्रकारच्या न्यायालयाच्या वागण्यामुळं न्यायदानात निःपक्षपातीपणा राहात नाही.न्यायालय काही अंशी आरोपींच्या बाजूला झुकतं.
न्यायालयाच्या वाट्याला शहाण्यांनी जावू नये असं म्हणतात.न्यायालयात वाळलेलाही जळतो व ओलाही जळतो असं म्हणतात.न्यायालयात वेळ लागतो.विनाकारण पैसाही खर्च होतो असं म्हणतात.ते खरं आहे.मग न्याय कसा मिळेल?
आज गुन्ह्यांच्या संख्येत बरीच वाढ होत आहे.झालेली आहे.सामान्य माणस आज न्यायापासून वंचित आहे.न्याय गराबांसाठी राहिलेला नाही. ज्याच्याजवळ पैसा, त्यांनीच न्यायालयात जावं किंवा न्यायालयाचं दार ठोठावावं असं न्यायालय सांगत जरी नसलं तरी ते आज लोकांना समजलेलं आहे.ज्याप्रमाणे द्रोपदीचं वस्रहरण केवळ अंध ध्रृतराष्ट्रामुळेच घडलं नाही,तर तिथे बसलेल्या व डोळस असलेल्या भीष्म पीतामहा,आचार्य द्रोण,कृपाचार्य तसेच पाच पांडवामुळं घडलं.कारण ते डोळस असूनही आंधळेपणाची भुमिका त्यांनी स्विकारलेली होती.पांडव तिचे आपले जरी असले तरी त्यांनीच तिला डावावर लावले होते.
आज आमचीही परिस्थीती त्या द्यूतसभेत बसणा-या लोकांसारखीच आहे.जे पांडव तिचे आपले असून ज्या पांडवानं तिला डावावर लावले होते,तेच पांडव आजही आहेत.फरक एवढाच पडला आहे की ते आपले आप्त बनले आहेत.एखादा गुन्हा घडलाच तर ते पहिलं आपलं खच्चीकरण करतात.विरोधी पार्टी ही बलिष्ठ आहे.ते.आपल्याला सोडणार नाहीत.पैशानं सक्षम आहेत असं पहिलंच सांगून आपली मानसिकता पहिलंच खचवून टाकतात.तसेच आजचे वकीलही आचार्य द्रोणाचार्य कृपाचार्यची भुमिका घेतात.तर साक्षीदार भीष्माची भुमिका घेतात.मग न्यायाधीश ध्रृतराष्ट बनणार नाही तर काय? तो आंधळा मग कोणता न्याय देईल.पण ज्यानं इज्जत वाचवली तो क्रिष्ण मात्र आजच्या या काळात तो क्रिष्ण बनायला कोणीच तयार नाही.म्हणूनच दररोज इथे द्रोपद्यांचं वस्रहरण होत असतं.अर्थात दररोज अत्याचार होत असतात.अत्याचारींना न्यायालयात शिक्षेची पाहिजे त्या प्रमाणात तरतूदच नसल्यानं त्या अत्याचारींच्या संख्येत वाढ होत असतांना दिसते व न्यायालयही लाचार असल्यासारखे भासते.
आजही कित्येक प्रकरणं अशी आहेत की ज्या प्रकरणात आरोपीने साक्षीदारांना मैनेज केलेले असते.साक्षीदारांना पैशानं खरेदी केल्यामुळं साक्षीदारही ऐनवेळी न्यायालयात आपली साक्ष बदलतांना दिसतात.कधी काळी आरोपींनी त्यांना मदत केल्यानं काही साक्षीदार आरोपीच्या विरोधातही जात नाहीत.ज्याप्रमाणे महाभारतात दुर्योधनाने इतरांना मदत करुन झुकवले होते.कर्ण बोलू शकत नव्हता.कारण त्याला अंगदेशचं राज्य दिलं होतं.तर शकुनी आणि दु:शासन हे त्याच्याच बाजूला होते.अशीच गत आज न्यायालयाची झालेली आहे.न्यायालयात सामान्य माणसांना न्याय मिळेल की नाही हे सांगता येणे कठीण आहे.त्यामुळेच न्यायालय लाचार झाल्यागत वाटत आहे.मग सामान्य जनतेचे काय?त्यांचेही हालहाल होत आहेत.त्यांचा न्यायालयावर विश्वासच उरलेला नाही.काय करावे त्यांना सुचेनासे झाले आहे.दिवसेंदिवस आरोपींची संख्या वाढतच आहे.गुन्ह्याचीही संख्या वाढतच आहे.हे असेच जर सुरु राहिले तर उद्या सामान्य माणसेच नाही तर देशही रसातळास जायला वेळ लागणार नाही.
भीमरावनं न्यायालयाबद्दल केलेला विचार आज रास्त होता.त्याची दुर्बलता म्हणा की न्यायालयाची दुर्बलता तो आपल्या मुलीचा खटला हारला होता.त्याला न्यायालयाबद्दल असुया वाटत होती.त्या न्यायाधीशानंही त्याला म्हटलं होतं की खटला मधातच सोडू नको.पण तो तेवढा सक्षम नव्हता.त्या खटल्याला तसा भरपूर वेळ झाला होता.आतापर्यंत नाही तर याही पुर्वी ह्या खटल्याचा निकाल लागायला हवा होता.पण तारखेवर तारखा पडल्यानं खचल्यात पाहिजे त्या प्रमाणात धार राहिली नव्हती.खटल्याच्या दिरंगाईमुळं त्याला खटला न्यायापुर्वीच सोडावा लागला होता.चूक त्याची जरी असली तरी तो कोर्टालाच दोष देत होता.त्याला वाटत होतं की न्यायालयानं जर दिरंगाई केली नसती तर कदाचित आज आपल्या मुलीला न्याय मिळाला असता.पण झालं उलट होतं.
तो कधीकधी याबद्दल लोकांजवळ बोलत असे की न्यायालयामुळं माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही.त्यावर कोणीतरी म्हटलं होतं की असं त्यानं बोलू नये.हा न्यायालयाचा अपमान आहे.कोणी नक्कीच तुझ्यावर केस करेल.तेव्हा त्याला विचार यायचा की हे न्यायालय.हे न्यायालय आरोपींना पुराव्याअभावी सोडून देते.ज्या दिरंगाईतून पुरावे मिटतात.ती दिरंगाई करणे म्हणजे न्यायालयाचीच चूक आहे तरीही.न्यायालयानं काहीही केलं तरी चालतं आणि सामान्य माणसानं काही साधं बोलणं हा न्यायालयाचा अपमान ठरतो.
कधीकधी वर्तमानपत्रात छापून येत होत्या न्यायाधीशाबद्दलच्या गोष्टी.तसेच एका आतंकवादी माणसाला फाशी झाली असतांना न्यायालय रात्री उघडलं होतं.या गोष्टी भीमरावने वर्तमानपत्रात वाचल्या होत्या.त्याला न्यायालयाची ती भुमिका रास्त वाटत नव्हती.त्यामुळं तो बोलत होता न्यायालयाच्या विरुद्ध.
संधी........न्यायालय आरोपींना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी संधी देत होते.त्यासाठीच वेळ लागत होता.त्यामुळं आरोपींना स्वतःला निर्दोष सिद्ध करता येत होते.पण भीमरावला वाटत होतं की अशाच दिरंगाईतून आरोपी सुटतात व ते पुढे गुन्हे करायला मोकळे होतात.न्यायालयाची ही भुमिका त्याला आवडत नव्हती.न्यायालयाचा असा आरोपींना वेळ देणे त्याला आवडत नव्हते.याच वेळेच्या दिरंगाईनं आपली लाडाची मुलगी कांता आज जगात जरी नसली तरी तिला न्याय मिळालेला नाही असं मनोमन त्याला वाटत होतं.आपल्या नशीबाचं खापर तो न्यायालयावर फोडत होता.तो व्यथीत होता. कारण त्याची शेती पीकली नव्हती.
आनंद फारच खुश होता.त्याची तर न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली होती.त्यानं कांतासारख्या निष्पाप जीवाचा बळी घेवूनही व स्वतः गुन्हा करुनही तो निर्दोष सुटला होता.तशी त्याची हिंमत अजून वाढली होती.आज त्याला वाटत होतं की आपण न्याय बदलवू शकतो.इतपत मजल त्यानं मारली होती.

शेतात दृष्टचक्र सुरुच होतं.देशात कोरोना आला होता.त्याचप्रमाणं शेतातही कोरोना शिरला की की काय? असं वाटत होतं.यावर्षी शेतात सोयाबीन होतं.रोपं मोठी झाली होती.ती चांगली दिसत होती.त्याला फुलंही धरली होती.त्यामुळं यावर्षी चांगलं पीक येईल असं वाटत होतं.पण जशी झाडांना फुलं धरली.त्यानंतर टिपीर टिपीर पावसाला सुरुवात झाली.पाऊस संततधार सुरु होता.सुर्याचा पत्ता नव्हता.तसं त्या पावसानं सोयाबीनची पानं पिवळी पडायला लागली.पानानं स्वतःचं अन्न बनवणं बंद केलं.त्यातच काही रोपे करपली तर काहींना दोनचार शेंगा पकडल्या.त्या शेंगाही पुर्ण भरलेल्या नव्हत्या.शेवटी शेताची ती अवस्था पाहून काहींनी ते पीक कापलं नाही.त्यांना वाटत होतं की सोयाबीनच्या कापणीचे पैसेही निघणार नाहीत. मात्र भीमरावनं आशेनं ते पीक कापलं.परंतू त्याला जे पीक आरजलं,ते पीक कापणीच्या मजूरीपेक्षाही कमी होतं.अर्थातच भयंकर नुकसान झालं होतं.कोरोना देशात होता.लोकांचे कित्येक बळी घेतले होते त्याने.मात्र या पावसानं शेतातील पीकांचा बळी घेतला होता.
भीमराव शेतीसंबंधी विचार करीत होता.आज देशात शेती करायला कोणी पाहात नाही.लोकं शेत्या विकत आहेत.कारण शेती पीकत नाही.आत्महत्येचं सत्र सुरु आहे.सरकारी मदत पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यानं शेतक-याचं अतोनात नुकसान होत आहे. त्याचबरोबर देशात कोरोनाचं सत्र सुरु आहे.सर्वत्र भीतीचं वातावरण आहे.लाकडाऊनचा असर अजूनही देशात आहे.कामधंदे सुरु झाले आहेत.पण अजूनही ब-याच लोकांना कामं मिळालेली नाहीत.काही लोकं अजूनही खाली आहेत.
देशातील बराचसा भाग हा शेतीवर अवलंबून आहे.लोकांनी आपल्या शेतात शेतमालाची पेरणी केली.शेतात पीकं चांगलीही होती.मात्र जेव्हा सोयाबीन फुलावर आलं.तेव्हा मात्र पाऊस सुरु झाला.तो पाऊस टिपीर टिपीर सुरु झाला.त्यामुळं पीकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली.अर्थात त्या पावसानं पीक कोमेजण्यास मदत झाली.
पीकांच्या वाढीला लागणारा सुर्यप्रकाश.या काळात सुर्य निघालाच नाही.त्यामुळं या सुर्यप्रकाशानं वनस्पतीच्या पानात जी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते.त्यातून वनस्पती अन्न निर्माण करतात.ते वनस्पतींना करता न आल्यानं वनस्पतींना पुरेसं अन्न मिळालं नाही.महत्वाचं म्हणजे यातून रोपांची पानं पिवळी पडली.त्यातच अख्खं झाड करपलं.तसंच काहींची फुलं करपली.काहींना शेंगा लागल्या.पण त्याही पोचट.त्यामुळं काही भागात ही सोयाबीन कापता येणं शक्य नाही.अशी स्थिती एकंदर ब-याच लांबपर्यंत दिसत आहे.त्यावरुन असं वाटत आहे की शेतक-यांच्या शेतात यावर्षी कोरोना तर शिरला नाही.
एकीकडे हा कोरोना घरी राहिल्यास लोकांना उपासानं मारत आहे.दुसरीकडे हा कोरोना कामावर गेल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव होवून आजारानं मारत आहे.अशावेळी काय करावे लोकांना सुचत नाही.अशातच सरकारपुढेही पेच निर्माण झाला आहे.या कोरोनासारख्या आजारावर मात कशी करावी? हा प्रश्न सरकारपुढे उभा आहे.लाकडाऊन लावलं तरी लोकं मरतात.नाही लावलं तरी लोकं मरतात.त्यामुळं सरकारलाही सुचेनासे झाले आहे.त्यातच आता शेतक-यांच्या पीकांचं नुकसान.कदाचित हे होत असलेले नुकसान कदाचित कोरोनाचं तर लक्षण नाही.कदाचित कोरोनानं पीकांना तर छळलं नसावं असं वाटायला लागलं आहे.
शेतकरी आत्महत्या.........अशाच शेतकरी आत्महत्या होत असतात.शेती करण्यासाठी बियाणे खते घेण्यापासून तर पुढं पीक हातात येईपर्यंत सतत शेतक-याला पैसा लावावा लागतो.नांगरणी करणे,बीयाणे घेणे,ती पेरणे,त्यानंतर खते टाकणे,निंदण करणे,डवरा मारणे,पाणी देणे, किडनाशक तणनाशक मारणे,कापणे,मळणी यंत्राने धान्याचे विलगीकरण करणे,ते बाजारपेठेत नेणे इत्यादी सर्व कामे शेतकरी आपल्या शेतात करतात.या सर्वच गोष्टीला पैसा लागतो.मग आशा असते की धान्य विकल्यावर हा पैसा निघेल.पण असा पैसा जर निघत नसेल तर शेतकरी जगणार कसा? कर्जही काढेल.पण ते कर्ज केव्हापर्यंत मिळेल.कोण केव्हापर्यत कर्ज देईल.सततचा दुष्काळ जर पाचवीलाच लागला असेल शेतक-यांच्या तर शेतकरी कसा जगेल? हाही प्रश्न आहे.
शेतकरी जगला पाहिजे.शेतकरी जगेल तर देश जगेल.पण जिथे अख्खा देश कोरोनाच्या संकटात असतांना व पीकांचीही अशा स्वरुपाची अवस्था असतांना देश तरी कोणते पाऊल उचलणार हा न उलगडणारा प्रश्न आहे.देशालाही वाटते शेतकरी जगावा.पण अशा शेतक-यांची संख्ख्या बोटावर मोजण्याएवढी असते का? याचं उत्तर नाही असंच आहे.
महत्वाचं म्हणजे सरकारला जरी वाटत असेल की शेतकरी जगला पाहिजे तर सरकारनं एक काम कमी करावं आणि ज्या भागात असं नुकसान झालं, त्या भागातील लोकांना सरकारनं नुकसान भरपाई द्यावी.कारण शेतकरी जगेल तर देश जगेल.जर अशी नुकसान भरपाई शेतक-याला मिळाली नाही तर असे शेतकरी आत्महत्येने मरतील.मग शेती करायला कोणी वाली उरणार नाही.शेती होणार नाही.धान्य पीकणार नाही.कोणी पीकवणार नाही.मग जिथे शेतीच पीकणार नाही.तिथे पोटाला अन्न तरी कोठून मिळणार.तेव्हा ही परिस्थिती येवू नये.म्हणून त्याला जगविण्यासाठी सर्व समाजातील घटकांनी मदत करावी.जेणेकरुन शेतकरी जगेल तर देश जगेल असं म्हणता येवू शकेल.
कांता पुराण कांताच्या मृत्यू व खटल्यानंतर बंद झालं होतं.त्याची बाकीची मुलंही शिकत होती.तो आपल्या मुलांना शिकवीत होता.त्याला आता वाटत होतं की मुलं शिकली की आपला भाग्योदय झाला.त्याची इच्छा ही तशीच होती.त्याला वाटत होतं की माझ्या अजून असलेल्या तीन मुलांपैकी कोणीतरी वकील बनावा.कारण त्यानं जो कांताचा खटला लढला होता,त्या खटल्यानुसार त्याला मिळालेला सरकारी वकील व न्यायाधीश चांगले होते.तरीही त्याला खटला हारावा लागला होता.तो आपल्या पराभवाचं खापर वकील व न्यायाधीश वर फोडत नव्हता.तर त्याचा दोष प्रारब्धावर लावत होता.प्रारब्ध असं होतं की त्या प्रारब्धामुळं त्याला खटला वेळीच सोडावा लागला होता.तसं पाहिल्यास विलंबही त्याला जबाबदार होतं.त्याला वाटत होतं की वकीलांचा पेशाच तो.प्रतिपक्ष वकील तसं बोलणारच नाही तर तो खटला कसा जिंकेल.देश जर स्वतंत्र आहे तर प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे.आरोपींना जिंकवणं हा त्यांचा उद्देश नसतो.पण पेशापुढं त्यांना शरणागती पत्करावीच लागते.
वकील म्हटलं की माणसासमोर येतो तो काळा कोट घातलेला खोट्याचं खरं करुन दाखविणारा आणि अस्सल खोटं बोलून खटले आरोपी असो की पक्षकार यांच्या घशात घालणारा सद्गृहस्थ.जे खटला हारतात.ते वकीलाला नावबोटं ठेवतात.जे जिंकतात.ते मात्र वकीलाची प्रशंसा करतात.
प्रत्येक खटल्यात हारजीत असतेच.पराभव हा ठरलेला असतोच.खटले जिंकणे वा हारणे यात वकीलाचा मुळात दोषच नसतो.तो आपले प्रयत्न करीत असतो इमानदारीनं.तो कोणाचा खटला लढत आहे.त्या खटल्याची पाश्वभुमी काय,हे त्या वकीलालाही माहीत असते.तरीही तो लढतो.आपली बाजू इमानदारीनं मांडतो.त्यात त्याचा उद्देश कोणाचे मन दुखावणं हा नसतो.
देशात जेव्हा संविधानानं जन्म घेतला.तेव्हा त्या संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्रता प्रदान केली.तसेच या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून आपले आपले मत मांडण्याचा अधिकारही प्रत्येकाला मिळाला.तसेच कोणावर अन्याय झाल्यास त्यावर दाद मागण्याचाही अधिकार संविधानाअंतर्गत मिळाला.मग ह्या अन्यायाची बाजू स्वतः मांडा किंवा दुस-याला मांडायला सांगा.
न्यायालयात कामकाजाची जी भाषा आहे.ती भाषा प्रत्येकाला समजेल अशी नाही.त्यात जमीन आसमानाचा फरक आहे.ती सामान्य लोकांना समजतच नाही.ती भाषा इंग्रजी आहे.तसेच न्यायालयात आपल्यावर झालेल्या अन्यायार्थ दाद मागण्यासाठी सर्व प्रकारची लोकं येतच असतात.त्यांना ही न्यायालयाची इंग्रजी भाषा कळते असं नाही.तेव्हा ही भाषा ज्याला कळते असा व्यक्ती आपल्याला हवा असतो.त्याला वकील म्हणतात.ह्या वकीलाच्या माध्यमातून आपण आपली बाजू मांडत असतो.मग वकील आपली बाजू आपल्या अक्कहुशारीने न्यायालयात मांडत असतो.त्यात त्याची तेवढीच इमानदारीही असते.मग शेवटी कोणतातरी एक पक्ष जिंकतो.यात दोष वकीलाचा नसतो.
पोट.......प्रत्येकाला पोट असतं.ते पोट भरण्यासाठी प्रत्येकजण कामे करीत असतात.त्यातून वकील कसा सुटेल.वकीलही कामे करीत असतात.संविधानानुसार प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार असल्यानं त्यांच्याकडे जो जो जातो.त्यांचीही ते बाजू मांडत असतात.मग कोणाकडे पैसा असो वा नसो.ते त्याचा विचार करीत नाहीत.ते त्या बाजू मांडण्यावर आपलं शुल्क आकारतात.काहींचं शुल्क जास्त असतं तर काहींचं कमी असतं.काही तर शुल्कच घेत नाहीत असेही काही वकील आहेत.तर काहींचं शुल्क एवढं असतं की ते सामान्यांना परवडत नाही.असे वकील हे सर्वसामान्य लोकांचे खटलेच घेत नाहीत.ते वकील उद्योगी वकील या गटात मोडतात.ते हुशार असतात.आपली बाजू कशी मांडायची,ते त्यांना कळते.ते जरी न्यायालयात उभे राहिले तरी न्यायाधीश समजून घेतात की ह्या खटल्यात काय असेल.असे वकील शक्यतोवर अन्यायग्रस्तच लोकांचेच खटले घेतात.कारण त्यांना खोटं बोलून पाप करणं आवडत नाही.याचा अर्थ असा नाही की बाकीची वकील मंडळी खोटं बोलतात! तेही पक्षकारांची बाजू इमानदारीनंच व तेवढीच पोटतिडकीनं मांडतात.खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही.या बाजू मांडण्यात त्या वकीलांचं चुकत नाही तर चुकतं ते आपलं.आपला गुन्हा जरी असला तरी आपण आपल्या वकीलाला आपली बाजू सांगतांना अगदी खोटं बोलूनच सांगतो.खरी गोष्ट सांगतच नाही.हे त्यांना माहीत नसतं.म्हणून ते आपण सांगीतलेल्या गोष्टी न्यायाधीशासमोर खरं खरं बोलूनच खरं खरं प्रतिपादन करीत असतात.मग ते जिंकतात.त्यांचं मात्र एकच चुकतं.ते म्हणजे शुल्क.ते शुल्क सर्वसामान्यांना परवडणारं नसल्यानं सर्वसामान्य लोकांना हाराचा सामना करावा लागतो.
वर्तमानकाळानुसार वकीलाच्या बाबतीत ठरवायचं झाल्यास वर्तमानकाळातील स्थिती फार भयंकर आहे.वर्तमानकाळातील वकील हा भरपूर शुल्क घेणारा आहे.त्यामुळं सामान्य लोकांनी आपली बाजू कशी मांडावी.हा प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारी वकील असतात.पण हे सरकारी वकील दमदार खटले लढत नाहीत अशी मानसिकता देखील लोकांची बनलेली आहे.तसेच ही सरकारी वकील काही काही खटल्यातच मिळतो.अशावेळी सर्वसामान्य लोकांसमोर निर्माण झालेला प्रश्न हा चिंतेचा विषय बनला आहे.वकीलाला ह्या वर्तमानकाळात न्यायाची देवता मानली जाते.पण असे जर संभ्रमाचे प्रश्न निर्माण झाले तर कधी कधी वकीलावरचा विश्वास उडतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास वकील हे हुशार असतात.त्याच हुशारीचा फायदा घेवून ते खटले लढत असतात.त्यात काही उद्योन्मुख असतात.परंतू तरीही सर्वसामान्य लोकांची एक इच्छा आहे की अशा उद्योन्मुख वकीलांनींही काही अशाही लोकांचे खटले लढावेत.ज्यांच्यावर खरंच अन्याय झाले आहेत.पण त्यांची परिस्थिती बेताची असल्यानं ते वकील करु शकत नाही व अन्याय झाल्यास दादही मागू शकत नाहीत.कारण वकीलाचा पेशा मुळात पैसे कमविण्यासाठी नाहीच.
आज देशात श्रीमंत आणि गरीब असा भेद निर्माण झाला आहे.श्रीमंत मंडळी हे गरीबावर नेहमी अत्याचार करीत आहेत नव्हे तर करु लागले आहेत.कोणी त्यांच्याकडून कामे काढून तर घेतात.पण त्याबदल्यात द्यायला हवे असलेले वेतन देणार असे कबूल तर करतात.पण ते देत नाहीत.काही लोकं एक एक रुपया जोडून मकान तर बांधतात.मग आपला उदरनिर्वाह चालावा म्हणून किरायेदार ठेवतात. त्यात ठेवलेले किरायेदार हे बदमाश प्रवृत्तीतून मकानाचा किराया देत नाहीत.मकान मालकाजवळ असे खटले लढायला पैसाही नसतो.काही ठिकाणी बालकामगार म्हणून कामाला लावले जाते.रोजच अत्याचार होतात.तर काही ठिकाणी चक्क श्रीमंतांची माजलेली मुलं बलत्कार करतात.काही ठिकाणी हुंड्यासाठी नववधू छळल्या जातात.जाळल्याही जातात.वधूपिते आधीच अशी रक्कम देत असल्याने नंतर त्यांच्याजवळ पैसा नसतो.तर काही ठिकाणी सावकारी अत्याचारही होत असतो.या ठिकाणी खरंच सर्वच वकीलांनी एक सेवाभाव म्हणून सेवा देण्याची गरज आहे.अशी प्रकरणं जास्त नसतात.
अत्याचाराने आज सरकारी कार्यालयांनाही सोडलेले नाही.सरकारी कार्यालयातही वरीष्ठ कर्मचारी कनिष्ठ कर्मचा-यावर अत्याचार करीत असतात.जणू तो कर्मचारी त्याच्या घरचा नोकर आहे असे वागत असतात.पण रोजीरोटीसाठी त्यांनाही चूप बसून अत्याचार सहन करावा लागतो.
आज समाजात होत असलेला अत्याचार रोखण्याची गरज आहे.हे काम वकीलच करु शकतो.पण त्यानं आपला लोभ सोडला तर......देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी बरीचशी मंडळी ही वकीलच होती.त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देतांना आपल्या प्राणाची पर्वा केली नाही.म्हणूनच देश स्वतंत्र झाला. आज होत असलेल्या अत्याचारावर फुंकर घालण्याची गरज आहे.या अत्याचारांना वकीलच मंडळी रोखू शकतात.त्यांनी ख-या अर्थानं प्रयत्न केला तर........वकील हेच देशाचे खरे आधार स्तंभ आहेत.पण त्यांनी काहीअंशी आपलं पोट बाजूला ठेवलं तर.......हं प्रत्येकालाही पोट आहे.ते पोट त्यांनाही आहे.पण त्यांनी निदान सर्वसामान्यांच्या बाबतीत नाममात्र शुल्क घ्यावं.जे शुल्क ते देवू शकतील.तसेच सर्वसामान्य गरीबांचेही खटले घ्यावेत.तसेच जाणुनबुजून जे पेशावर मंडळी गुन्हे करीत असतात.त्यांचे खटलेच लढू नये.अर्थात त्यांना बाजचू मांडू देवू नये.जेणेकरुन ते वकील बाजू मांडायला मिळत नाही म्हणून गुन्हे करणार नाहीत.(जसा कसाब) तसेच शासनानेही यासाठी जी आर बनवावा की जे वकील दारीद्र्य रेषेतील लोकांचे खटले लढणार नाहीत.त्यांचं सदसत्व रद्द केल्या जाईल.त्यासाठी विशिष्ट कोटा असावा.असं जर झालं तरच देशाची न्यायव्यवस्था बळकट बनेल व देशही बळकट बनायला वेळ लागणार नाही.अत्याचार कमी होतील.तसेच पेशालाही लोक हिणवणार नाहीत.त्यासाठी वकीलांनाही त्याग करायला हवा.आता राहिलं पोट.मग हा देह ज्या विधात्यानं जन्माला घातला, त्याची व्यवस्थाही त्यानं करुनच ठेवली आहे.मग खोटं बोला की नको बोला.खोटं बोलून कितीही संपत्ती गोळा केली तरी आलेलं धन हे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जातंच.कोणाला असाध्य आजार होतात.तर कोणाची मुलं बेगडी निपजतात.जर आपलं कर्म चांगलं असेल तर त्याचंही फळ नक्कीच चांगलं मिळेल या भावनेतून वकीलांनीही विचार करावा व न्यायात पारदर्शकता आणावी.जेणेकरुन सामान्य लोकंही न्यायपालिकेला नावबोटं ठेवणार नाहीत.तसेच वकीलाचंही नाव होईल आणि त्याचबरोबर देशाचंही नाव अजरामर व्हायला वेळ लागणार नाही.
कांता निघून गेली होती देवाघरी.कोमल नयना आता उपवर झाल्या होत्या.त्यातही त्या शिकतच होत्या.भीमराव त्यांना शिकविण्यासाठी हाडाचं पाणी करीत होता.तो आणि त्याची पत्नी काबाडकष्ट करीत असत.पण पोरींना शिकवीत असत.तसं पाहिल्यास लेकीच्या जातीला स्वातंत्र्यच नव्हतं.
मुलगी खरंच पराया धन.लोकं असच म्हणत असत.पण मुलगी काही पराया धन असते काय?ती इतरांसाठी पराया धन जरी असली तरी मायबापासाठी पराया धन नाही असं भीमरावला वाटत होतं.प्रगतीचा आधार असते मुलगी असं भीमराव मानत होता.

भीमरावला वाटायचं की आज मुलगी शिकली आहे.सुसंस्कृत झाली आहे.पण तरीही जुन्या प्रथा तिनं सोडलेल्या नाहीत.आजही ती त्या प्रथा,परंपरा घेवून चालतांना,वागतांना दिसते.म्हणूनच मुलगी ही पराया धन. आजचा सुधारलेला समाज असं जरी मानत नसला तरी जुन्या पीढीनं मुलीला पराया धन म्हटलेलं आहे.त्याचं कारणही तसंच आहे. मुलगी लहानाची मोठी मायबापाच्या घरी होते.शिकते आणि नोकरीलाही कधीकधी मायबापाच्याच घरी लागते.असं परीपुर्ण झाल्यानंतर मग मुलगी उपवर झाली असं समजून त्या मुलीचा विवाह केला जातो.एक साजेसा मुलगा बघून.
मुलगी आपल्या साजेस्या मुलाशी आपला जोडीदार समजून विवाह करुन सासरी जाते.ती आता त्याच घराला स्वतःचं माहेर समजते आणि त्याचबरोबर ती तेथील चालीरीती,रितीरीवाज शिकण्याचा प्रयत्न करते.तसेच तिच्या माहेरमध्ये ती जशी वागली,त्या गोष्टी तिला तिथे करता येत नाहीत.
मुलगी सासरी जाते.तिला मायबापाची आठवणही येते.मायबापाच्या घरी ती जशी वागली,तसं वागावसं वाटतं.पण त्याला मर्यादा पडतात.कारण मायबापाच्या घरचे रितीरीवाज,परंपरा वेगळ्या असतात तर सासरच्या परंपरा वेगळ्या असतात.तिथे तिला अल्लड वागता येत नाही.
मुलगी ही लक्ष्मीचं रुप आहे असे काहीजण म्हणतात.कोणी तिला वेगवेगळी रूपं देतात.त्यातच कोणी तिला धन समजतात.ती धनच असते मायबापासाठी.कारण मुलगी जन्माला आली की तिचा विवाह करावा लागणार.तिच्या सासरच्यांना हुंडा द्यावा लागणार.यासाठी मायबाप दिवसरात्र राबराब राबून पैसा गोळा करीत असतात.त्यामुळं ते धन, तिच्यासाठी का होईना गोळा होत असते.मग तिचं जेव्हा लग्न होतं,तेव्हा ती जेव्हा सासरी जाते.ती सासरी जात असतांना हुंड्याच्या स्वरुपात भरपूर रक्कम घेवून जाते.त्याचबरोबर गळ्यातलं कानातलंही.त्यातच त्या हुंडा स्वरुपात आलेल्या पैशानं वरपक्ष बळकट बनत असतो.त्याचबरोबर ती सासरी जाते,तेव्हा आपलं आडनावही घेवून जात नाही.पतीचं आडनाव मिळतं तिला.तसंच तिचं जे कमावलेलं धन असतं,ते धन शक्यतोवर विवाहानंतर मायबापाचं होत नाही तर ते सासरच्याच मंडळींचं होतं.म्हणूनच मुलगी पराया धन म्हटलं आहे.जर त्या पतीनं तिला ठेवलं नाही वा घटस्फोट दिला.तर ती दुस-याशी विवाह करते.मग हा विवाह झाल्यानंतर तिला आणखी दुसरं आडनाव मिळतं.अर्थात ती ज्याच्या ज्याच्या घरी विवाहबद्ध होईल,त्यांचं आडनाव मिळतं.
ज्याप्रमाणे मुलाला मायबाप जन्मास घालतात.त्याचप्रमाणे मुलीलाही जन्मास घालतात.मग मुलाला मुलीला जन्मास घातल्यानंतर त्यांना एक नाव मिळतं,त्याबरोबर आडनावही मिळतं.ते आडनाव मुलाचा विवाह झाल्यानंतरही बदलत नाही.मात्र मुलीचं आडनाव बदलतं.हे असं का होतं? असा जर विचार केला तर आपल्याला पुराणाच्या पोथ्या चाळाव्या लागतात.मनुस्मृती आणि इतर ब-याच पुराणात स्रीला उपभोग्य वस्तू समजून तिची संपत्ती ही विवाहानंतर पुरुषांची संपत्ती मानलेली असून स्रीला मुलगी पैदा करण्याची एक मशीन समजलेले असल्याने आजपर्यंत ह्या आडनावाच्या प्रथा सुरुच होत्या.आजही सुरु आहेत.
युरोपात औद्योगीकरण झालं.त्याचबरोबर विदेशी मंडळी पैसा गुंतवणूक करण्यासाठी देशात आले.त्यांच्या प्रथा वेगळ्या होत्या.आपल्या वेगळ्या.हळूहळू सरमिसळ होवून या देशातील तमाम भारतीयांनी त्यांच्या प्रथा परंपरा शिकण्याचा प्रयत्न केला.मग कपाळावरचा कुंकू अदृश्य झाला.त्याचबरोबर टिकली आली.लुगडे गेले,साडीही गेली,सलवारही गेला.गळ्यातील मंगळसुत्रही काही अंशी बाद झालं.हुंडाही काही अंशी बंद झाला.पण धन आणि आडनाव लावणे बंद झाले नाही.आजही भरपूर ठिकाणी तिचे धन हे तिचे नाही.तिच्या मायबापाचे आडनाव हे तिचे नाही.
काही मात्र अपवाद आहेत.तरीही त्या अपवादात्मक स्रीया आपलं पुर्ण धन आपल्यासाठी खर्च करीत नाही.तर तसा अधिकारच नाही.तसेच आडनावही लावतांना प्रथम आपल्या पतीचं आडनाव लावतात.नंतर आपल्या पतीचं.पण आपल्या मायबापाचं पूर्णतः आडनाव लावू शकत नाही.याला कारणीभूत आहे समाज.हा समाज आपल्याला काय म्हणेल याचा विचार प्रत्येकजण करीत असतो.म्हणूनच तसा प्रयत्न कोणीच करीत नाही.करण्यास धजावत नाही.एखाद्या स्रीनं जर असा प्रयत्न केलाच तर तिला नावबोटं ठेवली जातात.
महत्वाचं म्हणजे ज्या मायबापानं तिला जन्म दिला.लहानाचं मोठं केलं.त्यांचं आडनाव मुलीनं का लावू नये? आपल्या पतीचंच आडनाव का लावावं? पती सर्व देतो आणि मायबाप काहीही देणार नाही म्हणून की काय? मग आजपर्यंत जे मिळालं,ते कोणाच्या सहाय्यानं मिळालं.मायबापाच्याच सहाय्यानं ना.मायबापानं मुलीला जे सुख दिलेलं असतं.तिला लहानाचं मोठं केलेलं असतं.तिला बोट धरुन चालविलेलं असतं.तिला शिकविलेलं असतं.ते जे कार्य असतं,ते कार्य खरंच वाखाणण्याजोगं असतं.खरंच ते उपकारच असतात.ज्या उपकारातून मुलींनी आपल्या मायबापाचंच आडनाव शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत लावायला हवं.पतीचं आडनाव लावू नये.कारण पती काय देतो तिला?कोणतं सुख देतो? फक्त शारीरिक सुख आणि राहायला घर.दोनवेळचं जेवन.पण तेही बदल्यात देतो.ती स्री घरातील सर्व कामे करते.स्वयंपाक बनविणे,सडा टाकणे,झाडलोट करणे,फरशी पुसणे,कपडे धुणे,अंघोळीचं पाणी गरम करुन ते अंघोळीच्या कम-यात नेवून देणे.जेवायला ताट वाढून देणे.त्या ताटात वस्तू पुरवणे.कपड्याला इस्री मारणे या व्यतिरीक्त नव-यासारखी त्याच्या खांद्याला खांदा लावून कामालाही जाणे इत्यादी कामे करीत असते.परंतू पती काय करतो?तो तर आयत्या बिळात नागोबा बसल्यागत कामावरुन आला की पलंगावर लोटतो.साधी भाजी कापूनही देत नाही.तरीही ती मुलगी जी त्याची पत्नी बनलेली असते.ती आपल्या माहेरचं सगळं विसरुन आपल्या पतीचा गोडवा गात असते.त्याचंच आडनावही लावत असते.खरं तर त्यानं तिचं आडनाव लावायला हवं.
आज आपण मुलगा मुलगी एकसमान म्हणतो.पण खरंच स्रीला समानता प्रदान करतो का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. जेव्हा हा आडनावाचा बदल प्रत्येक मुली व मुलात होईल.मुलगा आपल्या मायबापाचं आडनाव व मुलगी आपल्या मायबापाचं आडनाव जेव्हापर्यंत लावणार नाही.तेव्हापर्यंत मुलगा मुलगी एकसमान कसं म्हणता येईल.यावर आजतरी विचार करण्याची गरज आहे.मुलगा मुलगी एकसमान आहेत तर मग हा भेदभाव नकोच.जेव्हा ही स्वतःची आडनावं लावण्याची प्रथा निर्माण होईल.तेव्हाच स्रीयांच्या जीवनात वसंत फुलेल.मग शिशीराचंही काहीच चालणार नाही.यात शंका नाही.
भीमराव शिकवत होता.त्याला ओढ होती शिक्षणाची.तसा तो मोठ्या मुलीला वकील बनवू पाहात होता.
त्या काळात डॉक्टर,इंजिनियरला भाव होता.अध्यापक शिक्षकालाही भाव होता.कारण त्याच व्यवसायात जास्त मिळकत होती.पण वकीलांना तेवढी मिळकत नव्हती.काही काही वकील गलेलठ्ठ पैसा कमवीत असत.कारण त्यांचं नाव झालेलं होतं.ते हमखास खटले जिंकतात असं त्यांचं दायित्व असायचं.त्यामुळं त्यांना खटलेही मिळायचे व ते खटलेही जिंकायचे.पण काही वकीलांना पोट भरणंही जिकीरीचं काम होतं.कारण त्यांना कोणत्याच स्वरुपाची कामं मिळत नव्हती.त्यामुळं लोकांचा वकीलकीवरील विश्वासच उडला होता.त्यातच कोणी वकीलकीच्या पेशाकडं जात नव्हते.
नयना फार हुशार होती.ती नित्य महाविद्यालयात जात असे.नित्य अभ्यास करीत असे.त्याचबरोबर स्वयंपाकात आईला मदतही करीत होती.तर कोमलनं शिक्षण सोडलं होतं.ती आता आईसोबत कामाला जात होती.आई दिवसभर राब राब राबून घरी ती थकून येताच कोणतंही काम करीत नसे.करण्याची इच्छाच असायची नाही.मात्र कोमल आपल्या लहान बहिणीला थोडी फार स्वयंपाकात मदत करीत होती.रात्रीला स्वयंपाक झाला की सगळेजण एकत्र बसून जेवन करीत असत.
नयना महाविद्यालयीन अभ्यास,स्वयंपाक यासह सगळं काम करीत असतांना तिही थकत होतीच.पण मनात एवढासाही आळस न दाखवता ती आपल्या आईवडीलाच्या व बहिणीच्या कष्टाला आठवून घरची सगळी कामं करीत होती.
कोमलनं शिक्षण सोडल होतंं.तशी तिही फारच हुशार होती.पण काय करणार! घरी शिकायला तेवढा पैसा नव्हता.साधं पोट भरायलाही पैसा नव्हता.पण बापाची इच्छा होती की मुलींना शिकवावं.परंतू शिकवणार कसे? त्यामुळं की काय कोमलला आपलं शिक्षण बंद करावं लागलं.हुशार असतांनाही.तिला वाटत होतं की कदाचित माझी बहिण शिकली तर ती आमच्याही कामात पडेल.तिचं शिक्षण कामात येईल.म्हणून ती कामाला लागली होती.
हे नयनाचं बारावीचं वर्ष होतं.ती खुप अभ्यास करीत होती.सकाळी महाविद्यालयात जाणं.दिवसभर प्राध्यापकाचे संभाषण ऐकणं व सायंकाळी घरी आल्यावर मायबाप बहिण येण्यापुर्वीच घरी स्वयंपाक करुन ठेवणं इत्यादी कामं ती करीत होती.आता तिला सकाळी मात्र कोमल स्वयंपाकात मदत करीत असे.पण सायंकाळी बहिणीची मदत होत नव्हती.कारण बहिण येण्यापुर्वीच नयना स्वयंपाक करुन ठेवत असत.मग सायंकाळी कामावरुन सगळे घरी आले की लवकरच ते जेवन करीत.कारण त्यानंतर नयना अभ्यास करीत असे.नयना मात्र कमी जेवन करीत होती.तिला वाटायचं की आपण जर जास्त जेवन केलं तर झोप येईल.
ते महाविद्यालय.......त्या महाविद्यालयातील मुलांनी शिकवणी वर्ग लावले होते.कारण ती एक फँशनच होती.मात्र नयनाकडे तेवढे पैसे नव्हते.ज्या मुलांनी शिकवणी वर्ग लावले होते.ती फँशन जरी असली तरी तिचा त्या ठिकाणी अभ्यास होत नव्हता.कारण तिच्याकडं तेवढा पैसा नव्हता.बाकी मुलांचा अभ्यास होत होता.पण नयनाचं काय? नयनाला ती मदत नव्हती.त्यातच त्या शिकवणी वर्गात जात असतांना जो वेळ लागायचा.त्या वेळात ती अभ्यास करीत होती घरीच.
आज शिकवणी वर्गाचं फॅड निर्माण झालं होतं.तसं तिला वाटत होतं. जो तो शिकवणी वर्ग लावायचा ध्यास धरतोय.शाळेत शिकवो अगर न शिकवो.
शाळा हे विद्येचं माहेर म्हटलं जातं.मग शिकवणी वर्ग हे सासर ठरतं.सासरी जसे मुलीला छळले जाते.हुंड्यासाठी तगादा लावली जातो.अगदी तोच प्रकार इथेही.इथेही पदोपदी ट्युशन फी आणावी म्हणून छळले जाते.त्या गोष्टीचा तगादा ही लावला जातो.नाही आणल्यास ज्याप्रमाणे घरातून नवरीला जसे हाकलतात तसे ट्युशन वर्गातून हाकलले जाते.तरीही मुले ट्युशन साठी धडपड करतात.मग ते घरचे गरीब असो की श्रीमंत.
पालकही आपला मुलगा पास झाला पाहिजे हा विचार करतात आणि ट्युशन लावून देतात.तरीही टक्केवारी कमीच पडते.ट्युशन यासाठी लावली जाते की बाजूची मुलगी क्लासला जाते.मग आपली मुलगी का बरं जावू नये ही भावना.शिवाय आजची शिक्षक मंडळी शाळेत शिकवतातच असे नाही.
पुर्वी शिकवणी वर्ग नव्हते काय?होते.पण ट्युशन लावायची गरज नव्हती.लावायचीच असेल तर फक्त इंग्रजी व गणित विषयाची शिकवणी लावावी लागायची.कारण ते विषय थोडे कठीण वाटत.शिवाय शिकवणी लावायचीच झाली तर दहावीला लावावी लागायची.कारण शालान्त परीक्षा कठीण असायची.काही मंडळी शिकवणी लावायचीच.पण काही मंडळी शिकवणी न लावताही पास होत असत.पण आज आपण सगळीकडं पाहातो की शालान्त परिक्षेत आपण ट्युशन लावणारे पाहिले की अख्खा वर्गच शिकवणी लावतो.काही मुलांची तर अगदी नर्सरीपासून तर पुढे......पर्यंत शिकवणी असते.तेही सर्व विषयाची.मायबाप शिकलेले असतांनाही......पुर्वी लहानपणापासून शिकवणी नव्हती.मग मुले शिकत नव्हती काय? शिकतच होती.हुशारही असायची.पैसा नव्हता पण गुणवत्ता होती.
पण पुढं काळ बदलला.आता आपल्याला वाटते की शिकवणी लावली नाही तर मुलगा नापास होईल.नापास करण्याचे अलिकडे प्रावधान नसुनदेखील.पुर्वी शिक्षण घेतांना एकलव्याला कोणताच गुरु नव्हता.तरीही तो शिकला.लहानाचा वीर झाला.मग आज मुले का शिकू शकत नाही? शिकतात.पण आपला त्यावर विश्वासच बसत नाही.शिवाय मायबाप म्हणून आपल्या अपेक्षाही वाढल्या.
अलिकडे विद्यार्थी निव्वळ आळशी झालाय.त्याबरोबर शिक्षकही आळशी झालाय.या शाळेत शिकविणा-या शिक्षकाला फक्त वेतन हवं.शिकविणे हवे नाही.वेतनासाठी आंदोलन,धरणे आंदोलन,मोर्चे,उपोषण.सारंच काही......मात्र शिकवितांना एवढा पगार मिळत असुनही निव्वळ शाळेत गोष्टी करत असतात शिक्षक.काही शिक्षण तर शाळा ज्या वेळेला असते.त्या वेळेवर कधीच पोहोचत नसून ते तब्बल एक दोन तासांनी पोहोचतात.शिवाय परत फिरतांना निवासी घर नसल्याने तब्बल एक तास पहिलच परतीच्या प्रवासाला निघतात.म्हणजे शाळा जी पाच तासाची असते.ती पाच तासाचीही शाळा हे शिक्षक बरोबर करीत नाही.मुख्याध्यापकाचं विचारुच नका.त्याची तर चांदीच चांदी असते.हा मुख्याध्यापक शाळेत नाही गेला तरी यांचे काही बिघडत नाही.हा मुख्याध्यापक मुख्यालयी राहाणे बंधनकारक असूनही मुख्यालयी राहात नाही.तसेच तो सगळ्या अधिकारी वर्गाला मँनेज करुन ठेवतो.त्यामुळे समजा एखाद्या वेळी अधिकारी आलाच तर तो अधिकारी एक तर फोन करुन येतो.नाही तर तो अधिकारी या मुख्याध्यापक साहेबांचे काहीच बिघडवू शकत नाही.
मुख्याध्यापक जसा वागतो.तसे शिक्षक वागतात.तसेच मुख्याध्यापक साहेबांनी काही म्हणूच नये.म्हणून आपल्याला मिळणारा काही पगारातील पैसा ही मंडळी मुख्याध्यापक साहेबांना देतात.जेणेकरुन येणा-या अधिकारी वर्गापासून स्वतःला वाचविण्यासाठी.हवं तर ते चापलूस सारखे त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने वागत असतात.या शिक्षकांनी नाही शिकविले तरी मुख्याध्यापक काहीच यांना बोलू शकत नाही.कारण तो स्वतः शाळेत येवुमू शकत नसल्याने तसेच शिक्षकांकडूनच देण घेत असल्याने तसेच बाकीचीही मंडळी त्यांच्यासोबत चांगलीच वागत असल्याने तो गप्प राहतो.बाकीच्या शिक्षकांच्या विरोधात ब्र काढायची ताकद नसते.शिवाय अशा शाळेत जे शिक्षक चांगले शिकवितात.त्यांनीही चांगले शिकवू नये म्हणून त्यांच्यावरच न शिकविण्याचे ताशेरे ओढले जातात.हवं तर त्यांना शिकवायला वर्गही दिला जात नाही.त्यांना वरीष्ठ श्रेण्या सहजासहजी लागत नाही.वेतनवाढी दरवर्षी रोखल्या जातात.काळाच्या ओघात मग असेही शिक्षक मग बाकीच्या शिक्षकमंडळी सारखे जेव्हा वागायला लागतात.तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.
अशाप्रकारचे शाळेचे वातावरण विद्यार्थ्यांच्या नाशाला कारणीभूत ठरतं.काही काही शाळेत तर शिक्षक स्वतःच पालकांना सांगत असतात."हा मठ्ठ आहे.याला ट्युशन लावून द्या." पालक तरी काय करणार.नाईलाजानं आपल्या मुलाचं नुकसान होवू नये म्हणून ट्युशन लावून देतात.
आज शिक्षकांचा पेशा शिक्षकाप्रमाणे राहिलेला नाही.फक्त काही अपवाद सोडल्यास या शिक्षकांना पगार पाहिजे गलेलठ्ठ.एवढा पगार देवूनही चक्क विद्यार्थ्यांचे पालकांना ट्युशन लावून द्या म्हणणे त्यांना शोभत नाही.तरीही मनाची लाज न बाळगता अशा शिक्षकांचे विद्यार्थी पालकांशी वागणे कुठेतरी विद्यार्थी मनाला ठेच पोहोचवणारे वर्तन असते.पण कार्यवाही होत नसल्याने आजचा दिवस तरी शिक्षकांचा चांगला जातो.शिवाय शाळेत आज मुले ही कमी आहेत.
मुख्याध्यापक शाळा सर्वतोपरी शिकविण्याच्या मुल्याधिष्ठीत न करता त्याच्या मताप्रमाणे मनमानीप्रमाणे वागत असल्याने अलिकडे मुले शाळेत येत नाही.मराठी शाळेला गळचेपी लागलेली आहे.मराठी शाळेत शिकवित नाहीत ना,त्यापेक्षा इंग्रजी ब-या.असे म्हणून पालक वर्ग इंग्रजी माध्यमात विद्यार्थ्यांना टाकत आहेत.निदान इंग्रजी वाचता लिहिता जरी आली नाही तरी माझा मुलगा इंग्रजी शिकला.असे म्हणायला पालकांना आवडते.शिवाय गरीबीतही काटकसर करुन ही पालकमंडळी ट्युशन लावून देतातच.कारण शाळेत जरी शिकविले गेले नाही,तरी ट्युशन हा त्यावरचा उपाय असतो.
शिक्षकांना फक्त वेतन हवं असतं.शिवाय कधी काळी आपल्यावर परिस्थीती ओढवेल याचा नेम नसल्याने ही शिक्षक मंडळी विवाह करतांनाही जोडीदार नोकरीवाला शोधतो.कारण केव्हा का होईल हे सांगता येत नाही.आज शंभर टक्क्यापैकी ब-याचशा शिक्षकांना साध्या बेरीज वजाबाकीच्या क्रिया येत नाहीत.वेतनवाढी सरसकट असल्याने असे शिक्षक आजही काळाच्या ओघात सुरुच आहेत.त्यांना वेळोवेळी हवे ते भत्ते मिळत असतात.तर चांगल्या शिक्षकांना ते मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.कोर्टातही आरोपी अभियोजन पक्षाला दंडीत न करता मधला मार्ग काढला जातो.त्यामुळे की काय,प्रत्येक शाळेत अशा अधिकारी वर्गाची मुजोरी वाढली आहे.ज्याने आवाज उठविला, त्यालाच बदमाश समजून टार्गेट केले जाते.हवं तर त्याने आत्महत्या करावी एवढा त्रास त्याला दिला जातो.
काही वर्षापुर्वी पटपडताळणी झाली.त्या पटपडताळणीत काही संचालक दोषी आढळले.पण कार्यवाही शुन्य.काही ठिकाणी तर शाळात नव्हत्या.तरीही कागदोपत्री शाळा दाखवून,कागदोपत्री शिक्षक आणि विद्यार्थी ही दाखवून वेतन उचलले जाई.ही बोगसगीरी पटपडताळणीतून सर्वांच्या दृष्टीस आली.शासन शिकवणी वर्ग बंद करा म्हणतात.व्हायला पाहिजे.पण ज्या शाळेत शिक्षक गलेलठ्ठ पगार घेवूनही विद्यार्थ्यांना शिकवीत नाही त्या विद्यार्थ्यांचे काय? शिवाय ज्या शाळेत देण म्हणून शिक्षण सेवकांचा पुर्ण पगार नोकरी मिळावी म्हणून संचालकांना जातो.त्या शिक्षकांनी जगावे कसे? नव्हे तर जे शिक्षण शिकलेले असून बेरोजगार आहेत,नोक-या नाहीत.त्यांचं काय?ह्या सा-या गोष्टीचा पटपडताळणी सारखा विचार करण्याची गरज आहे.शिवाय घरातील एकच उमेदवार सरकारी नोकरीवर असावा याचाही कुठेतरी विचार व्हावा.कारण त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यावर होतो हेही लक्षात घेण्याची गरज आहे.

कोमलच्या परीक्षेचे दिवस तसे जवळ येत होते.पुरते दोन महिने राहिले होते.तसा भीमराव ती घरी नसतांना घरच्यांना म्हणाला,
"पोरीले अभ्यास करु द्या.तिचं बारावीचं वर्ष हाय.कशीतरी पास होईल.नायतं हायेच हाये आपल्यासारखं मातीत खपणं.मोठ्या पोरीले शिकवाची इच्छा होती.पण का करु.माह्य नशीबच खराब.त्या पोरीले शिकवाले पैसाच नोयता.घरी उपाशी राहाची पाळी होती.पण आता थोडं बरं हाय.तवा पोरीले अभ्यास करु द्या.तुम्ही दोघीही स्वयपाक करत जा.समदी कामं बी."
परीवारानं मान हलवली.तसे आजपासून तेच घरची कामं करु लागलेत.तसा भीमराव नयना घरी आल्यावर नयनालाही म्हणाला,
"पोरी,परीक्षेचे दिवसं जोवर येत हायेत.तू घरातली कोणतीच कामं कराची नाय.आतं फक्त अभ्यास कर अभ्यास.माह्ये तुह्या रुपानं भरपूर सपनं हायेत.ते सपनं तुले पुर्ण कराची हायेत."
नयनानं मान हलवली.तशी त्या दिवशीपासून ती घरातील कामं न करता अभ्यास एके अभ्यास करु लागली.
बारावीची परीक्षा जवळ आली होती.आता तर नयनाला पुरेशी सवडच भेटत नव्हती.ती लगबगीनं अंघोळ करीत असे.तर कधी तशीच राहात असे.मात्र अभ्यासाचा तिनं कधी कंटाळा केला नाही.त्यातच परीक्षा सुरु झाली.
नयना परीक्षेचे पेपर सोडवू लागली.एक एक दिवस बरा जात होता.हळूहळू पेपर संपले होते.तसे पेपर संपताच तिही कामाला लागली.
ते उन्हाळ्याचे दिवस होते.ऊन अंगाला चटके देवून जात होतं.त्याचबरोबर ती उन्हातील कामं........नयनाला ती कामं करावीशी वाटत नव्हती.पण उपाय नव्हता.कदाचित पुढील शिक्षणाला पैसा कमी पडला तर........तसं घरी राहूनही काय करावं? त्यापेक्षा कामाला गेलेलं बरं.असं नयनाला वाटत होतं.त्यामुळं कुरकूर न करता नयना तप्त उन्हातही कामे करीत होती.तशी उन्हात कामं करण्याची तिला सवयच होती.
ते उन्हाचे दिवस.या दिवसात शेतकरी आपल्या शेतात त्या तप्त उन्हात कामे करीत असतात.शेत वखरणे.त्या वखरणानंतर शेतातील धसकटं वेचणे.ते धसकटं जाळणे.तसेच शेत वखरून झालं की त्या शेतात शेणखत टाकणे.ते शेणखताचे ढिगं पसरवणे.इत्यादी कामे शेतात सुरु असतात.काही महिला वर्ग पावसाळ्याच्या इंधनाची सोयही करीत असतात.त्या रानातील काड्यांची मोळी आणून ते इंधन पावसाळभर किंवा वर्षभर पुरावं यासाठी साठवणीच्या ठिकाणी ठेवत असतात.काही महिला ह्या गोव-याही गोळा करीत असतात.गोव-या म्हणजे वाळलेलं शेण.
ते तप्त ऊन असतं की ज्या उन्हानं ऊष्माघात होवून जीव जावू शकतो.तरीही शेतकरी ते काम आवडीनं करतात.नाही केलं तर उपासमारीनं मरण्याची गत येते.जर शेत पीकलं नाही तर आपण काय खावू म्हणून उष्माघातावरही मात करुन हा शेतकरी शेतात काम करीत असतो.
या उन्हाळ्याच्या दिवसात लवकर शेतावर जावून दुपारच्याला थोडीशी खोपटात सवड घेवून ऊन कलल्यावर पुन्हा शेतीत कामं करणं हे शेतक-यांच्या पाचवीला पुजलेलं असतं.पावसाळ्याचे जसे दिवसं येतात.तसा शेतकरी सचेत होवून परत शेतात वखर फिरवतो.या दिवसात शेतात रोपांची लावण करणे,पीक पेरणे.त्यांची जोपासणा करणे.ते पीक तयार झालं की त्याची काढणी करणे.यातच कधीकधी साप,विंचूशी त्याचा सामना होत असतो.तर कधी काही शेतकरी वीज पडूनही मरत असतात.अक्षरशः शेतक-याला पावलोपावली मृत्यूशी खेळावं लागतं.पुढं हिवाळा लागला तरी त्याला सुख नाही.याही दिवसात त्याला सकाळी सकाळी थंडी लागो की काही लागो उठून शेतात जावं लागतं.यातच वनक्षेत्र भागात मचाण बांधून त्यावर राहावं लागतं.कारण केव्हा कोणता जंगली प्राणी येवून केव्हा माणसाचा बळी घेईल याची शाश्वती नसते.यातच पीक हातात आलंच तर त्या पीकाला वेळ पडल्यास बेमोल भावानं विकावं लागते.कारण ते तसं जर विकलं नाही.तर शेतमजूरांचे पैसे तसेच उधारी घेतलेले पैसे द्यायचे कुठून? हा प्रश्न शेतक-याला सतावत असतो.
मुळात शेतक-यांना आपला जन्म नकोसा वाटतो.डॉक्टरांना आपला मुलगा डॉक्टर व्हावा,प्राध्यापकांना आपला मुलगा प्राध्यापक बनावा.तसेच अभियंत्यांना आपला मुलगा अभियंता बनावा असं वाटतं.पण शेतक-यांना आपला मुलगा शेतकरी बनावा असं वाटत नाही.त्याचं कारणही तसंच आहे.शेतक-यांच्या जीवनात मुळात बहार नाही.
काही लोकं नेहमी म्हणत असतील की असला जन्म नको गं बाई.कारण या शेतक-यांना छळणारे घटक पुष्कळ आहेत.पुर्वी सावकार छळत होते.आता बँका छळत आहेत.साप,विंचू हे नित्याचेच झाले.वीज पडणे ही गोष्ट देखील नित्याचीच झाली.दलाल छळणे नित्याचेच झाले.आता मात्र शासनही छळणार आहे की काय असे वाटायला लागले आहे.
आज शेतक-यांची स्थिती दयनीय आहे.कारण निसर्ग आता व्यवस्थीत शेतक-याला साथ देत नाही.तो कोपल्यासारखा वागत आहे.कधी पाऊस जास्त येतो.तर कधी कमी.मग योजना कितीही आणल्या तरी या निसर्गापुढं कोणाचं चालणार कसं? जर निसर्गानं साथच नाही दिला.तर शेतकरी आपला माल विकणार कसा?तेव्हा योजना आणायच्याच असेल तर सिंचन प्रकल्पाच्या आणाव्यात.ज्या सिंचनाच्या सोयीनं शेतक-यांना धान्य पीकू शकेल.बेमोसमातही.त्यासाठी नद्याजोड प्रकल्प अख्ख्या देशात राबवणं गरजेचं आहे.
देशात काही नद्या ह्या बारमाही वाहणा-या आहेत.तर काही नद्या ह्या फक्त पावसाळ्याचे चार महिने जर सोडले तर सुकणा-या आहेत.अशा नद्या बारमाही नद्यांना जोडल्यास शेतक-यांना वर्षभर पाणीपुरवठा होवू शकेल.तसेच पावसावर आधारीत पीकं शेतक-यांना घेता येईल.नाहीतर असला जन्म नको गं बाई म्हणायची शेतक-यांवर वेळ येवू शकते व पुढे कोणीच शेतकरी बनायला धजावणार नाही.हे तेवढंच खरं होतं.

नयना काम करायची.ती शेतात जायची.त्यातच एकदाचा तो निकालाचा दिवस उजळला.तशी ती आपला निकाल पाहायला गेली तर काय?तिला चक्क आश्चर्याचा धक्काच बसला.कारण ती बारावीच्या परीक्षेत मेरीटला आली होती.त्याचबरोबर तिचं अभिनंदन ही सुरु होतं.
नयना मेरीटला आली.त्याचबरोबर तिच्या वर्गातील इतर मुलीही मेरीटला आल्या होत्या.त्यानंतर कोणी डॉक्टरकीला जात होतं.तर कोणी इंजीनियर पेशाला.तसं एका तिच्या सहपाठी मुलीनं विचारलं,
"नयना,तुझं अभिनंदन.आता तू काय करणार आहे?"
"मला समजलं नाही तू काय म्हटलं ते." नयना म्हणाली.
"मला म्हणायचं आहे की तू कोणत्या क्षेत्राकडे जाणार आहेस? डॉक्टर की इंजीनियर?"
"मी वकील पेशाकडे जाणार आहे."
"वकील! छे गं.तिथं तं कोणालाही प्रवेश मिळतो.अगं, त्या पेशाला कुत्रही विचारत नाही.अन् तू वकील पेशाकडं जाणार म्हणतेस."
"हो गं,मी वकील पेशाकडंच जाणार आहे.हे मी आधीच ठरवलंय."
"अगं,तुला माहीत आहे,वकील मंडळी न्यायालयात एक एक रुपयासाठी मौताज असतात.प्रत्येक वकीलाची वकीलकी चालतेच असे नाही."
"पण मी ठरवलंय की मी वकीलकीच करणार."
मैत्रीणींनी तिला भरपूर समजावलं.पण ती ऐकण्याच्या तालात नव्हती.तशी तिची एक मैत्रीण म्हणाली,
"जावू दे गं,ही ऐकण्याच्या तालात नाही.हिला सांगणं म्हटलं तर आपलंच डोकं खराब करणं आहे."
मैत्रीणी निघून गेल्या.त्यांनी त्यानंतर डॉक्टरकीला प्रवेश घेतला.तर कोणी इंजीनियरकीला.कोणी अध्यापक पेशालाही गेला.पण कोणीही वकील पेशाकडं गेला नाही.वकील पेशा म्हणजे निव्वळ रिकामटेकड्यांचा पेशा असं समजण्यात येत असे.या पेशात जास्त पैसा कमविता येत नाही असंही काहींचं म्हणणं होतं.पैसाच जीवनात सर्वस्व असतो पैसा जर असेल तर लोकं साहेब म्हणतात.पैसा जर नसेल तर लोकं साधा नमस्कारही करीत नाहीत.तेव्हा पैसा जर कमवायचा असेल तर डॉक्टर,इंजीनियर बनलेलं बरं. असं बाकीच्या मैत्रीणींना वाटत असे.
नयना वकील पेशाला गेली होती.ती दररोज महाविद्यालयात जात होती.वकील पेशा शिकत होती.ह्या वकीलकीचा अभ्यासक्रमाला जात असणारी व शिकणारी गावातील ती एकमेव मुलगी होती.
अडाणी ते गाव.त्या गावात उच्चशिक्षण घेणारी मुलं नव्हती.मुलं दहावी झाले की आपल्या कामाला लागत असत.शिक्षणाला फारसा वाव नव्हता.शिक्षण शिकून नोकरी मिळत नाही असा गावचा समज.त्यातच जिथे श्रीमंतांची मुले शिकत नव्हती.तिथे गरीबाच्याही मुलांनी शिकू नये असं मानणारी पीढी.त्यातच नयनाचं शिकणं.शिवाय ती अस्पृश्यही.नयनानं शिकूच नये असं लोकांना वाटत होतं.बारावीपर्यंत ठीक होतं.पण आता वकीलकी.........उद्या ही मुलगी वकील बनल्यावर आपल्याला फारच त्रास देईल असं गावक-यांना वाटत होतं.त्यातच ब-याच गावक-यांनी भीमरावला समजावून सांगीतलं की मुलीच्या जातीला जास्त शिकवू नये.पण शिक्षणाचं महत्व बाळगणा-या भीमरावला मुलगी काय आणि मुलगा काय?असा भेद न बाळगणारा भीमराव नयनाला शिकवीत होता.
नयनाचं शिकणं अख्खं गाव पाहात होतं.तसेच आता तिचा आणि भीमरावचा गावातील लोकं द्वेष करीत होते.कारण तो दलित जातीतील होता.दलितांनी जास्त शिकणं हे गावाला मंजूर नव्हते. ते भीमरावला सबक शिकविण्याची संधी शोधत होते.पण संधी काही चालून येत नव्हती.
भीमरावजवळ जशी शेती होती.त्याचबरोबर त्याच्या घरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बक-याही होत्या.ह्या दोनतीन बक-या घेवून कोमल रानात जात असे.आपल्या बक-यांना मोकाट सोडून देवून आपल्या बापासोबत शेतात काम करीत असे.कधी भीमराव तर कधी त्याची पत्नी.कधीकधी सुटी असल्यावर नयनाही बक-या घेवून जात असे.
आज नामी संधी गावक-यांना चालून आली होती.कोमलची प्रकृती ठीक नव्हती.तशी ती अंथरुणावर पहूडली होती.त्यातच आज नयनाच्या महाविद्यालयाला कसलीतरी सुटी होती.त्यामुळं ती रानात त्या बक-या घेवून गेली.
नयना रानात एकटीच होती.हे गावातील काही भुरटे अक्कलवान पाहातच होते.तशी संधी शोधण्यासाठी गावातील मंडळी वाटच पाहात होते.गावातील कोणताच मुलगा शिकू नव्हे तर मुलींनी शिकू नये.त्यातच दलितांनी शिकूच नये असं गावाला वाटत होतं.म्हणून की काय? तसा तिचा काळच आला होता.
नयना एका झाडाखाली बसली होती.तसा तो काळ चालून आला.गावातील दोनचार भुरटे तरुण रानात आले.त्यांनी तिला पाहिलं.त्यांच्या मनात वासना तसेच द्वेषाची भावना होतीच.तशी ती तरुण झाली होतीच.ती आता चांगली दिसू लागली होती.
त्या गावच्या त्या लबाड तरुणांना पुढ्यात पाहून नयना घाबरली.त्यांना शिव्या देवू लागली.घरी नाव सांगेन असंही म्हणू लागली.पण ते तरुण कोणाला घाबरतील तेव्हा ना.त्यांना वाटलं की ही एकटीच आहे रानात.हिला मारुनही टाकलं तरी कोणाला माहीत होणार नाही.कामही होईल.
त्या तरुणांनी आधी तिला मारुन टाकण्याचा विचार केला.पण त्यातील एकजण म्हणाला,
"आपण हिच्यावर बलत्कार करु.मग ठरवू काय करायचं ते."
त्याची युक्ती सर्वांना पटली.तशी ती अधिकच घाबरली.आता बक-यांची चिंता न करता आरडाओरडा करीत ती सैरावैरा पळत सुटली.त्यातच द्वेषभावनेनं व वासनेनं प्रेरीत त्या तरुणांनी तिच्या मागे धावत व तिला घेरत तिला पकडले.दोघांनी तिला गच्च धरुन ठेवलं तर तिस-यानं तिचे हातपाय बांधून टाकले.ती मात्र जीवाच्या आकांतानं ओरडत होती.दयेची भीक मागत होती.पण त्या नराधमांना दया येईल तेव्हा ना.ते नराधम पिसाळले होते.
त्यांनी एकामागोमाग एक असा पाशवी बलत्कार केला.तशी ती जीवाच्या आकांतानं ओरडत होती.तशी काही वेळानं ती अधमरी झाली.तिला होशच उरला नव्हता. बलत्कार पुर्ण झाला होता.तशी ती आता बेशुद्ध पडली होती.
तिचं बेशुद्ध पडणं.तसा तो बलत्कार.आता मात्र ते तरुण घाबरले होते.आता केस होणार.आपण आरोपी होणार आणि आपण फसणार असं त्यांना वाटत होतं.त्यातच कोणीतरी म्हणालं,
"आपण हिला मारुन नाल्यात फेकून देवू.कोल्हे कुत्रे खातील.पुरावे नष्ट होतील.आपण सापडणार नाही."
"अरे,आपण फसलो आहोत.ही बेशुद्ध असली तरी उद्या होशात आल्यावर बोलेल.अन् मग आपल्याला फाशी होईल.हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.पण गावात शिक्षणाची आणि आपली दहशत बसायला नको का? हिला मारलं तर ही मरणार.मग हिचं काय जाणार.हिला न्याय तर मिळेलच मिळेल.शिवाय जीवंत राहिली तर हिची वकीलकीही कोर्टात सुरु राहिल.त्यापेक्षा हिची जीभ कापली तर.......ही बोलूच शकणार नाही.तसेच हिचे हातपाय तोडले.कंबरडे मोडले तर ही कुठेच जावू शकणार नाही आणि गावातील इतरांनीही आपली मुलगी शिकायला नको म्हणून सबक होईल.घरची मंडळी कुठं कुठं हिला सोबत घेवून फिरवतील.तेही काही दिवसानं नादच सोडतील.अन् तुम्ही घाबरु नका.सरड्याची धाव कुठपर्यंत.कुपापर्यंतच ना.हे जास्तीत जास्त पोलिसस्टेशनापर्यंत जातील.पोलिसस्टेशन तर आपल्या बापाचंच समजा.तिथं माझ्या बापाची खुप चलती आहे.तुम्ही घाबरु नका.अन् हं पोलिसांनी तक्रार घेतलीच तर माझा बाप एकदोन मंत्र्याकडून पोलिसस्टेशनला फोन करेल.माझ्या बापाच्या एका फोननं आपल्याला अख्ख पोलिसठाणं सोडून देईल.तुम्ही घाबरु नका.माझा बाप असा तसा माणूस नाही.मंत्र्यांचा खास दोस्त आहे.माझा बाप कसा फसू देईल आपल्याच पोराला.पण जरा धीर धरा.ही जीवंतच राहायला हवी.मात्र हिला बोलता, लिहिता व चालता यायला नको असं आपण करुया."
"नाही नाही.तिचा जीवच घेतला पाहिजे.ती जीवंत राहायला नको."
"बरं तुम्ही म्हणताय तसं करा.अन् समजा नियतीनं जीवंत ठेवलंच तर ती बोलायलाही नको,चालायला नको व लिहायला नको असं करा गड्यांनो."
"ठीक आहे."
मंत्र्याच्या मित्राचा मुलगा पाहात होता ते सगळं कृत्य. ती बेशुद्ध पडली होती.तशी त्यांनी तिची जीभ कापली.हातापायाच्या नसा तोडल्या व कंबरही मोडलं होतं.तिला जीवंत मारण्याच्या प्रयत्नात तिच्या अंगावर भरपूर जखमाही केल्या.आता तिची हालचाल पुर्णच बंद झाली असल्याचा निर्वाळा करुन ते आरोपी पळून गेले व गावात बिनधास्त वावरु लागले होते.
रात्र झाली होती.तशा बक-या घरी आल्या होत्या.नयना अद्याप घरी आली नव्हती.तसा भीमराव आपली पत्नी व एका मुलीसमवेत घरी परतला होता.पण नयनाला घरी न पाहिल्यानं शंकेची पाल चुकचुकली.तसा तो त्या रात्रीच्या अंधारात रानात लहानशा टार्चच्या प्रकाशात आपल्या मुलीला शोधू लागला.कारण सकाळी बक-या घेवून ती रानात गेली होती.
ते जंगलातील गाव नव्हतं.त्यामुळं कदाचित एखाद्या वाघानं तर आपल्या मुलीला खाल्ल नाही असं त्याला वाटलं असतं.पण त्या गावात जंगल अजिबात नसल्यानं वाघा सिंहावर त्याचा संशयच नव्हता.तसं त्याला आठवलं.लोकं म्हणत होते की आपल्या मुलीला शिकवू नको.कदाचित गावक-यांनी तर तिचं अपहरण केलेलं नसावं.अशी शंका त्याला आली.ही वेळ ब-याची नाही असं त्याला वाटलं.आता शोधण्यात काही अर्थ नाही.मुलगी शोधूनही सापडणार नाही असं त्याला वाटलं व तो जवळच्या पोलिसस्टेशनला गेला.घडलेली कहाणी पोलिसस्टेशनला कथन केली.त्यानुसार तेवढ्याच रात्री पोलिसदल तिला शोधण्यासाठी त्या रानात निघालं.
पोलिसच ते.ते मोठमोठ्या गुन्ह्यांचा शोध लावतात.मग ते नयनाला का शोधणार नाहीत.त्यांनी ताबडतोब नयनाला शोधलं.तिची हालत गंभीर होती.बहुतःश ती मरण पावली असेल असं वाटत होतं.तशी ती जीवंत लाश पोलिसांनी रुग्णालयात दाखल केली.रुग्णालयात ताबडतोब तिच्यावर उपचार सुरु केला.उपचाराअंती माहीती पडलं की ती जीवंत आहे.पण तिची कंबर व हातपाय मोडले आहेत.तिच्या अंतर्गत व बहिर्गत भागात जखमा आहेत.व जीभही कापलेली आहे.
बलत्कार करणारी मुलं ती.त्या मुलांपैकी एक राजकारणी माणसाचा मुलगा होता.पोलिसतक्रार झाली होती.पण कारवाई शुन्य होती.त्यातच नयनाची हालत दिवसेंदिवस बिघडत चालली होती.अशातच नयनाला व्यवस्थित उपचार न मिळाल्यानं ती मरण पावली.
नयना मरण पावताच भीमरावला फार दुःख झालं.त्यानं दोन मुली खोवल्या होत्या.तक्रार अजुनही नोंद झाली नव्हती.अशातच त्या गावाचा समाजाचा एक राजकारणी होता.तो ज्या राजकारणी पार्टीच्या माणसाच्या मुलानं बलात्कार केला होता.त्याचा विरोधक होता.त्यालाही भीमरावच्या परीवाराशी काही घेणदेणं नव्हतंच.पण त्यालाही त्या माणसाचा बदला काढायचा होता.कोणे एके काळी त्यांचं जोराचं भांडण झालं होतं.त्यामुळं त्याला पार्टी सोडावी लागली होती.तोही संधी शोधतच होता बदला काढण्याचा.अशातच ही घटना.
त्यानं प्रकरणाला हवा दिली.प्रकरण चिघळवलं.ते एवढं चिघळवलं की दबलेलं प्रकरण डोके वर काढून पाहू लागलं.अशातच सी बी आय चौकशी बसली.पुर्ण तपास झाला व तपासात बलत्कार झाला हे सिद्ध झालं.पोलिसांनी एफ आय आर बनवली.त्याचबरोबर ते प्रकरण न्यायालयात गेलं.
भीमरावला न्यायालय काही नवखं नव्हतं.त्याला माहीत होतं की या ठिकाणीही काही न्याय मिळणार नाही.कारण जसा सरकारी वकील असतो.तसाच खाजगीही वकील असतो.सरकारी वकील हा विकल्या जावू शकतो.पण खाजगी वकील विकला जात नाही.कारण त्याला पगार नसतो.त्यानं जेवढे खटले जिंकले.त्यावर त्याचं यश अपयश अवलंबून असतं.याही प्रकरणात तसंच झालं.प्रतिपक्ष वकीलानं एक फिक्की सुई दाखवली न्यायाधीश महोदयाला.तसा एक प्रश्न विचारला,
"ह्या फिरत्या सुईत ज्याप्रमाणं आपण धागा टाकू शकत नाही.त्याप्रमाणे बलत्कारही होवू शकत नाही."
तसा न्यायाधीश महोदयांनी एक प्रश्न उपस्थित केला.
"असं कसं होवू शकेल?"
"हे बघा,या फिरत्या सुईनुसार बलात्कार पीडीता तडपली असेल.तिनं काही तर प्रतिकार केला असेल.मग असा प्रतिकार करीत असतांना बलत्कार कसा होवू शकतो! साहेब,भावार्थ समजून घ्या.हे न्यायालय आहे.मी अपमानजनक सगळं खुलवून दाखवू शकत नाही.समजावून देवू शकत नाही.मात्र बलात्कार झाला नाही.तर ह्या आरोपीपैकी एकाचे वडील राजकारणी असल्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षानं रचलेली ही साजीश आहे."
न्यायाधीश महोदय काय समजायचं ते समजले.पण त्यानंतर जो निकाल दिला.तोही कांताच्या आलेल्या निकालासारखाच होता.निकाल आरोपीच्या बाजूनं लागला होता.कोणी म्हणत होतं की उच्च न्यायालयात अपिल करा.पण भीमरावनं ते अश्रू गिळून टाकले.गरीबांना न्याय मिळत नाही.हा दृष्टिकोण मनात ठेवून तो चूप बसला.तसेच दलितांनी शिकू नये असं त्याला वाटत होतं.त्याच्यासाठी शिक्षण अजूनही वाघिणीचं दूध ठरलं नव्हतं.
भीमराव आता उदास राहू लागला होता.त्यानं दोन मुली गमावल्या होत्या.मोठी कांता हुंडाबळी ठरली होती.त्याहीवेळी न्याय मिळाला नव्हता.तर लहान नयना बलत्काराची शिकार झाली होती.तिलाही न्याय मिळाला नव्हता.आता मधली शिल्लक होती.तिच्याशीही कधी काळी असाच प्रकार होणार की काय?अशी भीती त्याला वाटत होती.त्यामुळं तो उदास होता.
कांता शिकली नव्हती.तर कोमलनं मधातच शिक्षण बंद केलं होतं घरची बेताची परिस्थीती पाहून.मुलगा शिकत होता.पण तोही पाहिजे त्या प्रमाणात अभ्यास करीत नव्हता.बापाचे अश्रू कोमल पाहात होती.तिला कांता आणि नयनाला का न्याय मिळाला नाही हेही चांगलं समजलं होतं.यातच आता तिची शिक्षणाची हौस जागृत झाली होती.बापाला जर आनंद प्राप्त करुन द्यायचा असेल तर उच्च शिक्षण शिकायला हवं असं तिला वाटत होतं. तशी एकदिवस ती बापाजवळ गेली.म्हणाली,
"बाबा,तुम्ही नेहमी उदास दिसता.काय कारण आहे?कळेल काय?"
".........." बाप काहीच बोलला नाही.तशी ती म्हणाली,
बाबा,मी ठरवलंय.मी सोडलेलं शिक्षण शिकणार.तुमच्या अपेक्षा पुर्ण करणार.बदला घेणार.कांता आणि नयनाशी झालेल्या समाजाच्या वर्तनाचा.पण तुम्हाला आपला उदासपणा सोडावा लागेल."
कोमलनं बोललेले शब्द भीमरावनं ऐकले.त्याला आश्चर्य वाटलं.तसा आनंदही झाला.तसा तो म्हणाला,
"काय बोलते बेटा?तू शिकणार व्हय.कशी शिकणार.तू तं शिक्षण सोडून पाचसहा वर्ष झाले.कशी शिकणार?तुझ्या सोबतची मुलं आता मोठी झालीत.आता शाळेत लहान लहान मुलं आहेत.तुला लाज वाटणार नाही का?"
"बाबा,मी समदं सहन करील.केवळ तुमच्यासाठी.तुम्ही फक्त हो म्हणा."
"ठीक हाये तर." भीमराव म्हणाला.
वडीलांचा मिळालेला होकार कोमलला उत्साह देणारा ठरला.तशी तिनं सोडलेल्या वर्गात पुनर्प्रवेश केला.तशी ती शाळेला जावू लागली.
कोमल शाळेत जावू लागताच लोकं तिला चिडवू लागले.शाळेतील मुलंही चिडवू लागली.'एवढी मोठी घोडी' असे शब्द कानावर पडू लागले.कधी वाटत होतं की सोडून द्यावं शिक्षण.पण नाही.आपलं काय जाणार.समदं बाबांचं जाईल.त्यांच्या भावनांची राखरांगोळी होईल.कांता तसेच नयनाला न्याय देता येणार नाही.ती विचार करीत होती.त्या मानसिक विकृतपणाचा.जो प्रकार नयनासोबत घडला होता.
ही जनता आहे.हिजड्यांची औलाद नाही की बांगड्या घालून आरोपींचे गुन्हे चुपचाप सहनच करेल.हाथरसचं प्रकरण म्हणजे मत प्रदर्शित करणा-या स्वातंत्र्यावर गदा आणणारं प्रकरण आहे.
नयनाचं प्रकरण,नयना आमच्या अस्पृष्य समाजातील एक मुलगी.माझी बहीण.आज या माझ्या बहिणीवर बलत्कार झाला.त्यातच जीभ कापली.हातापायावर तसेच अंतर्गत भागात तसेच बहिर्गत भागात जखमा झाल्यात.नव्हे तर कंबरेचं आणि मानेचं हाडंही तोडलं गेलं.ती बोलू नये कोणाजवळ.तसेच तिला दाद मागण्यासाठी कोठेच जाता येवू नये.घरची मंडळी तिच्यासोबत कितीवेळा जातील.एक ना एक दिवस चूप बसतील हा विचार करुन केलेला सुनियोजित बलत्कार.
या बलत्कार प्रकरणाच्या अनुषंगानं भरपूर गाजावाजा झाला.त्यात कोणी कँडलमार्च काढलं.तर कोणी आंदोलन केलं.कोणी सांत्वना करणारे व्हिडीओ पाठवले.तर कोणी भडकविणारे.यातच एक चित्र दृष्टीस पडलं होतं.ते म्हणजे आरोपीच्या वडीलांचा मंत्र्यासोबत असल्याचा फोटो.खाली एक वाक्य लिहिलेलं होतं की आरोपीच्या वडीलांचे संबंध मुख्यमंत्र्याशी चांगले असल्यानं प्रकरण दडपलं गेलं आहे.कारण घटना अशीच होती.
पिडीतेच्या शवाला कोरोनाचा हवाला देत तिच्या मायबापालाही अंतिम समयी न भेटू देता ऐन रात्री दोन वाजता कोणत्याही प्रकारची मिडीयाला सुचना न देता,चोरुन लपून शव जाळून टाकून पुरावा नष्ट करण्यात आला.जेणेकरुन शरीराची पूर्णतः विल्हेवाट लागून पुरावे सापडू नये.
बलत्काराबाबत बोलतांना एक नक्की वाटते की माझी बहीण जरी दलित जातीची असली तरी गुन्हा हा गुन्हाच.मग तो कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा का असेना.त्या गुन्ह्याला जात,धर्म,नातेसंबंध नसतो.जरी गुन्हा करणारा हा आपला मुलगा जरी असला तरी त्या गुन्ह्यात त्याला माफ करुच नये.कारण त्यात ज्यानं गुन्हा केलेला असतो.तो गुन्हा नकळत घडलेला नसतो.तर जाणूनबुजून केलेला असतो.अशावेळी मुलांनी केलेले असे गुन्हे पदरात पाडून घेणे बरे नसते.
गुन्ह्याला नातेसंबंधात गोवू नये.कारण गुन्ह्याचा कोणाशी नातेसंबंध नसतो. हा भाऊ,हा बहिण.तसं कोणीही बाळगू नये.पण आम्ही मात्र गुन्हेगाराला वाचविण्यासाठी त्याला आमच्या चौकटीत बसवतो.तो आमच्या जातीचा आहे का?असेल तर काही बोलत नाही.उलट त्या आरोपीला हिंमत येईल असे बोलतो.वागतो.प्रदर्शन करतो.तो धर्माचा असेल तर मग धर्माचा आधार घेतो.मग यातून दंगे होतात.हिंसा भडकते.त्यातच अशांती निर्माण होते.शेवटी राजकारण मधात येतं.
जेव्हा राजकारण मधात येतं.तेव्हा मात्र मताच्या राजकारणासाठी जो तो ज्या जातीची संख्या जास्त असेल.ती जात कोणत्या बाजूला आहे.याचा विचार करुन राजकारणी पावले टाकत असतात.किती जातीची मंडळी कोणत्या बाजूला आहेत.तेही पाहून पावले उचलली जातात.राजकारण्यांचा सहभाग मिळताच मग त्या खटल्यात दम उरत नाही.पोलिसही टोकाची भुमिका घेत नाहीत.कारण त्यांना बदलीची भीती असते.त्यांना माहित असते की आपण जर अशी थोडीशीही गजबज केलीच,तर आपली बदली अशा ठिकाणी होईल.ज्या ठिकाणी कोणीही सहजासहजी जावू शकत नाहीत. हे पोलिस मात्र सत्ताधारी पार्टीच्या आदेशानुसार वागत असतात.सत्ताधारी पार्टी म्हणेल तसं.
