चंपकवनातील शाळा Ankush Shingade द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चंपकवनातील शाळा

चंपकवनातील शाळा

ती चंपकवनातील शाळा अतिशय सुंदर होती. त्या शाळेत विविध प्राणी शिकत असत. तसंच शिकतांना गुण्यागोविंदाने राहात असत. शाळेतील काही शिक्षक प्राणी अतिशय चांगले शिकवीत असत. परंतु त्या शाळेतील त्या प्राण्यांच्या शिकविण्यावर ग्रहण लागलं. जेव्हा त्या शाळेचा मालक मरण पावला.
ती चंपकवनातील शाळा. त्या शाळेतील शिक्षकांची नेहमी ओरड असायची की ते उपाशी पोटी काम करु शकत नाहीत. तेव्हा त्यांच्यासाठी जेवन यावं, तेही शाळेत. मग सर्व शिक्षक प्राण्यांना जेवन सुरु झालं होतं. ते अधिकाधिक सुग्रास अन्न खावू लागले होते. त्यांना चांगलं सुग्रास अन्न मिळत असे. हिंस्र प्राण्यांना मांस तर शाकाहारी प्राण्यांना चांगलं हिरवं गवत मिळत असे. तेही जाग्यावर. मग काय, शिक्षक प्राण्यांना अन्न मिळत असल्यानं सारे संदर्भ बदलले. असे संदर्भ बदलले की त्यांच्यात माणूसकीच उरली नव्हती.
ती शाळा पुर्वी एका वनराजाची होती व त्या शाळेला एक मालकही होता. जो वनराज होता. तोच शाळेचा कारभार पाहात होता व तोच त्या प्राण्यांच्या शाळेत शिकविण्यावर वचक ठेवत होता. जो प्राणी चांगलं शिकवायचा नाही. त्याचेवर ताशेरे ओढत त्याला शिकवायला बाध्य करायचा नव्हे तर काढूनही टाकायचा. त्यातच त्याच्या मनात कुठलाही स्वार्थ नव्हता. तो वनराज अतिशय चांगला होता.
दिवसामागून दिवस जात होते. काळ हळूहळू सरकत होता. तसा काळाच्या ओघात त्या शाळेवर लक्ष ठेवणारा वनराज अचानकच मरण पावला व त्याची मुलं त्या शाळेचे मालक बनलीत. ज्यांच्यात शिक्षणाचं मुल्य नव्हतं. मुल्य होतं स्वतःचा स्वार्थ. तेही शाळेच्या माध्यमातून. त्यातच शाळेत येणारं सुग्रास अन्नही बंद झालं होतं. आता प्रश्न पडला होता अन्नाचा. जो सोडविणं भाग होता. जर तो प्रश्न सोडवला गेला नाही तर शिक्षकांना अन्न मिळणार नाही व शाळा बुडेल ही भीती होती. तेव्हा त्या वनराजाच्या मुलांनी त्या प्राण्यांच्या शाळेतील प्रत्येक प्राण्यांच्या लेकरांना सांगीतलं की त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या जेवनाची व्यवस्था करावी. जेणेकरुन ते चांगले शिकवतील. जो चांगलं अन्न पाठवेल. त्यांच्या मुलांना चांगलं शिकवता येईल. मग काय सर्व प्राण्यांना चिंता पडली. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांनी न डगमगता आपल्या पिल्ल्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्यासोबत सुग्रास अन्न पाठवणं सुरु केलं. ज्यातून त्यांच्या मुलांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे पोट भरत होतं. परंतु ते त्यांनी आणलेलं अन्न शाळेतील त्या पिल्लांना शिकविणाऱ्या शिक्षकांना न मिळता त्यांच्या शाळेतील त्या वनराजांच्याच मुलांना मिळायचं नव्हे तर ते अन्न हिसकावून घ्यायचे. परंतु ते काही प्रमाणात अन्न शिक्षकांसाठी ठेवायचे. ज्यातून शिक्षण शिकविणारे शिक्षक प्राणी उपाशी राहायचे. तरीही त्या अन्नानं त्या वनराजाच्या मुलांचं समाधान होत नव्हतं. कारण ते अन्न तोकडं पडत होतं, अर्थात कमी पडत होतं. वनराजाच्या मुलांना जास्त प्रमाणात अन्न हवं होतं उद्याची गरज म्हणून. त्यानंतर त्यांनी त्या प्राण्यांच्या लेकरांना शिकविणाऱ्या शिक्षकांना वेठीस धरलं व त्यांना पुरेसं अन्न न देता त्या अन्नातून पुर्णच भाग ते काढू लागले. ज्याला ते सुकवून ठेवून उद्याची गरज भागवू लागले. त्यातच ते आजची गरज विसरले. कारण आज जे शिक्षक प्राणी उपाशी राहात होते अन्नाविणा. त्यांना उपाशीपोटी नीट शिकविताच येत नव्हते. त्यातूनच शिक्षणाचं मुल्य ढासळलं व जे शिक्षकप्राणी उपाशी राहात होते. त्यानंतर त्यांनी शिकवणं बंद केलं. मात्र त्या शाळेत असेही काही शिक्षक प्राणी होते की ते आपल्या अन्नातील कोणताच भाग जंगलातील वनराजाच्या मुलांना देत नव्हते. ते ते अन्न स्वतः खायचे. आपल्या विद्यार्थ्यांना खावू घालायचे. त्यांना आवडीनं शिकवायचे. शिकारीचे कौशल्य शिकवायचे. ते कौशल्य हिरीरीनं शिकवायचे. त्यांची हौस मौज पुरवायचे. कोणी मनुष्यप्राणी शिकार करायला आल्यास त्यातून कसं निसटायचं, तेही शिकवायचे. ते मात्र वनराजांच्या मुलांना पटायचं नाही. त्यानंतर त्यांनी अशा होतकरु शिक्षक प्राण्यांना शाळेतून काढून टाकलं. ज्यातून शाळा ही शाळा राहिली नाही. शाळेचा दर्जा घसरला व त्याची परियंती ही झाली की चंपकवनातील शाळेत मुलं कमी होता होता ती शाळाच बंद पडली.
आज चंपकवनात शाळा नव्हती. शिकार कशी करायची ते प्राण्यांना कळत नव्हतं. तसंच स्वतःचं स्वसंरक्षणही कसं करावं तेही त्यांना समजत नव्हतं. काही प्राणी तर लाव्हारीसपणानं मरत असत. अशातच काही माणसं शिकारीसाठी जंगलात येत. तेही प्राण्यांची शिकार करीत. ज्यातून अशा शिकारी माणसांपासून कसं वाचायचं याचं ज्ञान नसलेले प्राणी मारले जात. अशानं आज जंगलातील प्राणी कमी झाले होते. तशीच त्या जंगलातील शोभाही नष्ट झाली होती. त्यातच लोकांनी जंगलात प्राणीच कमी असल्यानं जंगलं तोडणं सुरु केलं होतं. अशातच जंगलं नष्ट होत होती. काही जंगलं नष्टही झाली होती.
जंगलं नष्ट होत होती. जंगलच नसल्यानं पाऊस पडणंही कमी झालं होतं. आता प्राणीही नष्ट व्हायची भीती निर्माण झाली होती.
आज मात्र त्याच वनराजाच्या मुलांना चिंता लागली होती स्वतःच्या अस्तित्वाची. कदाचीत त्यांच्याही मनात त्यांचंही अस्तित्व संपते की काय, ही भीती निर्माण झाली होती. हे सर्व स्वार्थानं व अति प्रमाणात जोपासलेल्या लोभानं घडवलं होतं.
काळ हळूहळू सरकला व काल जी भीती प्राण्यांच्या मनात होती. ती भीती ज्यानं चंपकवनातील प्राण्यांच्या जीवनात वास्तविक स्वरुपात आली होती. आज चंपकवनातील जंगल नष्ट झालं होतं. तसंच प्राणीच नाही तर चंपकवनही नष्ट झालं होतं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०