कामीनी ट्रॅव्हल - भाग ४३ (अंतिम भाग) Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४३ (अंतिम भाग)

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४३

कामीनी ट्रॅव्हल्सला पुरस्कार मिळाल्याचा आनंद पटवर्धन कुटूंबात भरभरून वाहत होता.

या आनंदाच्या पार्श्वभूमीवर कामीनीबाईंनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली.

" प्राची, हर्षवर्धन पुरस्कार मिळाल्याने आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.यामुळे तुम्हा दोघांचा मूड छान आहे तेव्हा मला वाटतं तुम्ही आता कुठेतरी फिरायला जावं. मागच्या वेळी अर्ध्यातून तुम्हाला परत यावं लागलं होतं. त्यामुळे आता पुन्हा जा. यांची काळजी करू नका.मी आहे. प्रदिप आणि तन्मय आहे."

कामीनी बाईंच्या बोलण्यावर भय्यासाहेबांनी पण होकारार्थी मान डोलावली.

"हे बघा मी आता ठीक आहे.तुम्ही आता खरंच कुठे तरी फिरायला जा.तुमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करा. मधला संघर्षाचा काळ विसरा.आम्ही इथे व्यवस्थित आहोत."

कामीनी बाई आणि भय्यासासेबांच्या म्हणण्याला होकार देत प्राचीने म्हटलं,

" आई मी ठरवते. कधी जाणं शक्य होईल ते बघते त्याप्रमाणे बुकींग करते."

" चालेल."
कामीनी बाईंनी समाधानाने मान डोलावली.

***
प्राचीने ऊटीचं बुकिंग करून ते काल उटईला पोचले.

ऊटीच्या निसर्गरम्य वातावरणात प्राची आणि हर्षवर्धन यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली. तन्मय जरी अठरा वर्षांचा असला तरी त्यांचा संसार ख-या अर्थाने आता सुरू होणार म्हणूनच ते ऊटीला फिरायला आले.

दोघंही विशीतल्या नवथर दांम्पत्यासारखं आपल्यातच गुंग होऊन ऊटीच्या वातावरणाचा आस्वाद घेत होते. दोघांच्याही आयुष्यातील बरीच वर्ष वाया गेली होती. आता मात्र दोघांनाही वेळ वाया घालवायचा नव्हता. मधला काजळी धरलेला कालखंड विसरून जास्तीत जास्त वेळ एकमेकांना देऊन एकमेकांत एकरूप व्हायचं होतं.

कामीनी ट्रॅव्हल्सला पुन्हा एकदा पुरस्कार मिळाला म्हणून हर्षवर्धन खूष होता त्या पुरस्कारामुळे प्राची त्याला पुन्हा परत मिळाली होती. आपल्याला पुन्हा पहिल्यासारखं करण्यासाठी प्राचीनी एवढं कठोर पाऊल उचललं म्हणूनच आपणही पुन्हा पहिल्यासारखं झालो. तिनी आपल्यातल्या पुरुषत्वाला डिवचलं नसतं तर कदाचित आपण एवढे कष्ट केले नसते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपण एवढे धडपडलो नसतो. प्राची तू माझ्या आयुष्यात नसतीस तर काय झालं असतं?

मी कदाचित नशेच्या विळख्यातून बाहेरच पडलो नसतो. काम करायला लागल्यावर कळलं की लहान वयात पुरूषांची राज्य असलेल्या या क्षेत्रात तिला किती सावध राहून काम करावं लागलं असेल. तरी ती डगमगली नाही.

हर्षवर्धन आपल्याच विचारात गुंतला होता.तो प्राचीकडे बघत होता पण प्राची त्याला काय विचारतेय हे त्याला कळत नव्हतं.

" हर्षवर्धन कसला विचार करतोस.मी काय म्हटलं ते ऐकलस का?"

" तुझाच विचार करतोय."

हर्षवर्धन म्हणाला.

" हर्षवर्धन आता फार विचार करायचा नाही. आत्ता या क्षणी आपण जगायचं. मनसोक्त जगायचं. मागच्या आठवणींनी अस्वस्थ व्हायचं नाही. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता फक्त आनंद वेचायचा.कळलं."

प्राचीने हे म्हणताच तिला हर्षवर्धन म्हणाला.

"आता फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच मला जगायचं आहे. तुझ्याबरोबर प्रत्येक क्षणातला आनंद मला घ्यायचा आहे."

" होनं .. मग फक्त आत्ताचा विचार कर. ही फुलं बघ. किती सुंदर आहेत. आपल्या मनाला किती आनंद देतात. पण या फुलांचं आयुष्य किती छोटं आहे.तरी आहे तेवढ्या काळात ते स्वतःही छान फुलतात आणि इतरांना आपल्या सौंदर्याने, आपल्या सुगंधाने खूप आनंद देतात. त्यांचा हा गूण आपण शिकायला हवा. आपल्याला कुठे माहिती आहे की. आपल्या झोळीत किती वर्ष आयुष्य मिळालं आहे. आता एवढ्या वर्षात आपण एकमेकांसाठी जगू शकलो नाही ते आता आपण जगायचं."

एवढं बोलून प्राचीनी खूप प्रेमानी हर्षवर्धनचा हात कुरवाळला. हर्षवर्धननेही अलगद तिचा हात दाबला.या त्याच्या कृतीने प्राचीच्या शरीरभर एक लहर उठली. ती आनंदानी रोमांचीत झाली. त्या रोमांचाने तिच्या डोळ्यात पाणी तरळले.हे पाणी म्हणजे आनंदाला, आलेला बहर आणि प्राणयाला झालेली सुरुवात आहे हे प्राचीच्या लक्षात आलं आणि ती लाजली.

हे क्षण दोघांच्याही आयुष्यात आले नव्हते. प्रेम,रोमान्स हे त्या दोघांनाही आयुष्यभर अनुभवताच आले नव्हते. आता त्यांच्या आयुष्यात हे सोनेरी क्षण आले. त्या क्षणांना हळुहळू धुंदपणे आपल्या ओंजळीत दोघांना साठवायचे होते.

किती तरी वेळ दोघंही नि:शब्द बसले. समोर झाडांची सळसळ एक वेगळाच नाद निर्माण करत होती. ती सळसळ दोघांनाही मंत्रमुग्ध करणारी होती. दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी शब्दांची गरज नव्हती. दोघांचे डोळे बोलत होते. हर्षवर्धनने हळूच प्राचीला आपल्याजवळ ओढलं. प्राचीही हर्षवर्धनला बिलगली.

प्राचीनी मनातल्या मनात त्या पुरस्काराला धन्यवाद दिले. त्या पुरस्कारामुळेच आज हर्षवर्धन आणि प्राची एकत्र आलेत.

. प्राची आणि हर्षवर्धनच्या आयुष्यात आनंद लहरी कधी ऊमटल्याच नाहीत. शेवटचा उपाय म्हणून प्राची आणि कामीनी बाईंनी हे नियोजन केलं आणि नशीबानी त्या दोघींना साथ दिली. नशीबाचा फेरा कधी पालटेल सांगताच येत नाही.

तो उपाय अमलात आणताना दोघींना खूप सावधगिरी बाळगावी लागली.

प्राची आणि हर्षवर्धनला एकत्र आणण्यासाठी कामीनी बाई जीवाचा आटापिटा करत होत्या. प्राची आणि हर्षवर्धन जेव्हा फिरायला गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदघन दाटीवाटीने जमा झाले.

त्यांना हर्षवर्धन नशेच्या विळख्यात सापडल्यापासूनचे ते काळेकुट्ट दिवस आठवले आणि भीतीने त्यांचं शरीर थरथरलं.

नशेत बुडालेल्या मुलाला बघताना रोज त्यांचा जीव तुटायचा. पण काही उपयोग नव्हता. त्यातरी काय करणार.

भय्यासाहेबांनी वाईट हेतूने प्राचीचं लग्न हर्षवर्धनशी ठरवलं पण म्हणतात नं वाईटातून कधी कधी चांगलं घडतं ते घडलं. कामीनीबाईंना कधीही वाटलं नव्हतं की प्राची हर्षवर्धनला सुधरवण्यासाठी एवढा जिवांचा आटापिटा करेल. तिचे प्रयत्न बघून कामीनी बाईंना खूप आनंद झाला.

त्याही तिला सहकार्य करत होत्या. हळूहळू हर्षवर्धन मध्ये बदल दिसू लागला होता. पण प्राचीला लग्नानंतरचे सोनेरी दिवस मात्र ऊपभोगता आले नव्हते. कामीनी बाईंना याचं वाईट वाटायचं पण त्यांचाही नाईलाज होता. त्यांनी प्राची वर आईची माया केली. तिला कधीच आईची उणीव भासू दिली नाही.

दिवस काय भराभर पळत होते. हर्षवर्धन थोडा सुधारला
पण व्यवसायात मदत करू शकेल एवढा नव्हता सुधारला. तेव्हाच तन्मयचा जन्म झाला. कामीनी बाईंनी तन्मयची जबाबदारी घेऊन प्राचीला कामासाठी मोकळीक दिली. म्हणूनच तन्मयला आजीचं फार वेड होतं.

आता तन्मय जाणता झाला होता.आईवडलांच्या आयुष्यात काहीतरी बिनसलं आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण विचारणार कसं? शेवटी एकदिवस त्याने आजीला विचारलंच. त्यावेळेस कामीनी बाईंनी खूप शांतपणे मर्यादेत राहून त्याला सत्य सांगीतलं. कामीनी बाईं आणि प्राचीनी हर्षवर्धनच्या मनातला अहं जागवण्यासाठी जी योजना केली ती सांगीतली.

तन्मयला शपथ दिली,

"बाळा तुझ्या बाबांना खूप धीट यशस्वी बनवायचं आहे नं?"

" हो आजी.मला माझे बाबा इतरांच्या बाबां सारखे हवेत."

"मग मला ऑफीसमध्ये जे काही होईल ते सांगायचं. हे सगळं हर्षवर्धन पासून लपवून करायचं आहे. करशील नं?"

कामीनी बाईंनी विचारलं त्यावर तन्मय लगेच म्हणाला

"हो आजी मी अजीबात बाबांना संशय येऊ देणार नाही. जेव्हा मिटींग असेल तेव्हा मी तुला फोन लावीन.तू सगळी चर्चा ऐकत जा.काही वाटलं तर मला सांगत जा."

कामीनी बाईंना तन्मयचं हे बोलणं ऐकून इतकं लाड आलं की त्यांनी त्याची पापी घेतली.

तन्मय तेव्हापासून खूपच शहाणा आणि मॅच्युअर्ड झाल्या सारखा वागू लागला. हा त्याच्यातला बदल प्राचीच्या लक्षात आला. तिनी कामीनी बाईंजवळ आश्चर्य व्यक्त केलं तेव्हा त्यांनी तिला सगळं सांगितलं. तिला मनापासून आनंद झाला.

पण तिनी कामीनी बाईंना सांगीतलं की

"तन्मयला तुम्ही सांगीतलं आहे हे मला माहीती आहे हे त्याला कळून देऊ नका. त्यालाही थोडी या नाट्याची मजा घेऊ द्या. त्याच्यात मोठेपणानी वागण्याची इच्छा झाली आहे आणि तो तसा वागतो आहे तर हे गुपीतच ठेवा."

कामीनी बाईंनी तिला कबूल केलं.

***

बघता बघता नाटकाचा तिसरा अंक संपला आणि राजा राणीची जोडी आनंद नगरीत फिरायला गेली सुद्धा.

कामीनी बाईंना वाटलं जेव्हा काळोख होता तेव्हा दिवस संपता संपत नव्हते सुखाचा किरण दिसता दिसत नव्हता. जेवढे दिवस दु:खाचे सहन करावे लागणार असतात तेवढे सहन करावेच लागतात. ही शेवटी परमेश्वरी इच्छा असते.

आता तो काळोख दूर झाला होता. तन्मयही खूप लवकर मोठा झाला. तो व्यवसायात मनलावून काम करू लागला.

कामीनी ट्रॅव्हल्स वरचं दु:खाचं सावट दूर झालं होतं. भय्यासाहेबांना कामीनी बाईंचं महत्व कळलं आणि त्यांच्यात कमालीचा बदल झाला. त्याने कामीनी बाई आनंदीत झाल्या होत्या. पण प्राचीच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा तिचा नवरा म्हणजे हर्षवर्धन कधी तिचा होईल याचीच त्या वाट बघत होत्या.आज तो तिला मिळाला याचं सूख कामीनी बाईंच्या डोळ्यात साठलं होतं, चेह-यावर दिसत होतं.

आज पटवर्धनांचं कुटुंब ख-या अर्थाने परीपूर्ण झालं.

***

प्राची आणि हर्षवर्धन ऊटीला जाणार हे कळल्यावर राधा आणि शशांकला खूप आनंद झाला. कारण ते दोघंही प्राचीनी लिहीलेल्या नाटकात सामील होते.

प्राची इतकी धीट आणि विचारी मुलगी राधानी बघीतली नव्हती.राधा शशांकच्या लग्नात प्राचीची खूप मदत झाली होती.त्यामुळेच जेव्हा तिनी रावांच्या कडे काम करण्याचा मनसुबा मांडला आणि त्यामागचं कारण सांगीतलं तेव्हा राधाला प्राचीचा खूपच अभीमान वाटला. राधा आणि शशांक दोघांनाही तिला साथ द्यायचं कबूल केलं.

कामीनी बाईं, प्राची, तन्मय, राधा आणि शशांक या सगळ्यांनी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. हर्षवर्धन सामान्य माणसासारखा वागू लागला.

एक इच्छा, एक महत्वाकांक्षा, एक स्वप्न उराशी बाळगण्याचं धाडस हर्षवर्धनमध्ये आलं. जीवनाचा खरा रंग हर्षवर्धनला कळला.

प्राचीने केलेल्या कष्टाचं फळ तिला मिळालं.आता ती सौ.प्राची हर्षवर्धन पटवर्धन असं नाव अभीमानाने सांगू शकणार होती.

तन्मयला सुद्धा आपल्या बाबांचं नाव अभीमानाने सांगता येणार होतं. कामीनीबाई आणि भय्यासाहेबांचा तर तो लाडका झाला.

पटवर्धन कुटूंबात फुललेला हा आनंद मोहर असाच फुललेला राहू दे हीच परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करू.

प्राची आणि हर्षवर्धनच्या आयुष्यात उत्तम संगीताची मैफील जमली आहे तिची रंगत उत्तरोत्तर वाढू दे हीच प्रार्थना आपण परमेश्वराजवळ करू.

पटवर्धन कुटूंबाची कहाणी इथे सुफळ संपूर्ण झाली.

---------------------------------------------------------
समाप्त
लेखिका — मीनाक्षी वैद्य.
कथामालिका कशी वाटली हे नक्की सांगा.
धन्यवाद.