आरोपी हा आरोपी असतांना व आरोपीचा जात धर्म आरोपी असतांना त्याला नात्याच्या शृंखलेत कसे गोवता येवू शकते?त्यामुळे तो कोणाचा मुलगा नसतो.भाऊ नसतो आणि कोणाशी त्याचं तत्सम स्वरुपाचं नातं नसतं.त्यामुळं त्याला शिक्षा देतांना कोणीही त्याला भावनात्मक आधार देवू नये.त्याची बाजू घेवू नये.तसेच टिकाटिपणी करु नये. नयनाच्या प्रकरणात मुख्यतः 'आरोपींचे रक्त गरम आहे.चूक होवून जाते.' अशा प्रकारची टिपणी काय दर्शवते याचा विचार न केलेला बरा.यात आरोपीची जात काढून त्या जातीच्या लोकांना भडकविणे व सांप्रदायिक दंगे घडवून आणणे हा उद्देश दिसून येतो.त्यातूनच जेवढा आरोपी दोषी,तेवढेच त्याची पाठराखण करणारेही दोषी आहेत.
महत्वाचं म्हणजे संविधानात्मक या भारतात संविधानाने प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला असतांना तसेच मत प्रदर्शित करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असतांना जर हा जीवन जगण्याचा अधिकार व मत प्रदर्शित करण्याचा अधिकार नयनासारखे प्रकरण करुन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होत असेल.जीभ कापून मत प्रदर्शित करण्यावर बंदी आणणारा हा प्रकार दलितांसोबतच नाही तर इतर मुलीमुलांसोबत होत असेल तर याला काय म्हणावे! हा निव्वळ बलत्कारच नाही,तर बलत्कार करुन जीभ कापणे म्हणजे कुठतरी स्वातंत्र्याच्या हक्कावर बाधा आणणारा प्रकार आहे.कदाचित इतरांचं रक्त गरम असेल.पण ते थंड करण्याचा उपायही संविधानाला माहीत आहे.म्हणून नयनाचं प्रकरण कोणीही थंड झालं समजून पुढे बलत्कार करु नये.नाहीतर ही अग्नीज्वाळा अशी भडकेल की मग आरोपीच नाही,त्या आरोपीची पाठराखण करणा-यांना ही देशातील जनता धडा शिकविल्याशिवाय सोडणार नाही.कारण ही जनता आहे.कोणाच्या मायबापाला न घाबरणारी जनता.मग कोणाचा कितीही मंत्री ओळखीचा का असेना.........
कोमल मन लावून अभ्यास करीत होती.तशी ती दहावी पास झाली.तिनं अकरावीला प्रवेश मिळवला.पण हे सगळं करीत असतांना व शिकत असतांना तिचं मन लागत नव्हतं.पण आता मन लागो की न लागो,आता तिला अभ्यास करणं भाग होतं.जर तिनं अभ्यास केला नसता व ती अनुतीर्ण झाली असती तर तिच्या वडीलांना जबर धक्का पोहोचला असता.तसा बाप उदास पाहूनच ती शिकायला तयार झाली होती.गावचा सगळा विरोध सहन करीत.अशातच ती बारावी पास झाली.
कोमल बारावी पास झाली खरी.पण आता काय करायचे.तिला विचार आला व प्रश्नही पडला.तशी एक मैत्रीण तिच्याजवळ आली.तिनं विचारलं की आता काय करणार? तशी कोमल म्हणाली,
"मी वकीलकीला प्रवेश घेणार."
"अगं छे वकीलकी.त्या वकीलांना कोण विचारतं? त्यापेक्षा मास्तरकीला प्रवेश घे.लवकर नोकरीला लाग आपल्या पायावर उभी हो ."
"नको गं,मला वकीलकीलाच प्रवेश घ्यायचा आहे."
"का बरं ठाम आहेस.या वकीलकीच्या पेशावर.कोणी आहे का वकील पाहिलेला."
"छे गं."
"मग दुसरं कोणतं कारण आहे.जरा मलाही कळू दे."
"मला न्याय मिळवून द्यायचा आहे लोकांना."
"म्हणजे? मी समजले नाही.जरा समजावून सांगशील."
"हो,ऐक."
तशी ती मैत्रीणीला सांगू लागली.
"माझी मोठी बहिण कांता.तिचा जीव हुंड्यानं गेला.हुंडा देवूनही तो नराधम अजून पैसा मागत होता.आमच्या मजबुरीनं आम्ही देवू न शकल्यानं ती हुंडाबळी ठरली.न्याय मिळाला नाही.लहान नयना.बलत्काराची शिकार झाली.तो बलत्कार सहन न झाल्यानं त्यातच ती मरण पावली.कोर्ट कचे-या सर्व झाल्या.न्याय मिळाला नाही."
"मग त्या घटनेचा आणि तुझ्या वकील बनण्याचा काय संबंध? त्या घटनांना बरीच वर्ष झाली असतील निकाल लागून.आता तुला त्या न्यायालयाच्या विरुद्ध बोलता येणार नाही.तो अपमान ठरेल न्यायालयाचा.शिवाय कोर्ट विचारेल की आतापर्यंत कोठं गेली होती म्हणून."
"अगं,मला माझ्या बहिणीचे खटले उघडायचे नाहीत.पण माझ्या बहिणीसारख्या समाजात ब-याच मुली आहेत की ज्या हुंड्यासाठी छळल्या जातात.बळी ठरतात.कुठंतरी बलात्काराच्या शिकार ठरतात.सर्रास बलत्कार होतात.पण न्याय मिळत नाही.कित्येक मुली ह्या गर्भातच मारल्या जातात.मुलगी नकोच म्हणून.कारण मुलगी जर जन्माला आली तर त्या मुलींच्या मायबापांना डोळ्यात तेल घालून जपावं लागतं.त्यामुळं मी ठरवलंय की वकील व्हायचं व अशा लाचार, मजबूर, अन्यायग्रस्त मुली व महिलांना न्याय मिळवून द्यायचा."
"व्वा कोमल, you are great. तू शिक.खुप मोठी हो.आपल्या बहिणीलाही न्याय मिळवून दे.तसेच समाजातील तू ठरवलेल्या महिलांनाही न्याय मिळवून दे."
ती मैत्रीण.त्या मैत्रीणीचं नाव कविता होतं.ती चालली गेली.तिनं मास्तरकीला प्रवेश मिळवला.लवकरच ती मास्तरीन बनली व पैसा कमवू लागली.काही दिवसानंतर तिनं विवाह केला व सुखी संसारात ती रममाण झाली. कोमलनंही वकीलकीला प्रवेश मिळवला.तसं ते वकीलकीचं जीवन खडतर जावू लागली.
वकीलकीच्या प्रवेशाचा सुरुवातीचा काळ.कोमल नयनासारखी पाहिजे तेवढी हुशार नव्हती.मराठी माध्यमातून आलेली ती मुलगी.तिला मराठी येत होती. धड इंग्रजी बोलता येत नव्हतं.वाचनही अडखळतच होतं.पण मनात जिद्द होती.
सुरुवातीचा काळ.त्या महाविद्यालयात भरपूर मुलमुली होते.ती मुले सर्व श्रीमंतांची होती.त्यांचे मायबाप मोठमोठ्या पोस्टवर होते.पण कोमल गरीब होती.ती मुलं इंग्रजी माध्यमातून आलेली होती.पण कोमल मराठी माध्यमातून.त्यामुळं त्या मुलांना भराभर इंग्रजी बोलता येत होतं.संवादही साधता येत होता.पण कोमलला इंग्रजी येत नसल्यानं तिच्यासमोर प्रश्न आ वासून उभा होता.कसं करायचं,काय करायचं असं तिला वाटत होतं.त्यातच हे वकीलकीचं शिक्षण सोडून द्यावं असंही तिला वाटत होतं.पण कसं सोडणार.बापाच्या सपनाचं काय? कांता आणि नयनावर झालेल्या अत्याचाराचं काय? तसा तिनं निर्धार केला.आपण इंग्रजी शिकायचं.
इंग्रजी शिकण्याचा निर्धार केला.पण इंग्रजी शिकायची कशी?शिकवणी लावावी लागेल.पण शिकवणी कशी लावायची.जवळ पैसा नाही.काय करायचे.अशातच ती एक दिवस मैत्रीणीसोबत पुस्तकाचे दुकान फिरत असतांना तिची नजर एका पुस्तकावर पडली.त्या पुस्तकावर लिहिलं होतं की दोन महिण्यात इंग्रजी शिका.
कोमलनं ती पुस्तक हातात घेतली.न्याहाळली.त्या पुस्तकात छोटे छोटे संवाद होते.तिला ती पुस्तक इंग्रजी शिकायला मदत करेल असं वाटू लागलं.त्यातच तिनं त्या पुस्तकाची किंमत विचारली.विक्रेत्यानं वीस टक्के सुटही देण्याचं कबूल केलं.
कोमलनं ती पुस्तक पाहताच व विक्रेत्यानं सुट देण्याचं कबूल करताच कोमलनं त्या पैशाचा विषय बापाजवळ मांडला.वडीलांना ते आवडलं व वडीलांनी जवळ पैसे नसल्यानं घरातील धान्य विकून मुलीला पैसा दिला.
कोमलनं ती पुस्तक विकत घेतली.तशी ती त्या पुस्तकानुसार इंग्रजी शिकू लागली.ती मेहनत घेवू लागली.तशी त्यात असलेल्या छोट्या छोट्या संवादानं ती मैत्रीणीशी संवाद साधू लागली.
कोमलची मेहनत व वकीलकी शिकण्याची जिद्द........थोड्याच दिवसात ती सराईतपणे इंग्रजी वाचू लागली व बोलूही लागली.अभ्यासही करु लागली.अशातच पहिल्या सत्राची परीक्षा झाली.कोमल विना शिकवणीनं पास झाली.मात्र तिच्या वर्गातील बरीच मुलं शिकवणी लावूनही नापास झाले होते.
वकीलकीचाच अभ्यासक्रम तो.बराच पैसा लागत होता.अशातच तिचा लहान भाऊ दहावीत गेला.त्याला शिकवणी लावायची होती.कारण तो तेवढा हुशार नव्हता.पण जवळ पैसा नव्हता.असलेला थोडाफार पैसा कोमलला लावायचा होता.काय करावे प्रश्न होता.भीमराव विचार करीत होता.त्यानं मुलाच्या शिकवणीसाठी पैसा भरला नाही.पण तो पैसा कोमलला लावला.अशातच मुलगा दहावी पास झाला.त्याचाही अकरावीला प्रवेश करायचा होता.तशी मुलाला शिकविण्याची गावात परंपराच होती.
मुलाला शिकवणी लावली नाही तरी मुलगा पास झाला.घरात आनंदीआनंद झाला.पुढे अकरावी प्रवेश.तसा कोमलचाही दुस-या वर्गात प्रवेश.दोघांनाही शिकण्यासाठी प्रवेशाची गरज.पैशाचीही गरज.काय करावे? भीमरावला काही सुचत नव्हते.अशातच तो मुलाला म्हणाला,
"बापू,माझ्यानंतर ही शेती कोण सांभाळणार? शेती आपली माय आहे.ती आपल्याला पोसते.अन् हं शिकून काय उपयोग? शिकल्यानंतर नोकरी लागेलच कशावरुन? त्यापेक्षा ही शेती कर.तुझ्या पोटाला घास तरी देईल."
बापाचा बोलका प्रश्न.रोहित काय समजायचं ते समजला.त्यानं उत्तर दिलं नाही.तसा बापानं त्याच्या शिक्षणात कोमलसाठी व्यत्यय आणला.त्याची शिकायची इच्छा असूनही जवळ पैसा नसल्यानं मजबूरीनं रोहितनं आपलं शिक्षण सोडलं होतं.
पाच वर्षाचा अभ्यासक्रम तो.आज चार वर्ष झाले होते.अशातच कोमलला वडीलांची रोहितला न शिकवित असल्याची गोष्ट माहित पडली.तसं तिचं महाविद्यालय रात्रपाळीतच होतं.तसा तिनं आपल्या भावालाही शिकविण्याचा निर्धार केला.
शहरातील महाविद्यालय.कोमल गावापासून दूर अशा ठिकाणी शहरी भागात वसतीगृहात राहात होती.त्यामुळं साहजिकच तिला शिक्षण शिकत असतांना साबण सोड्यासाठी पैसा लागत होता.तशी ती फारशी गावाला येत नसे.पण जेव्हा यावर्षी गावाला आली.तसं तिला रोहितला आपले वडील पैसा नसल्यानं व जो काही पैसा आहे.तो पैसा आपल्यालाच लावत असल्यानं रोहितचं शिक्षण जात आहे.असं कळलं.तिनं हे कळल्याचं बापाला सांगीतलं नाही.पण एक गोष्ट आवर्जून केली.ती म्हणजे त्याला शिकविण्याची.
दुसरं वर्ष उजळलं होतं.तिनं रोहितची एक वर्ष खाली का बरं असल्याचं प्रमाणपत्र बनवलं तसं तिनं आपल्या वडीलांना समजावून शहरातील वसतीगृहात त्याचं नाव दाखल केलं.
रोहित आणि कोमल शहरात शिकू लागले.भीमराव व त्याची पत्नी गावात राहू लागले.तसं पाहता गाव भीमरावच्या मुलांच्या शिक्षणाचा द्वेष करीत असल्यानं आपली मुले आपल्या दूरच बरी असं भीमरावला वाटू लागल्यानं त्याला मुलं शहरात शिकण्यात अडचण वाटत नव्हती.तो खुश होता.तसा मुलीला पैसा पाठवीत होता.
रोहितचं शिक्षण निःशुल्क आहे असा बहाणा करुन कोमलनं त्याचा अकरावीचा प्रवेश सुनिश्चित करुन वडीलांची परवानगी मिळवली खरी.पण आता त्याच्या शिक्षणाला लागणारा पैसा कसा पुरवायचा? कोमलसमोर विचार उभे राहात होते.तशी कोमल यावर्षी कामाला जात होती.
कोमल दिवसभर एका कार्यालयात काम करायची.तर रात्री महाविद्यालयात जायची.आलेल्या पैशातून व काही वडीलांच्या पैशातून तिनं आपलं व आपल्या भावाचं शिक्षण सुरु ठेवलं.हे तिचं वकीलकीचं पाचवं वर्ष होतं.अंतिम वर्ष.अशांत तिचं वय वाढलं होतं.तिचा विवाह करणं भाग होतं.कारण विवाह जर केला नाही,तर उद्या आपली मुलगी खपणार नाही असं भीमरावला वाटत होतं.तसे यावर्षीच्या सुरुवातीलाच तिला पाहायला पाहूणे येणार होते.वडीलांनी पाहूण्यांना कोमलची इच्छा न विचारता होकार दिला होता व बोलावून घेतले होते.त्याचबरोबर कोमलला कोणतीही गोष्ट न सांगता पाहूणे येण्याच्या आदल्या दिवशी तिला ताबडतोब बोलावून घेतले.
कोमल वडीलांच्या ताबडतोब बोलावण्यानं गावी परत आली.तसं सांजच्याला बापानं तिचा विवाह करायचा आहे.पाहूणे उद्याला येणार असल्याचे सांगीतले.मुलाजवळ भरपूर शेती आहे.पण तो पाहिजे तेवढा शिकलेलाही नाही.पण सुखी कुटूंब आहे.हे सांगीतलं होतं..कोमलला ते आवडलं नाही.पण वडीलांना ती काहीही बोलली नाही.
कोमल वसतीगृहातून ताबडतोब घरी आली.तेव्हा सायंकाळी वडीलानं तिला सांगीतलं की पाहूणे येणार.तेव्हा तिला फार दुःख झालं.पण ती काहीही बोलली नाही हे जरी खरं असलं तरी हा विवाह होवूच नये असा तिनं विचार मनात केला.त्यासाठी ती विचार करु लागली.पण तिला काही सुचत नव्हते.तशी आज रात्रीला तिला व्यवस्थीत झोप लागली नाही.ती विचारच करीत होती.
विचार करता करता पहाट झाली.पक्षांचा किलबिल आवाज कानी पडला.त्याचबरोबर पहाट झाली हे तिला कळलं.तशी ती उठली व घरची कामं करायला लागली.
ती सकाळी उठली होती.तिनं अंगण झाडलं.अंगणात सडाही टाकला.त्याचबरोबर घरी मातीचं छप्पर असल्यानं शेणाचं सारवण केलं.पण रात्रीला झोप व्यवस्थीत न झाल्यानं तिला थकल्यासारखं वाटत होतं.अशातच अकरा केव्हा वाजले ते तिलाही कळले नाही.तसा भीमराव म्हणाला,
"आटपा लवकर.पावणे येण्याची येळ झाली."
वडीलाच्या तोंडून ऐकलेला शब्द.कोमलच्या काळजाला भेदून गेला.ती विचार करु लागली.तसा एक विचार तिच्या मनात आला.तो म्हणजे आपण पाहूण्यांना नकार द्यावा.कारण एकतर बाबानं आपल्याला विचारात घेतलं नाही पाहूणे बोलावताना.तसेच आपण जर आजच विवाहबद्ध झालो तर आपल्या वकीलकी शिकण्याला अडथडा निर्माण होईल.पण दुसरा विचार हाही आला की नकार दिल्यास पाहूणे काय म्हणणार.वडीलांचा अपमान होणार. काय करावे सुचत नव्हते.अशातच पाहूणे आले.वडीलांनी पाहूण्यांना पाय धुवायला पाणी दिलं.त्याचबरोबर नाश्ता पाणी आटोपला व वडीलांना पाहूण्यांनी म्हटलं,
"बोलवा तिला."
भीमरावनं कोमलला बोलावलं.ती बाहेर आली.एका खुर्चीवर बसली.तसे पाहूणे प्रश्न विचारु लागले.
"बेटा नाव काय तुह्यं?"
"कोमल."
"किती शिकलीस?"
"एल एल बी करतेय."
"एल एल बी म्हणजे?"
"वकीलकीचा अभ्यास."
"छान."
त्यानंतर पाहूण्यांनी तिला जन्मतारीख,वय व इतर काही शिकल्याचं विचारलं.त्यानंतर शेवटचा प्रश्न विचारला.त्या प्रश्नांच्या उत्तरानं सर्वांना चक्रावून टाकलं. तो प्रश्न होता.
"आमचा मुलगा आवडला काय?"
त्यावर कोमल न भीता स्पष्टपणे म्हणाली.
"नाही."
कोमलनं नकार देताच सर्वांच्या चेह-यावरील आनंद मावळून गेला.तसा पाहूण्यातील एक व्यक्ती म्हणाला,
"बेटा वाईट वाटून नाय घेणार असशील तं एक प्रश्न विचारु?"
"विचारा."
"तुला आमचा मुलगा न आवडण्याचं कारण?"
"मला सध्याच विवाह करायचा नाही."
"का बरं?"
"मला शिकायचं आहे.भरपूर शिकायचं आहे."
तसं पाहूण्यांनी ठीक आहे म्हटलं व कोमल आत गेली.पाहूणेही आल्या वाटेनं निघून गेले.तसं भीमरावनं मुलीला बोलावलं.विचारलं,
"बेटा,तुले जर पाहूण्यांले नकार द्याचा होता तं मले आधी का नाय सांगीतलं?"
"बाबा,तुम्ही विचारलंच नव्हतं मला."
"पण बेटा,शिकता शिकता तुह्यं वय वाढन.तं तुह्या लगन तरी होईन का?"
"बाबा,तुम्ही माझ्या विवाहाची चिंता करु नका.असं जर झालं तर मी विवाहच करणार नाही."
वडील भीमरावसमोर कोमलची तटस्थ प्रतिक्रिया.वडीलांना कोमलचा राग आला होता थोडासा.पण तो तरी काय करणार.तिच्या इच्छेचा प्रश्न होता.तो चूप बसला.
दुसरा दिवस उजळला.कोमल शहरात जायला निघाली.कारण तिचं शिक्षणाचं नुकसान होणार होतं.
कोमल शहरात आली.ती त्या अंतिम वर्षाचा अभ्यास करु लागली.तशी ती परीक्षा आटोपली व निकालही लागला.कोमल चांगल्या गुणानं पास झाली.
वकीलकीची परीक्षा पास होताच कोमल वकील बनली होती.पण ती वकील कागदोपत्री बनली होती.अजून लांबचा पल्ला बाकी होता.तिला अनुभव नव्हता.तसेच तो अनुभव घ्यायला कोण्यातरी उच्च वकीलाच्या हाताखाली काम करणे भाग होते.
कोमलला माहीत होते की असं कागदोपत्री वकील बनून चालणार नाही.तेव्हा कोणत्यातरी वकीलांच्या हाताखाली काम करायला हवं.तशी तिनं शहरातील एका मातब्बर वकीलाच्या हाताखाली काम करणं सुरु केलं.त्यातच तिला फार त्रास होवू लागला.कारण ज्या वकीलाच्या हाताखाली ती काम करीत असे.तो वकील तिला पैसा देत नसे.तसेच पुर्वी महाविद्यालय रात्रपाळीत असल्यानं तिला मिळणारा दिवसाचा वेळ हा एका कार्यालयात काम करुन तिथे पैसा कमविण्यात कामात आणत असे.त्या पैशात ती आपला खर्च व भावाचा खर्च करीत होती.पण आता मात्र तिच्यावर फार संकट कोसळलं होतं.कारण तिच्याजवळ पैसाच यायचा नाही.शिवाय वडील म्हातारे झाले असल्यानं त्यांना जास्त काम जमत नव्हतं.त्यामुळं पैसा हातात येत नव्हता.त्यामुळं जो पैसा कोमलला गावावरुन मदतीसाठी यायचा.तो बंद झाला होता.अशातच तिची चिंता वाढली होती.ती म्हणजे तिच्या पोटापाण्याची व त्याचबरोबर तिच्या भावाच्या शिक्षणाची.
तिला असलेली अतिव चिंता.त्यातच जवळ नसणारा पैसा.यातच तिनं सायंकाळी पार्टटाईम जाब शोधला.न्यायालयातून निघून ती सायंकाळी थेट कार्यालय गाठत असे.त्यात तिला काही पैसे मिळत.त्या थोड्याफार पैशात तिचा काटकसर करुन पोटापाण्याचा खर्च भागत असे.त्याचबरोबर तिच्या भावाच्या शिक्षणाचाही खर्च ती भागवत होती.अशातच तिला मागणी घालायला काही मंडळी येत.तेव्हा वडील तिला सांगत पण ती विवाहासाठी तयार होत नव्हती.कारण तिला वाटत होतं की आपण जर विवाह केलाच तर आपल्या भावाचं शिक्षण होणार नाही.तसेच विवाहाला मागणी घालणा-या माणसांसोबत आपला विवाह झाल्यास आपण सुखी होवू.पण आपला परीवार दुःखी कष्टी होईल.ज्या बापानं आपल्याला शिकवलं.त्या बापाला पोसण्याची जबाबदारी आपली असतांना विवाह झालाच तर आपण पोसू शकणार नाही.असं तिला वाटत असे.
कोमलचा न्यायालयातील अनुभव वाढत गेला.तशी ती स्वतः केसेस लढू लागली.सुरुवातीला तिला केसेस कमी मिळाल्या. कारण तिचं अद्याप नाव झालं नव्हतं.तसं पाहता हळूहळू तिचं वय वाढत गेलं.
जसं जसं तिचं वय वाढलं.तसतशी तिची कांती घसरु लागली.वडीलांना मात्र तिच्या विवाहाची चिंता सतावू लागली.तसे काही मागणी घालणारेही तरुण तिला पाहून जावू लागले.पण हे आता पाहायला येणारे तरुण तिच्या लायक नव्हते.चौकशी केल्यावर ते तरुण कमी शिकलेले व्यसनी असल्याचे भासत होते.कारण आता तिच्या वाढत्या वयानुसार तिला मागणी घालणारे चांगले शिकलेले तरुण आता शिल्लक नव्हते.शेवटी तिनं आता निश्चय केला की आता आपण आजन्म विवाहच करु नये.
भावाचं शिक्षण झालं होतं.तो इंजिनियर बनला होता.पण अजुनपर्यंत त्याला जाब मिळाला नव्हता.वडील पार थकलेले होते.त्यांना आता अजिबात काम जमत नव्हते.आईही थकली होती.ते दोघंही जण म्हातारे झाले होते.त्यामुळं त्यांच्यानं काम जमत नसल्यानं भाऊ,वडील व आईची जबाबदारी एकट्या कोमलवर आली होती.आता तिनं शहरात एक किरायाचं घर घेतलं होतं.
शहरात तिला पाहिजे तेवढ्या केसेस मिळत नसल्या तरी ज्या कोणत्या केसेस मिळत होत्या.त्यातून आलेल्या पैशातून ती आपलं पोट,भावाचं पोट व आईवडीलांचं पोट,त्यांची औषधं,तसेच किरायादेखील भागवत होती.अशातच तिच्या भावाला दूरच्या जिल्ह्यात जाबसाठी बोलावणं आलं.
रोहित कामासाठी दूरच्या जिल्ह्यात गेला.त्यानं ते काम पकडलं.तसा तो ब-यापैकी कमवायला लागला.गाठीला पैसा शिल्लक पडू लागला.पण तो आपला पैसा बहिणीला पाठवत नसे.त्यातच असा पैसा गोळा करुन भावानं आपल्या बहिणीला व आईवडीलांना न विचारता आपल्याच पेशातील एका मुलीशी विवाह उरकवला.त्यानंतर त्याला दोन मुलं झाली.अशाप्रकारे त्यानं आपला संसार थाटला.त्यानं आपल्या मायबापाची चिंता सोडून दिली.तसेच ज्या बहिणीनं त्याला शिकवलं.माझा भाऊ शेतात उन्हातान्हात राबू नये.याचा विचार करुन शहरात आणलं.त्याचे लाड पुरवले.तो भाऊ आज पुरता विसरला होता.तो मजेत होता.आपल्या पत्नी व मुलासमवेत.मात्र कोमलची इकडे तारांबळ मचली होती.मायबापाचं म्हातारपण.तिला न मिळणारे खटले.त्यातच मायबापाचे आजार.तसा तिला मिळणारा पैसा.तो पैसा पुरत नव्हता.काय करावे सुचत नव्हते.स्वतःचा भाऊही आज पराया झाला होता.नव्हे तर परायासारखा वागत होता.अशातच आई आजारी पडली व त्या आजारातच व्यवस्थीत उपचार न झाल्यानं ती मरण पावली.पण तिच्या मयतीला रोहितशी संपर्क न झाल्यानं त्याला कळवता आलं नाही वा तो येवू शकला नाही.कशीबशी ती मयत कोमलनं आटोपवली.
आईची मयत आटोपली होती.आता भीमराव एकटा तिला आधार उरला होता.त्याचीही प्रकृती व्यवस्थीत राहात नसे.तरीही तो तग धरुन होता.नव्हे तर तो आपल्या बोलण्यातून कोमलला आधार देत होता.विवाह करण्याविषयी सांगत होता.
आता मात्र कोमलला वडील असूनही एकएकटं वाटत होतं.तिला भावाची खुप आठवण येत होती.भाऊ आपल्या संसारात खुश होता.पण कोमल मात्र आजही दुःखी होती.
कोमलला आता जास्त केसेस मिळत होत्या.ती समाजासाठी लढत होती.नव्हे तर जो हुंड्याच्या रुपानं छळत होता.त्यांचं डोकं ठिकाणावर आणत होती.त्यातच जे व्यक्ती बलत्कार करीत होते.त्या त्या व्यक्तींना धडाही शिकवीत होता.ती बरेच खटले निःस्वार्थ लढून जिंकत असल्यानं तिचा समाजात रुतबा निर्माण झाला होता.मात्र घरी तिला एकाकीपणाचं दुःख छळत होतं.
मुलगा आणि मुलगी काय देतो.असं तिला वाटत होतं.भावाचं आपल्याला मदत करणं तसेच वडीलांना सांभाळणं प्रथम कर्तव्य असतांना आपला भाऊ आपली पत्नी व आपली मुलं यातच रममाण झाला.तो इवलासा येवूनही पाहात नाही.त्याचा पत्ताच दिसत नाही.वडील कसे आहेत कसे नाही.हे साधे विचारत नाही तो.आपल्या गावात तर मुलींचा जन्म हा निषिद्ध मानला जातो.सर्रास भ्रृणहत्या केल्या जातात.गर्भलिंगनिदान करुन.अन् ही आपल्या भावासारखी मोठी झालेली मुलं साधी वडीलांना विचारत नाहीत.सेवा करणं तर दूरच.ती विचार करीत होती की हा मुलींचा जन्म बरा की जी आपल्या वडीलांसाठी दोन अश्रू तर ढाळते.तिनं विचार केला.आता आपण स्वतः मुलींना गर्भात मारण रोखायचं.गर्भलिंगनिदान चाचण्या रोखायच्या.मुलींच्या भ्रृणहत्या रोखायच्या.नव्हे तर मुलींवरील गर्भ राहण्यापासून तर तिच्या मरेपर्यंतच्या वेदना रोखायच्या.आपण वकील आहोत.आपण अशा अत्याचाराच्या विरोधात जनहित याचिका दाखल करायच्या.ज्या ज्या वाईट प्रथा आहेत.त्या त्या प्रथा समाजातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचा.
तिनं तसा विचार केला.तशा तीनचार प्रकारच्या जनहित याचिका तिनं स्वतः दाखल करुन घेतल्या होत्या.कशासाठी?तर समाजातील स्रीयांवरील अत्याचार दूर करण्यासाठी.जे अत्याचार दूर झाल्यानं स्रीया सुखी होणार होत्या. हुंडाबळी,भ्रृणहत्या,बलत्कार ह्या समाजातील वाईट गोष्टी होत्या.त्या गोष्टी भीमरावला आवडत नव्हत्या.त्या गोष्टीनंच भीमरावच्या दोन मुलींचा बळी घेतला होता.

भीमरावला जुन्या प्रथा मुळातच आवडत नव्हत्या.त्या जुन्या प्रथांनीच माझ्या मुलीचा जीव घेतला असं त्याला वाटत होतं.त्याचबरोबर त्या जुन्या प्रथा ह्या म्हणजे माणसाच्या माणुसक्या मारणा-या प्रथा वाटत होत्या.या प्रथांबाबत असुया त्याच्या मनात एका प्रकारावरुन निर्माण झाली होती.त्याला असाच मुकूंद नावाचा व्यक्ती भेटला होता.त्या मुकूंदनं घडलेला प्रसंग त्याला सांगीतला होता.त्यामुळं त्याच्या मनात साहजिकच असुया निर्माण होणं स्वाभाविक होतं.
मुकूंद नावाचा तो व्यक्ती.तो अस्पृश्य समाजातील होता.पण त्याची निरीक्षण शक्ती जोरदार होती.आकलनही जोरदार होतं.
पुर्वी लिहिण्याचा अधिकार हा उच्चवर्णियांना होता.मनुनं जे कायदे बनवले होते.त्या कायद्यांचं पालन करणारा हा समाज, दलितांनी जर लेखनी हातात घेतली तर त्या लेखणी हातात घेणा-यांचे हात तोडल्या जात असत.असा भयंकर अमानुष अत्याचार.त्यातच कोणी गावातलं मरणही पावलं तरी तिथे विटाळ होतो म्हणून जाता येत नव्हतं.
साहजिकच लिहिण्याचा अधिकार मुळात उच्चवर्णियांना असल्यानं त्यांनी पुर्वी भरपूर लेखन केलं.त्यांनी प्रथा वाईट की चांगल्या ह्याचा विचार न करता त्या ग्रंथात लिहिल्या नव्हे तर त्या अंमलातही आणण्याचं काम केलं.ह्या प्रथांचं मग जो पालन करणार नाही.त्याला राजांकरवी शिक्षा वा दंड केला जावू लागला.
राजेच ते.ते राजे ब्राम्हण किंवा पंडीतांचा सल्ला मानत असत.अस्पृशांना तर फारच नीच समजत असत.जरी अस्पृश्य हुशार असतील तरीही.ह्या प्रथा वाईटच होत्या.कारण ह्या प्रथेत निरपराधांचे हाल हाल होत होते.सतीप्रथेत कित्येक निरपराध स्रिया पतीच्या शरणावर मृत्यूमुखी जात असत.काही स्वखुशीनं तर काही इच्छा नसतांनाही.यातच पतीच्या शरणावर सती जाणे वेदनादायी जरी असले तरी ती सतीप्रथा प्रथा असल्यानं ते पुण्याचं काम समजलं जाई.
इंग्रज भारतात येण्यापुर्वी ह्या प्रथा सुरुच होत्या.पण इंग्रज सुधारणावादी असल्यानं त्यांनी ब-याचशा प्रथा बंद केल्या.त्यातच जेव्हा देश स्वतंत्र्य झाला.तेव्हा या देशात संविधान बनलं.त्याचबरोबर ब-याचशा प्रथांना तिलांजली देता आली.आता अस्पृश्य मंडळींनाही उच्चवर्णीयांच्या घरी लग्नविधी तसेच मरणविधीलाही जाता येवू लागलं.
एकदा मुकूंद असाच एका उच्च वर्णियांच्या घरी मयतीला गेला.जो उच्चवर्णीय व्यक्ती इतर समाजाच्या मयतीला कधीच गेला नव्हता.तो आपले काम आणि आपली पुजा यातच गर्क होता.जो इतर समाजाला चिल्लर समजत होता.परंतू त्या उच्चवर्णीय माणसाच्या घरी मयत होताच मुकूंद त्याचे घरी मयतीला गेला.
मुकूंदनं आपल्या समाजातील कित्येक मयतीचे धार्मीक विधी पाहिले होते.शरणाच्या कपाळावर नाणे लावण्यापासून तर त्या मयतीला जाळून विल्हेवाट लावेपर्यंतच्या सर्व विधी त्याला ज्ञात होत्या.त्यानुसार तो त्या उच्चवर्णीय समाजाच्या मयतीचं निरीक्षण करु लागला.त्यातच त्याला प्रेताच्या कपाळावर शरणाला आग लावण्यापुर्वी ते नाणं दिसलं नाही.तसा त्याला प्रश्न पडला की त्या प्रेताच्या कपाळावर नाणं असावं.नाहीतर प्रथेनुसार हे प्रेत शांत होणार नाही व काही अघटीत होईल.अस अघटीत होवू नये म्हणून त्यानं सुचना केली की या प्रेताच्या कपाळावर नाणं लावा व प्रेताच्या डोळ्यावर कापूर ठेवून पानानं झाका.पण त्यावर एक व्यक्ती म्हणाला,
"आमच्यात अशा प्रथा नाही."
उत्सुकतेनं मुकूंदनं त्या माणसाला विचारलं.
"का बरं?"
"शिक्का जर प्रेताच्या कपाळावर लावून ते प्रेत जाळलं तर लक्ष्मी जाळणं असा अर्थ होतो.तसेच कपाळावर कापूर ठेवून प्रेत जाळणं म्हणजे पुढच्या जन्मात अंध व्यक्ती जन्माला घालणं असा त्याचा अर्थ होतो."
"म्हणजे? कसा अंध बनेल?"
"अंध म्हणजे निव्वळ डोळ्यानं आंधळा नाही.तर मनानं आंधळा,विचारानं आंधळा,ज्ञानानं आंधळा.सर्वच गोष्टीनं आंधळा."
"आणखी एक विचारु का?
"विचारा."
"ह्या प्रेताचं डोकं दक्षीणेकडं न ठेवता असं उत्तरेकडे का ठेवलं?"
"ते कारण तुम्हाला सांगण्यासारखं नाही.आता तुम्ही चूप बसा.नाहीतर तुमच्या प्रश्नानं वादं होतील."
"नाही,सांगा तर खरं.अहो मलाही माहीत असाव्या प्रथा." मुुकुंद काकुळतीनं म्हणाला.
"आम्ही देव मानतो प्रेताला.म्हणून त्या प्रेताचं डोकं उत्तरेकडे असतं.हे प्रेत पाहात असतं राक्षसांना.जे राक्षस दक्षिण दिशेला वास करतात."
मुकूंदला प्रश्न पडला की प्रथा ह्या यांनीच बनवल्या.मग प्रेताचं डोकं दक्षिणेकडे आम्हाला ठेवायला सांगीतले असतांना तसेच डोळ्यावर कापूर ठेवण्याचीही प्रथा यांनीच सांगीतली असतांना,तसेच टाळूवरही शिक्का लावण्याची प्रथा यांनीच पाडली असतांना हे या प्रथा का मानत नसावेत? कदाचित आमच्या घरात लक्ष्मी येवू नये म्हणून आम्हाला कपाळावर शिक्के लावायला सांगीतले असेल का? तसेच आमच्या घरात आंधळे निपजावे म्हणून आमच्या प्रेताच्या डोळ्यावर कापूर ठेवायची प्रथा पाडली असेल का? यांची प्रेतदहन प्रसंगी वेगळी प्रथा का असावी? याचा अर्थ असा की ते इतर समाजासाठी प्रथा बनवीत असतांना इतर समाजाला राक्षस समजत असावेत व आपल्या समाजाला देव.
मुकूंदचा प्रश्न रास्त होता.तो विचार करीत होता की वास्तविक पाहता प्रथा या सर्वांसाठी सारख्याच असायला हव्या.कारण ते आणि आम्ही एकाच धर्माची माणसं.मरणानंतर कोणं पाहिलं की आपल्या प्रेताला जाळणार कसं? प्रेताची विल्हेवाट लावणार कशी? कोणी शिक्का लावला की नाही? कोणी दक्षीणेकडे तोंड ठेवलं की उत्तरेकडे? तसेच कोणं अग्नी दिला की माती? तसंच पुढचा जन्मही कोणी पाहात नाही.पाहिला नाही.हे प्रेतही पाहात नाही.तरीही असे असतांना पुढचा जन्म आधळ्यांचा मिळेल म्हणून त्या प्रेताच्या डोळ्यावर कापूर न ठेवणे.मातीच्या तेलानं शरण न पेटविणे.इत्यादी गोष्टी का? यातील प्रश्न मुकूंदला कळेनाशा होत्या.तो विचार करीत होता सत्य वदण्याचा.पण त्या सत्य वदण्यानं त्याचंच नुकसान होणार होतं.उगीचंच वाद होणार होता.शेवटी निपचीत चूप राहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.


भाग दुसरा


ते गाव.त्या गावात सर्वच जातीधर्मातील लोकं राहात होते.गावात तसा आता भेदभाव राहिलेला नव्हता.सर्वच लोकं एकमेकांच्या घरी जेवायला जात असत.एकमेकांच्या सणउत्सवात सहभागी होत असत.तसेच एकमेकांना चांगले लेखत असत.जर एखाद्याच्या घरी मयत झाल्यास ते मयतीला तर जात.जेवायलाही जात असत.मात्र त्या गावात असाही माणूस होता की जो स्वतःला उच्च जातीतील समजून तो मयतीलाही जात नसे व जेवायलाही जात नसे.तो जुन्या प्रथांचं काटोकाट पालन करीत असे.
कलिराम त्याचं नाव होतं.तो गावात राहात होता.तो स्वतः उच्च जातीतील असून त्याच्या मनात अहंकार होता.तो स्वतःला उच्च जातीतील समजून कोणाच्याही घरी मयतीला जाणं टाळायचा.कनिष्ठ जातीच्या घरी मयतीला जाणं म्हणजे त्याला शुल्लक गोष्ट वाटायची.तो रुढी, प्रथा, परंपरा आवर्जून पाळायचा.अशाच या गावात विश्वास नावाचा व्यक्ती राहात होता.त्याचा विवाह झाला होता व तो आपल्या मुलाबाळासमवेत खुश होता.गावात कोणी मरण पावलं तर तो मयतीला जात असे.मात्र तो जुन्या रुढी,प्रथा,परंपरा पाळत नव्हता.जसा देश सुधारला.तसं गावंही सुधरावं असं त्याला वाटत असे.तो सुधारणावादी होता.
अलिकडे परीवर्तनशीलपणाला सुरुवात झाली होती.जुन्या रुढी,परंपरा कालबाह्यं होतांना दिसत होत्या.मुलींनी आता लुगडे हद्दपार केलेले असून आता साड्याही हद्दपार केलेल्या होत्या.आता तर सलवार व पायजमाही कालबाह्य होतांना दिसत होता.त्याची जागा आता जिन्स आणि टी शर्टनं घेतलेली होती.पूर्वी लांबलचक वेणी राहायची.आता ती वेणी जावून मुलींनी आपली केससज्जाही बदलवली होती.तसेच आता कानात डुलं,नाकात नथनी घालण्याची प्रथाही नष्ट होते की काय असे वाटायला लागले होते.तसेच पुर्वी गळ्यातील मंगलसुत्राला फार मोल होतं.ते उतरलं तर पती मरण पावतो असा संकेत होता.तो आता कालबाह्य झालेला असून त्याची जागा सोन्याच्या आणि चांदीच्या माळेनं घेतलेली होती.बहुतःश विवाहित मुली आता ती सोनसाखळीच वापरतांना दिसत होत्या.त्यामुळं आता पतीमोल किंवा पत्नीमोल राहिलेलं नव्हतं.त्यातच ह्या काही प्रथेंचं कालबाह्य होणं आता विचार करायला लावणारी बाब झाली होती.मुलांनी आपली राहणी बदलवली होती.ते मात्र आता लांब केस ठेवून वेणी बांधायला लागले होते.
एकदा त्या कलिरामच्या घरी मयत झाली.त्याची पत्नी मरण पावली.त्याला अतीव दुःख झालं.मयत स्मशानाकडं रवाना होणार.इतक्यात लोकं विचार करु लागले की मयतीला जायचं की नाही.कारण कलिराम कोणाच्या मयतीला कधीच जात नसे.तरीही लोकांनी ठरवलं की मयतीला जायचं.कारण तो जरी मुर्ख बनला असला तरी आपण मुर्ख नाही.तसे लोकं मयतीला गेले.
मयत आटोपली होती.तसा जेवनाचा कार्यक्रम होता.मयतीतील जेवनाचा कार्यक्रम.तशी त्या घरची मंडळी कोणाच्या मयतीला येत नव्हते.खायला तर दूरच.स्वतःला उच्च जातीची समजायची की काय? कारण त्यांची जात त्या भागात उच्च होती.
विशेष सांगायचं म्हणजे जाती ह्या माणसानच बनविलेल्या असून त्या कधीही उच्च नसतात वा कनिष्ठ नसतात.तरीही काही लोकं स्वतःला उच्च जातीतील समजतात.ते इतर जातींना कनिष्ठ समजतात.तसंच ते कुटूंब.स्वतःला उच्च जातीतील समजत होतं.
जेवनाचा कार्यक्रम.काही लोकांचा विचार की जो माणूस कोणाच्या मयतीला येत नाही.त्याच्या घरी आपण मयतीला गेलो.पण जेवणाला कसं जायचं.काही लोकं मात्र जेवायला जायला तयार होते.पण त्यांना प्रथा आडवी येत होती.बाराव्या दिवशी कसं जायचं! त्यातच पत्रीका छापली गेली.ती पत्रीका लोकांना दिली गेली.तसेच जी मंडळी मयतीला आली.ती मंडळी जेवायला नक्की येतील असे वाटून घेवून त्या कलिरामनं लोकांना चिल्लर समजत स्वयंपाक तयार केला.तसेच तो स्वयंपाक तेराव्या दिवशी होता.
त्या गावात असलेला विश्वास जरी अशा प्रथा पाळत नसला तरी बाकीची मंडळी प्रथा पाळत होते.त्यांना मयतीचं जेवन तेराव्या दिवशीचं चालत नव्हतं.त्यातच ती तेरावी जरी असली तरी मयत होवून बाराच दिवस झाले होते.पण कट्टर पंथी प्रथा पाळणारी गावातील मंडळी त्या बाराव्या दिवशी त्या माणसाच्या घरी जेवायला गेली नसल्यानं बनवलेलं अन्न जागच्या जागीच राहिलं.अन्नाची नासाडी झाली.त्यातच त्याला ते अन्न फेकावं लागलं.त्यातच एक दिवस तो विश्वासला भेटला.सहजपणे म्हणाला,
"माझ्या घरचं तेरवीचं जेवण करायला तुम्ही आला नाहीत. कोणीही फिरकलं नाही.मी जे अन्न फेकलं.त्याचा तुम्हा सर्वांना शाप लागू शकतो!"
त्यावर विश्वास म्हणाला,
"कसा काय शाप लागेल?"
"मला अन्न फेकावं लागलं ना."
"कोणं बनवायला लावलं?"
"तुम्हाला चारणं भाग होतं.कारण तुम्ही मयतीला आले होते."
"विचारलं होतं का तुम्ही जेवणाला येणार की नाही ते?"
"मग मयतीला का आले? तुम्ही मयतीला आले आणि जेवायला नाही आले.म्हणून तुम्हाला शाप लागणार."
विश्वास कधी कलिरामचा राग करीत नव्हता.पण त्या कलिरामच्या तशा बोलण्याचा त्याला राग आला व तो म्हणाला,
"हे बघा,कलिरामजी,तुमचा शाप तरी कसा लागणार.तुम्ही एकतर कोणाच्या मयतीला येत नाही.आम्ही आलोत.शिवाय तुम्ही तेरावी बाराव्या दिवशीच केली.आमच्यातील काही मंडळी प्रथा पाळणारी आहेत.ती शुद्ध अशुद्धपणा पाहतात.पाळतातही.तेव्हा त्यांना तुमच्या घरचं जेवन चालत नाही.म्हणून ते आले नसतील.तेव्हा असा शाप बरा नाही."
तसा कलिराम म्हणाला,
"आम्ही उच्च जातीतील माणसं.आमच्यात बाराव्या दिवशी शुद्ध होतात लोकं.आमच्या पेक्षा या गावात उच्च जातीचा कोणी नाही की जो आमच्यापेक्षा श्रेष्ठ असेल."
"याचा अर्थ असा की तुम्हाला तुमची प्रथा आमच्यावर थोपवायची आहे तर.......आता मी एकच बोलतो ते ऐका कलिरामजी, या जगात कोणीही उच्च आणि कनिष्ठ नाही.आईच्या गर्भात काही कोणी जास्त दिवस राहात नाही.तसेच जातीवरुन श्रेष्ठपणा ठरत नाही.अहो जगात तोच माणूस श्रेष्ठ आहे की जो माणूसकी जोपासतो.माणूसकीनं बोलतो.वागतो नव्हे तर आचरण करतो.जो कधीच खोटे बोलत नाही.दुस-याच्या जसा आनंदात सहभागी होतो.तसाच दुस-याच्या दुःखातही सहभागी होतो.ज्याच्याजवळ राग,लोभ,द्वेष,मद,मत्सर हे शत्रू कधीच भटकत नाही.तो या जगात श्रेष्ठ आहे.त्याचा शाप लागू शकेल कदाचित.पण तुमचा शाप लागणार नाही.कारण तुम्ही जरी जातीनं उच्च असले तरी तुम्ही व्यसनाधीन आहात.तुम्ही सकाळ सायंकाळ व्यसन करता.त्यातच तुम्ही धंदे करतांना खोटंही बोलता.राग तर तुमच्या नाकावरच असतो.लोभ करुन तुम्ही मोठी इमारत बांधली.तसेच तुम्हाला उच्च जातीचे असल्याचा मोठा अहंकार आहे.शिवाय तुम्ही आपली स्वतःची चूक कबूल न करता या गावातील सगळ्या लोकांचा हेवा करता.महत्वाचं म्हणजे हे पाच शत्रू ज्याच्याजवळ भटकत नाहीत आणि ज्यांना व्यसन नसतं व जे सदैव खरं बोलतात.मग धंदा का असेना.तसेच ज्यांचं आचरण चांगलं असतं.त्यांचाच शाप लागतो."
"अर्थात?" कलिराम विश्वासला रागात म्हणाला.
"अर्थात तुम्ही आपलं आचरण बदलवा.गावातील लोकांचा द्वेष करु नका.लोकांच्या जसे आनंदात सहभागी होता.तसेच मयतीलाही जात चला.सर्वांशी प्रेमानं वागा.शक्यतोवर खरं बोला.माणूसकीनं वागा.माणूस बना.लोकं तुमच्या घरच्या खाण्याचे भुकेले नाहीत.तर ते प्रेमाचे भुकेले आहेत.त्यांना तुमच्या घरचं जेवन चालत नाही असं नाही तर तुम्ही त्यांच्याशी यापुर्वी जसे वागलात.तसं त्यांनी यावेळी तुमच्या जेवणावर बहिष्कार टाकून दाखवून दिलं.अहो,कशाचा एवढा अहंकार.मी श्रेष्ठ व तो कनिष्ठ.मरणानंतर सर्व जाग्यावर राहातं.कोणीच काही आपल्यासोबत नेत नाही.फक्त स्नेह व गोडवाच तेवढा नेतो.बाकी सगळं इथलं इथंच राहतं.तुम्ही जसं वागलात.ते वागणंच आठवतं लोकांना.चांगलं आणि वाईट वागणं.तेव्हा शक्य असेल तर आपल्या वागण्यानं माणूस बनण्याचा प्रयत्न करा.आपल्याला दुस-याचं जर चांगलं करता येत नसेल तर वाईटही करु नका.आपल्याला ही जिव्हा चांगलं बोलायला दिली आहे.तिचा वाईट उपयोग करु नका.नाहीतर याचे परिणाम वाईट होतात.मग हे परिणाम जेव्हा दिसायला लागतात.तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.मग आपण म्हणतो की मला कोणीतरी काहीतरी केलंय.त्याला अंधश्रद्धेचं शेपूट जोडतो.म्हणून हे परिणाम दिसू नये असे जर वाटत असेल तर आधी माणूस बनायला हवं."
कलिरामनं विश्वासचं सगळं ऐकलं.त्याला आलेला विश्वासचा राग पुरता मावळला.त्या दिवसापासून त्यानं आपलं आचरण बदलवलं व तो चांगल्या आचरणानं वागू लागला.लोकं आता त्याचं मोठ्या आदरानं नाव घेवू लागले.कारण तो आता माणूस बनला होता.माणसाप्रमाणं आचरण करीत होता.
भीमरावला गावातील ती गोष्ट आठवत होती.त्या उच्च जातीच्या माणसाची.जो माणूस त्याच्या गावात राहात होता.
एकदा भीमराव फिरायला गेला.तेव्हा त्याला 'सर' दुरुन शब्द ऐकायला आला.तसं भीमरावनं आपल्या अंधूक नजरेनं त्या मुलाकडं पाहिलं.तसं त्याला स्पष्ट दिसत नव्हतं.त्यातच जेव्हा तो जवळ आला.तेव्हा तो पायावर नतमस्तक झाला.तशी भीमरावची नजर त्या मुलाकडे गेली.तसा तो चेहरा ओळखीचा वाटला नाही. त्यानं त्या मुलाला विचारलं,
"कोण तुम्ही?"
"मी अभय.आपण मला शिकवलं."
"शिकोलं! मी शिकोलं! बेटा,तुह्या गैरसमज झालेला दिसते.मी बाबा शेतकरी होतो.आतापर्यंत शेतीच केली मी.आन् आता मरताखेपी माह्या पोरीन शयरात आणलं.म्हणून मी आलो शहरात.पण तू म्हणतेस का मी तुले शिकोलं,तं मी तुले शिकवाले मास्तर नोयतो एकाद्या शाळेचा."
"नाही सर.तुम्हीच मला शिकवलं."
"केव्हा शिकोलं?"
"मी फार गरीब होतो,तेव्हा मला शाळेची फी भरायला पैसा नव्हता.तेव्हा तो भरायला तुम्ही मदत नाही का केली.आठवा बरं."
"बेटा,आतं मले काई आठवत नाय."
भीमराव खेड्यात राहणारा खेडूत.तरुणपणापासूनच त्यानं गरीबीत जीवन काढलं होतं.त्याला पोटाला पैसा पुरत नव्हता.पण तरीही कोणी त्याचेकडे आलाच तर तो त्याला मदत करीत होता.शिक्षणाबद्दल त्याच्या मनात अतिशय कळ होती.
अभय असाच गावातला मुलगा.शिक्षण शिकायची हौस होती त्याच्या मनात.पण त्याचे मायबाप शिकलेले नसल्यानं त्याला ते शिकवायला तयार नव्हते.अशावेळी तो गावच्या शिवारावर सकाळी सकाळी रडत बसला होता.
भीमरावला सकाळी फिरण्याची सवय होती.तरुणपणात सकाळीच उठून तो शेतावर जात असे.तर आताही शहरात तो सकाळी फिरायला जात असे.असाच फिरता फिरता सकाळी हा अभय भीमरावला गवसला नव्हे तर त्यानं सर म्हणून आवाज दिला.
अभय शिवारावर रडत दिसला असता भीमरावनं त्याल् रडण्याचं कारण विचारलं.तसं अभयनं सांगीतलं की त्याला शिकायची इच्छा असून त्याचे मायबाप शिकवायला तयार नाहीत.ते परीक्षेची फी देखील देत नाहीत.जेव्हा भीमरावनं ते ऐकलं.तेव्हा त्यानं जे पैसे त्याच्या परीवाराच्या पोटापाण्यासाठी होते.त्याच पैशातून काही पैसे दिले.ज्या पैशातून अभयचं शिक्षण झालं.पुढं कमावता झाल्यावर अभय स्वतः काम करुनच शिकला.
भीमराव म्हातारा होता.त्याला आता तरुणपणाच्या गोष्टी स्पष्ट आठवत नव्हत्या.तरीही त्यानं अभयला ओळखलं होतं.त्याला हायसं वाटत होतं.तसा तो म्हणाला,
"आता काय करतोस?"
"मी वकील आहे.याच जिल्ह्याच्या न्यायालयात मी वकीलकी करतोय."
"अस्सं.माह्यी पोरगी बी वकील हाय.ते बी डीस्ट्रीक कोर्टात काम करते."
"कोणती? नयना काय?"
"नाय रं बाबा."
नयनाचं नाव काढताच भीमरावचे डोळे पानावले.त्यानं लांब श्वास घेतला.ते पाहात अभय म्हणाला,
"काय झालं सर?"
"काय नाय बाबा.नयना या जगात नाय."
"म्हणजे? तीच तर वकीलकी शिकत होती."
"शिकत होती.पण नियतीले ते मंजूर नोयतं.नियतीनं तिले हिरावून नेलं."
"कसं काय?"
"ते बलत्काराची शिकार झाली.त्यातच मरण पावली."
"कोण नीच तो.कोणं केला बलत्कार?"
"हं केला त्यानं.पण बाबा,त्याचं बी बरं झालं नाय.तो बी गेला गू खात."
"म्हणजे?
"एक्सेडंड झाला त्याचा.अन् ते त्याचे साथीदार बी मेलेत एक्सेडंडनं."
"केस चालली असेल ना."
"हो चालली.पण हारलो राजा."
तसे त्यानं डोळे पुसले.तसा अभय म्हणाला,
"या ना घराकडं."
"नाय बाबा,माह्ये हातपाय दुखतेत.आतं वागवत नाय.तुच येशीन.कोमललेबी भेटशीन.ते बी वकील आन् तु बी वकील.वळख होईन म्हंतो."
"बरं.आता जातो मी.पण नक्की भेटायला येणार हं."
"त्यानं भीमरावचा पत्ता घेतला.तसा तो चालता झाला.
अभय गेल्यावर भीमराव विचार करु लागला.किती चांगला मुलगा.जवळ आला.नतमस्तक झाला.अलिकडे तर एवढे शिक्षक मुलाला शिकवितात.ज्ञानदान करतात.पण कोणी सर म्हणून जवळ यायला तयार नाही.नतमस्तक होणं तर दूरच.शिक्षक एवढा पैसा कमवितात.ज्या पैशातून त्याचं घर तर भागतंच.शिवाय उरलेला पैसा ते ऐषआरामात खर्च करतात.पण एखाद्या गरीब मुलाला शुल्क भरण्यासाठी एक छदामही देत नाहीत.शिवाय त्यांना तो वेतनाचाही पैसा कमी पडतो.मग काय असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या फी मधूनही पैसा खातात.मग अशी मुलं शिकून मोठी झाली की ती त्या शिक्षकांबाबत सभ्यता पाळत नाहीत.नतमस्तक होणं तं तर दूरच राहिलं,साधं 'सर' हा शब्द देखील उच्चारत नाहीत.कुवत असतांना निःशुल्क कधीच शिकवीत नाहीत.त्यापेक्षा मी बरा की माझी परिस्थिती नसतांना मी त्याला दोनवेळा शिक्षणासाठी पैसा दिला.कदाचित तो दान जर मी मंदिरात दिला असता तर त्याचं महत्व राहिलं नसतं.पण हा शिक्षणासाठी दान दिलेला पैसा अहमियत ठेवून गेलेला आहे.माझ्या जन्माचं आज सार्थक झालेलं आहे की मी जरी शिक्षण घेतलं नसलं......कोणाला शिकवलं नसलं तरी मलाही कोणी सर म्हणतात.मान देतात.त्या प्राध्यापकाची नोकरी करणा-यापेक्षा मी सातपटीनं बरा.
लोकं लाखो रुपये मंदीरात खर्च करतात.कोणी मशिदीत देतात.कोणी अग्यारी तर कोणी चर्चमध्ये.कारण त्यात त्यांचा धर्म असतो.त्यांना वाटते की हा ईश्वर,अल्ला,देव आपल्याला दुःखापासून वाचवेल.काही लोकं म्हणतात की जो न तडपता लवकर मरण पावतो.त्याला पुढच्या जन्मात असंख्य यातना भोगाव्या लागतात.जो तडपत मरतो.त्याला पुढील जन्म सुखाचा प्राप्त होतो.पण असं होत नाही.पुढील जन्म कोणी पाहिला.तसंच धर्मासाठी दान केल्यानं पुण्य मिळतं हे कोणं पाहिलं.पाप आणि पुण्य इथंच असून खरं पुण्य अशा गरीब मुलांना शिक्षणासाठी दान देण्यात आहे.कारण या शिक्षणातूनच पुढं ते आपल्या पायावर उभे राहू शकतात नव्हे तर आपलं पोटंही भरु शकतात.
भीमराव विचार करीत होता.तसा वेळ बराच झाला होता.त्यानं वेळेचा अंदाज घेतला व आपल्या मुलीची न्यायालयात जायची वेळ झाली याचा वेध घेवून तो संथपणे घरी जायला निघाला.पण वाटेनं जात असतांनाही त्याच्या मनात त्या अभयबद्दल कुतूहल वाटत होतं.ज्यानं सर नावाची त्याला उपाधी दिली होती.
दार आतून लावलेलं होतं.सुट्टीचा दिवस होता.सुट्टीचा दिवस असल्यानं कोमल आज झोपेतून जरा उशिराच उठली होती.तसा दारावर ठोकण्याचा आवाज आला.
कोमलनं दार उघडलं.तसा बाहेर एक अनोळखी चेहरा तिला दिसला.चेहरा ओळखीचाच वाटत होता.पण नक्की हा व्यक्ती कोण ते कळत नव्हतं.तशी ती म्हणाली,
"कोण तुम्ही?कोण हवंय तुम्हाला?"
"मला तुमच्या बाबांना भेटायचं आहे.तुमच्या बाबांचं नाव भीमरावच आहे ना?"
"हो.भीमरावच.काय काम आहे?"
"ते माझ्या ओळखीचे आहेत.मी त्यांना भेटायला आलो."
कोमल आश्चर्यचकीत झाली होती.कारण ब-याच वर्षापासून कोमलजवळ भीमराव राहात होता.पण त्याला अद्याप कोणी भेटायला आलं नव्हतं.पण हा व्यक्ती भेटायला येणं म्हणजे आश्चर्यात टाकणारी बाब होती.तशी ती त्याला म्हणाली,
"या आत या."
अभय आतमध्ये आला.तसा तो भीमरावच्या परत पाया लागला.तसं कोमलनं प्यायला पाणी आणलं.तशी ती सोप्यावर बसली.तसं तिनं विचारलं,
"माझ्या बाबांची कशी काय ओळख आपली?"
"हे माझ्या गावचे.यांनी माझी शाळेची फी भरली.त्यामुळंच मी शिकू शकलो.नाहीतर मी असाच राहिलो असतो गावात गावठी बनून.तू कोमल ना."
"होय.मी कोमल."
"पण तू तर शिक्षण सोडलं होतं ना?"
"हो.सोडलं होतं."
"मग कशी काय शिकली?"
"नयना मरण पावल्यावर शिकली.माझ्या बाबांची इच्छा पुर्ण केली मी."
"म्हणजे?"
"बाबांची इच्छा होती की नयना वकील बनावी.पण नयना वकील न बनू शकल्यानं नाईलाजानं मला शिकावं लागलं."
"म्हणजे तुम्ही वकील आहात तर."
"होय,मी वकील आहे.आपण? आपण काय करता?"
"मीही वकीलच."
"म्हणूनच मी मगापासून विचार करते की तुम्हाला कुठंतरी पाहिलेलं आहे.पण आठवत नव्हतं.आता आठवलं की तुम्हाला कोर्टातच पाहिलं आहे.बरं करा गोष्टी.मी तेव्हापर्यंत चहा आणते."
कोमल चहा बनवायला आतमध्ये गेली.तशी चहा घेवून ती बाहेर आली.तिनं त्याच्या हातात चहाचा कप दिला.तशी ती परत सोप्यावर वर्तमानपत्र वाचत बसली.तसा भीमराव म्हणाला,
"बेटा,काय पोरंबारं तुले?"
"सर माझं लग्नच नाही झालं.शिकता शिकता राहिलो असाच.मुलगी भेटली की करेल."
"बरं बरं.एकादी गावाकडलीच पायशीन."
"पाहू."
तसा कोमलनं वर्तमानपत्र बाजूला करीत एक कटाक्ष टाकला.तशी ती परत वाचायला लागली.थोडा वेळ तिच्या बाबासोबत त्याच्या गोष्टी चालल्या.तसा भीमराव म्हणाला,
"हे माह्यी पोरगी.लय हुशार हाये.वकील हाये कोर्टात.लय मोठी वकील हाये."
"नाही नाही.मी काही तेवढी मोठी वकील नाही." कोमल म्हणाली.लहान आहे बरीच."
"लहान असो की मोठी असो.वकील शेवटी वकीलच असतो ना." अभय बोलला.
काही वेळ अशाच चर्चा चालल्या.तसा तो निघून गेला.
अभय निघून गेला खरा.पण आता ओळख झाल्यानं तो नेहमी सुट्टीच्या दिवशी तिथे येत होता.भीमरावशी भेटण्याच्या निमित्यानं त्याचं सतत येणं सुरू असायचं.तसा तो एकटाच राहात असल्यानं त्यालाही करमायचं नाही.त्यामुळं सुटीचा दिवस त्याला कंटाळवाणा वाटायचा.त्यातच इथं कोमल असल्यानं व ती त्याच्याच फिल्डमधील असल्यानं त्याला बरं वाटायचं.तिलाही त्याचं येणं बरं वाटायचं.त्यातच आता दोघांचं प्रेम निर्माण झालं होतं.ते प्रेम केव्हा निर्माण झालं ते त्या दोघांनाही कळलंच नाही.तिलाही सुटीच्या दिवशी त्याच्या येण्याची हुरहूर असायची.त्यालाही तिथं आल्याशिवाय राहावत नव्हतं.
अभयचं तिथं येणं हे काहीतरी कुतूहल निर्माण करणारं होतं.तिला प्रेरणा मिळत होती त्याच्या येण्यानं.हळूहळू त्यांच्यात एकतर्फी प्रेम निर्माण झालं.




भीमराव आज म्हातारा झाला होता.त्याला चालता फिरता येत जरी नसलं तरी त्याचं डोकं जाग्यावर होतं.त्याची स्मृती अजून गेलेली नव्हती.ती अजूनही शाबूत होती.नव्हे तर तो आपल्या बुद्धीनं आजही विचार करु शकत होता.
त्याला आपल्या मुलीबद्दल गर्व होता.त्याचं स्वप्न होतं की आपली मुलगी वकील बनून समाजातील जे दुर्बल घटक आहेत.त्यांची सेवा करावी.ते स्वप्न साकार झालं होतं.कारण त्याची मुलगी वकील बनली होती.ती लढत होती अन्यायाविरुद्ध.जे कोणी अन्याय आणि अत्याचार करीत होते अबलांवर.तो तसा खुश होता.पण त्यालाही दुःख व्हायचं.जेव्हा तो भुतकाळ आठवायचा.त्याची मुलगी नयना आणि कांता अशाच अत्याचाराच्या शिकार बनल्या होत्या.
भीमरावला आज वाटत होतं की आपली मुलगी ज्याप्रमाणं हुंडाबळी स्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढते.ज्याप्रमाणे ती बलत्कार पिडीतेसाठी लढते.त्याचप्रमाणं तिनं भ्रृणहत्येविरोधातही लढावं.कारण त्या बिचा-या गर्भातील मुली.त्या मुलींचा अजूनही जन्म झालेला नसतो.त्यांनी अजूनही कोणाला त्रास दिलेला नसतो.काही लोकं अत्याचार झाल्यास पाप केल्याचा हवाला देतात.तसं तर काहीच नसतं.कारण ह्या गर्भातील मुलींनी कोणतं पाप केलेलं असतं? तरीही आमचा नागडी समाज त्यांना ठार करतो.कारण मुलगी होणं हाच आजच्या काळातील शाप आहे.
मुलगी झाली रे झाली की तिचा जन्मापासूनच छळ केला जातो.लहानपणीच तिचं नाक कान टोचलं जातं.त्यात तिला वेदना होतात.पुढं खेळण्याच्या वयातच तिला घरची सगळी कामं करायला लावली जातात.पाणी भरणे,भांडे घासणे तसेच तिला लवकरच स्वयंपाक शिकवला जातो.मुलगी झालीच तर तिच्या नावानं पाहिजे तेवढ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला जात नाही.पण मुलगा झालाच तर खुप खुशी साजरी केली जाते.
पहिली मुलगी झाली.तर मुलासाठी वाट पाहिली जाते.कारण अमर्याद हुंडा आणि समाजातील स्रीयांची असुरक्षितता यामुळं स्रीयांचा जन्म हा नकोसा समजला जावून भ्रृणहत्या........भ्रृणहत्या हा गुन्हा असतांना देखील.काही काही ठिकाणी तर गर्भाला जबरदस्तीनं पाडलं जातं.म्हणूनच याबाबत ठोस कायदा बनायला हवा की जेणेकरुन कोणी भ्रृणहत्या करणार नाही.मुलींना संरक्षण मिळेल.
भ्रृणहत्येबाबत विचार केल्यास जर स्रीला समाजात सुरक्षा मिळाली तर भ्रृणहत्या होणार नाहीत.या सुरक्षेत हुंड्यासाठी मुलींना न छळणे.हुंडा पद्धती बंद करणे.देवदासी प्रथा बंद करणे एवढेच नाही तर ज्या ज्या क्षेत्रात आणि ज्या ज्या ठिकाणी मुलींना छळलं जातं.त्या त्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावायला हवा.एवढेच नाही तर स्रीयांचे हुंड्यासाठी बळी जात असतील तर तिला सासरी पाठविण्याऐवजी मुलांनीच तिच्या माहेरी येवून राहिल्यास किंवा मुलीनं तिला माहेरी येवून राहायला बोलावल्यास हुंड्यासाठी कधीच छळ होणार नाही.स्रीयांना अभय मिळेल.परंतू जावई सास-याच्या घरी राहायला जावू नये म्हणून काही म्हणी आजही अस्तित्वात होत्या.जसे 'सास-याच्या घरी जावई चोर' 'घरढगल्या' 'बायल्या' खरं तर सास-याच्या घरी जावई जावून राहणे चांगली पद्धत असून त्या पद्धतीतून नक्कीच स्रीयांवरील अत्याचार कमी होवू शकतील.भ्रृणहत्याही कमी होतील.कारण स्रीयांचा सन्मान वाढेल व मुली पैदा करण्यात लोकांना कुचराई वाटणार नाही.पण आज मुली मुलांकडे राहायला जात असल्यामुळे हुंडाबळीसारख्या समस्या आहेत.तसेच भ्रृणहत्याही सर्रास होत आहेत.
आज भीमरावच्या मुलीनं जनहित याचिका न्यायालयात स्वतःकडून दाखल केली होती.त्यात प्रावधान ठेवलं होतं की विवाहानंतर मुलींनी सासरी राहायला जाण्याऐवजी माहेरीच राहावं.तसेच वर मुलांनी पत्नीकडे येवून राहावं.त्यास हवालाही दिला होता.तो म्हणजे कांता आणि नयनाचा.केवळ नयनाच नाही तर समाजातील कित्येक मुलींचा.ज्या मुली हुंड्यासाठी जाळल्या जात होत्या नव्हे तर बलत्काराच्या शिकार होत होत्या.
आज तिनं दाखल केलेली तक्रार निकाली निघाली होती.न्यायालयानं स्पष्ट आदेश दिला होता की लग्न झाल्यानंतर पतीनं पत्नीच्या माहेरी जावून राहावं.
आज मुलींना अभय मिळालं होतं.मुली हुंड्यासाठी जाळल्या जात नव्हत्या.तसेच गावचीच मुलगी म्हणून गावात बलत्कारही होत नव्हते.एवढंच नाही तर मुलगी होवो की मुलगा, कोणाचीही गर्भलिंगतपासणी केली जात नव्हती.तसेच मुलापेक्षा मुलीच्या जन्माच्या वेळी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला जात होता.
गर्भलिंगनिदान प्रक्रिया बंद झाली होती. मुलींचा सन्मान वाढला होता.मुली सासरी राहायला जात नव्हत्या.तर मुलंच मुलीच्या गावी राहायला येत होते.भ्रृणहत्या होत नव्हती.पण लोकसंख्या वाढल्यामुळे या भ्रृणहत्येच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणलं गेलं होतं.याच लोकसंख्या वाढीच्या नियंत्रणातून मुलगा काय,मुलगी काय? लोकांनी आता मुलीलाही स्विकारणं सुरु केलं होतं. आज लोकसंख्या अमाप वाढलेली होती.या लोकसंख्येवर नियंत्रण म्हणून सरकारनं कुटुंबनियोजन आणलं होतं.त्यानुसार प्रत्येक पती किंवा पत्नीची नसबंदी करुन या लोकसंख्येवर आळा घालण्याचा प्रयत्न डॉक्टर करीत होते.काही ठिकाणी प्रयत्न फसत होता.काही ठिकाणी प्रयत्न यशस्वी ठरत होते.
भ्रूणहत्या आमच्यासाठी पाप आहे असं जरी लोकं मानत असले तरी पहिली बेटी धनाची पेटी आता लोकं मानायला लागले होते.कारण आता कोमलच्या याचिका लढल्यानं व जिंकल्यानं तसेच कायदे बनल्यानं लोकांना तसं मानणं भाग होतं.त्यानुसार एक किंवा दोन आणि त्यानंतर आम्हाला पुत्र नको म्हणून लोकं फार काळजी घेत होते.नव्हे तर नजरचुकीनं गर्भ राहू नये म्हणून लोकांनी नसबंदीला चालना दिली होती.
काही माणसे मात्र नसबंदीला आजही विरोध करत होते.ते मुलांना अल्लाची देन मानत.पुत्र होवू न देणे म्हणजे कुठंतरी देवाच्या मार्गात अडथडा आणणे असे समजत.कारण ते अज्ञानी होते.
भारतात साक्षरता वाढत चालली होती.पण आजही काही लोक डोंगर द-यात राहत.ते शिक्षणाच्या क्षेत्रात नव्हते.त्यांना शिकविणारे शिक्षक हे त्यांची बोलीभाषा ओळखू शकत नव्हते.तसेच बोलू शकत नव्हते.त्यामूळे ते साहजिकच निरक्षर.डॉक्टर मंडळी देखील या डोंगराळ भागात सेवा द्यायला तयार नसल्याने ही मंडळी आपल्या बाळांना रोगराई पासून वाचवू शकत नसत.तसेच सतत असणारी हिंस्र जनावराची भीती यामुळेही ही मंडळी मुले पैदा करण्याला अल्लाची देनच समजत.
महत्वाचं म्हणजे या लोकांचं ठीक होतं की ते हिंस्त्र श्वापदाच्या भीतीने वा रोगराईच्या भीतीने मुलं अल्लाची देन म्हणत पैदा करत.पण जी मंडळी सुज्ञ असूनही जाणूनबूजून अल्लाची देन समजत मुले पैदा करत, ते वाढत्या लोकसंख्येला जबाबदार नव्हते काय? त्यांना गुन्हेगारच समजावे. कारण वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न देशात ऐरणीवर असतांना ते जाणूनबूजून मुले पैदा करत.अर्थात ते गुन्हे करत असे म्हणायला काहीच हरकत नाही.
पण याहीपेक्षा मोठे गुन्हेगार तर भ्रूणहत्या करणारे होते.मुलीला धनाची पेटी न समजणारे महाभाग आजही देशात अस्तित्वात होते.त्याहीपेक्षा मोठे गुन्हेगार ते डॉक्टर होते.जे गर्भलिंगचाचणी करणे वा करविणे पाप असून देखील जबरन गर्भलिंगचाचणी करत.नव्हे तर गर्भात मुलगी असलीच तर तिला गर्भातच संपवून टाकत.गर्भलिंगचाचणी झाल्यावर यात त्यांना माहीत असायचं की जी गर्भलिंगचाचणी झाली.त्यात जर मुलीचा भ्रूण असेल तर तो भ्रूण नक्कीच त्या भ्रूणाच्या मातेला मारावा लागेल.त्यासाठी तिची इच्छा नसतांना तिच्यावर दबाव टाकला जाईल.तिला मजबूर केले जाईल की तिने आपल्या पोटातील मुलीच्या गर्भाचा जीव घ्यावा म्हणून.
आज भ्रृणहत्येचा कायदा बनला होता.परंतू भ्रृणहत्या सर्रास सुरु होत्या.मुलींना त्रास होवू नये म्हणून मुलं विवाहानंतर मुलींच्या माहेरी राहायला जात होते.तरीही भ्रृणहत्या व मुलीवरील अत्याचार थांबले नव्हते.ते अत्याचार होतच होते.हं त्यामध्ये कमतरता नक्की आली होती.एक मात्र बदल नक्की झाला होता.
अलिकडे वंशाचा दिवा म्हणून मुलीकडे पाहिले जात होते.मुलगा हाच वंश चालवतो असं समजलं जात नव्हतं.परंतू मुलीचं लग्न झाल्यावर तिच्या नावासमोर मुलांचं आडनाव लावलं जात होतं.मुलीचं आडनाव साहजिकच मिटत होतं.याच कारणामुळे तसेच हुंडापद्धतीच्या वाईट प्रथेमुळे दिवसेंदिवस स्री भ्रूणहत्येच्या संख्येत वाढ होत होतीे.एकट्या राजस्थान आणि गुजरात सारख्या भागात सरासरी दरडोई मुलामुलींची संख्या मोजल्यास टक्केवारीनुसार सत्तर ते शंभर अशी होती.सत्तर मुली तर शंभर मुलं.
भ्रूणहत्येला कायद्यानुसार पाप जरी मानत असले तरी लोकं जाणूनबूजून हे पाप करत होते.कारण समाजात वधूपित्यांना दुय्यम स्थान होते.विवाह करतांना मुलीच्या मायबापाला नवरा मुलगा शोधतांना नाकी नव येत होतं.जनजागृती होत नसल्यानं मुलीला दुय्यम दर्जा होता.मुलीची जात रात्री दहानंतर रस्त्यावरुन फिरु शकत नव्हती.कारण कोणता माणूस रात्री दहा नंतर काय करेल ते सांगता येत नव्हतं.हुंडा पद्धती तर वधूपित्यांच्या पाचवीला पुजलेली होती.
भ्रूणहत्या लोकं पाप जरी समजत असले तरी देशात सर्रासपणे भ्रूणहत्या होतांना दिसत होती.मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत जरी असली तरी आजही दवाखान्यात स्री भ्रूणांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत होती.गर्भलिंगनिदान चाचणीला विरोध असला तरी पैसा कमविण्याच्या डॉक्टराच्या पेशाने त्या डॉक्टरांना आंधळे बनवले होतेे.ते डॉक्टर पैशासाठी गर्भाची ओळख करुन देत होते.
अलिकडे मुलीला महत्व आल्याचे फक्त कागदावरच होते.एक महाराष्ट्र आणि केरळ सोडला तर स्रीयांना कोणत्याच राज्यात सक्षमपणे जगण्याचा अधिकार नव्हता.काही राज्यात तर महिलांना बुरखा वापरण्याची सक्ती होती.अशाच राज्यात पती मग तो कितीही अत्याचार करो.त्याला शिर्षस्थानी ठेवून त्याच्या पुर्णपणे आज्ञा पाळल्या जा त होत्या.तो म्हणेल तो कायदा.मग त्याच्याच आज्ञेत असलेली सासूसारखी महिला आपल्या सुनेचे पोटचे बाळ स्री भ्रूण निघाल्यास सर्रासपणे मारुन टाकत होती नव्हे तर मारायला मजबूर करीत होती.पण ती स्री म्हणून या गोष्टीला विरोध करीत नव्हती.असे असतांना पुरुषी कायदे चालणार नाही तर काय?
आज गरज होती स्रीयांनीच स्रीयांचे भ्रृण वाचविण्याची.सुनेच्या पोटातील स्रीभ्रृण का असेना.सासू नावाच्या स्रीने आपल्या सून नामक स्रीच्या पोटातील स्री भ्रृण वाचवायला हवे.ती सासू नामक स्री जेव्हापर्यंत हे असले कार्य करणार नव्हती तोपर्यंत ह्या स्री भ्रृण हत्या थांबणार नव्हत्या.
स्री भ्रूणहत्या थांबायलाच हव्या.ही काळाची गरज आहे असे कोमलला वाटत होते.अलिकडे ह्या स्रीयांच्या प्रमाण कमी असण्याने का होईना विवाहासाठी मुली मिळत नव्हत्या.त्यातच या अल्प प्रमाणामुळे की काय महिलांचे अपहरण बलत्कार यांचेही प्रमाण वाढत असल्याचे दिसत होते.यासाठी उपाय एकच.तो म्हणजे स्री भ्रूण हत्या रोखणे काळाची गरज ठरली होती.त्या सर्वांनी रोखाव्या.डॉक्टरांनीही आपली जबाबदारी लक्षात घेवून गर्भलिंगनिदान चाचणी करु नये.केलीच तर तो भ्रूण कोणाचा ते सांगू नये.एवढेच नाही तर पैशासाठी स्री गर्भ धुण्याचे काम करु नये.शासनाने देखील यावर ठोस पावले उचलावीत.जेणेकरून कोणीही स्रीगर्भलिंगनिदान चाचणी करणार नाहीत व स्रीभ्रूणांची गर्भातच हत्या करणार नाहीत.असेही कोमलला वाटत होते.
काही ठिकाणी आजही भ्रृणहत्या होत असत.हे जेव्हा वर्तमानपत्रातून कोमलला माहित होत असे.तेव्हा तिला अतीव दुःख होत होते.पण सध्या तरी तिच्याकडे उपाय नव्हता.कारण देश स्वतंत्र झाला असला तरी लोकं अजूनही जागृत व्हायचे बाकी होते.
अभय आता तिच्या घरी नेहमी येत असे.तशी ती त्याच्यासोबत फिरायला जात असे.ते पाहतांना भीमरावला हायसं वाटत होतं.कारण तसा तो जातपात मानणारा नव्हता.शिवाय त्याच्यावर जी मुलीची जबाबदारी होती.त्या जबाबदारीतून आपण मुक्त होणार अशी चिन्हे दिसू लागली होती.कारण तो फारच थकला होता.अशातच एक दिवस तो चालता झाला.
कोमल आज एकाकी झाली होती.तिला फार दुःख झालं होतं.एवढं दुःख की ती पेलवू शकत नव्हती.काय करावं सुचेनासं होतं.त्यातच आता एकटं राहतांना तिला फार त्रास होत होता.भावाचा तर पत्ताच नव्हता.मात्र अभयची साथ होती तिला.
अभय आजही येत होता.त्याला वाटत होतं की कोमलनं त्याच्याशी विवाह करावा.तसा तो तिच्याशी बोललाही होता.पण तिची विवाह करण्याची इच्छा नव्हती.तिला तिची बहिण कांताचं प्रकरण माहित होतं.अभय असा करणार नाही हे तिला माहित होते नव्हे तर वाटत होते.पण कोणाच्या मनातलं काय समजणार.कदाचित विवाहानंतर अभय असे करणार तर.........तिच्या मनात असा प्रश्न होता.म्हणून ती विवाहाला नकार देत होती.मात्र तरीही अभयनं तिचा साथ सोडला नव्हता.तो तिला आधार देतच होता. तिला खटला लढायला आधार देत होता.
कोमल आज म्हातारी झाली होती.त्याचबरोबर अभयही.पण त्या दोघांना आजही समाधान होतं.कारण त्यांच्याच प्रयत्नानं आज स्रीयांनी आपलं आडनाव आपल्या नावासमोर लावणं सुरु केलं होतं नव्हे तर त्यांच्याच प्रयत्नानं स्रिया सासरी राहायला न जाता माहेरीच राहात होत्या.तसेच आपल्यावरील अत्याचार दूर करण्यासाठी स्वतः शस्र वापरत असत.ज्याची परवानगी शासनानंच त्यांना प्रदान केली होती.ज्यात एक मोबाईल क्लीप बसवलेली होती.जी क्लीप असल्या अत्याचाराच्या वेळी वाजत असे.त्यानुसार सुरक्षारक्षक तिथे येवून त्या महिलांची सुरक्षा करीत असे.नव्हे तर त्यामुळेच आज महिलांवरील अत्याचारात घट झाली होती.
ती सायंकाळची वेळ होती.कोमल अंगणात बसली होती.तसा गार वारा अंगणात सुटला होता.तिला हायसं वाटत होतं.तसं तिला ती बालपणीची आठवण आली.ती आंब्याची बाग.त्या बागेत ती आपल्या लहान बहिणीसोबत खेळत असे.तसा तिला आवाज आला.
"कोमल$$"
तिनं वर पाहिलं.तिला अभय दिसला.तशी ती म्हणाली,
"बोल अभय.कसा आहेस?"
"बरा आहे.पण तुझी आठवण येत होती.म्हणून मी आलोय."
"छान केलंस.मलाही तुझीच आठवण येत होती.पण माझे पाय दुखतात रे.चालणं होत नाही.म्हातारपण आहे ना."
"होय.मलाही अगदी तसंच वाटतं.पण काय करु.करमत नाही गं."
काही वेळ त्यांच्या गप्पागोष्टींना पेव सुटला.तशी रात्र झाली.तसा तो म्हणाला,
"आता मी चलतोय."
"जातेय."
"होय."
"आता केव्हा येणार.
"आता येणं होतं की नाही ते माहित नाही."
"बरं.पण जमल तर ये."
त्यानं होकार दिला.तसा तो जायला निघाला.ती मात्र त्याच्या पाठमो-या आकृतीकडं पाहात होती.तो दिसेनासा होईपर्यंत.त्यानंतर तो कधीच आला नाही.तो नंतर मरण पावला.परंतू तिला मात्र त्याचं काय झालं ते कळलंही नाही.
ती त्याची आजही आठवण करीत होती.त्याच्या येण्याची वाट पाहात होती.तिच्या मनात त्याच्या येण्याची आस होती.परंतू तिच्या मनातल्या भावना आजही भ्रृणहत्येसारख्या तिच्या मनातल्या गर्भात मारल्या जात होत्या.ज्याप्रमाणे गर्भातून बाहेर पडण्यापुर्वीच भ्रृण गर्भात मरत होतं.सुर्योदयाचा सुर्य न पाहता रात्रीच्या अंधारमय गर्भातून ती त्याला आवाज देत होती. तो तिचा पती नव्हता.परंतू जणू तो तिचा पती असावा असा भास मनात बाळगून ती कोमल चांदणी भ्रृण बनून त्या सुर्याची वाट पाहात होती.पण तो सुर्य केव्हाचाच अस्तास गेला होता हे तिलाही माहित नव्हतं.तो मरण पावला आहे हेही कळलं नव्हतं.






इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED