Vital means the architect of transformation books and stories free download online pdf in Marathi

विटाळ अर्थात परीवर्तनाची शिल्पकार

परीवर्तनाची शिल्पकार कादंबरीविषयी 

          'परीवर्तनाची शिल्पकार' ही माझी पंचावनवी कादंबरी असून साहित्य प्रकारातील ती त्र्यांशिवी पुस्तक आहे. या कादंबरीचे स्वरुप वेगळे असून अशा प्रकारची कादंबरी लिहिण्याचा विचार बऱ्याच दिवसांपासून मनात होता. परंतु ती बाब पुर्णत्वास येत नव्हती. 
         या कादंबरीचा विषय विटाळ होता व तिचं शिर्षकही विटाळच होतं. परंतु मला माहीत झालं की तशाच शिर्षकाची एक कादंबरी जेष्ठ कादंबरीकार दया पवार यांची आहे. म्हणूनच मी ते शिर्षक बदलवलं व या कादंबरीचं शिर्षक परीवर्तनाची शिल्पकार ठेवलं. ही कादंबरी विटाळ व जातीभेदावर आधारीत आहे. यातील नायिकेवर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव पडला व तिनं कसा आपल्या गावातील विटाळ दूर केला याचं वर्णन या कादंबरीत आहे. ही कादंबरी वाचनीय झालेली असून ते आपण वाचक या नात्यानं ठरवावं म्हणजे झालं. 
          कादंबरी लेखनाविषयी थोडंसं माझं मत मांडतो आणि मांडणं मी माझं अहोभाग्य समजतो. कादंबरी लेखन करण्यामागे त्या लेखकाचा त्याग असतो. तो तपश्चर्याच करीत असतो आणि लेखन करतांना बरीच मेहनत करीत असतो. त्यातच त्याला सर्व पात्र लक्षात ठेवावी लागतात. त्याचं साधर्म्य साधावं लागतं. त्याच प्रसववेदनेतून कादंबरी जन्म घेत असते. कादंबरी म्हणजे एक साधी दोन चार पानाची कथा नाही की जी एकाच दिवशी लिहून पुर्ण केली जाते. कादंबरी लेखनाला अनेक दिवस लागतात. दोन तीन दिवसात कादंबरी पुर्ण होत नाही. तसंच कादंबरी लेखनात सातत्य ठेवावं लागतं. सातत्य नसेल तर त्यातील काही महत्वपुर्ण भाग विसरतात व कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी लागते. याचाच अर्थ असा की कादंबरी लिहिणं काही सोपी गोष्ट नाही. त्याबद्दल मी माझी स्तुती करीत नाही आणि तसं कोणीही समजू नये. कारण मी काही एवढा माहीर नाही की स्वतःला कादंबरीकार म्हणेल. परंतु वास्तविकता मांडत आहे. 
            माझं वैशिष्ट्य सांगतो. ते सांगणं गरजेचं समजतो आणि ती माझी खंतही आहे नव्हे तर तो माझा दुर्गूणच. मला जास्त बोलता येत नाही. तसा मी विचारपीठावर फारसा बोलत नाही. परंतु लिहू शकतो. चांगलं लिहू शकतो असं मी म्हणत नाही व मी माझ्याच तोंडून माझी प्रशंसाही करु इच्छित नाही. ते ठरविण्याचा अधिकार वाचकांचा आहे. तसं जर लेखन असतं तर माझ्या पुस्तकांना बरेच पुरस्कार मिळाले असते. तिही एक खंत मनामध्ये आहे. 
         पुरस्काराच्या बाबतीतही माझे मत वेगळेच आहे. मी पुरस्काराच्या मागं लागत नाही. कारण अलिकडच्या काळात पुरस्काराचं स्वरुप बदललं आहे. चांगल्या साहित्याची किंमत होत नाही असंच आढळून येतं. तसंच हजार रुपये द्या. पाचशे संस्थेला दान द्या व पाचशे तुमच्या पुरस्काराचे. असंच आजचं पुरस्काराचं स्वरुप पाहून मन खट्टू होतं व असे पुरस्कार मलाही नकोसे वाटतात. त्यामुळंच मी कोणतंही पुस्तक पुरस्काराला पाठवीत नाही. फक्त एकदाच पाठवलं होतं व तेथेही फसलो होतो. 
          मी ई साहित्याला व विशेषतः नास येवतीकर आणि सुनीळ सामंत आणि त्यांच्या चमूला मानतो की जे माझी ऑनलाईन पुस्तक प्रसिद्ध करतात. त्यामुळंच माझं साहित्य वर येत आहे. वाचक आवर्जून फोन करतात. बरं वाटतं. पुरस्कार मिळाल्यासारखा आनंद वाटतो. 
          आज या कादंबरी निमीत्यानं मी बऱ्याच वेदना व्यक्त केल्या. शेवटी एक खंत मांडतो. ती म्हणजे, मला पुरस्कार मिळो वा न मिळो, माझ्या पुस्तका सामान्य वाचकांपर्यंत पोहोचाव्यात. मलाही प्रकाशक मिळावेत. ज्यांनी पुस्तकरुपात माझं साहित्य वाचकांना उपलब्ध करुन द्यावं. त्यांनीही या पुस्तकातून बोध घ्यावा. तशीच प्रकाशकांना विनंती आहे की जर कोणी प्रकाशक माझी पुस्तक काढू पाहात असतील, त्यांनी जास्त पैसे कमविण्याचा उद्देश ठेवू  नये. ते शुल्क सामान्य माणसांना परवडेल असं ठेवावं. 
          शेवटी एकच सांगेन की ही देखील माझी पुस्तक समाजप्रबोधन करणारी असून वाचकांनी ती वाचावी व एक फोन अवश्य करावा की ज्यातून मला प्रेरणा मिळेल व मी नव्या दमानं आणखी एखादी नवी पुस्तक लिहू शकेल. 

                                                        आपला नम्र  
                                                   अंकुश शिंगाडे नागपूर
                                                       ९३७३३५९४५०

परीवर्तन (कादंबरी)
                     अंकुश शिंगाडे 


              म्हायदू विचार करीत होता. आपले दिवस केव्हा पालटतील याचा. कारण स्वातंत्र्य मिळाले होते व आता दहा वर्षापर्यंतचा काळ झाला होता. परंतु आजही गावातील विटाळ गेला नव्हता. ना गावातील विटाळ जावू शकणार होता. आजही गाव सुधारलं नव्हतं. आजही गाव म्हायदूचा विटाळ मानत होता. तसंच आजही गावात म्हायदूला दहा वाजेपर्यंत प्रवेश नव्हता ना त्याला रात्री सात नंतर प्रवेश होता. 
             म्हायदू काम करीत होता चांभारकीचं. त्यानं नुकतंच गावातील पाटलाच्या घरचं जनावर शिवारात नेवून फेकलं होतं. तसं त्याला ते जनावर चामड्यासकटच फेकायचं होतं. परंतु त्यानं विचार केला की दोनचार पैसे या जनावरांचे चामडे विकून मिळेल तर ....... आपलाच फायदा होईल. चारदोन आणे आपल्यालाच भेटतील. असा विचार करुन मायदूनं त्या जनावराचे चामडे सोलले व ते खांद्यावर घेवून तो आपल्या घराकडची वाट चालू लागला. 

******************************************

           आज सकाळी सकाळीच त्याला पाटलाच्या घरचं बोलावणं आलं होतं. पाटलाच्या घरचा गडी आला होता सांगायला. गडी म्हणत होता,
          "पाटलाच्या घरचं जनावर मेलं. त्याला फेकाचा सांगावा आलाय. "
           म्हायदूनं ते गडी माणसाचं बोलणं ऐकलं. तसा त्यानं एक आवंढा गिळला व विचार करु लागला. 
           "भोसळीचे........कामापुरता मामा ठेवतेत. काम पडलं तर बराबर बोलावतेत  आन् काम निसटलं तं कवडीचंबी मोल नाय. परंतु का करु. जावंच लागन. कारण माह्या पोट. माह्या पोटाचा प्रश्न हाये. नाय गेलं तं माह्यीच बायकापोरं उपाशी ठाकतीन. गेलंच पाह्यजे."
           म्हायदूचा तो विचार. तसा त्याच्या मनाचा फार जळफळाट होत होता. तसा तो विचार करीतच होता 
          'आमची जात मोठी कष्टाची. परंतु अलिकडं आमचाच विटाळ हाय. कुत्र्यालेबी पलंगावर जागा हायती. परंतु आमाले त्याईच्या आंगणात बी जागा नाय. आमचा ईटाळ त्याईले लय भारी हाय. मंग आमचा तं ईटाळ त्याईले लय भारी. मंग ते का बरं आमले सांगावा धाडतेत. का बरं एकादं जनावर दगावलं तं फेकाले बोलावतेत.'
          म्हायदूचा तो विचार. विटाळाच्या गर्तेनं म्हायदू आज लहानाचा मोठा झाला होता आणि आज तेवढाच तो म्हाताराही झाला होता. तसं त्याला त्याचं बालपण आठवत होतं. 
            तो त्याचा बालपणीचा काळ.  गावात चर्चा रंगली होती. तशीच चर्चा त्याच्या बिरादरीतही रंगली होती. लोकं म्हणत होते की आता स्वातंत्र्य मिळणार. आता विटाळ संपणार. मग आपण इतर लोकांसारखे वावरत असू नव्हे तर आपल्यालाही स्वच्छंदपणे विहार करायला मिळेल. परंतु झालं उलट. स्वातंत्र्य मिळालं. आजुबाजूच्या गावचे लोकं सुधारले. त्यांच्यावर बाबासाहेबाच्या विचारांचा प्रभाव पडला  होता. परंतु म्हायदूच्या गावची मंडळी सुधारली नाहीत. ती अजुनही भेदभाव मानत होती. आजही ती गावच्या शिवारातच राहात होती. पुर्वी जशी राहात होती तशी.
              सारी भकास पडलेली ती जात. ती जात त्याला खायला धावत होती. तसं पाहता त्या जातीत असं विशेष काहीच नव्हतं. परंतु ती चिकटली होती अंगाला अगदी चमगादडासारखी. ती अशी चिकटली होती की अंग सोडतच नव्हती. ती बदलाविशी वाटत होती. परंतु बदलताही येत नव्हती. तसं पाहता ती जात त्यांना सोडाविशी वाटत होती. परंतु ती सुटत नव्हती. 
            तो विचार करु लागला होता त्या जातियतेच्या भिंती तोडण्याचा. परंतु त्या जातीयतेच्या भिंती तुटतील तेव्हा ना. जरी त्या जातियतेच्या भिंतीत रस नसला, जिव्हाळा नसला तरी त्या जातियतेच्या भिंती तुटल्यानं तुटत नव्हत्या. त्या जातीत जिव्हाळा अजिबात नव्हता आणि कोणालाही त्या जातीत राहावसंही वाटत नव्हतं. तसं पाहता त्या भिंती अभेद्य अशा स्वरुपाच्या होत्या. 
            ती अस्पृश्य जात. त्या जातीनं खुप मरणप्राय वेदना झेलल्या होत्या. त्या वेदना आठवल्या की अंगाचा थरकाप उडत असे.
             विटाळ........विटाळ तर पाचवीलाच पुजलेला असे. अस्पृश्यांचा विटाळ मानण्यात येत असे. या विटाळात त्या जातीतील लोकांनी उच्चवर्णीय जातीला स्पर्शच करु नये असं उच्चवर्णीय लोकांचं मानणं होतं. त्या लोकांना प्राणी, पक्षांचा स्पर्श चालत होता. परंतु अस्पृश्यांचा स्पर्शच अजिबात चालत नव्हता. त्यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था ही गावात नव्हती तर गावकुसाबाहेर होती. ही मंडळी गावाच्या शिवेवर वा वेशीवर राहायची. त्यांना गावात तसाही प्रवेश नव्हताच. परंतु जर गावात प्रवेश करायचाच झाला तर त्यांना दिवसा प्रवेश करावा लागायचा. तेही दहा अकरा वाजल्यानंतर. सकाळी त्यांना गावात प्रवेश नव्हता. त्याचं कारण होतं. त्यांचे अंगणात पाऊल पडणे. 
           सकाळी सकाळी उच्चवर्णीय स्रिया आपल्या अंगाणात शेणाचा सडा टाकत असत. त्यातच ही मंडळी सकाळी सकाळी गावात शिरलीच तर  त्यांचे पाय शेणाच्या त्या सड्यावर पडायचे. ते त्या शेणात रुतून बसायचे. कारण त्यांनी टाकलेला सडा, त्यात पाण्याचा अंश असल्यानं त्यानं जमीन भिजत असे. त्या ओल्या जमीनीत पाय रुतून बसल्यानं अस्पृश्यांचे पाय या सड्यावर उमटत. तशी ती निशाणीच उमटून राहात असे त्या सड्यात. ती निशाणी अस्पृश्यांची राहात असे दिवसभर अंगणात व ती अस्पृश्यांच्या पायाची निशाणी उच्चवर्णीयांना पदोपदी आठवण देत असे की हे पदचिन्हं अस्पृश्याचंच आहे. त्यामुळंच ते सारखं आठवू नये. म्हणून कोणत्याही अस्पृश्यांना सकाळी दहा अकरापर्यंत गावात प्रवेश नव्हता. कारण दहा अकरापर्यंत हा अंगणातील सडा वाळतच नसे व नेमके पाय उमटत. तसंच दुसरं कारण होतं रेलचेल. सकाळी सकाळी सर्वच उच्चवर्णीय लोकं देवाणघेवाण करण्यासाठी गावात फिरत. त्यातच समजा अस्पृश्य गावात शिरलेच तर त्यांचा या गर्दीत स्पर्शच होणार नाही हे कशावरुन? तो स्पर्श होवू नये म्हणून त्यांना गावात प्रवेश न देण्याबाबत खास काळजी घेतली होती. तसं पाहता जेव्हा अकरा वाजत असत. तेव्हा गावातील बरीचशी मंडळी कामावर निघून जायची. गावात जास्त लोकं असायचे नाही. वर्दळही तशी दिसायची नाही. गाव तसं मोकळं राहायचं. त्यानंतर स्पर्शाचा प्रश्नच राहायचा नाही. तसंच अंगणात टाकलेला सडाही वाळलेला असायचा. त्यात कोणत्याही अस्पृश्यांचे पाय उमटून राहायचे नाहीत दिवसभर अंगणात. अन् समजा एखाद्याच्या घरच्या सड्यानं त्याचं अंगण ओलं असलंही व अस्पृश्यांचे पाय उमटलेही तरीपण ते कोणीही पाहिले नसल्यानं समस्या उद्भवण्याची वेळ यायची नाही. 
            रात्रीलाही तीच गत होती. त्या काळात वीज व्यवस्था नसल्यानं अस्पृश्य रात्रीच्या अंधारात दिसत नाहीत व विनाकारण स्पर्शाला पुढं जावं लागतं म्हणून रात्रीला अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. तसंच समजा रात्रीच्या वेळेस अर्जंट कामासाठी गावात जायचं असल्यास किंचाळत जावं लागायचं. त्या किंचाळल्यानं स्पृश्य लोकांना माहीत होत असे की अस्पृश्य व्यक्ती रस्त्यानं येत आहे. त्यामुळं अस्पृश्यांपासून. स्पृश्यांना विटाळण्याची संभावना राहात नव्हती. 
          अस्पृश्यांचा रात्रीचा स्पर्श वा दिवसाचाही स्पर्श उच्चवर्णीय लोकांना चालत नव्हता. त्याचं कारण होतं अंघोळ करावी लागणं. अस्पृश्यांचा स्पर्श केव्हाही होवो. परंतु त्याचा स्पर्श झाल्यास तो व्यक्ती अंघोळ केल्याशिवाय शुद्ध होत नाही असा समज होता उच्चवर्णीय लोकांचा. तसे ते अंघोळ करीत असत. त्याचं कारणही तसंच होतं. 
           अस्पश्यांना उच्चवर्णीय मंडळी गलिच्छ मानत. तसं पाहता अस्पृश्य माणसंही गलिच्छच राहात असत. त्यांना स्पर्श करतांना हिनताच वाटायची. तीच ती लुगडी असायची अंगावर. साबण मिळत नसल्यानं चांगलं स्वच्छ दिसायचं नाही लुगडं. ते किटलेलं दिसायचं. त्यातच केस नीट विंचरलेले नसायचे. तसे ते अंघोळ करायचे. तरीही त्यांच्या अंगाचा घाण वास यायचा. कारण ते कोणत्याही स्वरुपाचे उटणे लावत नसत. कारण उटणं लावण्याएवढे पैसे व उटणेही नसायचे. 
              अस्पृश्य काम करीत होते जनावरे फेकण्याचे. जर एखाद्या घरी एखादं जनावर मरण पावताच अस्पृश्यांना बोलावणं यायचं व ते जनावर फेकायला लावलं जायचं. बदल्यात त्याला काही धान्य मिळत असायचे. तसं पाहता ते जनावर फेकत असतांना हा अस्पृश्य व्यक्ती त्या प्राण्यांच्या अंगावरील कातडं काढायचा व त्या चामड्याला पकडून त्या चामड्यापासून दोर बनवायचा. ज्याला वार्ती म्हणत. काहीजण चप्पलही बनवत तर काही जण त्याच चामड्यापासून मोट बनवत. मोट हे विहिरीतून पाणी काढण्याचं साधन होतं. 
           ते कातडं........ते कातडं पकविण्याच्या मोठमोठ्या कुंड्याही असायच्या. त्या कुंडीत चामडे कमविणारी लोकं कातडं टाकायचे. त्यात काही वस्तू त्या कातड्यासोबत टाकत. त्यात बाभळीच्या शेंगा वा साल असायची. पाणी असायचं व ते चामडं आठ दिवस भिजत घातलं जायचं. त्याला दररोज उलटपालट केलं जायचं. आठ दिवसानंतर ते चामडं काढलं जाई. त्यानंतर त्या चामड्याला स्वच्छ केलं जाई. त्या चामड्यावर असलेले केसं काढले जाई. निरुपयोगी खराब झालेलं चामडं कापून फेकलं जाई. त्यानंतर पुन्हा दोन चार पाण्यानं स्वच्छ धुवून त्याला वाळत घातलं जाई. तसं पाहता त्या चामड्यावर प्रक्रिया करीत व त्याला धुत असतांना जे पाणी वापरलं जात असे. ते पाणी अंगावरही उडत असे व त्याचा वास परीसरातील व्यक्तीला सहन होत नसे. 
           त्या कुंडीत टाकलेल्या चामड्यांचा उग्र वास येत असे. तो वास घेणं कठीण होत असे. त्यामुळंच की काय, अस्पृश्य व्यक्तीनं कितीही वेळा अंघोळ केली तरी तो वास त्याच्या अंगावरून वा कपड्यावरून निघून जात नसल्यानं तो व्यक्ती आज आवडत नसे. त्या व्यक्तींचा वास येत नसे व त्याच्याबद्दल तथाकथीत समाजानं विटाळ धरला. काही लोकं तर या मेलेल्या प्राण्याचं मांसही खात असत. कारण त्यांना अन्न मिळत नसे. 
               
************************************************

          बाळंतपण........पुर्वी बाळंतपणाला उच्चवर्णीय मंडळी विटाळ मानत असत. जी एक चांगली गोष्ट होती. नवनिर्मीतीची गोष्ट होती. बाळंतपणात एक स्री नवजात बालकाला जन्म देत असे. जे बालक या जगाची एक उत्पत्ती असे. तथाकथीत लोकांना याच गोष्टीचा विटाळ होता. परंतु त्यावेळेस अस्पृश्य समाजातीलच माणसं कामात येत असत. अस्पृश्य समाजातीलच काही विशिष्ट जातीच्या स्रिया उच्चवर्णीय कुटूंबातील स्रियांचं बाळंतपण पाहात असत. त्यांचं दुखलं खुपलंही पाहात असत. तसंच कौमार्य मुलगी वा रजस्वाला स्री जर असेल तर तिलाही अशा समाजातीलच स्री सांभाळत असे. त्याचा विटाळ मानत नसे. 
             विटाळ हा चरणसीमेवर होता. विटाळ केवळ अस्पृश्य आणि उच्चवर्णीय यांचाच नव्हता तर विटाळ हा एकाच जातीतील माणसांमध्येही होता. रजस्व अवस्था प्राप्त स्रीचा विटाळ सर्वच जनजातींना होता. ती स्री मग उच्चवर्णीय असो वा कनिष्ठवर्णीय. 

********************************************

           विटाळाचेही काही प्रकार आहेत. एक जातीजातीतील विटाळ, दुसरा बाळंतीणीचा विटाळ  तिसरा मेलेल्या माणसाच्या मयतीचा विटाळ व चौथा मासीकपाळीच्या स्रियांचा विटाळ. त्यातच एखाद्या घरच्या पाळीव प्राण्यानं घरी जन्म घेतला वा ते मरण पावले तर त्याचा विटाळ मानला जात नाही. तसं पाहता मेलेल्या माणसांचाही  विटाळ मानू नये वा जन्म घेणाऱ्या नवजात बाळाचाही विटाळ मानू नये. 
           देशातल्या गडचिरोलीच्या जिल्ह्यात गोंड आदिवासी आणि त्याच्या काही उपजातींमध्ये कुरम्या'सारखी प्रथा होती. कुरमा म्हणजे पालापाचोळ्याची वस्तीबाहेर बांधलेली झोपडी. मासीक पाळीच्या काळात प्रत्येक महिलेने या कुरम्यांत राहावे, अशी ही प्रथा आणि तसा दंडकही होता. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गोंड समाज आणि त्याच्या उपजाती असलेल्या माडियासारख्या जातींमध्ये वर्षानुवर्षे ही प्रथा होती. काळानुसार तिच्यात थोडाफार बदल झाला. आज ती प्रथा पुर्णतः बदलली असली, तरी मूळ प्रथा कायम ठेवण्याकडे समाजाचा कल आहे. महिलेची मासीक पाळी सुरू झाल्यानंतर चार-पाच दिवस तिला कुरम्यांत मुक्काम करण्यासाठी पाठवले जाते. या काळात ती स्री कुटुंबातल्या कुणाला स्पर्श करत नाही. तसे झाल्यास तो विटाळ मानला जातो. या कालावधीत कुरम्यांत राहणाऱ्या महिलेला तिच्या कुटूंबातील सदस्य स्पर्श न करता बाहेरुन अन्न-पाणी पुरवतात. तसंच या काळात तिचा व समूहाचा संपर्क तोडला जात असतो. 
          कुरमा........आजही हा कुरमा अस्तित्वात आहे. पूर्वी पालापाचोळा गोळा करुन आणि श्रमदान करुन कुरमा उभारला जात असे. पाड्यालगतच तो कुरमा असायचा. उन्हा-पावसापासून, थंडीपासून संरक्षण होणेही कठीण बनत असे त्या कुरम्यात. लोकसंख्या जसजशी वाढत असे. तसतशी कुरम्यांची संख्याही वाढत असे. तसं पाहता कुटूंबातील लोकं चांगल्या मजबूत इमारतीत राहात व तिचा स्पर्श इतरांना होवू नये म्हणून तिला तात्पुरत्या पालापाचोळ्यानं उभारलेल्या जिथं थंडी, ऊन, वारा लागत असे. अशा लहानशा झोपडीत समाज तिला ठेवत होता. त्याचं कारण होतं विटाळ. विटाळानं हे सारं घडवलं होतं. 
            कुरम्यात रजस्व महिला राहात असे. तिची तिथं राहण्याविषयी  कोणतीही तक्रार सहसा दिसत नसे. कधी कधी त्या कुरम्यात साप, विंचूही शिरत असत. कुरमा चांगला असावा, साप-विंचू व वन्यप्राण्यांचा त्रास होऊ नये, अशी त्यांची इच्छा असायची. ही प्रथा वाईटच होती. कारण रजस्व होणं ही प्रकृतीची देण होती. तिचा बाऊ करायला नको होता. परंतु तथाकथीत संस्कृतीनं तोच बाऊ दाखवला. कालांतरानं समाज शिकला. त्यातील काहींनी ही प्रथा पाळणं बंद केली तर काहीजण आजही विचार करतात की संस्कृतीचा एक भाग म्हणून पाळली जात असलेली किंवा पाळण्यास भाग पाडली जात असलेली ही प्रथा बंद होणार की काय? ही प्रथा बंद होवू नये. त्यासाठी काही लोकं प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी कोणी पुढे यायला हवं असंही म्हणत आहेत. 
           रजस्व स्रीचाही विटाळ होतो का? हा प्रश्‍न आहे. अन् तो होतो तर का होतो? हाही प्रश्न आहे. रजस्व अवस्था येणं ही प्रकृतीची देण आहे. नवनिर्मीतीची एक प्रक्रिया आहे. ती अवस्था जर स्त्रियांच्या जीवनात नसेल तर नवनिर्मीतीची प्रक्रियाच घडून येवू शकणार नाही. तसंच ती प्रक्रिया आपला वारसा चालविण्यासाठी योग्य प्रक्रिया आहे. मग त्या गोष्टीचा आपण विटाळ का पाहावा? त्या गोष्टीचा आपणास विटाळ का असावा? तो असू नये. तरीही हाच विटाळ एक कुप्रथा असली तरी ती आपली एक चांगली प्रथा समजून लोकं पाळत असतात. आजही या समाजात अद्याप तरी या प्रथा बऱ्याच घरात पाहावयास मिळत आहेत.
           काही लोकं म्हणतात की कुरमा म्हणजे विटाळ नव्हे, तर विहार आहे. परंतु तो विहार कसला? अन् तो विहार त्याच स्रीसाठी का असावा? जी रजस्व अवस्थेत असेल. अन् तसा  विहारच करायचा झाला तर कुटूंबातील इतर लोकांनी तसा विहार का करु नये? परंतु लोकं म्हणतात की ती स्री कष्टापासून, नेहमीच्या रहाटगाडग्यापासून निवांतपणे चार-सहा दिवस स्वतंत्र राहते. यात वाईट काय आहे, असे प्रतिप्रश्‍नही विचारले जातात. पण मासिक पाळीचे वय संपल्यावर अशा आरामाची व्यवस्था महिलांसाठी आहे का, यावर कुणाकडेच उत्तर नाही. बऱ्याच वेळेला एका कुरम्यात अनेक महिला असतात. कुरम्यातील वातावरण तसे आरोग्यदायी नसते. कुरम्यात एखादी महिला गंभीर आजारी पडली की पूर्वी वैदू तेथे जाऊन दुरून उपचार करायचा. आता दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी कुरम्यात राहणारी महिला या विजनवासात आजूबाजूच्या विहिरी, नदी, नाल्यांनाही स्पर्श करीत नाही. जेव्हा केव्हा ही प्रथा सुरू झाली असेल, तेव्हा "विटाळ' हेच कारण प्रमुख असावे आणि नंतर आरामाचे कारण जोडले असावे, असे मानले जाते.
         महत्वाचं म्हणजे कुरमा ही रजस्व स्रीसाठी वाईट गोष्टच.  तिचा विटाळ मानायला नको व कोणीही मानू नये. कारण तिला आपल्याच वंशाच्या वाढीसाठी विधात्यानं त्या पद्धतीनं निर्माण केलं आहे. ती एक शक्ती आहे की जी स्रियांना विधात्यानं प्रदान केली आहे. प्रत्येक स्री ही वंशवाढीचे माध्यम आहे. मग ती स्री रजस्वाला जात असेल तर तिचा विटाळ न मानता तिच्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठी कुरमा नकोच. तिलाही भावभावना असतात. त्या जपायला हव्यात. त्याच भावनेतून त्या स्रीला वेगळ्या पालापाचोळ्याच्या घरात थंडी, ऊन वाऱ्याचा त्रास देण्यासाठी न ठेवता आपल्याच घरात ठेवावे. तिलाही आपल्यासोबत वावरु द्यावे. तिच्याबाबत विटाळ मानू नये. कारण तिचा विटाळ होत नाही.
           महत्वपुर्ण गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की बाळंतपण वा रजस्वपण या विटाळ मानण्यासारख्या  गोष्टी नाहीत. त्या नवनिर्मीतीच्या प्रक्रिया आहेत. त्याच प्रक्रिया आपल्या घरी लक्ष्मी व विष्णूला जन्म देत असतात. कोणाच्या घरी गणपती तर कोणाच्या घरी महादेव, कोणाच्या घरी राम तर कोणाच्या घरी सीतेलाही जन्मास घालत असतात. मग जिथं या प्रक्रिया प्रत्यक्षात देवी व देवांनाच जन्माला घालतात. मग त्याचा विटाळ वा त्यांच्यासाठी कुरमा प्रथा का ठेवावी? ती ठेवू नये. आज पाश्चात्य काळ आहे. हाच सुधारणावादी काळ आहे. त्यामुळंच पुर्वी लोकं नाही सुधारले असतील तरी चालेल. परंतु आजतरी सुधारण्याची गरज आहे. कारण या प्रक्रिया विटाळ मानणाऱ्या प्रक्रिया नसून आपल्या घराच्या वंशविस्ताराच्या प्रक्रिया आहेत की ज्याने महत्वपुर्ण बदल आपल्या कुटूंबात घडून येत असतात व ज्या प्रक्रिया आपल्या परीवाराला आनंद मिळवून देत असतात. त्या प्रक्रिया म्हणजेच आपल्या घरचा दिवाळी, दसरा असतो. त्यातूनच आपण आपल्या घरी दिवाळी, दसरा साजरा करु शकतो. अन् त्याच प्रक्रियेनं आपण प्रत्येक सण साजरा करु शकतो हे तेवढंच खरं आहे. म्हणूनच त्या प्रक्रियेबाबत विटाळ न बाळगलेला बरा. तसंच रजस्व स्रियांबाबतही विटाळ मानायला नको हेही सांगावेसे वाटते. 

*****************************************

           असंच ते गाव. त्या गावात विटाळ चरणसीमेवर होता. देशाला स्वातंत्र्य मिळून दहा वर्ष झाली होती, परंतु गाव सुधारलं नव्हतं. देशात पाश्चात्य विचारसरणीचे वारे वाहात होते. परंतु गाव सुधारलं नव्हतं. त्या पाश्चात्य विचारसरणीच्या पाश्र्वभूमीवर देशात ना अस्पृश्यांचे भेदभाव पाळले जात होते. ना रजस्व स्रीचे. ना बाळंतपण काळातील बाळंतपणाचा भेदभाव होता लोकांना ना कोणत्याच स्वरुपाचा भेदभाव. परंतु ते गाव आजही भेदभाव पाळत होतं. त्याचं कारण होतं संस्कार.
           संस्काराची परिभाषा त्या लोकांची वेगळी होती. त्यांच्या मते या प्रथा पाळणे ही चांगली गोष्ट आहे. ह्या प्रथा कुप्रथा नसून त्या चांगली प्रथा आहेत व त्यानंच संस्कार वाढीस लागतो. 
            शिवपूर नावाचं ते गाव. त्या गावात जातीजातीत विवाह करण्यावर जास्त भर देण्यात येत असे. त्याचंही कारण होतं. ते म्हणजे जात. लोकांचं म्हणणं होतं की दोन वेगवेगळ्या बैल व गाईंचा संकर घडून आल्यास त्यातून दुसरी वेगळीच जात निर्माण होते. तसेच दोन झाडांचा जर संकर घडून आल्यास तिसरी वेगळीच प्रजाती निर्माण होते. तेच मत होतं माणसांच्या बाबतीत. ते लोकं मानत असत की दोन वेगवेगळ्या जातीतील मुलामुलींचा विवाह झाल्यास त्याच्यातून निर्माण होणारं मुल हे वेगळ्या प्रकारचं जन्मास येवू शकतं. त्यामुळंच की काय, या गावातील लोकांचा आंतरजातीय विवाहाला विरोध होता. त्याचप्रकारे ती मंडळी अस्पृश्य व स्पृश्य असा भेदभाव मानत होती.
           आज आपण पाहतो की काळ बदलला. लोकं सुधारले व पाश्चात्य विचारसरणीनुसार चालायला लागले. कोणी तोकडे कपडे घालायला लागले. वावरायला लागले. तर दुसरीकडे काही लोकं बाळंतपण व रजस्व स्रियांचा विटाळ मानायला लागले व त्यालाच चांगले संस्कार समजून खऱ्या संस्कृतीची हत्या करायला लागले. खरंच त्याला चांगले संस्कार समजावे की कुसंस्कार?  हे जनलोकांना पडलेले कोडेच आहे. 
           संस्कार........संस्कार ही अशी गोष्ट की लोकांनी चांगलं बोलावं. चांगलं वागावं. कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव करु नये. कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव मानू नये. माणसाला माणसासारखं वागवावं. वागू द्यावं. त्यांच्या भावभावनांना छेद देवू नये. हिंसा तर अजिबातच करु नये. त्यांचा अपमान करु नये. चांगला विचार ठेवावा. दुसऱ्यांच्या प्रति चांगला विचार मनात यावा. मन स्वच्छ ठेवावं. त्याचबरोबर बुद्धीही. कारण चांगल्या पवित्र मनातून चांगलेच विचार बाहेर पडू शकतात. 
              संस्कार केवळ माणसांच्या बाबतीतच नसावा तर तो प्राणीमात्रांसाठीही असावा. प्राणीमात्रांशी वैरत्वानं वागू नये. त्यांच्याशी मिलनसार वागावे. त्यांची हत्या करु नये. त्यांना कधीच काठीनं मारु नये. त्यांचा कधीच अपमान करु नये. त्यांचीही दया घ्यावी. 
            वरील दृष्टिकोन अंगीकारुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूसपण शिकविण्यासाठी संविधानाची निर्मीती केली. त्यात वेगवेगळी कलमं टाकली. त्या कलमानुसार माणसाला माणूसपण समजलं व तो माणसासारखा वागू लागला. तरीही काही माणसं अशी आहेत की जी आजही माणसांसारखी वागत नाहीत. आज याच माणसांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडला आहे. माणसं माणूसपणच विसरले आहेत. ते तोकडे कपडे घालायला लागले आहेत. दारु, तिही विदेशी प्यायला लागले आहेत. त्यातच काही लोकं तर आपली पत्नी दुसऱ्याला व दुसऱ्याची पत्नी आपल्याला एका रात्रीसाठी देतात आहे. असा काळ. या काळात तसं वागणं म्हणजे संस्कार समजलं जातं. 
          संस्काराच्या बाबतीतून विचार केल्यास एकीकडे लोकं जुन्या काळच्या प्रथा पाळत असलेले दिसतात की ज्या कुप्रथा आहेत व त्या कुप्रथा असल्याचं सिद्ध झालं आहे.  आता लोकं त्या प्रथांना संस्कारी प्रथा म्हणतात आणि मानतातही. ते तसं का म्हणतात ते न कळणारं कोडच आहे तर दुसरीकडे काही लोकं पाश्चात्य विचारसरणीला चांगलं मानतात आणि म्हणतातही. ते का मानतात व म्हणतात तेही कळत नाही. 
          समाजात याच स्वरुपानं दोन प्रवाह तयार झाले आहेत. पहिला प्रकार, मुख्यतः संस्कार म्हणजे  बाळंतपण व रजस्वाचा विटाळ मानणे व दुसरा प्रकार असा विटाळ न मानणे, त्याला विरोध दर्शवणे, तसेच तोकडे कपडे घालणे वा विदेशी दारु प्राशन करणे आणि आपल्याच पत्नीसोबत इतर परपुरुषांकडून तिची इच्छा नसतांनाही विभत्स प्रकार घडवून आणणे. 
            संस्कार याचा अर्थ असा नाही की तिचा समाजानं विटाळ मानावा. तिच्या बाळंतपणात तिला अतिशय वेदना होत असतांना तिला हात लावू नये, मदत करु नये व ती रजस्व अवस्थेत असतांना व तिला त्रास होत असतांना तिच्या भावना समजून न घेता तिला वेगळं ठेवणे. तिच्याशी स्पर्श अस्पर्शानं वागणे. याला संस्कारक्षम वागणं म्हणत नाहीत. याला पिशाच वृत्तीचं वागणं म्हणतात. तसंच पाश्चात्य संस्कृतीच्या वागण्याला,  त्यातच तोकडे कपडे परीधान करण्यालाही पिशाच वृत्तीचं वागणं संबोधतात. याचाच अर्थ असा की माणसानं तसेच विशेषतः स्रियांनी तोकडे कपडे परीधान करुन वागू नये. त्यांनी दारु वा सिगारेट पिवू नये नव्हे तर त्या वस्तूला स्पर्शही करु नये. तसेच आपला पती म्हणतो म्हणून परपुरुषांची बळी बनू नये. त्या गोष्टीचा विरोध करावा. त्यांनी संपुर्ण शरीर झाकणारे कपडे वापरावेत. पाश्चात्य संस्कृती आपली संस्कृती नाही. ती विदेशी संस्कृती आहे. त्या भागात उष्ण व दमट हवामान असल्यानं त्या लोकांना कपडे अंगावर सहन होत नाहीत. म्हणून ते तसे कपडे वापरतात. परंतु आपल्याकडे वातावरण चांगलं आहे. आपल्या संपुर्ण पोशाख परीधान करण्याला अनुकूल आपल्याकडे वातावरण आहे. त्यादृष्टीनेच आपण विचार करावा. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे आपला देश एवढाही अंधश्रद्धाळू नाही की आपण बाळंतपण व रजस्व क्रियेला विटाळ समजावं. तसाही विटाळ कोणी मानू नये.
          काल संस्काराच्याच या नावाखाली स्रिया भरडल्या जात होत्या. आजही काही तशी परिस्थिती फारशी बदलली नाही. आजही संस्काराच्या नावाखाली स्रियाच भरडल्या जात आहेत. बरेचजण तिच्यावरच बळजबरीनं आपल्या कुप्रथा लादून तिला बळीचे बकरे बनवीत आहेत. तिचा विटाळ मानत आहेत नव्हे तर ती जर तशा प्रथा पाळत असेल तर त्याला संस्कार समजत आहेत. अन् समजा त्याला उच्छेद देवून एखाद्या स्रीनं डोकं वर काढलं व तोकडे कपडे घातले वा ती पाश्चात्य विचारसरणीनं वागायला लागली तर तिला नावबोटंही ठेवायला हा समाज मागं पुढं पाहात नाही. 
           महत्वपुर्ण बाब ही की बाळंतपण वा रजस्वाचा विटाळ मानणं. ही कुप्रथाच आहे. त्या प्रथेला संस्कार मानूच नये आणि त्या जर कोणी पाळत असेल तर त्याचं समर्थनही कोणी करु नये. तसंच कोणीही स्वतः विचार करुन तोकडे कपडे सेलिब्रेटीसारखे परीधान करु नये. या दोन्ही गोष्टी वाईटच आहेत. आता कोणी म्हणतील की सेलिब्रेटी तोकडे कपडे घालतात ना. मग मी घातले तर काय वावगं आहे? तर त्याचं उत्तर आहे की त्या सेलिब्रेटींचा तो व्यवसाय आहे. त्याचे त्यांना तेवढे पैसे मिळतात. त्या पैशावर त्यांचं पोट अवलंबून आहे व पोटासाठी वाट्टेल ते या वृत्तीनुसार त्या तोकडे कपडे घालतात. ते तोकडे कपडे फक्त त्यांच्या व्यवसायापुरते मर्यादीत असतात. तसं आपलं आहे का? आपला तो व्यवसाय तरी आहे का? तर याचं उत्तर नाही असंच येणार. तसं पाहता खरा संस्कार तोकडे कपडे घालणे व पाश्चात्य संस्कृतीनुसार चालणे नाही वा रजस्व स्रियांचा स्पर्श नाकारुन त्यांचा विटाळ मानणे नाही. जो तसे मानतो. तो कुसंस्कारीच असतो हे तेवढंच खरं. खरे संस्कार तेच आहेत की ज्यात रजस्व स्रियांचाही आदर होतो. त्यांच्या भावभावनांचीही इज्जत होते नव्हे तर त्यांचा विटाळ मानला जात नाही. तसंच तोकडे कपडे परीधान करण्याचंही समर्थन जिथं होत नाही. 
           काही लोकांना दिखाव्याची गरज असते. मात्र काहींना नसते. ज्याचेजवळ बरंच काही असते. त्याला दिखाव्याची गरज राहात नाही. कारण ते कालांतरानं दिसतंच लोकांना. मात्र ज्याच्याजवळ काहीच नसतं. ते सतत दिखावा करीत असतात. तसेच समाजात वावरणारे काही काही लोकं हे द्वेषभावना ठेवणारे असतात. त्यांना लोकांनी चांगलं केलेलं कार्य अजिबात आवडत नाही. त्यांच्याजवळ काहीही नसतं. ते काहीही करु शकत नाहीत. परंतु उगाचंच ज्ञान पाजळवत असतात.
            कुप्रथा अशाच लोकांमुळं निर्माण होत असतात. अशा लोकांना इतर लोकांनी केलेली चांगली कामं दिसत नाहीत. मग हे विरोध करीत सुटतात. ते लोकांना भडकवतात. त्यानंतर लोकांना समाजात झालेला सामाजीक बदल पाहावत नाही. मग काय? ते त्यावर टिका करीत सुटतात. 
         आजचा काळ अगदी  तसाच आहे. सामाजीक बदल सहजासहजी मनाला पचत नाही. तीच ती संस्कृती लोकांना हवीहवीशी वाटते. त्यातील सर्वच गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. अन् थोडासा बदल झालाच तर तो बदल लोकांना स्विकारावासा वाटत नाही. तसं पाहता लोकांमध्ये बदलाव होतो. कारण बदलणे हा स्वभावधर्म आहे. 
           आज तसं पाहता बराच बदल झालेला आहे. विज्ञानानं बरीच प्रगती केलेली आहे. त्यामुळंच आपली जिथं दृष्टीही पोहोचू शकत नाही. तिथं विज्ञान पोहोचलं आहे. आदित्य एल एक हा त्याचाच एक भाग आहे. आज एका सेकंदात कितीतरी पट आपण दूर पोहोचू शकतो. हा विज्ञानानं केलेला आविष्कारच आहे. 
            समाजात अशीही माणसं आहेत की जे आयुष्यभर काहीच करीत नाहीत. करण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. अन् कोणी करीत असेल तर त्याचे पाय ओढतात. तशीच इथं द्वेष करणारीही माणसं बरीच आहेत की जे सतत द्वेष करीत असतात. 
           माणसाला जीवनात शत्रू नसतातच. परंतु ते जेव्हा माणूसपण जपतात किंवा त्याची भरभराट होते. तेव्हा आपोआपच शत्रू निर्माण होत असतात. मग आपण कितीही विचार केला की मी कोणाशी भांडण करीत नाही. त्यामुळं माझा शत्रूच निर्माण होणार नाही. तर ते शंभर प्रतिशत खोटं भाकीत ठरतं. कारण जसजशी आपण प्रगती करतो. तसतसे आपले समाजात शत्रू निर्माण होत असतात. मग जे पुर्वी सतत आपल्याशी बोलत असतील. ते आपली भरभराट झाल्यानंतर बोलण्याचं टाळतात. पुर्वी जे चांगले वागत असतील, ते आपल्याशी आपली भरभराट झाल्यानंतर नीट वागत नाहीत. एवढंच नाही तर आपण पुन्हा प्रगतीसाठी प्रयत्न करु नये म्हणून आपल्याला अक्कलही शिकवीत असतात. असे सल्ले देत असतात की ज्यातून आपलं नुकसान होवू शकतं. हे आपले शत्रूच असतात.  परंतु ते आपल्याशी हिंतचिंतक या स्वरुपात वागत असतात. यात त्यांना काय मिळते? काहीच मिळत नाही. परंतु दुसऱ्याचं नुकसान करण्यात वा होण्यात या लोकांना नक्कीच समाधान वाटत असते. 
          सामाजीक लोकांबद्दल सांगतांना असं म्हणता येईल की समाजात असेही लोकं असतात की जे उच्चकोटीवर पोहोचलेले असतात. त्यावेळेस ते इतरांकडे हिन दृष्टीकोनातून पाहात असतात. ते विसरतात की आपण गतकाळात कुठे होतो? अशा लोकांना सतत वाटत असते की त्या पदावर कोणीही येवू नये. अन् कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास त्याचं सतत खच्चीकरण करीत असतात. याचाच अर्थ असा की लोकांनी कधीही विकास साधू नये. 
           सामाजीक बदलाचा विचार करता देश स्वातंत्र्य होईपर्यंत सत्ता उच्चवर्णीय लोकांची होती. त्यांना वाटायचं की देशात त्यांचंच राज्य राहावं. इतर लोकांनी वर येवू नये. म्हणूनच त्यांनी देशात लोकांमध्ये कर्मकांड, अंधश्रद्धा, देव धर्म शिरवले होते व ते त्या गोष्टींना विरोध करीत असत. जो कोणी त्या गोष्टीच्या विरोधात गेलाच तर त्याला वाळीत टाकणे, त्याच्याशी व्यवहार न करणे. त्याला यमसदनी पोहोचविणे. जातीय अत्याचार करणे. त्यांचा अधिवास वस्तीबाहेर करणे इत्यादी गोष्टी समाज करीत असे. त्यामुळंच कोणताही व्यक्ती कधीच समाजातील या प्रथांच्या विरोधात जात नसे. तो समाजातील चालीरितीनंच वागत असे. 
          संविधान बनण्यापुर्वी समाजात एकतर्फी गुंडाराजच होता. उच्चवर्णीय म्हणतील तेच होत असे व घडतही असे. याला फाटा दिला संतांनी. संतांनी भेदभाव प्रसवला नाही. जे खरे संत होते. त्यांच्याजवळ परोपकारी भावना होती. राग, द्वेष, मद, मत्सर नव्हता. अहंकार अजिबात नव्हता. तसाच लोभही नव्हता. त्यामुळंच संत महान ठरले. त्यांनी लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगीतल्या. परंतु काही लोकं तसे नव्हते. 
            संतांसारखेच एक व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांना खरंच पराकोटीचे संतच मानावे लागेल. कारण त्यांच्यातही संतांमध्ये असणारे बरेच गुण होते. भेदभाव नव्हता. परोपकारी भावना होती. सामाजीक कौशल्य होतं. सामाजीक दातृत्वाची भावना होती. परंतु त्यांच्यात राग, लोभ असल्यानं त्यांना संत मानलं गेलं नाही. परंतु त्या तीनही गोष्टीची उकल करुन सांगीतल्यास तेच महान संत ठरतात. जसे राग होता. कोणता राग होता? राग होता अन्यायाविरुद्धचा. अस्पृश्यांवर उच्चवर्णीयांकडून होत असलेल्या अन्यायाचा राग होता. तसा राग संतांमध्येही असतो. लोभ होता. अस्पृश्यांना समाजातील इतर घटकांबरोबर मानाचं स्थान मिळवून देण्याचा. तोही संतांमध्ये असतोच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातीलच कर्मकांड, देवधर्म जातीभेद व अन्याय याचा विरोध केला व त्यांना जातीजातीतील भेदभावही दूर करता आला. त्याचं कारण होतं, त्यांना असलेला ब्रिटिश सरकारचा पाठींबा. तो त्यांनी आपल्या शिक्षणाच्या भरवशावर मिळवला होता. तो होता म्हणूनच त्यांना संविधानही लिहिता आलं व तो होता म्हणून समाजातील वंचीत अस्पृश्यांना समाजात डोकं वर काढायची संधी मिळाली. 
          आज संविधान आहे. सर्वजण यशाच्या शिखरावर गेले आहेत. जावू शकतात आहेत. विज्ञानही मानतात आहेत नव्हे तर मानायला लागले आहेत. तरीही समाजात असे बरेच लोकं आहेत की आजही कर्मकांड पसरविण्याच्या गोष्टी करतात. आजही देवधर्म आणि अंधश्रद्धेवर विश्वास करुन ते पसरविण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते वैज्ञानिक तथ्यांना तिलांजली देतात. असे लोकं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाहीत. त्यांनी लिहिलेलं संविधान मानत नाहीत. ते पदोपदी समाजाला पुन्हा  त्याच भेदभावाच्या आगीत टाकण्याचा प्रयत्न करीत असतात.
           आज आपली जी विचारधारा आहे, ती बदलण्याची गरज आहे. आपली आजची जी विचारधारा आहे. ती कंपू स्वरुपाची असून तिला संकुचीत विचारधारा म्हणतात. ती विचारधारा चांगली विचारधारा नाही. ती विचारधारा आपण बदलायला हवी. त्या विचारधारेत थोडा विस्तारीतपणा यायला हवा. भेदभाव गळून जायला हवा. देवधर्म सोडा असं म्हणत नाही. मात्र कर्मकांड व अंधश्रद्धा सोडाव्यात. विटाळ कायमचा मिटवावा. मग तो स्री जातीच्या रजस्वाचा असो, अस्पृश्य स्पृश्यातील असो. तसाच भेदभावही मिटवावा. मग गरीब श्रीमंतांचा असो, प्रत्येक माणसाला समानतेच्या दृष्टीकोनातून वागवावं. वागू द्यावं. त्यांच्या ओबडधोबड विचारांचंही स्वागत करावं. यातच खरी माणूसकी आहे अन् तेवढंच माणूसपणही. हे समाजानंच नाही तर कोणीही विसरु नये. कारण प्रत्येकाला समानतेनं जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यावर आपली जबरदस्ती लादू नये. तशी आपली जबाबदारी आपण त्यांच्यावर लादलीच तर ती जबरदस्ती म्हणजे अत्याचार होईल व त्याच अत्याचाराचे रुपांतर एक ना एक दिवस स्फोटांमध्ये होईल. जो स्फोट देशाच्या विकासालाही घातक ठरु शकतो. यात शंका नाही.

********************************************

           म्हायदूनं चामडं सोललं. त्यानंतर तो घराकडील वाट चालू लागला. त्यातच त्या चामड्यासोबत जनावराचंही थोडसं मांसही घेतलं होतं. विचार होता की ह्या मांसानं माझ्या घरच्या बायकापोरांची तरी पोटं भरतील. 
           तो काळ तसाच होता. विटाळाचं कालचक्र सुरु होतं.  अस्पृश्यांना तर गावातच प्रवेश नव्हता. त्यामुळंच त्यांना कोणत्याही खायच्या वस्तू मिळत नव्हत्या. तसा अस्पृश्यांना पैसाही मिळायचा नाही. कोणी धान्यही द्यायचा नाही. कधी एखाद्या वेळेस एखादी स्री बाळंतीण झाली तर काही धान्य मिळायचे. ते धान्य वर्षभर पुरेल एवढं नसायचं. तसं पाहता जनावरंही जास्त मरत नसत. 
           अस्पृश्यांनाही पोट होतं. पोटासाठीच ते लाचार होते. जर पोट त्यांना नसतं तर ते लाचारीचंही जीवन जगले नसते आणि  त्यांना लाचारीचं जीवन जगावं लागलं नसतं. 
         गावात भरपूर लोकं होते. त्यांच्या पिढ्यान् पिढ्या उच्चवर्णीयांची सेवा करण्यात खच्ची झाल्या होत्या. आता लोकसंख्या वाढल्याने गावातील अस्पृश्यांसाठी काम नव्हतं. त्यामुळंच बऱ्याच लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं. म्हणूनच की काय, ते लोकं मेलेल्या जनावरांचं मांस कापून खात असत. ते कुजू नये व जास्त दिवस टिकावे व नंतरही आपल्याला खाता यावे व आपल्या पोटाची भूक भागवता यावी म्हणून ती मंडळी मेलेल्या प्राण्यांचं मांस त्याला मीठ मसाले लावून उन्हात वाळवून ठेवत असत. त्यानंतर ज्यावेळेस त्या अस्पृश्य लोकांना अन्न मिळत नसे. त्यावेळेस ते तसं अन्न खात असत. अर्थात त्या वाळवलेल्या मांसाचे अन्न म्हणून वापर करीत असत. 
           म्हायदू झपाझप पावले टाकत घरी येत होता. त्याच्या मनातील असंख्य विचार फेर धरुन नाचत होते. तसं पाहता म्हायदू उच्चकोटीच्या विचाराचा होता. 
            म्हायदू घरी आला. त्यानं आणलेलं मांस घराच्या वर वाळायला टाकलं. तो ते मांस अंगणातही टाकू शकत होता. परंतु त्यानं तसं केलं नाही. कारण त्याला माहीत होतं की ते मांस अंगणात वाळू टाकताच परीसरातील कुत्री त्यावर यथेच्छ ताव मारतील व आपल्याला मांस उरणार नाही. त्यानंतर त्यानं ते चामडं कुंडीत भिजू टाकलं. त्या चामड्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्यानं बाभळीची पानंही टाकली. तशीच निलगिरीची पानंही टाकली व ती कुंडीही व्यवस्थीत झाकून घेतली. तसा तो विचार करु लागला. 
            'वर्षापासून विटाळलेली आमची जात. आम्हीही एके काळी राजे होतो या देशाचे. कुणाला असं शहाणपण सुचलं कुणास ठाऊक की आमच्यावर आता भीक मागायची पाळी आली. काल जी जात भीक मागत होती. ज्या जातीला केवळ उपासात दिवस काढावे लागत होते. ती जात आज श्रेष्ठ ठरली. अन् आज आम्हीच भीक मागायला लागलोय.'
          त्याचा निर्देश ब्राम्हण जातीवर होता. कारण पुर्वी ब्राम्हण मंडळी माधुकरी मागायची. या माधुकरीत ते फक्त पाचच घरी भिक्षा मागत असत. फक्त पाचच घरी. जर या भिक्षेत ती पाचपैकी एकाही घरी भिक्षा मिळाली नाही तर बिचाऱ्यांना संपुर्ण दिवस उपासातच काढावा लागत असे. मात्र आज तसं नव्हतं  बरीचशी ब्राम्हण मंडळी सुधारली होती व चांगल्या हुद्यावर लागली होती. मानाच्या सर्व जागा त्यांनीच हिरावून घेतल्या होत्या. 
           उच्चवर्णीय जात आज श्रेष्ठ बनली होती. समाजात आरक्षण होतं. संविधानानुसार लोकांना आरक्षण मिळालं होतं. परंतु त्या आरक्षणाचा लाभ आजही कनिष्ठ जातींना होत नव्हता. 
           त्याचं ते बरोबर होतं. त्यानंतर त्यानं अंघोळ केली व त्यानं जेवनखावण केलं व तो आपल्या कामाला निघून गेला. त्याचं काम होतं चांभारकीचं काम करणं. म्हायदूचा जळफळाट होणं साहजीकच होतं. ती चीड येणं तो भोगत असलेल्या यातनांचा परीणाम होता. आज त्या यातना समस्या निर्माण करणाऱ्याच होत्या. 
           म्हायदूच्या हक्काच्या चारपाच कुंड्या होत्या. त्या कुंड्यात तो चामडे भिजत घालत असे व ते चामडं परिपक्व झालं की त्यापासून तो गावच्या लोकांच्या आग्रहानंतर तो  लोकांनी सांगितलेल्या वस्तू बनवू लागला. 
           चांभार ती जात. चामड्यावर त्यांचा रोजगार होता. चामडं नसेल तर ती मंडळी पोट भरु शकणार नव्हती.  त्यासाठी चामड्याची गरज असायची. ती गरज पाहता ती मंडळी चामडं मिळविण्यासाठी गावोगावी फिरत असत. एखाद्या ठिकाणी एखादं जनावर मेलेलं आढळलं की ते त्या प्राण्यांची कातडी सोलायचे व त्या कातडीला परिपक्व करुन ती मंडळी त्या कातडीपासून वस्तू बनवायचे. हा त्यांचा रोजचा व्यवसाय होता. 
          म्हायदूही त्यासाठीच निघून गेला होता. तोही गावोगावी फिरायचा आणि चामडं शोधायचा. कारण गावात जास्त जनावरं मरत नव्हती. त्यामुळंच त्याला केवळ गावावरच अवलंबून राहता येत नव्हतं. 
           म्हायदू आजही निघून गेला होता चामडं पाहायला. अचानक त्याची नजर एका म्हशीवर पडली. ती म्हैस जंगलात पडली होती. कदाचीत ती आजारानं जंगलातच मरण पावली असावी असं वाटत होतं. तिच्या अंगावरचं कातडं मधामधातून फाटलेलं दिसत होतं. तशी दोन चार कुत्री त्या म्हशीच्या मांसावर ताव मारत होती. अशातच म्हायदूचं लक्ष त्या म्हशीवर गेलं. 
          तो म्हशीजवळ गेला. त्यानं म्हशीचं निरीक्षण केलं. त्या म्हशीचं मांस कुजलेलं होतं. त्यातून घाणेरडा वास येत होता. ती कुजलेली म्हैस असूनही ती म्हैस पाहून म्हायदू अतिशय आनंदीत झाला. त्याचं कारण होतं त्या म्हशीपासून मिळणार असलेलं कातडं. तसं पाहता त्या म्हशीच्या अंगावर चामडं कमीच शिल्लक होतं. 
          कुत्री म्हशीला बिलगून होती. ती कुत्री त्या म्हशीचे लचके तोडत होती. अशातच त्या कुत्र्याचं लक्ष पडलं म्हायदूवर. ते लक्ष पडताच त्यातील एक कुत्रं त्याच्यावर भुंकू लागलं. तसे शब्द फुटले म्हायदूच्या ओठातून. 
          'का बरं भुंकतो रे बाबा, मी बी तुह्यासारखाच. एवढंच हाय का तू जनावर हाय. अन् मी माणूस. बाबा, तुले तरी त्या उच्चवर्णीयांच्या पलंगावर जागा भेटते. अन् मले.......मले तं त्याईच्या आंगणात बी जागा भेटत नाय. आतं तरी चूप बस बाबा. मी कोठं तुले मास खाची मनाई करतो. तू खा मास अन् मलेबी माह्यं काम करु दे बाबा.'
          म्हायदूचं ते बोलणं. तसा तो कुत्रा शांत बसला. त्यानंतर म्हायदूनं आपली पिशवी खांद्यावरुन उतरवली. ती खाली ठेवली व तो त्या म्हशीचं चामडं काढू लागला. अन् ती कुत्रीही त्या म्हशीचं मांस खावू लागली.
          थोड्याच वेळाचा अवकाश. म्हायदूनं म्हशीचं चामडं तिच्या शरीरातून विलग केलं. त्याचबरोबर त्याचं काम संपलं. परंतु त्या कुत्र्यांचं काम संपलं नव्हतं. ते अजुनही त्या म्हशीचं मांस खातच होते. तसा म्हायदूच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडला. 
            'किती भाग्यवान हायेत ही कुत्री. त्याईलेबी अन्न भेटतं. परंतु माणसाले नाय. माणसाले तं जिमीनीवर बसालेबी जागा नाय. खा बाबा, पोटभर खा. तुलेबी इमान पाळा लागते. त्याईचं राखण करा लागते बाबा. खा. पोटभर खा."
             म्हायदूनं चामडं अंगावर घेतलं व तो पुन्हा घरची वाट चालू लागला. 
           म्हायदूला तीन मुली होत्या व एक मुलगा होता. ती लहानाची मोठी होत होती. मोठी मुलगी सहा सात वर्षाची झाली असेल. तशी त्याला तिच्या शिक्षणाची चिंता सतावायला लागली. शिक्षण शिकवायचं. मुलीपासून सुरुवात करायची. परंतु कशी करणार? म्हायदूनं विचार केला की आपण आपल्या लेकीला शाळेत टाकायचं. पण कसं टाकणार? गावात तर विटाळ आहे आणि हा विटाळ पाचवीला पुजलेला आहे. 
         गावात एक शाळा होती. फक्त तिथं उच्चवर्णीय लोकांचीच मुलं शिकत होती. त्या शाळेत अस्पृश्य मुलांना प्रवेश नव्हता व एकही अस्पृश्य मुलगा त्या शाळेत शिकत नव्हता. त्याचं कारण होतं विटाळ. त्या शाळेतही उच्चवर्णीय शिक्षक होता की जो विटाळ करीत होता व अस्पृश्य मुलांना शाळेत प्रवेशच देत नव्हता आणि गावातील अस्पृश्यांना शिक्षण नसल्यानं त्यांना कायदे माहीत नव्हते. 
          म्हायदू विचार करु लागला. लेकीला शाळेत टाकायचं. त्यासाठी आपण तिला बाहेरगावी शाळेत टाकायचं आणि तिला आपल्या बहिणीकडे ठेवायचं. परंतु बहिण ठेवेल काय? हाही प्रश्न होता. शहरात वसतीगृह असतं शिक्षणासाठी. तिथंही ठेवता येतं याचीही त्याला माहीती नव्हती. शेवटी त्यानं विचार केला. आपण शहरात जावून आपल्या बहिणीला तसं विचारावं. 
          म्हायदूचा तो विचार. तसा तो शहरात गेला. तो थेट आपल्या बहिणीच्या घरी गेला. तसा त्याचा मान सन्मान झाला. इकडल्या तिकडल्या गोष्टीही झाल्या. तशी रात्र झाली व जेवनखावण सुरु झालं. तसा तो विचार करु लागला. आपल्या बहिणीला विचारावं की शिक्षणासाठी तिनं आपल्या मुलीला ठेवावं. परंतु त्याची त्याला लाज वाटत होती. कसं विचारावं. हिंमत होत नव्हती. 
          हिंमत होत नव्हती. परंतु हिंमत करुन विचारावंच लागेल असा विचार करुन त्यानं आपल्या बहिणीला जेवन करीत असतांनाच विचारलं, 
         "ताई, शिक्षण हे वाघीणीचं दूध हाये असं बाबासाहेब सांगून गेले. त्यामुळंच मिबी ईचार केला की माह्या पोरीले शिक्षण शिकवावं."
          "शिकव नं बा. कोणं मनाई केली तुले."
          "अवं पण गावात तिले कसा शिकवू?"
           "कावून बा ? गावात शिकवाले का झालं?"
           "ईटाळ हाये नं वं. गावच्या शाळेत नावंच नाय घेत आपलं. तुले माईत नाय का?"
             "हो, मग?"
             "मी यासाठी आलोय. मी ईचार केला का मैनेले तुह्या जोवर ठेवाचं आन् शिकवाचं शयरात."
           ते म्हायदूचे बोल. तशी त्याची बहिण गप्प झाली. तसा म्हायदू चिंतेत पडला. तसा तो म्हणाला, 
           "ताई, तू उत्तर दिलं नाय. अवं मी पैसा देईन शिक्षणाचा अन् खाण्याचाबी. चाहे तं गहाण राहीन. अजून काही."
           "नाय, नाय. तसं कायपण नाय. ठेव माह्याजवळ मैनेले. मलेबी कामात मदत होईन तिची."
          त्याला त्याच्या नातेवाईकानं तशी कल्पना दिली होती व त्याची मुलगी मैनेलाही शिकविण्याची हमी दिली. तसा तो तिच्या शिक्षणाचा विचार करु लागला  होता. 
          ती त्याची बहिणच होती. जिचा विवाह त्याच्या बाबानं गावातीलच एका तरण्याबाज मुलाशी लावून दिला नव्हता. कारण होतं त्याचं प्रेम.
           ती चांभार जात तशी विकसीत जात नव्हतीच. तरीही त्या जातीत आजही विवाह हे जातीतच करायची पद्धत होती. त्यातच त्या लोकांना ते विवाह जातीतच करावे असं बंधन असलं तरी त्यांना प्रेमविवाह मान्य नव्हते. त्यामुळंच की काय? ती मंडळी प्रेमविवाह करीत नसत. परंतु म्हायदूच्या बहिणीने प्रेमविवाह केला व ते प्रेम त्यांना न खपल्यानं त्यांनी तिला स्विकारलं नाही. आता ती शहरात स्थिरावली होती नव्हे तर राहात होती. ती म्हायदूची मोठी बहिण होती. 
         म्हायदूचे वडील आज म्हातारे झाले होते. तरीही त्यांच्यात रग होती. त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलीनं त्यांच्या मरणापर्यंत घरी यायचं नाही व मला तोंडही दाखवायचं नाही. परंतु आज म्हायदूनं विचार केला. आपण आपल्या मुलीला शहरात शिक्षण शिकवायचं. 
          म्हायदू तसा विचार करु लागला. आता त्याचे वडील जीवंत नव्हते.
          'कसं हे गाव. देशाले स्वातंत्र्य मिळालं हाये. आज बरेच दिवस झाले हायेत. तरी गावात आजबी ईटाळ हाये. इथं शाळा तर उघडली हाये. परंतु ना त्या शाळेत अस्पृश्याईले शिक्षण हाये. ना प्रवेश हाये. अशी शाळा कोणत्या कामाची? निव्वळ जातीचा ईटाळ. ना येथील उच्चवर्णीय लोकंही बरोबर शिक्षण शिकत हायेत. तसंच पलीकडील गावात शाळा हायेत. तिथंबी तोच ईटाळ. कोणतीच अस्पृश्य स्री वा पुरुष  शिकवायले आपल्या मुलाले शाळेत पाठवीत नाय. परंतु त्या उच्चवर्णीय लोकांची काही मुलं तरी  शिकतेत. परंतु आमचं? आमचं तं एकबी मुलं शिकू शकत नाय. ती मुलं शिकूच नये असं उच्चवर्णीय लोकांले वाटतं. वाटत असन का ही मुलं शिकली तं उद्या आपल्याला नाकीनऊ आणतीन. ईटाळ दूर करतीन. सारे पिढीजात धंदे सोडतीन. मग आपल्या घरचे मेलेले गाईढोरं कोण ओढणार? असंच वाटत असन त्याईले. त्या शिकलेल्या लोकांले संविधानानुसार महत्व समजलं असन. परंतु ते महत्व अंमलात आणत नाय. कारण त्याईले या गावात ईटाळ कायम ठेवायचा असन हे नाकारता येत नाय. परंतु नाय. आपण आपल्या सर्व मुलांले शिकवायचं. त्यासाठी काहीबी करावं लागलं तरी चालन.'
            म्हायदूचा तो विचार. त्यानं आपल्या मनात मुलांना शिकविण्याचा विचार केला. तसं त्याच्या बहिणीने होकार देताच त्याला मनातल्या मनात अतिशय आनंद झाला व तो दुसऱ्याच दिवशी गावाला येवून आपल्या मुलीच्या शिक्षणाची तयारी करुन लागला.
          शाळेचे दिवस सुरु झाले होते. मैनेला म्हायदूनं शाळेत टाकलं होतं. तो काबाडकष्ट करीत होता आणि आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी पै पैसा पाठवीत होता आपल्या बहिणीला. त्याला वाटत होतं की त्याची मुलगी मैना शिकावी व तिनं संपुर्ण गावातील विटाळ दूर करावा. 
           मैनेला म्हायदू शहरात शिकवतोय. ही गोष्ट वाऱ्यासारखी संपुर्ण बिरादरीत पोहोचली. त्यातच बिरादरीतील काही लोकं म्हायदूच्या घरी आली. तशी त्याला सुचनावत बोलली, 
           "म्हायदू, कायले टाकलं बा पोरीले शाळेत? तू शिकवशील तरी कसा? आरं, पोरीले आपल्या जातीत कोणी शिकवतेत का रे बाबा? अन् हे जर त्या उच्चवर्णीयाईले माईत झालं तं आपली नामुष्की नाय का होणार. आपल्याले ते मदत करतीन का? तसं पायता आपलं जीवनच त्याईच्या भीकेवर अवलंबून हाय. अन् तुही पोरगी शिकून काय कलेक्टर होणार हाये का?"
           "का बरं शिकवू नोको पोरीले. कवापर्यंत आपण असंच राहाचं या उच्चवर्णीयांची उबरं घासत. अहो, ईचार करा की बाबासाहेब शिकलेच नसते तं आज संविधान तरी लेहलं असतं का त्याईनं. अन् त्या संविधानानुसार देश चालतं असते आजही. अन् आपण त्याच ईटाळाच्या अंधकारात आजही खितपतच पडलेले हाओत. ईचार करा. आपण आपलं धाडस केलंच नाई ना. तं आपण तसंच राहू. आपल्यात कोणतीच सामाजीक क्रांती होणार नाय. कदाचीत बाबासाहेबांना तरी आठवा."
         म्हायदूवर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. तसा प्रभाव इतर बिरादरीतील माणसांवर नव्हताच. त्यांना वाटत होतं की आपल्याला याच गावात राहायचं आहे. आपलं पोटपाणी देखील याच गावावर अवलंबून आहे. जर आपण या गावच्या विरोधात गेलो आणि आपल्याच मतानं वागत गेलो तर या गावची मंडळी आपल्याला वाळीत टाकतील व आपण आपलं पोट भरु शकणार नाही व आपल्याला आपल्या परीवारासह उपासानं मरावं लागेल.      
           त्यांचं म्हणणंही बरोबर होतं. कारण तो एक इतिहास होता. जेव्हा बाबासाहेब क्रांती करीत होते. त्यांनी चवदार तळ्याचं आंदोलन केले होतं. तेव्हा त्या आंदोलनात याच गावातील एक संपत नावाचा चांभार सक्रियेतेनं सहभागी झाला होता. परंतु तो जेव्हा परत गावात आला. तेव्हा याच गावानं त्याला वाळीत टाकलं होतं. त्याची रसद बंद केली होती व त्यातच त्याचा संपुर्ण परिवार मरण पावला होता. तो इतिहास होता त्या गावातील अस्पृश्यांचा. त्यामुळंच आज गावाला भीती वाटणं साहजीकच होतं. 
           म्हायदूनं आपली मुलगी शहरात शिक्षण शिकायला टाकली. तसं पाहता ती बातमी जशी बिरादरीतील लोकांना माहीत झाली. तशीच ती बातमी त्या उच्चवर्णीय माणसांनाही माहीत झाली व एक दिवस त्यांनी संगनमत करुन आपला मोर्चा बिरादरीतील म्हायदूच्या घरी वळवला. ते म्हायदूच्या घरी आले. तसे ते दुरुन दिसताच म्हायदू घाबरला. परंतु त्यावर धाडस दाखविण्यासाठी हिंमत धरुन तो स्तब्ध व शांत होता. त्यातच तो विचार करु लागला. बाबासाहेब चवदार तळ्याच्या आंदोलनादरम्यान घाबरुन गेलेले नसावेतच. आपणही हिंमतीनं उभं राहावं. घाबरुन जावू नये. 
          तो उच्चवर्णीयांचा दुरुन दिसलेला मोर्चा. मजल दरमजल करीत तो मोर्चा म्हायदूच्या घरी आला. तसा थोडा दूरच तो मोर्चा उभा राहिला. तसा त्यातील एकजण म्हणाला, 
          "म्हायदू, म्या ऐकलंय का तू आपल्या लेकीले शयरातल्या शाळेत शिकवते म्हणून. गोष्ट खरी हाय का?"
            "होय जी. खरी हाय गोष्ट."
            "कोणं सांगीतलं शिकवाले? ईचारलं का आमाले काई?"
            "शिक्षणासाठी कोणाच्या परवानगीची गरज तरी रायते का जी. असंन तं सांगा बाप्पा."
             "अरे पण आपल्या गावच्या शाळेत बिरादरीतील मुलं शिकतेत तरी का? त्याईले परवेश देतेत तरी का आपले गुरुजी. अन् ते बी पोरीले परवेश हाये तरी का?"
          "म्हणूनच मी शयरातल्या शाळेत टाकलं शिकवाले पोरीले."
            "पण म्हायदू, ईचार कर. अरे,  तुले माईत नाय का की आमी तुह्यं काय करु शकतो, तू जर शिकवलं तर पोरीले."
              "करा नं बाप्पा, तुमाले कोणं अडवलं?"
              "हे पाय. जास्तचं बोलू नगं.  नायतं."
              "नायतं. नायतं का करान जी.?
              "आमी तुले वाळीत टाकू. गावात राऊच देणार नाय. समजलं का?"
              "हा गाव काय तुमच्या बा चा हाये की काय?" म्हायदू म्हणाला. 
              ते म्हायदूचे धारदार शब्द. ते शब्द त्याच्या हिंमतीतून निघाले होते. त्याच्या शब्दांना बाबासाहेबाच्या विचारानं हिंमत दिली होती. तसे ते शब्द त्या उच्चवर्णीयांच्या मनाला चिरुन गेले व त्यातील एकजण म्हणाला, 
          "म्हायदू, जरा तोंड सांभाळून बोल. आम्ही तुले दहा दिसाची मोहोलत देतो. दहा दिसात तुले जे काय कराचं ते कर. मंग आमी बी आयकणार नाय. "
           गावकरी दम देवून गेले. परंतु म्हायदू आपल्या निर्णयावर ठाम होता. तो टसमस झाला नाही. असेच दहा दिवस निघून गेले. 
            दहा दिवस झाले तरी म्हायदूनं आपला विचार बदलवला नाही असा विचार करुन म्हायदूच्या घरी पुन्हा एक दिवस गावकऱ्यांचा मोर्चा आला. त्यातील एकजण म्हणाला, 
           "म्हायदू, तुले सांगीतलं होतं न रे बापू. का आपल्या पोरीले शिकवाचं नाय म्हणून. काय झालं त्याचं. तिले आणलं का शाळेतून?"
            "नाय. नाय आणलं शाळेतून. अन् आणणार बी नाय."
            "तू कावून असा वागतेस. आमाले बी समजत नाय. अरे गावाचं भलं नाय वाटत का तुले?"
              "गावाच्या भल्याचा अन् माह्या पोरीच्या शिक्षणाचा यात कोणता संबंध. अन् त्यातबी म्हाई पोरगी गावच्या शाळेत शिकत नाई. अन् मी काढणार बी नाय माह्या पोरीले शाळेतून."
            "लय माजला वाटते. तुले कोळपा लागते."
            "तुमी हात लावून पाहा."
            "मंग का करशीन. करशीन का तू."
            "अहो, निदान संविधानाची तरी लाज बाळगा. संविधानात असं कोठं लेवलं हाय. का पोरीले शिकवाचा अधिकार नाय म्हणून."
            "लयच तिरीक तिरीक करुन राह्यगा भाऊ. तुही वरातच काढा लागते वाटते."
             त्या व्यक्तीचं तसं बोलणं. त्या बोलण्यातून फारच जोराचा वाद त्या दोघात झाला व त्यातून मारहाणही झाली व म्हायदूचं रक्तही निघालं. त्यातच गावानं त्याला दम दिला की जर त्यानं मैनेला शाळेतून काढलं नाही तर त्याचा जीवही घेतला जाईल. असं म्हणत अख्खं गाव तेथून दमदाटी करुन निघून गेलं. 
         गावात विटाळाचा विळखा. म्हायदूला सर्व गोष्टी बऱ्या वाटत होत्या. परंतु तो विटाळ बरा वाटत नव्हता. त्यातच त्या विटाळात जगणंही बरोबर वाटत नव्हतं. ते विटाळाचं जगणं त्याला अगदी वैतागून टाकत होतं. आज बरं झालं होतं की त्याचा जीव गेला नव्हता. तो वाचला होता. परंतु आज जर पावलं उचलली नाहीत तर उद्या आपला जीव नक्कीच जाईल असं त्याला वाटत होतं. त्या गावकऱ्यांना गप्प बसवणं आवश्यक होतं. त्यांना चूप बसविण्यासाठी त्याच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे मैनेला शाळा न शिकवणं अर्थात तिला शाळेतून काढणं व दुसरा उपाय म्हणजे त्या गावकऱ्यांची तक्रार पोलिस स्टेशनला करणं. त्यातच पोलिस स्टेशनला तक्रार करताच अख्खं गाव त्याला वाळीत टाकणार होतं. तसा म्हायदूही जिद्दी होताच. तो विचार करु लागला की जर आपण मैनेला शाळेतून काढून घेतलं तर मैनेची इच्छा मोडेल. तसं पाहता ती निरागस बाळ. तिला शिक्षण म्हणजे काय? हे आज तरी माहीत नाही. परंतु उद्या जेव्हा तसं तिला माहीत होईल, तेव्हा ती मलाच दोष देईल. गावाला नाही आणि त्यानं मलाच फक्त फरक पडेल. गावाला काहीही व कोणताही फरक पडणार नाही. काय करावं. तो विचार करु लागला. 
           म्हायदूचा तो विचार. विचारांती त्याला समजलं की आपण मैनेला शिकवावं. उच्च शिक्षण शिकू द्यावं. तिच्या शिक्षणात खंड पडू नये. 
            म्हायदूनं मनातून निर्णय घेतला की मैनेला शिकवावं. परंतु गावाचा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. गाव चूप बसेल काय? तसं पाहता गावानं तर त्याला दमदाटी दिली होती. ते गाव म्हणून गेलं होतं की जर त्यानं मैनेला शाळेतून काढलं नाही. तर ते गाव पुढच्या वेळेस त्याचा जीवही घ्यायला मागंपुढं पाहणार नाही. काय करावं. तो परत विचार करु लागला. तसा त्याच्या मनात पुन्हा विचार आकार घेवू लागले. एक वेगळाच विचार चमकून गेला. एक विचार सांगत होता की त्याची तक्रार पोलिसात करावी तर दुसरा विचार सांगत होता की तशी तक्रार पोलिसात केल्यास गाव आपल्याला वाळीत टाकेल. त्याचबरोबर समाजही. काय करावं. शेवटी निर्णय घेतला. आपण पोलिस स्टेशनला जावं व झालेल्या प्रकरणावरुन आपण तशी तक्रार पोलिसात करावी. मग जे होईल, ते पाहिल्या जाईल.
            म्हायदूनं तसा विचार केला व तो पोलिस ठाण्यात गेला. त्यानं पोलिसात तक्रार नोंदवली. तशी तक्रारीची दखल घेण्यात आली व अख्ख्या गावाला जाब विचारण्यात आला. बरं वागलं म्हणून पोलिसांनी गावाला कैदेत टाकलं नाही. पोलिसांनीही गावाला दमदाटी दिली व सोडून दिलं. 

*******************************************

          म्हायदू पोलिसात जाईल व आपल्यावर अशी नामुष्कीची वेळ आणेल असं गावाला वाटलं नव्हतं. परंतु म्हायदू पोलिस ठाण्यात गेला होता व त्यानं तक्रार दाखल केली होती. ते पाहून गाव तसं म्हायदूबाबत चूप तर बसलं. परंतु आता गावानं ठरवलं. आपण म्हायदूला गावाची मदत होवू द्यायची नाही. आपण म्हायदूला धडा शिकवावा. त्यासाठी अख्खं गावच नाहीतर अख्ख्या समाजाकडून म्हायदूला काहीच मदत होणार नाही असं काहीतरी करावं. याचाच अर्थ असा की म्हायदूला आपण वाळीत टाकावं व त्याला त्याच्या समाजाकडूनही वाळीत टाकायला लावावं. जर समाज त्यांना वाळीत टाकणार नसेल तर आपण त्याच्या समाजालाही वाळीत टाकावं. प्रसंगी आपल्याला एखाद्यावेळी त्या समाजाची मदत लागलीच तर ती मदत शेजारच्या गावातून मिळवावी. 
          गावाचा तो विचार. तसा विचार होताच गावानं चांभार समाजातील दोन चार लोकांना सोबतीला बोलावलं. त्यांनाही दमदाटी दिली की म्हायदूला त्यांनी कोणत्याही स्वरुपाची मदत देवू नये. जर अशी मदत त्यांनी म्हायदूला दिलीच तर त्यांनाही गाव कोणत्याही स्वरुपाची मदत देणार नाही. त्यांनाही गाव वाळीत टाकेल. 
          गावानं बिरादरीतील लोकांना दिलेली दमदाटी. त्यांनी बिरादरीतील लोकांना मदत न करण्याची व वाळीत टाकण्याची तशी दिलेली धमकी. त्यामुळंच बिरादरीतील लोकं घाबरले व त्या अख्ख्या बिरादरीतील लोकांनी ठरवलं की आता म्हायदूला वाळीत टाकायचं व त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करायची नाही. 
         बिरादरीतील लोकांना गावाची तशी मदत होती. अख्खी बिरादरी गावाच्या उपकारावर आजपर्यंत जगत आली होती. गावात कोणाचं बाळंतपण असेल तर बिरादरीतील लोकांना बोलावणं यायचं. कधी शेतीतील हंगामाच्या काळात गावात मजूर न मिळाल्यास शेतीतील पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून गावातील लोकं या बिरादरीतील लोकांना कामावर नेत. कधी त्यांच्याकडून पादत्राणे घेत तर कधी त्यांच्याकडून झाडू व टोपल्याही घेत. बदल्यात त्यांना धान्य देत व त्यावर जगत होती ही बिरादरीतील माणसं. आज तीच माणसं जरी विटाळाच्या काळचक्रानं गावकुसाबाहेर राहात असली तरी गावाच्या या होणाऱ्या उपकाराच्या ओझ्याखाली ती दबली होती. त्यामुळंच की काय अख्ख्या गावानं म्हायदूला वाळीत टाकलं होतं व त्याचेशी व्यवहार करणे सोडा, साधं बोलणंही गावानंच नाही तरी बिरादरीतील लोकांनीही बंद केलं होतं. 

********************************************

          विटाळ चरणसीमेवर होता. विटाळाचा विषारी विळखा असा अस्पृश्यांवर कसला जात होता. स्वातंत्र्य देशाला मिळालं असलं तरी गावाला मिळालं नव्हतं असंच वाटत होतं. कारण गावातील लोकं त्या गावात तसे वागतच होते. 
          आज गावानं म्हायदूवर शिकंजा कसला होता व त्याला वाळीत टाकलं होतं. त्यामुळं आज त्याच्यासमोर चिंता पडली होती की आपला जीव कसा पोषावा व आपला परीवार कसा पोषावा. याच धोरणानुसार त्याचेवर आज परिस्थिती उद्भवली होती. 
           अख्खी बिरादरी आज त्याचेवर नाराज होती. तसं पाहता त्या बिरादरीतील लोकांनाही गावाचा त्रासच होता. तरीही ती बिरादरी म्हायदूचं काही एक ऐकत नव्हती. आज तीच बिरादरी त्याच्या विरोधात होती. 
           म्हायदूसमोर प्रश्न निर्माण झाला होता पोटाचा, तरी तो हिंमत हारला नाही. तो हिंमतीनं व नेटानं गावालगत राहू लागला. गाव व बिरादरीतील लोकं त्याला मदत करीत नव्हती. ना त्याला ते गाव कामासाठी बोलवत असे. ना त्याच्याकडून कोणत्याच वस्तू विकत घेत असे. ना त्याचेशी बोलत असे. 
          गाव व बिरादरीतील लोकांचा असा व्यवहार पाहून म्हायदू परगावातील लोकांना आपलं समजू लागला व तो गावोगावी फिरुन त्यानं बनविलेल्या वस्तू विकत देवू लागला व आपला तसेच आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह चालवू लागला. 

********************************************

           मैना आपल्या आत्याच्या घरी शिकू लागली होती. ती लहान होती. तरीही तिच्याकडून तिची आत्या संबंध घरची कामं करुन घेत असे. तिला फारच त्रास देत असे. 
           मैना आपल्या आत्याच्या घरी अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात मोठमोठी कामं करीत होती. तरीही तिची आत्या तिला काहीही म्हणत होती. तशीच ती आत्या मेहताना म्हणून आपल्या भावाकडून धान्यही घेत होती. 
           म्हायदूसमोर नेहमीच प्रश्न पडायचा की मैनेला खर्च तरी कसा पुरवायचा. कारण एकतर त्याला गावानं वाळीत टाकलेलं. शिवाय मैनेचाही खर्च ठरलेला. त्यातच घरी बायकापोरांचाही खर्च. सर्व त्रेधातिरपीट उडत होती म्हायदूची. काय करावं सुचत नव्हतं. अशातच म्हायदूच्या दुसऱ्या मुलीचं शिक्षण आलं. परंतु दुसऱ्या मुलीचा शिक्षणाचा तिढा लवकर सुटला. त्याचं कारण होतं तालुक्याची शाळा. 
         तालुक्याच्या शाळेत आश्रमशाळा होती व त्या आश्रमशाळेत मुली हव्याच होत्या शिक्षणासाठी. अशातच म्हायदूनं आपल्या दोन्ही मुली तालुक्याच्या ठिकाणी आश्रमशाळेत टाकल्या. मात्र मुलाचं शिक्षणाचं वय व्हायचं होतं. त्यामुळं मुलाचं शाळेत नाव दाखल करण्यासाठी तो थांबला होता. 
          काही दिवस असेच गेले. एक दिवस म्हायदू बहिणीच्या घरी गेला. त्यानं पाहिलं की बहिण झोपली आहे व लहानगी मैना बाहेर कपडे धुत आहे. भांडेही तिच्यासमोर आ वासून पडलेली आहेत. तसं बापाला पाहताच मैनेच्या डोळ्यातून अश्रू टपकले. मैना रडायला लागली. ते पाहून म्हायदू तिला विचारु लागला,
          "काय झालं? अशी रडतेय का?"
          मैनेला म्हायदूनं विचारलेला प्रश्न. तशी मैना भितभीतच पोपटासारखी सगळा त्रास सांगू लागली. तोच म्हायदूलाही वाईट वाटायला लागलं होतं. त्यातच म्हायदू मैनेला म्हणाला, 
          "मैने, फक्त दोनचार महिने थांब. मग तू होस्टेलमध्ये शिकशीन. तुले हितं राहूच देणार नाय."
          म्हायदूनं असं म्हणत मैनेचे डोळे पुसले. त्यानंतर त्यानं आपल्या बहिणीला आवाज दिला. तशी त्याची बहिण उठली. उठताबरोबर विचारु लागली. 
          "केव्हा आलासा?"
          "बस आताच." म्हायदू म्हणाला.
           बहिण उठून बसली होती. तेव्हापर्यंत मैनेचे कपडे धुवून व भांडीकुंडी घासून झाली होती. त्यामुळं तक्रारीची संधीही नव्हती. अन् म्हायदू विचार करीत होता की जर त्यानं त्याबद्दलची तक्रार बहिणीला केल्यास बहिण आताच आपल्या मुलीला घरातून घेवून जा म्हणेल व हाकलून लावेल. त्यानं आपल्याच मुलीच्या शिक्षणाची तारांबळ उडेल. 
           तो लाचार होता. त्याच्यावर अख्ख्या गावाचाच नाही तर बिरादरीतील माणसांचाही अत्याचार सुरु होता व त्याच्या मुलीवर त्याच्या बहिणीचा की जी त्याची मुलगी जास्त वयाची नव्हती. तसं म्हायदू विचार करून चूप बसला. 
           म्हायदू चूप बसला खरा. परंतु आपल्या मुलीवर होत असलेल्या अत्याचारानं त्याच्या मनात त्याच्या बहिणीबद्दल असुया निर्माण झाली होती. ती नात्यातील होती. परंतु तिच्या वागण्यानं एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता. परंतु लाचारीनं व मजबुरीनं तो ते सगळं सहन करीत होता.  म्हायदू आपल्या मुलीच्या खानावळीचे पैसे आपल्या बहिणीला देतच होता. तरीही हा अत्याचार. त्याला ती कल्पना  सहन होत नव्हती. 
             म्हायदू त्या दिवशी आपल्या बहिणीकडे राहिला. त्या दिवशी मात्र त्याच्या बहिणीनं त्याच्यासमोर जास्त त्याच्या मुलीला काम करु दिलं नाही. तिच्या वागण्यावरून दिसून येत होतं की तिला ती जास्त त्रास देत नाही तर ती तिची फार काळजी घेत असते. परंतु म्हायदूनं जे पाहिलं होतं. त्यावरुन म्हायदू समजून गेला होता की आपल्या बहिणीचे खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे वेगळे आहेत. 
           दुसरा दिवस उजळला. तसा म्हायदू सकाळीच उठला. त्यानं चहापाणी घेतला व त्यानं आपल्या बहिणीला काही पैसे दिले व त्यानं आपल्या बहिणीचा निरोप घेतला. तसा तो निघाला. परंतु रस्त्यातून जातांना त्याच्या मनात विचार आला. 
          'साली जातीची अन् रक्ताची माणसं. परंतु तेबी अत्याचार करतेत आपल्यावर. आपल्यावरच नाय तं आपल्या परीवारावरबी. माह्या परीवारानं तरी यांचं काय बिघडवलं हाये. अन् ते बिरादरी......त्या बिरादरीले हेबी माईत हाये का आपल्या बिरादरीतील लोकांवर हे उच्चवर्णीय माणसं अत्याचार करतेत. तरीबी ते आपल्याले मदत करण्याऐवजी आपल्याले मदत करीत नाय. उलट आपल्याले त्याईनं वाळीत टाकलं हाये. गावानं तं मदत देणं दूर. कारण गाव ना नात्यातलं हाये ना जातीतलं. हं, गावाच्या गरजा आमी भागवतो, म्हणून गाव आमाले मदत करते. जर गावाची गरज आमीबी भागवली नसती तं गावानंबी आमाले मदत केली नसती. परंतु ही आमच्या बिरादरीतील माणसं........ कुठून ना कुठून रक्तसंबंधानं नात्यातच हायेत नं. तरीबी ती अशी वागत हायेत माह्याशीन. अन् ते माह्यी बहिण....... ते तं जवळच्या नात्यातील असून ते त्या माह्या मैनेचा...... कोवळ्या जीवाचीबी दया घेत नाय. हे जणू माह्या प्रारब्धातच लेहलं असावं असं वाटतंय. माह्यं प्रारब्धच लय वाईट. जणू माह्यी परिस्थितीच. परंतु हेबी दिवसं निघून जातीन असं वाटतं. बरं झालं मले गावानं वाळीत टाकलं असता दुसऱ्या गावानं सावरलं. जर त्याबी गावांनं माह्या बनविलेल्या वस्तू घेतल्या नसत्या तं आज माह्यावर व माह्या परीवारावर उपाशी मरायची पाळी आली असती. तसं पाहता गावाच्या आजुबाजूलेबी जास्त जनावरं मरत नाय.'
           मनात विचार करीत व मनाचा मनस्ताप वाढवीत म्हायदू घरी आला. त्यानं खांद्यावरचं उपरणं काढून बाजूला ठेवलं. हातपाय धुतले व तो खाटेवर बसला. मनात त्याच्या धीरगंभीरपणा होता. चेहरा काळवंडलेला होता. तशी त्याची पत्नी सुभद्रा म्हणाली, 
            "काय झालंया. असा संताप का?"
            "काय नाय." म्हायदू म्हणाला. 
           "नाय नाय. कायतरी कारण नक्कीच हाय. बोला, काय झालं? निदान मले तरी सांगा. मी तुमची धर्मपत्नी हाय."
           "आयकाचं हाये तुले. तं आईक. ते माह्यी बहिण आपल्या बाळीले मैनेले लय तरास देते. म्या सोता पावून आलो."
            "तरास म्हणजे?"
            "अवं, तिले समदे कामं कराले लावते."
           "अं त्यात काय बिघडलं? अवं आपली मैना एक स्रीची जात हाय. केली बायाची कामं तं का झालं? आपलीच लेक हुशार होईन."
           "मैने, तू तिची बाजू घेवून बोलू नगं. मले माईतच हाय का माह्यी बहिण कशी हाय ते."
            "अं जावू द्या नं वं. आपल्या पोरीले ठेवलं शिक्षणासाठी. तेच तं भरपूर हाय. तुमी शांत व्हा बरं."
            "कसा शांत होवू? शुभे, सांग मी तरी कसा शांत होवू."
            "आतं आणखी काय शिल्लक हाये?"
           "काय म्हणजे? अवं मी माह्या या उघड्या डोयानं पाहून आलो का माह्यी बहिण झोपली होती घरात आन् माह्यी लेक......."  त्यानं एक आवंढा गिळला. तसा तो म्हणाला. 
           "माह्यी लेक कामं करत होती बाहेर. भांडे अन् कपडे धुवत होती. ढेर सारा ढीग पडला होता. तुले मी का सांगू. मले ते पाहूनशान लयच बेकार वाटलं."
            "अं, जावू द्या नं धनी. जिथं आपल्यावर प्रारब्धच रुसलं. त्यात ही नात्यातील माणसं. ती रुसणारच की हो.  जावू द्या. त्यात असं का वाईट वाटून घ्यायचं. हातपाय धुवा. लयच दमले हात. मी गरम गरम भाकर टाकते. पिठलं बनवलं हाय. जरा दोन चार घास पोटात कोंबून तरी टाका. पावू. पुढं काय कराचं ते. परंतु आतापासूनच सोताच्या जीवाचा संताप करुन घेवू नोका." सुभद्रा म्हणाली. 
            म्हायदूच्या मनात चीड निर्माण झाली होती. तो परिस्थितीशी लढत होता. त्याला आता त्या गावात राहावसं वाटत नव्हतं.
            परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीशी लढता लढता त्याला नाकीनऊ येत असलं तरी त्याला लढणं भाग होतं. तो लढत होता. 
            थोड्या वेळाचा अवकाश. म्हायदूनं परत हातपाय धुतले व तो जेवायला बसला. तेव्हा त्याच्या पुढ्यात सुभद्रा प्रेमानं भात व पिठलं वाढत होती. ते खावून तो तृप्त होत होता. 

*******************************************

          ते पावसाळ्याचे दिवस होते. तसा कोणताही व्यक्ती कामासाठी घराच्या बाहेर पडत नव्हता. म्हायदूला तर गावानं वाळीतच टाकलं होतं. अशातच कॉलराची साथ आली होती व ती साथ लोकांना नेस्तनाबूत करीत होती. लॉकडाऊन लागलं होतं व कोणताही व्यक्ती घराच्या बाहेर पडत नव्हता. अशातच तो पावसाळा. कोणताही व्यक्ती कुणाच्याही घरी जात नव्हता. येतही नव्हता. कॉलरा आपल्यालाही छळेल व आपणही मरुन जावू असं गावकऱ्यांना वाटत होतं. त्यातच बिरादरीतील लोकांनाही अगदी तसंच वाटत होतं. बिरादरीतील माणसंही घाबरतच होती. 
          आजारानं जनावरांनाही सोडलं नव्हतं. पशूपक्षी सारखी मरत होती. त्यातच घरातल्या पाळीव प्राण्यांना तोंडखुऱ्या नावाचा रोग आला होता. प्राण्यांनाही या कॉलऱ्याच्या साथीत कोणीही हात लावायला तयार नव्हतं. त्यातच ते पावसाळ्याचे दिवस. तसं पाहता बिरादरीतील माणसंही त्या जनावरांना हात लावायला धजत नव्हते. कारण या साथीत लोकं पटापट मरत असत. अशातच एका पाटलाच्या घरचा एक बैल तोंडखुऱ्या आजारानं मरण पावला. त्यातच पाटलाच्या घरच्या त्या व्यक्तीनं त्या जनावराची विल्हेवाट लावण्यासाठी बिरादरीतील प्रत्येक लोकांना आवाज दिला. परंतु ना त्यांनी घराचा दरवाजा उघडला ना काही हरकत केली. ते पाहून पाटलाच्या घरचा तो एक व्यक्ती म्हायदूच्या घरी त्याला बोलवायला आला. तो आवाज देवू लागला.
           ''म्हायदू म्हायदू.''
            तो आवाज. आजपर्यंत बरेच दिवस झाले होते. तसा कोणीच आवाज त्याला दिला नव्हता. आज अचानक आवाज आला. तसा म्हायदू चक्रावला. विचार करु लागला. कोण असावा. तसा त्यानं हळूच घराचा तुटका फुटका दरवाजा उघडला व त्या दरवाज्यातून त्यानं आवाज दिला. 
           "कोण हाय?"
           "म्या.....म्या गणपत."
            "गणपत? कोण गणपत?"
            "त्या शिवराम पाटलाचा गडी माणूस."
             "बोल. काय काम हाये?"
             "पाटलाच्या घरचं जनावर मेलंय. ते फेकायचं हाये."
             "जनावर! ते बी पाटलाच्या घरचं! फेकायसाठी बोलावलंय."
             म्हायदू विचार करु लागला. 
             'आजपर्यंत तोच पाटील आपल्याशी एक शब्ददेखील बोलत नोयता अन् आज काम पडलं तर माह्याकडं आला. आज सांगून टाकावं का म्या नाय येत म्हणून.' 
          म्हायदूनं तसा विचार केला व तसा विचार करुन तो म्हणाला. 
          "नगं बाबा. म्या नाय येवू शकत पाटलाच्या येतचं जनावर फेकाले. पाटलाले ईटाळ होते. ईटाळ आमचा बी होते आन् आमच्या शिक्षणाचाबी. आमची पोरं शिकलेली चालत नाय पाटलाले. तू जा. आन् जावून सांग आपल्या पाटलाले का ते जनावर तूच फेक म्हणावं. म्या नाय फेकत. नायतं दुसरा गावातला पावून घे म्हणावं."
           म्हायदू जे बोलायचं ते बोलून गेला. त्यानंतर म्हायदूनं आपला दरवाजा लावला. तसा तो गडी माणूस त्याच्या घरुन निघून गेला. 
          गडी माणूस निघून गेला. त्यानं पाटलाला घडलेली सर्व हकीकत सांगीतली व बिरादरीतील लोकांनीही काय उत्तर दिलं तेही सांगीतलं. तसा पाटलाच्या मनात विचार आला. पाटील विचार करु लागला. 
           "म्हायदू गावातील एक सज्जन माणूस. तो कोणाच्याबी मदतीले धावून यायचा. परंतु आपलंच चुकलं. आपण त्याले वाळीत टाकलं. आपण तसं कराले नोको होतं. परंतु आपला अहंपणा. आपला अहंपणाच आपल्याले नडलाय आज. आपणच ईटाळ ईटाळ करीत बसलो. आज स्वातंत्र्य मिळून दहा वर्ष झाली तरी आपण सुधारलो नाय. आपण त्याईले लयच त्रास देला. अन् आता.......आता पश्चातापाची वेळ आली हाये. आता कोणीच आलं नाय आपल्या मदतीले. कोणी यालेबी तयार नाय. काय चुकलं त्याचं? तो तं आपल्या मुलीले शिक्षण देवू पाहात हाये. शिक्षणाची आस त्याच्याही मनात निर्माण झाली हाये. आपण जशी आपली मुलं शिकवतो तशी. का? त्यानं आपली मुलगी शिकवू नये काय? शिकवायले हवी नाय का?"
           म्हायदू हा गावातील असा व्यक्ती होता की जो गावातील लोकांच्या प्रत्येकाच्या कामात यायचा. परंतु विटाळाच्या कालचक्रानं व त्याला वाळीत टाकलं गेल्यानं तो आता जबर झाला होता व त्यालाही वाटत होतं की आपण या स्पृश्यांनाही धडा शिकवायला हवा. त्यामुळंच तो तसे वागला होता. 
           पाटीलच तो. त्या पाटलानं शेवटी विचार केला. विचार केला की आपण म्हायदूला समाजात मिळवावं. त्याच्या मुलीलाही शिक्षणाची परवानगी द्यावी. गावातील त्याच्याशी वागण्यात बदल करावा. विटाळात नाही. जर विटाळात बदल केला तर ही माणसं उद्या चालून आपलं काही एक ऐकणार नाहीत. शेवटी असा विचार करुन त्यानं ठरवलं. आज आपण म्हायदूकडेच जावं. त्याच्याकडे विनवणी करावी. अन् त्याला माफीही मागावी. म्हणावं की म्हायदू आमची चूक पदरात घे. पाहू. म्हायदू समजतो की नाही ते. 
          शिवराम पाटलाने तसा विचार केला व त्यानं ठरवल्यानंतर तो म्हायदूच्या घरी आला. बाहेरच दूर उभा राहून तो म्हायदूला आवाज देवू लागला. 'म्हायदू म्हायदू'
            शिवराम पाटलाचा तो आवाज. तो आवाज ऐकताक्षणी म्हायदूनं आपला दरवाजा उघडला. पाहतो काय, म्हायदूसमोर पाटील हात जोडून उभा होता. तसा म्हायदू चिंतेतच बोलला. 
          "पाटीलसाहेब,  आपण सोता अन् ते बी माह्या दरवाजात."
          "होय म्हायदू. मलेच यावं लागलं. हवं तं मले माफ कर. तसाबी म्या तुहा गुन्हेगार हाये. पण काय करु. म्याबी बंधनात हाये म्हायदू. बंधन हाये माह्यावर गावकऱ्यांचं. पण मले माफ कर म्हायदू अन् चाल माह्या घरी. माह्य जितरुब फेकून दे. तू जर ते फेकलं नाय ना. तं मोठं संकट कोसळल. साऱ्या गावात हैजा फैलन. अन् मंग गावातले एकेक मरतीन. पुरं गाव समाप्त होईन म्हायदू. माह्यासाठी नायतं गावाच्या भल्यासाठी तरी चाल. एवढी हात जोडून ईनंती हाये म्हायदू तुले."
         पाटलानं हात जोडले. तसा म्हायदू विचार करु लागला. विचार करु लागला की आपण या पाटलाला माफी द्यायला हवी. पाटील पश्चातापाच्या अग्नीत जळतो आहे. परंतु आपण त्या पाटलांकडून एक गोष्ट कबूल करवून घ्यावी की तो माझ्या मुलीच्या शिक्षणात व्यत्यय आणणार नाही. तसा विचार करताच म्हायदू म्हणाला, 
         "पाटीलसाहेब, म्या तुमाले माफ करतो जी. परंतु तुमी आमाले माफ कराले हवं अन् माह्या समद्या पोरीयच्या शिक्षणात तुमा गाववाल्याईची अडचण याले नोको."
          "ठीक हाये. तसंच होईन."
          "तसं नाय पाटीलसाहेब. तुमच्यावर माह्या ईश्वास नाय. मले तुम्ही तसं वचन द्यावं. मंगच येईन. म्या."  म्हायदू म्हणाला.
         "बरं बरं म्या वचन देतो की म्या तुले अतिशय सन्मानानं वागवेन. आतं तं झालं नं."
           "तरीबी मा तुमच्यावर ईश्वास नाय पाटीलसाहेब. तुमी माह्यासोबत बरंच काही केलं. परंतु काय करु. मलेबी गावातच राहा लागते म्हणून येतो."
            म्हायदूचं ते बोलणं. त्यावर पाटील खजील होत होता. परंतु तो तरी काय करणार, त्याचेजवळ आज तरी उपाय नव्हता. त्याला चूप राहाणं भाग होतं. तसंच म्हायदूवर बेतले होतं, त्यामुळंच तो पाटलाला खडे बोल बोलत होता. थोड्या वेळाचा अवकाश. म्हायदूनं मनोमन विधात्याला हात जोडले. म्हटलं की हे ईश्वरा, माझा तुच साथीदार आहे. मला पैशाची फार गरज आहे. म्हणूनच मी जात आहे. माझं रक्षण कर. असं म्हणत त्या भरल्या पावसात म्हायदू पाटलाच्या घरी निघाला. कारण पोटाचा प्रश्न त्याच्यासमोर होताच. 
          पाऊस जोरदार येत होता. त्याचे टपोरे थेंब अंगावर झोंबत होते. पाटील छत्री घेवून होता. परंतु विटाळाच्या पाचवीला त्यानं म्हायदूला छत्रीत येवू दिलं नाही. तसाच तो पावसात भिजत भिजत तो गावात जाणारी ती वाट चालत होता. तसे मनात असंख्य विचार होतेच. 
          शिवराम पाटील एक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्याच्या मनात विटाळ कुटकूट भरला होता. तो गावातील एक श्रीमंत गृहस्थही होता. त्याला वाटत होते की गावातील कोणीही त्याचेपेक्षा पुढं जावून नये. ना शिक्षणात ना पैशात ना कोणत्या गोष्टीत. त्याला वाटत होतं की पैशानं सारं मिळतं. विकत घेता येतं. असा त्याचा जो आजपर्यंतचा भ्रम होता. तो तुटला होता. 
            पाटील तसाच विचार करीत होता. अशातच जेव्हा त्यानं म्हायदूची मुलगी शिकतेय असं ऐकलं, तेव्हा उद्या म्हायदू आमच्याहून समोर जाईल ना. याच भावनेनं त्यानं त्रागा केला होता. त्यानंच जातीभेद पसरवला होता. परंतु नियतीनं आज  त्याला झुकवलं होतं. ज्या म्हायदूला त्यानं गावाकडून वाळीत टाकायला लावलं होतं. त्याच म्हायदूसमोर त्याला आज लोटांगणही घालायला लावलं होतं. आज म्हायदूमुळं संपुर्ण गाव वाचणार होतं. 

********************************************

           'ही समदी स्पृश्य जात. काम पडलं तं आमाले आवाज देते. अन् काम झालं तं.......काम झालं तं धुत्कारतेत. कामापुरता मामा असाच व्यवहार ठेवतेत आमच्याशीन. अन् आमीबी मोठ्या दिलदार मनाचे. याईचं आयकून घेतो अन् याईले मोठ्या उदार मनानं माफ करतो. काय करावं. आमच्यासमोर आमचा पोटाचा प्रश्न नडतो. आमची बायकापोरं आमच्यासमोर येतेत. थयथय नाचत असते त्याईची भूक आमच्यासमोर. अन् त्याईची लक्तरं बी थयथय नाचत असतेत. म्हणून आमाले दोन पावलं मागं सरकावं लागतं. म्हणूनच आज दहा वर्ष झाली. पुऱ्या देशातील ईटाळ गेला. परंतु या गावात अजूनही बाकी हाये हा ईटाळ. कवा जाईन तं माईत नाय. हा शिवरामबी,  कालपर्यंत माह्या विरोधात होता. म्हणत होता का याले वाळीत टाका. अन् त्याच्याच प्रेरणेनं मले गावानंच नाय तं बिरादरीतील लोकाईनंबी वाळीत टाकलं. अन् आज त्याले कोणी भेटलं नसन. म्हणून तो नाक घासत आला सोता माह्या दारी. अन् माह्या बी ईचार. मीबी मोठ्या मनानं याले माफ केलं. याचे पाप मी या पावसासारखे धुवून टाकले. आता काय करु. माह्याबीसमोर उपाय नाय. कोणी आला रडत रडत तं त्याले हासवत पाठवणारी आमची जात हाये. मंग काय करणार.'
          म्हायदू त्या भरल्या पावसात विचार करीत करीत जात होता. त्याचं अंग न् अंग भिजलं होतं. थंडी वाजत होती. अंगावर रोमांच उभे राहिले होते. अंगावर पुरेसं कापडबी नव्हतं. अशातच पाटलाचं घर आलं. 
          ते पाटलाचं घर. ते पाटलाचं टुमजली घर. त्या घराच्या बाजूला एक गोठा होता. त्या गोठ्यात बैलं बांधली होती. तो गोठा चांगला होता व त्या बैलांनाही राहायला चांगली जागा होती. पाणी किंचीतही गळत नव्हतं. अन् अस्पृश्यांचं घर. अस्पृश्यांच्या घरात त्यांना राहायला पुरेशी जागा नव्हती. ते कुडाचं शेणामातीचं घर असायचं. ज्या घराच्या छतावर सतरा भोकं पडलेले असायचे व त्या भोकातून पाणी थेंबथेंब टपकत असायचं. झोपायला पुरेशी जागा नसायची. अंथरुण पांघरूण सारं ओलं होत असे. एकमेकांना बिलगून रात्र अन् दिवस काढावा लागायचा. त्यातच सकाळी पाऊस उघडताच ज्या भिंती पडलेल्या असायच्या. त्या भिंतीवर गिलावा करावा लागायचा. त्यातच गावात ही वस्ती गावकुसाबाहेर असल्यानं त्यांना रानातील जंगली प्राणीही लय त्रास देत असत. रानातील माकडं छतावर उड्या मारत. त्यामुळं छतावरुन पाऊस येवू नये म्हणून छतावर शहारलेलं गवत घसरुन जात असे व त्यातून पाणी गळत असे. रानातील माकडं केव्हाही येत. त्याचा काही नेम नव्हता. तसेच जंगली प्राणी केव्हाही येत. त्यांचाही काही नेम नव्हता. 
         पावसाळ्यात बिरादरीतील लोकं आपलं घर सोडत नसत. त्याचं कारण होतं रानातील हिंस्र प्राण्यांचं मोकाट वावरणं. रानातील हिंस्र प्राण्यांनाही पावसाचा त्रास होत असे व तेही आसरा शोधत शोधत घराच्या आडोशाला येवून उभे राहात. अशातच ते पाऊस सुरु असेपर्यंत उपाशी राहात. त्यांनाही भूक लागतच असे. तेव्हा ते अशी भूक मिटविण्यासाठी संधी शोधत असायचे. अशातच जर त्यांना एखादा व्यक्ती जर घराच्या बाहेर दिसलाच तर त्यावर ते झडप घालायचे व त्याला यमसदनी पोहोचवूनच दम घ्यायचे. तसा पावसाळा या अस्पृश्यांना कठीणच जायचा. 
          म्हायदूला हे माहीत होतं की रानटी जनावर येवून त्याला त्रास देवू शकतं. त्यात त्याचा मृत्यूही होवू शकतो. तरीही त्यानं जोखीम उचलली होती व तो शिवरामच्या घरचं जनावर फेकण्यासाठी आला होता. 
           म्हायदू जसा शिवरामच्या घरी पोहोचला. तसं त्यानं सर्व भागाचं निरीक्षण केलं. तसा तो गोठ्यात गेला व त्यानं बैलं सोडले व ते सोडून त्यानं ते त्या जनावराजवळ आणले. त्या जनावराला त्यानं दोरानं बांधलं व तो त्या बैलाला हाकलत रानाच्या दिशेनं जावू लागला. सोबत मात्र शिवरामची काही गडी माणसंही होतीच. 
         थोड्याच वेळाचा अवकाश. रान आलं होतं. त्यानं बैलं सोडले व जनावराला मोकळं केलं. त्यानंतर बैलं घेवून शिवरामची गडी माणसं परतू लागले. ती गडी माणसं. त्यांना बैलाचा विटाळ होत नव्हता. आता शिवराम आपल्या कामाला लागणार होता. तो त्या जनावराचं कातडं सोलणार होता. परंतु नशीब फुटकं होतं. त्याला मदत करेल तेव्हा ना. तो आता त्या जनावराला कापणार व त्याचं कातडं सोलणार, तोच रानातील एका हिंस्र प्राण्यानं त्याचेवर झडप घातली. दोघांमध्ये तुंबळ युद्ध होवू लागलं. एकमेकांचे श्वास भरुन येवू लागले. तशी त्या जनावरासमोर म्हायदूची शक्ती पणाला लागू लागली. म्हायदूची शक्ती कमजोर पडू लागली. उपाय चालेनासा झाला. काय करावं सुचेनासं झालं व क्षणातच ते हिंस्र प्राणी हारलं व त्या प्राण्याला म्हायदूनं यमसदनी पाठवलं. परंतु ते तसं करण्याच्या प्रयत्नात म्हायदू एवढा घायाळ झाला होता की त्याला उठणं कठीण जात होतं. जागोजागी जखमा झाल्या होत्या. रक्त बरंच वाहात गेलं होतं. तसं पाहता त्याचे पायही जखमी झाले होते व तो विव्हळत होता. आता उठता न आल्यानं तो तेथेच पडून होता. 

********************************************

            पाऊस काही केल्या थांबत नव्हता. बरीच रात्र झाली होती तरी म्हायदू घरी परत आला नव्हता. त्यामुळंच सुभद्रा चिंतीत होती. बराच वेळ झाला तरी धनी घरी आला नाही. या गोष्टीनं सुभद्रा चिंतेत पडली होती. रात्र बरीच झाली होती आणि रात्रीलाही बाहेरच्या काळ्याकुट्टं अंधारात हिंस्र प्राण्यांची भीती असते, म्हणून सुभद्रा काही घराच्या बाहेर पडू शकत नव्हती. तसं पाहता ती चिंतेत होती. कारण गावानं आजपर्यंत म्हायदूला वाळीत टाकलं होतं. परंतु सुभद्राही काही बकरीचं दूध प्यायली नव्हती. तिही वाघीणच होती.  ती विचार करु लागली. तसं तिचं एक लेकरु होतं. जे रात्रीला अंथरुणावर पहुडलं होतं. 
           सुभद्रासमोर दोन प्रकारच्या चिंता होत्या. पहिली चिंता म्हणजे तिचा पती व दुसरी चिंता म्हणजे तिचं बाळ. ती विचार करु लागली की काय करावं. रात्र भयंकर आहे. पाऊसही पडतो आहे बाहेर. तसा विचार करता करता तिला इतिहास आठवला अन् आठवल तिनं शाळेत शिकलेला चवथीचा इतिहास. तानाजी असाच अंधारात निघाला होता व त्या रात्रीच्याच अंधारात त्यानं कोंढाणा सर केला होता. तशीच ती हिरकणीही आठवली की जी रायगडावर अडकून पडली होती व जिनं रायगडाचे दरवाजे बंद झाले असले तरी एका बिकट वाटेनं तिनं बाळाच्या आशेनं रायगडाचा कडा पार केला होता. तिला आठवत होती ती झाशीची राणी. ज्या झाशीच्या राणीनं आपला मुलगा आपल्या पाठीवर बांधून इंग्रजांशी दोन दोन हात केले होते. तिनं 'मै मेरी झाशी नही दूँगी' म्हणत इंग्रजांचा प्रतिकार केला होता. तिला आठवला झाशीच्या राणीनं केलेला निर्धार. तशी तिच्यात त्या भयाण रात्री विरश्री संचारली. ती जणू झाशीचीच राणी बनली व त्या भयाण रात्री भर पावसात ती आपल्या पतीला शोधण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्धार करु लागली. 
         तिनं घरातून पतीला शोधायला बाहेर पडायचा केलेला निर्धार. त्यातच ती तो बेत अंमलात आणत असतांना तिनं आपल्या कमरेला आपलं बाळ बांधलं. त्याला पाणी लागू नये म्हणून त्याला प्लॉस्टीक पांघरलं व हातात एक टार्च घेवून ती बाहेर पडली व ती थेट गावातल्या पाटलाच्या घरचा रस्ता चालू लागली. तसं पाहता रस्त्यावर चालतांना तिला कारकिर् असा आवाज येत होताच. कधी वाघाची डरकाळीही कानी येत होती. कधी ढगाचा गडगडाट कानी येता होता मधूनमधून. तर कधी वीजही चमकत होती. परंतु ती काही घाबरली नाही. ती थेट चालत होती. 
          रात्रीचे आठ वाजले होते. तसं गाव आलं. कुत्री भुंकायला लागली. तसे तिच्या तोंडून शब्द फुटले. 
          "कायले भुकते रे बाबा. म्या काई तुले माराले आले नाय. म्या माह्या पतीचा शोध घ्याले आले हाये. माह्या पती सकाळपासूनच घरी आला नाय. तशी आमची गावासोबत दुश्मनीच हाय. कदाचीत याच गावानं नाय तं त्या माकडानंच माह्या पतीले संपवायचा डाव रचला की काय? नगं नगं बाबा, माह्या मनात असले असते भलते ईचार नोको. बाबा, म्या तं आतं त्यालेच जाब ईचाराले चाललो. म्हणावं लागन का माह्या पती दाखव."
        सुभद्रा ती. ती गावात शिरली. तिनं मनात किंतू परंतु पाळला नाही. तिनं गावातील विटाळाची पर्वा केली नाही. ना ही ती किंचाळत चालली होती. तिला ना गावाचं भय होतं. ना गावातील माणसांच्या विटाळाचं भय होतं. तसं पाऊस बाहेर पडतच होता व सर्व गावकरी आपापल्या घराचे दरवाजे लावून आपल्या आपल्या घरात बसले होते. ते झोपी गेले नव्हते. तसं त्या गावात असलेल्या वीजेवरुन समजत होतं. घरातील लाईटं सुरु होते. 
          सुभद्रा आता पाटलाच्या घराजवळ पोचली. तशी ती पाटलाच्या अंगणातही. तशी ती ओरडून म्हणाली,
           "पाटीलऽऽ पाटीलऽऽ"
            तो जोराचा पण काकुळतीचा आवाज. परंतु तो आवाज ऐकताच पाटलाच्या लक्षात आलं. कोणीतरी महिला आपल्या फाटकाच्या बाहेर काकुळतीनं ओरडते आहे. तसा तो आवाज त्याच्या कानात शिरला होताच. तो आवाज त्या अंधाराला चिरुन गेला होता व त्या भयाण रात्री त्या अंधाराची शांतता त्या आवाजानं नष्ट केली होती. 
         पाटलाच्या घरुन कोणताच प्रतिसाद न दिसल्यानं पुन्हा सुभद्रेनं जोरात आवाज लावला. 
          "पाटीलऽऽ, जरा बायेर तं या."
           तो सुभद्रेचा आवाज. तो आवाज ऐकताच पाटील लगबगीने बाहेर आला. त्यानं बाहेरचा लाईट लावला व बाहेर येवून तो म्हणाला, 
         "कोण? कोण बोलतूया?"
          "म्या......म्या म्हायदूची बायको."
          "बोल? काय झालं?"
          "माह्या घरवाला कुठाय?"
           "तुह्या घरवाला! मगाशीच तं गेला नं घरी."
           "घरी गेला. मंग आतंपर्यंत घरी तं आला नाय. तो तं इकडंच आला होता. कदाचीत.......कदाचीत तुमी.......?"
            "काय कदाचीत तुमी म्हणत हायेस. म्या बी काईच केलं नाय अन् मले बी काईच माईत नाय."
            "पण तो तं इथंच आला होता नं. तसं गिसं काय नाय. पाटील एकतर माह्या पती आणून द्या मुकाट्यानं. नायतं शोधाले जंगलात तरी चाला माह्याबरोबर."
          ते सुभद्रेचे शब्द. तसे ते शब्द चिरुन पाटलाच्या कानात शिरले. त्यानं तिची अवस्था पाहिली. तिच्या पाठीवर एक लहानसं बाळ बांधून होतं. बिचारं तेही पावसात भिजलं होतं. ते कुईकुई रडत होतं आणि आता त्याच्यानं रडणं शक्य नव्हतं. ते भुकेलेलंही होतं. पाटील ते सगळं पाहात होता. तसं त्याचं ह्रृदय द्रवलं. त्याला दया आली. तसा पाटील विचार करु लागला. 
          'तो म्हायदू. बिचाऱ्यानं आपल्यासाठी या पावसाचीबी पर्वा केली नाय. अन् तो आपल्यासाठी धावून आला. अन् त्यानं आपल्या घरचं जनावर फेकलं. संबंध गावाची सुरक्षा केली अन् आपला जीव धोक्यात घातला. अन् आज त्याचेवर संकट हाये तं  आपण गप्प का बरं बसावं.'
        तो विचार करु लागला. तोच तो तिला म्हणाला, 
        "सुभे, काळजी करु नगं. म्या शोधतो त्याले गडी माणसासकट. तुह्या पती शोधून देतो. अन् त्याले शोधल्याशिवाय म्या चैनबी घेणार नाय. तू बस अशी कडेले."
          "नाय पाटील. माह्या नवऱ्यासारखा तुमच्यावर माह्या बी ईश्वास नाय. म्या बी येते तुमच्याबरोबर."
          "ठीक हाये. आपण......आपण शोधूया त्याले. पण निदान या बापड्याले तरी सुखानं घरी राहू दे." पाटलानं तिच्या लेकराकडं अंगुलीनिर्देश करुन म्हटलं.
           "नाय पाटील. आता कवडीचाबी ईश्वास नाय उरला तुमच्यावर."
           "आईक माह्य. थोडंसं तरी आईक. निदान या बापड्यासाठी तरी आईक. निदान याच्यासाठी तरी विचार कर." पाटील म्हणाला. 
           सुभद्रा विचार करु लागली.  'माह्या पती तर गेला. आता एक मुलगा आहे. तो जावू नये. उद्या या पावसानं जास्त भिजन. त्याले सर्दी पडसं होईन व तो जास्त आजारी पडन. त्यापेक्षा इथं पाटलाच्या घरी ठेवलं तं जास्त सुरक्षीत राहीन.' 
         सुभद्रेचा तो विचार. तसा विचार करताच तिनं ठरवलं की त्या मुलाला त्या पाटलाच्याच घरी ठेवावं व आपण स्वतः आपल्या पतीला शोधायला निघावं. तसा विचार करुन तिनं आपलं कमरेला बांधलेलं मुल सोडलं व ते पाटलाच्या हाती दिलं व ती म्हणाली ,
          "ठेवा तुमच्याकडे बाळाले. मले माह्या पती सापडल्यावर म्या घेवून जाईन त्याले."
          पाटलानं त्या बाळाला कवेत घेतलं. तसं ते बाळ आणखी ओरडायला लागलं. तसं त्यानं ते बाळ पाटलीनीच्या हातात दिलं.  पाटलीनीनं त्या बाळाला हातात घेतलं. त्याचं अंग पुसलं. त्याचबरोबर त्याच्या ओठात काही वेळ जाताच दुधाचे थेंब ओतले. ते बाळ गटागटा दूध पिवू लागलं व शांत झालं. थोड्याच वेळाचा अवकाश ते बाळ झोपीही गेलं होतं. जसं ते दररोज आईच्या कुशीत झोपी जातं तसं. 
          बाळ झोपी जाताच लगबगीनं सुभद्रा उठली. तिनं पाटलाला खुणावलं. तसा पाटील गावातील काही गडी माणसांना सोबत घेवून त्या भयाण रात्री व भयाण पावसात म्हायदूला शोधायला निघाले. त्या पाटलानं स्वतःही आपल्या जीवाची चिंता केली नाही. त्याचं कारण होतं त्यानं केलेला विचार. त्यानं विचार केला होता की बिचारा म्हायदू. तो स्वतः आपल्या जीवाचा विचार न करता आला. आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण गावासाठी धावून आला. आज त्याचे घरावर आपल्यामुळंच संकट कोसळले असून ते आपण निस्तरायला हवं. त्यानं केलेल्या उपकाराची जाणीव ठेवायलाच हवी.
          पाटलाचा तो विचार. तो विचारच करीत होता. तोच सुभद्रा म्हणाली, 
         "चाला न हो पाटील लवकर. रात्रीची वेळ हाये. जर माह्या पती  कुठं आडोशाले असन लपला तं एखादा प्राणी त्याले खावून टाकन. त्यापूर्वी आपण गेलेलेच बरे."
          ते सुभद्रेचे शब्द. तसा पाटील म्हणाला, 
          "हो हो.  तुह्यं बी बरोबर हाये. आमी जातो लवकर. तू इथंच थांब. त्याले शोधणं म्हणजे बाई माणसाचं काम नाय. आमीच जातो."
          "पाटील, माह्या ईश्वास नाय तुमच्यावर."
          "आता ईश्वास वैगेरे जावू दे धोड्यात. सुभे, म्या काय म्हणतो ते नीटसं आईक. अवं, जो माणूस माह्यासाठी अन् या गावासाठी धावून आला. ज्यानं या बद्द्या पावसात आपल्या जीवाची पर्वा केली नाय. त्याले आमी असेच सोडून येवू काय? अवं त्याले तो जशाबी अवस्थेत असन, तशाबी अवस्थेत आमी आणू. अन् हं,  त्याले आणल्याशिवाय रायणार नाय. वचन हाये माह्यं. त्याशिवाय परत बी येणार नाय. हा पाटलाचा शब्द हाय. ऐऱ्यागैऱ्याचा शब्द नाय."
          पाटील जे काही बोलायचं होतं ते बोलला. तशी सुभद्रा गप्प राहिली. तशी ती काही वेळ विचार करु लागली. क्षणातच ती म्हणाली,
         "ठीक हाये सा. जरा लगबगीनं जा अन् लवकर परत या."
          "ठीक हाये सुभे. हा आता गेलोया अन् आताच आलोया." असे म्हणत पाटलानं एक लांबशी काठी सोबत घेतली. दोनचार गडी माणसं सोबत घेतले व ज्या ठिकाणी त्या गडी माणसांसोबत जनावराला घेवून म्हायदू आला होता. त्याठिकाणी तो आला व तो म्हायदूचा शोध घेवू लागला. तसा तो आवाजही देत होता. म्हायदूऽऽ म्हायदूऽऽ. तसा एका दिर्घ  झाडीतून त्याला आवाज आला. 
          "कोण जी. म्या इथं हाये."
          "म्हायदू होय."
          "हो म्याच म्हायदू." 
           आवाजाची ती दिशा. त्या दिशेनं म्हायदू होता तिथं सर्व गडी माणसं पाटलासोबत गेले. क्षणातच पाटलानं पाहिलं. म्हायदू, रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. विव्हळत आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर रक्ताच्या जखमा आहेत. त्याचे पाय व हातही कोण्यातरी जंगली प्राण्यानं ओरबाडले आहेत. परंतु तो मरण पावला नाही. अजूनही जीवंत आहे.     
          जसा म्हायदू पाटलाला दिसला. तसा पाटलाच्या जीवात जीव आला. तसा तो विचार करु लागला. 
          'म्हायदू......म्हायदू जीवंत सापडला. परमेश्वराचीच ते लीला. एव्हाना या भयाण रात्री वाघ, सिंहासारखे प्राणी जिथं गावात शिरतेत. ते माणसाचे लचके तोडतेत. पाळीव प्राणी गावातून घेवून जातेत. तेथं हा म्हायदू. या भयाण जंगलात. कसा काय जीवंत राहू शकतो. ही खरं तं आश्चर्यच करण्यासारखी गोष्ट हाय."
           म्हायदूला पाटलानं पाहिलं. तसा पाटील म्हणाला, 
          "म्हायदू तू जीवंत हायेस. अन् ही तुह्यी अवस्था कोणं केली?"
           "वाघानं. वाघाने झडप घातली होती माह्यावर."
          "ते कशी काय?"
          "ते मले बी माईत नाय. पण लय त्रास होत हाय पाटील. जरा हात देता का?"
           म्हायदू विटाळाचा विचार करुन कचरतच म्हणाला, 
           "का नाय. आमी तुले न्यालेच आलो हाये."
           पाटलाचं ते बोलणं. तसा पाटील आपला मोर्चा गडी माणसाकडं वळवत म्हणाला, 
           "चाला उचला रे त्याले."
           'चाला उचला रे त्याले' ते पाटलाचे शब्द. तसे त्याचे गडी माणसंही उच्चवर्णीयच. त्यांनाही म्हायदूचा विटाळ होतच होता. मग ते हात कशाला लावतील त्याला. तशी ती उच्चवर्णीय जात विटाळ मानणारीच होती. त्यामुळंच त्या गडीमाणसांनी पाटलाच्या बोलण्यावर किंचीतही हालचाल दाखवली नाही. ते पाहून पाटील स्वतः पुढं होत त्याला हात लावू लागला व मनातल्या मनात पुटपुटू लागला. 'साली ईटाळ. या ईटाळानं आज दहा वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवून. तरी या गावाला सोडलं नाय.'
          ते पाटलाचे शब्द होते. तसा तो पाटील धिप्पाडच देहाचा होता. त्यानं कोणताही विटाळ न पाहता म्हायदूला हात लावला व केलेल्या उपकाराची परतफेड करावी तसं वर्तन त्यानं केलं. त्यानंतर त्यानं त्याच म्हायदूला इतरांची मदत न घेता अलगद खांद्यावर उचललं व तो गावची वाट चालू लागला. त्याची गडीमाणसं मात्र खजीलपणानं नव्हे तर विटाळाच्या स्वाभीमानानं पोटात भुकेची आस असूनही किंचीतही न घाबरता त्याच्या पाठीमागून चालू लागले. त्यांना वाटत होतं की जर आम्हाला पाटलानं एखाद्या वेळेस कामावरुन काढल्यास म्हायदूला हात लावल्यास सारं गाव त्यांनाही वाळीत टाकेल. कामं देणार नाही. मात्र पाटलानं म्हायदूला व त्याच्या पत्नीला दिलेला शब्द पाळला व त्यानं म्हायदूला उचलून घरी आणलं. अशाप्रकारे त्याला त्यानं माणूसकी दाखवली होती. 
          पाटलानं म्हायदूला घरी आणलं होतं. थोड्याच वेळात त्याला त्याच्याच घरी बैलगाडीनं सोडून दिलं. त्याच्या औषधाचाही खर्च उचलला व माणूसकी दाखवून केलेल्या उपकाराची परतफेड केली. त्यातच त्या गावात विटाळ जरी असला तरी आपले त्याच्याप्रती असलेले संबंध मधूर बनवले. परंतु याचा परिणाम हा झाला की आता गावानं आज म्हायदूच नाही तर पाटलाच्या घरालाही वाळीत टाकलं होतं. परंतु त्या वाळीत टाकण्याचं पाटलाला कोणत्याच स्वरुपाचं वाईट वाटत नव्हतं. त्याला तर उलट आनंदच वाटत होता की आपण एक चांगलं कार्य केल्याची ही पावती होय. आज कलियुग असल्यानं या कलियुगात चांगल्या गोष्टीला किंमत नाही तर वाईट गोष्टीलाच किंमत आहे. म्हणूनच आपल्यासोबत असं घडत आहे हे पाटलाला वाटत होते.
           काळ असाच हळूहळू निघून जात होता. म्हायदूला बैलगाडीतून पाटलानं त्याच्या घरी नेवून दिलं. तसं पाहता त्याच्या औषधपाण्याचा खर्चही पाटलानं केला. आता त्याची प्रकृती हळूहळू सुधारत चालली होती. आज तो स्वस्थ झाला होता. परंतु आता तो अपंग बनला होता. जखमा अजूनही शरीरावरच होत्या. परंतु त्याच्यानंतर जड कामं बनत नव्हती. सर्व ताण सुभद्रावरच येवून ठेपला होता. ती आता नित्यनेमानं आपली कामं करीत असे. घरचा स्वयंपाक पाणी करुन ती आपली कामं करुन कामाला जात असे. तिला मदत म्हणून पाटलानंच आपल्या घरी तिला कामाला ठेवलं होतं. 
          विटाळ आजही होता. तशी शेतीतील कामं करायला विटाळ वाटत नव्हता त्या उच्चवर्णीय लोकांना. तसा विटाळ चरणसीमेवर असल्यानं पाटलानं जेव्हा त्याला हात लावून त्याच्या घरी नेवून पोहचवलं. त्यानंतर त्यानं घरी अंघोळही केली होती. 
           काळ हळूहळूच असाच सरकत राहिला. तसा तोही हळूहळूच स्वस्थ होवू लागला. त्याला त्याच्या पत्नीचा ताणही समजू लागला व तो त्या ताणानं घरच्या कामातही सुभद्राला मदत करु लागला होता. परंतु आता तो आपल्या मुलीला मैनेला तसे पैसे पाठवू शकत नव्हता. 
         इकडे मैनेची त्रेधातिरपीट होत होती. मैनेला व तिच्या आत्याला माहीत नव्हतं की तिच्या वडीलाची परिस्थिती कशी आहे. फोनचा काळ होता. परंतु म्हायदूजवळ फोन नसल्यानं तसा संपर्कही त्याच्या बहिणीला झाला नव्हता. परिस्थिती माहीत झाली नव्हती. इत्यंभूत बातमीही समजत नव्हतीच. तसं पाहता ती बातमी न समजल्यानं एक दिवस तिचा संताप एवढा वाढला की ती काय घडलं ते पाहायला म्हायदूच्या घरी आली व समजलं की त्याचीच परिस्थिती वाईट आहे. मग तो कुठून पैसे पाठवणार. शेवटी तिनं निर्णय घेतला. निर्णय असा घेतला की तिनं पुढील वर्षीपासून तिनं तिची तक्रार केली  नाही. फक्त तिच्याकडून घरची सर्व कामं करवून घेतली. तसा तिनं एक चांगला निर्णय घेतला होता. आज तिचा तो निर्णय रास्त ठरला होता. 

*****************************************

          म्हायदू अपंग होता. परंतु तो बसल्या बसल्या घरी स्वयंपाक करुन ठेवत होता आणि सुभद्राही त्याला त्रास न देता संसाराचा गाडा पेलवीत होती. तिला बाळंतपणही करता येत होतं व ती बाळंतपणाचीही कामं करु लागली होती. परिस्थिती हळूहळू निवळू लागली होती. मुली शिकत होत्या. त्यातच आता मुलाचंही शाळेत जाण्याचं वय झालं होतं. 
          मोठी मुलगी मैना आता थोडी समजदार झाली होती. तिला चिंता पडली होती की आपण आपल्या भावालाही शिकवावं. त्यामुळंच तिनं आपल्या भावालाही जवळच्या आश्रमशाळेतच दाखल केलं होतं. आज चारही भाऊ बहिण शिकत होते.
          ते शिक्षणाचं वय. त्या शिक्षणाच्या वयात शाळा शिकणं महत्वाचं होतं. मोठी मुलगी दहावी पास झाली. परंतु पुढील शिक्षणाला पैसा हवा होता. तो पैसा कुठून आणावा? मैनेसमोर प्रश्न पडला होता की शिक्षणाला पैसा आणावा कुठून? घरी तारांबळ उडाली होती. ती तारांबळ पाहता मैनेलाही काहीच सुचत नव्हती. तसं पाहता त्या लहानग्याच वयात तिला वाटत होतं की आपण कमवायला हवं आणि जो पैसा येईल, त्या पैशातून आपल्या भावाबहिणींना शिकवायला हवं. तसा तिला तिच्या आत्याचा त्रास होताच. 
          मैनेनं विचार करताच तिनं दहावी पास होवूनही आपलं शिक्षण सोडलं. ती गावात आली आपल्या वडीलाजवळ राहायला लागली. ती आपल्या वडीलाची सेवाशुषृशा करायला लागली. तशीच आता तिही समजदार झाल्यानं आपल्या आईलाही कामात मदत करायला लागली. 
          कातडं काढणं हे त्यावेळेस स्रियांचं काम नव्हतं. परंतु परिस्थिती अशी नाजूक होती की मैनेलाही ती कामं करावी लागली. हळूहळू ती बापाच्या बरोबर चामडं पकविण्याचं काम करु लागली. तिचा बाप बसल्या बसल्या तिला चामडं पकविण्याच्या कामात मदत करु लागला. तसाच मार्गदर्शनही करु लागला होता. आता ती त्या पकविलेल्या चामड्यापासून वार्त्या, चपला आणि वेगवेगळ्या वस्तू बनवू लागली होती व डोक्यावर त्या वस्तू विकायला बाजारात नेवू लागली होती. त्या वस्तू विकून तिला जे पैसे येत होते. त्या पैशात ती आपलं घर पाणी व आपल्या बहिणभावाचं शिक्षण करु लागली होती. 
          वर्षामागून वर्ष जावू लागले होते. तिही हळूहळू काम करु लागली होती. त्यातच तिच्या दोन्ही बहिणी शांता व कौमुदी शालान्त पास झाल्या होत्या व त्याही हळूहळू महाविद्यालयात गेल्या होत्या. भाऊ अजूनपर्यंत महाविद्यालयात गेला नव्हता. 
           मैनेला आजही विटाळ छळत होता. तो विटाळ बंद व्हावा असं मैनेला वाटत होतं. परंतु आज तिच्याजवळ उपाय नव्हता. विटाळाचंही एक गणित होतं. डॉ. बाबासाहेबांनं सांगीतलं होतं की आपले पिढीजात धंदे संपवा. विटाळ आपोआपच निघून जाईल. परंतु मजबूरी होती आजही म्हायदूसमोर की तो आपले पिढीजात धंदे बंद करु शकत नव्हता. कारण त्याला माहीत होतं की आपण जरी आपले पिढीजात धंदे बंद केले वा सोडले तरी आपली बिरादरी ते काम नक्कीच करेल व विटाळ संपणारच नाही आणि आपण जर असले पिढीजात धंदे बंद केले तर आपलं या गावात पोट भरणं कठीण होवून जाईल. याच कारणानं तो आणि आता मैना आपले पिढीजात धंदे बंद करु शकत नव्हते. परंतु तिला वाटत होतं  की डॉ. बाबासाहेबांनी सांगीतल्याप्रमाणे आपले पिढीजात धंदे बंद करावे. 
           ती विचार करीत होती बाबासाहेबांच्या तत्वावर चालण्याचा. परंतु ती सक्षम झाली नव्हती. ती सोडणार होती पिढीजात धंदे. परंतु तिनं विचार केला की आपल्या बहिणी शिकल्या व आपला भाऊ शिकला तर सक्षम झाला की आपण आपले पिढीजात धंदे सोडू. त्यामुळंच ती शिकवत होती आपल्या भावाबहिणींना. हळूहळूच तिच्या बहिणी शिकू लागल्या होत्या.
          आज त्या बहिणी सक्षम झाल्या होत्या. मोठमोठ्या पदावर पोहोचल्या होत्या. आज तिचा भाऊही मोठा झाला होता. तोही मोठ्या पदावर पोहोचला होता. परंतु तिचे भाऊबहिण आज सक्षम बनले असले तरी ते आपल्या परीवाराकडे लक्ष देत नव्हते. ना त्या तिघांनाही त्यांच्या परीवाराचं घेणं देणं होतं ना त्यांना त्यांच्या मायबापाची चिंता होती. ते त्यांचं वागणं पाहून मैनेला अतिशय वाईट वाटत होतं. तिला अतिशय पश्चाताप होत होता. कारण तिनं त्याच भावाबहिणीचं शिक्षण करता यावं म्हणून आपलं शिक्षण बंद केलं होतं आणि आता ती आपल्याच मायबापाचा पिढीजात धंदा करु लागली होती.
             अनुभव हाच गुरु असतो. ज्याला जेवढा अनुभव,  तेवढा तो व्यक्ती शहाणा असतो नव्हे तर मानलं जातं. कितीही कोणी शिक्षण शिकला आणि त्याला जर अनुभव नसेल तर ते शिक्षण त्या व्यक्तीचं कुचकामी ठरतं. 
          पुर्वीच्या काळातही असंच होतं. अनुभवानुसार लोकं आपला धंदा करीत असत. पिढीजात धंदे व्यवस्था यातूनच पुढं आली. लोकं पिढीजात धंदे करीत होते. त्यामुळंच लोकांना कामासाठी कोणाकडे भटकण्याची गरज नव्हती व लोकं कामासाठी कुणाकडे भटकतही नसत. गाव स्वयंपूर्ण राहायचं. त्याचं कारण होतं पिढीजात धंदे. परंतु या पिढीजात धंद्यातून जातीव्यवस्था निर्माण झाली. ती जातीव्यवस्था.......ज्या जाती व्यवस्थेने विटाळ, अस्पृश्यता व जातीभेद वाढवला नव्हे तर जातीभेदाला खतपाणीही घातलं. 
         जातीभेद......पुर्वी जातीभेद हा विटाळ नव्हता. लोकं चामडं सोलणे. बाळंतपण करणे, टोपल्या बनविणे, मांस कापणे व वाद्य वाजविणे. ही व त्यासच अनुकूल असणारे कामं करणाऱ्या मंडळींचा विटाळ मानत नसत. त्या कामांना हिन समजत नसत. तसेच काही लोकं असेही होते की ते आपली अशा लोकांकडून सेवा करुन घेत. जो सेवेकरी असायचा. त्याला हिन दर्जाची कामं सांगीतली जात. परंतु त्यांचा विटाळ मानला जात नसे. कामाची विभागणी अशाच कामावरुन झाली. त्यातच अशा कामात कसब वाढावं म्हणून तीच ती कामं त्याच त्या लोकांनी करण्याची प्रथा पडली नव्हे तर पाडावी लागली. त्यात एकच हेतू होता. तो म्हणजे त्या कामाचं कसब वाढावं. 
          लोकं आवडीनं आपआपली कामं करीत असत. कोणी कोणत्याही कामाला हिन समजत नसत व कोणी कोणतंही काम करीत असत. यावरुन तत्कालीन काळात जाती तयार झाल्या होत्या. तरीही भेदभाव नव्हताच. तसंच कोणी कोणत्याही जातीचा असला तरी त्याला कोणत्याही जातीतील कामं करण्याची परवानगी होती. जर एखादा ढिवर वा वाल्मीक समाजाचा असेल आणि त्यानं जर विचार केला की मला ब्राह्मण समाजाचं काम करायचं आहे  तर तो ते काम आवडीनं करु शकत असे. त्याला कोणाचाच विरोध नव्हता. हे आपल्याला रामायण, महाभारत काळात दिसून येतं. रामायण काळात वाल्मीक समाजाचा असलेला वाल्मीक दरोडेखोर पुढं जावून त्यानं ब्राम्हणत्व प्राप्त केलं व तो वाल्याचा वाल्मीक ऋषी झाला. तसाच महाभारत काळात ढिवर समाजाचा असलेल्या वेद व्यासानं पुढं जावून महाभारत नावाचा अमुल्य ग्रंथ लिहिला व ब्राह्मणत्व प्राप्त केलं. याचाच अर्थ असा की ढिवर समाजाचं काम होतं,  मासोळ्या पकडणे तर ब्राह्मण समाजाचं काम होतं कथा करणे, ग्रंथरचना करणे. ते काम व्यासांनी केलं. यावरुन व्यास हे ब्राह्मण समाजाचे झाले नाहीत. परंतु गुणाने ब्राह्मण ठरतात. तशीच त्याची आई सत्यवती एक ढिवर समाजाची असून ती पुढं राजा शांतनूची राणी बनली व पुढं तिनं क्षत्रीयत्व प्राप्त केलं. तशीच रामाला उष्टी बोरं चारणारी शबरी ही देखील मातंग समाजाची होती हेही विसरुन चालत नाही आणि तिचा बोरं खातांना रामानं कोणताच भेदभाव केला नाही. यावरुन रामायण व महाभारत काळात भेदभाव नव्हता हे सिद्ध होते. तसंच महाभारत काळात झालेल्या युद्धात वेगवेगळ्या जातीधर्माचेही लोकं असतील हे नाकारता येत नाही. भेदभाव नसल्यानं ते लढले असावेत. मग जिथं प्रत्यक्ष त्यांना देवत्व प्रदान केलेला हा समाज आजही भेदभाव का मानतात? तेच कळत नाही. 
           रामायण महाभारत काळ गेला. तद्नंतरच्या काळात तथाकथीत लोकांनी आपल्याच फायद्यासाठी अनुभवाला गुरु मानत लोकांनी एकच एक काम पिढी दर पिढी करावं हे ठरवलं. त्याचा त्यांना फायदाही झाला. त्याचा फायदा म्हणजे रामायण, महाभारत काळात पिढी दर पिढी एकच एक काम करीत असतांना अनुभव हाच गुरु असल्यानं कामाचा सराव वाढला व लोकं एकच एक काम करु लागल्यानं कामात सातत्य, सुबकता व गती आली. गती वाढली. त्यानंतर लोकं आपल्याच जातीतील कामं करु लागली होती. ती आता ना दुसऱ्या जातीची कामं करीत होती. ना दुसऱ्या जातीची कामं करायला धजावत होती. ती मंडळी फक्त नि फक्त आपल्याच जातीची कामं करीत होती व त्याच कामाला करण्यासाठी धजावत होती. 
          बेरोजगारीवर मात होत होती त्या काळात. लोकसंख्या अफाट होतीच. नाही असं म्हणता येत नाही. कारण लोकं वाचत नव्हते. रुग्णालये वा वैद्य कमी होते. अंधश्रद्धा होती व अंगात देव येतो ही देखील प्रथा होती. ज्या अंधश्रद्धेनं अनेकांचे बळी जात होते. असे बळी गेल्यास अमूक अमूक ठिकाणचा भूत लागला असेल वा भुतबाधा झाली असेल असा लोकांचा समज बनायचा. त्यावर काही तथाकथीत वैद्य अशा अंधश्रद्धेनं पछाडलेल्या लोकांना भ्रामक कल्पना देत व आजाराला आपण दूर पळविण्याची पुष्टी करीत. मात्र कधी कधी एखाद्याला आलेला हलकासा ताप हा त्याच व्यक्तीच्या शरीरात आपोआपच रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्यानं आपोआपच तो ताप निघून जात असे. ही प्रतिकारशक्ती कधीकधी खाण्यातून तयार होत असे आणि तो ताप निघून जाताच नाव वैद्याचं होत असे की त्यानंच तो रोग दूर पळवला. समजा आजच्या काळातील अटॅक जर एखाद्या व्यक्तीला आलाच तर त्याला मुठ मारली असा अपप्रचार वैद्यूबा करायचा. यातूनच अंधश्रद्धा वाढीस लागल्या. तसंच पिढीजात शिक्षण वाढीस लागलं. या पिढीजात शिक्षणाने बरेच फायदे झाले. पहिला मुख्य फायदा म्हणजे बेरोजगारीवर मात करता आली. कारण पिढीजात धंदे लहानपणापासूच करायचे. लहानपणापासूनच लोकं आपल्याच मुलांना धंद्याचे कसब शिकवायचे. त्यामुळंच तेच शिक्षण असायचं मुलांना व तोच वारसा पुढं चालवून मुलंही तोच धंदा करीत असत. त्यातच दुसरा फायदा हा झाला की लोकांना कोणत्याही स्वरुपाचं शिक्षण वा कसब शिकायला पैसा लागत नव्हता. कारण लोकं फक्त नि फक्त आपल्याच धंद्याचं शिक्षण शिकत. ते शिक्षण त्यांना आपल्याच पिढीकडून मिळायचं व तिसरा आणि मुख्य फायदा म्हणजे या पिढीजात शिक्षणानं पोटाचा प्रश्न कायमचा मिटवला होता. कारण ग्राहक हे बनलेले असायचे. 
           पिढीजात धंदा हा त्या मुलांचा पिताच करीत असल्यानं त्याच्या मुलांनाही आपोआपच ते काम करायची संधी मिळत असे व त्याच्या वडीलाचे जे गिऱ्हाईक असायचे. तेच गिऱ्हाईक त्याच्या मुलाचेही असत. परंतु पुढं याच पिढीजात धंद्यात जातीभेद व विटाळ शिरल्यानं ते पिढीजात धंदे मोडणे अति आवश्यक होते. 
           पिढीजात हे धंदे..... सर्वांना वेगवेगळे धंदे करण्याची व एका धंद्यातून दुसऱ्याच धंद्यात जाण्याची मुभा होती. त्यातच असे धंदे की ते धंदे करायला लोकं धजत नसत. काही धंद्यात मेहनत जास्त होती तर काही धंद्यात मेहनत कमी. ज्या धंद्यात मेहनत जास्त होती. पोट भरणं दोन्ही धंद्यात जिकीरीचं काम होतं.
         प्रत्येक धंद्यानुसार जाती ठरवण्यात आल्या. त्याच जातीच्या माणसानं तेच धंदे करावे असं ठरलं व त्यानुसारच कोणताही व्यक्ती कोणताही धंदा करु शकत असल्यानं प्रत्येक जातीचे काही नियम ठरविण्यात आले. जसे. ब्राह्मण मंडळी माधुकरी मागत. त्यांच्या मागण्यातही काही नियम ठरवले होते. त्यांनी पाचच घरी माधुकरी मागावी. न मिळाल्यास उपाशी पोटी दिवस काढावे लागत. असा नियम असल्यानं कोणताही व्यक्ती ब्राह्मण जातीचं काम करण्यास धजत नव्हता. हे जातीसाठी बनवलेले नियम. हे नियम चांगले होते व चांगल्यासाठीच बनवले होते. परंतु जसा पुढं जातीभेद आला. तसे सारे नियम धाब्यावर बसवले गेले व नियम बदलले गेले. 
          रामायण, महाभारत काळ संपताच जातीभेद व विटाळ एवढा चरणसीमेवर पोहोचला की समाजात स्पृश्य व अस्पृश्य असे जातीचे दोन भाग तयार झाले. स्पृश्यांना उच्चवर्णीय संबोधलं गेलं व अस्पृश्यांना कनिष्ठवर्णीय. आता अस्पृश्यांनी व स्पृश्यांनी काम करतांना संगनमतानं काम करायचं ठरलं. परंतु पुढे यात नकाराच्या गोष्टी होवू लागल्या. कारण स्पृश्य विनाकारण अस्पृश्यांना आपली सेवा करुन घेत असतांना त्रास देत. त्यातच अस्पृश्य नकार देत. हे असं होवू नये. म्हणून व पुढं अस्पृश्य व स्पृश्यांनी नकार देवू नये म्हणून काही तज्ञ लोकांनी दोघांसाठीही नियम बनवले. परंतु ते सर्व नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी शिरजोर झालेला स्पृश्य वर्ग पुढं जावून अस्पृश्यांना एवढा त्रास देवू लागला की त्याची गणतीच करणे शक्य होत नाही. मग अत्याचाराची शृंखलाच तयार झाली. जे कालपर्यंत म्हणजे डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहण्यापर्यंत सुरु होते व आजही काही अंशी सुरु आहेत. आज डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे व ते अंमलातही आलं आहे. परंतु भेदभाव आणि विटाळ आजही गेलेला नाही.
          डॉ. बाबासाहेबांनी जेव्हा सामाजीक क्रांती केली. तेव्हा लोकांना त्यांनी सांगीतलं की बाबांनो, सोडा हे धंदे. आपण असले धंदे करण्याचा ठेका थोडा घेतला आहे. त्यानंतर काही लोकांनी आपले पिढीजात धंदे सोडले. त्यांनी पोट भरण्यासाठी वेगळे धंदे निवडले. पाश्चात्यीकरण झालं. लोकं विदेशी लोकांच्या संपर्कात येवू लागले. त्याचबरोबर विटाळ व जातीभेद संपला. मात्र यातून पिढीजात धंदे सुटल्यानं शिक्षणाला किंमत आली. लोकं शिक्षणाला जास्त महत्व देवू लागले. कोणत्याही स्वरुपाचं शिक्षण शिकता येवू लागलं व त्यातून स्वतःसाठी रोजगारही निर्माण करता येवू लागला. मात्र असे पिढीजात शिक्षण गेल्यानं स्पर्धा निर्माण झाल्या. पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण हाच पर्याय झाला. धंद्याचं कसब जे पिढीजात मिळायचं. ते शिक्षण मिळणं बंद झालं. पिढीजात शिक्षणानं जी बेरोजगारीची समस्या उद्भवायची नाही. ती उद्भवली. पिढीजात काळात व्यवसायीक शिक्षण शिकण्यासाठी जो पैसा लागायचा नाही. तो आज लागू लागला. एवढंच नाही तर असलं व्यवसायीक शिक्षण शिकायला जास्तीत जास्त पैसा लागू लागला. मात्र विटाळ कायमचा संपविण्याचा प्रयत्न असले धंदे सोडण्याच्या माध्यमातून झाला हे विसरता येत नाही. 
           आज पिढीजात धंदे नाहीत. ते सोडले म्हणून भेदभाव व विटाळ कायमचा संपलेला आहे. जरी बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला असला तरी अन् जरी व्यवसायीक शिक्षणाला पैसे लागत असले तरी. पुर्वी याच व्यवसायीक शिक्षणानं जो गाव स्वयंपूर्ण असायचा. तो गाव आता संपला. आज गावंची गावंही असल्या पिढीजात स्वरुपाचं व्यवसायीक शिक्षण आपल्या मुलांना शिकवीत नाही. ते दुसऱ्याच शिक्षणाला प्राधान्य देतात. दुसऱ्याच शिक्षणाला महत्त्व देवून त्याच शिक्षणाच्या मागं लागतात. ज्या शिक्षणातून पैसा जास्त मिळतो. आज त्याच पुरातन व्यवसायीक शिक्षणाला महत्व आले आहे. जे पिढीजात शिक्षण घरीच मिळत होते. आज तेच शिक्षण शाळेत वेगवेगळे भाग पाडून मिळत आहेत व त्याला जास्त महत्व आले आहे. काल मिळणारे पिढीजात निःशुल्क शिक्षण आज पैसे लावून मिळवले जात आहे व त्याचा उदोउदो सुरु आहे. 
          महत्वाचं सांगायचं म्हणजे पिढीजातपणा व पिढीजात शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट होती. आजही ती महत्वाची गोष्ट आहे. काल एक विशिष्ट जात तसे धंदे करीत होती आणि आज कोणीही तसे धंदे करायला पुढं येत आहे. जसे काल वाढयाचं काम वाढई करायचा. आज सर्वच लोकं करतात. ज्याला फर्निचर असं नवं नाव दिलं गेलं आहे व जो धंदा आज जोमात चालतो आहे. काल वेल्डींगचं काम करणारी खाती जात, आज वेल्डींगचं काम सारेच करतात खाती बनून. काल वैद्यूचं काम अस्पृश्य करायचे. त्यांच्याच अंगात देवी देवता शिरायच्या व एखाद्या साथीच्या आजारात तेच झाडफुक करीत वा जडीबुटी देत. आज ते काम सारेच करतात. मात्र नाव बदललं आहे व त्याला प्रमाणीत इंग्रजी नाव आलं आहे. 
           कालच्या पिढीजात व्यवसायाचं आज आधुनिकीकरण झालं आहे व आज त्या सर्वच पिढीजात व्यवसायांना इंग्रजी नाव मिळालं आहे. त्याच पिढीजात व्यवसायीक शिक्षणाच्या आज पदव्या निघाल्या आहेत. बदललं काहीच नाही. तंत्रशिक्षण आलं आहे व त्या तंत्रशिक्षणात कालचेच पिढीजात धंदे शिकवले जात आहेत. परंतु त्यांचे थोडेसे स्वरुप बदलले आहे. बदलला आहे फक्त विटाळ. याच विटाळ आणि भेदभावानं सर्व देश बदलवला आहे नव्हे तर जगही बदलवून टाकलं आहे. याचाच अर्थ असा की दारु एकच आहे आणि ती कामंही एकच करीत आहे. परंतु त्याला वेगवेगळी नावं आहेत. कोणी त्याला देशी तर कोणी त्याला मोहाची दारु म्हणतात. कोणी त्याला विदेशी दारु म्हणतात. आता या सर्व दारुंमध्येही बरेच प्रकार आले आहेत. या सर्व प्रकारच्या दारु जशा शरीराला पोखरत असतात. तसाच पोखरलं होतं कालच्या विटाळ अन् जातीभेदानं. काल समाजाची अवस्थाही अशीच होती.  जातीभेद व विटाळ नावाची दारु होती. एक देशी होती तर दुसरी मोहाची होती. परंतु या दोन्ही गोष्टीनं समाजाला नशा आली व त्या दोन्ही प्रकारानं समाजाला पोखरलं होतं. एवढं पोखरलं होतं की संपुर्ण समाजच नेस्तनाबूत झाला. मानमरातब सर्व गायब झाला. कालपर्यंत जो समाज वडीलधाऱ्यांची इज्जत करायचा. आज तशी इज्जत उरलेली नाही. आज विटाळ तर गेला. जातीभेदही गेला. परंतु समाज बदलला आहे आणि तेवढाच बिघडतही चालला आहे. जशी विदेशी दारुही देशी आणि मोहाच्या दारुसारखंच शरीर सडवते. तशीच गत आज जातीभेद व विटाळ गेला असला तरी पाश्चात्यीकरणाची कास करीत आहे. पाश्चिमात्यीकरण ही एक दारुच आहे विदेशी. ज्यातून तोकडे कपडे घालणे, आपली पत्नी दुसऱ्या पुरुषाला वापरायला देणे, असे प्रकार उदयास आले आहेत. येत आहेत. चांगली संस्कृती संपली आहे. जी आपली भारतीय संस्कृती होती आणि आम्ही जी संस्कृती चांगली नाही. त्या विदेशी संस्कृतीच्या मागे लागलो आहोत. आमच्या देशात गुणी लोकं आहेत. परंतु ते आज आपल्या देशाला परकीय देश मानतात आणि ते इथंच जन्म घेवून अन्न खावून व येथेच शिक्षण शिकून विदेशात जात आहेत. तेथेच आपले गुण विकसीत करीत आहेत आणि आपल्याच देशाला विसरत आहेत. असं का झालं? का घडत आहे? असा विचार केल्यास याला जबाबदार आहे कालचा आपला विटाळ व कालचा आपला जातीभेद. काल आपण आपल्याच बांधवांशी शत्रुत्व पद्धतीनं वागलो. विटाळ अन् जातीभेद मानून. त्यावरुन आज वाटायला लागलंय आणि विचार येतोय की काश! जर आम्ही काल विटाळ व जातीभेद पाळला नसता तर.......कालच्या विटाळानं सारेच नाते संपवले. जे नाते आपले होते. आपल्यासाठी होते अन् आपल्याच स्वयंपुर्णतेसाठी होते असे म्हणायला काहीच हरकत नाही.
             आज ते शिकले होते मैनेचे भाऊबहिण. परंतु ते तिच्या वडीलाला साथ देत नव्हते. ते चांगल्या नोकरीवरही लागले होते. परंतु ते कुटूंबाला मदत करीत नव्हते. ना गावाकड येत होते ना ते गावातील विटाळ दूर करीत होते. त्यामुळं त्याचा पश्चाताप मैनेला होत होता व तिला त्याचं शल्य वाटत होतं की आपण आपलं शिक्षण त्या आपल्या बहिणभावाच्या शिक्षणासाठी सोडलं. तशी ती हुशार होती. ती शालान्त पास झाली होती. परंतु भावाबहिणींच्या शिक्षणासाठी तिनं आपलं शिक्षण सोडलं होतं. आता बरेच दिवस झाले होते शिक्षण सोडून. परंतु भावाबहिणीच्या या दृष्कृत्यानं तिला शिकावंसं वाटत होतं.
          मैनेची इच्छा होती शिकायची. कारण तिला माहीत होतं की ती शिकल्याशिवाय ती गावचा विटाळ दूर करु शकत नाही. ना त्या गावातील लोकांच्या विचारात सामाजीक भरणा करु शकत. आपले भाऊबहिण व्यर्थ निघाले की ज्यांच्यापासून तिला उमेद होती. तिला वाटत होतं की तिचे भाऊबहिण गावचा विटाळ दूर करतील. तसेच ते गावचा विटाळ दूर करायला मदत करतील. तसं त्यांनी काहीच केलं नव्हतं. उलट त्यांनी आपला स्वार्थ पाहात आपलं पोट पाहिलं होतं. आपल्या स्वतःचा उद्धार केला होता व ज्या गोष्टीसाठी आपल्या शिक्षणाचा त्याग करुन मैनेनं आपल्या भावाला व बहिणीला शिकवलं होतं. तो उद्देश तिचा मनातल्या मनात राहिला होता. तो उद्देश यशस्वी झाला नव्हता. 
          शिक्षणाची आस........त्यातच समाजासाठी काही करण्याची आस तिला काही स्वस्थ बसू देत नव्हती. ती आपल्या आईवडीलाला तर सांभाळून घेत होती. त्यातच शिक्षण शिकायची आसही तिला होती. धंदा बऱ्यापैकी चालत होता. कारण तिनं आपल्या धंद्याचं तंत्र बदलत्या परिस्थितीनुरूप बदलवलं होतं. ती शहरात आत्याच्या घरी शिकायला असल्यानं तिचा तसं पाहता शहराशी संपर्क आला होता. त्याचाच फायदा तिनं घ्यायचं ठरवलं होतं व ती त्याचा फायदाही घेत होती. ती आता शहरात जायची व विकतची आयती बनलेली उत्पादने शहरातून आणायची व तीच उत्पादनं गावोगावी जावून विकायची. या तिच्या उपक्रमात तिला बऱ्यापैकी पैसाही मिळत होता व गाठीला चार पैसेही वाचत होते. 
        ती जशी शहरात उत्पादन घ्यायला जेव्हा जेव्हा जायची. तेव्हा तेव्हा तिच्या मनात शिक्षणाची आस निर्माण व्हायची. तिला बाबासाहेब आठवायचे व आठवायचं त्यांनी घेतलेलं शिक्षण. आठवत होतं तिला बाबासाहेबांनी हाल हाल भोगलेले. परंतु त्यांनी शिक्षण न सोडलेलं. तीच प्रेरणा घेवून त्या वाढलेल्या वयात तिनं स्वतःची लाजलज्जा न बाळगता शिक्षणासाठी फॉम भरला व ती शिकू लागली होती.
           मैनेनं शिक्षण शिकण्यासाठी फॉम भरला होता व ती महाविद्यालयात त्या वाढलेल्या वयात शिकू लागली होती. त्याचबरोबर ती कामंही करीत होती. कामाचं ओझं होतंच तिच्या डोक्यावर. कारण आता तिची आई थोडी थकलेलीच होती. वडील तर अपंगच होते. 
           मैनेचे बहिण भाऊ शिकलेले होते. त्यातच ते शहरात स्थिरावले होते. कधी ते गावाकडे येवूनही पाहात नसत ना कोणतेच हालहवाल विचारत नसत. अशातच तिच्याजवळ पश्चातापाशिवाय मार्ग नव्हता. परंतु असा पश्चाताप करण्याऐवजी ती स्वतःला सक्षम सिद्ध करु पाहात होती. त्यासाठीच ती शिकत होती. 
          मैना दररोज नित्यनेमानं काम करु लागली होती. त्याचबरोबर अभ्यासही करु लागली होती. तशीच घरचा स्वयंपाक, भांडीकुंडी व धुणीही आटोपवत होती. 
          मैना जशी कामं करायची. त्याचबरोबर ती थकायचीही. त्यातच तिची दया घ्यायला घरी पाहिजे असं कोणीच नव्हतं. परंतु तिला मदत करायला तिची आई सुभद्रा होती. 
          सुभद्रेनं आता फारशी कामं जमत नव्हती. तरीही ती हळूहळू आपलं बाळ थकतंय याची जाणीव ठेवून कधीकधी स्वयंपाक करीत होती. कधी कधी गावातील बाळंतपणंही काढत होती. 
         सारखी अस्वस्थता अन् सारखी उद्विग्नता. अशातच तिच्या मुलीचा चाललेला अभ्यास. ती जाणीव सर्व बिरादरीला होती. तशी जाणीव गावालाही. आज गाव तिला नमन करीत होतं. कारण तिनं कसोशीनं दिवस काढले होते. 
         ते म्हायदूचं घर. आज ते घर एका सुशिक्षीत माणसाचं घर म्हणून गणल्या जात होतं. त्याचं कारणही तसंच होतं. मैना प्रसंगी जास्त शिकली नाही. तरी तिनं शिकविलेले तीनही भाऊबहिण आज उच्चतम शिकले होते नव्हे तर आज ते चांगल्या प्रतिच्या नोकरीवरही लागले होते. हे सगळं तिच्याचमुळं घडल्यानं आता गाव तिला मानत होतं व तिचा सन्मानही करीत होतं. अशातच ती आणखी शिकू लागल्यानं तिचा आणखी हेवा गावाला वाटत होता. त्याचबरोबर तिचा बिरादरीतील लोकांनाही हेवा वाटत होता. 
         शिक्षण वाघीणीचं दूध आहे हे त्या गावाला कळलं असलं तरी गाव त्या शिक्षणाला अजुनही महत्व देत नव्हतं. कारण तिचे भाऊबहिण शिकले होते. परंतु आपल्या शिक्षणाचा उपयोग ते गुरगुरण्यासाठी करीत नव्हते. उलट त्यांनी स्वार्थ साधत आपला कार्यभाग साधला होता व ते आता आपल्याच परीवाराला विसरले होते. परंतु मैना काही आपला परीवार विसरली नव्हती. ती अजुनही आपलाच परीवार घेवून चालत होती. अशातच अशीही ती रात्र तिच्या घरी उगवली. म्हायदू चालता झाला होता. 
          ती भयाण रात्र. म्हायदूला त्या रात्री छातीत कळा येत होत्या. अतिशय वेदना होत होत्या. काय करावं ते सुचत नव्हतं. सारखं पोटंही दुखत होतं व त्या पोटाचा सुभद्रानं उपचारही केला होता. तिनं त्याच्या पोटाला तेल लावून दिलं होतं. तरीपण पोट बसलं नव्हतं. तशी अर्धी रात्र उलटली. 
           ती अर्धी रात्र. बाहेर अंधार पडला होता. कुत्री सारखी भुंकत होती. तसं काहीतरी विपरीत घडणार असंच सारखं वाटत होतं. बाहेर पाऊस पडत होता. अशातच म्हायदूच्या छातीत एक कळ भरुन आली व म्हायदूनं रक्ताची ओकारी केली. त्यानंतर तो क्षणभर शांत झाला. तसा थोड्याच वेळाचा अवकाश. म्हायदूला पुन्हा छातीत धडधड वाटायला लागलं. अंग तापायला लागलं. पुन्हा सारख्या कळा यायला लागल्या. तोच एक कळ महाभयंकर आली व ती कळ सहन न झाल्यानं म्हायदू गतप्राण झाला होता. 
            म्हायदू गतप्राण होताच त्या भयाण रात्री सुभद्रेनं आपला हंबरडा सोडला. जशी गाईला तिचा वासरु सोडून गेल्यावर गाय जशी हंबरते तसा. मात्र मैना रडत नव्हती. ती आपल्या आईला सांभाळत होती. म्हणत होती. 'आई, रडू नगंस. आपली प्रकृती खराब करु नगंस.'
          मैनेलाही रडू येत होतं. परंतु ती रडत नव्हती. रडू शकत नव्हती. कारण तिला वाटत होतं की आपणही रडलो तर आपली आई जास्त रडेल व आपल्या आईची प्रकृती जास्त खराब होईल. 
           ती रात्र.......ती रात्र वैरत्वाची रात्र ठरली होती. तशी त्या रात्रीला मैनेला झोप आली नाही. असंख्य विचार तिच्या मनात होते. तिला तिचा बाप एक आधारवड होता. आता तिच्यासमोर विचार होता की कसं जगता येईल. बाप एक आधारवड होता. 
          ती रात्र जाण्याची ती वाट पाहात होती. तशी पहाट झाली व कोंबड्यानं साद दिली. तशी ती बसल्या जागेवरुन उठली. बिरादरीतील लोकांजवळ गेली व त्यांना विनवणी करु लागली की त्यांनी एकतरी माणूस शहरात पाठवावा आणि तिच्या भावाबहिणींना निरोप द्यावा. परंतु बिरादरीतील लोकं तिचं ऐकतील तेव्हा ना. कारण विटाळाची एवढी काळी पट्टी त्यांनी डोळ्यावर चढवली होती की त्यांना डोळ्याच्या समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्यातच त्यांनी म्हायदूला वाळीत टाकलं आहे हेच त्यांना आठवत होतं. दुसरं काहीही आठवत नव्हतं. शेवटी तिनं विचार केला. भाऊ व बहिणीला मयतीचा निरोप कसा पाठवावा याचा. क्षणातच विचारांती तिला पाटलाची आठवण झाली की ज्या पाटलानं तिला म्हायदू अपंग झाला, तेव्हापासून सांभाळलं होतं त्याची. तशी क्षणभरही वेळ न दवडता ती पाटलाच्या घराच्या दिशेनं सैरावैरा धावत सुटली. तसं पाटलाचं घर आलं. 
           ती पाटलाच्या अंगणात पाऊल टाकते न टाकते, तेच सकाळी अंगणात सडा टाकणारी पाटलीण तिच्यावर खेकसली. म्हणाली,
           "पोट्टे, तुले लाज श्रम गी हाये का नाय. सकाळी सकाळी यमदूतावाणी माह्या आंगणात आली अन् माह्यं आंगण अपवित्र करीत हाय."
            पाटलीण बोलून गेली खरी. परंतु तिला काय माहीत होते की तिला एकेकाळी मदतच करणारा म्हायदू आज जगात नाही. 
             पाटलीणनं तसं म्हणताच ती उत्तरली. म्हणाली,
            "काकू, काकू माफ करा. पाटील हाय का घरला?"
            "हं, बोल, काय काम हाय एवढ्या सकाळी सकाळी?"
            पाटलीणचा तो प्रश्न. तसे तिनं डोळ्यातून आसवं काढले व रडक्या स्वरात म्हणाली, 
           "बापू गेलेत."
           "म्हणजे? म्हणजे म्हायदू गेला तर.........मरण पावला की काय?"
           "होय. ते मरण पावले."
           "कसे? अन् कवा?"
           "रातीले."
           "कायनं मरण पावले?"
           "कळ आलती छातीत. सहन झाली नाय अन् मेले."
            "इकडं कशी आली?"
            "सांगावा सांगाले. अन् आणखी दुसरं काम हाय."
           "कोणतं?"
           "शयरात माह्ये भाऊबहिण हायेत. त्याईले बोलावणं पाठवाचं हाय. अन् तुमाले तं माईतच हाये का बिरादरीतील लोकाईनं आमाले टाकून देलं. कोणीपण मदत करुन नाय रायले. म्हणूनच आले म्या. जरा पाटील सायेबाले हेच सांगाचं हाय. का तुमी तरी माह्यी दया घ्या. अन् कौमुदी व शांतेले बोलावणं पाठवा म्हणावं."
           "अशी गोष्ट हाये तर.......ठीक हाये,  सांगते हं. तू निश्चींत राहा म्हणजे झालं पोरी. काळजी करु नगं. " पाटलीण म्हणाली. 
         पाटलीणीचा मैनेसोबत चाललेला संवाद. तसा पाटीलच हातात तंबाखू घोटत घोटत बाहेर आला. त्यानं मैनेला पाहिलं. तसा तो म्हणाला, 
          "मैने अन् एवढ्या सकाळी सकाळी?" 
           पाटलाचे ते शब्द. तशी मैनाच बोलणार. तेच पाटलीण बोलली, 
           "म्हायदू गेला म्हणावं."
           "म्हणजे?"
           "अवं मेला तो. या जगात नाय तो आता." पाटलानं ते शब्द ऐकले. तसा तो जे समजायचं ते समजला व मैनेकडे तोंड करुन म्हणाला, 
            "मैने, खरी हाय का हे गोष्ट?"
            "होय पाटीलसायेब. गोष्ट खरी हाय. अन् मी आपणाकडं एक काम घेवून आलीया. "
            "बोल, काय काम हाय?"
            "आपण फक्त माह्या भाऊबहिणीले तसा सांगावा धाडा म्हणजे झालं. एवळी कृपा करा म्हणजे झालं." मैनेनं हात जोडले व ती काकुळतीनं म्हणाली. 
          "एवळीच गोष्ट ना. मंग काळजी करु नोको पोरी. तू माह्या लेकीसारखीच हायेस. आता जा. म्या सांगावा धाडतो तुह्या बहिण भावाले. जा आतं. आपल्या बापाच्या मयतीची तयारी कर."
             मैनेला पाटील तसं म्हणताच मैना परत माघारी फिरली. त्यानंतर पाटलानं तसा सांगावा एका गडीमाणसाकरवी तिच्या भावाबहिणीला पाठवला. तसा तो स्वतःच त्या म्हायदूच्या झोपडीत दाखल झाला.
             पाटील मात्र ठामपणानं त्यांच्या सोबत उभा होता मैनेच्या खांद्याला खांदा लावून. तोच एक म्हायदूचा आधारवड होता गावातील. त्यानं म्हायदू जीवंत असतांना तर मदत केलीच होती त्या परीवाराला आणि आता मरणानंतरही तोच तिला मदत करीत होता. 
            दुपार होत आली होती. तसे मैनेचे भाऊबहिण व नातेवाईक मयतीला उतरले होते. सारे रडत होते. तशी लवकरच मयत आटोपवली गेली. कारण कोणी म्हणत होते. 'म्हायदूला कोणीतरी मुठ मारली आहे. म्हणूनच तो मरण पावला आहे. असं प्रेत जास्त वेळ ठेवता येत नाही. कारण असं प्रेत जास्त वेळ ठेवणं हे सैतान जागविण्यासारखं असतं.' शेवटी जास्त वेळ ठेवा की नको ठेवा. प्रेताची विल्हेवाट लावणं भागच होतं. त्यामुळंच की काय, म्हायदूची मयत लवकरच आटोपण्यात आली. त्यानंतर म्हायदूच्या प्रेताचा रक्षाविसर्जन कार्यक्रम आणि तिसरा दिवसही झाला.  त्यानंतर आलेले पाहूणे आपापल्या गावी रवाना झाले व त्याचबरोबर तिचे भाऊबहिणही. मरणानंतरही मैनेच्या भावाबहिणींनी तिला साथ दिला नाही. ते निघून जाताच वा रवाना होताच ती अभागी मैना आजही त्यांच्या पाठमोऱ्या शरीराकडे केविलवाणे पाहात होती. पण तिचे स्वार्थपरायण भाऊबहिण ना तिच्याकडे वळून पाहात होते ना तिचे मन जाणत होते.
            मयत आटोपली. तसे सर्व सोपस्कार आटोपून तिचे भाऊबहिण आपापल्या घरी निघून गेले व एक मोठा आघात तिच्या डोक्यावर झाला. बापाचं छत्र हरवल्याची जाणीव तिला होत होती. अशातच ती हिंमत हारली नाही. हिंमतीनं व नेटानं ती एकेक पाऊल पुढं टाकत होती. त्यातच कामधंदेही करीत होती. तशीच शिक्षणही करीत होती. 
         नुकतीच ती बारावी पास झाली होती. त्यानंतर तिनं विचार केला की आपण पदवी कशात मिळवायची? व्यवसायीक शिक्षणात पदवी मिळवायची की शिकत जायचं अधिकारी बनण्यासाठी. तसा ती विचारच करीत होती. तो विचार करीत असतांना अचानक ती भूतकाळात गेली व तिला बाबासाहेब आठवले. तिला आठवलं की बाबासाहेबांनी व तत्सम नेत्यांनी सर्वप्रथम बॅरिस्टर पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याची लढाई केली. याचाच अर्थ असा की आपण सर्वप्रथम येथील कायद्याचा अभ्यास करावा. जेव्हा आपल्याला येथील कायदे माहीत होतील. तेव्हाच आपण या गावातील विटाळ अन् जातीभेद दूर करु शकू. 
           तो तिचा विचार. तसं पाहता त्यावेळेस बॅरिस्टर पदवीचा अभ्यासक्रम हा बारावीपासूनच सुरु होत होता. बारावीनंतर तो अभ्यासक्रम पाच वर्षाचा होता व बीए नंतर तो अभ्यासक्रम तीन वर्षाचा होता. 
           मैनेनं बॅरिस्टर बनायचा विचार करताच तिनं बॅरिस्टर अभ्यासक्रमाचा फॉम भरला व ती बॅरिस्टर अभ्यासक्रम शिकू लागली. 
            तो बॅरिस्टर बनायचा अभ्यासक्रम. तो पुर्णतः इंग्रजीत होता. तसं पाहता तिचं आजपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातील शाळेतून झाला होता. तिला इंग्रजी समजत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. महाविद्यालयात जाणंही जमत नव्हतं. कारण तिच्यावर घराची जबाबदारी होती व ती जबाबदारी पेलवत नव्हती.  अशातच तिला महाविद्यालयात गेल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. इंग्रजीपण आपल्याला नीट समजणार नाही व आपण नापास होवू असंच वाटायचं. शेवटी तिनं त्यातून मार्ग काढला. दिवसभर ती महाविद्यालयात जावू लागली व रात्रीला महाविद्यालयातून लवकर येवून ती आपला धंदाही सांभाळू लागली. 
         घरचा स्वयंपाक, धुणीभांडी, महाविद्यालयातील शिक्षण व धंदा सांभाळता सांभाळता तिला काही वेळ मिळत नव्हता. त्यातच अभ्यासही करणे होतेच. तरीही ती ते सगळं करुन पाहिजे त्या प्रमाणात अभ्यासही करीत होती. अशातच एक एक वर्ष करीत करीत ती बॅरिस्टरची परीक्षा चांगल्या गुणानं पास झाली. तेव्हा तिचा सत्कार करण्यात आला व विचारलं गेलं की एवढ्या उतार वयात तू बॅरिस्टर का बनली? त्यावर तिचं उत्तर होतं, भावाबहिणीमुळं....... त्यावर ते कसं काय? या प्रश्नावर ती गप्प होती. परंतु तिच्या मनात तिचे भाऊबहिणच शिर्षस्थानी होते. तिच्या मनात बदल्याची भावना होती. तिला धडा शिकवायचा होता आपल्या भावाबहिणीला. ज्या भावाबहिणीला तिनं शिकवलं होतं आपल्या शिक्षणाचा त्याग करुन. ज्यांच्याकडून तिनं अपेक्षा केली होती की जे भाऊबहिण आपल्या मायबापाची सेवा करतील. परंतु त्यांनी तसं काहीच केलं नव्हतं. 
          मैना बॅरिस्टर झाली होती. ती आता बॅरिस्टरपणाचा सराव करु लागली होती. तशा तिला सरकारी नोकऱ्या चालून आल्या होत्या. परंतु तिला पदोपदी बाबासाहेबच आठवत होते. बाबासाहेबांना सरकारी नोकऱ्या बऱ्याच आल्या होत्या. परंतु त्या त्यांनी केल्या नव्हत्या. कारण ते बाबासाहेबांना गुलामीचे बंध वाटत होते. 
           सरकारी नोकऱ्या. सरकारी आलेल्या नोकऱ्या मैनेनं केल्या नाही. ती सराव करीत होती आपल्या वकीलकीचा. त्यातच ती अल्पकिमतीत गरीबांचे खटले चालवत होती. तशी ती शिकली असली तरी तिनं आपला गावातील धंदा बंद केला नव्हता. तो तिचा धंदा सुरुच होता. ती दिवसा वकीलकीचा सराव करायची अन् सांजेला आपली लवकर येवून आपला पुरातन धंदाही करायची. तसं तिचं गावावर जास्त प्रेम होतं. त्यामुळंच की काय तिनं आजही गाव सोडलं नव्हतं. 

********************************************

           काळ हळूहळूच सरकला होता. गावातही आता पाश्चात्य विचारसरणीचे वारे वाहात होते. त्यातच मैनेच्या वयातील बरीच पिढी शिकली होती. त्यांचा विटाळाला विरोध होता. 
          मैना आता शिकली असल्यानं ते बिरादरीतील लोकं तिला मानत असत. आता तिला वाळीत टाकलेल्या गोष्टी बिरादरी विसरली होती. आता ते गाव तिचीच कोण्या वेळप्रसंगी मदत घेत असे. 
          ते गाव........त्या गावात आता  बिरादरीतील लोकांचे विटाळाच्या विषयावरुन गावातील लोकांसोबत भांडणं होत व आता ते मैनेकडे धाव घेत असत. परंतु मैना विचार करायची की या गावातील विटाळ हा केवळ भांडण करुन जाणार नाही तर त्यासाठी सामाजीक क्रांतीची गरज आहे. तशी ती सामाजीक क्रांती घडायला हवी. तसा तो एकदाचा प्रसंग. तो एकदाचा दिवस. त्या दिवशी असाच विटाळाचा प्रसंग होता. बिरादरीतील कोणाचं तरी भांडण झालं होतं गावकऱ्यांसोबत. तसं ते भांडण होताच संपूर्ण बिरादरी मैनेच्या घरी आली. म्हणायला लागली की तू आमच्या समाजातील. तू काहीतरी नक्कीच करायला हवं. 
          मैनेनं ते ऐकलं. तसा तिला तिचा भुतकाळ आठवला व आठवली ती बिरादरी. त्या बिरादरीतील लोकांनी तिच्या गतकाळात तिच्या वडीलाला वाळीत टाकलं होतं. तिला वाटत होतं की त्यांना मदत करु नये. परंतु ती समजदार होती. ती त्या जुन्या गोष्टी विसरुन आपल्या विचारांना समाजाप्रती प्रेरीत करीत होती आपल्या विचारांची बिरादरीतील लोकांमध्ये रुजवणूक करीत होती. 
         विटाळाचा तो प्रसंग. प्रसंग पाण्यावरुनच घडला होता. गावात दोन विहिरी होत्या. एक बिरादरीतील विहीर होती व दुसरी गावातील विहीर होती. ते दिवस तसे पाहता उन्हाळ्याचे होते. ऊन्हं चांगलं तापत होतं व बिरादरीतील विहीर यावर्षी आटली होती. मात्र गावातील विहीर आटली नव्हती. त्यामुळंच पाण्यासाठी बिरादरीतील लोकांनी गावच्या विहीरीकडं धाव घेतली. परंतु त्या विहिरीतून पाणी देण्यास गावातील लोकांनी नकार दिला. कारण त्याला कारणीभूत होता विटाळ. आज जरी गावातील लोकं शिकले असले तरी समाज पुर्णपणे बदलला नव्हता. त्यातच विटाळ अन् जातीभेद होताच. शेवटी बिरादरीला प्रश्न पडला की गावानं जर आपल्याला पाणी भरु दिलं नाही तर संपुर्ण उन्हाळभर आपल्याला पाणी भरताच येणार नाही. काय करावं. ती विचार करु लागली. तसं तिला आठवला बाबासाहेबांनी केलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह. त्या काळच्या अस्पृश्यांनाही अशीच विहिरीवर वा पाणवठ्यावर पाणी भरण्याची परवानगी नव्हती. तेव्हा बाबासाहेबांनी महाड इथं पाण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि संपुर्ण पाणवठा अस्पृश्यांसाठी खुला केला होता. 
         तिला आठवलेला तो चवदार तळ्याचा प्रसंग. क्षणातच तिनं ठरवलं. आपणही आंदोलन करायचं. हिंसा करायची नाही. परंतु काठ्या सोबत ठेवायच्या. जेणेकरुन काठीचा धाकतरी गावातील लोकांवर बसेल व ते काही न करता पाणी भरु देतील. आपण गावातील विहिरीला जबरदस्तीनं हात लावायचा. त्याचे परिणाम मग काहीही होवोत. 
           निर्णय ठरला. तसा तिच्या मनानं वेध घेतला व तिनं तो विचार बिरादरीतील लोकांनाही बोलून दाखवला. त्यानंतर तो विचार बिरादरीतील लोकांना पटला. तशी वेळ ठरली व तो संपुर्ण बिरादरीतील जमगठ्ठा हातात काठ्या व पाणी भरण्याचे भांडे घेवून गावातील विहिरीकडं निघाले. त्यातच ती बातमी हा हा म्हणता गावात पसरली व संपुर्ण गाव विहिरीभोवताल गोळा झालं. त्यांच्याही हातात काठ्या होत्याच. आता काय करावं सुचत नव्हतं. अस्पृश्यांना पाणी हवं होतं. त्यातच मैना जरी हिंसाचार टाळत असली तरी हिंसाचार होणं साहजीकच होतं. फक्त बिरादरीतील लोकं आदेशाची वाट पाहात होते. शेवटी मैना म्हणाली, 
           "माझ्या बांधवांनो, आमच्या बिरादरीतील लोकांचं काही तुमच्याशी वैर नाहीच. आम्ही आजपर्यंत तरी या विहिरीवर आलेलो नाही. अन् आपण हेही जाणता आहात की आता तप्त उन्हाळा आहे व या उन्हाळ्यात पाण्याशिवाय आम्हाला जास्तवेळ राहाणं जमणार नाही. आमची विहीर आटली आहे. म्हणूनच हा प्रसंग आमच्यावर आला. तेव्हा तुम्हाला आमची एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला पाणी भरु द्यावे. आम्हालाही माहीत आहे की आम्हाला हिंसा आवडत नाही. परंतु आपण जर हिंसा करु पाहात असाल तर हिंसेचं उत्तर हिंसेनच देवू."      
            मैनेचे ते बोल. शेवटी गाव काही मानायला तयार नव्हतं. त्यातच गावातील एक शहाणा बोलला, 
           "आता जर तुमची विहीर आटली हाये. त्यात आमचा कायपण दोष नाय. आमी का त्या विहिरीले सांगाले आलो होतो का हे बिरादरीतील विहीरी, तू आटून जा. नाय नं व्हं. मंग आमी कायले तुमाले पाणी भरु देवू. अन् एक आमी सांगून ठेवतो. जर तुमी जबरदस्तीनं या विहिरीले हात लावायचा विचारबी केला तं आमी चांगले तुमाले चोपून काढू."
            त्या व्यक्तीचं ते बोलणं. तसं ते गाव काही ऐकायलाच तयार नव्हतं. त्या अख्ख्या गावाला मैनेनं ऐन प्रकारेन समजावून पाहिलं. परंतु ते गाव ऐकेल तेव्हा ना. शेवटी जबरदस्ती करावीच लागेल असा विचार करुन मैना पुढं सरसावली. तोच कुणीतरी तिला एक दगड डोकं धरुन मारला. जो दगड तिच्या मस्तकाला लागला व ज्यातून भळाभळा रक्त वाहायला लागलं. बरं झालं की तो दगड निसटता गेला, नाहीतर तिचा जीवच गेला असता. त्यानंतर ती बिरादरीतील माणसं चिडली. ज्यात काही नवयुवकही होते. शेवटी जे व्हायचं ते होईल असा विचार करुन मैना म्हणाली, 
          "तुम्ही माझा विचार करु नका. तुटून पडा या लोकांवर. हे लोकं प्रेमाची भाषाच समजत नाहीत. तेव्हा आपल्याला जबरदस्तीनं पाणी मिळवावंच लागेल."
          मैनेचा तो शब्द. तसे बोल ती बोलताच बिरादरीतील त्या लोकांनी गावावर प्रतिहल्ला केला. त्यात बरेच जण जखमी झाले. तसे काहीजण पळून गेले. म्हणूनच ते वाचले. तसं पाहता त्यानंतर संपुर्ण बिरादरीतील लोकांनी आपला त्या विहिरीवर ताबा मिळवीत यथेच्छ पोटभर पाणी मिळवलं व आंदोलन यशस्वी झाल्याची पुष्टी केली. ती गोष्ट चवदार तळ्याच्या आंदोलनासारखीच घडत होती.
           गावकरी पळून गेले होते. परंतु ते चूप बसले नव्हते. त्यानंतर बिरादरीतील लोकांनी आपले सर्व गुंड भरुन पाणी नेलं. पाण्याचा स्टॉक करुन ठेवला. कारण त्यांना मैनेनं तसं सांगीतलं होतं. मैनेला कल्पना होती तेथील परिस्थितीची. तिला वाटत होतं की सायंकाळपर्यंत काहीही होवू शकते. 
           बिरादरीतील लोकांनी त्या विहिरीवरुन भरपूर पाणी भरलं. संपुर्ण स्टॉक करुन ठेवला आणि ते आपल्या बिरादरीकडे परतले. तशी सायंकाळ झाली. 
          सायंकाळ होताच बिरादरीत पोलिसांचा एक जत्था आला. सोबत गावातील बरेच लोकं होते. विचारणा करण्यात आली. मैना कोण?
           मैना न घाबरता निर्भीडपणानं बाहेर आली. म्हणाली, 
           "मीच मैना."
           "तुमच्या नावाची तक्रार आहे.  तक्रार अशी आहे की तुम्ही जबरदस्तीनं लोकांना चिथवलं व गावातील लोकांना मारहाण करायला लावली. हे खरं आहे का?"
            "होय, खरं आहे."
            "तुम्हाला चालावं लागेल पोलिस स्टेशनला."
            "ठीक आहे." मैना म्हणाली व ती त्या सरकारी गाडीत बसून पोलिस स्टेशनला गेली. तसे तिच्या मागोमाग बिरादरीतील लोकही पोलिस स्टेशनला गेले. त्यांनी पोलिस स्टेशनला घेराव टाकला. त्याचबरोबर ते प्रकरण काही साधं सुधं नसल्यानं ते प्रकरण संबंध देशात वाढलं. ठिकठिकाणी जाळपोळ सुरु झाली. त्यानंतर दुसरा दिवस उजळला. त्या दिवशी बिरादरीतील लोकं रात्रभर झोपले नाहीत.
           मैनेला अटक झाली होती. तशी प्रक्रियेनुसार बिरादरीतील कोणीतरी मैनेची जमानत घेतली. परंतु प्रश्न सुटला नव्हता. प्रकरण चिघळलं होतं व त्यावर तात्पुरता पर्याय काढल्या गेला. तो तात्पुरता पर्याय होता. टँकरनं पाणीपुरवठा करणं. आता बिरादरीतील लोकांना टँकरनं पाणीपुरवठा होत होता. शेवटी गावकरी जिंकले होते. त्यानंतर त्या बिरादरीतील लोकांसाठी कायमस्वरुपाची पाण्याची सुविधा सरकारतर्फे करण्यात आली. ती बिरादरीतील विहीर खोल करण्यात आली व तिचा उपसा करण्यात आला. ते प्रकरण जास्त चिरडू नये म्हणून काळजी घेण्यात आली. त्या प्रकरणावरुन गावकऱ्यांनाही समज देण्यात आली. मात्र त्या प्रकरणाचा जो खटला बनला. तो खटला न्यायालयात सुरु झाला होता. 

********************************************

            ते गावकरी व बिरादरीतील ते लोकं व ती त्या लोकांची केस..... त्या बिरादरीतील लोकांनी पाण्याच्या विहीरीला हात तर लावला होता. परंतु ती विहीर त्या गोष्टीनं बाटली होती. त्या विहिरीतील पाणी बाटलं होतं अस्पृश्यांच्या स्पर्शानं. त्यातच त्यानंतर त्या लोकांनी त्या संबंध विहीरीत गोमुत्र टाकून व शेण टाकून ते पाणी पवित्र करण्याचा प्रकार केला. त्या प्रकाराला, त्या विहिरीतील पाण्याला जो विटाळ झाला होता. त्या विटाळाचं शुद्धीकरण समजत होते. तो प्रकार म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण करण्याचा प्रकार नव्हता तर ते पाणी घाणेरडे करण्याचा प्रकार होता. गाईच्या शेणात व मुत्रात करोडो रोगाच्या विविध स्वरुपाचे जंतू होते की ज्या जंतूनं विहिरीचं शुद्धीकरण झालं नव्हतं तर ती विहीर अजून घाणेरडी झाली होती. परंतु ती गोष्ट त्या विटाळ मानणाऱ्या व अंधश्रद्धेनं बरबटलेल्या लोकांना कोण सांगणार? ते प्रकरण इथंच थांबलं नाही तर त्यावर न्यायालयात पुढं खटलाही सुरु झाला. खटल्यादरम्यान फैरीच्या फैरी झडणं सुरु झाल्या होत्या. शेवटी ती केस बोर्डावर आली होती. त्यानंतर त्या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मैना दलीलमध्ये म्हणाली, 
          "माय ऑनर, आज जवळपास  नव्वद वर्षाचा काळ झाला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. देश चंद्र व सुर्यावर पाऊल ठेवत आहे. देशात पाश्चात्य विचारांची उभारणी होत आहे. अन् या नव्वद वर्षानंतरही आमचं असं एकमेव गाव आहे की त्या गावात आजही भेदभाव आहे. विटाळ आहे व जातीभेद आहे. गावात आमची वस्ती आजही गावाच्या बाहेर आहे. आजही आम्हाला गावाच्या भयंकर जातीय वेदनांच्या जाचाला समोर जावं लागतं. अन् आजही आम्हाला गावात डोकं वर काढायची संधीच मिळत नाही. आजही आम्हाला गावात सकाळी दहा वाजेपर्यंत प्रवेश नाही. अन् रात्रीही गावात सहा नंतर म्हणजे अंधार पडल्यानंतर प्रवेश नाही. तो का नाही? याचं कारण कळत नाही. एखादा विचारार्थी उत्तर देतो की ही आपल्या गावातील परंपरा आहे. प्रथा आहे. या कुप्रथा आहेत. ना या प्रथा आजपर्यंत बिरादरी सोडायला तयार होती. ना आज ह्या प्रथा गाव सोडायला तयार आहे. 
          माय ऑनर, झालेल्या प्रकरणावरुन मी आपणास सांगते की विटाळाच्याच या कालचक्रात आमचं गाव जगतंय आणि आम्हीही. कारण आम्हाला तसं जगावंच लागतं. त्यातच निसर्गाचं चक्र कोण थांबवणार. शेवटी नियतीनं आपला हिसका दाखवला. निसर्गानं आपलं रौद्ररूप दाखवलं व आमच्या बिरादरीतील विहिरी आटल्या.
          माय ऑनर, तशा आमच्या गावात दोनच विहिरी. एक आमच्या बिरादरीतील व दुसरी गावातील. आता आमच्या बिरादरीतील विहीर आटल्यानं आमच्यासमोर प्रश्न पडला की पाणी कुठून भरावं. तेव्हा वाटलं आपल्याच गावात एक विहीर आहे. तेथून पाणी भरावं. तशी कल्पना होतीच आमची की गावातील ही विहीर त्या गावकऱ्यांच्या ताब्यातील आहे. त्या विहीरीचं पाणी आम्ही घेवू शकत नाही. परंतु तहान, भूक आणि तहानेला कोणी रोखू शकत नाही. ती आपली महत्वपुर्ण गरज आहे. मग आम्ही ती कशी रोखणार? शेवटी विचार केला की आपण त्या विहिरीतील पाणी घ्यायचं. त्यानंतर आम्ही ते पाणी घ्यायला गेलो तर गावकरी आडवे आले. ते काठ्या घेवून उभे होते. ते पाणीच घेवू देत नव्हते. मग आम्ही काय करणार? आम्हाला आमची तहान भागवायला दुसरा पर्याय कोणता होता? कोणताच नाही. तसंच तहानेनं कोणी मरणारही नव्हतं. शेवटी विचार करुन आम्ही शत्रूला गारद केला व पाणी मिळवलं. 
           माय ऑनर, आता आम्ही केलेली ही कृती जर योग्य नसेल तर आम्हाला आपण नक्कीच शिक्षा द्यावी व ती भोगायला आम्ही तयारही आहोत. परंतु एक यावर विचार नक्की व्हावा की या देशासारख्या स्वतंत्र्य देशात, अशा देशात आज राहात असतांना व देशात संविधान बनलं असतांना आणि त्या संविधानानुसार सर्व देश चालत असतांना एखाद्या गावात जर असा विटाळ असेल तर त्याला काय समजावं? सांगावं माय ऑनर की अस्पृश्यांना आजही कोणत्याही विहिरीवर पाणी पिण्याचा अधिकार नाही काय? अस्पृश्यांना स्वतंत्र्यपणे इतरत्र वावरण्याचा अधिकार नाही काय? अस्पृश्यांना दहा वाजेपर्यंत वस्तीत जाण्याचा अधिकार नाही काय? अन् रात्रीला काही लागलंच तर रात्रीलाही प्रवेश करण्याचा अधिकार नाही काय? आम्हीच का बरं जातीयतेचा त्रास करुन घ्यायचा? आम्हीच का बरं जातीयतेचा अत्याचार सहन करायचा. अन् आम्हीच का बरं असंच झेलत झेलत, शोषत शोषत मरायचं? माय ऑनर, आता पुरं झालं. आता सहन होत नाही. आम्ही स्वतंत्र्य झालो. परंतु आमचं गाव स्वतंत्र्य झालं नाही. तेव्हा कोर्टाला माझी एकच विनंती आहे की न्यायालयात या गोष्टीवर विचार व्हावा व न्यायालयात या प्रकरणाची गंभीर दखल घेवून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. जेणेकरुन आम्हाला आमचा गाव हवाहवासा वाटेल व गावात कोणत्याही स्वरुपाचा विटाळ, भेदाभेद व जातीभेद राहणार नाही. एवढीच आपणास आमची शेवटची प्रार्थना आहे."
            न्यायालयातील ते प्रकरण. ते प्रकरण न्यायालयानं ऐकलं. त्यावर प्रतिपक्ष वकीलानंही आपली बाजू ठेवली. त्यांनी सांगीतलं की ती विहीर गावातील लोकांची नसून ती कोण्या एका माणसाची आहे व त्याचा त्या विहिरीवर ताबा आहे. अस्पृश्यांनी त्या विहिरीचं पाणी घेणं म्हणजे ज्या व्यक्तीचा त्या विहिरीवर ताबा आहे. त्या व्यक्तीच्या घरच्या वस्तूची चोरी करणं होय. शेवटी न्यायालयानं त्या गोष्टीवर गंभीर दखल घ्यावी व योग्य न्याय द्यावा अशी दलील प्रतिपक्ष वकीलानं केली. त्यानंतर तसा विचार झाला. न्यायालयानं त्यानंतर त्या प्रकरणात विशेष लक्ष घातलं. काही तज्ञ न्यायाधिशांचे सल्लेही घेतले. तशी गरज लक्षात घेवून न्यायालयानं निकाल दिला. न्यायाधीश महोदय म्हणाले, 
          "या संबंधीत प्रकरणात न्यायालय न्याय देत आहे. तसा हा खटला विशेष असाच खटला आहे. या खटल्यातील सबब दाखले, पुरावे न्यायालयानं पडताळून पाहिलेले आहेत व त्याच पुराव्यावरुन व दलीलावरुन असं लक्षात येतं की आज देशात स्वातंत्र्य आहे व संविधानही आहे. परंतु आजही ज्या गावात असं प्रकरण घडलं, त्या गावात विटाळ अन् जातीभेदही आहे. संबंधीत प्रकरण त्याच जातीभेदावरुन व विटाळावरुन घडलेलं असून संबंधीत विटाळ आता स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही गावात तग धरुन आहे हे सिद्ध होतं. तशी आजची देशाची परिस्थिती पाहता तसा विटाळ व जातीभेद देशात असायलाच नको. परंतु असंही हे गाव की या गावात आजही विटाळ होता हे संबंधीत पुरावे सिद्ध करतात. 
         विहिरीबाबत सांगतांना न्यायालय हे म्हणेल की गरज लक्षात घेता संबंधीत व्यक्तीनं वा व्यक्तीसमुदायानं विहिरीचं पाणी घेतलेलं आहे. आता या ठिकाणी ती विहीर कोणाची? हे लक्षात घेणं गरजेचं नाही. जीव वाचवणं गरजेचं आहे. न्यायालयानं याठिकाणी विचार केलाय की संबंधीत पैसा, आडका, संपत्ती काहीही कोणीही सोबत नेत नाही. जीव वाचला तर सारं काही मिळवता येतं. त्यामुळंच या ठिकाणी ती विहीर कोणाची आहे, हे महत्वाचं नाही. जीव वाचवणं महत्वपुर्ण बाब आहे. तीच बाब लक्षात घेवून न्यायालय या निर्णयापर्यंत येवून पोहोचलं आहे की विहिरीवर कब्जा कुणाचाही असेना. भुकेमुळं व तहानेमुळं जर ही अस्पृश्यांनी योग्य कृती केलेली नसेल तरी ती कृती योग्य अशीच कृती आहे. तो गुन्हा ठरवता येणार नाही वा तो गुन्हा ठरत नाही. शिवाय विटाळाच्या व जातीभेदाच्या बाबतीत न्यायालय हेच सांगेन की न्यायालय भेदभाव व विटाळ मानत नाही व तसला विटाळ कोणीही मानू नये. तसा जातीभेदही कुणीही करु नये. जर अशा प्रकारचा विटाळ वा जातीभेद यानंतर गावात केल्या गेला तर ती कृती योग्य ठरवता येणार नाही. त्याबद्दल गंभीर दखल घेता येईल.  तशी गंभीर दखल घेण्याचा अधिकार न्यायालयाला राहील. याची साक्षेपानं गावकऱ्यांनी नोंद घ्यावी. 
         गावातील पाण्याच्या विहीरीबाबत निकाल देतांना न्यायालय हा निकाल देत आहे की ती विहीर सार्वजनीक करण्यात यावी. त्यावर कोणाची मालकी वा अधिकार यापुढे तरी कोणाचा असणार नाही. कारण गरज लक्षात घेता गावात दोनच विहिरी आहेत व दोन्ही विहिरी गावातील सर्वांसाठी खुल्या करण्यात येत आहेत. 
         न्यायालय पुन्हा आणखी एक या निकालात भर घालत आहे की जो मुद्दा यात अंतर्भूत नाही. तो मुद्दा आहे अधिवास. यापुढं या गावात कोणताही अस्पृश्य गावाच्या बाहेर राहणार नाही. त्यांची वस्ती गावाला लागूनच असावी. अधिवासाचा विषय यात नसला तरी न्यायालय हा विषय स्वमनानं यात समाविष्ट करीत आहे व त्याचा सर्व गावकऱ्यांनी स्विकार करावा. तसंच यानंतर कोणत्याही अस्पृश्यांचा गावानं कोणत्याही बाबतीत अटकाव करु नये. त्यांना मंदिर प्रवेशाबाबत रोखू नये वा कोणालाही केव्हाही संचार करु द्यावे. तशी मुभा न्यायालय देत आहे. 
          विशेष म्हणजे वरील प्रकरणातील संबंधीत बाब लक्षात घेता न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे व आता त्याच गावात नाही तर अशा कोणत्याही गावात लोकं तसे वागत असतील वा असा विटाळ पाळत असतील तर त्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. त्यावर कुणाला जमानतही मिळणार नाही. हाच न्यायालयाचा अंतिम निर्णय होय. Last dision is end and follow this matter."
            निकाल लागला होता. बिरादरीतील लोकं खुश झाले होते. मात्र गावातील लोकं नाखूश होते. न्यायालयीन आदेशानुसार त्या गावातील लोकांच्या वस्तीजवळच अस्पृश्यांना राहायला जागा मिळाली होती. आता ते गावकुसाबाहेर राहात नव्हते. गावाला गावच्या सरकारी प्रशासनाकडून जागा दिली गेली होती न्यायालयातील आदेशानुसार. 
          गावकऱ्यांना तो निकाल पटला नव्हता. त्यातच त्यांनी त्या निकालाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात त्याची अपील केली. परंतु तेथील न्यायालयानंही तोच निकाल अबाधीत ठेवला होता. त्यानंतर तर न्यायालयाच्या निर्देशानुसार व निकालानुसार निकालानंतर गाव फारच चिडून गेलं होतं व ते गाव बदल्याची भावना मनात ठेवून बदल्यासाठी संधी शोधत होतं.

********************************************

           न्यायालयातून लागलेला असा निकाल. त्यातच तसा निकाल लागताच गाव फारच चिडलं होतं  व गाव तसं संधीच शोधत होतं. त्यातच गावानं ठरवलं होतं की या अस्पृश्यांना कायमचं मिटवावं. ना रहेगा बास ना बजेगी बासरी.
           ती उच्चवर्णीय जात....... आज न्यायालयाच्या निकालानं खजील झालेली ती उच्चवर्णीय जात. न्यायालयानं निर्देश दिल्यानुसार विटाळ संपला होता अस्पृश्यांचा आणि आता तेच अस्पृश्य गावात सन्मानानं वागत होते. आपला अधिवास त्यांनी गावकुसाबाहेर न ठेवता स्पृश्यांच्याच घरालगत केला होता. ते आता मंदिरात खुलेआम प्रवेश करीत होते. आता ते गावातही खुलेआम प्रवेश करीत होती. सर्व बंधनं त्यांनी तोडून टाकली होती. तसं पाहता नवी पिढी न्यायालयाच्या निकालाचं स्वागतच करीत होती. परंतु काही जुने लोकं होते की ज्यांना तो न्यायालयाचा निकाल मान्य नव्हता. असेच ते लोकं योजना बनवीत होते. बिरादरीतील लोकांना कसा धडा शिकवता येईल. तशी त्यांनी लवकरच योजना बनवली. त्या योजनेंतर्गत ठरलं की बिरादरीतील झोपड्यांना आग लावावी. परंतु आग तेव्हाच लावावी. जेव्हा ते साखरझोपेत असतील. 
           गावातील काही लोकांच्या त्याच योजनेनुसार असाच तो काळा दिवस उगवला. त्याच योजनेंतर्गत त्या दिवशी त्यांनी अस्पृश्यांच्या पुर्ण घरांनाच ते रात्रीला गाढ झोपेत असतांना आग लावली. ती आग.......ती आग एवढी जीवघेणी होती की त्या आगीत बरेचसे अस्पृश्य लोकं मरण पावले होते. त्यात काही लहानगी मुलंही होती. तशी पाण्याची सोय नसल्यानं अख्खी आग बिरादरीसकट गावातही पसरली. कारण आता त्या बिरादरीतील वस्तीला लागूनच गाव होतं. हळूहळू ती आग भडकू लागली होती. श्यामराव, गयाराम, शिवराम पाठोपाठ सर्व गावंच आज बेचिराख झालं होतं. गव्हाबरोबर सोंडाही पिसला गेला होता. होत्याचं नव्हतं तेच घडलं होतं. 
            एक विटाळ......त्या विटाळानं सर्व लोकांचा संसार उघड्यावर आला होता. अस्पृश्यांच्या झोपड्याच होत्या. शेणामातीच्या व कुडाच्या. त्यांची भांडीकुंडीही जास्त नव्हती. ना जनावरं होती त्यांच्याजवळ. ना धान्याची कोठारं होती त्यांची. परंतु उच्चवर्णीयांजवळ सारंच होतं. मोठमोठी घरं होती सागवानी लाकडाची. मोठमोठे गंज होते. जनावरं दुधदुभत्याची होती. त्यातच गावात प्रत्येकाच्या घरी धनधान्य भरभरुन होतं. आगीनं मात्र त्या कोणालाच सोडलं नाही. ती सर्व घरं सपाचट झाली होती. यात ज्यांनी आग लावली होती. त्यांचीही घरं जळून खाक झाली होती. मात्र या आगीत जो निसटण्यात यशस्वी झाला होता. तोच वाचला होता. ज्यात मैनाही होता आणि तिची आईही. तिची आई मात्र थोडीशी भाजली होती. 
          सकाळ झाली होती. अस्पृश्यांच्या दुःखाला पारावार नव्हता. बऱ्याचशा अस्पृश्यांची घरं आगीत भस्मसात झाली होती. सर्वत्र राखच राख पसरली होती. त्यातच स्पृश्यांची घरंही बेचिराख झाली होती. भांडीकुंडी पिघलली होती. जनावरं मृत्यूमुखी पडली होती. काही जनावरं तर आगीत भस्मसात झाले होते. सर्वच केविलवाणेपणानं रडत होते. एकमेकांकडं आशेनं पाहात होते. 
         सकाळ झाली होती. तसं त्या गावाची झालेली दुर्दशा. ती पाहणारी ती बस आज गावात आली होती. ती बस त्याच रस्त्यानं दुसऱ्या गावाला जात असे. त्या बसच्या चालकाने पाहिलं. पाहिलं की इथं एक गाव असून काल रात्री त्या गावात लागलेल्या आगीनं संपुर्ण गावंच नेस्तनाबूत झालं आहे. तशी त्या चालकाने ती बातमी तालूक्याला पोहोचवली व तालुक्यातून भन्नाट वेगाने तीच बातमी शहरात आली व प्रत्येक जण घडलेला प्रसंग पाहण्यासाठी गावाकडं भटकू लागलं. पत्रकारही व न्युज चैनलवालेही गावात शिरले होते. प्रत्येकाला विचारत होते आगीचं रहस्य. परंतु गावातील कोणीही ते रहस्य सांगायला तयार नव्हते. कोणी म्हणत होते की ती आग शॉटसर्कीटनं लागली. ती आग लावली गेली नाही. परंतु मैना जाणत होती की ती आग न्यायालयातून स्पृश्यांविरोधात आलेल्या निर्णयानं लागलेली आहे. परंतु त्याचे काही पुरावे नव्हते. म्हणूनच ती बोलू शकत नव्हती. 
         सारं गाव विटाळाच्याच करतुतीनं बेचिराख झालं होतं. त्यानंतर सरकारनं या गावाचं पुनर्वसन केलं. त्यांना मोठमोठी सिमेंट कॉंक्रीटची घरंही बांधून दिली. ज्यात अस्पृश्यांचाही समावेश होता. आता गावात याच पुनर्वसन दरम्यान नवी पिढी रहायला आली होती. ज्या पिढीत ना भेदभाव होता. ना कोणत्याच बाबींची कुरकूर. गाव कसं आनंदानं राहात होतं. ते सांगायला नको असंच ते चित्र दिसत होतं.
            काही दिवस शांततेत गेले. गावाचे आणि बिरादरीतील लोकांचेही. गावात कोणत्याही स्वरुपाचा कल्लोळ नव्हता. गावात आता ना विटाळ राहिलेला होता, ना कोणी जातीजातीतील भेदभाव मानत होता. असे शांततेत मैनेचेही दिवस गेले होते. आजही तिच्यासमोर शांतताच होती. अशातच तिची आई आज म्हातारी झाली होती. 
         तो मध्यंतरीचा काळ. त्या बिरादरीतील लोकांनी त्या काळात बरंच भोगलं होता. जी प्रकरणं घडून गेली होती. त्याचा गाजावाजाही झाला होता. बातम्याच्या बातम्या वर्तमानपत्रात रंगून आल्या होत्या. ज्यात मैनेचंही नाव होतं आणि तिच्या आईचंही. सर्व घडलं होतं. ज्याचं वर्णनही करता येत नव्हतं. 
          जे बिरादरीतील लोकांनी भोगलं होतं. तेच मैनेनंही भोगलं होतं. परंतु अशा कठीण समयी सांत्वन द्यायला ना तिचा भाऊ आला होता ना तिची बहिण आली होती. तसा आज मैनेला विचार आला होता. तो विचार रास्त होता. 
          ती विचार करु लागली होती. मीच माझ्या बहिणभावाला शिकवलं. मी जर शिकवलं नसतं तर आज माझे बहिणभाऊ याच गावात शेणामातीत लोळत राहिले असते. मी शिकवलं म्हणून त्यांना सुखाचे दिवस आले आणि ती मंडळी ते विसरुन मोठ्या दिमाखानं सुखात राहात आहेत. ना माझे अन् ना आपल्या आईचे हाल विचारत आहेत. विचार येत आहे की आपण याची अद्दल त्यांना घडवावी. कारण ते आजच्या घडीला बेईमान झालेले असून बेईमानासारखे वागत आहेत. 
         मैनेचा तो विचार. विचारांती तिनं विचार केला की आपण आपल्या भावाबहिणींना अद्दल घडवावी. त्यांच्यावरही न्यायालयात खटला दाखल करावा. जेणेकरुन त्यांना अद्दल घडेल. विचारांती तिनं जास्त वेळ न दवडता न्यायालयात खटला दाखल केला. त्यात एक कलम अशीही टाकली की आईबाबांची सेवा करणं हे फक्त एकाच लेकराचं कर्तव्य नसून ते इतरांचंही कर्तव्य आहे.
           मैनेच्या या याचीकेनुसार जर बाकीची मुलं तशी सेवा करीत नसतील तर त्यांनी तसा त्यांना पोषण्याचा पैसा द्यावा. जेणेकरुन त्यांचे बाकीचे आयुष्य सुखी व समाधानात जाईल. 
          ही जनहीत याचिका होती. कारण आजच्या काळात बरेचसे असे लेकरं होते की जे आपल्या मायबापाची सेवा करीत नव्हते. ते फक्त आपलाच स्वार्थ पाहात होते. यावर तिच्या भावाबहिणीनं प्रतिपक्ष वकीलामार्फत दलील दाखल केली होती की गावच्या घराचा हिस्सा काही त्यांनी घेतलेला नसून त्यात ते कधीच वाटा टाकणार नाहीत. तसे ते हक्कं सोडत आहेत. त्या बदल्यात तिनं आईची सेवा करावी. तिच्या औषधपाण्यालाही पैसा लावावा. 
         गावचं घर. ते घर नव्हतं तर शेणामातीनं बनवलेलं झोपडंच होतं. ते झोपडं तर केव्हाच जळून खाक झालं होतं. आज त्या ठिकाणी कोणतं निशाणही नव्हतं. मात्र तरीही ते तिचे भाऊबहिण म्हणत होते की त्या जागेवर त्यांनी हिस्सा मागीतलेला नाही. हक्कं सोडत आहेत. जे अस्तित्वातच नव्हतं. त्यावर दावा केला होता तिच्या भावाबहिणीनं. तसं पाहता त्यांची तिला कीव येत होती. 
          ती न्यायालयीन केस. मैना लढत होती ती केस आपल्या आईसाठी. त्या केसची दलील करतांना मैना म्हणाली, 
          "माय ऑनर, जे अस्तित्वातच नाही, त्या घराची गोष्ट करीत आहे माझी प्रतिपक्ष पार्टी. खरं तर तसं हे माझे प्रतिपक्ष वकील म्हणतात. परंतु मी आपणास सांगते की ज्या ठिकाणाचं अस्तित्व सांगतात माझे प्रतिपक्ष वकील. परंतु तिथं कोणतंच घर अस्तित्वात नसून खाली जागा आहे व त्यावर गावठाणाची मालकी आहे. माझ्या प्रतिपक्ष वकीलास विश्वास नसेल तर ते चौकशी करु शकतात त्या जागेची. तसंच न्यायालयाला मी सांगू इच्छीते की हा माझ्याच प्रतिपक्ष पार्टीनं अंगीकारलेला मार्ग म्हणजे केवळ बनवाबनवी करणारा मार्ग आहे.  यातून ते केवळ पळवापळवीची भाषा करीत असून केवळ  ते आपली अर्थात न्यायालयाची दिशाभूलच करीत आहेत. "
         ते न्यायालय.......त्या न्यायदानालाही ती बाब आश्चर्य करण्यालायक वाटत होती. तशी ती बाब तिच्या भावाबहिणीलाही आश्चर्यचकीत करणारी वाटत होती. तसं पाहता ती मंडळी बऱ्याच दिवसांपासून गावात आली नव्हती. गाव त्यांनी पाहिलं नव्हतं. गावात जे स्थित्यंतर घडलं होतं. तेही त्यांना माहीत नव्हतं. शेवटी न्यायालयातून एक आदेश निघाला की संबंधीत मालमत्तेची चौकशी करावी व तसा अहवाल पुढील तारखेस न्यायालयात दाखल करावा. 
          न्यायालयाचा तो आदेश.  त्या आदेशानुसार संबंधीत प्रकरणाची चौकशी झाली व त्या चौकशीनुसार त्या जागेवर कोणतीच इमारत वा झोपडं आढळलं नाही. तशीच ती जागा गावठाणाच्या ताब्यातील निघाली. तसा अहवाल संबंधीत चौकशीनुसार चौकशी अधिकाऱ्यानं न्यायालयात दाखल केला व ठरलं की तिथं अशी कोणतीच मालमत्ता मैना तशीच शांता व कौमुदीच्या वडीलाची नाही. तेव्हा त्यावर न्यायालयानं निकाल दिला की आईनं प्रत्येक मुलास जन्म दिल्यानुसार त्या आईची जेवढीही मुलं असतील. त्यांनी मायबापांना पोषणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. जर ते तसे मायबापाला पोषत नसतील तर त्यांनी तसा पोषणनीधी म्हणून काही रक्कम त्यांना द्यावी. जेणेकरुन त्यांचा उदरनिर्वाह होईल. तसा जर नीधी कोणीही देण्यास नकार दिल्यास त्याला दोन वर्षाची कैद व पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. 
         न्यायालयाचा तो निकाल. तसा मैनेला आनंद झाला होता. आता तिनं  आपल्या बहिणभावाकडून आपल्या आईला पोषण्याचा पोषणनीधी वसूल केला होता. आता तिचे भाऊबहिण दर महिन्याला तिच्या आईच्या खात्यात तिच्या आईचा पोषणनीधी पाठवीत होते.
            आज सगळं काही बरोबर होतं मैनेचं. ती आपल्या आईलाही सांभाळत होती. विटाळ अजुनही होता जुन्या पिढीत. जुन्या पिढीतील लोकं विटाळाला धरुन होते. परंतु नव्या पिढीच्या पाश्चात्य विचारसरणीनुसार त्यांच्यामध्येही आज बदलाव झाला होता. 
          सगळं काही बरोबर होतं. परंतु काळाला ते सगळं व्यवस्थीत ठेवणं पटत नव्हतं. त्यामुळंच की काय, असाच तो दिवस उजळला. तिच्या आईला काळानं अचानकपणे तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. त्याचं असं झालं की अचानक तिच्या आईची प्रकृती बिघडली होती. तिच्यावर बरोबर उपचार सुरु होता. परंतु वय झाल्यानं ती उपचाराला साद देत नव्हती. अशातच असाही तो एक दिवस उजळला व काळानं तिच्या आईला अलगदपणे उचलून नेलं. 
        आईचा मृत्यू. त्यातच त्या आईचा मृत्यू होताच तिनं आपल्या भावाबहिणींना पुरता निरोप पाठवला. परंतु ते मयतीलाही आले नव्हते. त्याचं मैनेला फार वाईट वाटत होतं. 
         आईचा अंत्यसंस्कार मैनेनंच पुरता आटोपवला. आता तिला एकटं वाटत होतं. लोकं म्हणत होते की तिनं विवाह करावा. परंतु ती ऐकेल तेव्हा ना. ती काही कोणाचं ऐकत नव्हती. आपल्याला विवाह करायचाच नाही असं ती बोलत राहिली. अशातच कोणीतरी तिला म्हणायचं की तिनं विवाह करावा. विवाह केल्यावर तिची काळजी घेणारा जोडीदार येईल. तिलाही करमेल व सर्व दिवसं आनंदात जातील. परंतु ती काही ते सल्ले ऐकत नव्हती. 
         दिवसामागून दिवस जात होते. काळ हळूहळू सरकत होता. अशातच मैनेच्या जीवनात एक राजकुमार आला. त्याचं नाव जयराम होतं. जयरामही पैशानं वकीलच होता. राजकुमारच तो. चांगले राजशी कपडे तो परीधान करायचा. 
         मैनेनं काढलेल्या केसेसनं जयराम अगदी भारावून गेला होता. तो तिची कामं करीत होता नव्हे तर तिला प्रत्येकवेळी केसेसमध्ये मदत करीत होता. हळूहळू त्याचं प्रेम वाढत चाललं होतं. त्यानंही बरेच दिवस विवाह केला नव्हता. 
         जयराम उच्चजातीचा होता. परंतु त्याच्या मनात भेदभावाला थारा नव्हता. तो विटाळ मानत नव्हता. तसाच त्याचेकडे उचनीचतेचा भेदाभेद नव्हता. कोणी जेव्हा आपल्यापेक्षा लहान व्यक्तीवर अत्याचार करीत असत. ते त्याला आवडत नव्हतं. तो तशा केसेस लढत होता की ज्यात गरीबांना न्याय मिळवून देता येईल. तो श्रीमंत होता आणि गरीबीतच पिजलेल्या लोकांचे खटले लढणं त्याला आवडत होते. 
         मैनेची आई जेव्हा जीवंत होती. तेव्हापासूनच तो तिच्या जीवनात आला होता. तो तिच्यावर मनापासून प्रेम करीत होता. त्याचं तिला मदत करणं म्हणजे एकप्रकारे प्रेमच होतं. जणू तिच्याचसाठी त्यानं विवाहही केला नव्हता. परंतु तो आपल्या प्रेमाला जाहीर करु शकत नव्हता. त्याला वाटत होतं की कदाचीत आपण जर आपलं प्रेम तिला सांगीतलं आणि तिला जर ते आवडलं नाही तर ती त्याला सोडून जाईल. त्यामुळंच की काय तो आपलं प्रेम जाहीर करायला घाबरत होता. अशातच तिची आई मरण पावली. ती एकाकी झाली. 
          लोकं तिला समजवीत होते की तिनं आता विवाह करावा. परंतु ती ते ऐकत नव्हती. त्यातच तिची एक दिवस प्रकृती बिघडली. प्रकृती एवढी बिघडली की ती बरेच दिवस न्यायालयात गेली नाही. कारण तिला उठणं बसणंही कठीण जात होतं. तशी ती प्रकृती खराब झाल्यानं ती बरेच दिवस न्यायालयात दिसत नसल्यानं जयरामला चिंता पडली होती. तशी तिची परिस्थिती चांगली झाल्यानं तिनं फोनही घेतला होता व न्यायालयीन कामकाज करीत असल्यानं तिनं आपली भाषाही सुधरवली होती. 
           जयरामला ती न्यायालयात दिसत नाही हे पाहून एक दिवस जयरामचा तिला फोन आला. 
           "हैलो, कोण?"
           "मी जयराम. जयराम बोलतोय."
            "जयराम बोलतोय. बोल. कुठे आहेस?"
             "न्यायालयात, दुसरं कुठं राहणार?"
            "बोल. बरेच दिवसानं फोन केलाय."
            "अं,  तू दिसली नाही बरेच दिवस न्यायालयात. म्हणून विचार केलाय की कुठं गेली म्हणून विचारावं.  बोल का आली नाहीस न्यायालयात?"
            "जयराम, प्रकृती ठीक नाही रे बरेच दिवसापासून. कशी येवू?"
           "फारच बिघडली आहे का प्रकृती?"
           "होय, साधं उठणं बसणंही होत नाही."
            "हो का? दवाखान्यात गेली होती का?"
            "कशी जाणार अन् कोण नेणार? माझ्या हाताशी असं कोणीच नाही. मी एकटी राहाते."
            "बरं मी येतो."
            "नको येवूस. लोकं काय म्हणतील. कोण आहे म्हणतील. नावबोटं ठेवतील. पहिलंच गाव आहे आमचं. गावात नावबोटं ठेवतात."
           "मग नावबोटं ठेवणारे दवाखान्यात का नेत नाही तुला? मी येतोच."
           "मी काय सांगेन लोकांना?"
           "सांगशील माझा भाऊ आहे म्हणून. मला उठणं बसणं जमत नव्हतं म्हणून बोलावलं त्याला असं सांगशील. लोकं काहीच म्हणणार नाहीत."
            "ठीक आहे. मी तसंच सांगणार. ये."
           जयरामनं तिचं बोलणं ऐकलं. ऐकताक्षणीच तो तिच्या गावाला आला. त्यानं तिला दवाखान्यात नेलं. तिला भरतीही केलं व तिची व्यवस्थीत काळजी घेतली. काही दिवसानंतर ती बरी झाली.
            मैना प्रकृतीतून सुधारली होती. तशी तिची जयरामनं फारच काळजी घेतली होती व तिची सेवा केली होती. त्यामुळंच ती सुधारली होती. त्याचा परिणाम हा झाला की ती त्याचेवर आता प्रेम करु लागली होती. 
         दोघांचही एकमेकांवर प्रेम होतं. परंतु ते प्रेम एकमेकांना माहीत नव्हतं. जयरामची तर हिंमतच होत नव्हती. परंतु मैनेला वाटत होतं की आपण आपलं प्रेम जाहीर करावं. तसा विचार करुन एक दिवस तिनं त्याला फोन केला. म्हटलं,
          "मला तुझ्यासोबत काही बोलायचं आहे."
          "बोल." जयराम म्हणाला. 
          "काही गोष्टी अशा फोनवर बोलायच्या नसतातच."
          "मग कुठे बोलणार?"
          "एखाद्या बागेत वा रेस्टॉरेंटमध्ये."
           "ठीक आहे."
           "मग केव्हा येवू भेटायला?"
           "तू म्हणशील तेव्हा."
           "उद्याच भेटूयात का?"
           "ठीक आहे." 
           जयरामनं पुष्टी केली. तसा दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच मैना घराच्या बाहेर पडली. ती शहरात आली व तिनं त्याला फोन केला. त्या फोननुसार तिनं त्याला एका सुसज्ज हॉटेलमध्ये बोलावलं. नाश्त्याची आर्डर दिली गेली. तसं त्यांचं बोलणं सुरु झालं. आधी मैना म्हणाली, 
          "माहीत आहे जयराम. माझी आई गेली तेव्हापासून मी एकाकी झालेय."
           "होय, माहीत आहे."
           "मला करमतही नाही."
           "होय, माहीत आहे."
           "मला एकटं राहावसंही वाटत नाही."
           "होय, माहीत आहे."
           "तुला करमतं."
           "होय, माहीत आहे."
           "होय, माहीत आहे. हे काय तुझं बोलणं झालं. जरा दुसरं काही बोल."
           "काय बोलू."
           "बोल की तुलाही करमत नाही."
           "होय, मलाही करमत नाही."
           "बोल की तुलाही एखाद्या मैत्रीणीची गरज आहे."
           "होय, मलाही एखाद्या मैत्रीणीची गरज आहे."
           "आता जयराम, पुरं झालं. तू दुसरं काही तरी बोल. तू काही आता लहान राहिला आहे का जयराम?"
           "काय बोलू?"
           "जयराम एक बोलू."
           "बोल."
            "रागवशील तर नाही ना."
            "नाही रागवणार."
            मैना बोलत होती. तसं ती काही बोलणार. त्याच्या मनातलं हवं ते बोलणार ते पाहून त्याच्याही मनात लाडू फुटतच होते. परंतु तो उतावीळ झाला नव्हता. मात्र त्याच्या मनात आता लड्डू फुटतच होते व तो तिच्या होकाराचीच वाट पाहात होता. अशातच ती म्हणाली, 
           "जयराम, आता मला माझा एकाकीपणा सहन होत नाही."
            तिनं तसं म्हणताच जयराम म्हणाला, 
           "मग विवाह करुन टाक एखाद्याशी व मोकळी हो. संसार बसव. त्याशिवाय तुलाही करमणार नाही."
           "होय. तसंच वाटतं मला आता. परंतु तसा कोणीही आतापर्यंत मला गवसला नाही आणि आता तर माझं विवाहाचं वयही निघून गेलं. काय करु."
           "भेटेल......भेटेल. प्रयत्न कर. "
           "जयराम, एक विचारु?"
           "विचार."
           एवढ्यात मैनेसमोर चहा आला होता. तसं तिनं चहाचा एक घोट घेतला व ती म्हणाली, 
            "जयराम, मला लाज वाटते तसं बोलायला."
            "बोल, बोल.  त्यात लाज कसली? हिंमत करुन बोल."
           ती काय बोलणार हेही जयरामला माहीत होतं. परंतु तो तिच्याकडूनच वदवणार होता. तशी ती बोलती झाली. म्हणाली, 
          "जयराम, तू माझ्याशी विवाह करशील?"
           मैनेनं अगदी हिंमत करुन त्याला प्रश्न केला. तसा तोही तिच्याशी विवाह करण्याचा बेत ठरवूनच होता. परंतु उतावीळपणा न दाखवता तो काही वेळ गप्प राहिला. तशी तीच म्हणाली, 
          "जयराम, तू सांगीतलं नाहीस."
          "काय सांगू?"
          "ह्याच विवाहाबद्दल. तू माझ्याशी विवाह करशील का म्हणून विचारलं मी. अन् हो किंवा नाही असं तू उत्तरही दिलं नाही साधं."
           "अगं हा विवाहाचा प्रश्न आहे. यावर उत्तर मी तरी कसा काय देवू. घरी विचारावं लागेल. थोडी सवड घ्यावी लागेल. मलाही नीट विचार करावा लागेल. वेळ लागेलच ना."
            "मग मी यावर होकार की नकार समजू?"
            "तू काहीही समज. परंतु मी आताच काही सांगत नाही." जयराम म्हणाला. तसे ते तेथून निघून गेले. 
            जयरामनं आपले विचार तिला सांगीतले नव्हते. मात्र ती उतावीळ झाली होती. तिला जयराम केव्हा होकार देतो व केव्हा नाही असं होवून गेलं होतं. तसे दोन तीन दिवस झाले होते. जयरामचा होकार काही आलाच नव्हता. 
          ते दोन तीन दिवस. ते दिवस अतिशय वेदनेत व विचार करण्यात गेले होते. ती त्याच्या फोनची वाट पाहात होती. आज चवथा दिवस सुरु झाला होता. तशी ती त्याला फोन लावणारच होती. तोच त्याचा तिला फोन आला. तसा त्याचा फोन तिनं उचलला. म्हणाली, 
            "बोल जयराम, काय झालं? विचारलं का घरी."
            "होय, विचारलं."
            "काय म्हणाले घरचे?"
            "घरचे म्हणाले की......."
            तो थोडा थांबला. तशी ती म्हणाली, 
            "काय म्हणाले घरचे? होकार की नकार दिला त्यांनी?"
            तिनं उद्विग्नतेनं अनेक प्रश्न विचारले. तशी ती शेवटी म्हणाली, 
          "ए,  सांग ना रे. असा भाव का खातोस?"
           तसा तो समजला व शेवटी उत्तरला. 
           "हो गं बये, होकारच दिला त्यांनी. मी तुझी परीक्षा घेत होतो आणि तू त्या परीक्षेत पास झालीय. तू मलाही आवडतेस. कालपासून नाही तर बऱ्याच दिवसांपासून. परंतु मी तुला सांगीतलं नाही. माझी हिंमत होत नव्हती तुला सांगायची."
          "हो का." ती मिश्कीलपणानं म्हणाली आणि चूप बसली. 
            त्यांचं ते प्रेम. ते प्रेम आता वृद्धींगत होत होतं. तसं त्यांनी आपला विवाह करायचा बेत आखला होता.   त्यातच काही दिवस जाताच त्यांनी आपआपला विवाह साजरा केला. 

*******************************************

            आज मैना जयरामसोबत खुश होती. ती शहरात राहात होती. परंतु तिला गावच्या आठवणी येत होत्या. आठवत होता तो गावातील विटाळ दूर करण्यासाठी केलेला संघर्ष. तो विटाळ आज दूर झाला होता. परंतु तिला आजही आठवत होती ती अटक. त्या गावासाठी तिनं प्रसंगी अटकही शोषली होती. 
          आज तिला आठवत होता तोही एक प्रसंग. त्या मध्यान्हं रात्री होत असलेली अस्पृश्यांची आरडाओरड. त्यातच बेचिराख झालेली ती बिरादरी. त्यातच बेचिराख झालेलं ते गाव. आज ते गाव पुनर्वसनातून उभं झालं होतं. परंतु ती रोमांचकारी आठवण आजही तिच्या अंगावर रोमांच उभे करीत होती. 
          आज तिला आठवत होते ते भाऊबहिण. ज्या भावाबहिणींसाठी तिनं आपल्या शिक्षणाचा त्याग केला होता. परंतु ते बेईमान निघाले होते. तिला आठवत होतं त्यांचं बेईमान निघणं. ते जर बेईमान निघाले नसते तर आज ती ना स्वतःला बदलवू शकली असती. ना तिनं गावाला बदलवलं असतं.  ना आज गावातील विटाळ दूर झाला असता. 
          तिनं जयरामशी विवाह केला. त्यातच तिला आज दोन पुत्ररत्न झाले होते. त्यातच तिनं त्या दोघांचंही नाव ठेवलं होतं. एकाचं नाव माधव तर दुसऱ्याचं नाव रुख्मीनी होतं. ते दोनही भाऊबहिण जेव्हा तिला प्रेमानं आई म्हणत. तेव्हा तिला त्यांच्यात तिचा बाप व तिची आई दिसत असे. ज्यांची तिनं अगदी आयुष्यभर काहीही अपेक्षा न करता निःस्वार्थपणानं सेवा केली होती. आज त्याच सेवेचा परीपाक होता की तिचे दोन्ही पुत्र चांगले शिकत होते. चांगले वागत होते. 
          तिला एकदाचा तो प्रसंग आठवत होता की तिनं एका व्यक्तीला विचारलं होतं. गावातील विटाळ कसा दूर होईल. त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं होतं. आपले पिढीजात कामधंदे बंद करुन. परंतु त्यावेळेस ती आपल्या पोटासाठी पिढीजात धंदाच करीत होती व तिला वाटत होतं की हा पिढीजात धंदा जर आपण बंद केला तर आपल्यावर उपासमारीचं संकट कोसळेल. आज तिला आठवत होता तो गावातील विटाळ. ज्या विटाळाला बंद करायला पिढीजात धंदे बंद करण्याची गरज पडली नाही. फक्त एका चिंगारीची गरज पडली. जी चिंगारी उन्हाळ्यात त्या बिरादरीतील विहीर आटल्यानं पडली होती. ती विहीर जर आटली नसती तर ना बिरादरीतील लोकांनी पाण्यासाठी आंदोलन केलं असतं, ना त्यांना विटाळंही दूर करता आला असता. 

********************************************

             जयराम व मैना आज म्हातारे झाले होते. तसे रुख्मीनी व माधव लहानाचे मोठे झाले होते. ते चांगले निघाले होते व ते सदैव आपल्या आईवडिलांची सेवाही करीत होते. तेव्हा तिला तिची आई आठवत होती. ज्या आईसाठी ती आपल्याच बहिणभावासोबत खटला लढली होती. नात्याला तिनं तराजूत मोजले होतं आणि आठवत होता तिला तिचा बाप. ज्या बापानं अपंग राहूनही केवळ धंदा शिकवला नव्हता तर जगण्याचं मोलही शिकवलं होतं. काल ते होते. म्हणूनच आज तिला तिच्या मुलांवर संस्कार करता आले होते. ते जर नसते तर आज तिही अभागी अंधविश्वासातच जगत राहिली असती. कारण म्हायदूनं मैनेला शाळेत घालण्याचं धाडस केलं. म्हणूनच गावात समाज परीवर्तन झालं होतं. परंतु ते पाहायला ना आज म्हायदू जीवंत होता ना त्याची पत्नी सुभद्रा. दोघंही केव्हाचेच देवाघरी गेले होते. आपल्या मुलीला मैनेला एकाकी सोडून. जर तिला ऐनवेळेला जयरामची मदत मिळाली नसती तर तिही केव्हाचीच या धरणीवरुन निघून गेली असती. 
         आज गावात विटाळ नव्हता. कारण पाश्चात्य विचारसरणी आज गावात शिरली होती. त्या पाश्चात्य विचारसरणीनं गावाचा चेहरामोहराच बदलवला होता. हे मैनेमुळंच घडलं होतं. म्हणूनच की काय, आजही लोकं मैनेला मानत होते. कारण तीच गावातील विटाळ दूर करणारी एकमेव शिल्पकार होती नव्हे तर गावाचं जे पुनर्वसन झालं होतं. त्या पुनर्वसनाचीही ती एकमेव शिल्पकार होती. त्यामुळंच की काय, तिच्याबद्दल गावाला आदर वाटत होता. 
           मैनेला कधीकधी गावाची आठवण येत असे. तेव्हा ती आवर्जून गावात येत असे. सर्वांच्या भेटी घेत असे आणि जेव्हा परतत असे. तेव्हा संपूर्ण गाव रडत असे. जणू त्यांना ती जात असतांना कोणीतरी आपल्यातीलच व्यक्ती दूर जात असल्याचं दुःख वाटत असावं. एवढं तिनं गावाच्या हितासाठी केलं होतं. गावाबद्दल केलं होतं. आजही गाव तिला आठवत होतं. विटाळाच्या बहाण्यानं का असेना, तिला कायमचं स्मरणात ठेवत होतं. आपल्याच घरचा एक सदस्य समजून. ती होती म्हणूनच विटाळ दूर करता आला होता. जातीजातीतील जातीभेदही दूर करता आला होता.
           मैना आज बसली होती परसबागेत. तशी तिला तिच्या आईची आठवण आली. ती आई, ज्या आईनं हिंमत न हारता तिचा बाप अपंग झाल्यानंतरही कंबर कसून संसारगाडा चालवला होता. इतकंच नाही तर तिची लेकरं बेईमान झाल्याचं शल्य अतीव प्रमाणात तिच्या मनामध्ये होतं. परंतु त्यावरही मात करुन तिच्या आईनं आपला संसार चालवला होता. कोणत्याही गोष्टीची तमा बाळगली नव्हती वा कोणतीही काळजी केली नव्हती. त्यातच आज जे काही ती बनली होती. ते तिच्या आईचेच उपकार होते. 
          मैनेला एकदाचा तो प्रसंग आठवत होता. तिचे भाऊबहिण गावाला येत नव्हते. आपल्या संसारात रममाण झाले होते. हे पाहून तिनं ती गोष्ट आपल्या आईजवळ काढली. तेव्हा आई म्हणाली होती, 
         "बाळ, जीवन असंच असते. कधी त्या जीवनात आनंद येते तं कधी दुःख. आता निसर्गाचंच पाय. कधी पाऊस जास्त येते तं कधी अजिबात येत नाय. मग कधी कोरडा दुष्काळ झेलावा लागते तं कधी ओलावा. असे हे प्रसंग. जीवनात असे प्रसंग येणारच बाळ. हिंमत हारायची नसते. धिटाईनं पुढं जा लागते. आता माह्यंच पाय. तुह्या बाप जवा पडला होता अपंग होवून. तवा म्या हिंमत हारली का? नाय नं. कशी धिटाईनं सामोर गेली. आज पाय. म्या जर अशी धिटाईनं त्यावेळेस सामोर गेले नसते तं म्या बी कवाचीच संपून गेले असते."
         आईचे ते बोल. ते बोल मैनेचं जीवन पालटून देणारे झाले. त्यानंतर मैनेनं आईला विचारलं,
          "आई, मी काय करायला हवं?"
           तो मैनेचा प्रश्न. त्यावर आई म्हणाली, 
          "मैने तुले लय मोठं व्हायचं हाय. तुह्या भावाबहिणीपरसबी लय मोठं. ते बेईमान झालं तं जावू दे. होयेत माह्यीच मुलं नं. म्या जर अशी कोणाले सांगत सुटले तं लोकं माह्याच तोंडात शेण टाकन. म्हणन का तुनं पोराईले संस्कार बरोबर नाय देले. तुले संस्कार बरोबर देताच आले नाय. तुनं लाडानं चढवलं होतं पोराईले. म्हणूनच ते बेईमान निगले. त्यावर माह्याजवळ उत्तर बी नसन. बाळ, पोरं चुकत बी असली तरी त्याईच्या चुका मायनं पदरात घ्याव्याच लागतेत. त्याईले शिक्षा देवून चालत नाय. तेच आईचं ह्रदय असतं. निर्मळ अन् तेवढंच कोमल बी. आतं मले तवाच आनंद होईन.  जवा तू आपल्या बी भावाबहिणीहून लई मोठी होशीन."
          मैनेला आई मार्गदर्शन करुन गेली की तिनं आपल्या भावाबहिणीहून मोठं व्हावं. तोच हुरुप मैनेला आला व ती विचार करु लागली तसं काही करण्याचा. ती विचार करीत होती की काय करायला हवं. जेणेकरुन आपण आपल्या भावाबहिणीहून मोठं होवू. विचारांती तसं तिला समजलं होतं की आपण असं तर कधीच मोठं होवू शकत नाही. तसे तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवले. ते मोठे झाले. कारण ते शिकले होते. आपल्यालाही शिकावं लागेल. शिक्षणानंच व्यक्ती फार मोठा होतो. तसा आदर्श तिच्या डोळ्यासमोर बाबासाहेबांचा होताच. परंतु खंत वाटत होती आता शिकायची. कारण तिचं वय वाढलं होतं. तशी शिकायची इच्छा तिनं आपल्या आईजवळ व्यक्त करताच तिची आई म्हणाली होती, 
          "बाळ, शिक्षणाले कधी वयाचं बंधन नाय. माणूस मरेपर्यंत शिकत असतो. मग त्याची लाज का बाळगावी? तुले जर शिकाचं हाये तं तू शिकू शकते. म्या सांगते का तुले जर शिकाचं असन तं शिक. लय शिक. म्या आणखी दोन घरचे कामं करीन."
            मैनेला आठवत होतं. तिच्या आईला तशी दोन घरची कामं करावी लागली नाही. परंतु शिकण्यासाठी जी हिंमत तिनं दिली होती. ती वाखाणण्याजोगी होती. त्यामुळंच ती शिकू शकली होती. बॅरिस्टर होवू शकली होती. तसाच तिला गावातील विटाळ आणि जातीभेद दूर करता आला होता. 
          आज ना म्हायदू होता ना तिची आई सुभद्रा होती. परंतु त्यांचे सल्ले आजही तिला आठवत होते. ज्या सल्ल्यानुसार तिनं आपल्या मुलाला घडवलं होतं व जी मुलं घडली होती. ती आता मुलांना तसेच इतरांना आता सांगत होती की जर माणसाला मोठं व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अन् मायबापाशिवाय मार्ग नाही.

********************************************

             ते पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर धो धो पाऊस पडत होता. थंडी वाजत होती. तशी मैना गोधडी पांघरुन अंथरुणातच पहूडली होती. म्हातारपणानं तिची प्रकृती तशी आता बरी राहात नसे. तिची प्रकृती आताही बरी नव्हती. थोडासा ताप होताच. त्यातच थंडी लागत असल्यानं ती अंथरुणातच होती. तसं पाहता तिची मुलं तिची फार काळजी घेत असत. अशातच काय झालं कुणास ठाऊक. अचानक तिला एक छातीत जोराची कळ आली. तसा तिनं सर्वांना आवाज दिला. जयरामनं तिचा हात हातात घेतला. तसा तो म्हणत होता. 
         "बाळांनो, अँबुलन्स बोलवा."
          ते शब्द शब्दच राहिले ओठातल्या ओठात. ती म्हणाली, 
           "नको अँबुलन्स अन् नको काही. मी आता काही वाचणार नाही. मात्र माझी अंतिम इच्छा आहे. माझी मयत गावातच करावी. मला गावातच दफन करावं. माझी अंतिम इच्छा होती, ती म्हणजे एकदा तरी गावाला जावं. परंतु ती पुर्ण झाली नाही. आता माझी मयतच गावाला करा. म्हणजे शेवटची माझी गावाला जाण्याची इच्छा तरी पुर्ण होईल."
          मैना बोलून गेली खरी. त्यानंतर अँबुलन्स बोलविण्यापुर्वीच तिनं जीव सोडला व ती गतप्राण झाली. त्यानंतर तिचं प्रेत गावाला नेण्यात आलं. तिथंच तिचा दफनविधीही करण्यात आला. त्यानंतर त्या गावच्या लोकांनी तिची गावातच समाधी तयार केली व त्या समाधीजवळ एक तिचा पुतळा तयार केला होता व त्या पुतळ्याखाली नाव लिहिलं होतं. 'परीवर्तनाची शिल्पकार ' खरंच तिनं अख्खं गाव बदलवून टाकलं होतं. तसाच विटाळ व जातीभेद कोसो दूर पळाला होता नव्हे तर पळायला लावलं होतं. तसं पाहता त्या गावाची तीच एक शान ठरली होती नव्हे तर तीच एक परीवर्तनाची शिल्पकार ठरली होती.
           विटाळ.......विटाळ तसं पाहता कायमचा संपला नव्हता गावातून अन् शहरातूनही.  तसा लोकांचा जातीभेदाचा विटाळ कोसो दूर गेला होता. कधीकाळी एखाद्या वेळेसच तो डोकं वर काढत असे. तसा तो विटाळ गेला असला तरी विटाळ संपला नव्हता कायमचा. त्यानं आता आपलं स्वरुप बदलवलं होतं. आजही विटाळ होता. बाळंतपणात बाळंतिणीचा विटाळ मानल्या जात होता तर माणूस मरण पावल्यास त्याचाही विटाळ मानल्या जात होता. तसाच कावळ्याचा कोणाला विटाळ होत नव्हता. हा कावळा सर्व जातीधर्माच्या लोकांना शुद्ध करण्याचं काम वेळोवेळी करीत असे. तसंच त्या लोकांना माणसातही आणण्याचं काम करीत असे. माणूस मेल्यानंतर त्यांच्या रेतीच्या पिंडाला शिवून. जणू मैनेनंच कावळ्याच्या रुपात जन्म घेतला होता की काय? अगदी वाटत होतं. 

**************************************************************************समाप्त ********

इतर रसदार पर्याय