Geet Ramayana Varil Vivechan - 46 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 46 - अनुपमेय हो सुरू युद्ध राम रावणांचे

अंगदने रामांना रावणाचा मनोदय सांगितला त्यावरून युद्ध आता अटळ आणि अपरिहार्य आहे हे रामांना कळलं एका शुभ मुहूर्तावर युद्ध आरंभाचा शंख ध्वनी दोन्ही बाजूंनी झाला आणि राम सेना व रावण सेनेचे तुंबळ युद्ध सुरू झाले. रणांगणावर सर्वत्र बाणांचा वर्षाव होऊ लागला. सगळेजण त्वेषाने मोठमोठ्याने गर्जना करीत होते जणू सगळ्यांच्या मुखातून विद्युल्लता कडाडत होती. त्या अतिप्रचंड आवाजाने दोन्हीकडच्या सैन्यातील घोडे थय थय नाचत खिंकाळत होते त्याच्या जोडीला हत्ती सुद्धा गर्जना करीत होते. त्या आवाजातच वानर सेना व राक्षसांच्या चालण्याचे लयबद्ध आवाज मिसळले.


वानर सेना दात ओठ खाऊन दैत्य सेनेवर तुटून पडत होती. दैत्य सुद्धा त्यांच्याशी बरोबरीने लढत होते. वानर उंच उड्या मारत वृक्ष आणि पर्वत दैत्यांवर फेकत झुंजत होते.


कधी दैत्यांवर वरचढ होत कधी त्यांच्याकडून मार खाऊन घेत तोंडाने जय दाशरथी(श्रीराम) जय तारा पुत्र(अंगद) असा जयघोष करत शर्थीची लढाई लढत होते. दोन्ही कडचे अजस्त्र सैन्य पाहून असे वाटत होते जणू दोन महासागर एकमेकांशी झुंजत आहेत.


गदा, शूळ किंवा शक्ती(सगळे शस्त्रांचे नाव आहेत) लागून कधी वानर तर कधी दैत्य रणांगणात धारातीर्थी पडत होते. दैत्य 'जय लंकाधिपती' असा जयघोष करत वानरांना तोंड देत होते. जसा चारही बाजूने पाण्याने घेरलेला भूभाग दिसतो त्याप्रमाणे वानर व दैत्य सेनेच्या मध्ये अश्वारूढ, गजारूढ योद्धे द्विपाप्रमाणे भासत होते. बाण लागताच असे हे द्विपासम योद्धे घोड्यासकट कोसळत होते. प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून मारा झोडा ठोका तोडा ह्याच अर्थाचे शब्द निघत होते.


मृत्युमुखी पडून रक्त मांसाच्या चिखलात पडलेल्या योद्धयांच्या चेहऱ्यांवर रणांगणात लढत लढत, आपले कर्तव्य करत मरण्याचा आनंद ओसंडत होता. त्यांचे मृतदेह जिवंत असलेल्या योद्धयांकडून त्वेषाने लढताना आपोआपच तुडवल्या जात होते. संपूर्ण रणांगणावर लाल भडक रक्ताचे पाट वाहू लागले.


मृतदेहावर मृतदेहांचा खच पडू लागला. दैत्य,वानर कोणाचे मृतदेह पडत होते त्याकडे लक्ष देण्याला ही कोणाला वेळ नव्हता. सगळे लढण्यात गुंतले होते. मृत्यू पेक्षाही सगळ्या योद्धयांचे शौर्य हृदयाचा थरकाप उडवत होते. शस्त्रांच्या घावाने कोणाचे हात कोणाचे पाय कोणाचे शीर लांबवर जाऊन पडत होते. कोणाचे शीर नसलेले धड तडफडत होते.

छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेहांचे अवयव सर्वत्र पडत होते. धरणी आकाश भयाने थरथरतील एवढा महाभयंकर उत्पात प्रलय माजला होता.


त्या भयप्रद रणधुमाळीत कोणाला कोणाचे भान उरले नव्हते, प्रत्येक जण थोड्या थोड्या अंतराने काळाच्या मुखात प्रवेशत होते.


{युद्धाने फक्त विध्वंस च होऊ शकतो आणि त्यात सामान्य जनतेचाच बळी जातो हे वरील प्रसंगावरून कळते. त्यामुळे मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी शक्यतो सामोपचाराने घेण्याकडेच कल ठेवणे श्रेयस्कर ठरते.}


(पुढे रामकथेत काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)


कवी ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे सेहेचाळीसावे गीत:-


नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे

अनुपमेय हो सुरू युद्ध हे रामरावणांचे


सशंख राक्षसगण तो दिसला

कृष्णघनांवर बलाकमला

मुखांतुनी शत गर्जे चपला

रणांगणावर कोसळलें तों पाऊस बाणांचे


नाचत थय थय खिंकाळति हय

गजगर्जित करि नादसमन्वय

भीषणता ती जणूं नादमय

त्या नादांतच मिळले पदरव प्लवग-राक्षसांचे


दंत दाबुनी निज अधरांवर

वानरताडण करिती निशाचर

नभांत उडती सदेह वानर

शस्‍त्र म्हणुन ते घाव घालिती वृक्ष-पर्वतांचे


"जय दाशरथी, जय तारासुत"

प्रहार करिती वानर गर्जत

झेलित शस्‍त्रां अथवा हाणित

भरास आलें द्वंद्व जणूं कीं महासागरांचे


गदा, शूळ वा लागुन शक्ति

राक्षस वानर घेती मुक्ति

रणांत पडती अपुल्या रक्तीं

'जय लंकाधिप' घोष घुमविती अरी वानरांचे


द्वीप कोसळे, पडला घोडा

वर बाणांचा सडा वांकडा

'हाणा मारा, ठोका तोडा'

संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे


रणांत मरतां आनंदानें

मांसकर्दमीं फुलतीं वदनें

तींहि तुडविलीं जातीं चरणें

रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे


कलेवरावर पडे कलेवर

ऋक्ष, निशाचर, नकळे वानर

मरणांहुनही शौर्य भयंकर

कैक योजनें उडुनी जाती भाग अवयवांचे


चक्रें, चरणें, हस्त, लांगुलें

शुंडा, ग्रीवा, शिरें, पाऊलें

पडलें तें शतखण्डित झालें

प्रलयकाळसें अंग थरारे धरणी-गगनाचें


द्वंद्व तरी हो कुठें कुणाचें

काळमुखांतुन कोणी वांचे

कुठे कुणाचें कबंध नाचे

धुमाळींत त्या कोणा नुरले भानच कोणाचे

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय