कोकणातले भोरपी - भाग 2 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोकणातले भोरपी - भाग 2

                             कोकणातले भोरपी  भाग 2

                  मथवून मथवून  त्या माणसाला डफ़ावर चढवला की, तो मागचा पुढचा विचार नकरता चढ्या  दराने सौदा करी. अशावेळी जनावरसोडून त्याच्या ताब्यात देताना जमलेल्यां पैकी कोणीतरी चौकशी केली  की बिलंदर भोरपी ठरलेल्या दरापेक्षा आणखी वीस पंचवीस जादाचा आकडा फोडीत. उलट जनावर खरेदी करताना  जनावर बघितल्यावर त्याना अचूकअंदाज यायचा.  हे जनावर  वय झालेलं आहे, लंघलेलं आहे. आपल्याखेरीज  दुसरं कोणीही गिऱ्हा ईक हे उचलणार नाही. हे पक्कं हेरून ते ढोराची केंड करीत.“अरा ऽऽरा, निस्तं कातडं नी हाडं हाईत शेठ. आमी धा गाव फिरणारं. वाटेला कुटे  गचकलं  तर मुदलातच बूड......” नी अगदी  पडत्या भावाने आकडा फोडीत. मालक रंजीस येवून काय काय बतावण्या करीत असे. पण भोरपीसहसा मागितल्या शब्दाबाहेर छादामही जादा द्यायला. तयार नसे. सौदा मोडला नी भोरपी निघून  गेल्यावर घरात बोलणं  होई. काहीच न मिळण्यापेक्षा  भोरपी देतोय् ती चोराच्या हातची लंगोटी म्हणून दुपारी – संध्याकाळी  तळावर जावून संबंधित भोरप्याला भेटून  व्यवहार ठरवून मोकळा होत असे.

                 हे भोरपी महादेव कोळी यावंशाचे. मारुती चितमपल्ली  या प्रख्यातअरण्य ऋषिनी  ईटिया डोहावर लिहीलेल्या लेखात त्याना भेटलेल्या डोमा धीवराचे अतिशक मनोवेधक वर्णन केलेले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे मासेमारीला लागणारी आपदणं - पाग, कांडळ , आऊत,आकी, झाबळी ही आयदणं, फळ तोडणीचे  घळ- झेले विणणं,  हा आहे. तसेच  काथ्याच्या दोरीची अंबाड्याच्या,तागाच्या  क्वचित वाखाच्या नाहीतर कापशी  जनावरांची दावी, मोरक्या, मुसकी , वेसणीची रशी,जुपणं  वळण्यातही हे लोक तरबेज असत. तसेच गोड्या नी खाऱ्या पाण्यातली मासेमारी करण्यातही हे लोक वाकबगार असत . माशांचे थवे  नेमके कुठे असतील, हेत्यांना उपजतच समजायची .  भरती सुकतीचं ताण नी  तिथी वार यानुसार मासेमारी करायचे अचूक होरे  त्याना  परंपरागत ज्ञात असत.  म्हावरं नेमकं कुठे नी  कधी  मिळेल याचं नेमकं ज्ञान असल्यामुळे मासेमारीला गेलेला भोरपी  काही मिळालं नाही म्हणून हात हलवीत  परत येत नसे.  कोणत्या जातीचे मासे दिवसाच्या कोणत्या वेळी गावतात हे कसं कोण जाणे पण त्याना अचूक माहिती पडायचं.  ते नेमक्या  सम्याला  पाग  , कांडळ घेवून  जात नी  अती वेळ न घालवता  टोपल्या भरभरून  मासे पकडून आणित. मात्र  त्यांचे होरे, आडाखेनी  अंदाज याच तपशील मात्र ते प्राण गेला तरी कोणाला सांगत नसत.  दिवसा, रात्री  अवास्तूकपणे ते जेव्हा कधी  म्हावरं पकडायला जात  त्याचा किंचीत सुगावाही कोणाला लागू देत नसत. कुळवाडी त्यांच्यावर भलताच खार खात . ह्येंच्या वांग़डान  जावचा  तर मायझये  कदी  दडॉन जातत तां कळॉक  देयनत नाय. पक्कीअक्करमाशी जात.  

                   वाटेने येता जातानाही प्रत्येकाच्या खांद्यावर अर्धवट विणलेला पाग म्हणा आऊत म्हणा  टाकलेला असे नी त्याचे वीणकाम  विद्युत गतीने यंत्रवत सुरू असे. त्यासाठी वेगळे लक्ष न देता  त्यांचे काम अगदीबिनचूक नी देखणे होत असे. मोठेपणी कुतूहल म्हणून गोपा भोरप्याला  हटकले तेंव्हात्याने देलेले उत्तर ऐकून मी  थक्कझालो.  तो म्हणाला, “ह्या कामात आमच्या कैक पिढ्या गेल्या , मालक. आमीम्हादेव कोळी. आमच्या रक्तातच ह्ये कसब मुरल्यालं ऱ्हातय म्हणा.  मायच्या पोटातआसताना  ह्ये कसब  शिकूनच आमच जल्म  होतो की......” वीण कामासाठी  दोरा गुंडाळलेली  त्यांची स्वनिर्मित  लांबुडकी रिळं असतात . छत्रीच्या गोल घेराला टेकावा देणा ऱ्या लांब ताडीला  नी मधल्या रहाटाला गुंफवलेल्या चौकोनी  ताडीचे तीन ते चार तुकडे  करून त्याची दोन्ही टोकं अर्धां  इंच  दुभाग़ होतील अशी फोडून घासून गुळगुळीत करून दोरा गुंडाळायची  आटी – हूक बनवेला असतो. त्याला  ठराविक लांबीचा दोरा गंडाळून  घेतात, म्हणजेवीणकाम करताना जाळीच्या घरातून ओवून घेवून जाळीच वीण काम वाढवीत जाणं सोप होतं.प्रत्येक आयदणाच्या जाळीचं  घर किती  मापाचं पाहिजे ते ही त्या आयदणाचा वापर कोणत्या जातीचे नी आकारचे मासे पकडायचे हे योजून निश्चित केलेलं असतं. त्या मापाची  सुकलेल्या चिव्याची  पाठबेळं त्याला ते ‘माप‌ -ज्वॉक ’किंवा ‘घरक्याचं  माप’ म्हणतात. कोणत्याआयदणाला  किती जाडीचं सूत वापरायचं ते ही नंबर नुसार ठरलेलं असतं.

                प्रत्येक आयदणाची  लांबी रुंदी ची मापंही  पारंपारिक - ठरीव  असतात. पाग पाण्यात फेकल्यावर गोलाकार रहावा  म्हणून  प्रत्येक घरक्यात  सूत ओवता येईल एवढं  छिद्र असलेल्या विशिष्ठ लांबीच्या  पुंगळ्या – नळ्या  वापरतात. प्लॅस्टिक वापरात येण्या आधी  पाणस्थळाच्या काठावर तसेच विशिष्ठ ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यांवर  तांबेट, चांभारडीवा तत्सम नावाची  गवतीलं  रुजतात. ती पिकल्यावर ठराविक नक्षत्रावर शुक्र उगवती मावळतीचा  होरा साधून ती कापून आणित.त्याच्या काड्यांच्या पुंगळ्या वापरीत. या पुंग़ळ्या पाण्यात न कुजता  जाळं शाबूत असेतो टिकत. तसेच पाग बुडण्यासाठी जडपणा यावा म्हणून  शिशाच्या ठराविक मापाच्या मध्ये छिद्र पाडलेल्या गोळ्या वापरतात. कांडळ हे पाण्यात  उभं करायचं एक प्रकारचं  कुंपणच अ सतं. त्याची एक बाजू जड  आणि एक बाजू हलकी असावी लागते तरच ते पाण्यात उभं राहू शकतं. यासाठीही  पुंगळ्या  नी शिशाच्या गोळ्या वापराच्या लागताय. आयदणसंपूर्ण विणून पुरं झालं की मग त्याच्या टोकाच्या घरक्यांमध्ये  पुंगळ्या किंवा शिशाच्या गोळ्या वेगळा दोरा वापरून गुंतवाव्या लागतात. (क्रमश:)