story collection books and stories free download online pdf in Marathi

कथासंग्रह

१)खावटी

बाहेर पावसाची सारखी रिपरिप सुरु होती.धरणी न्हाऊन तृप्त झाली होती.हवेत गारवा निर्माण झाला होता.तृणाकूरही धरणीतून डोकं काढून बाहेर आले होते.तरीपण त्याचे पाय जमीनीतच होते.पक्षी किलबिल करीत होते.पण पावसात भिजल्यानं गारठले असल्यानं आपल्या जोडीदारासमवेत अगदी निगरगट्ट राहून बसले होते.तसं त्याच्या जोडीदारांनाही हायसं वाटत होतं.
बाहेर पाऊस पडत असल्यानं सगळी माणसंही आपआपल्या घरातच होती.कोणाची भार्या भजी तळत होती.तर कुणाची भार्या पापड.पाऊस सुरु असतांना आलेल्या सुगंधावरुन हे सगळं कळत होतं.हा सुगंध त्या धरणीमाईच्या सुगंधात मिसळून गेला होता.
गंगाधर आपल्या झोपडीत विचार करीत बसला होता.तो त्या पक्षांचं निरीक्षण करीत बसला होता.त्याला आपल्या पत्नीची सारखी आठवण येत होती.
गंगाधर शेतकरी होता.त्याच्याजवळ चार एकड शेती होती.शेती दुष्काळानं पिकत नव्हती.कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ पडायचा.काही रात्री तर उपासातच काढाव्या लागायच्या.तरीही त्याच्या बानं त्याला शिकवलं होतं.त्याचं लग्नही करुन दिलं होतं.
गंगाधरचं लग्न झालेलं होतं.तोही शिकला असल्यानं त्यानं नोकरीसाठी बराच प्रयत्न केला होता.पण बराच प्रयत्न करुनही नोकरी न लागल्यानं शेवटी निराश होवून तो शेती करु लागला होता आणि आता नोकरीसाठी प्रयत्नही करणे सोडले होते.
त्यानं लग्न केलं होतं. शिकलेलीच मुलगी मागीतली होती.त्याला आता विचार आला होता की या आपल्या शेतीत पाहिजे तेवढं पिकत नाही.त्यामुळं नोकरी शोधलेली बरी.निदान मला नाही मिळाली तर काय झाले.आपल्या पत्नीला तर मिळेल.तसा आता तो तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. त्यामुळं ते दोघेही नोकरीसाठी प्रयत्न करीत असतांना एका कंपनीत तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.
ती नोकरी करु लागली होती.त्यामुळं साहजिकच तिला चांगलं राहावं लागत होतं.तिला मिळणा-या पैशाच्या आधारानं घर व्यवस्थीत चालत होतं.तसा जुने दिवस न विसरल्यानं गंगाधर साधा राहात होता.पण ती आपले सारे अस्तिवं विसरुन गेली होती.तशातच गंगाधर शेतकरी असल्यानं व गबाळपणानं राहात असल्यानं तो तिला आवडेनासा झाला.तसंही तिला वाटायचं की आपला पगार गंगाधरनं आपल्या घरात वापरायला नको.आपल्याला पोषणं त्याचं कर्तव्य आहे.याच कारणावरुन त्यांचं दररोज भांडणंही होत होती.अशातच ती एक दिवस त्याच्या घरुन निघून गेली.
तीन चार महिने उलटले होते.एक पोस्टमेन घरी आला.गंगाधरची सही घेत त्याच्या हातात एक पत्र देवून गेला.गंगाधरनं पत्र उघडलं.तसं त्याला जाणवलं की तो त्याच्या पत्नीनं पाठवलेला नोटीस आहे.नोटीसात तिनं हुंड्याचा आरोप लावला होता व त्यामुळं ती गेली असं तिचं म्हणणं होतं.आता तिला त्याच्याकडून खावटी हवी आहे असंही तिचं म्हणणं होतं.कारण ती आजही अर्धांगीनी आहे असंही ती म्हणत होती.
गंगाधर विचार करायचा की आपणच हिला नोकरी लावून दिली.आपणच तिच्या नोकरीसाठी प्रयत्न केले.अन् आपल्यामुळंच ती पगार कमवू लागली.मग आपण संसाराला थोडा पैसा मागीतला तर काय झाले?म्हणून पत्नीनं आपल्याला सोडून जायचं काय? ती स्वतः गेली.तरीही तिनं नोटीसात लिहिलं की आपण हुसकावून लावलं.तसेच हुंडा मागीतला नसतांना मागीतला असं लिहिलं.कधी मारलं नसतांना मारल्याचा आरोपही.त्याला वाटत होतं की चूक तिचीच असून दोष मला देत आहे.त्यानंही तिला नोटीस पाठवला.त्यातच केस सुरु झाली.पण शेतीच्या सततच्या नापिकीनं तो एवढा मागं आला की वकीलाचे पैसे देवू न शकल्यानं न्यायालयानं त्याच्यावर खावटी बसवली.ती नोकरीवर असतांनाही ते तो सिद्ध करु न शकल्यानं........
आज ती नोकरी करीत होती आणि तिला खावटीही मिळाली होती.चूक तिचीच होती.पण न्यायालयानं खावटी तिलाच दिली होती.पुरावे सादर केले नसल्यानं.शेती पिकत नव्हती.तरीही खावटी द्यावी लागतच होती.
खावटीची इच्छा उभ्या आयुष्यात पुर्ण करता करता उभी शेती पूर्णतः विकल्या गेली होती.पण आजही खावटी बंद झाली नव्हती.तिनं लपून चोरुन एक बायफ्रेंडही ठेवला होता.कारण तिच्याजवळ नोकरी आणि खावटीचा पैसा होता.पण गंगाधर काही जीवनभर इच्छा असूनही लग्न करु शकला नाही.कारण त्याचा पैसा त्यालाच खावटी देत असतांना तसेच शेतीच्या नापिकीनं पुरत नव्हता.शिवाय त्याच्या पत्नीचीही टांगती तलवार त्याच्या डोक्यावर त्या संविधानाच्या कलमांतर्गत होती.ज्या संविधानाच्या कलमांनी आज ब-याच गंगाधरांची जिंदगी बरबाद केली होती. आलेली संकटं कलीयुगात पत्नी जीवंत असतांना तसेच मृत्यूनंतरही कित्येक गंगाधरांना झेलावी लागत होती.चूक त्यांचीच असायची.पण आजही कित्येक गंगाधरलाच न्यायालयानं दोषी मानून खावटी लावून शेत्या विकायला लावल्या होत्या.तसेच विवाहही करु दिले नव्हते.कारण तसे पुरावे आज कित्येक गंगाधरकडे नव्हते.आज याच कारणानं कित्येक गंगाधर आत्महत्या करुन संपले होते.पण खावट्या संपल्या नव्हत्या व खावटी मिळते म्हणून प्रश्न संपले नव्हते.पतींना धमक्या देणेही संपले नव्हते नव्हे तर न्यायालयात अशा प्रकारचे खटलेही दाखल होणे संपले नव्हते.

२) घर

घर असावं एकतरी.तिथे असावा आसरा.नातं तिथंच जपता यावं.चेहरा असावा हासरा.
घर.....घर कुणाला आवडत नाही.प्रत्येेकाला घर आवडते.त्यानुसार तो कल्पना करुन आपलं घर बांधत असतो.मग आपआपल्या कुवतीनुसार कोणी मोठे घर बांधतो.कोणी लहान घर बांधतो.
एकनाथ फार गरीब होता.बाकीच्या लोकांना तो घर बांधतांना पाहात होता.त्यांच्या आजुबाजूला मोठमोठ्या इमारती होत्या.तो त्या इमारतीकडं पाहायचा.तद्वतंच त्याला बरे वाटत नव्हतं.पावसाळा आलाच की ते गळत होतं. कारण कौलारु घर असल्यानं कोलं फुटली होती.
जेव्हा पावसाळा लागायचा,तेव्हा एकनाथला वाटायचं की आपलंही एखादं घर असावं.पण पावसाळा संपताच एकनाथ ते सगळं विसरुन जात होता.एकनाथला वाटायचं माझं जर घर बनलं तर त्या घरात मी आणि माझी पत्नी कौसल्या सुखानं संसार करु.पण जवळ पैसे नसल्यानं एकनाथचं घर काही केल्या होत नव्हतं.
पावसाळा लागला होता.घर गळत होतं.त्यातच गळण्याच्या जागेवर भांडे लावणे सुरु होते.अशातच पत्नी कौशल्यानं म्हटलं,
"धनी आपलं घर गळतं.आपण दरवर्षी पावसाळ्यात विचार करतोय की घर बांधू.पण घर काय बोळकं बांधणार."
"मले बी तेच वाटते कौसल्या.पण का करु मी तरी.घर बांधाले पैसा लागते.तो मा जोवर नाय."
"एक उपाय सुचवू का?"
"सांगना,उपाय सांग."
"आपण लॉटरी काढू का एखादी."
एकनाथनं विचार केला.तसं त्यानं लॉटरी काढली आणि आश्चर्य असं की ती लॉटरी लागली.भरपूर पैसा आला.
एकनाथनं त्या लॉटरीच्या आलेल्या पैशानं घर बांधलं.तसं त्यांना हायसं वाटलं.कारण त्यांनी त्या घरात आतापर्यंत खुप गैरसोयी झेलल्या होत्या.आता एकनाथ पाठोपाठ त्याची पत्नीही त्याच्याबरोबर सुखी राहू लागली.त्यांचं स्वप्न पुर्ण झाल्याचा आनंद चेह-यावर होता.
काही दिवस सुखात गेले.आलेला पैसा.....त्या पैशानं घरंही झालं होतं व एक छोटासा धंदा लावू न एकनाथनं आपल्या पोटाचाही प्रश्न सोडवला होता.तो धंदा पाहिजे तेवढा चालत नव्हता.तरीही पोट भरत होतं.पण पैसा गाठीला उरत नव्हता.
काही दिवस जाताच एकनाथची पत्नी म्हणाली,
"आपण आता दोनमजली इमारत बांधूया."
"पण कशी?आपल्याजोवर तं पैसा नाय."
"आपून लॉटरी काढून मागच्यासारखी."
"नको नको.मला आता लॉटरी काढायला लावू नको."
एकनाथ लॉटरी काढायला तयार नव्हता.तर त्याची पत्नी लॉटरी काढायला लावत होती.चांगला सुखी संसार होता त्यांचा.पण आता लोभ निर्माण झाला होता कौसल्याच्या मनात.त्यामुळं ती आता दोन मंजीलसाठी भांडत होती.पण त्याला वाटत होतं अति लोभ करु नये.नाहीतर जे आहे तेही घर निघून जाईल.पण कौसल्या काही केल्या ऐकत नव्हती.शेवटी उपाय उरला नाही.
आज एकनाथला लॉटरीचा छंद लागला होता.लॉटरीचा पैसा कधी येत होता.तर कधी जात होता.पण गेलेला पैसा मिळायला हवा या उद्देशानं एकनाथ पुन्हा पुन्हा लॉटरी लावत होता.
लॉटरीच्या छंदात एकनाथ कर्जबाजारी झाला होता.घरंही त्याचं गहाण पडलं होतं.नव्हे तर बँकवाल्यांचे हप्ते भरता न आल्यानं बँकवाले येरझारा मारत होते.अशातच एक दिवस बँकवाल्यांनी घरावर जप्ती मारली.
घर गेलं होतं.त्याचबरोबर जागाही.आता कौशल्याला पश्चाताप येत होता.त्याचबरोबर एकनाथलाही.ज्या लॉटरीनं त्यांचं घर बांधून दिलं होतं.त्याच लॉटरीनं त्यांचं घरही हिरावलं होतं.ते विचार करीत होते.पण आता विचार करुन काही उपयोग नव्हता.कारण लॉटरीचा छंद हा वाईटच छंद होता.आधी लोभ दाखवून त्यानं आवळा दिला होता.तर रागानं पोवळा नेला होता.

३) तरुणपणातील पाप

*म्हातारपण आलं होतं.मेघा नेहमी आजारी राहात होती.आजही तिची प्रकृती खराब होती.तिला नीट बसता येत नव्हतं.नीट उठताही येत नव्हतं.तिला फार अशक्त जाणवत होतं.म्हातारपण छळत होतं.अंगाची लाही लाही होत होती.कारण मुलगा आणि सुन तिच्याजवळ नव्हते.त्याचबरोबर तिच्या मनात विचार येत होता की आपण असं कोणतं कर्म केलं की कर्माची शिक्षा आपल्याला भोगावी लागत आहे.*
मेघा लहान होती.बालपण चांगलं गेलं होतं.लहानपणी शाळेत मायबापानं जेव्हा नाव टाकायला नेलं,तेव्हा ती सात वर्षाची होवूनही कानाला हात न पुरत असल्यानं तिला शाळेत घेतलं नाही व तिला शाळेत घेतलं नसल्यानं दोन वर्ष वाया गेली.त्यातच तिची शिकायची इच्छा जरी असली तरी बालपणातच मायबापांनी तिचं लग्न एका मुलाशी लावून दिलं.सासरीही तिला पाहिजे तेवढं सुख मिळालं नाही.त्यातच एक दिवस तिचा पती चालता झाला आणि वैधव्य आलं.मुलगा पोटात असतांनाच तिचा पती मरण पावला.मग काय सारेच नातेवाईक तिला दुषणे देवू लागले.कोणी करंटी,भोंड्या कपाळाची म्हणू लागले.पण ती जगली.आपल्या एका पोराची आस धरुन.
तिचं पतीवर निरतिशय प्रेम. ती जगली आपल्या मनात आपल्या पोटातील बाळाची आस घेवून.तेच बाळ आपल्या पतीचं नाव चालवणार.आपला आधार बनणार.आपल्याला म्हातारपणात पोसणार.सारेच स्वप्न ती पाहात होती.
तिनं बाळाला जन्म दिला.त्याला कष्ट करता करता दूध पाजलं.देह झिजवत झिजवत शिकवलं.लहानाचं मोठं केलं.नव्हे तर आपला तरुणपणा गोठवून तिनं बाळाला जपलं.दुसरी असती तर तिनं पुनर्विवाह केला असता.आपले सुख पाहिले असते आणि त्यातच दुस-या पतीच्या नादात आपल्या मुलाला होणारा त्रास ओढवून घेतला असता.
आपल्या मुलाच्या सुखासाठी ती राब राब राबली.आपल्याला म्हातारपणात सुख प्राप्त होईल या आशेनं.त्यातच तिचा बाळ शिकला.तिनं त्याला शिकवलं.नातेवाईक व समाजाच्या खस्ता खात खात इंजिनियरही बनवलं.
तरुणपण ते......तिला पुनर्विवाह करण्याची इच्छा व्हायची.पण मनात विचार यायचा.आपण विवाह तर करु.पण त्यानंतर आपल्या बाळाचं कसं होणार!शेवटी तिनं विवाह करणं टाळलं.पण वासना ती.त्या वासनेला कोण रोखणार! शेवटी तिची इच्छा नसतांनाही केवळ आपल्या शरीराची शारिरीक इच्छा भागवण्यासाठी ती कष्टाच्या कामासोबत अशी शारिरीक कामंही लपूनचोरुन करु लागली.अर्थात देहविक्रय करु लागली.पण नियती ती जे काही कर्म करीत होती.ते सगळं लपून पाहात नव्हती तर उघड्या डोळ्यांनी पाहात होती.तिची काहीही चूक नसतांना नियतीनं तिच्याकडून तिचा पती हिरावून घेतला होता.पण ह्याच क्रूर नियतीनं तिला पुढील जीवनातही माफ केलं नाही.
तिच्या बाळाचं नाव रमेश होतं.रमेश खुप शिकला.इंजीनियर झाला.त्यानंतर त्याचं लग्न केलं.मुलगीही फार शिकलेलीच मागीतली होती.लग्न फार थाटामाटात पार पडलं होतं.
काही दिवस संसार सुखाचा चालला.पण काही दिवसानं सासू सुनेचं पटेनासं झालं.सुन सासूशी झगडू लागली.भांडण विकोपाला जावू लागलं.मग काय पती रमेशला सोडून त्याची पत्नी माहेरी जावून राहू लागली.त्याला तडपवू लागली.नोटीस पोलिसस्टेशनच्या धमक्या देवू लागली.
रमेशला या जीवनाचा वैताग यायला लागला.त्यातच एक दिवस त्यानं याच त्रासाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पण मेघाच्या आरडाओरडण्यानं तो थोडक्यात वाचला.शेवटी मेघा म्हणाली की त्याने तसे स्वतः आत्महत्या करुन मरण्यापेक्षा पत्नीच्या माहेरी जावून राहावं.
आईनं सांगीतलेली गोष्ट रमेशला पटली होती.ह्या अशा त्रासापेक्षा व धमकीपेक्षा आपण पत्नीच्या माहेरी जावून राहिलं तर......त्याला फार विचार येत होता.पण आईला सोडून त्याला जावेसे वाटत नव्हते. परंतू काय करणार तो.त्याला पत्नीचीही फार आठवण यायची.त्यातच मुलाबाळांचीही.शेवटी आईची इच्छा.तो पत्नीच्या माहेरी राहायला गेला.
रमेश पत्नीच्या माहेरी तर राहायला गेला.त्याला आईची फार आठवण यायची.कधीतरी आईची सेवा करावीशी वाटायची.पण काय करणार.लपून चोरुन तो आईची भेट घ्यायला येवू लागला आणि आईची भेट घेवू लागला.
आता तर तो आईला पाहायला येईनासा झाला.तो मुलाबाळातच खुश झाला होता.आई मेघा आज म्हातारी झाली होती.तिला उठता बसता येत नव्हते.तिच्या फार गती चालल्या होत्या.तिला सारखी रमेशची आठवण येत होती.म्हातारपण कटत नव्हतं.ते म्हातारपण जड जात होतं.जगणं मुश्किल होत होतं.
ती पलंगावरच होती.कधीकधी विचार करायची की आपण कोणतं पाप केलं असावं? शेवटी तिला आठवायचं की आपण या बाळासाठी जरी आपला संसार बसवला नसला तरी एक पाप नक्कीच आपल्या हातून झालंय.ते म्हणजे आपण आपल्या वासनेची इच्छा पुर्ण करण्यासाठी आपल्या देहाचा सौदा केलाय.ज्या सौद्यानं इतरांचे संसार बिघडले.तेच पाप आज निघत आहे.
ती खुप तळपायची.तिला फार वेदना व्हायच्या.मोठंसं घर असलं तरी ते घर तिला खायला धावायचं.पण काय करणार होती ती.ती विचार जरी करीत असली तरी म्हातारपण असंही तिला छळत होतं की ज्या म्हातारपणात तिला तिचं तरुणपण असंही छळत होतं.नियती क्रुर झाली होती.
कोरोना आला होता.सगळीकडं लॉकडाऊन होतं.अशातच तिचा आजार वाढतच चालला होता.शेवटी ती एक दिवस त्या आजारात मरण पावली.पण तिच्या त्या तिरडीला खांदा द्यायला तो मुलगा येवू शकला नाही.कारण क्रुर नियतीनंच तिच्या तरुणपणाच्या पापाचा निकाल लावला होता तसेच निर्णयही दिला होता.

४)माणुसकीची हत्या

बाहेर धो धो पाऊस सुरु होता.विजेचा गडगडाटही सुरु होता.त्याचबरोबर लख्ख प्रकाशही दिसत होता.
त्या धो धो पावसात सर्वजण आडोशाला लपले होते.कैरण सर्वांना भीती वाटत होती.गुरं ढोर,पशू पक्षी सारेच आडोशाला लपले होते.पण अशा या धो धो पडणा-या पावसात ती मात्र अजूनही भीजत होती.तिला पावसाचं भय वाटत नव्हतं ना विजेचं भय वाटत होतं.
कोण होती ती?ती का बरं पावसात उभी होती?का बरं तिला भय वाटत नव्हतं? सारेच प्रश्न अनुत्तरीत होते.
सोनिया तिचं नाव होतं.तिलाही पाऊस झोंबत होता.परंतू आता तिला पावसाची भीती वाटत नव्हती.कारण ती वेडी झाली होती.परिस्थितीनं तिला वेडं बनवलं होतं.
तिला पावसाची भीती वाटत नव्हती.भीती वाटत होती ती माणसाची.कारण तिला कोणत्यातरी माणसानं वेड लावलं होतं.नव्हे तर घरातून हाकलून दिलं होतं.
सोनिया पाहायला सुंदर होती.लहानपणीच मायबापानं तिला जपलं होतं.भरपूर संस्कार तिच्यात कुटकूट भरले होते.त्याच संस्कारातून तिच्यामध्ये आदर्शाची पेरणी झाली होती.
सोनियाचा विवाह जुळला.अगदी थाटामाटात विवाह पार पडला व तिची घरी पाठवणी झाली.ती सुहागरात्र पार पडली.तसा सकाळी निरोप आला की तिच्या मायबापाचा रस्ता अपघातात अपघात झाला.दोघंही मृत्यू पावले.
अभागी ती.लग्न बोवारं लागलं.लग्न नुकतंच झालेलं आणि तिच्या माहेरी तिच्या मायबापाची लाश.मैयत कशीबशी निपटली आणि आता तिच्या सार्वभौम विचारावर गदा आली.
सासू सासरे तिला सासुरवास करीत असत.तिच्याकडून नानात-हेची कामं घेत असत.घरच्या कामासोबतच आता तर सासूसास-यानं तिच्याकडून देहविक्रीची कामं करुन घेण्यास सुरुवात केली.म्हणायला बोलायला कोणी नाही.ती असहाय्य आहे याचा फायदा घेवून सोनियावर सासूसासरे अशा प्रकारचा अत्याचार करु लागले.त्यातच त्यातून सासूसास-यांना पैसे मिळत व घर चालत असे.पतीही त्या गोष्टीचा विरोध न करता तिला बळ देत नव्हता.तर ती काही म्हणताच तिला मारत असे.
दररोजच्या अशा प्रकारच्या सासरच्या वागण्यानं सोनिया कंटाळली.तिला कसंतरी वाटायला लागलं व संधी साधून ती पोलिसस्टेशनला गेली.तिनं तक्रार नोंदवली.परंतू तिला तक्रार टाकून काही उपयोग झाला नाही.कारण पोलिसांनी त्यांना बोलावताच त्यांनी बयाणात सांगीतलं की विवाहाच्या दुस-याच दिवशी तिचे मायबाप मरण पावल्यानं तिच्या मेंदूत फरक पडलेला असून आम्ही तिला चांगले सांभाळून घेत असूनही ती आमच्याविरुद्ध अशी वागते.शेवटी नोंदविलेल्या तक्रारीवर पोलिसांनी त्यांना अटक न करता सोडून दिलं.परत सोनियाला घरी आणण्यात आलं.पुन्हा तेच ते अत्याचार दररोज तिच्यावर होवू लागले.आता तर तिच्यावर कडक पहारा बसवण्यात आला.
दररोजची कामाची रेलचेल व दररोजच पैसे कमविण्याच्या हव्यास्याने तिच्या सासूसास-यांच्या वागण्यानं व पतीच्या निगरगट्ट बसण्यानं तिच्या मानसिकतेवर जबरदस्त परीणाम झाला.ती वेडी झाली.
ती वेडी झाली होती.आता तिच्या शरीराचा उपभोग कोणाला घेताच येत नव्हता.कारण ती त्या वेडेपणात कोणाला काहीही मारुन देत असे.त्यामुळं कोणी आता तिच्या जवळ भटकत नव्हतं.शेवटी ती सासूसास-यांच्याही कामात पडत नव्हती.
सासूसास-यांना पैसे मिळत नव्हते.उलट ती वेडी झाल्यानं ती कामंही करु शकत नव्हती.त्यातच तिला निव्वळ खावू पिवू घालणं जिव्हारी येत होतं त्यामुळं तिचा आपल्याला उपयोग काय? सासूसासरे विचार करीत होते.अशातच त्यांनी तिला एकदिवस घरातून हाकलून दिलं.
सोनिया आज पावसात रस्त्यावर भिजत होती.तिला पावसाचं भय नव्हतं.भय होतं ते माणसाचं.माणसानंच तिच्यावर अत्याचार करुन माणुसकीची हत्या केली होती.तिचे मायबाप मरणं म्हणजे तिच्यासाठी धोकादायक ठरलं होतं.तिनं असा कोणता गुन्हा केला होता की तिला अशी शिक्षा मिळाली असावी हे कोणालाही कळत नव्हतं नव्हे तर ती वेडी का झाली असावी याचा विचारही कोणी करीत नव्हतं.

५) आपलाच धंदा बरा

बाहेर तप्त ऊन पडलं होतं.धरणी लाही लाही करीत होती.पारा फार चढला होता.रस्त्यावर कोणीही नव्हतं.तसा शहादूही आपल्या खोपटात बसला होता नुकतेच त्यानं वखराचे बैल सोडून औत बाजूला धु-यानं ऊभा केला होता.
तीन साल झाली होती.त्या तीनही वर्षात त्याला पीकपाणी बरोबर झालं नव्हतं.मागील वर्षीही उन्हाळा एवढाच तापला होता.त्यामुळं पाऊसही जोराचाच पडला होता.पीक ओल्या दुष्काळानं गारद झालं होतं.म्हणून त्याला या वेळच्या उन्हाची चिंता वाटत होती.कधीकधी त्याला वाटायचं की ह्या धंद्यापेक्षा दुसराच धंदा बरा.एवढ्यात त्याला त्या भर उन्हात एक व्यक्ती दिसला.
तो व्यक्ती डींक काढायचे काम करायचा.एक मोठा वेळू घेवून या झाडावरुन त्या झाडावर डींक शोधीत वणवण फिरायचा.कधीकधी शहादूबरोबर बसायचा.दोन गोष्टी करायचा.भाकरीही खायचा.पण जास्त वेळ थांबायचा नाही.कारण त्याला चिंता असायची की जर मी काम केलं नाही तर उद्या आपण आपल्या लेकरासमवेत उपाशी राहू.याच भानगडीतून तो उन्हाची पर्वा न करता फिरायचा शहादूला मात्र त्याचं नवल वाटायचं.त्याला वाटायचं की आपल्या धंद्यापेक्षा त्याचा धंदा बरा की त्याला ओल्या किंवा सुक्या दुष्काळाचा सामना तर करावा लागत नाही. दुपारच्याला आपल्याला आराम तर मिळतो.पण तरीही आपलं पोट भरु शकत नाही.आज डींक फार महाग आहे.त्यामुळं बक्कळ पैसा मिळत असेल.तो विचार करु लागला.तसा त्याला त्याचा धंदा बरा वाटताच त्यानं शेत विकलं.बैलाची जोडीही विकली व मोठा वेळू घेवून तो गावोगावी डींक काढत रानोरान फिरु लागला.
सुरुवातीला त्याला रानात भरपूर डींक मिळू लागलं.त्याचबरोबर पैसाही.पण जसा पावसाळा लागला.शहादूला डींक सापडेनासं झालं.कारण डींक पाण्यानं पार विरघळून जायला लागलं होतं.त्यातच आता डींक न सापडल्यानं त्याची उपासमार होवू लागली.त्यातच एक दिवस रानात फिरता फिरता त्याला एक मेंढपाळ दिसला.क्षणात त्याला विचार आला की हा मेंढपाळाचा धंदा बरा.मेंढ्या वर्षभर पाळता येतात.शिवाय मांसाची किंमतही जास्त असते.त्यातच मेंढ्याचे केसंही वाया जात नाही.त्याचीही लोकर बनते.नव्हे तर कोणी शेतकरी उन्हाळ्यात जेव्हा मेंढ्या आपल्या शेतात बसवतात.तेव्हाही त्याचे पैसे मिळतात.शेवटी त्यानं बराच विचार केला शेती तर विकली होतीच.त्याचा बक्कळ पैसा जवळ होताच.तेव्हा त्यानं आव न पाहता काही पैशात मेंढ्या विकत घेतल्या व आता तो मेंढपाळ बनून मेंढ्या चारु लागला.
दोन वर्ष बरी गेली.मेंढीपासून केस विकून तर कधी शेतात बसवून तर कधी मेंढ्या कापणीसाठी विकून तर कधी मेंढीचं खत विकून त्यानं बराच पैसा कमवला.त्याला हा धंदा आवडायला लागला.काही दिवस आनंदात गेले.पण त्याच वर्षी महामारी आली होती.
महामारी आली खरी पण त्या मारामारीत त्याच्या पुर्ण मेंढ्या एक एक करीत मरण पावल्या.सावरायलाही वेळ मिळाला नाही.शेवटी तो हताश झाला.काय करावे सुचेनासे झाले.
आता त्याला वाटलं की आपण हा धंदा करायला नको होता.पण काय करणार?उपाय नव्हता. शेवटी त्यानं ठरवलं की आपण आपल्या स्वतःच्या धंद्यात बुडतो.त्यापेक्षा कोणाकडे रोजमजूरी केलेली बरी अशातच त्यानं आता भोंग्याचा आवाज ऐकला.
त्याला वाटलं की आपण कारखान्यात नोकरी करायला हवी.विचारांचा अवकाश त्यानं कारखान्यात नोकरी करायचं ठरवलं.शेवटी त्यानं कारखान्यात नोकरी पकडली.
दररोज वेळेपुर्वी त्याला कारखान्यात जावं लागायचं.शेंबड्या सुपरवायजरचे खडे बोल ऐकावे लागायचे.बारा बारा तास मेहनतीचं काम करावं लागायचं.बदल्यात तेवढा बक्कळ पैसा मिळत नव्हता.भट्टीजवळ काम करतांना अंगाची लाहीलाही व्हायची.त्याचक्षणी विचार यायचा की यापेक्षा आपली शेतीच चांगली होती.निदान कोणी टोचून बोलत तर नव्हतं.शिवाय नुकसान आणि त्रास प्रत्येकच कामात आहे.सुख असतं क्षणभराचं.पण त्याचबरोबर दुःखही.दुःख पर्वतापेक्षा मोठं वाटत असतं.पण जेव्हापर्यंत आपण दुःख सहन करीत नाही,तेव्हापर्यंत आपल्याला सुख प्राप्त होत नाही.शेती आपली माय होती.पण आपण आईला विसरण्यानं असे दिवस आले.
असे विचार कारखान्यात काम करता करता पावलोपावली येत होते.अशातच एक दिवस कारखान्यात स्फोट झाला.शहादूचे दोन्ही पाय स्फोटात गेले.
शहादू आता घरी राहात होता.पत्नी त्याला टोचून खात होती.जुन्या दिवसाची आठवण देत होती निदान गडी लावून शेती केली असती असंही म्हणत होती.जवळचा पैसा पूर्णतः निघून गेला होता.
शहादू विचार करीत असला तरी आता त्याचेजवळ काही उपाय नव्हता.तो उठून चालू शकत नव्हता.बोलू शकत जरी असला तरी त्याचे बोल ऐकून घेणारे कोणीही अस्तीत्वात नव्हते.तो एकटात बडबडत असायचा शहाणपणाच्या गोष्टी वेड्यासारखा.अन् लोकही त्याला शहाणे समजण्याऐवजी वेडाच समजत होते.

६) सासुरवास

ते पावसाचे पाणी ती आपल्या तनुवर झेलत होती.त्याबरोबर तिला भुतकाळ आठवत होता.तिला वाटत होतं की मी माझ्या आईवडीलांकडे जशी सुखी होती,तसं जीवन मला याही ठिकाणी मिळायला हवं.
मीरा एक सुंदर स्वभावाची मुलगी.मायबापाच्या लाडाची होती.कारण ती एकुलती एक होती.साहजिकच त्यामुळं त्यांच्या मनात लाड होतं.त्या मायबापांनी तिचा जरी लाड केला असला तरी तिच्यावर त्या लाडासोबतच संस्कार भरले होते.सासरी कसं वागायचं आणि कसं राहायचं हेही शिकवलं होतं.अगदी साडी घालण्यापासून.
लाडीगोडीनं मोठी झालेली मुलगी.केव्हा वयात आली,ते मायबापालाही कळलंच नाही.अशातच लग्न जुळविण्यासाठी प्रयत्न करीत असतांना मीरानं कोण्यातरी तरुणावर प्रेम केलं व मुलीच्या हट्टापायी मायबापानं तिचा विवाह त्या तरुणासोबत करुन दिला.
त्या तरुणाचं नाव निशांत होतं.त्यांचे सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले.काही दिवसानं मीराचा बाप मरण पावला.बस तेवढंच.तीच वाट सासरकडील मंडळी पाहात होते की काय कुणास ठाऊक.कारण काही दिवसानंतर तिच्या दुःखी जीवनाला सुरुवात झाली.
मीरा कामात प्रामाणिक होती.ती घरची सारी कामं करायची.पण आता सासरकडल्यांना मीरा नको होती.आता त्यांना तिची मालमत्ता हवी होती.
मीराचा बाप मरताच सासरकडील मंडळी मीराला सासुरवास करु लागले.शुल्लक कारणावरुन तिला तिचा पती मारझोड करु लागला.नव्हे तर तिचं चुकतही नसलं तरी,चुकलं असा आरोप लावून सासूही तिला मारत असे.आरोप लावत असे.स्वतःच्या मुलीसारखं तिला सांभाळत नसे.
परीवर्तनवादी काळ होता तो.लुगडे केव्हाचेच संपले होते.साडीही हद्दपार झाली होती.त्याची जागा आता सलवारनं घेतली असली तरी मीराला साडीच घालावी लागत होती.तिला कधी काळी आपणही सलवार घालावं वाटायचं.पण पती त्या गोष्टीला विरोध करायचा.दररोज काम करीत असतांना साडीवर कामं करता येत नव्हते.परंतू सासरमंडळींना कोण सांगणार! एकदा असाच त्यांच्या घरी सलवार घालण्यावरुन वाद झाला होता.ते प्रकरण फार चिघळलं होतं.
मीरा साडी जरी घालत असली तरी सासरकडील मंडळी खुश नव्हते.ते तर या ना त्या कारणानं तिच्याशी भांडण करायचे.तिच्यामागं दररोजची कटकट लावायचे.ती त्या भांडणाला एवढी कंटाळायची की तिला त्यांना सोडून जावंसं वाटायचं किंवा आत्महत्या करावीशी वाटायची.पण मीरा मुलाबाळामुळं गप्प राहायची.
सासरकडील मंडळींना नेहमी वाटायचं की आपल्या आईला मीरा घर बांधण्यासाठी पैसे मागेल व आपल्यालाही सुंदरसं घर बांधता येईल.ते एकदा तिला तसे म्हणालेही होते की आईला पैसे माग.म्हणजे आपल्याला घर बनवता येईल व चांगल्या घरात वावर करता येईल.पण आईकडे जो पैसा होता.तिला वाटायचं की म्हातारपणात आपल्याला मीरानं पोसलं नाही तर.....तर हाच पैसा आपल्या कामात येईल.मरणानंतर काहीही असो.मरणानंतर ही सर्व संपत्ती त्यांचीच आहे. पण सासरकडच्यांना मात्र धीरच नव्हता.त्यांना वाटायचं की नंतरचा काळ कोणं पाहिला.शेवटी याच पैशाच्या कारणावरुन त्यांचे वाद सुरु झाले.
सासूचे डिवचणे पैशासाठीच होते.पण ती पैशासाठीच भांडण करते आहे.हे मीराला जाणवू देत नव्हते.पतीही त्यासाठीच भांडत होता.दररोजची वेगवेगळी कारणं होती.ती अगदी त्रासून गेली होती.
साडी,सलवार किंवा इतर भांडणाच्या तत्सम गोष्टी ह्या निमित्त मात्र होत्या.शेवटी एक दिवस असंच सलवारवरुन भांडण झालं.भांडण एवढं विकोपाला गेलं की सासरकडील मंडळींना तिला घेरलं.ती एकुलती एक अबला असहाय होती.त्यांनी तिचे हातपाय बांधले व तिच्यावर मातीचं तेल शिंपून तिला जाळले.त्यातच ती वेदनेनं घायाळ अबला मरण पावली.प्रकरण पंचक्रोशीत माहित झालं.पैसा मालमत्ता जागच्या जागीच राहिला होता.
पोलिसांनी तपासचक्र फिरवली.त्यांना अटक झाली.शेवटी प्रकरण न्यायप्रविष्ट झालं.वकील साक्षीदाराच्या फैरी झडू लागल्या.शेवटी पुराव्याअभावी व वकीलाच्या वकीलकीगीरीने सासरकडील मंडळी निर्दोष सुटली.
सासरकडील मंडळी ही गुन्हेगार होती.मीराला न्याय मिळाला नाही.नियती मात्र लाचार होवून हे सर्व पाहात होती.मीराचा अंत झाला होता.तशी तिची आईही ह्रृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावली होती.सारंच संपलं होतं.होती नव्हती ती मीराची सगळी मालमत्ताही त्यांचा कोणी वारस नसल्यानं ती सासरकडील मंडळींनाच मिळाली होती.कायद्याच्याच या राज्यात कायद्यानच मीराच्या न्यायालाही संपवलं होतं.
सासरकडील मंडळींनी चांगलं टुमदार घर बांधलं होतं.मुलानं दुसरं लग्नही केलं होतं.थाटात संसार सुरु होता.अशातच काही दिवसानं भुकंप आला व ते पुर्ण घरच जमीनदोस्त झालं.त्यातच सर्व परीवार गाडल्या गेला.कोणी वंशाचा दिवा वारसाला उरला नाही.त्याचबरोबर आजुबाजूची माणसंही मरण पावली होती.त्या घरासोबत आजुबाजूचीही घरं पडली.मनुष्यहानी व वित्तहानीही खुप मोठ्या प्रमाणात झाली होती.अर्थात ज्यांना ज्यांना मीराची गोष्ट माहित असूनही त्यांनी न्यायालयात साक्ष न दिल्याने व आरोपी निर्दोष सुटल्यानं नियतीनं त्या सर्वांनाच शिक्षा दिली होती.
आज अशा कितीतरी मीरा सासरकडील मंडळींच्या जाचक त्रासानं जाळल्या जात होत्या.कोणी आत्महत्याही करीत होत्या.पण न्यायालयात पुराव्याअभावी व वकीलांच्या वकीलकीपणानं कितीतरी मीरांचे अपराधी निर्दोष सुटत होते नव्हे तर वकीलाच्या वकीलीपणानं कितीतरी मीरांचं आयुष्य उध्वस्त होत होतं.त्यांचा गुन्हा नसला तरीही........पण नियती मात्र सोडत नव्हती.ती मात्र आपलं काम दाखवतच होती.पूर्वसूचना न देता पूर,वादळ,भुकंप,त्सुनामीची तर कधी कोरोनासारख्या इतर आजाराच्या माध्यमातून निशांतसारख्या माणसांना संपवून खरा न्याय करीत होती.
७)आश्वासन

फाल्गून सुरु झाला होता.त्याचबरोबर लग्नघाईही सुरु झाली होती.सगळे थाटामाटात विवाह करीत होते.सगळीकडं आनंदी आनंद झगमगत होता.काहींचे विवाह जुळले होते.तर काहीजण विवाह जोडत होते.
केतकीचाही विवाह जुळला होता.तिचं लग्नही निघालं होतं.त्याचबरोबर ती खुश होती आपलं लग्न होणार.आपला संसार सुरु होणार.नवीन परीसर नवीन लोकं आपल्या आयुष्यात येणार.त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल याची स्वप्न ती पाहात होती.तिला काय माहित होते की कोरोना येईल व आपल्या चांगल्या स्वप्नावर पाणी पडेल.
कोरोना आला होता.सगळीकडं लॉकडाऊन सुरु झालं होतं.विवाहमंडपाला टाळे लागले होते नव्हे तर विवाहालाही बंदी होती.विवाहाला परवानगी नव्हती.लोकं पाखरासारखे मरत होते.कोरोना काही थांबल्या थांबत नव्हता.त्यातच लाकडाऊनमध्ये विवाहाची ठरलेली तारीख निघून गेली.आता काय?केतकी तसेच तिच्या मायबापाला विचार येवू लागला.
काही दिवस असेच निघून गेले.लॉकडाऊन अंशतः उघडलं.त्यातच कमी लोकं बोलावून विवाह करणे सुरु झाले.केतकीच्या मायबापालाही तसंच वाटलं.त्याबरोबर त्यांनी जावयांना बोलावलं.विचारलं की विवाहाचं काय?
जावई म्हणाले,
"विवाह तर होईलच.पण माझ्या नातेवाईकांचं काय?माझे हजार नातेवाईक आहेत,ते काय म्हणतील?"
शेवटी विवाह तो.......आपण मुलींची जात.काही म्हटलं तर जावयांना राग येईल.विवाह तोडेल.असं समजून केतकीकडील मंडळी चूप बसली.त्यातच परीवर्तनवादी काळाचा फायदा घेत सासूसास-यांना न जुमानता जावई मुलीला फिरवायला नेवू लागले.तशी केतकीच्याही मनात फिरायची इच्छा नसुनही आपला पती विवाह तोडेल असं समजून फिरायला जात असे.तसे मायबापही फिरायला पाठवत असत.
परीवर्तनवादी काळ........परीवर्तनवादी काळाचा फायदा जावयानं घेतला.तो आश्वासन देत देत तिला फिरवू लागला.त्यातच त्याला विवाहाचं विचारल्यावर तो माझे हजार पाहूणे असंच म्हणायचा.
कोरोनाचा आजार वाढतच होता.तो काही केल्या कमी होत नव्हता.ज्यांचे विवाह जुळले होते.ते विवाहही निपटून गेले होते.शेवटी मायबापांना विचार आला.त्यांनी केतकीला फिरवायला नेण्याची मनाई केली.
केतकीनं आता त्याच्यासोबत फिरणं बंद केलं होतं.त्यातच तिचा पती तिच्यासोबत फिरता न येत असल्यानं तोही परेशानच होता.शेवटी ती फिरायला येत नसल्यानं त्याला वाटलं की ही काही कामाची नाही.म्हणून त्यानं ऐनवेळी विवाह तोडला.
विवाह तुटला होता.केतकीचे फिरायला जाणे महागात पडले होते.ती फिरायला गेल्यानं त्यानं विवाह केला नव्हता.तिही फिरायला गेली होती.नव्हे तर आश्वासनावर भाळली होती.ज्या आश्वासनानं तिचा जीव घेतला होता.

८) वेडी आठवण

ती सैरावैरा पाहात होती इकडेतिकडे.तिचं कशातच मन लागत नव्हतं.काय करावं सुचत नव्हतं.सारखी तिची नजर काहीतरी शोधीत होती.कुणाची तरी आठवण काढत होती.कंगणा तिचं नाव.
कंगणा महाविद्यालयात जात होती.अभ्यास करीत होती.त्यातच तिचं आकाश नावाच्या एका मुलासोबत प्रेम झालं.मग काय दोघंही दररोज भेटायला लागली.फिरायला बागेत जायला लागली.प्रेमाच्या गप्पा गोष्टी करायला लागली.त्यातच त्यांचं एवढं प्रेम झालं की त्यातून त्यांचं लग्न केव्हा झालं हे त्यांनाही समजलंच नाही.आकाश व कंगणाचा विवाह झाला.दोघांचा सुखी संसार सुरु झाला.
काही दिवस सुखात गेले.कोणाला कशाची फिकर नव्हती.यातच तिला एक बाळही झालं.
विवाह होण्यापुर्वी आकाशला कोणताच शौक नव्हता.तो आपल्याला शौक नाही हेच सांगत होता.पण विवाहानंतर तो दररोज पिवून यायला लागला.मग दारुवरुन रोजची भांडणं.कंगणा तंग होवू लागली.त्यातच त्या भांडणातून कधी कंगणाला तो मारुही लागला.एकदा असाच त्यानं तिच्या डोळ्याला मारल्यानं जबर दुखापत झाली होती.
आकाश दारु प्यायचा.रोजरोज मारायचा.त्यामुळे कंगणाला काय करावे हे समजत नव्हते.त्यातच झालेलं लेकरु........लेकरु आज तीन महिण्याचं झालं होतं.
कंगणा आणि आकाशच्या पोटी झालेलं लेकरु छान होतं.ते छानसं हसत होतं.दोघांच्याही तो अंगाखांद्यावर खेळायचं.मजा यायची.त्यातच दिवस कसा जातो हेही त्यांना समजायचं नाही.
कंगणाचंही आकाशवर प्रेम होते.पण तो दारु पित असल्यानं तिला तो आवडायचा नाही.त्यातच तिला त्याची जुनी गोष्टही माहित पडली.तेही लेकरु झाल्यावर.त्याला एक पत्नी होती.ती गावाकडं राहात होती.पण ती तेवढी शिकली नसल्यानं त्याला ती आवडत नव्हती.म्हणूम त्यानं तिला गावाला ठेवून हा विवाह कोणालाच माहित न करता तिनं केला होता.यात त्याची जेवढी चूक होती.तेवढीच चूक तिचीही असल्यानं ती गप्प होती.
एक दिवस ही त्याच्या पहिल्या विवाहाची गोष्ट तिनं आपल्या बापाला सांगीतली.तशी तिनं झालेली चूक कबूल केली.मग काय बापानं तिला माफ केलं.तसंच सांगीतलं की तिला जेव्हा त्याला सोडून यायचं असेल तेव्हा तिनं यावं.या बापाच्या घरी तिचं स्वागतच आहे.
बापानं सांगीतलेल्या अभयाच्या गोष्टी तिला पटल्या होत्या.त्यातच आता बाळ झाल्यानंतर पहिल्या पत्नीवरुन तिचं आकाशशी भांडण होवू लागलं.त्यातच तो दिवस उजळला.
आजही नेहमीप्रमाणं त्यांचं भांडण झालं होतं.तशी तिनं माहेरची वाट धरली.तिनं आपलं लेकरु पकडलं व ती रवाना होवू लागली.पण एवढ्यात आकाशनं ते लेकरु हिसकावलं.
कंगणाला राग आला होताच.शिवाय त्या रागाचा परिणाम म्हणून की काय,तिनं आपल्या त्या तीन महिण्याच्या लेकराची कदर केली नाही व त्याला सोडून ती आपल्या मायबापाच्या घरी आली.
ती मायबापाच्या घरी तर आली खरी.पण आज तिला आपल्या लेकराची आठवण येत होती.ते लेकरु कसं असेल याची चिंता तिला सतावत होती.नव्हे तर आता तिला आपल्या पतीजवळ जावेसे वाटत होते.केवळ लेकरासाठी.........पण आता आपला पती आपल्याला ठेवेल का?हाही प्रश्न तिच्या मनामध्ये होता.वेड्या आठवणीसारखा.तिला पतीच्या आठवणीने नाही तर बाळाच्या आठवणीने त्रस्त केले होते.
ती प्रत्येकाला सांगत होती.गयावयाही करीत होती की त्यांनी त्याला समजवावं.त्यासाठी त्याचा फोननंबरही देत होती.कदाचित तो हे सगळं विसरुन तिला न्यायला येईल.पण जीवनात दोनवेळ केलेली चूक तिला भोवत होती.एक म्हणजे तिचं लग्न करणे व दुसरी म्हणजे तीन महिण्याच्या बाळाला सोडून जाणे.शेवटी काय तर ती कंगणा आज एखाद्या हंबरड्या गाईसारखी हंबरडत होती.पण तिचा तो हंबरडा आज ऐकायला कोणी वाली नव्हता.कोणीच वाली नव्हता.

९) लेकरु

" मला लय भीती वाटते त्याची." ती सांगत होती आपली दुःखभरी कहाणी.जी कहाणी ऐकून वाईट वाटत होतं.
नलिनी बाळाला सोडून माहेरी आली होती.तिचं बाळ लहान होतं.त्यामुळं तिला त्याची आठवण येत होती.काळजीही तेवढीच वाटत होती.तसा सुहास तिला म्हणाला,
"तु जा सरळ. कोणालाही न घाबरता जा. तु जा तिकडे तो काही करणार नाही. लोकं सोडचिठ्ठ्या झाल्यावरही जातात. कोणी म्हटलं तर म्हणायचं माझा राग शांत करायला गेले होते. त्यानंतर कोणी काही बोललं तर चूप राहायचं. बोलायचं नाही. काही करणार नाही तो."
"तो ठेवेल का?"
" तो ठेवेल पण तू जाशील तेव्हा ना."
"केव्हा जावू."
"तु एक काम कर, एक तर पूर्ण विसर.ना ही तर उद्याच जा.वेळ नको दवडू.अन् जायचं नसेल त्याच्या घरी तर परवापासून हा लग्नाचा विषय डोक्यात आणायचा नाही. कारण एखाद्या जखमेवर वारंवार मीठ चोळलं तर ती ताजीच राहते.तसं तुझ्या जीवनाचं होत आहे. लग्न झालं एकदा मुलीचं की मायबाप तिचे नसतातच. पती हाच सर्वस्व असतो आणि पतीची भीती पत्नीला नसावीच. मारनच तो ना.एकदाच मारन न तो.अन् मरणाच्या पुर्वी शरणाची भीती बाळगू नये. असा कितीतरी वेळा त्यांनं तुला मारलं असेलच. एकदा खावून घ्यायचा लेकरासाठी. लग्नानंतर मायबाप कितीही चांगले बोलत असले तरी ते चांगले राहतीलच पुढे असे नाही.हेही दिवस निघून जातीलच आणि लग्नाला दिवसच किती झाले असतील तुझ्या.एक दिड वर्ष झाला असेल कदाचित. मग त्या दिड वर्षात तुनं का पाहिलं? किती ओळखलं पतीला? जो पती आयुष्यभर ओळखता येत नाही.तो तू दिड वर्षात कसा ओळखला? त्याला सुधरवणं हे बाईच्या हातात असतं.माणसं तर स्रीच्या तालावर चालत असतात. ठीक आहे आज मायबापाकडं मायबाप आहे.उद्या वहिणी आल्यावर काय करशील? हं तेच सांगतोय.मी अनुभवानं बोलतोय. तुटलेले संसार जोडणे अवघड आहे.जुळलेले संसार तोडणे सोपे आहे. तुला एक बाळ आहे. ते बाळ म्हणजे तुझं भविष्य आहे. तेच भविष्य त्याला सुधरवेल उद्या.पण आज नाही. उद्या तू दुसरा विवाह केल्यास दुसरा एखादा वाईट भेटला तर........तर काय करशील?त्यापेक्षा हा बरा. बाळ तुझं ना.मग हे सगळे संस्कार बाळावर कर.आता गेल्यावर परत येवू नको,पतीच्या घरुन पाय काढून. अन् आता पाहूणी म्हणून परत ये.पण परत येतांना बाळाला सोडायचं नाही. यावर तु आता तुझा निर्णय घे. तुला जिंदगी काढायची आहे अख्खी.मायबापांना नाही.मी सांगतो म्हणून नाही तर तू विचार कर याचा. तुला जायचं आहे.आनंदानं जा.आईवडील चार दिवस बोलणार नाही तुझ्याशी. रोष राहिल काही दिवस. मग सगळं व्यवस्थित होईल. पण एक लक्षात घे. तिथेही तुला कामंच करावी लागतील. कोणीच कोणाला सांगीतलेलं ऐकणार नाहीत. सगळे आपल्या रागात असतील. महत्वाकांक्षा महत्वाची असते ना सर्वांची.म्हणून सगळा निर्णय तुझ्यावर.तुझ्या बापाला वाटते माझ्या मुलीचं वाईट होवू नये.म्हणून त्यांनी तो तुला न पाठविण्याचा निर्णय, निर्णय घेतला. कोणीच मागं हटायला तयार नसेल तर तडजोड कशी होणार! म्हणून निर्णय महत्वाचा.तुला जर वाटत असेल की त्यानं न्यायला यावं तर तो न्यायला येणार नाही. कारण तुलाही माहित आहेच.तुला जसा राग आला त्याचा,तसा त्यालाही आला असेलच.साहजिक आहे. प्रत्येकाला वाटते माझी चूक नाही.मी मोठा. तेच प्रशांतचं होत असेल. तेव्हा तुलाच नमतं घ्यावं लागेल आणि गेल्यानंतर परत पाय काढायचा नाही तिथून.तू बाबांना पटव. म्हण, मला माझ्यासाठी नाही तर माझ्या लेकरासाठी जायचंय. हिंमत कर,कारण तुला तिथं अख्खी जिंदगी काढायची आहे. समजून घे.ते काम तुलाच करावं लागेल. तु जावून तर पहा. एकटीच जावून पाहा."
"पण मला फारच भीती वाटते त्यावर बोला."
"तेच सांगत आहे. वाघ आहे का की तो तुला खावून टाकणार. तू जा त्याच्याघरी मग बोलीन मी त्याच्याशी आणि तुझ्याशीही. आपण दोघं मिळून त्याला सुधारण्याचा प्रयत्न करु."
सुहासचं नलिनीला बोलून झालं होतं.तसा काहीएक फरक नलिनीच्या मनात पडला व ती जायला तयार झाली होती.
अलिकडे घटस्फोटाचे भरपूर अर्ज येत होते.लोकं छोटसंही कारण सहन करीत नसत.शुल्लक शुल्लक कारणावरुन काही महिला घर सोडून जात.त्यात त्यांची चूक असे असं नाही.पण टाळी एका हातानं वाजत नाही, त्याप्रमाणे त्यांचं होत होतं.दोघंही एकमेकांवर दोषारोपण करीत होते.एकमेकांना हीन लेखत होते.
सुहासनं नलिनीला समजविण्याच्या केलेल्या प्रयत्नातून नलिनी तयार तर झाली खरी.पण विकास आढेवेढे घेत होता.त्याला वाटत होतं की लहानशा बाळाला सोडून जाणारी ही महिला आई होवू शकत नाही.म्हणून तो तिला नाकारत होता.शेवटी त्याला जेव्हा खुप समजावलं,त्यावर तो तयार झाला.
अलिकडे परीवार तुटू नये म्हणून कोणी मार्गदर्शन करीत नाहीत.त्या मार्गदर्शनासाठी कोणाजवळ पुरेशी सवड नाही.कोणीही भडकवू बोलणे बोलतात. त्यामुळं अशा कारणानं परीवार तुटतो.नलिनीचंही असंच होत होतं.पण सुहासच्या मार्गदर्शनाचा परीणाम तिच्यावर झाला व ती विकासच्या घरी जायला तयार झाली.
आज नलिनी विकासच्या घरी होती.मुलगा मोठा झाला होता.आयुष्यभर नलिनीनं विकासचा मार खाल्ला.दारु त्याची अजिबात सुटली नव्हती.पण मुलगा तिला फुलासारखा जपत होता.आई म्हणून नाही तर आईने झेललेल्या खस्ता पाहून.ज्या खस्ता तिनं आयष्यात झेलल्या होत्या आणि त्या खस्ता नलिनीच्या मुलानं अनुभवल्या होत्या.

१०)मार्गदर्शन

"किती दिवस झाले बाळाला सोडून.नाहीतर जेवढे जास्त दिवस होतील दुरावा वाढेल व तो घरात घेणार नाही."
तशी ती रडायला लागली.त्यावर परत भावेश म्हणाला,
"काय झालं रडायला.जात आहे ना आज की बदललाय निर्णय."
भावेश बोलत होता आपल्या मैत्रीणीला,जी मैत्रीण त्याला व्हाट्सअपवर मिळाली होती.
गोदा अशीच मुलगी.......पचवीसतली.ती मायबापाच्या घरी लाडीगोडीनं मोठी झाली.मायबापानं तिचे लाड पुरवले.त्यातच काही दिवसानं तिची आई वारली व ती एकाकी झाली.त्यातच बापानं तिचा विवाह केला.
विवाहानंतर काही दिवसानं तिच्या पतीनं तिला हाकलून दिलं.लहानग्या बाळाला हिसकून.त्यामुळं तिला बाळाची फार आठवण येत असल्यानं ती आपल्या एका मित्राशी बोलत होती.
"माझा बाप नकार देते जायला." ती म्हणाली.त्यावर तो म्हणाला,
"ते सोडून गेले का त्यांच्या लेकरांना.त्यांना काय माहित आईची ममता.आईची ममता आईलाच माहित.एखादी वस्तू आपल्याजवळ असते,तेव्हा तिचं महत्व नसतंच.ती वस्तू दूर जाताच महत्व प्राप्त होतं.तू आणि तुझा बाळ,ती ममता आणि तुझा भाऊ,तुझे मायबाप यात पुष्कळ मोठा फरक आहे.तो फरक म्हणजे ममता.जी ममता त्यांनी अनूभवली नाही.जी बाळाची ओढ तुला लागली आहे,ती ओढ,ती ममता ते पुर्ण करु शकतील काय?जीवन जगतांना माया,ममता व ओढीला फार महत्व आहे.हे जीवन आनंदानं जगता यावं म्हणून विवाह करावा लागतो.तुझे भाऊबहिण,मायबाप तुला सांभाळतीलही जीवनभर,पण ही जी ममता आहे,ती ते पुर्ण करु शकतील काय?याचा तूच विचार करावा व तू तुझे निर्णय घ्यावे.हा आता तुझा निर्णय." त्यावर ती म्हणाली,
"तो जास्त दारु पितो."
"तो एकटाच आहे तर आता जास्त पेणारच.तो दारु अजिबात सोडणार नाही.तेव्हा जायचं की नाही जायचं हा तुझा निर्णय,पण माझ्या मतानं तू बाळासाठी तरी जावं.नाही जायचं असेल तर बाळाला विसरावं,तो मग कसाच पोसो.बाळाचे कोणतेही हाल होवो."
"बाळावर परिणाम होवू शकते काय?"
"वेगळं राहतांना बाळावर परिणाम होईलच.तो पेणारच.आता कारण त्याला रोखणारं कोणी नाही त्याच्या घरात.तुझं बाळ आता कोणाकडे राहते?"
"आपल्या आजीकडे.ती आहे म्हणून तर मी आले."
"बरं आहे तुझं.प्रत्येकाच्या लेकरांना आजीनंच सांभाळलं असतं तर आई कशाला राहिली असती आणि हं फक्त उद्यापर्यंतच बोलायचं बाळाबद्दल.कारण तू आपलं स्वतंत्र्य निर्णय घेवू शकत नाही.आज भाऊ त्याला सोड म्हणून भांडण करतो.उद्या तुझा बाप नसल्यावर पोसल का तुला?मायबाप सगळे आपले असतांना बाळाची आस का असते सांग बरं?म्हणूनच जा लवकर.कारण आताही जास्त दिवस झाले नाहीत.जर जास्त दिवस झाले तर तू तुझ्या मुलाला मुकशील.तो बाळ तुझा राग करेल.तुला शाप देईल.ते पाप लागेल.कारण तू बाळाचं मन तोडत आहेस असं वाटतं.लोकं तुझ्या बापाला भावाला नावं ठेवणार नाही,तुलाच ठेवतील.यावर विचार कर तू."
असं बोलताच ती पिघलली.तिला बाळाची जी आठवण आली.ती स्वस्थ बसू देत नव्हती.तशी ती पहिल्यांदा त्याचेकडे गेली.परंतू त्यांनी तिला यावेळीही हाकलून दिलं होतं.तिची सासू तिला कोर्टात जायला सांगत होती.कोर्टाशिवाय मुलगा देत नाही म्हणत होती.पोलिसस्टेशनही तिनं करुन पाहिलं.पण पोलिस त्यावर म्हणत होते की तो तिचा घरगुती प्रश्न आहे.त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात पदोपदी माणुसकीपुढं असा जीव जात होता.तिच्याजवळ पैसाही नव्हता.कोर्टकचेरी करतो म्हटलं तर पैसा नव्हता.पोलिसही न्याय द्यायला तयार नव्हते.अशावेळी काय करावे हे तिला सुचत नव्हते.कोर्टातही न्याय भेटेल काय हाही एक प्रश्न होता.कारण वकीलाच्या वशीलतेबाजीवरही प्रश्नचिन्ह होतं.जो जास्त पैसा देईल,न्याय पोलिसांप्रमाणे त्याच्याच बाजूने लागला असता.तिच्याजवळ पैसे नसल्यानं तिच्या बापाला वाटत होतं की न्याय त्याच्याच बाजूनं झुकणार.म्हणून बाप व भाऊ कुठेच जायचं नाही असे सांगत होते.विसरुन जा म्हणत होते.पण ममता विसरता येवू शकते काय?त्यातही ते तीन महिण्याचं बाळ.ममता विसरता येत नव्हती.म्हणून पुन्हा तिला जाण्यास बाध्य करण्यासाठी त्यावर तिचा मित्र तिला म्हणाला.कारण त्याला वाटत होतं की कदाचित तो परत परत जाता जाता ठेवेल.
"तो कोर्टाशिवाय देणार नाही.पण कोर्टात वाळलंही जळते ओलंही.तुला बाळ भेटेलच असं नाही.हे लक्षात ठेवून पुढलं पाऊल उचल."
"तो कसा पोसेल याची चिंता असल्यानं बाळ हवं मला.कारण तो खुप पितो.धड भांडीही नाही घरी.मी कोर्टात जावू का?"
"हं बरोबर.मग तो तुझ्या बाळाला कसा पोसेल.अन् ह्या भांडीकुंडी तू असतांना होती का?हे बघ कोर्टात जाण्यापुर्वी दहा वेळा विचार कर.लेकराला प्रेमानं मागून पाहा.कारण एकदा का प्रकरण कोर्टात गेलं तर कोणी कोणाचा राहात नाही.म्हणून सांगतो.ती लढाई असते अखेरची.जो हारतो त्याचंही नुकसान अन् जिंकतो त्याचंही.प्रेमानं मागून पाहा.तुम्ही दोघांनी कोर्टाचे खटले लढले आहेत का?बाबा तुला ते आणायचं नाही म्हणतात.तुला जावू नको म्हणतात.मंग बाळाचं काय?बाळाच्या भावनेचं काय?तू विसरु शकशील हे सगळं?एकतर बाळ पाहा नाहीतर बाप पाहा.तू स्वतः कमवायला पाहिजे होतं.अन् बाळाला घालायला पाहिजे होतं.खुप वाईट झालं तिथून पाय काढून.त्याच्या घरी राहून हे करायला हवं होतं.तोच उपाय होता."
"जावू दे.मी आता कामावर जाणार.विसरणार मुलाला."
"अगं तुला आई मानावं की नाई हाच विचार आहे.अगं सोडायचंच होतं तर गरोदर असतांनाच सोडायचं होतं.किंवा मुलगा घेवून सोडायचं होतं.किंवा मुलगा मोठा झाल्यावर.माहित आहे,तुझा हा आताचा निर्णय मुलाची हत्या करण्यासारखा आहे. तुझ्याजवळच त्याचा उपाय आहे.कोणीच तुला तसं केलं हे चांगलं केलं म्हणणार नाही.मला तू दादा म्हटलं ना.मग माझं ऐकशील तर तू कोणाचं न ऐकता जा आपल्या लेकराजवळ.उपाशी राहिली तू तरी चालेल.बाळाला पोटाला दे.मार खाल्ला तू तरी चालेल.पण बाळाला ममतेचा मार देवू नको.त्याची ममता हिरावून घेवू नको.तू जशी बापाची मुलगी आहे.तुझ्या बापाला वाटते की माझ्या मुलीचं वाईट होवू नये.तसं तुलाही वाटायला हवं की माझ्या बाळाचं वाईट होवू नये.जशी तू दिड वर्षपर्यंत तिथं राहिली तशी जेव्हापर्यंत सहन होते तेव्हापर्यंत राहा तिथं.मुलगा मोठा झाल्यावर मग सोडलं त्याला तरी चालतं.अगं ते पशु पक्षी पाहा,तेही आपल्या लहान बाळाला सोडत नाहीत.गाई बकरीच्या लहान लेकराला मारुन पाहा,तीही आपल्याला मारते.कोंबडीच्या पिलाला मारुन पाहा,तीही टोचते.आणि तू मौन आहेस अन् मला विचारत आहेस की काय करु ते.तू स्वतंत्र्यपणे आपला मार्ग ठरव.आणि स्वतःच स्वतःची जिजाई बन.पुण्याला असतांना शिवाजी घडला,तेव्हा त्याचा बाप शहाजी सोबत नव्हता.झाशीच्या राणीनं दत्तक पुत्र पाठीशी बांधून लढाई केली,तेव्हा नवरा जीवंत नव्हता.पण बाळ सोडला नाही.माझं वाईट वाटत असेल तर बोलू नको माझ्याशी.पण माझ्या बोलण्यावर नीट विचार कर.भाऊ आणि बाप तुला शेवटपर्यंत पुरणार नाही आणि दुसरा लग्न केल्यास तोही कसा निघेल हे सांगता येणं कठीण."
मायेच्या ममतेनं घायाळ झालेली नागीण त्याचे घरी परत पुन्हा जावून आली होती.तेव्हा तर तिला जीवच द्यावासा वाटत होता.पण काय करावो हे सुचत नव्हते.परंतू मानाच्या कोप-यात स्वतःला बंदिस्त करुन ती नागीण शांत होत होती.कारण पुढे बलदंड बाहू हातात काठ्या घेवून उभे होते.परिस्थीतीच तशी होती.त्यातूनही मार्ग काढून तिला जगायचं होतं उद्याच्या येणा-या उज्ज्वल भविष्यासाठी आजचं संकटमय वर्तमान विसरुन.मित्र मात्र तिला सांत्वना देत होता.हवा तेवढा आधारही देत होता.तिची आठवण पुसत होता तिच्या मनातून.तिनं जेव्हा ती दुस-यांदा त्याच्या घरी गेल्याचं सांगीतलं.तेव्हा भावेश म्हणाला,
"ठीक आता नको जावूस एकदा गेली ना.कोर्टात जाता येतं.पण लेकरु सध्याच मिळणार नाही तुला.चार वर्ष जातील.हाकललं म्हणावं लागेल.पण पैसा असेल तर........नाहीतर विसरुन जा कायमची.त्याला आणि आपल्या लेकरालाही.आठवणही काढू नको.हेही दिसं निघून जातील.नशीबावर विश्वास ठेवसगळं चांगलं होईल.तुझी चूक नसेल तर त्यांना हे सगळं भोगून द्यावं लागेल.असं समज की तुला मुलगाच झाला नाही.तुझं लग्न झालंच नाही.तो एक अपघात होता.आठवण काढू नको.आलीच तर इतरांशी दुस-या विषयावर बोलायचं.ताजी घटना असल्यानं आठवण येईल काही दिवस.जसजसे दिवसं जातील तसतशी आठवण जाईल.माझ्याशी बोलायचं.अजून कोणाशी.नसेलच काम तर काहीतरी लिहित बसायचं.आणि नसेलच विसरता येत त्याला तर एखादा मित्र पकडायचा.त्याच्यासोबत फिरायला जायचं वेळ गमवायसाठी.जावू दे.तुझं नशीब खराब असं समजून वाग.माझीही आई अशीच सहा महिण्याच्या लेकराला सोडून आली होती.त्यांनी हाकलून दिलं होतं.पण आईची चूक नसल्यानं बाबा चांगले मिळाले.त्या च्या मात्र खुप गती झाल्या नंतर.ते बाळही अकाली मरण पावलं होतं.त्यांना आठवण यावी म्हणून देवानं नेलं असेल.तुला आज त्याईनं हाकललं न हाच त्यांचा गुन्हा आहे.तू चिंता करु नको.तुझा बाळ तुझा बदला जरुर घेईल.उन्हाळ्यानंतर पावसाळा येतोच.तशी काही दिवस जाताच तू विसरशील.तू बोलशील जेवढं तुझं मन हलकं होईल.पण तू हे दिवसं विसरणार नाहीस.म्हणून या आठवणी काढू नको व आपलं डोकं खराब करु नको.सुखी राहा,आनंदी राहा."
काळानुसार ती बाळाला विसरली होती.ती लिहिती झाली होती.तिला आठवण आली की ती लिहित होती.त्या गतकाळातल्या आठवणी.त्या आठवणी ती प्रसिद्ध करीत होती.त्यामुळंच की काय आज ती फार मोठी लेखिका झाली होती.तिच्या जीवनातही शिशिरानंतर वसंत फुलला होता.पण त्यासाठी भावेशचं मार्गदर्शन पुरेसं ठरलं होतं.

११)ममता

रात्रीचे बारा वाजले होते.रात्र फारच झाली होती.ममताला लेकराची आठवण येत होती.तिचं लेकरु तिच्याजवळ नव्हतं.त्यातच तिचं बाळ तिच्याजवळ नसल्यानं रात्रीला झोप येत नव्हती.तसं तिला जेवणही धकत नव्हतं.
ममता........ममताचा जीव जडला होता तिच्या बाळावर.तिला कसंही करुन बाळ हवं होतं.तसा तिचा विवाह थाटात झाला होता.परंतू सासू मात्र बरोबर निघाली नव्हती.
ममताचा नवनवीन संसार होता.तो फुलत चालला होता.अशातच आई वारली होती.त्यातच वडील एकाकी पडल्यानं ममता आपल्या वडीलांकडे दर आठ पंधरा दिवसानं येत असे.एक लहानसा भाऊ असल्यानं ममताला त्याचीही आठवण येत होती.
ममताचं सातत्यानं वडीलांकडे जाणं तिच्या सासूला खपत नव्हतं.पण ती तरी काय करणार होती?वडीलांनाही कोण होतं तिच्या.एक मुलगा.......तोही लहान.त्यातच ती गरोदर राहिली.
ममताचं वडालांकडे सातत्यानं जाणं.तसेच ते सासूला न खपणं कुठंतरी तिच्या संसाराला छेद देणारी घटना ठरली.जसा मुलगा झाला.तशी ममताला सबक शिकविण्याची योजना सासूच्या मनात आकार घेवू लागली.त्यातच ती नवनवीन योजना आखून ममताला त्रास देवू लागली.त्यातच रोजची भांडणं होवू लागली.
दररोजची होणारी सातत्यपुर्ण भांडणं.ममताला तिथं राहाणं नकोसं करु लागली.त्यातच ती भांडणं वडीलांनाही माहिती झाली.म्हातारा बाप चिंता व्यक्त करु लागला.त्यातच काय करावं तेही त्याला सुचत नव्हतं.शेवटी काय तर आता मुलीला कायमस्वरुपी आणणं हेच उद्दीष्ट त्यांच्यासमोर उरलं.
एक दिवस असंच भांडण होत असतांना ममतानं बापाला बोलावलं व ते भांडू लागले.त्यातच भांडण एवढं विकोपाला गेलं की वडीलांनी ममताला माहेरी परत आणली.कदाचित तिची सासू सुधारेल व झालेल्या चुकीची माफी मागून ती न्यायला येईल या उद्देशानं.पण त्यात त्यांची एक चूक झाली.ती म्हणजे त्यांनी बाळ हिसकावून ठेवल्यानं त्या बाळाला न आणता आपल्या मुलीला आणलं होतं निदान बाळासाठी तरी ते न्यायला येतील असं त्यांना वाटत होतं.
भरपूर दिवस झाले होते.सासूचा काही फोन नव्हता.ना पतीचाही फोन येत होता.ममता घायाळ होत होती एखाद्या हरीणीसारखी.एखाद्या म्हशीचं लहान रेडकू मेल्यावर जसं त्या म्हशीला वाटतं,तसं तिला वाटत होतं.ती वडीलांना नेवून द्या म्हणत होती.त्या घायाळ पशूपक्षांसारखी.पण वडील आपल्या बाळाला विसरुन जा म्हणत होते.त्यांनी फार अपमान केला आपला असेही म्हणत होते.
संसार तुटला होता.विवाह मोडला होता.तिच्या मनात बाळाची ममता असली तरी ममतेची हार होत चालली होती,नव्हे तर त्या ममतेपुढे वडीलांच्या भावनेचा बळी जात होता.ममताला काय करावे ते सुचत नव्हते.ती घायाळ हरीणीगत तळपत होती आपल्या बाळाची आस करुन.आपला बाळ आज भेटेल,उद्या भेटेल याच आशेने.पण तो दिवस उजळत नव्हता.कारण सासू आणि बापाच्या महत्वाकाक्षेनं ममताच्या ममतेची हत्या झाली होती.

इतर रसदार पर्याय