Mall Premyuddh - 57 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 57

मल्ल प्रेमयुध्द


वीर हरला होता. दोन दिवस एकटा रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. वीर कोणाचाही फोन उचलत नव्हता. आर्या रूमवर येऊन गेली होती. त्याला माहित असूनही त्याने दरवाजा उघडला नव्हता. आबांचे खूप फोन येऊन गेले होते.आता पुन्हा फोन येत होता. शेवटी वीरने फोन उचलला.
"आर लेका काय हे?? काळजात पाणी पाणी झालं... आता फोन नसता उचलास ना तर म्या यणार व्हतो मंबईला...काय झालंय...? सुनबाई जिकल्या ह्याचा त्रास व्हतुय का तू तिथपर्यंत पोहचला नाईस म्हणून?"
"आबा म्हाईत न्हाय पण लै तरास व्हतोय... कुठतरी निघून जावस वाटतय.."
"दोन दिस ये इकडं बर वाटलं.."
"नको आबा तिकडं तुमच्याशिवाय कोण बी बोलत न्हाय... नको मी हितचं बरा हाय पण???"
"पण काय?"
"आबा आर्या अन तिचा बाप लई तरास देत्यात नको झालय, आर्या लग्नासाठीं मग लागली."
"मग काय तिला सांग घटस्फोट झाल्यावर करू..."
"आबा तुमचा पोरगा तुमच्यापासन लांब गेला तर चाललं का तुमास्नी?"
"म्हंजी???"
"आबा बालिश हाय ती , पैशाचा मज हाय बाप लेकीला... आबा लग्न झाल्यावर ती न्हाय ..."एवढं बोलून वीरने फोन ठेवला आणि स्विच ऑफ केला.

त्याने पटकन त्याची बॅग भरली आणि भायर पडला.


आशा,दादा,क्रांती तिच्या सासरी आले होते.

आबा बाहेर झोक्यावर बसले होते.
क्रांती, दादा, आशा आत येणार तोच सुलोचना बाईंनी आवाज दिला.
" सुनबाई दरवाजात थांब... आत पाऊल ठेव नकस."
क्रांतीने यायच्या आधी सुलोचनाबाईंना फोन केला होता.
" मी येणारे..."
पण मग अचानक असं का बोलल्या? क्रांती दारातच थबकली. दादा आशा एकमेकांकडे बघायला लागले. सुलोचनाबाई आणि तेजश्रीने औक्षणाचा ताट आणलं आणि तिचा पाय धुतले. औक्षण केल. पेढा भरवला. क्रांतीचे डोळे पाण्याने भरले.
" क्रांती सुखात रहा असच मोठ हो... अजबात माग फिरून बघू नकस आता..." तिने सुलोचनाबाईंच्या आणि तेजश्रीला नमस्कार केला. तेवढ्यात संग्राम वरतून आला. ती संग्रामच्या पाया पडली. आबांकडे गेली आणि आबांना नमस्कार केला. आबा काहीही न बोलता त्यांच्या रूमकडे निघाले. क्रांतीने आवाज दिला.
" आबा लेकीचं कौतुक नाय करणार का? "आबा शांत होते. आबा काहीही न बोलता तसेच वरती गेले. क्रांतीला वाईट वाटले.
" सुनबाई नको वाईट वाटून घेऊस... क्रांतीने डोळे टिपले आणि देवघरात नमस्कार करायला गेली. देवघरात नमस्कार केला. दादा बाहेर बसले होते. क्रांती स्वयंपाक घरात गेली सुलोचनाबाई जेवायला ताट करत होत्या.
"आत्याबाई हे काय करताय?"
"गोडाधोडाचे बनवलया... माझी लेक एवढी जिंकून आली, मग तिचं कोड कौतुक करायला गोडधोड नको करायला का?" क्रांतीने सुलोचनाबाईंना मिठी मारली आणि भरपूर रडून घेतलं. क्रांती यापूर्वी इतकी रडवेली कधीच बघितली नव्हती. खमकी क्रांती हळवी झाली होती.तेजश्रीने तिच्या पाठीवरून हात फिरवला.
" क्रांती सगळं नीट व्हईल... तू फक्त हरू नकोस.. सुलोचनाबाईपासून ती लांब झाली आणि डोळे पुसले.
सगळ्या सगळ्यांची जेवण वगैरे झाली. क्रांतीने पुन्हा सुलोचनाबाईंना मिठी मारली.
"आत्याबाई येते."
"परत कधी येशील?"
परत ईन का? माहित नाय." तेजश्री आली. तेजश्रीने तिला हळद कुंकू लावलं आणि हातात साडी दिली.
"जाऊबाई हे कशासाठी?"
" बघ जाऊबाई म्हणतीस ना ... अजून नात संपलं नाय आपलं.. अजून हाय आणि जाऊ बाई म्हणून लय कौतिक हाय तुझं..." सुलोचनाबाईंनी तिच्या हातात बॉक्स दिला.
" आता आत्याबाई हे काय?"तिने उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये सोन्याच्या अंगठी होती. आत्याबाई जाऊबाईंनी दिलेलं मी आनंदाने घिन, पण एवढी महागडी गोष्ट आता मला नको. सुलोचनाबाई म्हणाल्या,
"अगं लेक म्हणवते मी तुला माझी, असं कसं तुला रिकाम्या हातान पाठवू ग बाई आणि परत यायचय तुला.. बघ मी तुला जबरदस्ती करत नाय, की माझी सून म्हण परत ये,पण तू ये... तुझं येन आमच्यासाठी लय महत्त्वाच हाय."
दादा आणि आशा त्यांचं नातं जवळून बघत होते. दादांना शब्द फुटत नव्हते. शेवटी आशा न राहून म्हणाली.
"सुलोचनाताय आपण परत त्यांची मन बदलायला लावू... विचार करू आन.. दोघांना समोरासमोर बसवू...असं कसं लगीच काडीमोड घेता येतो..." आशा बोलली दादा तिच्याकडे रागाने बघायला लागले.
" आव रागाने बघू नका... असं संसार तुटतो व्हय.. एकदा माझा ऐका..." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"आशाताय आम्हाला सगळं तुमचं कळतंय... तुमच्या पोरीच्या आयुष्याचं मात्र व्हतंय, माझ्या पोराचा विचार जर नीट नसल तर मी पोरीच्या आयुष्याचं का मातेर हुन द्यायचं. आशाताय त्यांची इच्छा असल तर परत ते एकत्र येत्याल. आपण नाय मधी पडायचं. पोर आता मोठी झाल्यात हायत... त्यांना कळतं काय करायचं काय नाय.. त्यात आपण मधी पडणं चूक हाय... नशिबात असेल ते व्हईल तुमी नका काळजी करू."

" खरं बोलताय तायसाब तुमी..." जे त्या दोघांच्या नशिबात हाय तसच व्हईल, पण त्यांच्या मनाविरुद्ध आपण पुढ जाणार चुकीच हाय, तुमी एकदम खरं बोलताय... आबासायबांनी अबोला धरला त्याच वाईट वाटलं फक्त, असं त्यांनी नक करायला पाहिज व्हत."
सुलोचनाबाई म्हणाल्या,
" दादासायब तुमी नका काळजी करू, ते त्यांच्या पोराच्या बाजून इचार करत्यात, त्यांना तो चुकीचा हाय हे कळत नाय. सुनबाईची चूक दिसती. त्यांना तीन पुढ जाऊ नय असं वाटतया.

त्यांनी माझ्याबरोबर पण हेच केलं, तेजश्रीच्या बरोबर पण हेच केलं आणि आता क्रांती ऐकत नाय म्हटल्यावर त्यांची मन दुखवल म्हणून ते त्यांच्या पोराच्या पाठीमाग ठाम उभं हायत."

" पोरीच एका महिन्यात असं झाल्यावर कुठल्या बापाला वाईट वाटणार नाय, वाईट वाटतंय, गावात लोक चर्चा करत्यात. त्यांना वाटलं पाटलाची सून, एवढी मोठी कर्तबगारी करून आली. म्हटल्यावर गावात त्यांच्या मिरवणूक काढत्याल पण तसं काय झालं नाय. लोक रोज इचारतात काय झालं? काय झालं ? आम्ही जे ते खरं सांगतोय पण गावात एक चर्चेला विषय मिळाला एवढं खरं..."
"दादा तुम्ही नका काळजी करू बघू, एकदा मी विरला समजवणार हाय" संग्राम म्हणाला.
क्रांतीने संग्राम कडे बघितल.
"भाऊजी नको भूषणच्या भाऊजींच्या डोळ्यात मी बघितलय त्यांना किती त्रास झाला तो... ते मित्र व्हते त्यांचे, त्यांनी सहन केल.. पण एक भाऊ म्हनुन किती सहन कराल तुमी, नका बोलू.

" खरतर मी भूषणला त्याचवेळी म्हणलो त्याच्याशी बोलण्यात काय अर्थ नाय पण मला एक वेळ वाटतंय त्याच्याशी बोलावं म्हणून."
"नको भाऊजी जे व्हईल ते दोघांच्या नशिबात असलेलं व्हईल तुम्ही नका बोलू त्यांच्याशी."

संग्राम म्हणाला, " ठीक आहे बघू जे होईल ते होईल.."

क्रांतीने पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार केला आणि निघाली.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


इतर रसदार पर्याय