posy of poems books and stories free download online pdf in Marathi

कविता संग्रह



MATITLYA KAVITA
मातीतल्या कविता

प्रकाशक निर्मला शिंगाडे मो नं ९३७३३५९४५०
कवी अंकुश शिंगाडे
१२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर ४४००३५ मो नं ७२७६८१७१९७
अक्षरजुळवणी अंकुश शिंगाडे
प्रथमावृत्ती १५ ऑगस्ट २०२१
मुल्य ७५ ₹
तमाम कष्टकरी शेतकरी बांधवास सादर समर्पीत

मनोगत

मातीतल्या कविता हा माझा पाचवा काव्यसंग्रह वाचकांना देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या संग्रहात कष्टकरी, प्रेषीत, दुःखी लोकांच्या कविता आहेत.
जन्म जाहला ज्या मातीतूनी
ती माती पावन व्हावी
युगे युगे तिचे नाव चालावे
ही माझी वाणी खरी ठरावी
माती खरंच पवित्र अशी वस्तू आहे. ती नसेल तर आपल्याला शेतकरी अन् पिकवून देणार नाहीत. ती नसेल तर कुंभाराला मडकेही बनविता येणार नाहीत. अन् ती नसेल तर आपण व्यवस्थीत उभेही राहू शकणार नाही.
समाधान कवितेत मी लिहिलं की
'ही काळी मातीच
माह्यी आई झाल्याचं
समाधान वाटत होतं
जे समाधान काही औरच होतं
खरं सांगायचं म्हणजे
मातीतच घडतो आपण
मातीतच खेळतो आपण
मातीच असते आसरा
मातीतच विसावतो आपण
हा देहही मातीच आहे. शेवटी ज्यावेळी आपण मरतो. तेव्हा आपल्याला जाळतात आणि आपली रक्षा नदीत शिरवतात. याचाच अर्थ असा की आपण मातीतच मिसळतो. अशाच मातीतून ज्याप्रमाणे एखादा हिरवा अंकूर बाहेर पडतो. तसा माझ्या कवितेचा जन्म झाला.
या कवितासंग्रहात एकूण नव्वद कविता असून त्या कविता वेगवेगळ्या विषयावर लिहिलेल्या आहेत. आपण त्या नक्कीच वाचाव्या ही नम्र विनंती.
आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर ७२७६८१७१९७

=============================
*(कवितासंग्रह मातीतल्या कविता)*
=============================

१}... आणि सूर्य गवसला
...........आणि सुर्य गवसला
कारण आम्ही तळपत होतो काल
त्या मनुवाद्यांच्या पशुव्रत वागण्यानं
त्यांनी आम्हाला मजबूर केल होतं
एक पाईन मागण्यासाठी
आम्ही उष्टी काढत होतो
उष्ट खात होतो.
मनुनं लिहिलं होतं
अस्पृश्य चुकले तर
कानात उकळतं शिसं ओता
त्यांनी आपल्या स्रीयांकडं पाहिलं तर
डोळे फोडा
अन् त्यांनी एखादा अपशब्द बोलला तर
जिव्हाच छाटा
अन् खुन केला तर........
अख्ख्या परीवाराचाच खुन
नाहीतर बिरादरीचाही खुन
आमच्या डोळ्यात आजही दिसतात
त्या भेगाळलेल्या जखमा
ते रक्ताळलेले डोळे
ते आमच्या आया बहिणीवर होणारे रोजचे बलत्कार
कधी रात्रीच जाग येते
पाहतांना स्वप्नातल्या त्या वास्तविक गोष्टी
भेदातिभेदानं मरणारी ती आमची बिरादरी
काय गुन्हा होता आमच्या बिरादरीचा
साधा पाण्यालाही स्पर्श करु शकत नव्हती
आमची बिरादरी
पाणी जवळच, पण मरणं पसंत
अन्न जवळंच, पण मरणं पसंत
सर्व देव अन् नशीबाची कैफियत
मनुस्मृती, भाला, संग्रामनं
सगळी बंधनं टाकली ग्रंथात लिहून
त्यानुसार राजेही गुलामासारखे राबवायचे आपल्याला
हवाला मनुस्मृतीचाच द्यायचे
ते नियम, सकाळी रात्री वस्तीत नको अस्पृश्य
त्याची सावलीही नको
त्यानं पायाखाली राहावं
घरंही बांधू नये
अन् बांधलंच तर झोपडं बांधावं
पण त्याही बंधनात तो विटाळ नव्हता
सुंदर मुलगी जर असेल,
तर छळण्यासाठी विटाळ होत नव्हता
शिक्षण अजिबात घेण्याचा अधिकार नव्हता
अन्न म्हणून सडकं, कुजकं जनावराचं मांस
तहानेनं मात्र जीव जात होता
आणि सुर्य उगवला
सुर्य उगवला नवतेजाचा
त्यानं महाडला सत्याग्रह केला
मनुस्मृती, भाला, संग्राम ही धर्मग्रंथ जाळली
अन् अस्पृश्यांच्या उद्धारासाठी
संविधान आणलं
देव आणि नशीब समाप्त केलं
कर्तृत्वाला प्राधान्य दिलं
शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलं
संघटीत होवून संघर्ष करायला लावलं
पण आपला समाज विसरला त्यांना
त्याचं कार्य तर विसरलाच
अस्तित्वही विसरला
आपलं अस्तित्व, त्याचंही अस्तित्व
आणि गुरफटत आहे आज
देवादिकात, इतरांच्या धर्मात
नशीबावर विश्वास ठेवत
आजही हा समाज त्यांचंच ऐकतो
त्यांच्या सभेला जातो
त्यांच्या हो ला हो मिळवतो
त्यांचे देव पुजतो
एवढंच नाही तर
त्यांना आपल्याच बांधवानं काही म्हटल्यास
आपल्याच समाजातील काही माणसं
आपल्याच बांधवांना वाईट म्हणतात
शिक्षणाला वाघिणीचं नाही,
मांजरीचं दूध समजतात
अन् मेंढीसारखे खाली मान घालून
चालत असतात पुढची वाट
गर्दभासारखे मान व कान हालवत असतात
कुत्र्यासारखी शेपूट हालवत असतात त्यांच्याचसमोर
अन् शेळीसारखे हलाल होत असतात आजही
विसरतात त्या उगवलेल्या भीमरुपी सुर्याला
ज्यानं आपल्याला जागं केलं
ज्यानं माणूसकीचा उजेड दाखवला
ज्यानं वास्तविकता पेरली
ज्यानं उषःकाल दाखवला
अन् ज्यानं त्यांचे अत्याचार
मुळात बंद केले
आज आपल्या आया बहिणीवर बलत्कार नाही
आज आपण मोठं घर बांधू शकतो
आज आपण खुप शिकू शकतो
एवढंच नाही तर लिहू शकतो, बोलूही शकतो
तो सुर्य गवसला म्हणून
त्या मनुस्मृतीच्या कलमा नाहीत म्हणून
आज संविधानाच्या कलमा आहेत
त्यामुळंच आपण लाचार नाही
काहीजण घाबरतही नाही
अन् कुत्र्यांसारखी शेपूटही हालवत नाही
शेळीसारखे हलाल होत नाही
मेंढीसारखी खाली मान घालत नाही
गर्दभासारखे कान हालवत नाही
कारण तो सुर्य गवसला आणि उगवलाही
आज तो सुर्य मावळलाही असेल
पण त्याचा संधिप्रकाश आजही तेवत आहे
कारण त्याला सुर्याचं बळ आहे
त्या संधिप्रकाशालाही कोणी समाप्त करु नये
नाहीतर तो उगवलेला सुर्य मावळेल
पुन्हा कधीही उगवणार नाही
सर्वत्र अंधार पसरेल
अस्पृश्यांच्या जीवनात पुर्वीसारखाच
मग पुर्वीचेच नियम
पुन्हा एकदा मनुस्मृती
पुन्हा एकदा आपल्याच आया बहिणीवर बलत्कार
पुन्हा आपल्या कानात उकळते शिसे
पुन्हा आपलेच डोळे फोडणे
सुर्यास्तानंतर त्यांच्या वस्तीत प्रवेश नसणे
आपल्या सावलीचाही विटाळ होणे
अन् पुन्हा पाण्याविणा तडपडत मृत्यू
आज त्याच गोष्टीची भीती वाटते
आज धोका त्यांच्यापासून नाही
तर आपल्याच माणसांपासून
आपलीच माणसे आज
त्यांची हेरगीरी करीत आहेत
आपल्याला खोटं ठरवून
त्यांना श्रेष्ठ लेखत आहेत
अन् पुन्हा ते मनुस्मृतीचं राज्य आणण्यासाठी
त्यांना प्रेरीतही करीत आहेत
तो सुर्य
भीमरुपी सुर्य उगवला होता
आपल्याला गवसलाही आहे
पण आज मावळला आहे
आपण आज संधीप्रकाशात जगतो आहोत
हे आपण विसरु नये
म्हणून आज विचार करण्याची गरज आहे
अन् तसं वागण्याची गरज आहे
तो सुर्य होता
पण आपण काजव्याची भुमिका घ्यायला हवी
आज आपल्या बांधवांना जागं करायला हवं
अन् आपल्याच बांधवांना गुरगुरायलाही शिकवायला हवं
पुढच्या पीढीनं शेळी, मेंढी गाढव व कुत्रं बनू नये यासाठी
हा सुर्य दररोज उगवावा यासाठी
दररोज गवसावा यासाठी
अन् दररोज उगवून
आपल्यालाच
नाही तर इतरांनाही
समानतेच्या गोष्टी शिकविण्यासाठी
समता प्रस्तापीत व्हावी यासाठी
तो भीमरुपी सुर्य
त्या सुर्याचा आपण आदर करायला हवा
आणि आपल्या पीढींना शिकवायला हवं
संघटीत करुन संघर्ष करण्यासाठी
तयार करायला हवं
कारण आजचा तो मनुस्मृती बांधव
लय चतूर आहे
तो केव्हा आपलं मुंडकं वर काढेल
आपल्याला केव्हा गुलाम करेल
हे काही सांगता येत नाही
म्हणून आपण सावध असले पाहिजे
आपल्या बांधवांनाही सावध केले पाहिजे
आपल्यासाठी नाहीतर
आपल्या भावी पीढीसाठी
तो भीमरुपी सुर्य जरी मावळला असेल
तरी दुस-या अनेक सुर्याचा उदय व्हावा यासाठी
त्यांच्याही नवीन आकाशगंगा तयार व्हाव्या यासाठी
मग त्या सुर्यांना कुत्रीम म्हटलं तरी चालेल.....

२} म्हातारं घर

ते घर म्हातारं झालं
ज्या घरानं घरपण जपलं
इमानदारी शिकवली
माणूसकी जपली

ते घर म्हातारं झालं
ज्या घरात होते मायबाप
दोन बहिणी व एक भाऊ
काका काकू अन् आजी आजोबा

ते घर म्हातारं झालं
ज्या घरात भांडण नव्हतं
मायेचा गोडवा होता
जिव्हाळा अन् ओलावाही होता

ते घर म्हातारं झालं
कारण आज घरात बहिणी नाही
काका काकू नाही आजी आजोबा नाही
अन् घराच्या भींतीही नाही

ते घर म्हातारं झालं
कारण अलिकडे कातिणीचे घर आहे
घुबडांचे आवाज आहे
सापाची रोजच पिलावळ जन्मते

ते घर म्हातारं झालं
कारण भींती पडल्या आहेत
छत कुजलं आहे
पावसाचं घरावर राज्य आहे

ते घर म्हातारं झालं
कारण नाती संपली आहेत
वटवाघळं टांगली आहेत
पक्ष्याचे घरटे आहेत
अन् रात्र होताच भुताटकीही

आज ते घर म्हातारं झालं
कारण कोणीच भटकत नाही तिकडं
ते घर शाप देत कसंतरी उभं आहे
एखाद्या हडकुळ्या माणसासारखं

३} पंजाबराव देशमुख

कृषी क्रांती प्रणेता
डॉक्टर पंजाबराव देशमुख
त्यांनी भागवली
आम्हा शेतक-यांची भुक

शेतकरी लोकांचे
होत होते मोठे हाल
सतत दुष्काळानं
शेतकरी होता कंगाल

पंजाबरावांनी खोदली
शिक्षणाची गंगा
कृषीशिक्षण सुरु केलं
गावागावात धंदा

कोणी बनला ग्रामसेवक
कोणी बनला पशूवैदक
कोणी बनला पटवारी
तर कोणी मातब्बर कृषक

पंजाबरावामुळं
शेतकरी सुधारला
शेतक-यांच्या घरीही
डॉक्टर इंजीनियर जन्मला

४} नाती

नाते असे असावे
ज्यात असावी समता
ज्यात नसावे रुसवे
ज्यात असावी बंधूता

वैरत्व नसावे कधीही
ज्यात नसावी कटूता
दुःखातही वेदना नसावी
सुखात नसावी दृढता

नात्यात असावा जिव्हाळा
नात्यात असावा ओलावा
एकमेका मदत करावी
आनंद पुरेपूर भिजावा

मृत्यूवर प्रेम करावे
मृत्यूला जवळ करावे
जन्म घेण्या अनेकदा
मृत्यूशी नाते जोडावे

५} ठेव जाणीव याची

मीच तुझी आई झालो
बाप. मरता तुझा
मीच झाले पीता
सगळं काही सांंभाळता

ह्रृदयात तुला बसवले
सर्वकाही केले
शिक्षण शिकवितांना
माझेच डोळे गेले

गोजि-या बाळा तुजसाठी
दुधाचं पाणी झालं
तुझ्याचसाठी रे बाळा
माझं काळीज चिरलं

फुलाचे अश्रू झाले
अश्रूंचे झाले मळे
आयुष्य तुझे बनविण्या
हाडांचे झाले साफळे

राब राब राबले मी
चंदनापरी झिजले मी
ती कुस आनंदाची
तुझ्यासाठीच पोषली मी

कधी पडे मज स्वप्न
कधी फुटे मज पान्हा
बाळ होईल केविलवाणा
भरवेल घास पुन्हा पुन्हा

आज म्हातारपणीसमजले
वांझोट्या कुशीचं महत्व
आज वृद्धावस्थेत कळते
ख-या जीवनाचं सत्व

कधी वाटले मला
सुनेला गोंजारीन
नातवांना सांभाळीण
नाही होणार शेजारीण

त्या स्वप्नातील गाय
मी भाकड झालीया
दुर देशीची चांडाळीण
सासूमाय कशी झालीया

कळेना आज मला
काय चुकले तुुला वाढवितांना
प्रश्न सारखे मला पडती
वांझोट्या कुसेला विचारतांंना

बरं बाळा जावू दे ते
तुला मी माफ करते
पण माझी अखेरची इच्छा
तुझ्यापाशीच बोलते

मरता मी शेवटी
तू माझ्यापाशी येजो
भावासारखी एक
साडी मला देजो

साजरा पितृमास
मी मेल्यावर करजो
अन् पात्रावरी कावाला
वडापाव चारजो

शेजारी पाजारी जेवणाला
बोलावशील माझ्या राजा
पिंडदान दरवर्षी करशील
अन् देवं पुजशील छप्पन राजा

सांगशील जना लोका
सासूसासरे असतात देव
मायबापाला टांगावे
लग्नानंतर फाशीवर

नको ठेवशील जाण याची
जन्म मायनं तुला दिला
मरणानंतर विसरशील
मायनं उन्हातनं सावलीत नेला

नको देशील तसे संस्कार
तू आपल्याशी बाळा
नकोच पसतावशील
म्हातारपणी वृद्धाश्रमाला

जवं बाळही तुझा राजा
टाकेल तुला वृद्धाश्रमात
अन् पत्नीपायी तुझा
जीव तीळ तीळ तुटेल

सांगणे हेच अखेरचे
आज जीवंत आहे म्हणून
वृद्धाश्रमात कुजते देह
नाही कोणते कानून

देह कासावीस होतो
कासावीस होते मन
मरतासमयी आली
आज अखेरची आठवण

तुझ्या इच्छेने बाळा
येशील मला भेटायला
मी मेल्यावर अखेरचा
खांदा देशील मला

ठेव जाण याची
मी आहे भिकारीन
माझ्या मृत्यूनंतर मुठभर
माती तरी टाकशीन

६} मलाही एकदा मरायचे

मरणाला कोणी सोडलं नाही
मरणे चांगली गोष्ट आहे
जन्म घेण्या उशीर नको
जन्मही चांगली गोष्ट आहे

जन्म अन् मृत्यू आजही
दोन नाण्याच्या बाजू आहे
जगणे चांगले करुन जगावे
जगण्यालाच अर्थ आहे

समाजसेवेचे व्रत घेवूया
जनतेची सेवा करुन जगावे
वृद्ध अनाथांची सेवा करावी
लाचारांनाही समान लेखावे

जन्म घेतला तर मृत्यू येणारच
मलाही एकदा मरायचेच आहे
मरावे परी किर्तीरुपी उरावे
नाव राहिले पाहिजे असे जगावे

७} आयुष्याच्या गणितामध्ये

आयुष्याचा अभ्यास करतांना
मले लय मजा येत होती
दिसत होतं सारं सुख
खेळण्यात अन् हसण्यातच
गेलं सारं आयुष्य
जवाबदारी नव्हती अंगाखांद्यावर
कारण ते बालपण होतं
पुढं वय वाढलं
वाढतच गेलं
तसा हळूहळू गणित
सोडवायला लागलो
आयुष्याचे
मधल्या काळात तर
आत्महत्या करावीशी वाटली
पीक बुडालं होतं
कर्जही वाढलं होतं
तरीही शिकवलो पोराले
आतं लेक शिकला
विदेशात गेला सुनंसोबत
आतं तो फिरकून बी पाहात नाय
माझी पत्नी माझ्या सोबत हाय

हळूहळू वय वाढलं
आता म्हातारपण आलंय
पडलो खितपत त्या वृद्धाश्रमात
त्या चार भींतीत
मी स्वतःला कोंडून घेतंलय
आता वाटते की
आयुष्याच्या गणितामध्ये
मी नापास तर झालो नाही
कारण पोरगा ढुंकूनबी पाहात नाय
बायको ही मरण पावली हाय
कोणी पावणा बी दिसत नाय
अन् चौकीदार बी बाहेर जावू देत नाय
समदी अडचणच अडचण
आयुष्याच्या गणितामध्ये
आयुष्याच्या गणितामध्ये

८} का आम्हीच ठरलो अबला

तो अंधकार,ती बेचैनी
तेे स्रीयांवरचे अत्याचार
का आम्हीच ठरलो अबला

मागील ब-याच वर्षापासूनची परंपरा
आम्हा स्रीयांवरच पुरुषांच्या वेदना
राजे महाराजांनी आम्हाला छळलं
आम्हाला बोटावर नाचवलं
मनूनही आम्हाला नागडं केलं
सतीप्रथा आणल्या, केशवेपण आणलं
बालविवाह आणले
सा-या अशाच कटकटी
नुसता संताप आलाय
आता सहन होत नाही त्या वेदना
मधल्या काळात सतीप्रथा बंद झाली
केशवेपण अन् बालविवाहही
पण अत्याचार थांबलेत का?
नाही ना
आजही हुंड्यासाठी छळल्या जातात स्रीया
अन् कित्येक स्रीया आत्महत्या ही करतात
तर कित्येक स्रीयांना
आजही त्याच सतीप्रथेसारखं
जीवंत जाळलं जातं
संविधान बनलं तरी

९} वंशाच्या दिव्यासाठी

वंशाच्या दिव्यासाठी
सगळं आहे करणं
शिक्षणात शुल्क असलं
तरी आहे शिकवणं

कोणीच कोणाचा नाही
वंशाचा दिव्याला भारी अक्कल
मोठा झाल्यावर तो
बापाचीच करते कत्तल

माय मात्र लेकराचीच
बाजू घेवून बोलत असते
लेकरु मात्र तिलाही
वृद्धाश्रमात टाकत असते

सगळं सोडून सगळं विकून
राब राब राबते मायबाप
तरीपण मुलगा बनतो
मायबापासाठी अस्तीनचा साप

जास्त मुलांना शिकवणं
सहज सोपे नसते
अशा सापाला घडविण्यासाठी
संस्कारच हवे असते

१०} माणसाने जगावे तरी कसे

माणसाने जगावे तरी कसे
माजलेल्या लांडग्यापुढे
देहाची लक्तरं उडतात.
कासावीस होतो जीव
कासावीस होते मन
अन् डोकावते तेच मन
त्या विक्षीप्त डोला-यातून
मग ज्वालामुखीसारखा उद्रेक होतो
मानवी मनाचा
मानवी मन तुटतं
धाड्कन
तेव्हा.........
तेव्हा अस्तित्वही धोक्यात येतं

माणसाने जगावे तरी कसे
त्या पिंज-यात सापडल्याने
मनाचा थरकाप होतो
खाली वाघांचे वंशज
दरीत सापांची पिल्लावळ
आकाशात मोठीजात घार
सगळेच शत्रू टपलेले
वाट पाहात बसलेले
माणसाच्या मृत्यूची
तरीही संघर्ष पाहतोय मी जीवनात
त्या तिनही शत्रूंपासून सुटका करण्यासाठी

माणसाने जगावे तरी कसे
अलिकडे हिच आपली माणसं
बलत्कार करीत सुटलीत
हिच आपली माणसं
भ्रष्टाचार करात सुटली
अन् हिच आपली माणसं
जीवही घेत सुटलीत
कधी केव्हा, कुणाचा जीव जाईल
याचा नेम नाही
भररस्त्यात कुणावर बलत्कार होईल
हेही सांगता येत नाही
कधी कोण मालमत्ता हडपेल
आणि.........आणि
मालमत्तेसाठी कोण कुणाचा
मुदडा पाडेल ते सांगता येत नाही

माणसाने जगावे तरी कसे
त्या हिंस्र पिसाळलेल्या श्वापदापासून
माणूसकी विकलेल्या नराधमापासून
आपल्याच बहिणीवर,लेकरावर
अत्याचार करणा-या
स्वकीयापासून
आणि त्याच हेरापासून
जे जवळ तर राहतात
अगदी मित्रांसारखे
पण विश्वासघात करतात
आपलाच, आपल्याच माणसाचा
आजही भीती वाटते अशाच माणसाची
जी आपल्याच ताटात जेवून
आपल्याच ताटात विष्ठाही करुन ठेवतात
अशांपासूनच सावध राहिले पाहिजे
अर्थपुर्ण जीवन जगण्यासाठी

११} माझी अपेक्षा

काळजात लपलेलं माझं शरीर
त्या तप्त उन्हातून घामाच्या धारा सोडत
जळत सुटलंय
अगदी भाग्याचा उदय होईल याची वाट पाहात
पण या भाग्यात सूर्योदय कधी होणार काय

माझी अपेक्षा एवढीच की
मला चांगलं पीक यावं
पीकावर दुष्काळ नसावा
नसाव्या कोणत्याच अडचणी
माझ्या घामाची फुलं होवू दे
ही काळी आईही कोपू नये माझ्यावर
कारण मी जगाचा पोशिंदा आहे
एक वेळ मला अन्न नाही मिळालं तरी चालेल
पण माझ्या देशात राहणा-या
या माझ्या सर्व लेकरांना मिळू दे
पोटभर अन्न........अगदी तृप्त होत

१२} तूच खरा बागवान

हे बाबा
तू होतास म्हणूनच घडला समाज
नाहीतर आम्ही आजही
खितपत पडलो असतो
त्याच मनुवादी लोकांच्या पायाखाली
अन् त्यांनी लाथाडलं असतं आम्हाला
जेवन तर मिळालं नसतं
तसेच कापले असते आमचेच मुंडके
त्यांच्या दगडाच्या देवावर
देवाचा नवश म्हणून
कोंबड्याबक-यांंसारखे
तरीही आम्ही काहीच करु शकलो नसतो
हे बागवाना,
तुच वाचविला आमचा प्राण
म्हणूनच आम्ही बोलू शकतो
राजकारण खेळू शकतो
निवडणुुकीत उभे राहू शकतो
वकीलकी करु शकतो
खुलेआम वावरु शकतो
पण आजही हे सगळं मिळालं तरी
तूलाच विसरुन
चालत असतो ती पाऊलवाट
जी उजेडातून अंधाराकडेच जाते
प्रकाशाकडे कधीच जात नाही
कधीच जावू देत नाही
आजही बागवाना
तू सक्षम बनविले तरी
आमचे काही बांधव
अजूनही अंधारातच आहेत
कारण त्यांनी तूला ओळखलं नाही
हे बागवाना तूच घडवला समाज
अन् देशही घडवला तरी


१३} आई, मी बोलतेय

आई, मी बोलतेय
तुझी नको असलेली लेक
का गं मारते आई गर्भात मला
का गं छळते आई गर्भात
त्या बाबांच्या बोलण्यावरुन
अगं मीच तुझा आधार होईल
म्हातारपणात
अन् एक गोष्टही लक्षात घे
जेव्हा तू गर्भात असतांना
तुला तुझ्या आईबाबांनी मारले असते तर......
आज तू आई होणार नसती
माझ्याचसारखे तुझ्या आईने गर्भात
या कोवळ्या कळीला
कुस्करुन टाकले असते
कायमचे
मग तू कुणाला जन्म दिला असता
याचा एकदा तरी विचार कर
याचा एकदा तरी विचार कर
१४} मातीत जन्मली मी

मातीतच जन्मलो मी
मातीच आमची माय आहे
मातीतच उगवलो मी
मातीच आमची आय आहे

त्या बरसती जलधारा
आमची आई खुश होते
हिरवळीत आम्हा खेळवतांना
आमची आई वेडी होते

पान्हा तेव्हा फुटतो आईला
जवं रंगीबेरंगी फुलपाखरे दिसती
रंगीबेरंगी पंखावरती
इंद्रधनूच्या छटा दिसती

आमची आई धान्य पिकवते
आमचीच आई अन्न देते
आईच्या कुशीत बागडतांना
खुशाल आम्हा झोपही येते

आई आमची खुश होते
जेव्हा आम्ही मोठे होतो
आम्हा मोठे झाल्यावर मग
आईला तर विसरुन जातो

मातीतल्या कविता सुचल्या नसत्या
आईने आनंदी जर ठेवले नसते
त्या जाईच्या वेलींचा झोका बनवून
आईने जर कधी झुलवले नसते

त्या थंड वा-यानेही अलगद
शीळ कधीच घातली नसती
अन् त्या नदीच्या जलधारेनं
मंजूळ गाणी गायली नसती
तो अबोल वारा जर
बोलला नसता
घोंगावणा-या आक्रंडीत रुपानं
अन् तो पवन जर बरसला नसता
काळ्या कुट्ट मेघ रुपानं

ती पर्वतराजी जर आली नसती
वेड्यावाकड्या वाकोल्या दाखवत
अन् ते पशूपक्षीही बिलगले नसते
वनराजीला कवटाळत

१५} चिऊताई

छोटीशी सानुकली
चिऊताई
तिच्या ओठात पाहिले
प्रेमसारे

वाटली ती
चांदणीसमान
वाटे आणावे
तिच्यासाठी ग्रहतारे

वातावरण बिघडले
वाढले प्रदूषणही
झाला हा त्रास
पशूपक्षालाही

आठवण विसरली ती
ह्या त्रासापायी
दाणा नाही आणला तिनं
आपल्या बाळालाही

बाळाचा टाहो
वेदना तिज अपार
काय करेल ती
उपाय नव्हता तिच्याजवळ

पंखपंख चोचीने
उखडले भुकेपायी
शेवटी उपासाने मेली
पिल्लासह चिऊताई

कवी बाळ सांगे
मानवाचीही अशी गत
प्रदूषण एक दिवस
घेईल असे जीव

१६} मातीतील कविता १

मातीतल्या कविता लिहितांनी
आठवतो माह्या बाप
बिचारा उन्हातान्हात राबत होता
चिखलात तुडत होता
अन थंडीनं गारठत होता
तरीबी मेहनत कमी केली नाय
तो सपन पेरीत होता वावरात
वाटत होतं त्याले
माह्या पोरगा
शिकून सवरुन मोठा होवून
त्याचं जीवन सुखी करन
आज माह्यं जीवन सुखी हाय
पण तो नाय
तो गेला वर
मातीच्या कवितेमधून
माह्यासाठी उजेड पेरुन

१७} मातीतल्या कविता २

कविता सपन पेरुन जातात
वखराच्या तासात
तुफान होवून जातात
ते गजबजले सावकार
मुकाम होवून जातात
अन् कर्जवाहू कास्तकार
लहूलुहान होवून जातात

मी मातीच्या गर्भात
पेरतो आहे कविता
त्या आत्महत्या ग्रस्त
शेतक-यांच्या आत्महत्या
थांबाव्या यासाठी
त्या श्रमीकांच्या पगारासाठी
होणा-या क्रांत्या
थांबाव्या यासाठी
पशूपक्षांनाही चांगले
जीवन जगता यावे यासाठी

माझ्या मातीतल्या कविता
बनाव्या क्रांतीच्या ज्वाळा
बनाव्या शस्रास्त्रे
बनावी गोळाबारुदे
अन् उध्वस्त करुन टाकावे
त्या सरंजामशाहीला
जी सरंजामशाही
आमच्या शेतक-यांना
आत्महत्या करायला लावते
जी सरंजामशाही
आम्हा मजूरांना ठार करते
नव्हे तर जी सरंजामशाही
पशूपक्षांचा अन्न म्हणून
वापर करते

१८} कविता लिहिताना

मातीतल्या कविता लिहितांना
मन भरुन येते
रडक्या मनी येते
संवेदना

भुकेचं काहूर
अंतकरणात माजणे
सोंग न घेता येणे
कोणतेच

स्वप्नांची गाणी
गाता येतात मनात
असतो वास्तवात
दुष्काळ

शेतात राबतांना
घाम येतो फार
भावना अपार
स्वप्नाळू

बीज मनातले
रुजतांना नवआशा
नाही मिळे दिशा
अंकुराला

दिवाळीच्या दिशी
अंधारच दिसे
मायाजाळ फसे
शेतक-यांचा

लाभ नाही कोणता
नशीबात खडे
आत्महत्या घडे
रानोरानी

कवी बाळ सांगे
नका करु चिंता
अन् कोणाच्या मिंता
कधीही

जीवन छान आहे
जगा बिनधास्त
करुया परास्त
दुःखाला

मेहनतीला माना
मेहनत आहे धन
मेहनतच आहे सोनं
जीवनातले

आपण शेतकरी
राबणे आपले काम
इथले चारही धाम
स्वहातात

आपण आहो भाग्यशाली
आपणच वंद्य
आपणच आधारस्तंभ
देशाचे

१९} कविता पाहतांना

मातीत कविता पेरतांना
घाबरते माझे मन
कधी घसरेल माझी जीभ
कधी जाईन माझे पण

मातीत कविता पेरतांना
अति भीती वाटते
शाई माझी आटते
खोटं लिहितांना

मातीत कविता पेरतांना
विव्हळ होते जीव
मज येते कीव
आदिवासींची

मातीत कविता पेरतांना
धावत असतो असतो मी
बेडी हुकूमशाहीची
तोडाया मुद्दाम


२०} पाऊस

पाऊस आला होता पाऊस आला होता
वसुंधरेला मोठा गंध आला होता
आनंदाश्रूची फुले उमलली होती
वृक्षावरती पालवी फुटली होती

झुळझुळ झुळझुळ ध्वनी उमटला होता
ती शोभा बघण्या इंद्रधनू प्रगटला होता
पहिला पाऊस आनंद उपकाराचा होता
शेतकरी अन् पशूपक्षांचाही होता

परंतू दुरुन करुन आवाज कानी आला होता
चिंब भिजले घरटे अन् घरटा वाहून गेला होता
त्या नित्य गाणा-या कोकिळेचा चेहरा पडला होता
चिंता तीज भारी होती कोण येईल मदतीला

तवं तारा झंकारल्या, मृदंग वाजला होता
पाहता वरती इंद्रधनू दिसला होता
जिकडे तिकडे लख्ख प्रकाश पसरला होता
काळे काळे नभ जिकडे तिकडे दिसले होते

त्या नभावर मेघ आरुढ असलेले भासत होते
त्या पावसात प्रितीलाही रंग आला होता
धुंद मनात प्रितीनं संग केला होता
पाऊस आला होता पाऊस आला होता

२१} निसर्ग माझा सोबती बरा

निसर्ग माझा सोबती बरा
सर्वाहूनी आहे वेगळा
जन्मापासून खेळतो तयासंगे
तोच आता वाटे जिवलग सारखा

रम्य परिसर रम्य त्याचा थाट
आजूबाजू उभे होते वृक्ष ताट
दिधले अन्न वस्र अन् दिधला निवारा
निसर्ग माझा सोबती बरा

तो कुशल शेतकरी
रोप टाकूनी बागा फुलवी
त्वा बागेत वाहे झुळझुळ वारा
निसर्ग माझा सोबती बरा

विलक्षण आवडे मजला कुरण
अंगी वरुणा तुझ्या किती हे गुण
झरझर झरती मुसळधार धारा
निसर्ग माझा सोबती बरा

तो पर्वत दिसे अन् दिसे ती टेकडी
खेळावया जातो आम्ही पोरं पोरी
त्या टेकडीवरती मिळे निवारा
निसर्ग माझा सोबती बरा

२२} सांजसकाळी

सांजसकाळी आम्ही बालके
उठूनी करितो वंदन
ह्या भुतलावरी जगण्यासाठी
करितो नेहमी धडपड

सांजसकाळी आम्ही बालके
प्रार्थनेस होतो तयार
आमुच्या या मायभूसाठी
मागतो सुखशांती निसर्गास

सांजसकाळी आम्ही बालके
स्वातंत्र्याचे गातो गान
आमच्या देशाच्या रक्षणाची
जबाबदारी घेतो खांद्यावर

सांजसकाळी आम्ही बालके
आठवतो शहिदांचे बलिदान
त्यांच्यासारखे होवू आम्ही
मनोमनी करितो ध्यान

सांजसकाळी आम्ही बालके
करितो नेहमी अभ्यास
जगता मरता मायभुची
आठवण करतो सदैव

२३} भारत देश महान

भारत देश महान अमुचा भारत देश महान
या देशासाठी मरण पत्करु देवू बलिदान

न्यु बटालियन मराठा ऊभी आमची सिमेवरी
रवी किरणांचे तेज प्रथम येई भारतभुवरी

चंद्रही भोळा तवं पाहतो श्रम आम्हा बालकांचे
मदत करण्या परीराणी येते कार्य आमुचे तेजाचे

निपचीत पाडू सदैव परकिय शत्रूंना
आतंकवाद नष्ट करण्या लढवू बालसैनिकांना

गल्लीगल्लीतुनी मिरवणुकीने प्रसार करु स्वातंत्र्याचा
स्वातंत्र्याचे सुराज्य करणे हे काम आमुचे आता

समान काम अन् समान वेतन देवू बेरोजगारांना
राष्ट्र विकसण्या स्विकार करु नवनीत ज्ञानाचा

स्वातंत्र्य, समता बंधूतेची शपथ आम्ही ध्यानी धरु
आम्हा बालकांची फौज सिमेवर नेहमी उभी करु

सृजलाम सुफलाम या शेतीत धनधान्य आम्ही पिकविण्या
देश रक्षण्या मरण आले तरी त्याचा स्विकार करु

उद्योजक होवूनी उद्योगधंदे उघडू आम्ही देशात
विकसीत राष्ट्राच्या गणतीत देशाला नेवून उभे करु

२४} आहे अभिमान

महाराष्ट्र राज्य आमुचे आम्हा आहे अभिमान
या राज्यासाठी सेवा करुनी करु सन्मान

गोदावरी ही पवित्र गंगा आमच्या राज्याची
सप्तसिंधूचेही पाणी मिळती आमच्या नद्यातूनी

हिमालयासमान पर्वतरांगा आमच्याच राज्यात
गार गार वारा घुमतो आमच्या सह्यांद्रीत

किलबिल किलबिल ती पक्षांची कानी ऐकू येते
ही धरणी माता अन्न, वस्र,निवारा कुशीतूनी देते

इथेच जाहले शूर शिवाजी अन् संभाजी वीर
अन् इथेच घडले तेजाने शाहू फुले आंबेडकर

इथेच स्वातंत्र्याची वीरश्री पैदा झाली
इथेच धडा शिकवला आम्ही औरंगजेबालाही

इथेच होती पेशवाई अन् संताची भुमी
अन् इथेच आहे ताडोबा सारखी वनराई

इथेच पिकतो हापूस आंबा, नारळ अन् काजू
अन् इथेच मिळती चारं, बोरं अन् मोहाचे लाडू

अहो सागरतटीचा थंड किनारा आहे आमच्या धरती
अन् इथेच गाजती मंगलगान अन् कलाकार भर्ती

ऐसा महाराष्ट्र राज्य आमुचा, पाहता वीरश्री संचारते
तयाची गाथा ऐकता ऐकता देशप्रेम वाढते

तया आळवू वारंवार कारणे लागतो राज्याचे देणे
तया सौभाग्य जतन करण्या लढू प्राणपणाने

२५} थोर

सुर्य हा नभीचा तोही थोर आहे
चंद्र हा नभीचा तोही थोर आहे
निसर्गराजा हा आहे अबोल
काट्यावरी उभा तो गुलाब थोर आहे

ह्या विश्वापरी नाते जुळले हे
मायभूसाठी सैनिक लढले हे
भुमी वाचविण्या हा देश आहे कबूल
त्या पर्वतातील वायूही थोर आहे

पाय जमीनीवरचा गार गार होतो
सुर्य हा नभीचा आम्हा बालकांना घाबरवितो
परि उन्हाळी चाहूल आहे भावनारी
तो रखरखीत उन्हाळाही थोर आहे

२६} पिळवणूक

पिळवणूक फार करतो भांडवलदार
म्हणता काही कधीही टाकतो भट्टीत
दिसत नाही सरकारला मजूरांचे हे हाल
विद्वानांचाही जिथे नाही होत सत्कार

कायदे दुरापास्त नेत्यांच्या बाजूचे
सामान्य माणसे मरतच असतात
महागाई कंबरडे मोडते माणसांचे
आत्महत्या करणे महापाप आहे

२७} गोष्ट

दूर देशी राहणा-या
आदिवासींची आहे गोष्ट
असल्या जरी सवलती
तरी करतात फार कष्ट

काम पडते तवा
उपयोग सर्व घेतात
काम निसटता मात्र
सर्वकाही विसरतात

काट्यागोट्यात, डोंगरात
आहे त्यांची वस्ती
देशी दारुही तिथं
आहे मोठी सस्ती

नाही रस्ते काही
नाही तिथे शाळा
पिकत नाही काही
खाई सर्व वारा

गाई गुरांचे गोठे
शाळेतच असतात
सुर्य उजाडल्यावर
गोठ्यांच्या शाळा होतात

शिक्षण निःशुल्क तयांना
नाही कळत तरीही
पैसेही दिले तरी
त्याचे मोल नाही

२८} जगणे

भाषा अबोध तयांची
माणुसकी ती रक्ताची
वेश आधुनिक नाही
माणसे अंधार प्यायलेली

स्वाभीमानी ते असती
गर्व तयांना नाही
पैदल चालणे तयाचे
गाड्याही पाहिल्या नाही

पाखरांमध्येच राहणे
धोके जंगली श्वापदांचे
अंथरुणाची चिंता नाही
आहे आकाश पांघरणे

जेवनात नशीबी मुंग्या
रक्ताळलेले जेवन
विसरु नये आम्ही
आदिवासींचं जीवन

२९} अंतिम सत्य

काळ्या स्मशानी कुणी लावली फुले
अत्तराचा सुगंध सभोवार दरवळे
दुरुन स्मशानात हिरवेपणा वाटे
कोरड्या अक्षात अश्रूंचा श्वास दाटे

शरणी झोपलेला मुडदा जवं बोले
स्वार्थासाठी बाळा, का रे मारीले
जुळलेले हस्तही तवं थरथर कापे
लेकरु तसेच करणार, विचार मनी असे

आंधळ्या घुबडाला जवं बुबूळ फुटे
आताच जीवन अन् आताच मृत्यू भेटे
स्मशानी प्रेते ही वाट तयााची पाहे
भुकेली धरणी तहान तिची भागे

भष्म ते स्मशान, माया वसे तिथे
कोणीही पराया मृत्यूतून न सुटे
मृत्यू हेच मरण, मृत्यूच जीवन आहे
सर्वांचे स्मशान अंतिम सत्य आहे

३०} नोंद

बांधातल्या हिरव्या पानामध्ये
धानातल्या खळाभर रक्तामध्ये
कोणाचा पाहिला मुडदा तिथे
सरकारी दप्तरी नोंद नसे

खळ्यात कर्जबेजार बाप दिसे
टाहो आईचा भारी असे
सरकार झाले बाईलवेडे
सरकारी दप्तरी नोंद नसे

बोलकी पाखरे पाहती तिथे
अबोलक्या कळ्यांना वाचा फुटे
सरकार बदलण्या जवं पाखरु उडे
सरकारी दप्तरी नोंद नसे

सरकार बदलण्या जवं पाखरु उडे
लाचार उंदीर बिनधोक असे
संविधानही जवं पैशाने झुके
सरकारी दप्तरी नोंद नसे

३१} कोणता गुन्हा

गर्भामध्ये प्रसवते वेदना
ओकारीची मातेस भावना
दडलीय तिथं नवनीत कल्पना
गर्जनेसह आनंद देई गर्भातील वल्गना

दुर्मीळ सामाजिक चेतना
अपु-या पडतात यंत्रणा
द्यावे लागते तोंड भ्रृणा
होती अनेक गर्भावर चाचण्या

मरते सत्य पाहूनी सांत्वना
आसूरी निर्भयता पुरुषभ्रृणा
गर्भपाताला पुढची यातना
नवमाता करती याचना

निष्पाती समानतेला छेदना
कोणीच हा चक्रव्युह भेदेना
मांडणार कोण तयाची कवना
काही बोलण्यात नाही मायना

कोण देईल उजाळा स्वप्नांना
कोण होईल मुलींचा पितामहा
आई का मारते मला ते सांगना
माझ्या स्री जन्माचा हा कोणता गुन्हा

३२} गरज

हिरवाकंच भारतदेश ओसाड का व्हावा
स्वातंत्र्यात बलिदानाचा मुकूट का सजावा
सागरासवे थोरवीत निसर्गाची महिमा
का गुलाम झालो आम्ही तेचि कळेना

जुनाट भारत आमचा, जुनी आमची संस्कृती
जागृत ते देव,जुनी होती नीती
भुतकाळ होता रक्ताचा, वेध स्वातंत्र्याचा
आज नव्याने आठवावा इतिहास शहीदाचा

केव्हा दुःखी भारतीला केव्हा येईल सुख
बुरसटलेल्या विचारांना केव्हा फुटेल पाय
भाकीत असेल हातात पण आळशी आहे राणी
भविष्य घडविण्यासाठी तयार नाही कोणी

तिरंगा लहरतो आनंद मावत नाही
भारत माता की जय सर्वांच्याच वदनी
पण ते निव्वळ दाखविणे आज लोकांच्या मनी
कारण भारतीलाच विकाया, लागले राजकारणी

३३} गणिका

भुकेलेल्या वासनेची होते तिथं तृप्तता
समाजाच्या प्रतिष्ठेची असते तिथं गुप्तता
घरदार सोडुनिया करते वासनेची पुर्तता
मृत्यूशय्येवरही चढते कधीही न गर्जता

जाणीव नाही अनमोल लपतात तिथं भावना
ना कोणी धावे ना येत कोणाला कवना
शरीर भोग घेण्या येती सगळे अंगणा
कामवासनेनंतर कोणीही नर कधी न भटकेना

रातीचा पुरुष अर्धा नवरा एका दिसाचा
ऊन सावल्यांचा खेळ लपंडाव जीवनाचा
बलत्कार शोषित देह अर्पिते ती गणिका
रुप सुंदरी असली तरी अत्याचार सहते कर्णिका

पैलतीरावर शिकवते लेकराला ती शाळा
मजबुरी घेते जीव प्राण वेशीवर टांगला
साहेब होवून लेकरु जवं येई भेटण्या
आनंद तिच्या मनात ना मानेना


३४} हे नववर्षा

हे नववर्षा
तू जातपात बंद करण्यासाठी अगाढ प्रयत्न केलेस
पण तू मेल्याबरोबर नवीन वर्षानं घात केला
कारण जातीप्रथा बंद झाली नाही
पोखरली सामाजिक लोकशाही
निर्मियली जातीची हुकूमशाही
जातपात मोडण्याची तू जी शपथ घेतली होतीस
ती तर सोड
तुलाच काढले वेड्यात
अन् आजही नववर्षा
जातीमध्येच विवाह करण्याची प्रथा आहे
जातीमध्ये विवाह न केल्यास
कत्तली दंगली मारपीट होते
बिचा-या प्रेमवीरांची नाईलाजास्तव आत्महत्या होते
मुलींच्या सोडचिठ्ठ्या होतात
संसार सारेच उध्वस्त होतात
मुलांची कत्तल होते
आईवडीलांना वृद्धाश्रम मिळते
अन् सारंच काही बिघडत जाते
तरीही तू गप्प उभा ठोंब्यासारखा
रोजच बलत्कार पाहात असतोस
हे काही बरोबर नाही
आतातरी तुला जागलच पाहिजे
आतातरी तुला जागलच पाहिजे

३५} श्वास

श्वासात तिच्या माझा श्वास आहे
काळजात तिच्या माझा वास आहे
पेरुन गेली ती स्वप्ने पारदर्शी
तिच्या मृत्युनंतरही ती हृद्यात आहे
माझा गुलकंद का बरे झाला
माझा मकरंद का बरे झाला
कळले न मला काळचक्राने
माझा श्वास का बंद झाला
ठुमक्याच्या तालात ती नाचते आहे
वाद्याच्या गजरात ती लाजते आहे
स्पर्श सुखाचा ती होती दुरदर्शी
बासरीच्या सुरात अजुन वाजते आहे
दैवाने घात असा का केला
देवाने नुर असा का हिरावला
कळले न मला काळचक्राने
माझा श्वास का खंड झाला
पोशाख जरीचा अंगी ती चढवीत येते
ठुमकत ठुमकत ठुमरी ती मिरवीत येते
उनाड राणी ती उनाड प्रियदर्शी
काळजात चिमटा अजुन घेऊन जाते
३६} लावणी

काळीज माझे फाडूनिया

काळीज माझे फाडूनिया,
ठेवले तुला ह्रृदयात गं
अन् आलोे सर्व सोडूनिया
मर्द खरा मी नख-याचा गं गं गं

सांग सवाल हा खडा माझा
कोणी फेकल्या अक्षदा गं
अन् द्वापार नगरी कोणं जाहला
कोण रुख्मीणी पळवली गं
सांगते सवाल उत्तर आयका
झाला क्रिष्ण तो बाका हो
द्वापार नगरीत दधी कोपला
सांगा सवाल तो माझा हो

कपडे नेसूनी जगात आला
असा हिरा तो कोणता हो
सांगा उत्तर मर्द खरे तुम्ही तर
नायतं शाहीरी सोडजा हो

(प्रश्नाचं उत्तर आरामात द्या. पहिलं आश्वाद घ्या)

लावणी नियम
१)अश्लीलतेचा भाव नक्की असावा.पण अश्लिल शब्दही नसावे व लावणी अश्लीलही नसावी
२)पत्नीे पतीला प्रेमानं आळवणी जशी करतात.तोच प्रकार पण कवितेच्या रुपात वापरावा
३)शक्यतोवर प्रशंसा करणारे जास्तीत जास्त शब्द असावेत
४)नवरसाचा श्रुंगार असावा लावणीत
५)ऐकणा-याचे लक्ष वेधेल अशी लयबद्ध शब्दरचना असाव्यात
५)यमक जुळविण्याचा प्रयत्न करायला हवा
६)छोटी वाक्यरचना लावणीला अधिक दर्जेदार करत असते

३७} लावणी

राया माझं काळीज का चोरतोय

मुठभर मास,अंगाशी चढलया,
उगाच मला का छळतोय
राया माझं काळीज का चोरतोय

नार नवेली,शोभे मी जगात
गळ्यात माझ्या,नाही नवहार, पण....
पायात पैंजण का बांधतोय
राया..........

तु तो-याचा, मी नख-याची,
मिठी तुझी ही, धाक मज भारी, पण .......
सैल मिठी का करतोय
राया........

खेळ इश्काचा, डाव साधण्या,
देतो आमीष, गाठ बांधण्या, पण.......
कुंवारपणी मला का बघतोय
राया.........

या मोसमाचा, खट्याळ वारा,
तुझ्यासारखाच, बदले रंगपिसारा, पण......
आस मनी का भरतोय
राया......

डोळ्यात अंजन, केसात गजरा,
चाल ऐटीची, नाकात मुखडा, पण
तरीही दुर दुर का पळतोय
राया.........
३८} लावणी

पहिली पहिली वेळ बाई

पहिली पहिली वेळ बाई, सजना डोहाळे पुरवे गं
तिचा गं , राया गं, तिला जेवण भरवे गं
सजना तिचा, डोहाळे पुरवे गं।।धृ।।

जेवणात लाडु बुंदी, बर्फी, जिलेबी, गुलकंद
आवळा बोरं, चिंच, केळी, आंबे अन् करवंद
काय खावे काय नाही इच्छा तिची पुरवे गं
सजना तिचा डोहाळे पुरवे गं।।१।।

काजु कतली बदाम पिस्ता, सारं तिच्या समोर
तिच इथली मालकीण, सारे तिचे नोकरं
काय खावे काय नाही इच्छा तिची पुरवे गं
सजना तिचा डोहाळे पुरवे गं।।२।।

सासु मोठी खास्ट आहे, मधात असते टोकत
ननदही मोठी खरपुस, मधातच असते टोकत
काय खावे काय नाही, इच्छा तिची पुरवे गं
सजना तिचा डोहाळे पुरवे गं।।३।।
३९} लावणी

अहो कामाच्या पडली घाई

अहो कामाचीया पडली घाई,
दात कसा विचकतो गं
बाई बाई,कसा मिशीवर ताव मारतो
***********************
भुरळ पाडली लग्नाचिया
घाम मला कसा फुटला गं
अन् पायात हिल घालनिया
टोंगरा माझा फुटला गं
पाहुनिया माझी दशा
दादला दात विचकतो गं
बाई बाई कसा मिशीवर ताव मारतो
***********************
डोळ्यात अंजन घातले तरी
तीट प्रियाची लागली गं
अन् काळजाचा ठाव घेण्यासाठी
मला भुक लागली गं
पाहुनिया माझी तृष्णा
दादला दात विचकतो गं
बाई बाई मिशीवर ताव मारतो
४०} लावणी

कशी सांगु मी राया तुम्हा

कशी सांगु राया तुम्हा
तुम्ही या मला भेटायला

जीव माझा घायाळ झाला
श्वास श्वासात कोंबला
उर मनी दाटला
राया तुमच्या विना करमेना

धुंदी प्रेमाची चढली
अंगी शराबी नशा दडली
लिहा काळजाचा कागद कोरा
ठाव माझ्या मनाचा घ्या ना

मनी हुरहुर दाटली
बंधनाची होळी पेटली
अंत माझा पाहु नका
राया इच्छा पुरी करा ना

इकडे तिकडे पाहु नका
मन माझं फिरवु नका
पायदळी तुडवु नका
भावना माझी समजुन घ्या ना

मी तुमची नार नवेली
हिमतीची गार सावली
बाईलवेडे बनु नका
करु नका कोणता बहाना
४१} लावणी

ऐकत नाही करतो मुजोरी
होते किती नुकसान गं
बाई बाई, होते किती नुकसान

झाड कापाया जंगलात जातो
पाऊस नाही पडत गं
अन् पीक नाही शेतात होत
उपाशी लेकरु मरते गं

मी म्हणले कुटुंबनियोजन करा
तयार नाही झाला गं
अन् आतं खावाले नाही
उपाशी दिस काढा लागते गं

जंगले कापली आले कारखाने
वायुप्रदुषण वाढले गं
अन् शरीर साथ देत नाही
बिमा-या कशा वाढल्या गं

कवि बाळ सांगे लावा झाडे
शुद्ध हवा जरा मिळवा गं
नायतं तुमची खैर नाही
दुष्काळ माणसं मारते गं
४२} सावित्री तुझ्यामुळे

सावित्री तुझ्यामुळे
शिकला हा समाज
नाहीतर त्या व्यवस्थेने
अाजही ह्या समाजाला
गुलामच ठेवले असते
**********************
तरीही समाज विसरला तुला
आणि सांगतो शहाणपण
सरस्वतीबद्दल,जिच्या
अंगावर उच्च कपडे आहेत
**********************
तिला आजही पुजतो समाज
जिने तुझ्यासारखे शेण
अंगावर झेलले नाहीत
ती महालातच राहीली असे वाटते
***********************
सावित्री ज्यांच्यासाठी तु
जे-जे काही केलेस
त्यांच्यासाठी जो-जो अन्याय
सहनही केला
तो सर्व विसरला इथला समाज
कारण इथला समाज स्वार्थी
***********************
पण आता जागत आहे
समाज थोडा थोडा
आता परीवर्तन होईल असे वाटते
पण त्या दिवसाची प्रतिक्षा
करावी लागेल
४३} फुलराणी

फुलराणी तु होशिल का
स्वप्नात माझ्या येशिल का
पाऊस पडता आभाळी
उंच गगणी नेशिल का
फुलराणी तु होशिल का

कवेत मला तु घेशिल का
झोपाया अंगाई गाशिल का
त्या चतुरासंगे रानोरानी
मला फिरायला नेशिल का
फुलराणी तु होशिल का

संकटात धीर तु देशिल का
वादळात गारवा होशिल का
त्या किसानाच्या शेतावर
सुखाचे क्षण तु पेरशिल का
फुलराणी तु होशिल का

शोषीत भुक गोठवशिल का
कामाला न्याय देशिल का
त्या बेरोजगार बांधवांना
खरंच उद्योजक बनवशिल का
फुलराणी तु होशिल का

बंधुक माझी होशिल का
शत्रुशी लढायला नेशिल का
बर्फातही शत्रुला हारवायला
फुलराणी साथ देशिल का
फुलराणी तु होशिल का

माझे प्रश्न सोडवशिल का
मार्ग तवं दाखवशिल का
देश माझा देहु आळंदी
मला ज्ञानोबा करशिल का
फुलराणी तु होशिल का
४४} हे आरशा

हे आरशा,
तुझ्यामध्ये भविष्य पाहतांना मला
वर्तमानाचा विचार येतो
हे आरशा, तूच घडव माह्य भविष्य
भुतकाळात घडलेल्या चूका सुधरव
अन् माझ्या हातून घडू दे बलशाली भारत

हे आरशा, तूच तपासतोस माझे
चांगले वाईट गुण
माझे चांगले गुण माझ्यात राहू दे
वाईट गुणदोष बाहेर जावू दे
तेव्हाच मी घडवू शकेल
बलशाली भारत

हे आरशा, समाजात जे आहेत अवगुणी,
अशांचे अवगुण, तमगुण बाहेर पडू दे
त्यांच्याही अंगात सात्वीक गुण फुलू दे
तेव्हाच ते मदत करतील घडविण्यासाठी बलशाली भारत

हे आरशा, तुलाच माहित आहे सगळीकडील पसरलेला भ्रष्टाचार
त्यांच्यात माणूसकी जागृत करण्यासाठी
एक थोडीशी कृपा कर माझ्यावर
कारण तेच साकारतील पुन्हा बलशाली भारत

हे आरशा, अजून एक करायचे आहे तुला
बलत्कार, चोरी लुटमारीने देश पोखरलाय
समाजात रोज गुन्हे घडतांना दिसतात
निष्पाप माणसे विनाकारण मारली जातात
हेच अडसर ठरते घडविण्यासाठी बलशाली भारत

हे आरशा, मला हवाय तो बलशाली भारत
ज्यात गरीब, श्रीमंत, दलित, ब्राम्हण, उच्च नीच
असा कधीच भेदभाव होणार नाही
ज्या भारतात सर्वांना समानतेने वागता येईल
न्याय मिळेल अन् गर्वानं म्हणता येईल माझा भारत......बलशाली भारत
४५} आजादी के सपना संजोये

आजादी के सपने संजोये राह
पर मेरा बाप चल रहा था
और सोच रहा था प्यारी बाते
आजादी कैसी होगी?
जनाब,आजादी ने हमारा
जनाजा निकाल दिया
अंग्रेज तो जानवर की भी कद्र करते थे
मगर हम आदमी की कद्र नही करते
दुर फुटपाथ पर बैठे आदमी की
आज कद्र है जनाब
वह भी ठसन से पेश आता है
आजादी के बाद आदमी बदल गया
गोमाता को काटता चला गया
आदमी का खुन चुसता गया
और तो और किसानो को भी
लुटता चला गया
क्या यही है आजादी?
धुप मे बैठे बैठे चमार मर रहा
धुप से लडते लडते किसान मर रहा
बकरा काँटते काँटते कसाई
धर्म के नाम पर आदमी कट रहा
अपनी ही जिव्हा के प्रेम से
अपना स्वार्थ पल रहा
आज रुपयो की चाहत मे
अंधविश्वास फैल रहा
आदमी बडा ही लाचार हो रहा
क्या यही है आजादी?
नही आज अपनों को बदलना होगा
जानवर पंछी हत्या बंद करनी होगी
किसानों को राहत देनी होगी
आम जनता की परेशानी समझनी होगी
तभी सुधरेगा हिंदुस्तान
और तभी बनेगा अखंड हिंदुस्तान
क्या अखंड हिंदुस्तान नही बनना चाहिये?
बनना चाहिये
इसलिए अपनी ही अपने लिए
सोच बदलनी चाहिये
बोलो भारत माता की जय
(मैफीलसम्राट काव्यमैफीलचा या कवितेला पहिला पुरस्कार मिळाला)

४६} लावणी

भळा भळा मी राया

भळा मी राया अश्रु का ढाळु नये
माझ्या वेदनेची तमा तुला का वाटु नये
**********************
काय सांगु राया तुला का गेला रुसुन रे
वैताग या जीवनाचा भोग कसे भोगु रे
माझ्या...........
***********************
इवल्याश्या घरट्यात कसा संसार सजवला रे
संसाराच्या तिमीरात कसा दिवा लावला रे
माझ्या.............
*********************
माझा तु प्राण सखा मीच आता दोषी का रे
सत्यवचने दिली मोठी मीच आता फाशी कीरे
माझ्या......................
**********************
शुल्लक गोष्ट माझी राग का धरतो रे
माझी मी चुकले राया क्षमा तुला मागतो रे
माझ्या..............

(जेव्हा दोघांची भांडणं होतात त्यावेळी एक निघुन जातो. पती पत्नी किंवा प्रेयसी प्रिययकरही दाखवु शकता त्यावेळी प्रत्येक कडवं मुलानं व मुलीनं म्हणावयाचे)

४७} हे पावसा पावसा

हे पावसा पावसा
तू किती रे कामाचा
तू नसलास तर
जीव होतो वेडापीसा

हे पावसा पावसा
तुझी महती अपार
या धरणीवरती
नेहमी करितोस उपकार

तरी आम्ही बेईमान
तुला रोज शिव्या देतो
तुझे उपकार न मानता
तुला रोज हाकलतो

हे पावसा पावसा
तू का रे अति येतोस
आमचे नुकसान का
करुनिया जातोस

हे पावसा पावसा
पिकव आमचे धनधान्य
आमच्या या भुमीत
फुलू दे रे तू सोनं
४८} शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस गड्या
उन्हाळी सुट्या मजेत रे
गुरजी पाढे पाठ घेतील गड्या
मनात माझ्या धडकी भरे

गावोगाव फिरलो मजेत गड्या
पाहिले नाही चोहीकडे
पशुपक्षी मित्र वृक्ष मित्र गड्या
लग्न सोहळे अलिकडे

हरलो नाही कधी तरीही गड्या
हरण्याची भिती का पडे
डावावर डाव बुद्धीबळ गड्या
राजाची राणी तरी का रडे

गुरजी येती स्वागतासाठी गड्या
फुलंही माझेसाठी रडे
वर्षभर टेंशन अभ्यासाचे गड्या
यातुनी सुटका न घडे
४९} प्रेम पत्र

ती प्रेमपत्र त्याला लिहिते सख्या ,
माझं खरं अन् शितल प्रेम
तिचा त्यावर विश्वास आहे म्हणुन
त्याचा मात्र नाही
ती त्याच्यासाठी भातुकली
भातुकलीतीलही प्रेम
तुटणारं नसतं मुळी
पण त्याचं प्रेम एक खेळणं
तुटणारं खेळणं
हव्या त्यावेळी कित्येक
तरुणींना प्रेमपाशात अडकवुन
त्यानं मित्रांकरवुन बलात्कार केला
अगदी निर्भयासारखा
पण तिला आजही ते माहीत नाही
अगदी विश्वास ठेवुन आजही
ती प्रेमपत्र लिहीत असते
अहोरात्र...........
सख्या
माझं खरं अन् शितल प्रेम म्हणत
तिला प्रेमात भातुकली
कधीच वाटली नाही
कधीच वाटली नाही
५०} गझल

धाक नाही कायद्याचा

वेदनेने घात केला बंधुत्वाचा
घात केला कौरवांनी कुकवाचा
काळजाला भेदणारा थंड वारा
द्रौपदीची लोप झाली भावमाला

कौरवांनी खेळ केला क्रुरतेचा
धाव घेई नंदलाला द्रौपदीचा
डाव फेके कामिनीच्या संगतीने
डाव जाई लालसेने पांडवांचा

हाल झाले हारलेल्या पांडवांचे
लोप झाला राजवाडा सामतांचा
त्रास झाला बारमाही चालतांना
जीव गेला यातनेने पांडवांचा

खेळ नाही चांगल्यांचा आज येथे
आज येथे धाक नाही कायद्याचा
गाव नाही चांगल्यांचा आज येथे
आज येथे भाव नाही कायद्याचा

(मंजुघोषा गालगागा गालगागा
गालगागा २१मात्रा)

५१} समाधान

मातीतच खरी मजा
मातीची करावी दोस्ती
आठवतं म्हून सांगतो
मातीतल्या गोष्टी

लहानपणी मातीतच शिकलो
मातीवरच अभ्यास केला
अन् मातीनच सांभाळलं मले
आज मातीतूनच उभा हाये

मातीत खेळतांनी
रागावत होती आई
अन् उदाहरणे पाढे शिकवतांनी
रागावत होती बाई
मी मातीतच रेघोट्या काढायचो
अन् मातीशीनच बोलायचो

मातीवर रेघोट्या काढतांनी
मास्तर पाठीमागून येई
अन् म्हणे, का लिहिलं बे
तवा पळून जात होतो
मग मास्तरनं वर्गात
शाबास म्हटल्यावर
मले कळायचं नाय
मी कोणता तीर मारलो

मास्तर सांगे
गड्यानं मातीवर
बिनचूक पाढे लिहिले
तवा हूरुप यायचा
अन् अभिमान वाटायचा मातीचा
वाटायचं, मातीच
आपला गुरु हाये

ही काळी मातीच
माह्यी आई झाल्याचं
समाधान वाटत होतं
जे समाधान काही औरच होतं, मात्र आतं
मातीनच शिकवलं अन्
मातीनच वाढवलं
हे मी विसरु शकत नाय
५२} आई, मी बोलतेय

आई, मी बोलतेय
तुझी नको असलेली लेक
का गं मारते आई गर्भात मला
का गं छळते आई गर्भात
त्या बाबांच्या बोलण्यावरुन
अगं मीच तुझा आधार होईल
म्हातारपणात
अन् एक गोष्टही लक्षात घे
जेव्हा तू गर्भात असतांना
तुला तुझ्या आईबाबांनी मारले असते तर......
आज तू आई होणार नसती
माझ्याचसारखे तुझ्या आईने गर्भात
या कोवळ्या कळीला
कुस्करुन टाकले असते
कायमचे
मग तू कुणाला जन्म दिला असता
याचा एकदा तरी विचार कर
याचा एकदा तरी विचार कर
५३} प्रश्न

पाण्याचा प्रश्न पेटणार आहे
निसर्गाचाही प्रश्न पेटतच आहे
नसबंदी कधी करणार नाही
वंशाचे दिवे वाढणार आहे
****************************
अलिकडे वस्ती वाढत आहे
झाडे आमची कटतच आहे
नसबंदीला कधी समर्थन नाही
वंशाचे दिवे वाढणार आहे
***************************
आमचे कर्तुत्व फोकणाड आहे
झाड कापणे रोखणार आहे!
झाड मरल तं पाऊस नाही
वंशाचे दिवे वाढणार आहे
*************************
मी निसर्गाचं रक्षण करणार आहे
एक तरी झाड लावणार आहे
आयुष्य बरबाद करणार नाही
वंशाचे दिवे रोखणार आहे
*************************
तुम्हा निसर्ग टिकवायचा आहे
नसबंदीचा निर्धार करायचा आहे
झाडं कोणती कापायची नाही
वंशाचे दिवे रोखायचे आहे
५४} भाजी

रोज रोज तेच भाजी
आतं दुसरी भाजी पाह्यजे
घरची भाजी नोको
आतं बाहारवाली पाह्यजे

सयंपाक लय झ्याक
पण कडू मले लागते
आमी कसेबी वागो
बायकोे दुस-याची
गोड लागते

मले पाह्यजे व्हाट्सअपचा फोन
तिले साधा घेवुन देतो
तरीबी घरी गेल्यावर
सोता हुडकून घेतो

ते बरी हाये म्हुन मी
कवीसंमेलनाले जातो
नायतं संशयाच्या कल्लोळात
घरीच राह्यलो असतो
५५} अबोल प्रित

सई माह्यी हाये
इतराईहुन येगळी
चालते वाकडी पण
लय गुणांत आगळी

जवा मुळ रायते
बोले ना काई
टोचे जीभेवरी
अबोलाची सुई

जवा मुळ बिघडे
सई जवळ येते
भल्ली घाई होते
बोलण्याची

न बोलल्यास भरे
मनात कापरे
हुरहुर दाटते
बोलासाठी वापरते

कामंधामं सोडुन देतो
बोलासाठी तिच्याशी
ते मातर मजा घेते
मी मातर अधाशी

पण सईची साथ मले
देते लय प्रेरणा
तिच्याशिवाय नाही हालत
सांसरीक पाळणा

ते दूर हाये तरी
जवळ माह्या वाटते
म्हणुनच माह्या उर
तीळ तीळ तुटते

५६} गवळण

अगं अगं मावशी

अगं अगं मावशी बाई
भरभर ये माघारी...
अडलाय वाटेवरी
सावळा ..
नटखट कृष्ण मुरारी
सोंगाड्या. .
सोंगाड्या बाई. ..
छळतोय मजला हरी...
हरी रे...
छळतोय मजला हरी..
हरी रे छळतोय मजला हरी॥धृ॥

दही दुध लोणी
माझे गं बाई
खाया मागते,नटखट हरी
कसा येतो,कसा जातो
कसा छळतो गं बाई
हरी.....हरी रे
छळतोय मजला हरी।।१।।

गोकुळात राहे
राहे टपूनी
फोडे आमचे,माठं लपूनी
दात विचके,राग भारी
कसा छळतो गं बाई
हरी....हरी रे
छळतोय मजला हरी।।२।।

राग येतो
राग जातो
कान्हा माझा,हवासा वाटतो
फोडतोे माठ,तरीही आवडतो
काय जादू केली बरी
कसा छळतो गं बाई हरी
.......हरी रे
छळतोय मजला हरी।।३।।

५७} स्वप्न पाहिले मी

स्वप्न पाहिले मी, आधार मागण्याचे
तेचि मायबाप, गेले मरुनिया
स्वप्न पाहिले मी, त्याच्यासाठी जगण्याचे
तोच गेला पळून, माहेरी सोडुनिया

स्वप्न पाहिले मी, तिला जगवण्याचे
त्यानेच चारली गोळी, गेला वधुनिया

स्वप्न पाहिले मी, जगात जगण्याचे
तोचि समाज फसवा, गेला भोगुनिया

स्वप्न पाहिले मी, माझ्या मरणाचे
तेचि मरण रुसले, मला बघुनिया

५८} जोगवा

खोल मनात हुरहुरं
आठवणींचं काहुरं
आस भारी तिची
माह्या मनात दुरदुरं

उभी कधी ती स्वप्नात
उभी कधी वास्तवात
उभी कधी बागेमध्ये
उभी कधी काळजात

कधी खुश फुलराणी
कधी दुःखी रातराणी
तीच माझी पंढरी
कधी आकाशचांदणी

आज मी जोगीराजा
ती मले गौरवशाली
कधी मोठे बळ मले
माह्या कोणी ना वाली

फिका तिच्यापुळं मी
फिका तिच्यापुळं वारा
उभा जवं मी धरणी
तिच्या अश्रुंच्या धारा

तीची आठव फार मले
तीले आठव ना माही
मी आज बळीराज
जोगवा प्रेमात धराशायी
५९} बदल

बेधुंद नजर तुही
का बेजार चंद्रावर
खोट्या प्रेमाची
पडछाया पृथ्वीवर

ती सोनेरी किरणं
परि मीच सुर्यावर
तया काया तुजसाठी
का तुहा जीव चंद्रावर

तुच कुलस्वामिनी
परी उदास का हे घर
घरात वसंत उभा
बाहेर बेईमान नर

वसंत कौमुदे
नापास शिशिर जर
ती रुक्ष हरियाली
उद्याले वसुंधरेभर

सखे, शिशिर धोकेबाज
तडा विश्वासावर
इमानदार वसंत तुहा
संशय का सुर्यावर

जळता भुई थोडी
तुह्ये बेभान ते उत्तर
शिशिर बोबडा आज
ना बदल चंद्रावर

बदल जवं तुह्यात
बदल माह्या मनावर
तो बेईमान आज चंद्र
खरे प्रेम माह्येच तुह्यावर

६०} प्रेरणा

तिची इवली प्रेरणा
इवल्या पंखासाठी बळ
मी विश्वासाचा बळी
तिच्या काळजावर वळ

जीवनाचे रुदन
माह्या जगण्याला गळ
काटे ते बाभळीचे
माह्या सर्वांगाला दाह

वाटा रक्ताळलेल्या
कसा शिशिरात आळ
कधी बा चा वसंतात
मरण्याचा काळ

मुडदा सावकारी
पोटात भुकेली कळ
तव ना दान पदरी
तो नित्याचाच छळ

तवा इवली प्रेरणा
शस्र माझ्यासाठी न्यारं
ह्या अन्यायावरती
माह्या लेखनीची धार
तिची.....

६१} सत्य

अलिकडं चांगल्याचा जमाना नाही.
सत्य कोणाला आवडत नाही
सत्य मरत आहे आज
प्रसंगी मरावं लागतं
खोटं जगत आहे आज मान वर करुन
अन् त्याचाच बोलबाला
माणुसकी संपली तरी
अन् माणुस संपला तरी....
तरीही सत्य उजागर होतं
एक दिवस
तेव्हा पश्चातापाशिवाय
काहीच मिळत नाही
६२} हे पितृपक्षा

हे पितृपक्षा तू का येतोस
भेटायला पृथ्वीवासीयांना
काहीही न सांगता
अरे तू येतोस म्हणून ही लेकरं
मायबापाची,जीवंतपणी
सेवा करीत नाहीत
तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात
अन् देतात नाना त-हेचे चटके
कारण मेल्यावर प्रायश्चीताची सोय आहे
खरंच ते तृप्त होत असतील का रे

हे पितृपक्षा खरंच कावळा
पिंडाला शिवल्यावर पुण्य लाभते का रे
की मायबापाची सेवा केल्यावर पुण्य लाभते
तरीही विचार मोडणारे दिसतात मला
अन् दिसतात मला कधी
एक ग्लास जीवंतपणी पाणी न देणारे
मेल्यावर तिरडीला खांदा,
शवाला अग्नी,
धावून धावून गोव-या
गोळा करतांना केलेली धावपळ,
अन् ते त्यांचे धाय मोकळून रडणे
तसंच प्रेतात्मा नाराज होवू नये
म्हणून बनवलेलं पंच पक्वान
खरंच यानं पाप धुतलं जातं का रे
खरंच ते तृप्त होत असतील का रे

हे पितृपक्षा, तुही पाहतोस
जे जीवंतपणी सेवा करतात
त्यांच्या नशिबात दुःखच दिसतं.
संडास मलमुत्र सारं धुवून
हाती करवंटाच
वरुन म्हाता-यांची वटवट
अन् मेल्यावर ते आत्मेही
पितृपक्ष रुपाने सतावतात
कावळा नाही शिवला तर दुःख,
मेल्यावरही, मेल्यावर शेतीची वाटणी
रितसर सारख्या प्रमाणात
मंजूरी दिली नसल्यानं भांडणं, खुन
ते आत्मे वरुन पाहात असतील सारा पोरखेळ
खरंच ते तृप्त होत असतील का रे

हे पितृपक्षा, तू शहाणा असशिल पण
कळत नाही मला तुझे हे वागणे
कावळा रुपानं त्यांचे पिंडाला शिवणे
दररोज होळ्या होळ्या म्हणून त्यालाच मारणे
त्यांची पैशासाठी तस्करी करणे
जीवंतपणी त्यांचेशी माणसाचे बेताल वागणे
मेल्यावर पात्रावर दारु, मटन, बिडीबंडल सर्वकाही
खरंच ते आत्मे तृप्त होत असतील का रे

हे पितृपक्षा, तरीही तू येतोस
त्यांच्या दारात उभा राहतोस
निर्लज्जासारखा, ताटकळत
मग बनवणार नाही तर काय पंच पक्वान
कदाचित थोडं पुण्य मिळेल हा विचार करुन
अन् कावळा पिंडाला शिवायची वाट पाहतात
कावळा पिंडाला शिवतोही
कारण कावळाच तो
त्याला भूक अपार लागलेली असते

हे पितृपक्षा, पापपुण्य काही नसतं
मायबाप लेकरांना जन्म देतात
त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य
तु आला नाही तरीही......
पण तु येत असल्यानं
सारंच पाप
लोकं कर्तव्य विसरलेय
मेल्यावर श्राद्ध करु म्हणतात
पापातून मुक्ती करु म्हणतात
मग ढोंग्याच्या हातानं
पितृपक्ष शांतीकार्य,शांतीमंत्र,
होमहवन,श्राद्ध कार्य
सारंच काही अविरतपणे
खरंच ते तृप्त होत असतील का रे

हे पितृपक्षा, तेच मला कळत नाही
पण तुला तरी समजते का रे
हे तरी एकदा येवून सांग
अन् सांग की जीवंतपणी
सेवा करायची गरज नाही
मरु दे त्या मायबापांना तडफडत
मी आहे ना पुण्य मिळवून द्यायला
तु घाबरु नकोस कधीही
ते मेल्यावर श्राद्धकार्य करुन
तुमचं सारं पाप धुवून काढील
तुमची पापातून मुक्ती करील
पण दरवर्षी येईल तुमच्यासाठी
केलेल्या पापाचं प्रायश्चित व्हावं म्हणून
तुमचे सारे पाप धुतले जावे म्हणून
६३} एका कवितेसाठी तरी

सख्या,
काय जादू केली तू कुणास ठाऊक
पण सारखी हुरहुर आहे मनात
कधी वाटतं बोलतच राहावं
तर कधी वाटते सोडून द्यावं

सख्या तू दूर असला तरी
मला दिसतोस, माझ्या अंतकरणातून
मलाही फायदा होतोच तुझा
एक कविता लिहिण्यासाठी
हवं तर मला मदत करशिल का?
की क्रिष्ण बनून सोडून जाशिल
राधेला एकटी सोडून

मी म्हटलं तू ओळख आधी मला
आपल्या अंतकरणातून
माझे चांगले वाईट गुण
खरं तर दोन दिवसात
ओळख होत नाही
पण तु म्हणतोस
मी अंतर्यामी आहे
क्रिष्णासारखा स्थितप्रज्ञ
त्या दूर क्षितीजापलिकडील दिसतं मला
काय वेडा आहेस की काय रे

पण नाही सख्या, माझेच चुकले
हवं तर मला माफ कर
मी तुला ओळखु शकले नाही.
तुझ्यात असतीलही वाईट गुण
तुला मी दोन दिवसात ओळखलेही नसेल.....
तरी तू माझी प्रेरणा आहेस
पुढील प्रवासातील
निदान एका कवितेसाठी
एक कविता लिहिण्यासाठी........

६४} प्रिये तू

प्रिये, तू......
भुमध्यसागरापलीकडील
माझ्या निखळ मैत्रीची साक्ष
आनंद देणारी मुर्तीमंत प्रतिमा
कदाचित वाटते की तु
हरवायला नकोस त्या लाटेसारखी....
माझ्या काळजातुन
माझ्याच या काळजातुन
कारण पुष्कळ दिवसांनी भेटलीय तु........
तु हरवली होतीस त्या अमावस्येच्या चंद्राप्रमाणं
पण आज गवसलीस पौर्णीमेच्या चंद्रासारखी
माझ्या जीवनाला आकार देण्यासाठी
माझं जीवन बदलविण्यासाठी नव्हे तर
माझी साहित्याची वाट सावरण्यासाठी.....
६५} उधार

उधार आम्ही घेतो
उधार आम्ही देतो

उधार भोगी आम्ही
उधार पाणी पेतो

उधार घेतो जागा
उधार आम्ही येतो

उधार मारे काटा
उधार आम्ही नेतो

उधार करते त्रागा
तवाच रोगी भेतो
६६} गझल

घाव

काळजात घातला घाव त्याने
तारुण्यात टाकला दाव त्याने

लग्न मोडण्या असे सोंग केले
शोधले किती असे नाव त्याने

मी हुशार कालची पारु होती
मी पणात सोडले गाव त्याने

तृप्त ह्या नशेत बाजार झाला
मांडवात सोडला भाव त्याने

आज नजर देत नाही दिलासा
पावलात कोंडली धाव त्याने

वादळात प्रेम झाले असे हे
संकटात तोडले पाव त्याने

पावसात लग्न केले तरी का
वासनेत चोरली छाव त्याने

आजचेच प्रेम की वासना ही
गोंधळात मारला आव त्याने

कोसते मनात माझा कसाई
वेदनेत खेळला डाव त्याने

सोडला पती जरी ऐकुनी मी
आणले किती पतीराव त्याने

हे नको करा प्रेम लग्न होता
हाल भोगते दिली हाव त्याने

६७} दया घे

ये रे पावसा जिव्हाळा घेवुन
नातलगासारखा भेटायला
हळुच विश्वास दाखवत
आमच्या काळजाचा ठाव घेत
कधी कंटाळवाणा वाटत
तर कधी आनंद देत
नातलग रमतात तसे
पण दुस-याच दिवशी
परतीला जावु नकोस

नातलगाचं ठीक आहे
महागाईच्या काळात जातात ते.....
पण अलिकडे तुही
जायला लागलाय
महागाईच्या काळात
अजुन महागाई करत
म्हणुन वाटते पावसा
तु अन् नातलग
एकाच माळेचे मणी

तुम्ही दोघेही महागाईच्या
काळातच डोळे वटाळता
संकटातही दूर पळता
अन् सर्वांनाच फासावर लटकविता
एखाद्या स्मशानागत
उध्वस्त करुन टाकत आयुष्य
तेव्हा.....वाटतंय
तुला शिव्याशाप द्यावा
पण....नाही
कारण तुही आमच्यासारखाच लाचार

आम्हीच तुझ्या नाशाला कारणीभुत
आम्ही जंगलं तोडली नसती तर....
आम्ही बेईमानी केली
म्हणुन तु करतोस
मला कळतय सारं
पण मित्रा,आम्हाला माफ कर
हे पावसा,यावर्षी तरी
बेईमानी नको करशिल
तु नातलगासारखी
नाहीतर मा शेतकरी बाप
याहीवर्षीही आत्महत्या करेल
त्याची थोडीतरी दया घे

६८} माणूस हरवला आहे

आज माणूस शोधतो मी
गल्ल्लीगल्लीत,
अगदी दिल्लीपर्यंत
मला सगळी माकडं दिसतात
माणूस दिसत नाही
माणूस हरवला आहे
तोच शोधायचा आहे

माणूस पाहिजे मला
बलत्कार न करणारा
कामगाराचं रक्त न पिणारा
शेतक-यांना भक्ष न समजणारा
कर्मचा-यांचा सुड न घेणारा
माकडलीला न करणारा

माणूस पाहिजे मला
देशासाठी लढणारा
हवं तर देशासाठी
प्राण अर्पण करणारा
सर्वांना समान वागवणारा
न्यायात आप्त नाकारणारा
सत्यासाठी झगडणारा
स्री पुरुष भेद न करणारा

माणूस पाहिजे मला
दलित,वंचित,शोषीतांची
बाजु घेवून वागणारा
वृद्ध मायबापाचा आदर करणारा
महिलांना माता मानणारा
नव्हे तर गाईलाही

माणूस पाहिजे मला
वृक्षतोड न करणारा
बक-यांचा बळी न घेणारा
अंधश्रद्धा न पाळणारा
नरबळी न देणारा
व्यसनात घराची
धुळधानी न करणारा

कोणी सांगाल का असा
माणूस सापडला का म्हणुन
हवं तर बक्षीस देणार
बदल्यात अजून बरंच काही
मला माणूस पाहिजे
माकड अन् माकडलीला नकोत
६९} लावणी

विडा

राया मज सवय लागली विड्याची

कालपर्यंत, नव्हती खात,
पानं ती विड्याची
राया मज सवय लागली विड्याची।।धृ।।

पाहता तुम्हा, नजर अंधी
नजरेत भरली, तुमची धुंदी
झाली मी धुंद, मदनाची राणी
धावले मी पानं खाया विड्याची
राया मज सवय लागली विड्याची।।१।।

झाली नशा ही, गुलकंदाची
वाट पाहते, तुमच्या प्रितीची
गजरा सजला, डोईवरती
पाळा वचनं ती भेटण्याची
राया मज सवय लागली विड्याची।।२।।

तुमचा विडा, आहे बहुरंगी
नशा त्यात, रंगीबेरंगी
मारला इश्काचा, डंख दिलावरती
तवं डंखाने होळी केली दिलाची
राया मज सवय लागली विड्याची।।३।।

बिमारी जडली, राया तुमच्या प्रितीची
इश्ककिड्याने, आजारी झाली
कशी सोडू सवय, पान खाण्याची
झोप नाही तुमच्या विना रातीची
राया मज सवय लागली विड्याची।।४।।

नशा तुम्ही, लावली तरी
मीच सोडवीन, माझी नशा ही
मार्गही काढीन, मार्गही दाखवीन
लढाई लढीन, व्यसनमुक्तीची
राया मज सवय लागली विड्याची।।५।।

७०} गझल

घाव

मावळ्यांना झोप येते, गाव येता
नायकाला सोंग येते,ताव येता

आज आहे भक्ष ढोंगी,देशद्रोही
भाळती का त्या मुलीही,आव येता

ध्वस्त होते मोठमोठे,लाल येथे
बाग त्यांची वांझ होते,हाव येता

तो दधीच्या काठ बोका,मास खाया
ती गिधाडे ध्वस्त झाली,छाव येता

ती मुलांची माय झाली, दोन वेळा
तो कशाला सोंग घेतो, डाव येता

ताकदीचा घोळ झाला,आज येथे
मारल्या ह्या भावना तो, काव येता

अब्रुंची ही धिंड झाली, काल रात्री
वेदना ही जीव घेते,घाव येता

का असा हा देव तीचा, आज येथे
का बरे हे भोग नंगे,राव येता

वासनेची ती बळी का,न्याय नाही
ह्या कळीची वाट लागे,धाव येता

७१} माते तुला सलाम
(अभिनंदन यांच्या मनातून)

हे भारत माते क्षणाक्षणाला
तुला माझा सलाम आहे
पाक धरणीवरुन माते
माझा तुला प्रणाम आहे

कितीही संकटं आले तरीही
न घाबरणारा मी जवान आहे
त्या पाकड्यांची शेपुट वाकडी
तोडणारा तुझा हा हनुमान आहे

वाटली मज भीती तरीही
धीर सोडण्या मी का गहाण आहे!
माते तुझा सुपूत्र कसा हारणार
सोचले भारत माझा प्राण आहे

किती झाले कष्ट,किती त्रास झाला
अगं पाक आपल्यापरस लहान आहे
कितीही शिष कटले आमचे तरी
मला अजून देशसेवेची तहान आहे
७२} मत कोणाले द्याचं

घरी बायकोची कुनकुन
देशात पार्टीची भुनभुन
बायको बदलत नाय
मत कोणाले द्याचं
इची बईन ते कळत नाय

पार्टीले देलं तं
घरचं सरकार कोसळती
आन् बायकोले देल तं
देशाचं सरकार कोसळती
मत कोणाले द्याचं
इची बईन ते कळत नाय

सरकार लुट लुट लुटते
शेतक-याईची वाट लावते
सरकार कोणाची बी रावो
निव्वळ आश्वासनच भेटते
बायको बी नाय आयकत
सरकार बी आयकत नाय
मत कोणाले द्याचं
इची बईन कळत नाय

दारु पेजान नोको
पैसे घेजान नोको
बायको दरडावून सांगते
मतबी कोणाले द्याच
ते बायकोच ठणकावून सांगते
मले मातर लय ईचार
घरी जेवाले भेटन का नाय
मत कोणाले द्याचं
इची बईन ते कळत नाय

एक सरकार गेलं दुसरं आलं
घरी मातर सरकार तेच राह्यलं
रोजची कटकट, रोजचे घोटाळे
पण घरची सरकार बदलत नाय
मत कोणाले द्याचं
इची बईन ते कळत नाय

पोरं बारं बदलली
मी बी बदललो
माहा देश बी सपा बदलला
आतं बायकोच बदलाची हाय
मत कोणाले द्याचं
इची बईन ते कळत नाय
७३} मागणे आहे

हे लक्ष्मी माता
तू आली सर्वांना सुख देण्या
मी ही आनंदात,
तुही
पण ज्यांच्या भरवशावर
तुझं राज्य,
तो मात्र दुःखी सदैव
कोण समजून घेतोय गं त्याला
कापूस पिकलाच नाही
तर तुझ्या पुजेला वाती येणार कुठून?

आज ठरव तू अन् तुझा निर्णय,
तशीच तू वाग अखेरपर्यंत
कोणी दुषणे दिली तरी.....
श्रीमंतांच्या महालात तर
नेहमी जातेस
आज त्यांच्याही झोपडीत जावून बघ

अगं नको पाहु तू
ते महालावरचे लामणदिवे
नको पाहू त्या रंगरंगोट्या
त्यांना खायला भरपूर आहे
पण माझ्या शेतक-याला
खायला काहीच नाही

हे लक्ष्मी माता
तो उपाशी राहून तुझ्यासाठी
कापूस पिकवतो
निदान त्याची तरी आठवण ठेव
निदान त्यांच्या आत्महत्या वाचव
एवढेच तुला मागणे आहे
७४} गावाकडची मजा

गावाकडची बालमजा
कधी येणार नाही
तो आमराईचा आंबा
कधी पिकणार नाही

लहाणपणची सोंगटी
कधी मिळणार नाही
झाडावरची माकडं
कधी पळणार नाही

शाळेला गट्टी मारुन
कधी खेळणार नाही
पावसातली झिम्मा
कधी वळणार नाही

पाण्यातली मासोळीही
मी आज होणार नाही
हातामधली सब्बल
कधी खुपसणार नाही

टायर,कंचे चक्करबिल्ला
खेळायला मिळणार नाही
घाण शिव्यामध्ये जीभ
माझी कधी वळणार नाही

आजही वाटते मनामध्ये
यावी गावाकडची इशा
बापाची सजा असावी
पण दिवसाची नको निशा

आनंद दरवळावा
भातुकलीचा चोहीकडे
अन् बालपणाचा संसार
बसावा सगळीकडे
७५} अनमोल

अनमोल दुधाने
पोषले जिने मला
तरीही तिला
चटके

अनमोल क्षण
खाते ती उष्ट
म्हातारपणी कष्ट
तरीही

गत तिची
नाही आज बरी
केविलवाणी तरी
समाधानी

जीवाचा जीवलग
तिचाच जीव घेतो
इस्टेटीसाठी करतो
हत्या

बाप बिचारा
नाही उपाय ठायी
हताश तयापायी
केविलवाणा
७६} गझल

शालिनी

भीमासाठी प्राण हे त्यागतो मी
अर्पीयेला देह हा जाळतो मी

झाली शेती थंड माझी तरीही
अंधी श्रद्धा आजही चाळतो मी

काळाचे ते भोग आता फाडण्या
रक्ताचाही जोगवा मागतो मी

निःशस्राने घात केला अवेळी
हिंसेचाही मार्ग हा दावतो मी

पारा ना भोंड्या कपाळास माझ्या
पक्षावाणी उंच घर बांधतो मी

आभाळाने आज केला तमाशा
दुष्काळाला पोटचे वाहतो मी

हुंड्यासाठी जीव गेला धन्याचा
शेतीवाडी सोड हे सांगतो मी

७७} महती मातीची

मातीला विसरु नये कोणी
मातीतच आहे पाणी
मातीच आहे पोशिंदा
मातीतच पिकपाणी

मातीच जीवन आहे
मातीच मरण आहे
माती नसेल तर
जगणं बेरंग आहे

मातीत जन्म वृक्षा
मातीच धनधान्य आहे
जगतांना पोसे माती
मरणानंतर मातीच आहे

मातीवरच जगती जंतू
मातीतच मिळते मोक्ष
मातीच जीवन देते
मातीच शरण वाहे

मातीवर लिहितो कविता
मातीतच फुलवतो कविता
मातीच नसती तर
अपुर्ण असती कविता

मातीत सोनं आहे
मातीत चांदी आहे
मातीच आहे अनमोल
माती स्मशान आहे
७८} गझल

वादळाला असेही सांग

वादळाला असेही सांग त्यांचा इशारा झाला
नोटबंदी पुरेशी शोषकाचा दरारा झाला

तो दुरूनी बघाया लागला जव उपाशी दाता
ह्या जगाचा किसानी मावळा बेसहारा झाला

मारतो पावसाळा, मारते जव नदीही माझी
ताल गुर्मीत ताठर वावराचा सहारा झाला

हाड झाली तरंगी बासुरीला खुणावे आता
फुंकतो कान त्यांचे आज त्यांचा पुकारा झाला

मोडल्या भावना ह्या मोडली बात माझी कष्टा
ह्या खळ्यात छळाचा कावळा शेतसारा झाला
७९} गझल

शेतसारा

गालगागा गालगागा गालगागा गालगागा

शेतसारा आज साला कास्तकारा ताप आहे
उंदरांना माफ सारा तो शिकारी साप आहे

माय माझी रोज रांडी बाप माझा दुःख भोगे
तो बसे ती राजगादी राज त्यांचा बाप आहे

आत्महत्या रोज होई माकडे खाई तुपाशी
तो भिकारी आज मोठा संसदेचा भाप आहे

बारबाला रोज सांगे आपली ही आपबीती
भक्ष येती रोज रात्री देह माझा शाप आहे

गोड लागे दारु वेडी कौरवांची फौज येता
स्वाद माझा जीव घेई माकडांचा जाप आहे

तेच खाई आज चारा तेच खाई लाच सारी
भ्रष्ट आचारास रोखू मात्र त्यांची छाप आहे

गाय मारे तेच सारे दोष सारा भारतीला
तीच कुत्री आज सांगे गायहत्या पाप आहे

रोज वाढे भाव येथे रोज पेटे वाद सारे
रोज मोर्चे गाव बंदी गर्दभांचा माप आहे

जाळ फेके जात वारा जाळती वाड्या म्हशाली
हा विटाळ रोज घाती संपला ही थाप आहे
८०} स्वच्छ भारत
(गाडगेबाबा यांच्या शब्दात)

हे भारता तुला स्वच्छ
करता करता
उन्हाळे पावसाळे गेलेत
पण तु स्वच्छ झाला नाहीस
मी झटलो,राबलो
केवळ तुझ्यासाठी

आजही ते षंढ
मोठमोठ्या बाता करतात
स्वच्छतेच्या
अख्खा गाव झाडायचं
नाटक करतात
स्वच्छ नद्याही करायचं नाटक
पण खरंच तु स्वच्छ
होशील कारे

अरे असा तुला स्वच्छ करुन
काय उपयोग?
मनं स्वच्छ झाली पाहिजे ना

अरे जेव्हा या देशात
बलत्कार होणार नाही
खुन होणार नाही
मालमत्तेसाठी
अन् धर्मासाठी जातीसाठी
माणसे लढणार नाही
तेव्हाच ख-या अर्थानं
तुला स्वच्छ झाल्याचा
आनंद होईल
मलाही समाधान लाभेल
८१} गझल

ती आरसा शोधीत आहे
मी पारवा शोधीत आहे
दुष्काळ हा माझ्याच वेशी
मी गारवा शोधीत आहे

मी लावले कित्येक थिगळे
माझ्याच ह्या नीती मनाला
वस्रास ना जागाच काही
मी कारवा शोधीत आहे

जातीप्रथा आताच फेका
अंती तया डोळेच नाही
लोकात ही मोळी विकाया
मी बारवा शोधीत आहे
(बारवा:-बहार,संपन्नता)

आताच मी हे पंख झाले
झालेच हे मी रक्त बर्फी
संदेश हा देण्या भविष्या
मी आरवा शोधीत आहे
(आरवा:-कोंबडा)

गावात ही गाथा वदाया
मी पेरतो आश्वस्त रात्री
माझीच ही माडी स्मशानी
मी दारवा शोधीत आहे
(दारवा;-दारवा शहर या अर्थाने,
स्मशानी:-गावाच्या बाहेर,जातीच्या बाहेर)
८२} हायकू

सागर वर
घोंगावणारा वारा
थांबते धारा

धरा ही सांगे
त्सुनामीची वेदना
होते यातना

चंद्र अबोल
मतलबापुरता
अंबरी गुंता

धरणी कळा
ओहोटीची निराशा
भरती ताशा

आकाश हसे
धरणीमाय रडे
अश्रुचे सडे

कोपली आग
नभ,दधि,भुभाग
रक्ताचा पाट

८३} सारेच आठवत आहे

आठवत आहे आज
तू आणि तुझा विरह पण
आता विरह सहन होत नाही

भातुकलीचा खेळ समजुन
मी तुला मारले, छळले
माझ्या दारुच्या नादात
मी तुला धारेवर धरले
अन् पुन्हा आठवते
मला तुझा स्वाभिमान
माझ्यासाठी उभे
असलेले तुझे आयुष्य अन्
तू माझ्यासाठी केलेला त्याग

अन् पुन्हा आठवते
तू आणि मी भिन्न
जातीचे असुनही
तू दिलेला लग्नाचा होकार
मी दलित होतो तरी
न मानलेला भेदभाव

तुझ्या विरहात जगतो मी
तुझी आठवण घेत
दिवस काढतो
आजही परिवर्तनाच्या
गोष्टी करतो
अन् आजही झटतो
जातीभेद मोडण्या

तू गेली पण
संपला नाही आजही
जातीभेद ,भेदाभेद
माणसाचे माणसाशी
जनावरांसारखे वागणे
अन् जातीसाठी
धर्मासाठी भांडणं करणे

तू होती म्हणून
मीही शिकलो आज
भेदभाव न माणणे,
माणसासारखे
माणसाला वागवणे
देशसेवा करणे
तू नसली तरी मी
तुझा वसा चालवत आहे
जातीची बंधनं तोडत आहे

पण आजही धर्मांतरण
जातीसाठी राजकारण
जाती बदल्यासाठी
बालिकावर होणारा बलत्कार
त्याच त्या जुनाट प्रथा
पैशाचा माज
प्रिये माझेही प्रयत्न
अपुरे पडतात
कदाचित मला बळ द्यायला
माझी लेखनी बनुन
तु येशिल तर बरे होईल
प्रिये हा विरह संपवण्याची
आजतरी गरज आहे
८४} श्वास

श्वासात तिच्या माझा श्वास आहे
काळजात तिच्या माझा वास आहे
पेरुन गेली ती स्वप्ने पारदर्शी
तिच्या मृत्युनंतरही ती हृद्यात आहे
माझा गुलकंद का बरे झाला
माझा मकरंद का बरे झाला
कळले न मला काळचक्राने
माझा श्वास का बंद झाला
ठुमक्याच्या तालात ती नाचते आहे
वाद्याच्या गजरात ती लाजते आहे
स्पर्श सुखाचा ती होती दुरदर्शी
बासरीच्या सुरात अजुन वाजते आहे
दैवाने घात असा का केला
देवाने नुर असा का हिरावला
कळले न मला काळचक्राने
माझा श्वास का खंड झाला
पोशाख जरीचा अंगी ती चढवीत येते
ठुमकत ठुमकत ठुमरी ती मिरवीत येते
उनाड राणी ती उनाड प्रियदर्शी
काळजात चिमटा अजुन घेवून जाते

८५} शाळेसाठी

शाळेत जाता जाता
आबाळ माझी होते
कसे फुलवु जीवन माझे
दप्तराचे ओझे फार होते

आधीच जड दप्तर माझे
जड माझ्या वेदना
लबाड माझ्या शिक्षकांना
केव्हा येईल कवना

इवलासा जीव माझा
इवली माझी ताकद
हत्तीसारखी बाई माझी
चाले डुलत डुलत

किती शहाण्या बाई माझ्या
म्हशीसारख्या चाले
ओझे देवुन आमच्याच हाती
आम्हालाच गाढव केले

८६} माझं गाव

गाव गाव सुधारलं
गाव लई छान बनलं आहे
प्रत्येकाच्या हातात मोबाईल
शौचालये त्यासाठीच आहे

आतं गावची पोरगी बी
स्मार्टफोन वापरते आहे
फेसबुकच्या माध्यमानं
नवरेही शोधते आहे

म्हणते नवरा नको मला
बापानं ठरवलेला गावरानी
व्हाट्सअप चालविणारा असावा
नको मला असरानी

इची बईन आतं
स्मशानातही मोबाईल आहे
अन् व्हाट्सअपच्या नादानं
अख्खी पिढी बिघडली आहे

८७} कोणासाठी जगू

माह्या गाव जरी लहान
देश माह्या महान आहे
माह्याच देशातली व्यथा
गावही माह्यं गहाण आहे

तुरी सपा मेल्या अमदा
कसा मी आतं धान रोवू
वाट लावली निसर्गानं
वावरातला मेला गहू

तान्ही तिन्ही लेकरं मेली
सांगा कोणता माह्या गुन्हा
सांगा कोणासाठी जगू
कोण देईल पान्हा पुन्हा

बायजा बाळंतीन माह्या घरी
कशी सांगू तिले व्यथा
मिरुग कोपला अन् आतं स्वाती
अशी माह्या जीवनाची गाथा

८८} धुपारे

गाव माझं, मी गावचा
प्रत्येकाने समजून घ्यावे
या शहराच्या नादात
गावाला सोडून जावू नये

गावात मिळतात धडे
रामरुमाई अन् माणुसकीचे
इथेच मिळतात चांगली माणसे
अन् फुलतात मळे संस्काराचे

पण अलिकडे जादू केली
गावाला माझ्या भुरळ घातली
कारखानदारी इथेच वाढली
जंगलाची कत्तल झाली

शेती गेली, बैलही गेले
सिगारेट, दारुला भाव आले
ज्या शेतीचे मालक होतो
तेथेच काही नोकर बनले

माणुसकीची झाली हत्या
मेले संस्कार वडीलधा-यांचे
रामरुमाई गेली खड्ड्यात
आतं फक्त उरले धुपारे

८९} मातीतल्या कविता

मातीतच घडतो आपण
मातीतच खेळतो आपण
मातीच असते आसरा
मातीतच मिसळतो आपण

मातीविना सर्व रिते
कुंभार ना बनवी भांडे
चित्रकार ना बनवी चित्रे
शिल्पकार ना बनवी शिल्पे

माती तया वस्तू पुरवते
चित्रकार अपूर्ण असते
कुंभार अपूर्ण राहते
शिल्पकार अपूर्ण दिसते

अपूर्णच सर्व काही
पशूपक्षी, जलसंपदा, निसर्गही
गर्व न करावे कोणी
मातीच श्रेष्ठ ह्या नरदेही

समजू नये कोणीही श्रेष्ठ
मातीच आहे सर्वश्रेष्ठ
काळा, गोरा भेद नाही
अहंकार नाहीच नाही

राग, द्वेष, लोभही नाही
जो मातीसोबत राही
या मातीच्या ऋणासाठी
लिहे मातीतल्या कविता कवी

९०} माती रुसली होती

माती रुसली आहे
जेव्हा आम्ही त्रास देत होतो आपल्या आईला
अन् आपल्या बापाला
वृद्धाश्रमात टाकले तेव्हा
त्यांच्या डोळ्यात अश्रू होते
आमच्या डोळ्यात नव्हते
ते अधाशीपणानं
पाहात होते आमच्याकडे
आम्ही दया घेतली नाही
आम्हाला दयाही आली नाही
कारण आमच्या होत्या
भावना मेलेल्या
पण आज आठवतात मायबाप
कारण आज आम्ही
पडलोय वृद्धाश्रमात
आम्हाला टाकलंय
बाळानं वृद्धाश्रमात
म्हणूनच माती रुसलीय आज
आम्हाला कवेत घेत नाही
विसावाही देत नाही
मृत्यूही देत नाही
सुखाची झोपही घेवू देत नाही
आम्ही आज
भोगतो आहोत यातना
आम्ही जे प्राक्तन केलं त्याच्या
आता नकोसं झालंय वृद्धाश्रम
अन् नकोशा झाल्याय यातना
वाटतं मरण यावं एकदाचं
अन् मोक्ष मिळावा एकदाचा
अखेरचा श्वास घेण्यासाठी
पण माती रुसली आहे
ती काही ऐकत नाही
ती आम्हाला खुप त्रास देणारच
कारण पुढच्या भावी पीढीनं
आपल्या मायबापाला कधीही
वृद्धाश्रमात टाकू नये म्हणून



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED