Geet Ramayana Varil Vivechan - 47 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 47 - लंकेवर काळ कठीण आज पातला

युद्ध अखंड सुरू असते. वानरसेना राक्षस सेना एकमेकांना शस्त्राने उत्तर देत होती.

इकडे मेघनाद राम व लक्ष्मणांना नागपाश बाणाने बंदिस्त करतो त्यामुळे वानर सेनेत गोंधळ आणि दैत्य सेनेत विजय सुरू असतो पण गरूडला बोलावण्यात येते व तो ते नागपाश् तोडून श्रीराम व लक्ष्मण यांना मोकळे करतो. पुन्हा श्रीराम व लक्ष्मण युद्धात सहभागी होतात.

युद्धात रावणाचा सेनापती प्रहस्त नील वानरकडून मारला जातो. त्यामुळे रावण युद्धात सहभागी होतो.


श्रीराम रावणाशी तर लक्ष्मण रावण पुत्र इंद्रजित शी तोडीस तोड युद्ध करण्यात गुंततात. विभीषण,सुग्रीव,हनुमान,नल निल अंगद सगळे युद्धात गुंततात.


लक्ष्मणाला जेव्हा कपटाने सुद्धा जिंकता येत नाही हे बघितल्यावर रावण पुत्र मेघनाद उर्फ इंद्रजित ने लक्ष्मणावर शक्ती बाणाचा प्रयोग केला त्यामुळे लक्ष्मण मूर्च्छित पडले. ते बघून राम सेनेत एकच हलकल्लोळ झाला. राम,हनुमान,विभीषण सगळे लक्ष्मणजवळ आले. लक्ष्मणाला बेशुद्धावस्थेत पाहून रामांना काळजी वाटू लागली त्यावर विभीषणानी लंकेतील वैद्य सुषेन ला बोलावण्यास सांगितलं.


लक्ष्मण बेशुद्धावस्थेत आहे हे पाहून आता तो नक्की मरणार असे वाटून मेघनाद आपल्या प्रासादात निघून जातो.


हनुमानाने सुषेन वैद्याला बोलावून आणले. वैद्याने सांगितल्यानुसार लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी वनस्पती आणण्याची आवश्यकता होती. सूर्योदयापूर्वी लक्ष्मणास त्या वनस्पतीचा रस पाजणे आवश्यक होते.


हनुमानाने संजीवनी वनस्पती आणण्याची तयारी दर्शवली. हनुमान एक झेप घेऊन काही वेळात द्रोणागिरी वर पोचले परंतु एवढ्या सगळ्या वनस्पतींमध्ये नेमकी संजीवनी कुठली हे ओळखू न आल्याने त्यांनी संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच हातात उचलून आणला.


ते पाहून सगळेच अचंबित झाले. वैद्यांनी त्यावरील संजीवनी बुटी चा थोडा पाला घेतला व त्याचा रस लक्ष्मणाच्या मुखात टाकताच काही वेळाने लक्ष्मणाला शुद्ध आली. इकडे वानरसेनेत मुख्य योद्धे जागेवर नसल्याने चलबिचल झाली. सुग्रीव,अंगद त्यांना प्रोत्साहित करीत होते. राक्षस त्वेषाने वानर सेनेवर हल्ला करू लागले. परंतु लक्ष्मण शुद्धीवर येताच श्रीराम,हनुमान,विभीषण व स्वतः लक्ष्मण सगळे पुन्हा युद्धास सज्ज झाले. काही काळातच युद्ध भूमीचे चित्र बदलले. त्वेषाने लढणाऱ्या राक्षसांना पड खावी लागू लागली.


आता युद्धात वानर सेनेची सरशी होऊ लागली. श्रीरामांनी तर बाणांच्या वर्षावाने रावणाचा सारथी मारला,रथाचे चाक मोडले,छत्र उडविले. बाणांचा मारा करून रावणाला नामोहरम केले. रावण रामांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हबकून जातो,थकून जातो,शस्त्र हाती घेण्याचेही भान त्याला राहत नाही तेव्हा युद्ध धर्मा प्रमाणे निशस्त्र व्यक्तीवर हल्ला करणे योग्य नाही हे जाणून श्रीराम रावणाला म्हणतात,


"रावणा आता तू थकलेला आहेस. आपल्या प्रासादात जाऊन विश्राम कर आणि उद्या युद्धास पुन्हा सज्ज हो.",रामांचे हे बोलणे ऐकून रावण लज्जित होऊन आपल्या प्रासादात येतो.


रावण आता काळजीत असतो. रावणाचे मेघनाद सोडला तर सगळे पुत्र युद्धात कामी आले असतात. आता कोणाचे साहाय्य घ्यायचे ह्या विवंचनेत असताना अचानक रावणाच्या डोक्यात त्याचा कनिष्ठ बंधू कुंभकर्णाचा विचार येतो.


[कुंभकर्ण हा रावणापेक्षा लहान तर विभीषणापेक्षा मोठा असतो. एकदा रावण,कुंभकर्ण व विभीषण अरण्यात जाऊन ब्रम्ह देवाची आराधना करत असतात. त्यांच्या कठोर तपश्चर्येने ब्रम्हदेव त्यांच्यासमोर प्रकट होतात व इच्छित वरदान मागण्यास सांगतात त्यावर रावण ब्रह्मदेवांना अमर होण्याचे वरदान मागतो त्यावर ब्रम्हदेव चतुराईने त्याला म्हणतात की रावणा तुला न देव न दैत्य कोणीही मारू शकणार नाही. ह्यावर रावण खुश होतो त्याला वाटते मानव एवढा शक्तिशाली असूच शकत नाही त्यामुळे मला मानवापासून काही धोका नाही.


त्यानंतर कुंभकर्ण इंद्रासन मागण्याच्या बेतात असतो पण त्याचा हा बेत आधीच माहीत असलेला इंद्र विष्णूंकडे मदतीसाठी जातो. तो म्हणतो की हे प्रभू! कुंभकर्णाने जर इंद्रासन मागितलं तर मी कुठे जाऊ? तसेच दानव स्वर्गात आले तर इथे हाहाकार होईल तेव्हा कृपया काहीतरी उपाय करा. ह्यावर श्रीविष्णू देवी सरस्वती ची मदत घेतात. जेव्हा कुंभकर्ण ब्रह्मदेवास वरदान मागण्यास तोंड उघडतो तेव्हा त्याच्या जिभेला देवी सरस्वती नियंत्रित करतात आणि कुंभकर्णाच्या तोंडून 'इंद्रासन' ऐवजी 'निद्रासन' म्हंटल्या जाते व ब्रम्हदेव त्याला तथास्तु म्हणतात. पण कुंभकर्ण आश्चर्य चकित होतो की असे आपल्या तोंडून कसे निघाले? तो ब्रम्हा देवांना म्हणतो की हे देवा माझ्याकडून चुकीने निद्रासन मागितल्या गेले आहे तरी आपण मला पुन्हा वरदान मागण्याची परवानगी द्या. तेव्हा वरदान फक्त एकदाच मागता येते असे ब्रम्हदेव त्यास म्हणतात. तेव्हा कुंभकर्ण म्हणतो की देवा मी कायम झोपेतच राहिलो तर माझ्या आयुष्याचा काय फायदा? तेव्हा ब्रम्हादेव म्हणतात की फारफार तर मी तुला सहा महिने जागे राहण्याचा व सहा महिने झोपण्याचा वर देतो.


कायम झोपण्यापेक्षा हा वर बरा असे वाटून कुंभकर्ण तो वर स्वीकारतो. तेव्हा पासून कुंभकर्ण सहा महिने जागा आणि सहा महिने झोपू लागला.]


रावण सेवकांना कुंभकर्णाला उठवण्याची आज्ञा देतो. मोठमोठे वाद्य, तुताऱ्या,रण दुन दुभी कर्कश्य कर्णे वाजवून सुद्धा कुंभकर्ण उठत नाही. त्यानंतर हत्तींचे कळपच्या कळप त्याच्या अंगावरून जातात तरीही एखादी माशी हाकलावी त्याप्रमाणे तो फक्त थोडा हलतो पण उठत नाही. मग पंचपक्वान्नाचा सुगंध त्याला देण्यात येतो तो घेऊन मात्र कुंभकर्णाची झोप चाळवते व तो एकदाचा उठतो आणि रावणाचा जीव भांड्यात पडतो.


उठल्या उठल्या पोटभर जेवल्यावर एक ढेकर देऊन तो रावणाला त्याच्या उठवण्याचे कारण विचारतो. तेव्हा रावण त्याला शूर्पणखेच्या कथेपासून संपूर्ण माहिती सांगतो. ते ऐकून कुंभकर्ण रावणास म्हणतो,


"रावणा भावा! योग्य वेळी तू मला जागे केले आहे. खरंच लंकेवर फारच बिकट परिस्थिती आली आहे. नियतीच्या नियमानुसार पापी माणूस स्वतःचा नाश करून घेतच असतो आणि वाईट कर्म करणाऱ्याला नरकातच जावे लागते. तू सुद्धा तुझ्या उन्मत्त वागण्याने लंकेवर तीच वेळ आणली आहे.


सदैव तू तुला जे हवं तेच करत राहिला,कोणी दिलेला भल्याचा सल्ला तुला कधीच आवडला नाही. विभीषणाचा सल्ला तू झिडकारला तुला त्याचे बोलणे आवडले नाही पण तेच तुझ्या भल्यासाठी होते हे तुला कळले नाही. विनाकारण एक चांगला माणूस तू दुरावला. मंदोदरी ने पदोपदी तुला समजावले पण तिच्या भावना तू पायदळी तुडवल्या. वेळप्रसंग काय आहे,परिस्थिती काय आहे? कुठे नमते घ्यावे कुठे ताठ राहावे हे तारतम्य तुला कधीच जमले नाही. मनाला वाटेल तसे वाटेल तेव्हा तू वागत राहिला. चांगले सल्ले देणाऱ्या सचिवपेक्षा खूषमस्करेच तू तुझ्या सचिवपदी निवडले. तुला जे जे ऐकण्याची इच्छा होती तेवढं तू ऐकलं जे तुला आवडत नव्हतं ते कल्याणाचे असूनही तू ऐकले नाही त्यामुळे तुझ्याच हाताने तू तुझे अधः पतन केले आहे.",एवढं कुंभकर्ण बोलल्यावर रावण त्याला म्हणतो,


"कुंभकर्णा ही वेळ उपदेश द्यायची आहे का? त्यासाठी मी तुला उठवले का?"


ते ऐकून ह्याला सांगून काही फायदा नाही हे कळून कुंभकर्ण म्हणतो,


"मला माहित आहे ही वेळ उपदेशाची नव्हे पण एक भाऊ म्हणून जे सांगण्यावाचून राहवलं नाही तेच मी तुला सांगितलं पण काळजी करू नको. एका भावाचे कर्तव्य मी जाणतो. युद्धात मी तुला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आता निश्चिन्त राहा. आता बघ युद्ध भूमीवर मी कसा शत्रूच्या रक्ताने युद्ध भूमी न्हाऊ घालतो. अरे जिथे मी देवांचा राजा इंद्राला मारू शकतो तिथे हा मामुली मानव राम माझ्यापुढे काय टिकणार? संपूर्ण समुद्र गिळण्याची,अग्नीला भक्षण्याची ज्यात शक्ती आहे तो कुंभकर्ण युद्धभूमीवर उभा राहिला की बघ कशी शत्रूची दैना होते.",एवढं बोलून कुंभकर्ण रावणाला आश्वस्त करताना म्हणतो ,


"रावणा माझे हे वचन हाच तुझा विजय समज. मी युद्ध भूमीत जाणार म्हणजेच तुझा विजय निश्चित आहे तेव्हा काळजी करू नको. सुखाने प्रासादात जाऊन मद्यप्राशन करत आपल्या जिंकण्याचे स्वप्न बघत विश्राम कर. तुझ्या काळजीचा भार वाहायला हा तुझा भाऊ समर्थ आहे.",कुंभकर्णाने असे म्हणताच रावण अत्यंत आनंदित होतो व प्रेमभराने भावाला आलिंगन देतो व पडत्या फळाची आज्ञा घेऊन अत्यंत निश्चिन्त मनाने आपल्या प्रासादात मद्यपान करावयास जातो.


(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)


महाकवी ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे सत्तेचाळीसावे गीत:-


योग्य समयि जागविले बांधवा, मला

लंकेवर काळ कठिण आज पातला


पाप्याप्रति आत्मघात

दुष्कर्त्म्या नरकपात

अटळचि जो नियतीनें नियम योजिला


तव मानसिं दर्प-गर्व

विषमय तव आयु सर्व

बोधशब्द कधिं न मधुर तुजसिं लागला


विभिषणकृत सत्यकथन

अप्रिय परि पथ्य वचन

झिडकारुन एक आप्त तूंच हरविला


मंदोदरि विनवी नित

हित गमलें तुजसि अहित

भाव तिचा पायतळीं व्यर्थ तुडविला


पाहुनिया देश समय

पडताळुन न्याय, अनय

कार्याप्रति हात कधी तूं न घातला


मनिं आला तो निर्णय

ना विचार वा विनिमय

सचिव कुणी पारखुनी तूं न पाहिला


प्रिय तितकें ऐकलेंस

अप्रिय तें त्यागिलेंस

यांत घात तूंच तुझा पूर्ण साधिला


उपदेशा हा न समय

लंकेशा, होइ अभय

कर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला


बोलवि मज बंधुभाव

रणिं त्याचा बघ प्रभाव

रिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्विला


सहज वध्य मजसि इंद्र

कोण क्षुद्र रामचंद्र!

प्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्‍निला


वचन हाच विजय मान

करि सौख्ये मद्यपान

स्कंधी मी सर्व तुझा भार घेतला

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय